मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४

पेशवे कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था

                                                 श्री
    राजश्रियाविराजित राजमान्य बाबूराव राम स्वामी गोसावी यांसी पो।। बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंती उपरी चिरंजीव राजश्री जनार्दन याणी आम्हांस पत्र लिहिले कीं " आमच्याने पढवत नाही, अन्न द्याल तर द्या " म्हणोन रागें करून लिहिले. ऐसियास याप्रकारे ल्याहावयास कारण काय जाहाले ते सविस्तर मनास आणून लिहिणे. भीड न धरणे. या दिवसामधे याणीं या प्रकारे आम्हांस लिहावे तस्मात आम्ही कोणी सिक्षेची शिकवणूकच न ल्याहावी, असा सिद्धांत जाहालासा दिसतो. तर तुम्ही त्यास एकांती दोगांस घेऊन बसून साफ पुसणे की आम्ही लिहिण्या पढण्या बोलण्याविसी न ल्याहावे, त्यांचे मनास येईल ते त्यांणी करावे, ऐसाच सिद्धांत करून उत्तर पाठविणे. ( म्हणजे ) आम्ही सर्व सोडून देऊं, उगेच बसूं. जे त्याचे प्राक्तनी असेल ते होईल. जर आमचे सिकणे ऐकणे आहे तर आपले मनात येईल ते बरे वाईट येकीकडे ठेवून, सिष्यपणे चाकरपणे राहावे ; जे सांगू ते त्याप्रमाणे करावे ; विस्तार याचा काय ल्याहावा ? कलयुग प्रधान असे हे विनंती.
     बाळकृष्णशास्त्री हे नीट पढत नाहीत, भलतीकडे पाहातात, मधे बोलतात, येकाग्रचित करीत नाही यास्तव रागे भरले. यास्तव विद्येचा त्याग करावा असे नाही. गुरु आहेत. त्यांनी रागे भरले पाहिजे. कोणीही काम येकचित्त करून केलियावांचून सहसा होत नाही. येखादे समयी त्याणी शासन केले तरी सोसून गुरुमर्यादापूर्वक जो सिष्य सहन करतो तोच महापात्र होतो. तुम्हीही जाणता. हे सिष्य होत्साते रागे भरुं लागले तेव्हां त्याणी त्यास सिकवणे उचित नव्हे. विस्तार काय लिहिणे. 


    विवेचन :- प्रस्तुत पत्र हे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याने स्वारीतून बाबूराव फडणीस यांस लिहिले आहे. या पत्राची तारीख श्री. केळकरांनी न दिल्याने काही प्रश्न हे अनुत्तरीत राहतात पण त्यास इलाज नाही. असो, नानासाहेब पेशव्यास रघुनाथ व्यतिरिक्त रामचंद्र व जनार्दन हे दोन सख्खे बंधू होते.  रामचंद्राचा जन्म स. १७२३ चा असून तो १७३३ मध्ये वारला तर जनार्दनचा जन्म दि. १० जुलै १७३५ चा असून तो रघुनाथरावापेक्षा वयाने लहान होता.असो, दि. २८ एप्रिल १७४० रोजी बाजीराव पेशव्याचे निधन झाल्यावर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबाकडे पेशवेपद तर आलेच पण लवकरच चिमाजीआपाचा मृत्यू झाल्याने कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे स्थानही त्यास प्राप्त झाले. तेव्हा घरातील मुलांच्या शिक्षणाची वगैरे सर्व जबाबदारी त्याच्या गळ्यात येऊन पडली. तत्कालीन प्रघातानुसार जे काही ब्राम्हण कुटुंबातील मुलांचे शिक्षण होते त्या पलीकडे जाऊन पेशवे कुटुंबातील मुलांना शिक्षण घ्यावे लागे. यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जात असे. परंतु , कितीही झाले तरी हि पेशव्यांची मुले !  यांना सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे गुरुजींनी रागावले अथवा बरे वाईट बोलले असता कसे सहन होईल ? असाच प्रकार जनार्दनाच्या बाबतीत झाला. जनार्दनाच्या शिक्षणासाठी बाळकृष्णशास्त्रीची नेमणूक करण्यात आली होती. जनार्दनपंताची लहर सांभाळून तो त्यास शिकवायचे काम करी, परंतु जनार्दनाचा हूडपणा अधिक वाढला तेव्हा शिक्षकीपेशास अनुसरून बाळकृष्णशास्त्री त्यास रागवला तेव्हा आपण शिकणार नाही असे आपल्या वडीलबंधूस लिहून कळवले. त्यावेळी नानासाहेब पेशवा मोहिमेत असून त्याने बाबूराव फडणीसास उपरोक्त पत्र लिहून सर्व प्रकाराची माहिती तर मागवलीच पण सोबत जनार्दनालाही कशा प्रकारे समजावून सांगायचे हे देखील त्याने बाबूरावास पत्राद्वारे कळवले.    


संदर्भ ग्रंथ :-
१) काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे :- श्री. य. न. केळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: