गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ८ )


    बाजीरावाच्या मनधरणीने नाना अप्रत्यक्षपणे का होईना कारभारात आला. पेशव्याने आपल्या संरक्षणार्थ मुंबईला दोन इंग्रजी पलटणे पोसण्याचा उपद्व्याप चालवला असल्याचे त्यांस समजताच त्याने बाजीरावास त्या पलटणांचा करार रद्द करण्याची सुचना केली व पेशव्यानेही आपल्या कारभाऱ्याची सुचना लगेच अंमलात आणली.

    या काळातील घटनाक्रम ; बाजीराव, नाना, दौलतराव इ. महापुरुषांची कृत्ये ; अस्सल पत्रव्यवहार व त्यावरील इतिहासकारांचे स्वतःच्याच विधानांशी विसंगत असणारे निष्कर्ष वाचले कि, दुसऱ्या बाजीरावाची कारकीर्द म्हणजे निव्वळ ' गाढवांचा गोंधळ ' वाटू लागतो. नाना - बाजीराव एकमेकांना पाण्यातही पाहतात. स्वहित साधण्याकरता इंग्रजांच्या गळ्यांत गळे काय घालतात व परत लगेच एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सहमत होत एकत्र काय येतात. सारेच विचित्र ! 

    असो. तर दरबारी कट - कारस्थानात पेशवे - फडणीस मग्न असले तरी अधून - मधून त्यांची  नजर राज्यहिताकडेही वळत होती. परशुरामभाऊ कर्नाटकांत करवीरकरांशी लढण्यात गुंतल्यामुळे बाजीरावाने रामचंद्र परशुरामास निजाम - इंग्रजांच्या टिपूविरुद्ध मोहिमेत, आपल्या वतीने सामील होण्याची आज्ञापत्रे रवाना केली. परंतु , रामचंद्र श्रीरंगपट्टणच्या आसपास देखील पोहोचला नाही तोच टिपू मारला गेल्याची बातमीपत्रे पुण्यास येऊन थडकली. 

    इकडे इंग्रजांनी, टिपूच्या राज्याचे चार भाग करून पैकी ४४ लाखांचा प्रदेश म्हैसुरच्या मूळ राज्यघराण्याचा वंशज कृष्णराज वोडीयार यांस देऊन त्याची स्थापना केली. सात लक्ष सत्याहत्तर हजार उत्पन्नाचा प्रदेश इंग्रजांनी स्वतःकडे ठेवत निजामाला सहा लाखांचा प्रांत दिला व २ लक्ष ६३ हजार उत्पन्नाचा प्रदेश मोहिमेत सहभागी  होणाऱ्या पेशव्यास पुढील अटींवर देऊ केला :- 
१) करारात ठरल्याप्रमाणे पेशव्यांची फौज आमच्या मदतीस आली नाही. इतकेच नव्हे तर टिपू बरोबर आमचे युद्ध सुरु असताना पुणे दरबारने टिपूचा वकील आपल्या पदरी बाळगला. सबब वाटणी मागण्याचा त्यांस हक्क नाही.

२) परंतु , आम्ही पेशव्यांस दहा लक्ष रुपये उत्पन्नाचा मुलुख देऊन पण त्याकरता त्यांनी आमच्या खालील अटी मान्य केल्या पाहिजेत :-

(१) म्हैसुरच्या राजाकडून चौथाई मागू नये.
(२) निजामाप्रमाणे पेशव्यांनीही आमच्यासोबत तैनाती फौजेचा करार करावा.
(३) निजाम - पेशवे यांच्यात तंटा उद्भवल्यास आमच्या मध्यस्थीने निकाल व्हावा.
(४) परचक्र आले असता निजाम - इंग्रज - पेशवे यांनी एकमेकांना मदत करावी. या प्रकरच्या करारास नागपूरकर भोसले अनुकूल असतील तर त्यांनाही सहभागी करून घ्यावे.
(५) सुरत शहराच्या उत्पन्नात पेशव्यांचा जो हिस्सा आहे तो त्यांनी सोडून द्यावा. बदल्यात तितक्याच उत्पन्नाचा प्रदेश त्यांना दिला जाईल.
(६) पेशव्यांनी फ्रेंच लोकांना आपल्या राज्यात आसरा व सैन्यात नोकरी देऊ नये.           


    इंग्रजांच्या या अटींवर बाजीराव - नानाने पुढीलप्रमाणे उत्तरे कळवली :-
राज्यातील कलहामुळे मोहिमेस वेळेवर सैन्य पाठवता आले नाही. टिपूच्या वकिलाचे म्हणाल तर, दोन राज्यात युद्ध चालू असताना परस्परांचे दरबारी एकमेकांच्या वकिल असण्याचा जुनाच रिवाज आहे. त्याने वाटणीच्या हक्कास बाधा येत नाही.
(१) इंग्रज जो आम्हांला दहा लक्षांचा प्रांत देत आहेत त्याबदल्यात म्हैसुरवरील चौथाई सोडून देण्याचे आम्ही मान्य करतो.
(२) इंग्रजांची तैनाती फौज आम्ही जरूर बाळगू पण मग तिच्यावर हुकुमत आमची असेल व आम्ही सांगू त्या कामगिरीवर तिने गेले पाहिजे. आम्ही जंजिऱ्यावर मोहीम काढू तेव्हा या पलटणांना सोबत घेऊ.
(३) निजाम व आमच्यात काही तंटा उद्भवल्यास मध्यस्थीकरता इंग्रजांनी मध्ये पडण्याचे काहीच कारण नाही.
(४) एकमेकांच्या संरक्षणार्थ निजाम - इंग्रजांशी करार करायचा झाल्यास त्यात नागपूरकरांचा सहभाग कशाकरता हवा ? ते आमचे नोकर असल्याने आमच्या परवानगी खेरीज परराज्याशी करार करू शकत नाहीत.
(५) सुरत शहराच्या उप्त्न्नातील हिस्सा आम्ही सोडणार नाही.
(६) फ्रेंचांनी हिंदुस्थानवर स्वारी केल्यास त्यांना हाकलून लावण्यासाठी आम्ही इंग्रजांना मदत करू पण त्या जातीच्या लोकांना नोकऱ्या न देण्याची अट नामंजूर आहे.
 

[ महत्त्वाची नोंद :- म्हैसुर राज्याच्या वाटणीत नेमका किती लाख उत्पन्नाचा प्रदेश पेशव्याला मिळणार होता या संबांधी सरदेसाई आणि खरे यांच्यात एकवाक्यता नाही. खऱ्यांच्या माहितीनुसार दहा लाख रु. उत्पन्नाचा तर सरदेसाईंच्या मते २ लक्ष ६३ हजार रु. उप्त्न्नाचा प्रांत इंग्रजांनी पेशव्याला देऊ केला होता. ]         
    वरवर पाहता देखील या अटी बाजीरावाने मान्य करणे म्हणजे आपले स्वातंत्र्य गमावणेच होतं. बाजीराव राजकारणात कितीही अनभिज्ञ असला तरी त्याला इंग्रजांच्या या अटींमागील कपटाची चांगलीच जाणीव होती. त्याने या अटी मान्य करण्याचे साफ नाकारले व पेशव्याच्या वाटणीचा मुलुख निजाम - इंग्रजांनी आपसांत विभागून घेतला. 


    इंग्रजांचे धोरण आक्रमक असले तरी नैतिकतेच्या बळावर ते आपले प्यादे पुढे दामटत होते. म्हैसुरच्या मूळ वोडीयार घराण्यास बाजूला सारून त्यांच्या पदरी लष्करी अंमलदार असलेल्या हैदरअलीने म्हैसुरची सत्ता बळकावली होती. पेशव्यांनी आजवर म्हैसुरवर इतक्या स्वाऱ्या केल्या पण त्यांना कधीही या वोडीयार घराण्याची वा त्यांच्या अधिकारांची आठवण झाली नाही. परंतु इंग्रजांनी या वोडीयार घराण्याची ढाल पुढे करून पुणेकरांना हात चोळत बसण्यास भाग पाडले. नानासाहेब पेशवा, थोरला माधवराव व पुढे नाना फडणीस या तीन शहाण्यांना जे जमले नाही ते वेल्स्लीने अल्पवधीत केले !  

    म्हैसूर युद्धांतील हातातून निसटलेला डाव भरून काढण्यासाठी बाजीरावाने निजामावर स्वारी काढण्याचा बेत रचला. जोडीला शिंद्याची पलटणे असल्याने त्याला निजामाची धास्ती बिलकुल नव्हती. परंतु , पेशव्याची राजकीय चाल ओळखून वेल्स्लीने निजामाला मदतीचे आश्वासन तर दिलेच पण त्या आश्वासन पत्राची नक्कलच त्याने पुणे दरबारास पाठवून दिल्याने बाजीरावाने आपले मनोरथ गुंडाळून ठेवले.


    इकडे कर्नाटकांत कोल्हापूरकरांनी रत्नाकरपंत राजाज्ञास पेशव्यांच्या प्रदेशात स्वारी करण्यास रवाना केले. पेशव्याच्या वतीने धोंडोपंत गोखले त्याच्याशी लढत होता. स. १७९८ च्या अखेरीस त्याने राजाज्ञास पिटाळून लावण्यात यश मिळवले असले तरी पेशव्याच्या आज्ञेने परशुरामभाऊ सातारचे प्रकरण उरकून कर्नाटकांत रवाना झाला. गोखल्याने राजाज्ञास चेपलेले पाहून सुरापूरकडची खंडणी गोळा करत तो मनोळीकडे येऊ लागला. रत्नाकरपंताचा यावेळी मनोळीस मुक्काम असून खुद्द करवीरकर छत्रपती शिवाजीराजे त्याच्या पाठपुराव्यासाठी तिकडे येत होते. याच काळात शिंदे बाया कोल्हापूरकर व पटवर्धन अशा दोन्ही ठिकाणी, आपणांस कोणाचा आश्रय मिळतो याची चाचपणी करत होत्या. पैकी, भाऊ कर्नाटकांत असल्याने त्याचा व बायांचा संबंध आला नाही आणि करवीरकरांची बायांशी प्रत्यक्ष भेट घडूनही त्यांची परस्परांना कसलीच मदत होऊ शकली नाही. उलट कोल्हापूरच्या शिवाजीने दौलतराव व नाना फडणीसकडे पटवर्धनांशी लढण्याकरता मदत मागितली. बायजाबाईच्या बापाची जहागीर कागल --- कोल्हापूरकरांच्या अखत्यारीत असल्याने दौलतरावाची चांगलीच पंचाईत झाली. इकडे नानालाही कोल्हापूरकरांची मागणी मान्य - अमान्य करणे जड गेले व त्याने भाऊला कोल्हापूरचा नाद सोडण्याचा सल्ला दिला. परंतु तिकडे साफ दुर्लक्ष करून भाऊ करवीरकरांवर चालून गेला.


     दि. १७ सप्टेंबर १७९९ रोजी पट्टणकुडीचा संग्राम घडून त्यात भाऊ मारला गेला. लढाईत त्याचे दोन्ही पुत्र पराभव होताच पळून गेले. भाऊ देखील पराभवाचा रंग पाहून निघाला असेल अशी त्यांची कल्पना होती पण तो गोटातच राहून त्याची छत्रपतींच्या शेलक्या सैनिकांशी झुंज होऊन त्यांत मरण आले. भाऊच्या निधनाने पेशव्याच्या राज्याला फार मोठा धक्का बसला असे काही नाही. तसेच करवीरकरांचाही मोठा लाभ झाला असेही नाही. परंतु, पुणे दरबारात आता नाना व तात्या दोघे एकाकी मात्र पडले हे निश्चित ! 
    परशुरामभाऊचा सूड घेण्याकरिता पेशव्याने पटवर्धनांच्या मदतीला मानाजी फाकडे, मालोजी घोरपडे, तोफखाना प्रमुख गणपतराव पानसे, विंचूरकर, पेठे, जाधव, पवार, नाना फडणीसची पथके व शिंद्याच्या काही पलटणी ब्राऊनरिंगच्या हाताखाली स. १७९९ अखेर पाठवल्या. स. १८०० च्या जानेवारीच्या उत्तरार्धात शिराळयाचे ठाणे काबीज करून पुण्याच्या फौजा पटवर्धनांच्यासह थेट कोल्हापूरास जाऊन भिडल्या. कोल्हापूरास हा संग्राम सुरू असताना पुण्यास वेगळ्याच घटना घडू लागल्या होत्या.

     स. १७९९ च्या नोव्हेंबरात इंग्रजांकडून वकील आले व त्यांनी पेशव्यास सांगितले कि, ' तुमच्या नावे इंग्रज बादशाहचे फर्मान आणले असून त्याचा स्वीकार करण्यासाठी पेशव्याने मुद्दाम बाहेर डेरे द्यावे. फर्मनास सामोरे जाऊन त्याच्या स्वीकृतीसाठी दरबार व फर्मानबाडीचा समारंभ करावा. फर्मान दरबारात हजर केले जाईल तेव्हा पेशव्याने उभे राहून त्याचा स्वीकार करावा व फर्मान स्वीकारल्यावर १०० तोफांची सलामी द्यावी.'  इंग्रजांच्या या मागणीवर बाजीरावाचे गोंधळून जाणे स्वाभाविक होते. पूर्व रिवाजांची त्यांस कल्पना नसल्याने त्याने याविषयी नानाचा सल्ला विचारला. तेव्हा नानाने त्यांस सांगितले कि, ' फर्मानबाडीचा समारंभ फक्त दिल्लीच्या बादशाह करिता होतो. तेव्हा इंग्रज बादशाह करता तो करण्याची गरज नाही. फर्मान दरबारात प्रवेशते त्या समयी पेशव्याने उभं राहावं अशी इंग्रजांची मागणी मान्य करण्याचे काही कारण नाही. पूर्वी थोरल्या माधवरावाचा काळात असेच फर्मान घेऊन मॉस्टीन आला. ते त्याने नेहमीच्या दरबारात पेशव्याच्या हाती दिले होते. तेव्हा यावेळी विशेष दरबार भरवण्याची गरज नाही. तसेच पेशवे दरबारात येण्यापूर्वी फर्मान घेऊन इंग्रजांनी दरबारात हजर राहावे व पेशव्यांनी तख्तनशीन होण्यापूर्वी पेशव्याकडे अथवा मुनशीकडे द्यावे. तसेच खुशाली करता तोफेचे १०० बार करण्याइतकी हि काही मोठी घटना नसल्याने नेहमीच्या प्रथेनुसार वीस बार करावेत. ' नानाने सांगितलेली उत्तरे पेशव्याने इंग्रजांस कळवली तेव्हा त्यांनी त्यांस अनेक आक्षेप घेतले खरे पण नानाने सुचवलेल्या शर्तींवरच त्यांना हा फर्मानाचा समारंभ दि. ७ जानेवारी १८०० रोजी पार पाडता आला. 

    टिपूच्या नाशाचे राजकीय परिणाम  काय झाले आहेत हे पेशव्यांच्या, विशेषतः हिंदुस्थानच्या तमाम संस्थानिकांना जाहीर व्हावेत याकरता इंग्रजांची हि फर्मानबाडीची धडपड होती. परंतु, नाना - बाजीरावने ती हाणून पाडली !


    स. १७९९ - १८०० च्या दरम्यान पुण्यात एक बातमी पसरली कि, ' अंगठीवरील हिरा काढून नवीन बसवायचा आहे. ' या बातमीला अफवा म्हणून इतिहासकारांनी दुर्लक्षित केले असले तरी तत्कालीन घटनाक्रम पाहता हि बातमी खरीच होती असे म्हणावे लागेल. खुद्द बाजीरावाचा याबद्दल असा समज झाला कि, अमृतरावाचा मुलगा विनायकराव यांस स. माधवाच्या पत्नीस दत्तक देऊन पेशवा बनवण्याचे कारस्थान चालले असून याचे सुत्रधार नाना, बाळोबा व अमृतराव हे तिघे आहेत. नाना व इतरांच्या संशयास्पद हालचाली पाहता बाजीरावाचा हा समज अवास्तव नव्हता असे म्हणणे भाग आहे. 

    स. १७९७ मधील भांबुर्ड्याच्या लढाईत जीव वाचवून पळालेल्या विठोजी - यशवंत या होळकर बंधूंचे सामार्थ्य यावेळी बरेच वाढले होते. यशवंतराव यावेळी माळव्यात प्रबळ झाला होता. होळकरांचे संस्थान दौलतरावाच्या कह्यात चाललेलं होळकरशाहीच्या जुन्या - जाणत्या निष्ठावान सरदार मुत्सद्द्यांना स्षष्ट दिसत होते. त्यांना यशवंतरावाच्या रूपाने नवा नेता मिळाला व त्याच्या नेतृत्वाखाली गोळा होऊन त्यांनी शिंद्याविरुद्ध लढा पुकारला. उत्तरेत ठिकठिकाणी आपला अंमल बसवत व शिंद्याच्या पलटणांचा समाचार घेत यशवंतराव होळकर घराण्याची एक प्रकारे पुनर्स्थापना करत होता. नाना फडणीसचा होळकर घराण्याला पूर्वीपासूनचा पाठिंबा होता. आता दौलतरावाची लष्करी घमेंड उतरवण्याचे सामर्थ्य यशवंतरावाकडे असल्याचे पाहून त्याने यशवंतरावला दक्षिणेत येण्याचे आमंत्रण दिले. 


    इकडे दक्षिणेत विठोजी होळकरही अमृतरावाच्या नावाने धुमाकूळ घालत होता. त्याने व त्याच्या साथीदारांनी पेशव्याच्या प्रदेशाची धूळदाण उडवण्यास सुरवात केली. त्याच्या बंदोबस्तासाठी बाजीरावाने रवाना केलेले कित्येक सरदार एकतर पराभूत झाले वा त्यालाच जाऊन मिळाले. खुद्द शिंद्याचेही पगार न मिळालेले काही सरदार विठोजीच्या गोटात दाखल झाले. विठोजीचा हा सारा उपद्व्याप अमृतरावाच्या नावाने चालला होता व अमृतराव नानाला सामील असल्याने बाजीराव काळजीत पडणे स्वाभाविक होते. 

    आपल्या विरोधात चाललेली कट - कारस्थानं हाणून पाडण्यासाठी त्याने दौलतरावाकडे सर्जेरावास कैदेतून सोडण्याची गळ घातली. परंतु, सर्जेरावास बंधमुक्त करण्यास बाळोबा तयार नव्हता. तसेच सर्जेरावास मोकळे केल्यास महादजीच्या स्त्रिया बिथरण्याचा संभव असल्याने मनात असूनही सर्जेरावास मोकळे करण्याची दौलतरावाची हिंमत होत नव्हती. तेव्हा पेशव्याने त्यांस मसलत सुचवली. त्यानुसार बापाला कैदमुक्त करावे म्हणून बायजाबाईने अन्नत्याग केला. तेव्हा बायको उपाशी असताना आपण कसे जेवायचे म्हणून दौलतरावानेही उपोषणास आरंभ केला. कारभाऱ्याच्या दुराग्रहाने धनी - धनीण उपाशी राहू लागले हा प्रवाद टाळण्याकरता दि. ४ जानेवारी १८०० रोजी बाळोबातात्याने सर्जेरावास मोकळे केले. महापराक्रमी सर्जेरावाने कैदेतून सुटका होताच बाजी व दौलतरायासमोरील संकटांचे निवारण करण्यास आरंभ केला.

    दौलतरावाच्या विरोधी पक्षाचे बलस्थान म्हणजे यशवंतराव होळकर. तूर्तास तो दृष्टीआड असल्याने आपल्या जवळचे जे त्यांस पटकन अनुकूल होतील असे म्हणजे --- कारभारी मंडळ व महादजीच्या स्त्रिया ! पैकी महादजीच्या स्त्रियांचे शिंद्यांच्या लष्करावरील वजन सर्जेरावाने चांगलेच अनुभवले असल्याने त्याने थेट महादजीच्या बायकांनाच मारण्याचे ठरवले. त्यानांच जर नाहिसे केले तर प्रसंग पडला असता लष्कर कारभारी मंडळींच्या विरोधात दौलतरावाच्याच पाठीशी उभा राहील अशी त्याची अटकळ होती. त्यानुसार दि. १४ जानेवारी १८००  रोजी त्याने महादजीच्या स्त्रियांच्या छावणीवर भल्या पहाटे हल्ला केला. पण स्त्रिया सावध असल्याने सर्जेरावाचा डाव फसला व हल्लेखोरांना झोडपत महादजीच्या स्त्रिया बचावून बाहेर पडल्या. 


    सर्जेरावाच्या या कृत्याने बाळोबा वगैरे मंडळी हादरून गेली. खुद्द शिंद्याचा कारभारी बाळोबा तात्या जीवाच्या भीतीने दरबारी जायचा बंद झाला. सर्जेराव कधीही आपणांस दगा देईल म्हणून धरणे बसविण्याच्या निमित्ताने त्याने सरदार - शिलेदार जवळ बाळगले व दौलतरावास निरोप पाठविला कि, ' मी कारभार करत नाही. पाहिजे तर मला कैद करा वा निरोप द्या ! ' तेव्हा चार मध्यस्थांच्या मदतीने दौलतरावाने बाळोबाची समजूत काढली व त्यांस कारभारावर येण्यास भाग पाडले. प्रसंग पाहून बाळोबाने दौलतरावाची मर्जी राखली पण अंतस्थरित्या त्याने परशुरामभाऊच्या मुलाला --- रामचंद्रआपास सावधतेच इशारा दिला. रामचंद्र त्यावेळी शिंद्यांच्या व पुणे दरबारच्या सरदारांच्या मदतीने कोल्हापूर मोहिमेत व्यस्त होता. अजून तरी करवीर आघाडीवर सर्जेरावाची नजर पडली नव्हती. अशा स्थितीत जानेवारी उलटून गेला व फेब्रुवारीत नाना फडणी
तापाने आजारी पडला. त्याचा ताप वाढत जाऊन दि. १३ मार्च १८०० रोजी त्याचे निधन झाले !
                                                                                  ( क्रमशः )

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ७ )


    ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने हिंदुस्थानच्या गव्हर्नर जनरलपदी सर जॉन शोअरच्या जागी रिचर्ड वेल्स्लीची नियुक्ती केली व तो दि. १७ मे १७९८ रोजी अधिकारपदी दाखल झाला. यावेळी नेपोलियनचा मुक्काम इजिप्तमध्ये असून त्याचा हिंदुस्थानात येण्याचा विचार असल्याचे वेल्स्लीला वाटेतच समजले होते. तेव्हा हिंदुस्थानात जाताच फ्रेंच धार्जिण्या सत्तांना आपल्या पंखाखाली आणण्याचा त्याने प्रवासातच बेत आखला होता. इकडे येऊन पोहोचल्यावर जेव्हा त्याने ठीकठीकाणच्या वकिलांचे राजकारणी खलिते अभ्यासले तेव्हा त्याने पेशवा, निजाम व टिपू हे आपले संभाव्य तीन शत्रू व नेपोलियन / फ्रेंचांचे मित्र  मानून त्यांच्याविरोधात राजकीय व लष्करी मोहिमा आखण्यास आरंभ केला. 

    सध्या तरी त्याला पुणे दरबारची फिकीर करण्याची गरज नव्हती. कारण, तिथे प्रत्येकजण आपल्यापेक्षा दुर्बलाची मुंडी मुरगळण्यात मग्न होता. अशा स्थितीत पुणे दरबार इंग्रजांच्या विरोधात काही कारवाई करेल हे संभवत नव्हते. पण त्यांच्या आपसांतील झुंजीचा फायदा घेऊन पेशव्यावर आपला शह बसवण्यासाठी त्याने आपल्या पुण्यातील वकीलास --- पामर यांस लिहिले कि, ' बाजीराव जर शिंद्याला दूर करेल तर अडी - अडचणीच्या प्रसंगी इंग्रज सरकार त्यांस मदत करेल. '  तसेच ' नाना फडणीस आपल्या मदतीची अपेक्षा बाळगत असेल तर आपल्या हितास बाधा न येईल अशा प्रकारे त्यांस मदत करता आली तर करा ! ' असेही त्याने पामरला सांगितले. त्यानुसार पामर पुण्यात खटपट करत राहिला. शिंद्यांच्या अरेरावीने वैतागलेल्या बाजीरावाने पामर करवी दोन पलटणे आपल्या संरक्षणास्तव मागून घेतली पण शिंद्यांशी विरुद्ध न दिसावे यासाठी ती मुंबईतच ठेवून प्रसंग पडला असता पुण्यास यावीत अशी तजवीज केली. या पलटणांचा दरमहा खर्चही तो पामरला देऊ लागला होता. या प्रकारे पेशव्याचे प्रकरण काहीसे मार्गी लागताच वेल्स्लीने निजामाकडे आपले लक्ष वळवून दि. १ सप्टेंबर १७९८ रोजी तैनाती तहाने त्यांस आपल्या पक्षात वळवून घेतले. निजामाच्या कवायती फौजेचा फ्रेंच सेनानी यावेळी मरण पावल्याने वेल्स्लीला हे कार्य सहज पार पाडता आले. अशा प्रकारे निजाम - पेशव्यांची प्रकरणे मार्गी लागताच वेल्स्लीने शिंदे - टिपूकडे आपला मोर्चा वळवला. 


    दौलतराव शिंद्याच्या कर्तबगारी एव्हाना सर्वांनाच कल्पना येऊन चुकली होती पण, त्याच्याजवळील महादजी वेळचे अनुभवी सरदार व फ्रेंच अंमलदारांच्या हाताखालील पलटणांची इंग्रजांना धास्ती होती. तेव्हा शिंद्याला हाताळण्यासाठी वेल्स्लीने निराळाच उपक्रम आरंभला. ' अफगाण बादशाह जमानशाह मोगल बादशाहला शिंद्यांच्या ताब्यातून स्वतंत्र करण्यासाठी दिल्लीवर चालून येणार असून या स्वारीसाठी तो इंग्रजांची मदत मागत असल्याचे ' वेल्स्लीने दौलतरावास कळवले. यानिमित्ताने दौलतराव उत्तरेत जाईल व त्याच्या अनुपस्थितीत टिपू बद्दल  निश्चित धोरण अंमलात आणता येईल. तसॆच जमानशाह जर हिंदुस्थानात आलाच तर शिंदे - अफगाण परस्पर लढून दुर्बल होतील तर त्यात अंती इंग्रजांचाच फायदा होता. परंतु, दौलतरावाने वेल्स्लीचा निरोप फारसा मनावर न घेतल्याने त्याचा हा डाव वाया गेला व शिंद्याच्या उपस्थितीतच त्याला टिपूचे प्रकरण उरकावे लागणार असा रंग दिसू लागला ! 


    तेव्हा त्याने पेशव्यास कळवले कि, ' श्रीरंगपट्टणच्या वेळी ठरलेल्या करारानुसार टिपूचे वर्तन नसल्याने लवकरच त्याच्याशी युद्धप्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. आधीच्या निजाम - इंग्रज - पेशवा त्रिवर्ग करारानुसार संभाव्य मोहिमेत आपण आम्हांस सामील होणार कि नाही ? होणार असाल तर सर्वप्रथम शिंद्यांच्या सैन्यातील फ्रेंच अधिकारी काढून टाकावेत. कारण, फ्रेंच - टिपूची मैत्री असल्याने व फ्रेंच आमचे शत्रू असल्यामुळे संभाव्य मोहिमेत फ्रेंचांची उपस्थिती आम्हांस अडचणीची आहे. ' बाजीराव - नानाला इंग्रजांची मसलत समजली पण त्यांच्या तडफेचा अंदाज काही आला नाही.  याच सुमारास निजामाने इंग्रजांच्या सोबत केलेल्या तैनाती कराराची नक्कलही पेशव्यास पाठवण्यात आली. परंतु त्याकडे यावेळी सर्वांनीच दुर्लक्ष केले. 

    नाना आपला जम बसवण्याच्या नादात होता तर बाजीराव राज्यकारभार शिकण्याच्या ! दौलतराव यावेळी कोणत्या खेळात मग्न होता काय माहित ? परंतु, बाजीरावावर आपला शह बसवण्यासाठी लॉर्ड वेल्स्ली मात्र अत्यंत आतुर, उत्सुक होता. आपल्याविषयी पेशव्यास आत्मियता वाटावी, विश्वास बसावा याकरता रघुनाथरावाने इंग्रजांकडे गहाण ठेवलेले अलंकार त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज माफ करून बाजीरावास दिले.  जवाहिरांसाठी दादा मरेपर्यंत झुरला. इंग्रजांकडे मागणी करून थकला. पण इंग्रजांनी त्यावेळी त्यांस दाद दिली नाही. परंतु , आता मात्र त्यांच्या हृदयाला स्वार्थी पाझर फुटला. वेल्स्लीच्या या दर्यादिलीचा बाजीरावाच्या मनावर कितपत प्रभाव पडला हे रावबाजीच जाणे ! 

    इंग्रज समस्त हिंदुस्थानावर आपले वर्चस्व लादण्याच्या बेतात असताना इकडे पुण्यात वेगळाच तमाशा चालला होता. गादीवर पेशवा होता पण त्याचे हुकुम, अधिकार शहरात सोडा, दरबारात पण चालत नव्हते. पेशव्याचा कारभारी नाना फडणीस --- पदावर नियुक्ती होऊनही कारभार हाती घेत नव्हता. अलिजाबहाद्दर दौलतराव शिंदे हा राज्यकारभार सोडून इतर कामांत व्यस्त होता. अशाने राज्यकारभार सुरळीत होणार तरी कसा ? बाजीरावाने यावेळी थोडा कमीपणा घेऊन दि. १४ नोव्हेंबर १७९८ रोजी रात्रीच्या वेळी फक्त एक शिपाई सोबत घेऊन वानवळ्यांच्या वाड्यात मुक्कामास असलेल्या नानाची भेट घेऊन त्याच्या पायांवर डोकं ठेवलं व राज्य सांभाळण्यासाठी त्याची आर्जवं केली. तेव्हा नानाने त्यांस संमती दर्शवली पण, ' आपण स्वतः दरबारात येणार नाही. आपल्या वतीने नारोपंत चक्रदेव तिथे हजर राहिल व आपल्या सल्ल्याने तो कारभार करेल ' अशी नानाने अट घातली. पेशव्याने ती मान्य केली. नाना फडणीसचे प्रकरण मार्गी लागते न लागते तोच पटवर्धनांचा मामला पुढे आला. परशुराम भाऊस पेशव्याने कैदमुक्त करून मोहिमेवर पाठविले असले तरी त्याचा सरंजाम अजून मोकळा केला नव्हता. पटवर्धनांच्या कारकुनाने याविषयी बोलणे काढले असता पेशव्याने पटवर्धनांची जहागीर कायम करण्यास्तव सरकारी नजर तर मागितलीच पण शिंद्याकडे दहा लाखांचा भरणा करण्यासही सांगितले. या दरम्यान इतरही घटना घडतच होत्या.


     शिंदे बायांच्या पक्षातून अमृतराव जरी फुटला असला तरी चालू राजकारणातून निवृत्ती घेण्याची त्याची इच्छाही नव्हती व वयही नव्हते ! त्याने पाहिले इंग्रजांचे राजकारण चढाईचे आहे. बाजीराव कारभारात धडपडत आहे तर नाना पायापुरते पाहतोय. निजाम इंग्रजांच्या कच्छपी लागला. सर्जेरावीत पुण्याची व जुन्या मुत्सद्द्यांची दुर्दशा झाली. महादजी शिंदेच्या वेळचा शिंदेशाहीचा फक्त दरारा राहिला होता. दौलतरावामुळे तोही आता पोकळ बनू लागला होता. अशात कारभार आपल्या हाती घेतल्याखेरीज निभाव लागणार नाही असे ठरवून त्याने नानाचा हस्तक गोविंदराव काळे यांस आपल्या बाजूला वळवले व त्याच्या आणि शिवराम थत्तेच्या मार्फत शिंद्याकरवी नानाला पकडण्याचा घाट रचला. या बदल्यात चाळीस लाख रुपयांचे आमिषही दौलतरावास दाखवण्यात आले. परंतु दौलतराव सध्या नानाच्या उपकाराखाली दबलेला असल्याने त्याने हि गोष्ट सरळ नानाच्या कानी घातली. नानाला याविषयी बाजीरावाचा संशय येऊन त्याने थेट पेशव्याकडेच या बाबत विचारणा करताच त्याने याच्याशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करत दोषींवर कारवाई करण्याचे नानास स्वातंत्र्य दिले. तेव्हा काळे, थत्ते यांना कैद करून नानाने अनुक्रमे सिंहगड, कर्नाळा येथे पाठवले.
 

    अशा प्रकारे पुणे दरबार आपसांतील तंट्यात गुरफटला असताना तिकडे निजाम - इंग्रजांच्या फौजा टिपूविरुद्ध लढण्यासाठी तयार होऊ लागल्या होत्या. त्रिवर्गाच्या श्रीरंगपट्टण मोहिमेने म्हैसुरकरांचे कंबरडे आधीच मोडले होते. त्यात पुन्हा त्यांची स्वारी आल्यास आपला निभाव लागणार नाही हे हेरून टिपूने पेशव्याकडे वकील पाठवून, पैसा भरून हि स्वारी रद्द व्हावी --- निदान पुणेकरांनी त्यात सहभागी न व्हावे अशी खटपट चालवली. बाजीरावानेही परराज्य धोरणावर नजर ठेवत इंग्रज व टिपू --- दोघांकडेही आपली सुत्रे राखली. टिपूकडून तो पैसाही घेत होता व लढाईसाठी फौजही जमवत होता. प्रस्तावित मोहिमेत सहभाग घेण्यासाठी मराठी सेना माधव रामचंद्र कानडेच्या नेतृत्वाखाली पाठवण्याचा पेशव्याचा बेत होता तर या स्वारीत परशुरामभाऊने जावे असे नानाचे मत होते. परंतु भाऊला मात्र यावेळी टिपूपेक्षा कोल्हापूरची मोहीम आवश्यक वाटत होती. नानाच्या प्रेरणेने कोल्हापूरकरांनी पटवर्धनांच्या मुलखाची नासाडी चालवलेली असल्याने सातार प्रकरण हातावेगळे होताच त्याने कोल्हापूरवर स्वारी करण्याचे योजले पण, याचवेळी धोंडोपंत गोखले कर्नाटकांत अडचणीत सापडल्यामुळे व पुढील मोहिमांकरता पुरेसे द्रव्य गोळा करण्यासाठी भाऊला कोल्हापूर मोहिमेचा बेत तात्पुरता तहकूब करून कर्नाटक प्रांती जाणे भाग पडले.

    इकडे नानाला कैद करण्याचा डाव फसल्यावर अमृतरावाने नानाची भेट घेऊन त्याचा पक्ष स्वीकारला. नाना - अमृतराव एकत्र येताच आपला पक्ष लष्करीदृष्ट्या बळकट व्हावा याकरता त्यांनी भाऊशी हातमिळवणी केली व पुणे दरबारातील शिंद्याचे प्रस्थ कमी व्हावं याकरता नानाने दौलतरावास उत्तरेत निघून जाण्याची टोचणी लावली. परंतु, सैन्याचा थकित पगार दिल्याखेरीज इथून हलणे शक्य नसल्याचे दौलतरावाने स्पष्ट केले. तेव्हा नानाने त्यांस मुक्काम हलवताना सात लक्ष, जांबगावी जाताच चार लाख व बऱ्हाणपुरी गेल्यावर बारा लक्ष देण्याचे मान्य करून उर्वरित तेवीस लक्षांची वरात बुंदेले व झांशीवाले यांच्यावर देण्याचे स्पष्ट केले. पण नानाचा भरवसा नसल्याने दौलतरावाने उर्वरित तेवीस लाखांसाठी जामीन मागितला असता हरिभक्ती सावकाराचा भाचा दुल्लभदास व अन्याबा अभ्यंकर यांस शिंद्याच्या ताब्यात जामीन म्हणून दिले तेव्हा स. १७९९ च्या जानेवारीत सातच्या ऐवजी दहा लाख रुपये घेऊन दौलतराव वानवडीवरून मांजरीस गेला व तिथेच दहा - पंधरा मुक्काम त्याने केले. तेथूनच त्याने उर्वरित रकमेसाठी नानाकडे तगादा लावला तेव्हा नानाने त्याकडे दुर्लक्ष केले. मग आपले चंबू गबाळे उचलून दौलतराव निमूटपणे पुण्यात येऊन बसला ! दौलतरावाच्या या लेझीम नृत्यामागे बाजीरावाचाही थोडाफार हातभार होताच.


     स. माधवराव पेशव्याचा अपघाती मृत्यू झाला हा सर्वसामान्यपणे सर्वांचाच --- अगदी इतिहास संशोधक ते अभ्यासकांचा समज असला तरी त्याचा खून करण्यात आला होता याबद्दल बाजीरावाच्या मनात अजिबात शंका नव्हती. जवळपास बव्हंशी मुत्सद्द्यांना नको असलेला पण भट घराण्याचा औरस जेष्ठ वारस असलेल्या बाजीरावास शत्रू सर्वत्र होते. तेव्हा आपल्या जीवाच्या रक्षणासाठी त्याने दौलतरावास अंतस्थरित्या गळ घातली कि, कोणत्याही स्थितीत आम्हांला नानाच्या हवाली करून जाऊ नका. पण इतक्यावरच थांबतील ते रावबाजी कसले ?


     जांबगावी स्वस्थ बसलेल्या महादजीच्या स्ञियांना
बाजीरावाने अंतस्थ चिथावणी देऊन त्यांना दौलतरावाविरुद्ध बंड करण्यास उत्तेजन दिले. म्हणजे, आपल्या बचावास्तव राहिले निदान सरदारीच्या रक्षणासाठी तरी दौलतराव दक्षिणेत राहील अशी त्याची धारणा होती. महादजीच्या स्ञियांनी फिरून धामधूम करण्यास आरंभ करताच दौलतरावाचा दक्षिणेतला मुक्काम रेंगाळला. परिणामी, नानाला परत एकदा आपल्या भवितव्याची काळजी वाटू लागली. 

    अमृतरावाच्या रूपाने त्याच्याकडे बाजीरावावर ठेवण्याकरता एक शह होता. परशुरामभाऊ शिंद्याच्या लष्करी सामर्थ्यावर उतारा होता. परंतु , शिंद्याने मुळातच आपल्या विरोधात जाऊ नये असे करता आले तर ? तशी एक सुवर्णसंधी त्याकडे चालून आली. नानाच्या मध्यस्थीमुळे महादजीच्या स्ञियांचा दंगा तात्पुरता थांबला होता. जांबगावी गेल्यावर त्यांना खुद्द पेशव्याचे अंतस्थ प्रोत्साहन मिळताच परत त्यांनी हैदोस मांडला. आपला जीव व पेशवाई रक्षणाच्या नादात रावबाजी आता आगीशी खेळू लागले होते !   

 
    महादजीच्या स्त्रियांचा बंडावा हळूहळू पुन्हा वाढू लागला होता. महादजीच्या हयातीतच शिंदेशाही सैन्यातील दोन गटांत सुप्त ईर्ष्या निर्माण झाली होती. शिंद्यांचे परंपरागत सैन्य व नव्या कवयाती पलटणी यांची आपसांत अंतस्थ अशी चुरस होती. परंतु , आणखी त्यात मुत्सद्द्यांच्या गट होतेच. यांपैकी एक गट --- म्हणजे शेणवी मंडळींचा शिंदे बायांच्या पाठीशी उभा राहिला. त्याचे उत्तरेतील नेतृत्व लखबादादा लाड करत होता तर दक्षिणेत नारायणराव बक्षी ! या गटाला थोरल्या बाजीरावाचा नातू -- बांदा संस्थानिक अलीबहाद्दरचा सक्रीय पाठिंबा होता. दौलतरावाने हे बंडाचे प्रस्थ आटोक्यात आणण्यासाठी उत्तरेतील आपल्या दोन प्रमुख सरदारांना -- अंबुजी इंगळे व पेराँ यांस लखबाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सांगितली व बायांचे प्रकरण निस्तारण्यासाठी बाळोबातात्या पागनीसची कैदेतून सुटका केली. बाळोबाने कैदेतून मुक्तता होताच शिंंदे बायांशी तडजोडीचे बोलणे चालवले. यावेळी महादजीच्या स्त्रियांचा मुक्काम जतच्या आसपास असून दौलतरावामार्फत आपली व्यवस्था लावून घेण्याकरता त्यांनी परशुरामभाऊस मध्यस्थ करण्याचे ठरवले. परंतु भाऊ कर्नाटकांत असल्याने त्यांनी कोल्हापूरकरांशी हातमिळवणी केली. आपण लावलेली आग आता वणव्यात बदलत आहे हे पाहून बाजीराव शुद्धीवर आला व त्याने भाऊला पत्रे पाठवून कोल्हापूरकर व शिंदेबायांची जुट फोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार, भाऊने आपले तडजोडीचे उपाय चालवलेच पण जोडीला आपलेही प्रश्न निकाली काढण्याचा त्याने प्रयत्न आरंभला.


     या पार्श्वभूमीवर बाळोबा पागनीस कारभारावर आला. तात्या येताच भाऊचा व त्याचा तसेच नानाचा स्नेहसंबंध जुळण्यास विलंब लागला नाही. मुख्य या तिघांची युती होताच महादजीच्या स्त्रियांचा प्रश्नही चर्चेअंती निकाली निघाला. त्यानुसार बायांच्या खर्चासाठी जहागीर तोडून देणे, त्यांचा पक्ष घेणाऱ्या सरदारांना त्रास न देणे व त्यांना पूर्ववत सेवेत दाखल करून घेणे, बायांचे कर्ज वारणे व मुख्य म्हणजे सर्जेरावास कारभारातूनच नव्हे तर आपल्या जवळपासही न ठेवण्याचे दौलतरावाने मान्य केले. तसेच कोल्हापूरकर व पटवर्धन यांच्यात ऐक्य करून देण्याचीही जबाबदारी त्याने घेतली. करवीरकरांचा उपद्रव बंद पडल्याखेरीज भाऊ कारभारात मुक्तपणे लक्ष घालू शकत नव्हता. शिंद्याच्या मध्यस्थीने त्यांचा बंदोबस्त झाला तर तो भाऊला हवाच होता.


    अशा प्रकारे स. १७९९ चे सबंध वर्ष आपसांतील तंट्यात एकप्रकारे वाया गेले. कारण, भाऊ - नाना - तात्या या त्रिकुटाचे मेतकुट जमणं  हे बाजीरावास काही बरोबर वाटले नाही. खुद्द दौलतरावासही कारभारातील बाळोबाचे वाढतं प्रस्थ मंजूर नव्हतं. करवीरकर - पटवर्धन यांचा वैराग्नी कोणाच्याही मध्यस्थीने शमणारा नव्हता. शिंंदेशाही लष्करातील भांडणं महादजीच्या स्त्रिया स्वस्थ बसल्याने बंद पडणार नव्हती. हे सर्व सर्वांनाच माहिती असूनही प्राप्त स्थितीवर आपण तोडगा काढल्याच्या भ्रमात सारे होते आणि अशातच बातमी आली …. …. निजाम - इंग्रजांच्या संंयुक्त मोहिमेत टिपू सुलतानचा मृत्यू .  दि. ४ मे १७९९ रोजी झालेल्या श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपू मारला गेला. या बातमीने पुणे दरबार तात्पुरता खडबडून जागा झाला. टिपू विरुद्धची मोहीम सुरु झाली कधी व संपली कधी हे त्यांना घरगुती बुद्धीबळाच्या खेळात समजलेच नाही व वेल्स्लीची धडाडीही उमगली नाही !
                                                                                                              


                                                                           ( क्रमशः )

शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग - ६ )


    बाजीराव - दौलतरावाने नानाला कैद केले खरे पण त्याची शहरात असलेली अरबांची पलटण हे एक भयंकर प्रकरण होते. नानाच्या अरबांनी थकित पगाराच्या निमित्ताने शहरातच ठाण मांडले. बाजीरावाला या अरबांचा मोठा धोका वाटत होता. शिंंद्यांकरवी त्यांना शहरातून बाहेर काढायचा प्रयत्न केला खरा पण पाच सात हजार अरब विना लढाई सुखासुखी शहर रिकामे करणार नाहीत असा रंग दिसताच त्याने अरबांचा थकित पैसा देऊन मार्गस्थ केले. इकडे नानाला दौलतरावाने आपल्या छावणीत तीन महिने अटकावून त्याच्याकडील पैसा उकळण्याचा प्रयत्न केला पण नाना त्याला काही दाद लागून देत नव्हता. तेव्हा दि. ६ एप्रिल १७९८ रोजी दौलतरावाने त्यांस नगरच्या किल्ल्यात पाठवले. तिथे यापूर्वीच कैदेत पडलेली बाळोबातात्या वगैरे शेणवी मंडळी होती. त्यांच्या जोडीला फडणीस नानांची रवानगी करण्यात आली. याच दरम्यान म्हणजे मार्च महिन्यात दौलतरावाने आपला विवाह सोहळा मोठ्या समारंभाने पुणे मुक्कामी उरकून घेतला. सखाराम घाटग्याची मुलगी बायजाबाई दौलतरावाची पत्नी झाली व सखाराम उर्फ सर्जेराव घाटगे आता शिंद्यांचे कारभारी बनले. शिंद्यांचे कारभारीपद प्राप्त होताच सर्जेरावाने धडाक्याने प्रलंबित कामं निकाली काढण्यास आरंभ केला. कारभाराच्या सोईसाठी त्याने नानाच्याच वाड्यात तळ ठोकून शिंदे व पेशवे या दोघांनाही गुंडाळण्याचा उपक्रम आरंभला. 

    शहरातील नानाच्या पक्षपात्यांना धरून त्यांना मारझोड करून द्रव्य उकळण्याची मोहीम सर्जेरावाने आरंभली. पुणे दरबारात आता कोणत्या मुत्सद्दयाला पकडून त्याचे घर धुवून काढायचे यावर मसलती झडू लागल्या. दरबारात पेशव्याची उपस्थिती आता नावालाच उरली होती. भर दरबारी सर्जेराव पेशव्याच्या समक्ष नानाच्या पक्षपात्यांना शिवीगाळ करत असॆ. नानाच्या समर्थकांना मारझोड करून, गरम तोफेवर निर्वस्त्र बसवले जाई, हाता - पायांस दगड बांधून शारीरिक यातना दिल्या जात. अशाच यातना असह्य होऊन नानाचा चुलतभाऊ गंगाधरपंत मरण पावला. नानाच्या पक्षपात्यांकडून आपणांस मोठा द्रव्यलाभ होईल अशी बाजीराव - दौलतरावाची आरंभी कल्पना होती. परंतु , त्यातून जो काही अर्थलाभ झाला त्यांपैकी बराच मोठा हिस्सा शिंद्याने घेतला व तो देखील त्यांस पुरेसा वाटेना. तेव्हा त्याने पुण्यातूनच वसुली करण्याची पेशव्याची लेखी आज्ञा मागितली व दौलतरायाची मर्जी राखण्यास्तव बाजीरायाने ती देऊनी टाकली ! 

    यानंतर सर्जेरावाने स. १७९८ च्या जुलै महिन्यापर्यंत जो पुण्यात धुमाकूळ घातला त्याचे वर्णन काय करावे ? प्रख्यात इतिहासकार वा. वा. खरे यांच्या मते, या काळात सर्जेरावाने दोन - तीन कोटींचा ऐवज पुणे शहरातून जमा केला असावा. पानिपतनंतर निजामाच्या पुणे स्वारीत जितकी दुर्दशा पुणेकरांची झाली नाही तितकी सर्जेरावाने केली. आणि पुण्यात इतका नंगानाच घालूनही पुण्याची दैना उडवण्याचा मान इतिहासकारांनी कारण नसताना यशवंतराव होळकराच्या पदरी बांधला !
सर्जेरावाने पुण्यातून स. १७९८ साली दोन ते तीन कोटींची वसुली केल्यावर स. १८०२ मध्ये यशवंतरावास पुण्यामध्ये लुटण्यासारखे काय शिल्लक राहिले होते ? बरे, सर्जेरावाचा पुण्यात मुक्काम हा ऑक्टोबर १८०१ पर्यंत होता तर यशवंतराव पुण्यात आला स. १८०२ मध्ये. म्हणजे सर्जेराव पुण्यातून बाहेर पडल्यावर एक वर्षाने यशवंताचे पुण्य नगरी आगमन झाले. दुसरे असे कि, सर्जेराव पुण्यात असेपर्यंत शिंद्याच्या सैनिकांचा शहराला उपद्रव देण्याचा उपक्रम तुरळक प्रमाणात का होईना सुरुच होता. मग अशा स्थितीत केवळ एका वर्षात बाजीरावाने व पुणेकरांनी अशी कोणती ' दिव्य उलाढाल ' केली कि, यशवंतरावाने लुटण्याइतपत संपत्ती त्यांना प्राप्त झाली ? कि झटपट श्रीमंत होण्यासाठी ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे बाजीराव व पुणेकरांनी काय शेअर्स विकत घेतले होते का ? कशाचा कशाला पत्ता नाही व पांढऱ्यावर काळे करून एखाद्याच्या चारित्र्याला, कारकिर्दीला कलंक लावायचा हि काही खऱ्या निःपक्षपाती इतिहासकारांची लक्षणे नव्हेत. हे तर दरबारी भाटांचे वंशज !    

    सर्जेराव पुणे शहर दिवसाढवळ्या लुटत होता. मग बाजीराव पेशवा गप्प का बसला होता ? आपल्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी त्याने काहीच कशी पावलं उचलली नाहीत ? कि भट - भिक्षुकांना दानधर्म करण्यात व बायका - नाच्या पोरं नाचवण्यात तो मग्न झाला होता ? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याइतपत पुरेसे पुरावे माझ्याकडे नाहीत. ज्यावेळी उपलब्ध होतील तेव्हा ते जरूर मी वाचकांसमोर मांडेन. कारण, ज्याने नानाच्या राज्यघातकी धोरणास आळा घालण्याचा प्रयत्न केला तो यावेळी स्वस्थ बसला असेल असे मला तरी वाटत नाही. मात्र याचा अर्थ असा नाही कि, या दृष्टकृत्यात त्याचा अजिबात सहभाग नव्हता. सर्जेरावाच्या या दरोडेखोरीत त्याचाही वाटा होताच. त्याने शिंद्यांना लेखी अधिकार दिल्यानेच सर्जेरावाला एवढे अवसान आले. मग त्याला गुन्हेगार का म्हणायचे नाही ? मान्य आहे कि, त्याने फक्त नानाच्या पक्षपात्यांना भरडून काढण्यापुरताच या गोंधळात सक्रीय सहभाग घेतला पण त्यामुळे त्याची जबाबदारी वा गुन्ह्याची तीव्रता काही कमी होत नाही. राजकीय बंदीवासात सारी हयात गेल्याने राज्यकारभार वा राज्याच्या आर्थिक उत्पन्नाच्या बाबींविषयी त्यांस माहिती नसावी हे समजून घेता येते पण, प्रजाहितदक्षता काही शिकवावी लागत नाही. ती तर साधी व्यावहारिक गोष्ट आहे व याबाबतीत बाजीरावाने एवढा मूर्खपणा दाखवावा याचेच आश्चर्य वाटते. असो. 

     नाना फडणीस कैद होताच बाजीरावाने राज्यातील प्रमुख सरदारांना व राज्याचे मालक --- सातारकर छत्रपतींना घडल्या प्रकाराची कल्पना दिली व सातारकर छत्रपतींना विनंती केली कि, त्यांनी त्यांच्याभोवती नानाने जे पहारेकरी व सरदार नेमले होते त्यांचा बंदोबस्त करावा. त्यांच्या बदली कामगार मागाहून पाठवण्यात येतील. यावेळी साताऱ्यास दुसरा शाहू छत्रपतीपदावर होता. राजकीय अज्ञानातून पाठवलेल्या या निरोपाचा योग्य तो अर्थ घेण्याची या छत्रपतीला अक्कल जरूर होती. त्याने राजमंडळातील सरदार गोळा करून सातारचा नानाचा किल्लेदार बाबूराव आपटे यांस कैद केले व फिरून पेशव्याच्या नजरकैदेत पडण्याचा प्रसंग न यावा, यासाठी त्याने लष्कर भरती आरंभली.  

    इकडे पुण्यात यावेळी बऱ्याच घटना वेगाने घडत होत्या. नाना कैद झाल्यावर बाजीरावाने शनिवारवाड्याभोवती पहाऱ्यासाठी तैनात असलेली शिंद्याची पलटणे दूर करून तिथे आता आपले पहारेकरी नेमले. नव्याने सैन्य भरती आरंभली. मोरोबा फडणीसला कैदमुक्त करून कारभारावर घेण्याचा बाजीरावाने प्रयत्न केला पण त्याकरता शिंद्याने तीस लाखांची मागणी मोरोबाकडे केल्याने हे प्रकरण तूर्त इथेच संपुष्टात आले. मात्र, बाजीरावाने आपल्या बापाच्या पक्षातील मुत्सद्द्यांना शक्य तितक्या मानाच्या व अधिकाराच्या जागा देण्याचा प्रयत्न केला. तसेच स. माधवास बाजीरावाचे गुप्त पत्र पोहोचवून त्या बदल्यात कैद भोगणाऱ्या बळवंत नागनाथास देखील वस्त्रे देऊन सन्मानित केले. बाजीराव या कार्यात मग्न असताना दुसरीकडे शहरात सर्जेरावाची लुटालूट जोरात सुरु होती. सर्जेरावाच्या मनमानी कारभाराने प्रजेची होणारी दैना पाहून अमृतरावाने थेट शिंद्यालाच अटकेत टाकण्याचा पर्याय बाजीरावासमोर मांडला. परंतु तो पर्याय बाजीरावाने अवलंबला नाही. कारण, शिंद्याला पकडण्याचे सामर्थ्य कोणात होते ? पेशव्याच्या गादीचा - पदवीचा धाक व दरारा अलीकडे साफ मावळला होता. त्यास बाजीराव कारणीभूत असला तरी या सामर्थ्याला उतरती कळा फार पूर्वीच लागली होती. त्याशिवाय सरदारांना दाबात ठेवण्यासाठी खुद्द पेशव्याकडे प्रबळ असे सैन्य तरी कुठे होते ? खेरीज शिंद्याला राजी राखण्यात त्याची पेशवाई कायम राहण्याचा फायदा तो कसा दृष्टीआड करेल ? त्याशिवाय अमृतरावाच्या मसलतीनुसार दौलतरावास कैद जरी केले तरी त्यानंतर अमृतराव बाजीरावास गुंडाळणार नाही कशावरून ? सारांश, संशयपिशाच्चाने पछाडलेल्या अननुभवी बाजीरावाने या काळात एका पाठोपाठ एक इतक्या मोठ्या घोडचुका करून ठेवल्या कि त्यामुळे पेशवाईचा अस्त जवळ येउन ठेपल्याची चाणाक्ष मुत्सद्द्यांना होऊ लागली. अशा स्थितीत राज्य सावरण्याऐवजी प्रत्येकजण आपापला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नास लागल्यास त्यांना दोष का द्यावा ?   

    खुद्द अमृतराव देखील याच वेळी बाजीरावापासून विभक्त होऊन बाहेर पडला. याच सुमारास महादजीच्या स्त्रियांचे प्रकरण अनावर झाले. कारभारी सर्जेरावाने तिथेही आपली अरेरावी गाजवण्याचा उपक्रम केला. आपल्या जावयाला शिंद्याच्या दौलतीवरून बाजूला काढण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याबद्दल त्यांना अद्दल घडवण्यासाठी सर्जेरावाने त्यांना कैद करून नगरच्या किल्ल्यात डांबण्याचे योजले. त्यानुसार दि. १६ मे १७९८ रोजी त्यांना जबरदस्तीने मारझोड करून पालख्यांत बसवून बंदोबस्तात नगरला घालवण्यात आले खरे पण, शिंद्यांच्या जुन्या सरदारांना हे कृत्य पसंत न पडून नारायणराव बक्षी, यशवंतराव शिवाजी, देवजी गवळी इ. नी नगरच्या वाटेवर या बायांची सुटका केली. सरदारांचे हे कृत्य म्हणजे दौलतरावविरुद्ध बंडच होते. सर्जेरावाने लगेच पलटणांची युद्धासाठी तयारी सुरु केली. महादजीच्या स्त्रियांचा पक्ष घेऊन शेणवी सरदार आपापल्या फौजांनिशी सिद्ध झाले. 

    सर्जेरावाने लगेच पलटणांची युद्धासाठी तयारी चालवली. शिंद्यांचा हा गृहकलह दक्षिणेपुरता मर्यादित न राहता उत्तरेतही पसरला. लखबादादा लाड हा आपल्या सैन्यासह बायकांच्या पक्षास मिळण्यासाठी दक्षिणेत येऊ लागला असता दौलतरावाच्या आज्ञेवरून अंबुजी इंगळ्याने त्यांस रोखून धरले. मिळून, उभ्या हिंदुस्थानाशी लढणारे शिंदेशाही सैन्य आता आपसातच लढू लागले होते. शेणवी सरदारांच्या हाताखालील पारंपारिक पद्धतीच्या फौजा मदतीस आल्याने सर्जेरावाच्या कैदेतून सुटलेल्या बायका वाटेने गावं लुटत, खंडण्या गोळा करत पुण्याकडे येऊ लागल्या. दौलतरावाच्या विरोधकांना एकत्र करण्याचे काम करणाऱ्या अमृतरावाने ताबडतोब बायांचा पक्ष स्वीकारून शिंंद्याला शह देण्याचा प्रयत्न केला. इकडे बाजीरावही आता सर्जेरावीस उबगला होता. त्यानेही महादजीच्या स्त्रियांना चिथावणी देण्यास आरंभ केला. परिणामी, ठिकठीकाणी बायांच्या सैन्याचा पलटणांच्या बरोबर संग्राम घडून सर्जेरावाची पलटणे मार खात पुण्याकडे निघून आली व त्यांच्या पाठोपाठ अमृतरावासह महादजीच्या स्त्रिया पुण्यास येऊन तळ ठोकून राहिल्या. 

    बाजीरावाच्या दुटप्पीपणाने व पलटणांच्या पराभवांनी सर्जेराव चिडून गेला. बाजीरावाचे नाक दाबण्यासाठी त्याने सातारकर छत्रपतींना निरोप पाठवला कि, ' पेशव्याच्या सरदारांना तुम्ही धुडकावून लावा. तुमच्यात व करवीरकरांत मी तह जुळवून देतो व जर पेशव्याने तुमच्यावर आक्रमण केले तर पलटणे घेऊन मी तुमच्या बचावास येतो. ' शिंद्याचे मदतीचे आश्वासन मिळताच छत्रपतींच्या कारवायांना जोर आला. आपल्यापरीने त्यांनी कोल्हापूरकरांशी हात मिळवणी करून त्यांची फौज मदतीस बोलावली. छ्त्रपतींचे वाढते प्रस्थ लक्षात येताच बाजीरावाने सरदार रास्त्यांना सातारवर रवाना केले. परंतु सातारकरांनी रास्त्यालाच लुटून घेतल्याने बाजीराव गडबडून गेला. सातारकरांचा बंदोबस्त करण्याचे सामर्थ्य शिंद्यांकडे होतं पण तेच सातारकरांना सामील असल्याने हा बंडावा कसा निस्तारावा हा बाजीरावापुढे प्रश्न पडला. दरबारच्या जुन्या मुत्सद्द्यांच्या व सरदार रास्त्यांंच्या सल्ला पडला कि, हे कार्य फक्त परशुरामभाऊच पार पाडू शकतो. तेव्हा त्यांस पेशव्यांनी बंधमुक्त करावे. पण सहजासहजी भाऊला सोडण्याची बाजीरावाची इच्छा नव्हती. २० लाख रुपये दंड भरायच्या बोलीवर त्याने भाऊला कैदेतून मोकळे केले व त्याच्यावर सातारची मोहीम सॊपवली. इकडे पुण्यात सर्जेरावाने एक नवाच उपद्व्याप करून बाजीरावाला डिवचले तर दौलतरावास तोंड लपवायची वेळ आणली !

     अमृतराव व महादजीच्या स्त्रिया पुण्यात तळ ठोकून राहिले होते. त्यांच्या फौजेसोबत सर्जेरावाच्या पलटणांची अधून मधून चकमक झडत होतीच पण, दि. २५ जून रोजी रात्री सर्जेरावाने बायांच्या व अमृतरावाच्या गोटावर हल्ला चढवून त्यांना उधळून लावले. या वेळी बायांचा व अमृतराव बचावले खरे पण, धन्यावर शस्त्र उपासल्यामुळे दौलतरावाची दरबारात नाचक्की झाली. या कृत्यासाठी त्याला प्रथम बाजीरावाची व त्याच्या मार्फत अमृतरावाची माफी मागावी लागली. 

    बाजीरावाने दौलतरावास माफ केले खरे पण शिंद्यांचा बंदोबस्त करण्याचे त्याने मनावर घेतले व त्याकरिता निजामाबरोबर बोलणी आरंभली. यावेळी निजामासोबत झालेल्या करारानुसार (१) महाड कारस्थान प्रकरणी नानाने केलेला निजामाबरोबरचा तह जसाच्या तसा अंमलात यावा (२) बेदरची चौथाई सोडून देणे या अटी बाजीरावाने मान्य केल्या. बदल्यात (३) शिंद्यांच्या बंदोबस्तासाठी निजामाने पेशव्याला लष्करी मदत करायची. या फौजेच्या खर्चाकरिता पेशव्याने त्यांस दोन लक्ष उत्पन्नाचा मुलुख द्यायचा. (४) नाना कैदेतून सुटल्यावर राज्यकारभार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल तर त्याची बंदोबस्त निजामाने करावा. (५) शिंद्याने नानाला कैदेतून सोडले तर नानाला पेशव्याने एक लाख रुपये पोटगीदाखल द्यावे. [ संदर्भ ग्रंथ :- नाना फडनवीस यांचे चरित्र.  लेखक :- वा. वा. खरे ]  
 
    बाजीरावाच्या उपद्व्यापाची कल्पना सर्जेराव - दौलतराव या सासऱ्या - जावयास लागताच त्यांनी नानालाच कैदेतून मोकळे करण्याचा निर्णय घेतला. कारण निजाम, बाजीराव, अमृतराव व महादजीच्या स्त्रिया या सर्वांना एकाच वेळी तोंड देणे त्यांच्या शक्तीबाहेरचे होते. त्याशिवाय या लढ्यात इंग्रजही सामील होण्याची शक्यता होती. त्यापेक्षा काही दंड घेऊन नानाला मोकळे करून कारभारी बनवावे. त्याच्या मार्फत बायांचा दंगा मिटवावा असा त्यांचा हेतू होता. खेरीज, आपल्या मदतीने कारभारीपद मिळाल्याने नाना आपल्या पाठीशी राहील. त्यामुळे इंग्रज - निजामाची भीती बाळगण्याचे कारण उरणार नाही असा त्यांनी व्यवहारी हिशेब केला. सर्जेरावाची चाल ओळखून महादजीच्या स्त्रियांनीही नानाच्या सुटकेसाठी नगरला आपली माणसं धाडली. परंतु आरंभी नाना कोणत्याच पक्षाला मिळेना व नंतर त्याचा कल दौलतरावाकडे झुकतोय म्हटल्यावर महादजीच्या स्त्रियांचे हस्तक मागे फिरले. शिंद्याचा सरदार फकिरजी गाढवे याच्या मार्फत दहा लक्ष रुपये देण्याच्या बोलीवर नानाची सुटका करण्याचे शिंद्याने मान्य केले.

    यावेळी उभयतांमध्ये एक करारही झाला. त्यानुसार (१) दौलतरावाने नानाला कैदेतून मुक्त करावे. बदल्यात नानाने त्यांस दहा लक्ष रुपये द्यावे. (२) बाजीराव पेशव्याची निजामाबरोबर चाललेली वाटाघाट नानाने बंद करावी. (३) दौलतराव व महादजीच्या स्त्रियांच्या दरम्यान सन्मानजनक तोडगा नानाने काढावा. (४) नानाला कारभारीपद मिळावे. त्यासाठी शिंद्यांना १५ लाख रुपये देण्यात येतील. नानाचा कारभार सुरळीत चालू झाल्यावर मग शिंद्याने उत्तरेत जावे. करार होताच दि. १५ जुलै १७९८ रोजी नाना बंधमुक्त होऊन ता. १७ जुलै रोजी वानवडीस दौलतरावच्या तळावर दाखल झाला. पाठोपाठ नानाचे साथीदारही आपापल्या पथकांसह तिकडे येऊन धडकले. 

    नानाने सुटका होताच तहाची अंमलबजावणी लगोलग आरंभली. शिंद्याला त्याने दहा लाख रुपये दिले. नाना कैदेतून मोकळा झाल्याचे कळताच निजामाने बाजीरावाचा पक्ष सोडला. दौलतराव व महादजीच्या स्त्रियांचा वाद विकोपाला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्जेराव ! हे हेरून नानाने सर्जेरावास दौलतरावामार्फत कैद केले. महादजीच्या स्त्रियांचा मुख्य आधार म्हणजे अमृतराव पेशवा. त्यालाच सात लाखांची जहागीर देण्याचे मान्य करून नाना - दौलतरावाने आपल्या बाजूला वळवले. नंतर नानाने स्वतः महादजीच्या स्त्रियांना आश्वासन दिले कि, ' तुमच्या सर्व तक्रारी दूर केल्या जातील. दौलतराव तुमच्या सल्याने कारभार करेल. तुमच्या मागण्यांचा सरकारांत विचार केला जाईल. तुम्ही संंघर्षाची भूमिका सोडून जांबगावी स्वस्थ राहावे. ' नानाच्या या निरोपाने महादजीच्या स्त्रियांची तात्पुरती समजुत पडून त्या जांबगावाकडे निघाल्या. 

    नाना दौलतरावाच्या अडचणी दूर करत असतानाच दौलतरावाने बाजीरावावर दबाव आणून नानाला कारभारीपद देण्यास भाग पाडले. दौलतरावाची विनंती अमान्य करणे बाजीरावास शक्य नव्हते. त्याने नानाला कारभारीपद देऊ केले पण, बाजीरावाने आपल्याला कैदेत टाकल्याच्या अपमानाचा सूड घेण्याची संधी नाना सोडणार नव्हता. त्याने कारभारीपद तर घेण्याचे आरंभी साफ नाकारले व नंतर असे सांगितले कि, ' माझ्या प्राणास वा अब्रूस धक्का लागणार नाही याविषयी निजाम - इंग्रज हमीदार होणार असतील तर मी तुमचे कारभारीपद घेईन. ' नानाच्या या मागणीने बाजीराव काय समजायचं ते समजून गेला. 

    या बाबतीत प्रख्यात इतिहासकार वा. वा. खरे व गो. स. सरदेसाई यांनी जे विवेचन केले आहे ते अतिशय हास्यास्पद आहे. नामवंत इतिहासकारांनी या प्रकरणाविषयी इतकी बालिश विधानं करावीत ? काय तर म्हणे, ' इंग्रज - निजामाकडून अशी हमी मिळवणे श्रीमंतांच्या इभ्रतीस बट्टा आणणारे व नुकसानीचे होते. एवढेच नव्हे, तर ते अशक्यही होते.' या वाक्यांचा अर्थ असा कि, बाजीराव हा नालायक असल्याने त्याच्या शब्दावर भरवसा ठेवून कारभारीपद हाती घेऊन  आपला जीव धोक्यात घालण्यास नाना तयार नव्हता. परंतु जर नानाच्या जीविताची हमी इंग्रज - निजामाने घेतली तर मात्र तो या कामास तयार होता. वरकरणी सरळ वाटणारी हि मागणी अतिशय विचित्र होती. बाजीरावास अशा प्रकारचे हमीपत्र मिळाले नसते असे समजणे चुकीचे होईल. निजाम - इंग्रजांनी अशी हमीपत्रे मोठ्या आनंदाने दिली असती. कारण, त्यायोगे निजाम - इंग्रजांना बाजीराव पेशव्यावर --- पर्यायाने समस्त मराठी राज्यावर आपले नियंत्रण प्रस्थापित करता येणार होते. सारांश, अधिकारपदाच्या लालसेपोटी या काळात एक बाजीरावच नव्हे तर नाना फडणीस देखील राज्यहितास तिलांजली देण्यास प्रवृत्त झाल्याचे दिसून येते. 

    दरम्यान बंधमुक्त केलेला परशुरामभाऊ तडफेने साताऱ्यावर चालून गेला व ऑगस्ट पर्यंत त्याने साताऱ्यावर पेशव्याची सत्ता परत एकदा प्रस्थापित करून दिली. तिकडे उत्तर हिंदुस्थानात यावेळी एक बदलाचे वारे वाहू लागले होते. त्याची दखल ना फडणीस नानाने घेतली, ना अलिजाबहाद्दर शिंद्याने, ना बाजीराव पेशव्याने ! 
                                                                                                                                                                                 ( क्रमशः )