रविवार, ३० जून, २०१३

श्रीमंत रघुनाथराव पेशवे ( भाग - २ )

    
  माधवरावास पेशवेपदाची प्राप्ती आणि कुटुंब कलहास आरंभ :-  जून महिन्यात पुणे मुक्कामी नानासाहेब पेशव्याची खालावत जाणारी प्रकृती पाहून भावी घटनांचा अंदाज आल्याने दादाने स्वतःला पेशवेपद मिळवून घेण्याच्या दृष्टीने खटपटी चालवल्या. ज्यावेळी पेशवा मरण पावला तेव्हा तुळाजी आंग्रे हा पुण्यातच पेशव्यांच्या कैदेत होता. त्याने इब्राहीमखान गारद्याच्या भाच्याला फितवून कैदेतून निसटण्याचा व पुण्यात दंगा माजवण्याचा कट रचला. परंतु, सखारामबापूच्या जागरूकतेने हा कट फुटून कटवाल्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात आला असला तरी या कटाच्या उभारणीत दादा - बापूचा हात नसावा असे म्हणता येत नाही. या निमित्ताने पेशवेपदासाठी आपणचं कसे लायक आहोत हे सर्वांच्या नजरेस आणून देण्यात दादा तात्पुरता यशस्वी ठरला. परंतु, पती निधनातून गोपिकाबाई लवकरचं सावरली आणि तिच्या पुढाकाराने व नानासाहेबास मानणाऱ्या पुणे दरबारातील सरदारांच्या एका मोठ्या गटाच्या जोरावर तिने पेशवेपदासाठी माधवरावाचे नाव पुढे केले. माधवराव यावेळी १५ - १६ वर्षांचा असला तरी नानासाहेब पेशव्यांचा मुलगा होता आणि तत्कालीन प्रघातानुसार पेशवेपदावर रघुनाथापेक्षा त्याचाच अधिक हक्क पोहोचत होता. दादाने आपल्या पुतण्यास पेशवा करून त्याचा कारभार करावा अशी पुणे दरबारातील मुत्सद्द्यांची भावना होती. त्याउलट दरबाराचा अंदाज न आल्याने आपणास पेशवेपद मिळणार हे जवळपास गृहीत धरून दादाने पेशवेपद प्राप्त होताच उत्तरेत जाउन पानिपतचे अपयश धुऊन काढण्याचा बेत आखला आणि त्यानुसार गोपाळराव बर्व्याच्या मार्फत मोगल बादशहा व सुजाउद्दौला यांच्याशी पत्रव्यवहार देखील आरंभला. मात्र लवकरच त्यास वस्तुस्थितीची जाणीव होऊन त्याने आपल्या हालचाली आटोपत्या घेतल्या. 
                          इकडे दादाच्या खटपटींनी माधवरावाचे पक्षपाती सावध झाले व छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे घेण्यासाठी साताऱ्यास जाताना माधवरावाने दादाला सोबत घेऊन नये असे ठरवण्यात आले, पण नंतर हा बेत बदलून दादाला सोबत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. चुलते - पुतण्यात एकमेकांविषयी संशय निर्माण होण्यास या घटनेने आरंभ झाला असण्याची शक्यता आहे. ता. २० जुलै १७६१ रोजी माधवरावास पेशवेपदाची आणि सखारामबापूस मुख्य कारभाऱ्याची वस्त्रे प्राप्त झाली. बापूला पेशव्यांची दिवाणी मिळाल्याने पेशव्यांचे कारभारीपद अप्रत्यक्षपणे दादाच्या हाती गेले. पेशवेपदाची वस्त्रे प्राप्त झाल्यावर दादा - माधव पुण्यास परतले आणि उभयतांमध्ये कारभारावरून हळूहळू खटके उडू लागले. चुलते आणि पुतणे दोघेही महत्त्वाकांक्षी असल्याने व माधवराव हा स्वतंत्र वृत्तीचा असल्यामुळे दादाचे आणि त्याचे पटणे शक्य नव्हते. परंतु  याच वेळी निजामाचे प्रकरण उद्भवल्याने पेशवे कुटुंबातील हा कलह सध्या तरी अंतर्गत कुरबुरींपुरता मर्यादित राहिला.     
       माधवराव पेशवा दादाच्या नजरकैदेत :-   आधी सांगितल्यानुसार पटवर्धनांना निजामाच्या तोंडावर ठेवून दादा पुण्यास परतला होता. पटवर्धनांनी निजामाची चढाई आजवर थोपवून धरली होती आणि पुढील राजकारणाचा अंदाज घेत निजामदेखील एकदम एकेरीवर न येत हळूहळू कुरापत काढत होता. मात्र, नानासाहेब पेशव्याचे निधन झाल्याची बातमी मिळताच निजामाने उदगीरचा तह धाब्यावर बसवून पेशव्यांविरोधात रणशिंग फुंकले. निजामाच्या पारिपत्यासाठी दादा - माधव आपसांतील मतभेद विसरून एकत्र आले आणि २० ऑगस्ट १७६१ रोजी ते स्वारीसाठी पुण्यातून बाहेर पडले. निजामावरील मोहिमेसाठी सर्व सरदारांना आपापल्या सैन्यासह येण्याची ताकीदपत्रे रवाना करण्यात आली. इकडे निजाम कायगाव टोके, प्रवरा संगम इ. स्थळांना उपद्रव देत मराठी मुलखात बेधडक घुसला. शिंद्यांच्या चांभारगोंद्याची दैना उडवलीच पण त्यांची तेथील हवेलीही खणून काढली. निजामाचा हा जोर पाहून गोपिकाबाईने दादाला, निजामासोबत तह करण्याचा सल्ला दिला परंतु, त्याने तो जुमानला नाही. पुढे लवकरचं निजाम - पेशव्याच्या फौजांचा ठिकठीकाणी सामना जुंपला. पण त्यामुळे प्रकरण निकाली निघाले नाही. इकडे पेशव्यांनी निजामाच्या दरबारात फितुरीचे शस्त्र वापरून मीर मोगल आणि रामचंद्र जाधव यांना फोडण्यात यश मिळवले. त्याबरोबर निजामाचे अवसान गळून त्याने चाळीस लाखांचा मुलुख पेशव्यांना देऊन लढा आटोपता घेतला. ( दि. ५ जानेवारी १७६२ , उरळीचा तह )
                       मात्र असे असूनही दादाने मुद्दाम या प्रसंगी निजामाचा बचाव केला असा आरोप सरदेसाईंसारखे इतिहासकार करतात तेव्हा नवल वाटते ! त्यांच्या मते, यावेळी निजामाला साफ बुडवण्याची संधी चालून आली होती पण पुढे - मागे पेशवाई प्राप्त करण्यासाठी निजामाची मदत होईल या मनसुब्याने बापूच्या सल्ल्यावरून दादाने निजामाचा बचाव केला. वस्तुतः सिंदखेड असो, उदगीर असो कि राक्षसभवन वा खर्डा ! निजामाला पूरांथा नष्ट करण्याची लष्करी ताकद जरी पुणे दरबारात असली तरी त्यास नाहीसा करण्याची त्यांची इच्छा कधीच नव्हती.  उरळीचा तह करून दादाने निजामास जीवदान दिले असे म्हणण्यात काही अर्थ नाही. 
                     उरळीचा तह होऊन निजाम - पेशव्यातील संघर्ष तात्पुरता मिटला पण दादा - माधव यांच्यातील वाद परत उफाळून आला आणि माधवरावास वठणीवर आणण्यासाठी दादा व बापूने कारभारातून अंग काढून विरक्तीचे सोंग घेतले. परंतु, दोघांचेही अंतरंग माधवराव चांगलाच ओळखून होता. त्याने गोपिकाबाईच्या सल्ल्यानुसार बाबुराव फडणीस व त्रिंबकराव पेठ्यास कारभारावर घेतले. पण यामुळे कलह न मिटता निकालासाठी दोन्ही पक्षांनी गोपिकाबाईकडे धाव घेतली. गोपिकाबाईने यावर असा तोडगा काढला कि, सखारामाने कारभारात दखल देऊ नये आणि दादाच्या सल्ल्याने पेठे व फडणीस यांनी कारभार करावा. ( फेब्रुवारी १७६१ )  यामागील खोच अशी कि, दादाचा सर्व कारभार सखारामबापूच्या बुद्धिबळावर चालला होता. दादाच्या वैगुण्यास झाकून त्यास सांभाळून घेण्याची मल्हाररावाने जी चाल पाडली होती, त्यास अनुसरूनचं बापू देखील वागत होता. त्यामुळेच जोपर्यंत बापू, मल्हारराव, विठ्ठल विंचूरकर, दमाजी गायकवाड  आणि गंगोबातात्या प्रभूती मंडळी दादासोबत होती तोवर तो यशाची शिखरे पार करत होता. त्याउलट जेव्हा ही मंडळी त्याच्यापासून दुरावली वा काळाच्या पडद्याआड गेली दादाचे सर्व तपोबल, सर्व करमत नष्ट होऊन त्यास अपयशाचे धनी व्हावे लागले. असो, गोपिकाबाई दादाची सर्व करामत ओळखून असल्याने तिने हा तोडगा काढला, पण त्यामुळे ना दादा खुश झाला न माधव ! परंतु दोघांनीही तात्पुरता हा निकाल मान्य केला व दोघे कर्नाटकात हैदरच्या बंदोबस्तासाठी रवाना झाले खरे पण, मार्च महिन्यातच चिकोडी मुक्कामातून दादा मागे स्वारीतून फिरला. याचवेळी मल्हारराव होळकर देखील वाफगावास येऊन दाखल झाल्याने माधवरावास धास्ती पडून जून महिन्यात तो कर्नाटक स्वारी अर्ध्यात सोडून पुण्यास परतला. मल्हारराव होळकर आणि दादाची मैत्री जगजाहीर असल्याने होळकराचा पाठिंबा मिळवून दादा वर्दळीवर येतो कि काय याची माधवरावाच्या पक्षपात्यांना भीती पडली. परंतु पेशव्यांच्या गृहकलहात सक्रिय सहभाग घेण्याची मल्हाररावची मुळीच इच्छा नव्हती. उलट वडीलकीच्या नात्याने त्याने दादा - माधव यांच्यात समझोता घडवून आणण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला. त्यानुसार पेशव्याचे कारभारीपद त्रिंबकराव पेठ्याकडे कायम राहून आबा पुरंदरे व सखारामबापू या दादाच्या दोन हस्तकांच्या सरंजामाची पेशव्याने घालमेल करू नये असे उभयपक्षांनी मान्य केले. खरे, पाहता या तडजोडीने दोन्ही पक्षांचे समाधान झाले नाही. परंतु होळकराच्या भूमिकेचा अंदाज न आल्याने दोघांनीही तात्पुरता समझोता मान्य केला. माधवरावाचा अंदाज होता कि, होळकर दादास भर देऊन प्रकरण चिघळवून टाकेल वा दादा त्याची मदत घेऊन आपल्याविरोधात बंड पुकारेल. तर रघुनाथरावास होळकराच्या संपूर्ण पाठींब्याची अपेक्षा होती पण, मल्हाररावाने या दोघांच्याही अपेक्षांच्या विपरीत कार्य करून पेशवे घराण्यातील वाद मिटवण्याचा मनापासून प्रयत्न केला. असो, होळकराने काढलेला तोडगा कोणासही मान्य नव्हता आणि माधवपेक्षा दादा अधिक उतावीळ असल्याने जुलै - ऑगस्ट महिन्यात पेशव्याकडे पाच किल्ले व दहा लाखांच्या जहागिरीची मागणी केली. 
                            एक प्रकारे राज्याची वाटणी मागण्याचाच हा आरंभ होता. याच सुमारास गोपिकाबाईच्या आज्ञेवरून पटवर्धन मंडळी दादाला कैद करणार असल्याची बातमी उठली आणि त्यामुळे घाबरून जाऊन दादाने पुण्यातून पळ काढला. त्याची समजूत काढण्याचे माधवराव, गोपिकाबाई, मल्हारराव यांनी अनेक प्रयत्न केले पण दादाच्या मनातील भीती काही दूर झाली नाही. अखेर प्रकरण युद्धावर येणार याची सर्वांना कल्पना येऊन चुकली. रघुनाथरावाने आपल्या पक्षातील सरदारांना तसेच निजाम व भोसल्यांना आपल्या मदतीस येण्यासाठी पत्रे पाठवली. इकडे माधवरावाने देखील हाच उपक्रम चालवला आणि लष्करी तयारी पूर्ण होताच पेशवा स्वारीसाठी बाहेर पडला. स. १७६२ च्या नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वार्धात दादा - माधव यांच्यात अनुक्रमे घोडनदी व आळेगाव येथे दोन लढाया घडून आल्या. पैकी पहिल्या लढाईत माधवाचा विजय झाला तर दुसरीमध्ये दादाची सरशी झाली. मात्र, पेशव्याच्या फौजेतील बरेचसे सरदार फितूर झाल्यामुळे त्रिंबकराव पेठे, गोपाळराव पटवर्धन यांनी पेशव्यास तह करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार होळकरांच्या मध्यस्थीने दादा माधवमध्ये तह घडून आला. या तहान्वये पेशवेपद माधवाकडे कायम राहून त्याच्यावर आणि गोपिकाबाईवर नजरकैद लादण्यात आली. तसेच यापुढे माधवराव हा फक्त नामधारी पेशवा राहून कारभाराची सर्व सूत्रे दादाच्या हाती गेली. सत्ता हाती येताच प्रथम दादाने निजामाला सुमारे ५० ते ८५ लाख उत्पन्नाचा मुलुख व दौलताबादचा किल्ला देऊन त्याच्याशी असलेली मैत्री आणखी पक्की करण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर हैदरचा बंदोबस्त करण्यासाठी तो कर्नाटक प्रांती रवाना झाला. मार्गात मिरज येथे पटवर्धनांशी त्याचा खटका उडून त्याने मिरजेच्या किल्ल्याचा ताबा पटवर्धनांकडे मागितला. पटवर्धनांनी किल्ल्याचा कब्जा देण्यास नकार दिल्यामुळे मिरजेला वेढा घालून आपल्याच सरदारासोबत लढण्याची दादावर पाळी आली. ता. २९ डिसेंबर १७६२ ते ३ फेब्रुवारी १७६३ पर्यंत मिरजेचा संग्राम चालून अखेर किल्ला दादाच्या ताब्यात आला. दरम्यान दादा सूड घेईल या धास्तीने गोपाळराव पटवर्धनाने निजामाकडे संधान जुळवून तिकडे आश्रय घेतला. मात्र, पटवर्धनांशी युद्ध झाल्यावर देखील दादाने त्यांचा सूड न घेत त्यांच्यावर कृपावृष्टीचं केली. एक मिरज वगळता पटवर्धनांकडील सर्व प्रदेश त्याने त्यांच्याच ताब्यात परत दिला व तो पुढे कर्नाटकात रवाना झाला. 
               राक्षसभुवनवर निजामाचा पराभव, नजरकैदेतून माधवरावची सुटका :-  याच सुमारास निजाम - भोसल्यांनी एकत्र येउन पेशव्याच्या विरोधात साठ - चाळशीचा तह केला. या तहानुसार पेशव्याच्या विरोधात निजामाला सर्व तऱ्हेची मदत करण्याचे भोसल्यांनी मान्य केले. याबदल्यात पेशव्यांचा जो मुलुख मोहिमेनंतर हाती लागेल त्यात साठ टक्के वाटणी निजामाची तर चाळीस टक्के भोसल्यांची राहील असे ठरवण्यात आले. त्याशिवाय निजामाने जानोजी भोसल्यास सातारचे छत्रपतीपद मिळवून देण्याचे मान्य केले. नागपूरकर भोसल्यांशी हातमिळवणी होताच निजामाने दादाकडे आपल्या पुढील मागण्या पाठवल्या :- (१) भीमा नदीच्या पलीकडील सर्व मुलुख निजामाच्या ताब्यात देणे. (२) आजवर निजामाकडून जे काही किल्ले व महत्त्वाची स्थळे घेतली आहेत ती परत देणे. (३) पुणे दरबारने येथून पुढे निजामाच्या सल्ल्यानुसार आपला कारभार करावा.  
                निजामाच्या या चढेल मागण्यांनी दादाची धुंदी साफ उतरली. प्रसंग जाउन त्याने माधवासोबत मिळते - जुळते घेतले. माधवरावाने देखील मिळालेल्या संधीचा फायदा उचलण्याचे ठरवले. स्वतःचे कर्तुत्व सिद्ध करण्याची हीच एकमेव वेळ असल्याचे त्या चाणाक्ष युवकाने जाणले. चुलत्याशी त्याने नम्रभाव स्वीकारून त्याच्यासोबत सख्य जोडले. दादा - माधव एकर येताच, नाराज सरदारांचे रुसवे काढून त्यांना मदतीस बोलावण्यास त्यांनी आरंभ केला. त्यानुसार पटवर्धन, होळकर वगळता बव्हंशी सरदार त्यांना येऊन मिळाले. पैकी होळकराचा यावेळी पेशव्याला मोठा आधार वाटत असून त्यास बोलावण्यासाठी दादाने नारोशंकरला वाफगावी पाठवले. पेशवा अडचणीत असून त्यास आपल्या मदतीची गरज आहे हे ओळखून होळकराने यावेळी आपल्या काही मागण्या पेशव्याकडून मान्य करून घेतल्या आणि मगच तो वाफगावातून बाहेर पडला. दरम्यान, दादा - माधव सैन्यासह निजामाच्या राज्यात घुसून औरंगाबादपर्यंत पोहोचले होते. दादाने शहरावर हल्ला चढवून शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. दादाचा मुक्काम औरंगाबादेस असताना दोन विलक्षण असे प्रसंग त्याच्या आयुष्यात घडून आले. (१) दादाचा १ वर्षाचा मुलगा भास्करराव हा त्र्यंबकेश्वर येथे मरण पावला. (२) एका गारद्याने दादावर कट्यार चालवून त्यास ठार करण्याचा प्रयत्न केला. या दोन प्रसंगांनी त्याच्यावर काय परिणाम झाले असावेत हा एक प्रकारे चर्चेचा आणि संशोधनाचाच विषय आहे पण तूर्तास इतकेच पुरे. इकडे पेशवे औरंगाबादेवर चालून गेल्याचे समजताच निजाम - भोसले त्यांच्या पाठीवर धावून आले. तेव्हा पेशव्यांची फौज औरंगाबाद सोडून वऱ्हाडात शिरली. मल्हाररावाच्या सल्ल्याने पेशवा यावेळी गनिमी काव्याचे युद्ध खेळत होता. होळकराच्या रणनीतीला तोंड देण्यासाठी निजामाने वेगळाच डाव रचला. त्याने आपल्या लष्कराचे तीन भाग करून एक त्याने नाशिक प्रांती रवाना केला. दुसरा विभाग घेऊन तो स्वतः नगरला तळ ठोकून राहिला तर तिसरा विभाग भोसल्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेला. 
                     निजाम - भोसल्यांच्या सरदारांनी पुण्याची राखरांगोळी करून टाकली. शहराचा बचाव करण्यासाठी पुणेकरांनी गोपाळराव पटवर्धनाकडे निरोप पाठवले खरे पण निजाम पटवर्धनाचे थोडी ऐकून घेणार ? कधी नव्हे ती पेशव्याची राजधानी लुटण्याची त्यास संधी मिळाली होती, हि संधी साधून त्याने पेशव्यांचे नाक कापून टाकले ! पुण्याच्या दुर्दशेची बातमी समजताच पेशव्याने हैद्राबादची वाट लावून टाकली. परंतु यामुळे दोन्ही पक्ष चीडीस पेटण्यापलीकडे काही साध्य झाले नाही. अखेर ता. १० ऑगस्ट १७६३ रोजी गोदावरीनजीक राक्षसभुवन येथे निजाम - पेशव्यांची एक मोठी लढाई घडून आली. तत्पूर्वी भोसल्याला निजामाच्या गोटातून फोडण्यास पेशव्याला यश मिळाले होते. भोसल्यांनी दगा दिल्याचे समजताच युद्धाच्या आदल्याच दिवशी निजाम गोदावरी पार करून गेला होता. परंतु त्याची मुख्य फौज अजून अलीकडेच होती. तेव्हा पेशव्याने तातडीने त्या सैन्यावर हल्ला चढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १० ऑगस्ट रोजी मराठी पथके निजामाच्या फौजांवर तुटून पडली. पण युद्धाच्या पूर्वार्धात निजामाच्या फौजांनी मराठी पथकांचा चांगलाच समाचार घेत खुद्द दादाला कैद करण्याचा प्रयत्न केला. परंतु होळकर व माधवरावाने फिरून बळ बांधून चढाई केल्याने युद्धाचे पारडे फिरले. निजामाचा मुख्य सेनानी व दिवाण विठ्ठल सुंदर मारला गेल्याने  निजामाची फौज पळत सुटली व पेशव्याला मोठा विजय प्राप्त झाला. राक्षसभुवनच्या संग्रामानंतर भोसले - पेशवे यांची भेट घडून पेशव्याने त्यांना अशीरगडचा किल्ला व तीस लाखांचा मुलुख देऊन राजी राखले.   गोपाळराव पटवर्धन देखील निजामाचा पक्ष सोडून पेशव्याच्या गोटात परतला. इकडे निजामाने औरंगाबादेस जाउन तहाच्या वाटाघाटींना आरंभ करत आतल्या अंगाने फौजेची जुळवाजुळव चालवली. तेव्हा पेशव्याने औरंगाबादेवर चढाई केली. त्यावेळी उभयतांचे कित्येक संग्राम घडून आले व त्यात अनेकदा निजामाच्या सैन्याला मार खावा लागला. तेव्हा त्याने उदगीरच्या तहातील साठ लाखांचा व नव्याने आणखी बावीस लक्षांचा मिळून ब्याऐंशी लाख उत्पन्नाचा प्रदेश पेशव्याला देऊन समेट करून घेतला. 
              निजाम - पेशवे संघर्षाची चर्चा तपशीलवार करण्याचे मुख्य कारण म्हणजे, हाच तो प्रसंग होता कि, माधवरावाचे सुप्त तेज तळपून त्याच्यासमोर दादा काहीसा तेजोहीन झाला. निजामावरील मोहिमेत दादाने पेशव्यावर लादलेले सर्व निर्बंध हळूहळू सैल होत जाउन स्वकर्तुत्वाने पेशवा स्वतंत्र झाला. परिणामी, येथून पुढे त्यास कैदेत ठेवण्याची दादाची हिंमत झाली नाही. मात्र या ठिकाणी दादाच्या खुल्या मनाची तारीफ करावी लागेल. राक्षसभुवनचा संग्राम घडून गेल्यावर त्याने गोपिकाबाईला लिहिलेल्या पत्रात माधव विषयी पुढील गौरवोद्गार काढले आहेत :- " चिरंजीव रायांनी यंदा मेहनतीत व शिपाईगिरीत कमी केली नाही. आम्हांपेक्षा अधिक झाले." निजामासोबत तह घडून आल्यावर पेशवा २ नोव्हेंबर १७६३ रोजी पुण्यास परतला तर दादा नाशिकला निघून गेला. 
  दादा - माधव यांचे शीतयुद्ध :- नाशिक मुक्कामी स्नान - संध्या करून राहण्याचा दादाचा आरंभी निश्चय होता. स. १७६४ च्या पूर्वार्धात तो त्र्यंबकेश्वरी गेला. तेथून नाशिकजवळ चावंडस गावी त्याने स्वतःसाठी वाडा बांधून घेतला. नंतर अग्निहोत्र घेण्याचा मनोदय व्यक्त करून त्या तयारीस लागला खरा परंतु, संकल्प करण्याच्या वेळी त्याचे मन पालटले व त्याने अग्निहोत्र घेण्याचा बेत रद्द केला. या सुमारास हैदरचा बंदोबस्त करण्यासाठी माधवराव कर्नाटकात तळ ठोकून बसला होता. अशा वेळी पुरंदरचे प्रकरण उद्भवून दादा - माधव यांच्यातील कृत्रिम स्नेहभाव भंग पावून त्यांच्यात एकप्रकारे शीतयुद्धाचा भडका उडाला. 
                         पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी शिवपुत्र राजारामाने वंशपरंपरेने कोळी व बेरडांना स. १६९१ मध्ये दिली होती. स. १७६४  पर्यंत या किल्ल्याचे मालक बदलले पण संरक्षक कामगार मात्र तेच राहिले. पुढे आळेगावी माधव दादाच्या कैदेत पडल्यावर दादाने पुरंदर किल्ला आबा पुरंदरेच्या ताब्यात दिला.  स. १७६४ मध्ये पुरंदरावरील कोळी - बेरडांचे आणि आबा पुरंदरेचे काही कारणांनी खटकले व आबाने कोळी - बेरडांना नोकरीवरून दूर करून नवीन माणसे किल्ल्याच्या बंदोबस्ताला नेमली. यामुळे कोळी - बेरड बिथरले. त्यातच पुरंदरे कुटुंबातील भाऊबंदकीचा देखील या प्रकरणास संदर्भ आहे. त्यांनीही आबाच्या विरोधात कोळी - बेरडांना फूस लावली. दरम्यान स. १७६४ च्या उन्हाळ्यात आबा, दादाला भेटण्यास नाशिकला गेला असता, कोळी - बेरडांनी विसाजीपंत सानेच्या चिथावणीवरुन पुरंदरवर हल्ला चढवून पेशव्याच्या नावाने तो किल्ला ताब्यात घेतला. वस्तुतः यामागे माधवाचा अजिबात हात नव्हता. मात्र या कारस्थानात दादाचे अंग निश्चित होते.                                      
                   दादाचे एक स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे त्याचे एक मन नेहमी निवृत्तीकडे ओढ घेत असे तर दुसरे राजसत्तेकडे ! त्यामुळे त्यचे ठाम मत असे कधी बनलेच नाही. यावेळी देखील त्याच्या संन्यस्त मनावर राजकीय महत्त्वकांक्षेने मात केली. विसाजीपंतास हाताशी धरून दादाने पुरंदरचा किल्ला आपल्याच हस्तकाच्या ताब्यातून काढून घेतला. यामागे त्याचे अनेक हेतू होते. माधवरावाने आपणांस पूर्णतः निष्प्रभ करून सत्ता हाती घेतल्याचे शल्य त्याच्या पोटांत डाचत होते. माधवसोबत एखादी  निर्णायक लढाई झाल्याखेरीज आपल्याला पेशवाई वा राज्याची वाटणी मिळणार नाही हे तो पूर्णपणे जाणून असला तरी त्याचे संन्यस्त, धार्मिक मन राज्यलोभास्तव पुतण्यावर निकराने शस्त्र चालवण्यास धजत नव्हते. तरीही त्याचे सत्तालोलुप मन त्यास राजकीय खटपटी करण्यास प्रवृत्त करायचे आणि त्यावेळी तो सर्व धर्मशास्त्र बाजूला ठेऊन राजकारण खेळायचा.  दादाच्या मुख्य मनातील या पोटमनांचा संघर्ष अविरत चालला आणि अखेरपर्यंत बुद्धीऐवजी मनाच्या कलाने चालत दादाने सदैव अपयशाचे तोंड पाहिले. असो, पुरंदरचे प्रकरण देखील असेच त्याने उपस्थित केले. कोळी - बेरडांच्या दंग्याशी त्याचा संबंध नव्हता पण, त्या दंग्याचा त्याने फायदा उचलून पुरंदरसारखे बचावाचे भक्कम ठिकाण आपल्या ताब्यात घेतले. आबा पुरंदरेस दादाची हि खेळी समजताच तो पुरता खचला. त्याने दादाची भेट घेणे देखील टाळले इतका तो नाराज झाला. इकडे, माधवरावाच्या लक्षात आले कि, दादाला मोकळे सोडल्यास तो असेच उपद्व्याप करत बसणार. तेव्हा कर्नाटक स्वारीत सहभागी होण्यासाठी त्याने दादाला विनंती केली आणि त्यानुसार दादा कर्नाटकांत रवाना झाला. मात्र यावेळी माधवरावच्या विरोधात युद्ध पुकारण्याकडे त्याच्या मनाचा कल झुकत चालला होता हे निश्चित !  
                            स. १७६५ च्या जानेवारी अखेरीस दादा - माधव यांची हरपनहळळीला भेट झाली. यावेळी हैदरचा पुरता बंदोबस्त होण्याची वेळ आली होती. आणखी थोडा नेट केला असता ते संस्थान पेशव्याच्या ताब्यात आले असते परंतु, दादाने पेशव्यास हैदरसोबत तह करण्याची गळ घातली. हैदरदेखील यावेळी तहासाठी अत्यंत घायकुतीला आल्याने आणि मोहीम बराच काळ चालल्याने माधवरावाने तहास संमती दिली. त्यानंतर उभयतां पुण्यास परतले व काही दिवसांनी दादाने राज्याच्या अर्ध्या वाटणीची मागणी माधवरावाकडे केली. परंतु, माधवरावाने चुलत्याची समजूत काढून त्यांस स्वतंत्रपणे उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर रवाना करण्याचा निर्णय घेऊन प्रस्तुत प्रसंगी वेळ मारून नेली. स. १७६५ च्या सप्टेंबरात दादा उत्तरेत रवाना होण्यास डेरेदाखल झाला खरा पण, याच सुमारास नागपूरकर भोसल्यांचे प्रकरण वर्दळीवर आल्याने खासा माधवराव भोसल्यांवर चालून गेला व दादाने भोसल्यांशी संधान बंधू नये म्हणून त्यास देखील आपल्या सोबत घेतले. याच सुमारास निजाम - भोसल्यांचा लढा सुरु असून औरंगाबादच्या तहातील एका कलमानुसार निजामाने पेशव्याकडे कुमकेची याचना केली. तेव्हा निजाम, भोसले व दादा यांच्यावर एकाच चालीत शह बसवण्यासाठी पेशव्याने निजामाच्या साहाय्यास जाण्याचा निर्णय घेतला. निजाम - पेशवे एकत्र आल्याने भोसल्यांचा नाईलाज होऊन त्यांनी शरणागती पत्करली. स. १७६६ च्या जानेवारीत भोसले - पेशवे यांचा तह होऊन भोसल्यांनी चोवीस लाख उत्पन्नाचा प्रदेश पेशव्यास दिला . पैकी ९ लक्षांचा प्रांत माधवाने आपल्याजवळ ठेवून उर्वरीत पंधरा लाख उत्पन्नाचा मुलुख निजामाला देऊन त्याच्याशी मैत्री जोडली. 

रघुनाथरावाची अखेरची उत्तर स्वारी :- भोसल्यांचे प्रकरण निकाली निघाल्यावर दादा उत्तरेत रवाना झाला. यावेळी उत्तरेतील राजकीय परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची झाली होती. बंगाल - बिहारमध्ये इंग्रजांचे वर्चस्व वाढून तेथील संस्थानिक इंग्रजांच्या कह्यात गेले होते. खुद्द मोगल बादशहा देखील इंग्रजांच्या कच्छपी लागला होता. आगऱ्यात जाटांचे प्रस्थ अतोनात वाढले असून राजपूत संस्थानिक देखील पूर्वीसारखे मराठी सरदारांना वचकून राहात नव्हते. दिल्लीची वजिरी नावालाच गाजिउद्दिनकडे असली तरी तो स्वतः जीवाच्या भीतीने दिल्लीच्या बाहेर भटकत होता. दिल्लीत अब्दालीचा हस्तक नजीबखान सर्वाधिकारी होऊन बसला असला तरी मोडकळीस आलेल्या बादशाही डोलाऱ्यास सावरण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. पंजाबात शिखांचा उदय होऊन त्यांनी अब्दाली, मोगल व मराठे यांना तेथून बाहेर काढण्याचा उपक्रम चालवला  होता. सारांश, दादाच्या प्रथम उत्तर हिंदुस्थान स्वारीच्या वेळी जी राजकीय परिस्थिती होती,  जवळपास तशीच याही वेळी होती. फरक फक्त इतकाच होता कि, शिंदे - होळकर त्यावेळी पूर्ण भरात होते आणि पुणे दरबार देखील एकसंध होता. परंतु आता स्थिती पालटली होती. पानिपतावर शिंदे घराण्याचा निकाल लागून त्यांच्या सरदारीच्या वारसाचा प्रश्न अजून न सुटल्याने उत्तरेची सर्व जबाबदारी मल्हारराव होळकराच्या अंगावर येउन पडली. त्यानेही परिस्थिती पाहून बंगाल, बिहार, दिल्ली, पंजाब इ. आहाराबाहेरील प्रदेशांवर ताबा बसवण्याचा नाद सोडून माळवा, आग्रा, राजपुताना इ. प्रांतांतच आपले सर्व बळ व लक्ष केंद्रित केले. याकामी महादजी शिंदेची त्याला मदत असून, मल्हाररावाच्या मदतीने आपल्या घराण्यातील सरदारकीचा बचाव करण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता. पानिपतपूर्व मराठी राज्याची प्रतिष्ठा व दरारा कायम राखण्याच्या प्रयत्नात होळकरास इंग्रज  - सुजा यांच्या झगड्यात पडावे लागले. याप्रसंगी  होळकराने इंग्रजांना चांगलाच हात दाखवला.   
                  उत्तरेत या घडामोडी घडत असताना दादाची स्वारी स. १७६६ च्या एप्रिलमध्ये झाशीजवळ आली. यावेळी मल्हारराव आणि महादजी गोहदला मोर्चे लावून बसले होते. पुढे यथावकाश शिंदे - होळकरांच्या सोबत दादाची भेट घडून आली खरी पण पुढील उपक्रम निश्चित करण्यापूर्वीच ता. २० मे १७६६ रोजी आलमपूर जवळ  मल्हारराव होळकराचे निधन झाले. त्यामुळे दादाच्या उत्तर स्वारीचा पुरता बोजवारा उडून गेला. कारण, महाभारतात ज्याप्रमाणे कृष्णावतार समाप्त झाल्यावर अर्जुन हा एक अतिसामान्य धनुर्धर बनून राहिला तद्वत मल्हाररावाच्या मृत्यूने राघोबाची सर्व भरारी संपुष्टात आली. असो, मल्हाररावच्या मृत्यूनंतर त्याची सुभेदारी मालेराव होळकर -- या त्याच्या नातवास प्राप्त झाली आणि त्याचा दिवाणी कारभार अहिल्याबाई तर लष्करी व्यवस्था तुकोजी होळकर पाहू लागले. इकडे शिंदे - होळकरांच्या फौजा गोहदला वेढा घालून बसलेल्या होत्या. उत्तरेत आल्यावर दादाने या मोहिमेची सूत्रे आपल्या हाती घेतली. दरम्यान राघोभरारी उत्तरेत आल्याचे समजताच मोगल बादशहाने त्यास त्वरेने आपल्या मदतीसाठी येण्याची पत्रे पाठवली. परंतु जाटाचा प्रश्न निकाली काढल्याखेरीज दादाला पुढे जाता येईना व जाट काही सहजासहजी ऐकेना ! तेव्हा दादाने कलकत्त्यास पत्रे पाठवून इंग्रजांकडे मदतीची मागणी केली. यावेळी विजयदुर्गचा ब्रिटीश विजेता रॉबर्ट क्लाइव्ह कलकत्त्यास अधिकारावर होता. त्याने दादाला मदत देण्याच्या बाबतीत आपली असमर्थता व्यक्त केली. दरम्यान मोहिमेत खंडणीची प्राप्ती न झाल्याने फौजेचा खर्च भागवणे मोठे जिकीरीचे बनले. अशा प्रसंगी दादाने पुण्याकडे पत्र पाठवून खजिन्याची मागणी केली, पण यावेळी खुद्द पेशवा आर्थिक संकटात असल्याने दादाची मागणी पूर्ण करण्यास तो असमर्थ होता. अशात स. १७६६ संपून १७६७ चे नवीन वर्ष उगवले. नव्या वर्षासोबत नवीन राजकारणांचा देखील उदय होऊन मराठ्यांच्या विरोधात बहुसंख्य जाट संस्थानिक एकत्र येउन त्यांच्या मदतीला रोहिला सरदार देखील येण्याची चिन्हे दिसू लागली. पंजाबात शिखांचा जोर वाढून ते दिल्लीवर चालून येण्याची शक्यता दिसत होती. अशा परिस्थितीत आपला निभाव लागणे शक्य नसल्याचे दादाने ओळखले. कसाबसा त्याने गोहदकराशी समझोता करून परतीचा रस्ता धरला. याच सुमारास म्हणजे ता. २७ मार्च १७६७ रोजी मालेराव होळकराचा मृत्यू होऊन होळकरशाहीचा नवा वारस नेमण्याची संधी दादासमोर चालून आली असे सामान्यतः म्हटले जाते परंतु त्यात तथ्य नाही.
                       मल्हाररावच्या मृत्युनंतर गंगोबाचे कारभारी म्हणून महत्त्व घटले होते. तसेच मल्हारबापेक्षा या गंगोबाशीच दादाची अधिक जवळीक होती. दादाची महत्त्वकांक्षा मल्हारी व गंगोबा दोघेही जाणून होते. परंतु दादाला आळ्यात ठेवण्याचा मल्हारबाचा उपक्रम असून त्याविपरीत दादाला चिथावणी देण्याचा गंगोबाचा क्रम होता. मालेराव मरण पावल्यावर होळकरशाही निराधार झाली. अहिल्याबाई राज्यकारभारात दक्ष असली तरी सरदारकी कोणाच्या नावे द्यायची हा एक मोठा प्रश्नचं होता. अशा परिस्थितीत होळकरांची सरदारकी आपल्या मर्जीतील इसमास देऊन होळकरांची दौलत व सैन्य सोबत घेऊन पेशवाईसाठी यत्न करण्याचा दादाचा मानस होता आणि गंगोबाचे त्यास अनुमोदन होते. त्यानुसार दादाने होळकरांचा सरंजाम जप्त करण्यासाठी शेट्याजी आयतोळा व आनंदराव गोपाळ या आपल्या दोन सरदारांना पाठवले. इकडे दादाची वाकडी चाल पाहून अहिल्याबाईने पुत्रशोक बाजूला ठेऊन युद्धाची तयारी चालवली. दादाच्या सरदारांना रोखण्यासाठी आपली पथके सरदार बुळेच्या नेतृत्वाखाली रवाना करून घडल्या प्रकाराची माहिती पत्राद्वारे माधवरावास कळवली. सरदार बुळे यांनी दादाच्या सैन्याचा पराभव करून लढाईमध्ये आयतोळा यास ठार केले. यामुळे दादाचा संताप अनिवार होऊन त्याने शिंदे, भोसले, गायकवाड या सरदारांना होळकरांवर चालून जाण्याची आज्ञा केली. परंतु, या सरदारांनी दादाची आज्ञा जुमानली नाही. दरम्यान माधवरावाने अहिल्याबाईस पत्र पाठवून, प्रसंग पडल्यास दादाच्या विरोधात शस्त्र उपसण्याची  दिली तसेच आपल्या मर्जीतील दोन इसम तातडीने पुण्यास पाठवून सरदारकीचा बंदोबस्त करून घेण्याचा हुकुम केला. इकडे दादाने सर्व रागरंग पाहून अहिल्याबाईसोबत तडजोड आरंभली आणि पुत्रनिधनाच्या सांत्वनार्थ ३० मार्च १७६७ रोजी इंदूर येथे तिची भेट घेतली. होळकरांच्या कारभारात हात घालून फजित पावल्यावर दादाने गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. गोपिकाबाईस लिहिलेल्या पत्रानुसार गायकवाडास जरब देण्याचा त्याचा मानस असल्याचे दिसून येते. परंतु, खरे पाहता हे सर्व नाटक होते. दमाजी गायकवाड हा दादाचा पक्षपाती असून त्याच्याशी संधान जुळवून पेशव्याच्या विरोधात लढा पुकारण्याचा दादाचा बेत होता. ठरवल्याप्रमाणे दादा गुजरातला गेला नाही. अंतस्थरित्या त्याने आपले कार्य साधून घेतले व स. १७६७ च्या जूनमध्ये तो आनंदवल्लीला परतला. याच सुमारास कर्नाटक स्वारी मर्यादित प्रमाणात यशस्वी करून विजयी पेशवा माधवराव देखील पुण्यास आला होता. 
             धोडप येथे दादाचा पराभव व कैद :-   पेशवा पुण्यास येताच दादाने परत एकदा राज्याच्या वाटणीचा विषय काढला व फौजांची जमवाजमाव सुरु केली. पेशव्यानेदेखील सैन्याची तयारी करत दादासोबत वाटाघाटींची तयारी दर्शवली. अखेर स. १७६७ च्या दसऱ्यास उभयतांचा तह घडून आला. त्यानुसार दादाने सातारा, नगर, शिवनेरी व अशीरगड हे चार किल्ले पेशव्याच्या ताब्यात देण्याचे मान्य केले. तसेच राज्यकारभारात हस्तक्षेप न करण्याची पेशव्याची अट देखील मंजूर केली. त्याबदल्यात दादाच्या उत्तर स्वारीत झालेले २५ लाखांचे कर्ज वारण्याची हमी पेशव्याने घेतली आणि दादाच्या निर्वाहासाठी दहा लक्ष उत्पन्नाची जहागीर तोडून देण्याचे मान्य केले. सारांश, परत एकदा दादा - माधव यांचा वरकरणी समेट होऊन पेशवा पुण्यास परतला. परंतु माधव पुण्यास रवाना झाल्यावर दादाने आपले हस्तक निजाम, भोसले, हैदर, इंग्रज, गायकवाड इ. कडे रवाना केले व पेशवाई प्राप्त करण्यासाठी आपणास सहकार्य करावे अशी विनंती केली. याच सुमारास हैदरच्या विरुद्ध मदत मागण्यासाठी इंग्रज वकील मॉस्टिन पुण्याला आला होता. दादा - माधव यांच्यातील संघर्ष इंग्रजांना माहिती असल्याने मॉस्टिनने आपला सहकारी ब्रोम यास दादाकडे पाठवून दादाचे मनोरथ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ब्रोम सोबत झालेल्या चर्चेत दादाने त्यास उघडपणे विचारले कि, पेशव्याच्या विरोधात लढण्यासाठी इंग्रज आपणांस तोफा व दारुगोळ्याचा पुरवठा करतील का ? परंतु, माधवराव पेशव्याच्या सामर्थ्याची कल्पना असल्याने ब्रोमने दादाला कसलेही आश्वासन दिले नाही. दरम्यान, दादाचे अंतस्थ बेत माधवास समजून त्याने चुलत्याच्या बाबतीत कडक धोरण स्वीकारण्याचे निश्चित केले. विना लढाई दादा हाती येणे शक्य नसल्याने माधवाने सर्व सरदारांना पत्र पाठवून आपल्या मदतीस येण्याची आज्ञा केली. दादाने देखील आपल्यातर्फेने सर्व सरदारांकडे आणि पुणे दरबारच्या शत्रूंकडे पत्रांची झोड उठवली. त्याचप्रमाणे स. १७६८ च्या एप्रिलमध्ये गोविंदपंत भुस्कुटे यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा दत्तक घेऊन त्याचे नाव अमृतराव असे ठेवले. दत्तकाची वस्त्रे व साखर त्याने माधवरावाकडे पाठवली पण त्याने त्यांचा स्वीकार केला नाही. 
                  दत्तकपुत्र घेऊन दादाने पेशवे कुटुंबातील कलहाग्नीत तेल ओतण्याचे कृत्य केले. दादा जेव्हा - जेव्हा राज्याच्या वाटणीचा विषय काढत असे तेव्हा तेव्हा माधवराव  त्याचा पुत्र म्हणवून विषयाला बगल देत असे. मात्र, दत्तक का होईना पण दादास आता पुत्रसंतान असल्याने माधवाची ती पळवाट बंद झाली. त्याचप्रमाणे दादाच्यामागे पेशवाईसाठी आणखी एक दावेदार उभा राहिला तो निराळाच ! 
                     दादाला लष्करी तयारीसाठी उसंत मिळू न देत पेशवा त्वरेने चालून येऊ लागला. हाताशी लागेल तेवढी फौज घेऊन दादा धोडप किल्ल्याच्या आश्रयास गेला. होळकरांची फौज गंगोबातात्याच्या नेतृत्वाखाली दादाच्या गोटात दाखल झाली. गायकवाडांची लष्करी पथके दमाजीपुत्र गोविंदरावाच्या नेतृत्वाखाली दादाच्या मदतीस धावली. शिंद्यांच्या सरदारकीचा औरस मालक केदारजी शिंदे देखील दादाला येउन मिळाला. उर्वरीत सरदार पेशव्याच्या निशाणाखाली गोळा झाले. धोडपजवळ संग्राम होणार हे उघड होते पण आयत्यावेळी दादाच्यात लपलेला शास्त्री - पुराणिक बाहेर आला आणि त्याने आपण संग्रामात सहभाग घेत नसल्याचे जाहीर केले. कारण युद्धात एकतर माधव राहील वा मी, आणि जर तो मारला गेला तर माझ्याकडून पुत्रहत्या घडेल अथवा उलट झाल्यास त्याच्याकडून पितृहत्या घडेल असा शास्त्रार्थ त्याने काढला. तेव्हा लढाईची सर्व जबाबदारी गंगोबा, चिंतो विठ्ठल रायरीकर, सदाशिव रामचंद्र इ. सरदारांवर येउन पडली. दि. १० जून १७६८ रोजी उभयपक्षांच्या फौजांचा संग्राम घडून त्यात दादाच्या सैन्याचा पराभव होऊन त्याचे कित्येक मदतनीस पेशव्याच्या ताब्यात आले. निरुपाय जाणून लढाईच्या दुसऱ्या दिवशी दादाने शरणागती पत्करली. २२ जून रोजी मोठ्या सन्मानाने पेशव्याने दादाला पुण्यास परत आणले. दादाच्या ताब्यातील सर्व किल्ले, प्रदेश जप्त करण्यात येउन त्यास शनिवारवाड्यात नजरकैदेत ठेवण्यात आले. मात्र, राजकीय प्रकरणात सहभाग न घेण्याचे बंधन वगळता त्यावर इतर कोणतेही निर्बंध लादले गेले नाहीत. येथून पुढे कैदेत असताना उपवास, व्रत, अनुष्ठान इ. धार्मिक कृत्ये करण्यात व कैदेतून पळून जाण्याचे उद्योग करण्यात दादाने काही दिवस घालवले. 
       माधवराव पेशव्याचा मृत्यू :- दादाला कैदेत टाकल्यावर माधवने राज्यकारभाराची घडी बसवण्याचे कार्य हाती घेतले. अजून त्याच्यापुढे कामांचे पुष्कळ डोंगर पडले होते परंतु, क्षयाचा विकार बळावल्याने माधवास आपल्या आयुष्याची मर्यादा समजून आली. आपल्या पश्चात मुत्सद्दी नानासाहेबांच्या वंशजास -- म्हणजे आपल्या धाकट्या भावास -- नारायणरावास गादीवर बसवण्याचा आग्रह धरणार आणि अनुभवशून्य व अविवेकी नारायणास हि जबाबदारी पेलवणार नाही याचीही माधवास कल्पना होती. भावी संकट जाणून त्याने स. १७७२ च्या मार्चमध्ये दादास कैदेतून मोकळे केले. सखारामबापूने नारायणरावास जवळ बसवून त्यास राज्यकारभार शिकवावा अशी आज्ञा केली. तसेच आपल्या माघारी दादाचे काय स्थान असावे यावर त्याने बराच विचार केला. ता. ३० सप्टेंबर १७७२ रोजी माधवरावाने जी नऊ कलमांची यादी लिहून त्यावर कारभाऱ्यांची काबुलात लिहुन घेतली, त्यातील एका कलमानुसार दादाच्या खर्चास पाच लाखांची जहागीर लावून द्यावी -- फार तर सात लक्षांची जहागीर द्यावी पण अधिक काही देऊ नये अशी त्याने कारभाऱ्यांना लेखी आज्ञा केली. 
                 पुढे लवकरच दि. १८ नोव्हेंबर १७७२ रोजी थेऊर मुक्कामी माधवरावाचे निधन झाले. त्याच्या अखेरच्या दिवसांत दादाचा मुकाम थेऊर येथेच होता.  मृत्युसमयी त्याने नारायणरावाचा हात दादाच्या हाती दिल्याची नोंद मिळते. परंतु त्यातून नारायणाने दादाच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार करावा असे सुचित होत नाही. आपल्या पश्चात दादाची व्यवस्था कशी असावी आणि त्याचे या राज्यात स्थान काय राहील हे माधवाने आपल्या मृत्यूपूर्वीचं  निश्चित केले होते. असो, ता. ३ डिसेंबर १७७२ रोजी नारायणराव पेशवेपदाची वस्त्रे घेण्यास साताऱ्यासनिघाला. त्यावेळी त्याने दादाला सोबत येण्याची विनंती केली असता दादाने २५ लाखांचा सरंजाम व चाकरीची संधी देण्याची मागणी केली. परंतु सर्व राज्य तुमचेचं आहे असे म्हणून नारायणाने दादाची मागणी फेटाळून लावली. नारायण व माधवच्या स्वभावात बरेच अंतर होते. माधव जितका कोपिष्ट तितकाच समजूतदार होता पण नारायणाचे तसे नव्हते. तापटपणाच्या बाबतीत तो माधवरावचे अनुकरण करत असे पण त्याचा समजूतदारपणा नारायणाकडे नव्हता. दादाने हे ओळखून असल्याने त्याने नारायणास फार न डिवचता, तूर्तास पड खाउन साताऱ्यास जाण्याचे मान्य केले. दि. ५ डिसेंबरला उभयतां साताऱ्यास गेले व ता. १३ डिसेंबर १७७२ रोजी नारायणास पेशवेपदाची व बापूस मुख्य कारभाऱ्याची वस्त्रे मिळून नाना आणि मोरोबा यांना फडणीशी प्राप्त झाली. ता. ३१ डिसेंबर १७७२ रोजी दादा - नारायण पुण्यास परतले. 
                                                                            ( क्रमशः ) 
                                 

      
                     
                            
                            

शनिवार, २९ जून, २०१३

श्रीमंत रघुनाथराव पेशवे ( भाग - १ )

  ' होणे जाणे ईश्वराधीन. आमचे स्वाधीन काय आहे ! '
                                                         -- रघुनाथ बाजीराव भट
       
                                                                           
               अटकेपार भगवा फडकवणारा बहाद्दर लढवय्या, मराठी राज्याला ग्रासणारा काळराहू, पेशवाईतील कलि पुरुष, भोळा सांब, हलक्या कानाचा, अक्कलशून्य राजकारणी  इ.  विशेषणांनी अनेक मराठी - अमराठी इतिहासकारांनी श्रीमंत रघुनाथराव पेशवे उर्फ दादासाहेब उर्फ राघोभरारी यांचा गौरव केला आहे. या राघोबादादांच्या चरित्राचा धावता आढावा घेण्याचा या लेख मालिकेमागील प्रमुख उद्देश आहे. 
                   दिनांक १८ ऑगस्ट १७३४ रोजी साताऱ्याजवळील माहुली येथे रघुनाथाचा जन्म झाला. रघुनाथराव ४ - ५ वर्षांचा असताना बाजीराव पेशव्याचे निधन झाले. बापाच्या पाठीमागे आपल्या बंधूंच्या शिक्षणाची व संगोपनाची सर्व जबाबदारी नानासाहेब पेशव्याने पार पाडली. परंतु रघुनाथ किंवा त्याचा धाकटा भाऊ जनार्दन यांच्या विषयी माहिती देणारी जी काही पत्रे उपलब्ध आहेत ती पाहता या मुलांच्या वर्तनावर फारसे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. पेशवे कुटुंबात यावेळी बाजीरावाची आई राधाबाई, तसेच बाजीरावाची पत्नी काशीबाई या प्रमुख स्त्रिया हयात होत्या पण त्यांचेही या मुलांवर फारसे बंधन नसल्याचे दिसून येते. रघुनाथ व सदाशिव यांचे लहानपणापासूनच आपसांत बनत नसल्याचे तत्कालीन एका पत्रावरून दिसून येते. असो, बाजीराव पेशव्याच्या पाठोपाठ काही महिन्यांनी चिमाजीआपा मरण पावला व त्यानंतर अवघ्या ८ - १० वर्षांत वरवर एकसंध दिसणाऱ्या पेशवे परिवारात सुप्त संघर्षास आरंभ झाला. 
         राजकारणात प्रवेश :- स. १७४९  अखेरीस सातारच्या छ. शाहू निधन झाल्यावर नवीन छत्रपती रामराजा पेशव्याच्या कह्यात गेला. ताराबाईस हा प्रकार मानवला नाही. तिने छत्रपती रामराजास -- म्हणजे आपल्या तथाकथित नातवास -- कैद करून सत्ता हाती घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी ताराबाई विरुद्ध नानासाहेब पेशवा असा संघर्ष उद्भवला. यावेळी पेशवे कुटुंबात नानासाहेबा व्यतरिक्त सदाशिव, रघुनाथ व समशेर बहाद्दर हे तिघे कर्ते पुरुष होते. पाकी सदाशिव हा बाकीच्या दोघांपेक्षा वयाने मोठा असला तरी तो चिमाजीआपाचा मुलगा असल्याने तसा दर्जाने दुय्यमचं होता. बाकी रघुनाथ व समशेर राजकारणात सक्रियपणे भाग घेण्यास अजून अप्रबुद्ध असल्याने त्यांचा राजकीय घडामोडींशी थेट असा संबंध अजूनपर्यंत आला नव्हता. बाजीरावाच्या काळात,  चिमाजी व बाजीराव दोघेही एकमेकांच्या विचाराने स्वाऱ्या - शिकाऱ्या पार पाडत असत. परंतु हि प्रथा निदान सदाशिवरावाच्या बाबतीत तरी पुढे चालू ठेवण्याचा नानासाहेब पेशव्याचा मानस असल्याचे दिसून येत नाही. नाही म्हणायला त्याने सदाशिवरावास उर्फ भाऊला काही मोहिमांवर पाठवले होते परंतु, त्या मोहिमांमध्ये भाऊला निर्णय आणि वर्तन स्वातंत्र्य असे फारसे दिले नसल्याने त्या मोहिम भाऊने पार पाडल्या काय आणि न पाडल्या काय दोन्ही सारखेच ! असो, पेशवे कुटुंबातील एक कर्ता पुरुष म्हणून भाऊ राज्यकारभारात भाग घेत होता पण,  अधिकारपदाचा जोर पाठीशी नसल्याने त्याची एकप्रकारे घरात कुचंबणाच होत होती. पेशवे घराण्यातील हि अस्वस्थता ताराबाईने अचूक हेरली आणि तिने नाना - भाऊमध्ये फूट पाडण्याचा एक प्रयत्न केला. अर्थात, त्यास फारसे यश आले नाही पण भाऊच्या महत्त्वकांक्षेस पंख फुटून त्याने कोल्हापूरची पेशवाई स्वीकारण्याचा खटाटोप आरंभला. त्यामुळे गडबडून जाऊन नानासाहेबाने त्यास आपले मुख्य कारभारीपद देऊ केले. घरातील हे शह - प्रतिशहाचे राजकारण रघुनाथराव अगदी तटस्थपणे पाहत होते. मात्र अजून तरी त्याच्या मनात वैषम्य आलेलं नव्हतं. कारण, स. १७५२ पासून नानासाहेबाने त्यास लष्करी मोहिमांवर पाठवण्यास आरंभ केला होता. नानासाहेबाने दादा - भाऊ यांच्याबाबतीत आरंभापासूनच थोडासा दुजाभाव ठेवल्याचे दिसून येते. दादा प्रमाणेचं भाऊ देखील प्रसंगी लष्करी मोहिम पार पाडत असला तरी स्वारीच्या दरम्यान मर्यादित का होईना पण निर्णय घेण्याचे जे स्वातंत्र्य दादाला होते, ते पेशव्याने भाऊला कधीच दिले नाही. 
  गुजरात व उत्तर हिंदुस्थानात दादाची भरारी  :-  स. १७५३ मध्ये दमाजी गायकवाडाच्या मदतीने दादाने अहमदाबाद शहर मोगलांकडून जिंकून घेत आपल्या पहिल्या वहिल्या लष्करी विजयाची नोंद केली. याचे फळ म्हणून कि काय याच वर्षाच्या उत्तरार्धात दादाची रवानगी उत्तर हिंदुस्थानात करण्याचा नानासाहेबाने निर्णय घेतला. गंमतीची बाब अशी कि, दादापेक्षा चार उन्हाळे - पावसाळे अधिक पाहिलेल्या व दादापेक्षा १ - २ मोहिम अधिक पार पाडलेल्या भाऊला उत्तरेत पाठवण्याचा विचार नानासाहेबाच्या मनात आला नाही. असो, स. १७५३ च्या ऑगस्टमध्ये थालनेर येथून दादाची स्वारी उत्तर हिंदुस्थानच्या दिशेने रवाना झाली ती स. १७५५ च्या ऑगस्टमध्येच -- म्हणजे तब्बल दोन वर्षांनीच पुण्यास परतली. या स्वारीत कुंभेरीचे प्रकरण उद्भवून त्यात खंडेराव होळकराचा त्यात बळी जाऊन जाटांचे वैर मराठ्यांच्या पदरात पडले. त्याशिवाय शिंदे - होळकरात या घटनेमुळे असलेल्या द्वैतभावात भर पडली ती वेगळीचं ! या व्यतिरिक्त म्हणावे असे फारसे यश दादाच्या पदरी पडले नाही. परंतु, स. १७५३ ते ५५ या दोन वर्षांच्या अवधीत त्यास जे विविध अनुभव आले आणि जे काही स्वातंत्र्य त्यास मिळाले, त्यामुळे त्याच्या सुप्त राजकीय आकांक्षांना पंख फुटू लागले. यावेळी शिंदे - होळकर या आपल्या बलदंड सरदारांना नियंत्रणाखाली आणण्यासाठी नानासाहेबाने या दोन सरदारांमध्ये फूट पाडण्याचे धोरण अवलंबले होते. या धोरणानुसार उभय सरदारांमध्ये द्वैत माजवून व प्रसंगी त्यांस रगडून, त्यांच्याकडून सरकारकाम करवून घेण्याची पेशव्याने दादास आज्ञा केली होती. परंतु, दादाने पेशव्यांची आज्ञा काहीशी अर्धवट पद्धतीने अंमलात आणत, बलाढ्य होळकरासोबत -- विशेषतः होळकरांचा कारभारी गंगाधर चंद्रचूड याच्याशी -- त्याने मैत्रीचे संबंध जोडले. दादाच्या या कृत्यामागील कारणपरंपरा उघड होती. पेशव्याचे कारभारीपद सदशिवाकडे म्हणजे, चुलतभावाकडे होते आणि पेशव्याचा सख्खा भाऊ मात्र एक लष्करी सरदार या नात्याने पेशव्याचा ताबेदार बनून राहिला होता. दादाच्या या विचारांना गायकवाड, होळकर या पेशव्याकडून दुखावलेल्या सरदारांनी व बापूसारख्या दादाच्या हितचिंतकांनी प्रोत्साहन दिलेचं नसेल असे म्हणता येत नाही.          
              रघुनाथरावाचा मुख्य स्वभाव देखील याच काळात सर्वांच्या दृष्टीस पडला. तो पराक्रमी, धाडसी, महत्त्वकांक्षी असला तरी प्रसंगी खंबीरपणे निर्णय घेणे व घेतलेल्या निर्णयांना घट्टपणे चिटकून राहणे त्याच्या कुवतीबाहेरचे होते. त्याखेरीज तो बुद्धीपेक्षा मनातील विचारांना - भावनांना अधिक किंमत देत असे. त्यामुळे त्याचा स्वभाव हा चंचल बनून राहिला. त्याच्या या स्वभावातचं त्याच्या पुढील आयुष्यातील भानगडींचे मूळ आहे आणि त्याचा  हाच स्वभाव त्याच्या मुलांमध्ये, बाजीराव - चिमाजी यांच्यात पुरेपूर उतरल्याचे दिसून येते. राहता राहिले वचनभंग, धरसोडपणा इ. दुर्गुण तर त्यांचा उगम त्याच्या स्वभावात नसून वडीलबंधू नानासाहेब पेशव्याच्या वर्तनात आहे. प्रसंग पडताच आपल्या धन्याचा खजिना त्याच्या परवानगीवाचून जप्त करणे, अभयवचन देऊन आपल्याच सरदाराचा गोट लुटणे, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी प्रसंगी राज्यहिताला तिलांजली देणे इ. सद्गुणपूर्वक वर्तनांचा जो आदर्श नानासाहेबाने आपल्या धाकट्या भावासमोर ठेवला होता त्याच मार्गाने दादाने आपली वाटचाल सुरु केली होती. 
                  गायकवाड किंवा होळकर हे आपणांस चढवून स्वतःचा स्वार्थ साधत असल्याचे दादास माहिती नव्हते अशातला भाग नव्हता, पण मानसी काहीतरी एक योजूनचं त्याने आपला वर्तनक्रम निश्चित केला होता. असो, स. १७५६ मध्ये विजयदुर्गाचा प्रसंग उद्भवून तुळाजी आंगऱ्याच्या आरमाराचा व सरदारकीचा निकाल लागला. त्यानंतर विजयदुर्गच्या हस्तांतरणावरून पेशवे - इंग्रज यांच्यात पत्रोपत्री मोठे युद्ध झाले. त्यावेळी इंग्रज वकील स्पेन्सर हा स. १७५६ च्या ऑक्टोबरमध्ये पुण्यास येऊन पेशवेबंधूंना भेटला. या भेटीमध्ये दादाने आपल्या नियोजित दिल्ली स्वारीकरता इंग्रजांकडून सैन्य व तोफखान्याच्या मदतीची मागणी केली. परंतु इंग्रज वकिलाने गोड शब्दांत या मागणीस नकार दिला. तसे पाहता हि क्षुल्लक बाब आहे. पण, मला काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे अभ्यासू वाचकांचे लक्ष वेधायचं आहे.  स. १७५६ मध्ये इंग्रजांची शक्ती खरोखर इतकी वाढली होती कि, त्यांची मदत असल्याशिवाय आपली दिल्ली स्वारी सहजासहजी यशस्वी होणार नाही असाच दादाचा आणि पेशव्याचा देखील समज होता. कारण, या चर्चेच्या प्रसंगी पेशवा तिथे हजर होता आणि त्याने इंग्रजांकडे मदतीची मागणी करण्यापासून दादाला रोखले नाही. याचा अर्थ असा होतो कि दादाला त्याचा पाठिंबा तर होता. म्हणजेचं मराठी राजकारणात इंग्रजांची हस्तक्षेप करण्याची इच्छा असो वा नसो पण पेशवेबंधू मात्र त्यांना घरात घेण्यास अगदीच आतुर झाले होते. 
   अटक स्वारी :- स. १७४८ पासून दिल्लीच्या राजकारणात अफगाण सत्ताधीश अहमदशहा अब्दालीने हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली होती. राज्यविस्तारासाठी त्याला मोगल राजवटीत मोडणारे पंजाब व सिंध हे दोन प्रांत हवे होते आणि स. १७५२ च्या बादशाही संरक्षण करारानुसार मोगल बादशहाने याच दोन प्रांतांमधून चौथाई वसुलीचे हक्क मराठ्यांना दिले होते. परिणामी मराठे व अब्दाली यांचा सामना जुंपणे अपरिहार्य असेच होते. स. १७५६ च्या उत्तरार्धात अब्दाली दिल्लीच्या रोखाने येत असल्याच्या बातम्या समजल्यामुळे नानासाहेबाने नोव्हेंबर महिन्यात रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांना उत्तरेत पाठवले असे सामान्यतः मानले जाते. परंतु, दादाच्या पहिल्या उत्तर स्वारीत अपुरा राहिलेला कार्यभाग पुरा करण्यासाठी त्यास उत्तरेत पाठवण्याचा पेशव्याचा निर्णय आधीच ठरलेला होता हे मात्र सांगितले जात नाही. असो, दादा व मल्हारराव होळकर यांना उत्तरेत रवाना करून स्वतः पेशवा कर्नाटक प्रांती मोहिमेस निघून गेला. सुमारे पंधरा हजार सैन्य सोबत घेऊन दादा १४ फेब्रुवारी १७५७ रोजी इंदूरला पोहोचला. तोपर्यंत अब्दालीने दिल्लीची पुरती वाट लावून टाकली होती. परंतु मल्हाररावास यावेळी अफगाण प्रकरणात हस्तक्षेप करण्याची इच्छा नसल्याने त्याने दादाला दिल्लीचा रोख सोडून राजपुतान्यात जाण्याचा सल्ला दिला व दादाने तो अंमलात देखील आणला. दादा व होळकराच्या या बेजबाबदार वर्तनाबद्दल सर्वच इतिहासकारांनी त्यांना सडकून दोष दिला आहे. पण दुर्देवाची बाब म्हणजे त्यांना तत्कालीन राजकारणाचे मर्म न समजल्याने त्यांनी स्वतःच्या मूर्खपणाचे तेवढे जाहीर प्रदर्शन घडवून आणे आहे व मराठी इतिहास अभ्यासकांनी देखील आपल्या बुद्धीस कष्ट न देता मान्यवर इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास प्रमाण मानून स्वस्थ बसण्यात धन्यता मानली. 
                   वास्तविक अब्दालीच्या दिल्ली स्वारी प्रसंगी त्याच्याशी उघड सामना करण्याचे टाळून दादा व मल्हाररावाने कित्येक महत्त्वाच्या गोष्टी साध्य केल्या याकडे आमच्या इतिहासकारांचे आजवर साफ दुर्लक्षचं झालेलं आहे. प्रथम आपण दादा व होळकराने दिल्लीला न जाण्याचा निर्णय का घेतला हे आधी पाहू :- (१) दादासोबत यावेळी फक्त पंधरा हजार फौज असून होळकराचे देखील जवळपास तेवढेच सैन्य असावे. इतक्या अल्प फौजफाट्याच्या बळावर अब्दालीचा सामना करणे यावेळी शक्य नव्हते. (२) तत्कालीन प्रघातानुसार स्वारीचा खर्च परस्पर बाहेर भागवायचा असल्याने फौज पोसण्यासाठी मार्गातील मांडलिक संस्थानिकांकडून खंडण्या वसूल करतचं पुढे जायचे होते आणि पेशव्यांचे मांडलिक असलेले संस्थानिक, लष्करी बळाचा वापर केल्याशिवाय खंडण्या देत नसत. (३) अब्दालीच्या आक्रमणाचे नेमके कसे पडसाद उमटतात, त्यावर हिंदुस्थानातील सत्ताधीशांची -- विशेषतः मुस्लिम उमरावांची -- काय प्रतिक्रिया व्यक्त होते याचा अजून अंदाज येत नव्हता. (४) प्रत्यक्ष दिल्ली दरबारातून अब्दालीला कितपत पाठिंबा आहे व तेथे त्याचे नेमके किती हस्तक कार्यरत आहेत याचाही अजून अंदाज आलेला नव्हता. (५) दादा व होळकर फेब्रुवारीत इंदूर मुक्कामी होते तेव्हा जवळचं मथुरेस जाट आणि अब्दालीचा झगडा जुंपला होता. अशा वेळी दादा - होळकर पुढे चालून आले असते तर जाटाच्या मदतीने अब्दालीचा काटा त्यांना काढता आला असता असे मानले जाते. परंतु, दादाच्या मागील स्वारीमध्ये मराठ्यांनी जाटांचे पुरेपूर वैर पदरात पाडून घेतले असल्याने जाटावर होळकराचा अजिबात विश्वास नव्हता. आयत्यावेळी जाटाने आपल्याला फशी पाडले तर …? हि भीती त्याच्या मनात सदैव होती. असो, इ. कारणांमुळे दादा - होळकर अब्दालीच्या सामन्यास समोर गेले नाहीत. 
              आता या दोघांनी अब्दालीसोबत लढा टाळून नेमके काय साध्य केले ते पाहू :- (१) स. १७५२ च्या बादशाही संरक्षण करारानुसार मराठ्यांना पंजाब व सिंध प्रांतांची चौथाई मिळाली होती, पण त्यातचं अब्दालीचा पाय शिरल्याने निव्वळ चौथाई वसुलीसाठी अफगाणांवर शस्त्र उपसण्याचा प्रसंग उद्भवला. (२) मोगल बादशहाने जरी रोहिले, अफगाण, राजपूत, जाट इ. देशी - विदेशी शत्रूंपासून आपले व आपल्या बादशाहीच्या बचावासाठी मराठ्यांच्या फौजा घरात घेतल्या असल्या तरी मराठ्यांची मान कापण्यास तो प्रसंगी मागे - पुढे पाहणार नाही याची होळकरास पूर्णतः खात्री होती. तेव्हा जोवर मोगल बादशहा अगतिक होऊन मदतीसाठी विनवणी करत नाही तोवर दिल्लीच्या राजकारणात फारसे मन न घालण्याचे त्याने धोरण आखले. पुढील काळात मल्हाररावाचा पट्टशिष्य महादजी शिंदे, याने देखील याच धोरणाचा पुरस्कार केल्याचे दिसून येते. (३) अब्दालीने दिल्लीत लुट व कत्तलीचे थैमान घातल्यावर मराठी फौजा दिल्लीत दाखल झाल्या, त्यावेळी अब्दालीच्या अत्याचारांनी टेकीस आलेल्या मोगल बादशहाने पंजाब व सिंध प्रांतांची निम्मी मालकी मराठ्यांना देऊन अब्दालीचा बंदोबस्त करण्याची गळ घातली. (४) जाट व अब्दालीचा झगडा जुंपला असला तरी ते दोघेही मराठ्यांचे वैरी होते. स. १७५२ च्या बादशाही संरक्षण करारानुसार आगऱ्याचा सुभा होळकरास मिळाला असून त्यातचं जाटांची बलवान राजवट उदयास आली होती. अशा परिस्थितीत जाट व अब्दाली हे दोघेही आपले प्रबळ शत्रू असल्याने ते जर आपापसांत लढून दुर्बल होत आहेत तर ती मल्हाररावाच्या दृष्टीने इष्टापत्तीच होती. जाट पराभूत झाला तर आगऱ्यावर पकड बसवण्यास होळकरास फार कष्ट पडणार नव्हते आणि अब्दालीचा जर परस्पर काटा निघाला तर पंजाबात फिरून येण्याचे त्यास सामर्थ्य राहणार नव्हते. असा व्यवहारी विचार मल्हाररावाने केला असल्यास नवल नाही. (५) अब्दालीच्या स्वारीत सर्वचं संस्थानिक भरडून निघाल्ये पुढे अटक स्वारीत मराठ्यांना अभूतपूर्व असे यश प्राप्त झाले. कारण, त्या स्वारीत रोहिले, शीख, मोगल या मराठेशाहीच्या शत्रुंनीच अब्दालीच्या विरोधात मराठ्यांना मदत केली हे विसरता येत नाही. 
                        असो, स. १७५७ च्या मे महिन्यात राजपुताना पालथा घालून दादा आगऱ्यास आला. तेव्हा जाट राजाने आपणहून मागील वर्षीची थकलेली खंडणी भरण्याचे मान्य करून त्याच्याशी सख्य जोडले. मोगल बादशहाने देखील आपल्या वजीरामार्फत दादाच्या सोबत बोलणी सुरु केली. परंतु, दिल्ली अजूनही अब्दालीचा पक्षपाती रोहिला सरदार नजीबखान, याच्या ताब्यात असल्याने दादाने या वाटाघाटींना दाद न देत दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला. तसेच लष्कराची एक तुकडी अंतर्वेदीतील नजीबच्या ताब्यातील प्रदेश जिंकण्यास पाठवून दिली. दादासाहेबाच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्य दिल्लीकडे निघाले असताना पेशव्याची आज्ञा आली की, दौलतीला झालेलं कर्ज वारण्यासाठी बिहार - बंगाल प्रांती मोहीम काढून द्रव्याची पैदास करावी. मात्र पेशव्याची हि सूचना / आज्ञा प्रस्तुत प्रसंगी अंमलात आणणे अव्यवहार्य असल्याने दादाने ती मानली नाही. पुढे, सप्टेंबर महिन्यात दादाच्या वतीने विठ्ठल शिवदेव विंचूरकराने दिल्ली जिंकून घेतली आणि नजीबला कैद केले. या पराक्रमाबद्दल मोगल बादशहाने त्यास बक्षीसादाखल जहागीर देऊन त्याचा गौरव केला. इकडे नजीब कैद झाल्यावर त्यास मारून टाकावे वा कैदेत ठेवावे असे सर्वांचेच मत पडले. पेशव्याचीही तशाच आशयाची आज्ञा होती. परंतु या सर्वांच्या विरुद्ध होळकराचे मत पडून त्याने नजीबला मोकळे करण्याची दादाकडे विनंती केली. त्यानुसार दादाने नजीबला जीवनदान देत त्यास त्याच्या जहागिरीत परतण्याची परवानगी दिली. दादा - होळकर यांच्या या मूर्ख निर्णयाबद्दल त्यांची सर्वचं इतिहासकारांनी निर्भत्सना केली आहे. परंतु, नजीबखान हा काही एकटाच अब्दालीचा हस्तक नव्हता हे सर्वजण विसरतात. राजपूत, मोगल परिवार, रोहिले - अफगाण सरदार, मोगल वजीर गाजीउद्दिन हे सर्व अब्दालीचेच तर हस्तक होते. गळे कापायचे तरी कोणा कोणाचे आणि कैदेत टाकायचे तरी कोणा कोणाला ? तसेच नजीबला नाहीसा करून गाजिउद्दिनला मोकळे रान मिळू देण्यास होळकर तयार नव्हता. याच धोरणाचा अवलंब पानिपत नंतर अब्दालीने देखील केल्याचे दिसून येते. असो, तात्पर्य काय, तर नजीबला जीवदान देऊन दादा - मल्हाररावाने फार मोठी राजकीय चूक केली असे म्हणता येत नाही. 
                            दिल्ली ताब्यात आल्यावर दादाने मोगल बादशहाकडे लष्कराच्या खर्चासाठी पैशाची मागणी केली. पण शक्य असूनही अब्दालीचा सामना न केल्याच्या कारणावरून गाजिउद्दिनने दादास पैसे देण्याचे नाकारले. तेव्हा दोन्ही पक्षांमध्ये काही काळ खटके उडाले. त्यानंतर गाजिउद्दिनने आपली पडती बाजू लक्षात घेऊन दादासोबत नव्याने करार करून त्यास पंजाब व सिंधच्या चौथाई ऐवजी प्रांताची निम्मी वाटणी देऊन टाकली. त्याबदल्यात अब्दालीचा बंदोबस्त करण्याचे दादाने मान्य केले. आणि विशेष म्हणजे दादाच्या स्वारीचा सर्व खर्च देण्याचे मोगल वजीराने कबूल केले. त्याखेरीज या मोहिमेत मोगल सरदार देखील आपापल्या सैन्यदलांसह सहभागी होणार होते ते वेगळेचं ! असो, करारानुसार मराठी फौजा पंजाबात रवाना झाल्या. दादाची दिल्लीकडे पाठ वळताच नजीबचे उपद्व्याप परत सुरु झाले पण सध्या त्याच्याकडे लक्ष देण्यास मराठी सरदारांना फुरसत नव्हती. लाहोरात अब्दालीपुत्र तैमुरच्या नेतृत्वाखाली तळ ठोकून बसलेल्या अफगाण सैन्याला पिटाळून लावणे हे त्यांचे सध्या तरी प्रमुख लक्ष्य होते. शीख व मोगल अंमलदार आदिनाबेगच्या मदतीने , तसेच स्थानिक लहान - मोठ्या जमीनदारांच्या साथीने मराठी सैन्याने तैमुरचा पराभव करून त्यास चिनाबपार पळवून लावले. मराठी सैन्याच्या पराक्रमाने भारावून गेलेल्या आदिनाबेगने  दादासाहेबांची स्वारी जेव्हा लाहोरात दाखल झाली तेव्हा त्यांच्या मुक्कामाची सोय मोगल बादशहाच्या वाड्यात केली. इतकेच नव्हे तर या विजयाप्रीत्यर्थ एक लक्ष रुपये खर्चून प्रचंड दीपोत्सव केला. मराठ्यांच्या शौर्याने केवळ मोगलचं भारावून गेले असे नाही, तर इराणी बादशहाने देखील यावेळी अब्दालीच्या विरोधात मराठ्यांची मदत मागितली. इतकेचं नव्हे तर खुद्द अब्दालीचा पुतण्या, अफगाण पातशाही प्राप्त करून घेण्यासाठी मराठ्यांच्या आश्रयास धावला. दादासाहेबाचे हे यश इतके भव्यदिव्य होते कि, एक नजीबखानाचा व काही राजपूत राजांचा अपवाद केल्यास उत्तर हिंदुस्थानातील बव्हंशी हिंदू - मुस्लिम संस्थानिक अब्दालीच्या विरोधात लढण्यासाठी मराठ्यांना मदत करण्यास तयार झाले होते. तशा आशयाची पत्रे त्यांनी दादाला पाठवून त्यास पंजाबातच तळ ठोकून राहण्याची त्यांनी विनंती देखील केली होती. परंतु, पेशव्याच्या आज्ञेवरून परत फिरणे दादाला भाग पडून अब्दालीच्या बंदोबस्ताची हि एक संधी यावेळी हुकली. मात्र, पंजाब ते दिल्ली या मार्गात त्याने ठिकठिकाणी मजबूत लष्करी पथके पेरून पंजाबचा बंदोबस्त उत्तम केला. त्याशिवाय पंजाबचा कारभार हाती घेण्यासाठी पेशव्याने शिंद्यांना उत्तरेत रवाना केले होतेच. त्यामुळे दादासाहेबाने तिथे थांबलेच पाहिजे असे काही नव्हते. इराणी आक्रमण, पुतण्याचे व जमीनदारांचे बंड यांमुळे अब्दाली व्यापलेला असल्याने नजीकच्या काळात तरी त्याच्या आक्रमणाची शक्यता दिसत नसल्याने मल्हारराव होळकर देखील पंजाबात थांबला नाही. 
          उदगीर मोहीम आणि भाऊची उत्तरेत रवानगी :-   दादाची स्वारी पुण्याच्या वाटेला लागली तेव्हा रस्त्यात त्याची शिंदे मंडळीं सोबत भेट झाली. नजीबला जीवनदान देऊन त्यास सुधारण्याची एक संधी दादाने दिलेली होती. पण त्याने आपले पूर्वीचेच रंगढंग सुरु केल्याने दादाने शिंद्यांना, नजीबचा बंदोबस्त करण्याची आज्ञा केली.  ता. १६ सप्टेंबर १७५८ मध्ये दादा अटक स्वारीचे यश पदरी पाडून पुण्यास परतला खरा, पण त्याच्या या यशाने पेशवे कुटुंबातील राजकारणास निराळाच रंग चढला. अलीकडे नानासाहेब पेशवा हा पडद्यामागून राजकारणाची सर्व सूत्रे चालवीत होता. त्याउलट कारभारी व सेनापती म्हणून अनुक्रमे सदोबा व राघोबा हे दोघे ;  जनता, परराष्ट्र दरबार, लष्कर यांच्यासमोर वारंवार नाचत होते. नानासाहेब पेशव्याच्या दृष्टीने नसली तरी त्याची पत्नी - गोपिकाबाईच्या दृष्टीने हि परिस्थिती चिंताजनक अशीच होती. सदाशिव व रघुनाथ यांचे महत्त्वाकांक्षी स्वभाव तिच्या चांगलेच परिचयाचे असल्याने तिला आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी पडणे स्वाभाविक होते. हल्ली जरी विश्वासराव हा राजकारण, मोहिम यांमध्ये सहभाग घेत असला तरी त्याचे स्वतंत्र कर्तुत्व अजून झळकायचे होते. त्याउलट दादा - भाऊंचे सरदारांवर असलेले वजन ती ओळखून होती. त्यामुळे भविष्यात काही बरा - वाईट प्रसंग उद्भवल्यास दादा वा भाऊ, या दोघांपैकी कोणीही सत्ता हाती घेऊन आपल्या मुलांना देशोधडीला लावेल ही भीती तिच्या पोटात होती. नानासाहेब पेशव्याला देखील हल्ली दादा - होळकर यांच्या वाढत्या मैत्रीचे संकट वाटू लागले होते. त्यामुळे पुढे - मागे उत्तरेत लष्कर पाठवायचे झाल्यास विश्वासरावासचं मोहिमेचा प्रमुख सेनापती म्हणून नेमायचे त्याने नक्की केले.
                     इकडे पंजाब, नजीब यांचा बंदोबस्त करून बंगालमध्ये जाण्याची आज्ञा घेऊन उत्तरेत गेलेल्या शिंद्यांच्या हातून कोणताच कार्यभाग पुरा होण्याची चिन्हे दिसेनात. पंजाबात होळकराचा पाय शिरल्याने त्यांना तिथे थांबायचे नव्हते. नजीबचा बंदोबस्त करण्याची खाशांची आज्ञा असूनदेखील नजीबच्या मदतीने बंगाल स्वारी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. परंतु त्यांची मजल गंगेपर्यंतच जाउन त्यांना हरिद्वारला तळ ठोकून बसावे लागले. नजीबने आपल्या भूलथापांनी शिंद्यांना गंगा किनारी रोखून त्यांच्याविरोधात गंगा - यमुनेच्या दुआबातील सत्ताधीशांचा संघ उभारला. या बातम्या दक्षिणेत पोचताच पेशव्याने परत एकदा दादाला उत्तरेत पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र याच वेळी निजामाचे प्रकरण वर्दळीवर येउन उदगीरची मोहीम उद्भवली. स. १७५९ च्या ऑक्टोबर पासून दि. ११ फेब्रुवारी १७६० पर्यंत हि मोहीम चालून त्यात रघुनाथरावाच्य पराक्रमामुळे पेशव्यांना विजय प्राप्त झाला. उदगीरच्या विजयाचा फायदा घेऊन कर्नाटकातून निजामाला पूर्णतः उखडून काढण्याचा पेशवेबंधूंचा मानस असतानाच उत्तरेत अफगाण फौजांकडून शिंद्यांचा मोठा पराभव झाल्याचे आणि दत्ताजी शिंदे मारला गेल्याचे वृत्त आल्याने पेशवा गडबडून गेला. दत्ताजी मारला गेल्यामुळे उत्तरेत अब्दालीचा प्रभाव वाढला होता. तेव्हा अब्दालीच्या सामन्यासाठी कोणाला पाठवावे हा त्याच्यासमोर प्रश्न पडला. वस्तुतः उत्तरेच्या स्वारीवर दादाचीच रवानगी होणार होती हे मागे सांगितले आहेचं. पण, तेव्हाची परिस्थिती निराळी होती.  त्यावेळी दत्ताजी शिंदे हयात होता. आता दत्ताजी जिवंत नाही याचा अर्थ होळकरांचे वर्चस्व वाढून शिंदे मागे पडले आणि दादा - होळकरांची मैत्री तर जगजाहीर होती. अशा परिस्थितीत दादाला उत्तरेत न पाठवता त्याच्या ऐवजी भाऊला पाठवण्याचे पेशव्याने ठरवले. त्यानुसार भाऊची उत्तर हिंदुस्थानात रवानगी करण्यात आली आणि आधी निश्चित केल्यानुसार विश्वासरावास या मोहिमेचा मुख्य सेनापती म्हणून सोबत पाठवण्यात आले. भाऊच्या गैरहजेरीत पेशव्याचे मुख्य कारभारीपद सांभाळण्याची जबाबदारी दादावर सोपवण्यात आली खरी ; मात्र स्वाऱ्या - शिकाऱ्या, नाटकशाळा, देवपूजा यांत रमणाऱ्या दादासाहेबाला फडावरला बैठा कारभार फारसा मानवला नाही. त्यामुळे त्याचा दुय्यम सखारामबापू याचे कारभारात महत्त्व वाढले. 
                 नानासाहेब पेशव्याचा मृत्यू :- भाऊ उत्तरेत गेल्यावर उदगीरच्या तहात निजामाने जो मुलुख पेशव्यांना देण्याचे मान्य केले होते त्यावर ताबा बसवण्याचे काम पेशव्याच्या आज्ञेनुसार दादाने हाती घेतले. कर्नाटकात यावेळी पेशव्याच्या वतीने पटवर्धन मंडळी खपत होती. स. १७६० च्या उत्तरार्धात स्वतः पेशवा या कामासाठी डेरेदाखल झाला. पण नोव्हेंबर नंतर भाऊची पत्रे यायची बंद झाल्याने चिंताग्रस्त होऊन तो उत्तरेकडे जाऊ लागला आणि उदगीरच्या तहात ठरल्यानुसार निजामाला आपल्या मदतीला आणण्याची जबाबदारी त्याने दादावर सोपवली. पेशव्यांबरोबर केलेला कोणताच तह अक्षरशः अंमलात आणण्याबद्दल निजामाची ख्याती नव्हतीचं. त्यामुळे दादासोबत उत्तरेत जाण्यास त्याने मुद्दाम टाळाटाळ करणे स्वाभाविक होते. बोलावल्याप्रमाणे निजाम त्वरेने मदतीला येत नाही हे पाहून पेशवा संतापला आणि त्याने दादाला आज्ञा केली कि, निजामाला कैद वा ठार करावे. परंतु, प्राप्त परिस्थितीत पेशव्याची आज्ञा अंमलात आणणे शक्य नसल्याने दादाने गोड बोलून पेशव्याची समजूत काढली. इकडे निजामानेही जास्त ताणून न धरता दादासोबत उत्तरेत जाण्यास आरंभ केल्याने पेशव्याचा कोप शांत झाला खरा, पण लवकरच त्यास आपल्या फौजांचा पानिपतावर सडकून पराभव झाल्याचे आणि पुत्र विश्वासराव युद्धात पडल्याचे वृत्त समजले. त्यामुळे उत्तरेत जाण्याची त्याची उमेद खचून पछोर येथे त्याने काही काळ मुक्काम ठोकला. पानिपतचे वर्तमान समजल्याने निजामाने आपले खरे स्वरूप प्रकट केले आणि उदगीरच्या तहाविरुद्ध वागण्यास आरंभ केला. पुणे दरबारची यावेळची हलाखी लक्षात घेऊन सखारामबापूने निजामासोबत समेटाचे धोरण अवलंबले पण पटवर्धन मंडळींना बापूचा हा उपक्रम पसंत पडला नाही. अजूनही त्यांचा व निजामाच्या सरदारांचा संघर्ष सुरूच होता. पानिपतावर अनेक अनुभवी सरदार व विश्वासराव मारले गेल्यामुळे आणि सदाशिवराव गायब झाल्याने पेशव्याच्या अनुपस्थितीत पुण्यास जाणे दादाला आवश्यक वाटून त्याने निजामाकडे साफ दुर्लक्ष करून पुण्याची वाट धरली. यामुळे पटवर्धन मंडळी निजामाच्या कचाट्यात सापडली खरी, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये दादासमोर तरी दुसरा कोणता पर्याय होता ? इकडे पछोरचा मुक्काम आवरून पेशव्यानेही पुण्याचा रस्ता धरला होता. सर्वांचे लक्ष आता पुणे दरबारकडे लागून राहिले होते. मात्र प्रकृती खालावल्याने ता. २३ जून १७६१ रोजी नानासाहेब पेशव्याचा मृत्यू झाला आणि पुणे दरबारात राजकारणापेक्षा घरगुती कारस्थानांना जोर चढला. 
                                                                                         ( क्रमशः )                                     

गुरुवार, २० जून, २०१३

पेशवे - इंग्रज यांची आंग्रेविरुद्ध मोहीम ( भाग - ३ )

                                          ( उपसंहार )      
                विजयदुर्गच्या संग्रामात तुळाजीच्या अधिपत्याखालील असलेल्या आरमारापैकी बव्हंशी जहाजांचा निकाल लागून मराठी नौदलाची सत्ता खालावली. या दोषाचे खापर राज्यचालक या नात्याने पेशवा बाळाजी बाजीराव याच्यावर फोडणे कितपत योग्य आहे ? वस्तुतः या प्रश्नावर राजवाडे, शेजवलकर, सरदेसाई प्रभूती दिग्गज इतिहासकरांनी आपापली मते मांडली आहेत. प्रस्तुत ठिकाणी त्यांच्या मतांचा विचार न करता आपणांस या प्रश्नाची स्वतंत्रपणे चर्चा करायची आहे. 
                       सर्वप्रथम आंग्रे - पेशवे यांचे वितुष्ट पडण्याचे काय कारण होते याचा शोध घेणे योग्य ठरेल. दंतकथा, वदंता, प्रवाद इ. स्वरूपाच्या भाकडकथांना खरे मानण्याची एक थोर अशी परंपरा आपल्या इतिहासकरांनी मोठ्या निष्ठेने जपली आहे. तुळाजीवर पेशव्याची वक्रदृष्टी होण्याचे एक प्रमुख कारण काय तर म्हणे, तुळाजी हा चित्पावनी ब्राम्हणांचा द्वेष / छळ करत असे. या बाष्कळ, फालतू कारणावर सरदेसाईंच्यापासून एस. एन. सेन सारख्या इतिहासकारांचा देखील पूर्णतः नसला तरी काही प्रमाणात विश्वास असल्याचे दिसून येते. या विधानात कितपत तथ्य आहे ? उपलब्ध माहिती पाहता या विधानात अजिबात तथ्य नाही. हे विधान / कारण कोणाच्या सुपीक मेंदूतून बाहेर पडले आहे हे समजायला मार्ग नाही पण, आंगऱ्यांचा पराभव पेशव्यांनी केला व पेशवे हे चित्पावनी होते हाच धागा मनाशी घट्ट पकडून उपरोक्त तर्क मांडण्यात आला आहे. जणू काही पेशव्यांनी ' चित्पावनी तितुका मेळवावा ' अशी साद घालून सर्व चित्पावनी ब्राम्हणांचा संघ उभारून तुळाजीचा पराभव केला होता !  या हिशोबाने मग इंग्रज देखील चित्पावनीच ठरतात त्याचे काय ?
                 मुळात आंगऱ्यांचा नायनाट करण्याची इच्छा हि मूळची बाजीराव पेशव्याची होती याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जावे यासाठीच हा सर्व उपद्व्याप करण्यात आला असावा. कदाचित शिवाजीच्या बरोबरीने बाजीरावास उभे करण्याच्या कामी या आंग्रे प्रकरणाने अडथळा येत असल्याने याकडे मुद्दाम कानाडोळा केला जात आहे. असो, स. १७३४ मध्ये तर ना बाळाजी बाजीराव पेशवा होता ना तुळाजी आंग्रे सरखेल होता ! त्यावेळी बाजीराव पेशवा असून संभाजी आंग्रे सरखेल होता. संभाजीने चित्पावनी ब्राम्हणांचा छळ केल्याचे कोणी लिहित नाही मग बाजीरावास आंगऱ्यांचा विरोधात पोर्तुगीजांची मदत मागण्याची अवदसा का सुचावी ? याचे मूळ शाहू छत्रपती व सातार दरबारातील भानगडींमध्ये आहे. शाहू छत्रपती दुबळा असल्याची स्पष्ट जाणीव एव्हाना दरबारातील सर्व मुत्सद्द्यांना झाली होती आणि या गोष्टीचा फायदा घेऊन प्रत्येकजण छत्रपतीला आपल्या बगलेत मारून आपापले प्रस्थ वाढवण्याच्या प्रयत्नात होते. सारांश, मोगल व सातार दरबारात एकाच वेळी धन्याला गुंडाळून आपापले महत्त्व वाढवण्याची नोकरांची जीवघेणी व राज्यबुडवी स्पर्धा चालली होती. या स्पर्धेत दिल्ली दरबारात जे महत्त्व निजामाचे तेच साताऱ्यास आता बाजीरावाचे बनत चालले होते. मात्र निजामाला ज्याप्रमाणे दिल्लीपासून दूर दक्षिणेत निर्वेध असे कार्यक्षेत्र मिळाले तसे बाजीरावास मिळणे शक्य नव्हते. त्यासाठी त्याला आपला रस्ता साफ करणे भग होते. या कामात एक बाजीरावचं तेवढा पुढे होता असे नाही तर सेनापती दाभाड्यांची देखील तीच मनीषा होती. परिणामी डभईचा प्रसंग उद्भवून त्यात सेनापती दाभाडे बाजीरावसोबत लढताना मारला गेला. त्यामुळे पेशव्याच्या मार्गात उघडपणे आडवे येण्याचे धाडस करण्यास सातार दरबारातील मुत्सद्दी कचरु लागले. मात्र जो कोणी जबरदस्त असेल त्यास पेशव्याच्या विरोधात चिथावणी देण्याचा त्यांचा उपद्व्याप सुरुचं राहिला. इथपर्यंत तरी आंगऱ्यांचा व पेशव्याचा उघड वा सुप्त संघर्ष उद्भवला नव्हता. मात्र स. १७३३ मध्ये सेखोजी आंग्रेचा मृत्यू झाल्यावर संभाजी सरखेल बनला आणि बाजीरावाच्या महत्त्वकांक्षेला नवीन भक्ष्याचा वास येऊ लागला. 
                    सातारच्या दरबारातील दाभाडे, आंग्रे, जाधव, भोसले प्रभूती सरदार नाही म्हटले तरी जुन्या नामवंत घराण्यातील होते. तुलनेने भट घराण्याची बाजीरावाच्या रूपाने दुसरीचं पिढी स्वराज्याच्या सेवेत दाखल झाली होती. त्यामुळे नव्या - जुन्यांचा आपसांत खटका उडणे स्वाभाविक होते. अशा वेळी धनी दमदार असेल तर त्याचा सेवक वर्गावर दाब राहून असा संघर्ष मर्यादित राहतो वा जागच्या जागी जिरतो. पण शाहू तितका जोरदार नसल्याने त्याच्या सरदारांचे फावले. त्यातूनचं जाधव, भोसले, दाभाडे, पेशवे यांची प्रकरणे अनावर झाली. पैकी जाधवांचे तेज साफ मावळले होते तर भोसले दूर नागपुरात सवता सुभा मांडून बसल्याने तूर्त तरी बाजीरावाच्या आवाक्याच्या बाहेर होते. अशा स्थितीत बाजीरावास आपले हातपाय पसरण्यासाठी अगदी नजीकचे कोकण दृष्टीस न पडल्यास नवल नाही. कोकणात आपले वर्चस्व वाढवण्याची त्याची इच्छा होतीच, पण कान्होजी व सेखोजीच्या हयातीत हे त्यास साध्य झाले नाही. मात्र या दोघांच्या मृत्यूनंतर त्याने आपले धोरण आक्रमक केले. स्वतंत्र आरमार उभारणीकडे त्याने मुद्दाम लक्ष दिले. कारण, आंगऱ्यांना नमवण्यासाठी समुद्रात त्यांचा पराभव करणे गरजेचे होते. परंतु, आंगऱ्यांच्या नौदलाला सुमारे ६० - ७० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असल्याने काल - परवा उभारलेले आपले आरमार आंगऱ्यांचा पराभव करण्यास अजिबात समर्थ नाही हे तो ओळखून होता. अशा स्थितीत त्याने आंगऱ्यांच्या शत्रूंची म्हणजे पोर्तुगीजांची मदत मागितली. परंतु, पोर्तुगिजांचा मराठी सरदारांवर अजिबात भरवसा नसल्याने त्यांनी बाजीरावाच्या मागणीकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले. इंग्रजांचा जोर अजून बाजीरावाच्या दृष्टिस न पडल्याने त्याने इंग्रजांकडे मदत मागितली नाही. पोर्तुगीज आपणांस आंगऱ्यांच्या विरोधात मदत करत नाहीत हे पाहून बाजीराव काहीसा स्वस्थ बसला. पण लवकरचं आंग्रे बंधूंमध्ये दुफळी माजून त्यांचा तंटा निकालासाठी शाहूकडे आला. त्यात शाहूच्या आज्ञेने पेशव्याने मध्यस्थाची भूमिका घेत आंग्रे बंधूंची भांडणे सोडवण्याचा एक ' यशस्वी ' प्रयत्न केला. 
             यशस्वी या अर्थाने कि, त्याने आंग्रे बंधूंमध्ये आरमार व किल्ल्यांची वाटणी करून त्यांचे सामर्थ्य विभागून टाकले. या तोडग्याने घरगुती भांडणे कधी निकाली निघत नाहीत मग सरदारकीची कसली मिटणार ? पण बाजीरावास याच्याशी काही देणे - घेणे नव्हते. कलागत लावून तो अनुकूल संधीची वाट बघत बसला. पुढे वसईचा पाडाव झाल्यावर त्याने पोर्तुगीजांना आपले अंकित बनवले. याच वेळी इंग्रजांनी देखील त्याच्याशी मैत्रीचा करार केला. हीच संधी साधून या दोन बलिष्ठ नाविक सत्तांच्या मदतीने आंगऱ्यांना रगडण्याचे त्याने निश्चित केले. परंतु त्याच्या मृत्यूने त्याची धडपड थांबवली. मात्र त्याचा भाऊ चिमाजी अजून जिवंत होता. बाजीरावाच्या मागे त्याचा मोठा मुलगा नानासाहेब हा पेशवा बनला. चिमाजी व नानासाहेबाने बाजीरावाची अधुरी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचे ठरवले. त्यांनी इंग्रज - पोर्तुगीज यांच्याशी आंग्रेविरोधी मैत्रीचे करार केले. 
           उपरोक्त आशयाचे करार स. १७४० मध्ये झाले असले तरी त्यांची अंमलबजावणी करण्याची वेळ लगेच आली नाही. चिमाजी आपाच्या अनपेक्षित मृत्यूने नानासाहेब एकाकी पडला आणि त्याला आपले आसन स्थिर करण्याकडे प्रथम लक्ष द्यावे लागले. इकडे संभाजीचा मृत्यू होऊन तुळाजी सरखेल बनला. स. १७५२ पर्यंत सातारची भानगड मिटून नानासाहेब जवळपास निरंकुश बनला होता. सातारच्या दरबारात आता त्याचे फक्त दोनचं बलिष्ठ प्रतिस्पर्धी उरले होते. एक नागपूरकर भोसले आणि दुसरे आंग्रे ! पैकी, भोसल्यांना त्याने आपल्या लष्करी व राजकीय सामर्थ्याची चुणूक दाखवून तात्पुरते गप्प बसवले होते. राहता राहिले आंग्रे, तर त्यांचा बंदोबस्त करून बापाचे आणि चुलत्याचे अपुरे राहिलेले स्वप्न पुरे करण्याचा त्याने विडा उचलला. स. १७४० च्या कराराच्या पार्श्वभूमीवर त्याची व इंग्रजांची मैत्री जुळून येण्यास फारसा वेळ लागला नाही. वास्तविक हा करार घडून एक दशकाहून अधिक काळ लोटला असला तरी आंग्रे व इंग्रजांचे कार्य व संचारक्षेत्र एकच असल्याने त्यांच्यातील वैरभाव अधिक तीव्र झाला होता. परिणामी, आंगऱ्यांचा बंदोबस्त करण्याची पेशव्यापेक्षाही अधिक उत्कंठा इंग्रजांना लागून राहिली होती. 
                पुढे यथावकाश पेशवा - इंग्रज यांची तुळाजी आंग्रेवर संयुक्त मोहीम होऊन त्यात आंगऱ्यांचा निकाल लागला. अर्थात, या दोघा बलदंड प्रतिस्पर्ध्यांना एकाच वेळी तोंड देणे तुळाजीच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे तुळाजीचा पराभव झाला यात अनपेक्षित असे काहीचं नाही. इथपर्यंत जे विवेचन करण्यात आले आहे त्यावरून एक गोष्ट निर्विवादपणे सिद्ध होते व ती म्हणजे आंगऱ्यांचा जो काही नाश झाला त्यास नानासाहेब पेशवा जबाबदार नसून यामधील खरा दोषी बाजीराव पेशवा हाच आहे ! या दोषाचे म्हणा वा गौरवाचे म्हणा खरे श्रेय बाजीरावाकडेचं जाते. नानासाहेबाने फक्त बापाने आखून दिलेल्या मार्गाने वाटचाल केली इतकेचं ! 
                          आता राहता राहिला प्रश्न आंगऱ्यांच्या जहाजांच्या विनाशाचा तर त्याची प्रत्यक्ष जबाबदारी इंग्रजांची असून अप्रत्यक्ष अशी बाजीरावाचीचं आहे. वाचकांना माझा हा निष्कर्ष धक्कादायक असा वाटेल आपण जे सत्य आहे ते सत्य आहे ! आंग्रेंचे सर्व सामर्थ्य त्यांच्या आरमारात होते. ते आरमारचं जर नष्ट करण्यात आले तर आंग्रेंचे महत्त्व ते काय शिल्लक राहणार होते ? त्यावेळी मैदानी लढायांमध्ये एखादा सैन्यविभाग नष्ट करून व सेनापती / राजाला ठार करून किंवा कैद करून प्रतिपक्ष्याला नामोहरम केले जात असे. नाविक युद्धाच्या बाबतीत बोलायचे झाले तर लढाऊ जहाजे म्हणजे सैन्यदल आणि सागरी किल्ले म्हणजे तोफखाना ! यातील एक घटक जरी उध्वस्त झाला तर त्या सागरी सत्तेचे सामर्थ्यचं खचले असे म्हणता येईल. आंगऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचे आरमार नष्ट करणे व किल्ले जिंकून घेणे हे पेशव्यांचे आणि इंग्रजांचे समान उद्दिष्ट होते. एकूण, आंगऱ्यांचा बळी घेण्याचे कारस्थान बाजीरावाने आधीच सिद्ध केले होते. त्याच्या दुर्दैवाने त्याला आपल्या हयातीत हे कार्य शेवटास नेण्याची संधी लाभली नाही पण त्याच्या मुलाने बापाची इच्छा शेवटी तडीस नेली. परंतु त्याचे दुर्दैव असे कि, प्रबल मराठी आरमार  करून युरोपियन सत्तांना येथे आपली पाळेमुळे रुजवण्याची व मजबूत करण्याची अमुल्य संधी उपलब्ध करून देण्याच्या दोषाचे धनी व्हावे लागले. बाजीराव पेश्याच्या समर्थकांना / चाहत्यांना माझी मते अजिबात पटणार नाहीत याची मला पुरेपूर कल्पना आहे. बाजीराव स. १७४० मध्ये मेला व आंगऱ्यांची वाताहत स. १७५६ मध्ये झाली. तेव्हा मृत व्यक्ती एखाद्या सत्तेचा वा घराण्याचा कसा विध्वंस करू शकते असा प्रश्न ते निश्चितचं उपस्थित करणार याची मला पूर्ण खात्री आहे. अशा लोकांना मला फक्त एवढेचविचारायचे आहे कि , आंगऱ्यांची जहाजे न पेटवता , त्यांचे सागरी किल्ले ताब्यात न घेत बाजीराव त्यांचा कसा बंदोबस्त करणार होता ? 

संदर्भ ग्रंथ :- 
१) मराठी रियासत, खंड - ४ :- गो. स. सरदेसाई 
२) मराठे व इंग्रज :- न. चिं. केळकर 
३) मराठ्यांची लष्करी व्यवस्था :-  डॉ. एस. एन. सेन    

पेशवे - इंग्रज यांची आंग्रेविरुद्ध मोहीम ( भाग - २ )

                                        ( उत्तरार्ध ) 
             हिंदी महासागरातील तिन्ही युरोपियन राष्ट्रांस ( इंग्रजी, फिरंगी व डच ) पराक्रमाच्या कामात आंगऱ्यांनी खाली पाहण्यास लावले आणि कोणालाही त्यांची बरोबरी करता आली नाही. ---  डग्लस               
      तुळाजी आंग्रेविरुद्ध इंग्रज - पेशवा यांची युती बनण्यास स. १७५४ चे साल उगवावे लागले. पेशव्याच्या तर्फेने कोकण सुभ्यावर नेमलेला सरसुभेदार रामाजी महादेव बिवलरकर याने पेशवा व इंग्रज यांच्यात तह घडवून आणण्याचे कार्य पार पाडले. रामाजीचे व तुळाजीचे कार्यक्षेत्र एकच असल्याने त्यांचे आपसांत शत्रुत्व असणे स्वाभाविकच होते. त्यातच पेशवे जरी वरवर मानाजी आंगऱ्यास पाठीशी घालत असले तरी आतून त्याचेही सामर्थ्य खच्ची करण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच होता. पेशव्यांचा नोकर या नात्याने रामाजीला हे कार्य पार पाडणे भागचं होते. त्यामुळे प्रसंगी मानाजी विरोधी देखील त्यास कारस्थाने करावी लागत. सातार दरबारात शाहूच्या निधनाने बराच गोंधळ माजला होता. त्यामुळे कोकणची सर्व जबाबदारी पेशव्याने रामाजी महादेव वर सोपवली. तेव्हा त्याने पुढाकार घेऊन ता. १९ मार्च १७५५ रोजी मुंबईचा इंग्रज गव्हर्नर रिचर्ड बूर्शियर याच्याशी पेशव्याच्या तर्फेने व संमतीने तह केला. त्यातील प्रमुख अटी पुढीलप्रमाणे : - (१) सर्व आरमार इंग्रजांच्या ताब्यांत असावे, परंतु कारभार उभयतांच्या संमतीने व्हावा. (२) तुळाजी आंगऱ्याकडून जी जहाजे काबीज करण्यात येतील ती इंग्रज - मराठ्यांनी निमेनिम वाटून घ्यावी. (३) बाणकोट व हिंमतगड आणि नदीच्या दक्षिण काठावरील पाच गावे मराठ्यांनी इंग्रजांस कायमची द्यावी. (४) पश्चिम किनाऱ्यावरून आंगऱ्यांनी कोणत्याही किल्यास समुद्रातून मदत पोचवू नये असा बंदोबस्त इंग्रजांनी ठेवावा. (५) आंगऱ्यांच्या किल्ल्यांत जे द्रव्य, सामान, दारुगोळा, तोफा वगैरे सापडेल ते सर्व मराठ्यांस देण्यांत यावे. (६) मानाजीच्या मुलखावर उभयतांनी हल्ला केल्यास खांदेरी बेट, बंदर व कित्येक गांवे इंग्रजांस द्यावी. (७) जरुरीप्रमाणे जास्त कलमे नानासाहेबांच्या संमतीने ठरविण्यांत यावी. ( संदर्भ - मराठी रियासत खंड - ४ )      
        तहातील कलमे काळजीपूर्वक पाहिली असता असे लक्षात येते कि, हा तह पेशव्याच्या दृष्टीने मुळीच फायद्याचा नव्हता. छत्रपती शिवाजी महराजांनी मोक्याची स्थळी उभारलेले सागरी किल्ले आता आंगऱ्यांच्या ताब्यात होते व त्यावर कब्जा मिळवण्याची सुमारे पाउण शतकाची इंग्रजांची इच्छा आता पूर्ण होण्याचा योग जुळून आला होता. त्यामानाने पेशव्यांच्या पदरी काय पडणार होते ? आंगऱ्यांची काही जहाजे ; त्यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांमधील द्रव्य, तोफा, दारुगोळा वगैरे सामान इतकेचं ! हा तह घडून आला त्यावेळी पेशवा दूर कर्नाटकात होता. हि बाब एकप्रकारे इंग्रजांच्या पथ्यावरच पडली !, कारण मोहिमेच्या प्रसंगी काही भानगड उपस्थित झाल्यास त्याचा पेशव्याकडून त्वरित निकाल येणे समजतच होते. असो रामाजी महादेवने इंग्रजांच्यासोबत तह करण्यापूर्वी प्रथम मानाजीला आपल्या पक्षात वळवून घेतले. तुळाजीच्या विरोधात पेशवे - इंग्रज एकत्र येऊन युद्ध पुकारणार असल्याची त्याला कल्पना दिली. मात्र तुळाजीच्या ताब्यात असलेला सुवर्णदुर्ग जिंकून घेण्यासाठी पेशव्यांना मदत करण्याचे मानाजीने कबूल करून पुढील मोहिमेत सहभाग घेण्याचे साफ नाकारले. 
                        माझ्या मते, मानाजीने हि एक मोठीच चूक केली. एकतर त्याने या मोहिमेत पूर्णतः सहभाग घ्यायला हवा होता किंवा सरळ त्याने तुळाजीची बाजू उचलायला हवी होती अथवा तटस्थ राहण्याचा देखील पर्याय त्याच्यासमोर होता. जर त्याने त्यावेळच्या प्रघातास अनुसरून या मोहिमेत सहभाग घेतला असता तर युद्धानंतरचा नफा तिघांत वाटला गेला असता. तसेच त्याला आपले बळ वाढवता आले असते. जर त्याने तुळाजीला मदत केली असती तरी चालण्यासारखे होते पण, या भावाभावांचे आपसांत इतके फाटले होते कि अशा प्रसंगी त्यांचे एकत्र येणे शक्य नव्हते. तटस्थ राहून देखील मानाजीचा बराच फायदा झाला असता. पण त्याने सुवर्णदुर्ग जिंकण्यास पेशवे - इंग्रजांना मदत करून तुळाजीचा घात तर केलाच पण पर्यायाने स्वतःच्या पायावर देखील एकप्रकारे कुऱ्हाड मारून घेतली ! 
               कोकणात रामाजीच्या मदतीला जावजी गौळी / गवळी व खंडोजी माणकर हे दोन सरदार होतेच पण रामाजी महादेवच्या हालचालींना जोर यावा म्हणून पेशव्याने समशेरबहाद्दर व दिनकर महादेव यांना कोकणात रवाना केले. पोर्तुगीजांकडे वकील पाठवून ते तुळाजीची मदत करणार नाहीत याचा बंदोबस्त केला. पेशवा - इंग्रज करार होताच विल्यम जेम्सच्या नेतृत्वाखाली ता. २२ मार्च १७५५ रोजी इंग्लिश आरमार सुवर्णदुर्गाकडे झेपावले. जोडीला पेशव्यांचा आरमार प्रमुख नानापंत / नारोपंत हा आपल्या नौदलासह होता. त्याशिवाय जमिनीवरून समशेरबहाद्दर व दिनकर महादेव या आरमाराच्या साथीने सुवर्णदुर्ग जवळ करत होते. मार्गातील आंगऱ्यांच्या जहाजांना तडाखे देत पेशवे - इंग्रज यांचे संयुक्त नाविकदल २ एप्रिल रोजी सुवर्णदुर्गावर चाल करून गेले. सुवर्णदुर्गाच्या लढाईचा ब्रिटीश आरमार प्रमुखाने लिहिलेला वृत्तांत पुढीलप्रमाणे :- " …. ….  ता. २ एप्रिल रोजी मी सुवर्णदुर्गावर मारा सुरु केला. पेशव्यांची जहाजे निलाजरेपणाने आमची मजा पाहत उभी राहिली. कितीदां सांगितले तरी ती पुढे येऊन आम्हांस मदत करीनात. तेव्हा त्यांच्या मदतीची आशा सोडून मी एकट्यानेच हल्ल्याचे काम चालू केले. रात्री वादळ सुरु झाले, म्हणून आम्ही जर बंदराच्या बाहेर आलो असतां रामाजीपंताने मजकडे येऊन अशी बातमी सांगितली, कीं किल्ल्याचा किल्लेदार व आठ माणसे ठार झाली असून आतां तीनशेपेक्षा जास्त लोक किल्ल्यांत नाहीत. मी उत्तर दिले, असे आहे तर एक हजार लोक मजबरोबर द्या ; म्हणजे गलबतांवरील तोफांच्या आश्रयाने मी ते लोक घेऊन जमिनीवर उतरतो आणि एकदम हल्ला करून किल्ला काबीज करतो. हा बेत रामाजीपंतास पसंत पडला नाही. हाताखालचे लोक त्याचा हुकुम पाळतात, असे मला वाटत नाही. सर्व लोक त्यास हरएक बाबतीत अडवीत असावेत असे दिसले. एकंदर युद्धात पेशव्यांच्या आरमाराने पन्नास सुद्धां गोळे टाकले नसतील. माझ्या मदतनिसाची अशी परिस्थिती असल्यामुळे हाताशी आलेले काम टाकून यावे हे मला योग्य दिसेना, तेव्हां मी एकट्यानेच पुढे उद्योग चालवून ३ तारखेला आम्ही आपली जहाजे किल्ल्याच्या अगदी जवळ आणिली. किल्ल्यांतील लोकांचाही मारा काही कमी नव्हता. सकाळी नऊपासून तीन तास आमचा मारा चालला. बारा वाजण्याच्या सुमारास किल्ल्यांतील दारूखाना आग लागून उडाला. तेव्हां किल्ल्यांतील लोक सैरावैरा पळू लागले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तहाचा बावटा घेऊन किल्ल्यांतील लोक रामाजीपंताकडे आले, तेव्हा आम्ही तोफा थांबविल्या. पुढे जमिनीवर उतरलो. रामाजीपंताने पूर्वी कळविलेली हकीकत खरी नव्हती. किल्ल्यांत बरीच फौज होती. ती मारली न जाता बरीचशी पळून गेली होती. कालचा दिवस बोलाचालीत गेला. बोलाचालीत अशी वेळ काढून शत्रूचे लोक बाहेरून मदत येण्याची वाट पहात आहेत, असा मला संशय आला. तेव्हां आम्ही एकदम आज १२ एप्रिलास सकाळी तोफांचा मारा करून किल्ल्यांत शिरलो, त्याबरोबर किल्ला आमच्या हातांत आला. लगेच हि आनंदाची बातमी मी आपणांस लिहून कळवीत आहे. जास्त लिहिण्यास मला आता अवकाश नाही. तरी पण इतके खरे की सुवर्णदुर्ग किल्ला आपणास वाटला होता त्यापेक्षां फारच बळकट आहे. किल्ला मजबूद खडकावर बांधला असून तटाला चार चार फूट लांबी रुंदीचे मोठाले लाल दगड आहेत. आमच्या तोफांचे गोळे ह्या दगडांवर आपटून ठिकऱ्या होऊन खाली पडत, पण दगडास भंग होत नसे. एकंदर सवाशेंवर तोफा किल्ल्यांत आहेत. …  …  आमचे एकंदर ७९० गोळे व ४० दारूची पिपें खर्च झाली. " ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड - ४ ) 
  रामाजीपंताने मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरास पुढील पत्र लिहिले :- " आम्ही चौलाहून निघून श्रीवर्धनास पोचलो, आणि मार्चच्या २७ तारखेस हरणई जवळ आलो असतां आंगऱ्यांचे आरमार आमच्या दृष्टीस पडले ; त्याचा आम्ही जयगडपर्यंत पाठलाग केला. पुढे सुवर्णदुर्गास येऊन मी आपली फौज जमिनीवर उतरविली ; आणि किल्ल्यावर मारा सुरु केला. आपल्या आरमाराने समुद्रातून व आमच्या फौजेने जमिनीवरून मारा करितांच किल्ला जेरीस आला ; आणि आम्ही जमिनीवरून हल्ला करितांच तो माझ्या हस्तगत झाला. हा जय सर्वस्वी आपल्या मदतीचे फळ असून हा प्रकार मी पेशव्यास कळवीत आहे. अद्यापि आम्हांस आपली मदत घेऊन आंगऱ्याच्या ताब्यात असलेले सर्व किल्ले काबीज करावयाचे आहेत. " ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड - ४ )  
        सुवर्णदुर्गाच्या लढाईची ब्रिटीश आरमार प्रमुखाने व रामाजीपंताने पत्रांद्वारे लिहिलेली माहिती वाचल्यावर काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात. (१) सागरी लढाईत पेशव्याचे आरमार अगदीच कुचकामी होते. (२) सुवर्णदुर्गावर सुमारे १०० - १२५ तोफा व तीनशेहून अधिक शिबंदी होती. (३) ३ एप्रिल रोजी जहाजांवरून केलेल्या तोफांच्या सरबत्तीत किल्ल्यातील दारूखाना आग लागून उडाला. त्यामुळे किल्ल्यातील लोकांनी तहाची वाटाघाट आरंभली. परंतु त्यात अनेक दिवस खर्ची पडू लागल्याने १२ एप्रिल रोजी इंग्रजांनी पाण्यातून व जमिनीवरून एकदम हल्ला चढवून किल्ला ताब्यात घेतला. (४) लढाईचे उपलब्ध वर्णन पाहता किल्ला लढून जिंकण्यापेक्षा फितुरीने घेण्यात आल्याचे दिसून येते. (५) या संग्रामात पेशव्याचे आरमारी दौर्बल्य इंग्रजांना दिसून आल्याने येथून पुढे या मोहिमेत पेशवे सरकार दुय्यम राहून इंग्रजांना पुढारपण प्राप्त झाले व त्याच्या त्यांनी भरपूर फायदा उचलला. 
                 सुवर्णदुर्ग पडताच बाणकोट, पालगड, रसाळगड इ. किल्ले देखील पेशव्याच्या हाती पडले. आंगऱ्यांची माणसे फितल्याने पेशव्याच्या फौजांना भराभर विजय मिळत गेले. आपली परिस्थिती पाहून तुळाजीने रामाजी महादेवकडे वकील पाठवून तहाची बोलणी सुरु केली. याच सुमारास पेशव्याने तुळाजीच्या ताब्यातील अंजनवेल आणि गोवळकोट हे दोन किल्ले तसेच दाभोळच्या हद्दीतील आंगऱ्यांचे सर्व किल्ले घेण्याचा रामाजी हुकुम दिला. रामाजीपंताने यासाठी इंग्रजांकडे मदतीची विनंती केली. परंतु पावसाळा तोंडावर आल्याने त्यांनी या मोहिमेत भाग घेण्यास साफ नकार दिला. इकडे समशेरबहाद्दर व दिनकर महादेव यांनी रत्नागिरीच्या किल्ल्यास वेढा घातला. पेशव्याला हि वार्ता कळताच त्याने हि बातमी इंग्रजांना देऊन त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. रामाजीपंताने देखील नाना प्रकारे इंग्रजांकडे कुमकेची याचना केली परंतु, पावसाळा तोंडावर असल्याचे निमित्त करून ते या मोहिमेत सहभागी होण्याचे टाळू लागले. वस्तुतः इंग्रजांचा आपल्या मराठी दोस्तांवर फारसा असा विश्वासचं नव्हता. युद्ध चालू असताना कोणत्याही प्रसंगी पेशवा - आंग्रे यांच्यात मैत्रीचा तह घडून येऊ शकतो याची त्यांना जाणीव होती. त्याचप्रमाणे युद्धात जर का ऐन वेळी पेशव्याच्या सरदारांनी आपणांस बाजू दिली तर आंग्रे आपणांस तेव्हाच लोळवेल याचीही त्यांना भीती होतीच ! त्यामुळे आपल्या आरमारी सामर्थ्याला बाधा येईल असे नसते धाडस स्वीकारण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. 
                                 इंग्रजांची साथ मिळत नाही हे पाहून रामाजीने भर पावसाळ्यात जमिनीवरून आंग्रे विरुद्ध मोहीम नेटाने चालवली. परिणामी स. १७५६ आरंभी अंजनवेलम गोवळकोट व पाठोपाठ रत्नागिरीचा किल्लादेखील ताब्यात घेण्यात त्यास यश प्राप्त झाले. रत्नागिरी पडताच   व किरकोळ गड - किल्ले देखील पेशव्यांना शरण गेले. रामाजी महादेवने निकराने मोहीम चालवल्याचे पाहून तुळाजीने स. १७५५ च्या नोव्हेंबर मध्ये पोर्तुगीजांशी मैत्रीचा तह करून त्यांची फौज मदतीस बोलावली. पोर्तुगीजांनी देखील प्रसंग पाहून ५०० सैनिकांची एक तुकडी तुळाजीच्या मदतीस रवाना केली. पेशव्याला हि बातमी समजताच त्याने गोव्याला वकील पात्वून पोर्तुगीजांना आपली फौज माघारी बोलावण्यास सांगितले. दरम्यान तत्पूर्वीचं पोर्तुगीज - आंग्रे यांच्या संयुक्त फौजांचा पेशव्यांच्या सरदारांशी ११ डिसेंबर १७५५ रोजी संग्राम घडून आला. तुळाजीचा भरवशाचा सरदार रुद्राजी धुळप हा नौदल व भूदलासह खारेपाटण येथे जावजी गवळी व इतर सरदारांवर बेधडक चालून आला. लढाई मोठी होऊन त्यात रुद्राजी धुळप, दुलबाजी माने व फिरंगी सरदार गोळ्यांनी जखमी झाले. खुद्द रुद्राजी पेशव्याच्या फौजेच्या हाती लागून त्याची फौज उधळून गेली. 
                इकडे राजकीय आघाडीवर देखील बरीच धामधूम चालली होती. पेशव्याच्या राजकारणाने तुळाजी आंग्रे आता पुरता एकाकी पडला होता. विजयदुर्ग अपवाद केल्यास मजबूत असे स्थळ त्याच्या हाती राहिले नव्हते आणि तेच काबीज करण्यासाठी रामाजी व पेशवा इंग्रजांकडे वारंवार मदतीची मागणी करत होते. इंग्रजांनाही आंगऱ्यांचा बंदोबस्त करण्याची उत्कंठा होतीच पण त्यांनी यावेळी सहेतुक वेळकाढू धोरण स्वीकारले होते. स. १७५५ च्या ऑक्टोबरमध्ये इंग्लंडहून रॉबर्ट क्लाइव्ह व बादशाही आरमारी सरदार वॉटसन सरकारी जहाजांसह मद्रासला येऊन दाखल झाले होते. हिंदुस्थानात व युरोपात यावेळी इंग्रज - फ्रेंचांचे उघड वैर जुंपल्याने हिंदुस्थानातील आपल्या वखारींच्या संरक्षणासाठी आणि फ्रेंचांचा हिंदुस्थानातून साफ उठवा करण्यासाठी इंग्लंडमधून हि ताज्या दमाची कुमक पाठवण्यात आली होती. या काळात फ्रेंच सरदार बुसी याचा दक्षिण हिंदुस्थानात विशेष बोलबाला झाला होता. तोफखाना व कवायती पायदळाच्या बळावर एतद्देशियांना तो एकप्रकारे अजिंक्य असा योद्धा भासू लागला होता. फ्रेंचांनी धूर्तपणे बुसीला निजामाच्या दरबारी चिकटवून आपले प्रस्थ वाढवण्यास आरंभ केला होता आणि हि गोष्ट इंग्रजांना हानिकारक असल्याने त्यांना फ्रेंचांचा नक्षा उतरवणे भाग होते. कारण हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता ! तेव्हा क्लाइव्ह आणि वॉटसन हिंदुस्थानात येऊन दाखल झाल्यावर इंग्रज - फ्रेंचांचा झगडा जुन्प्न्याची चिने दिसू लागली. मात्र यावेळी मद्रासच्या इंग्रजांनी सद्यस्थितीत आपली फ्रेंचांसोबत बिघाड करण्याची तयारी नसल्याचे सांगून युद्ध पुढे ढकलले. हि गोष्ट मुंबईकर इंग्रजांना समजताच त्यांनी मद्रासकरांना पत्र लिहून क्लाइव्ह व वॉटसन यांना मुंबईला पाठवण्याची विनंती केली. अर्थात मद्रासकरांनी त्यानुसार इंग्लंडहून आलेलं सैन्य व नौदल मुंबईला रवाना केले. क्लाइव्ह व वॉटसन मुंबईला आले आणि मुंबईचा गव्हर्नर बूर्शियर याच्याशी त्यांची भेट घडून विजयदुर्ग मोहिमेचा तपशील ठरवण्यात आला. . 
                 ब्रिटीश योजनेनुसार १४ जहाजे, ८०० इंग्रज व १००० देशी सैनिक या स्वारीत सहभागी होणार होते. ता. ६ फेब्रुवारी १७५६ रोजी बूर्शियरने क्लाइव्ह व वॉटसन यांस मोहिमेचा लेखी हुकुम पाठवला. त्यातील मजकूर पुढीलप्रमाणे :- " तुळाजी आंगरे सापडल्यास मुंबईस आणावा. विजयदुर्ग घेतल्यावर आंगऱ्यांचे बाकीचे किल्ले घेण्यास आरमाराने पेशव्याच्या फौजेबरोबर जावे. बाणकोट व हिंमतगड पेशव्याने इंग्रजांस दिले आहेत, परंतु त्या प्रदेशाची हद्द ते अजून ठरवून देत नाहीत. ती ठरवून देईपर्यंत विजयदुर्ग किल्ला काबीज केल्यावर पेशव्यांच्या स्वाधीन करू नये. हरेश्वरचे ठिकाण आपणास पाहिजे आहे. सबब कोणत्या ना कोणत्या सबबीने ते घेण्याची तजवीज करावी. दुसरी जी ठिकाणे आपल्या व्यापाराच्या व आरमाराच्या सोयीची अशी तुम्हांस आढळतील, ती तहाच्या वेळी मिळवण्याचा प्रयत्न अवश्य करावा. तुळाजी आंगरे हा तुम्हांस लांच देऊ करील, किंवा स्वाधीन होतो म्हणेल, परंतु तुम्ही पक्के ध्यानांत ठेवा की, तो पहिल्या प्रतीचा लबाड आहे. त्याच्यावर विश्वास ठेवू नये. तो केव्हा काय करील त्याचा नेम नाही. दंड देतो म्हणेल तर, त्याने आजपर्यंत आमची मोठमोठी जहाजे नाहीशी केली आहेत, आणि नानाप्रकारे दरसाल तीन चार लाखांवर आज कित्येक वर्षे तो आमचे नुकसान करीत आहे, इतके सर्व नुकसान आमचे भरून निघेल इतका दंड ठरवावा. एवढा पैसा त्याजपाशी असणे शक्य नाही, सबब तुळाजीचा हा कांटा सबंध काढून टाकावा, हेच आपणांस श्रेयस्कर असून जिवंत सापडलाच तर त्यास मुंबईस आणावे. पेशव्याचे हाती त्यास देऊ नये ; कारण ते कदाचित त्यास पुनरपि मोकळा सोडतील आणि तो पुनः आपणास पहिल्यासारखा त्रास देऊ लागले. " ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड - ४ )  
                        ता. ७ फेब्रुवारी १७५६ रोजी ब्रिटीश आरमार मुंबईहून विजयदुर्गाच्या दिशेने रवाना झाले. इंग्लंडहून मद्रासला येऊन दाखल झालेले इंग्रजी नाविकदल आपल्यावर चालून येत असल्याची बातमी आरंभी तुळाजीला नव्हती असे रियासतकार सरदेसाई लिहितात, पण त्याचे हे मत तर्काच्या कसोटीवर तर टिकत नाही आणि आपले मत सिद्ध करण्यासाठी आवश्यक तो पुरावा देखील ते देत नाहीत. त्यामुळे तुळाजी गाफील राहिला असे म्हणता येत नाही. मानाजी आंग्रे व पेशवे यांनी त्याचे मदतनीस फोडल्यामुळे विजयदुर्ग अखेरपर्यंत लढवणे वा तह करून आपला बचाव साधने हे दोनचं पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध होते. पैकी पेशव्याच्या सोबत त्याने तहाची बोलणी सुरु केलीचं होती आणि विजयदुर्ग लढवण्याची तयारीदेखील केली होती. 
        विजयदुर्गचा संग्राम :- ब्रिटीश आरमार प्रमुख वॉटसनने मुंबईला विजयदुर्गच्या संग्रामाचे ता. १४ फेब्रुवारी रोजी पाठवलेले बातमीपत्र  पुढीलप्रमाणे :- " ता. ११ रोजी सायंकाळी आमचे आरमार विजयदुर्गपुढे येऊन दाखल झाले. त्य वेळी तुळाजी आंगऱ्याचे व पेशव्यांचे तहाचे बोलणे चालले असल्याचे मला कळले. तेव्हा तुळाजीस ह्या बाबतीत अवकाश द्यावयाचा नाही, असा निश्चय करून एकदम किल्ला स्वाधीन करून देण्याविषयी मी त्यास निरोप पाठविला. ठरलेल्या वेळांत जबाब न आल्यामुळे आणि पेशवेही जरा कां कूं करीत आहेत असे पाहून, ता. १२ रोजी आम्ही किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला. चार वाजतां आमचा एक गोळा आंगऱ्यांच्या जहाजावर पडून त्याची सर्व लढाऊ जहाजे जळून खाक झाली. ता. १३ रोजी सकाळी आमचे कांही लोक जमिनीवर उतरले. पेशव्यांची फौजही उतरणार होती. तीस उतरू देऊ नये म्हणून आम्ही पुनः किल्ल्यावर मारा सुरु केला. कॅप्टन फोर्ड ६० लोक बरोबर घेऊन संध्याकाळी किल्ल्यांत शिरला आणि त्याने वर आमचे निशाण लाविले. आज सकाळी आमची सर्व फौज किल्ल्यांत गेली. आज रामाजीपंत आमच्या भेटीस येणार आहे, तेव्हा तुळाजीस मी आपल्या ताब्यात मागणार आहे. लढाईत म्हणण्यासारखे आमचे नुकसान झाले नाही."
( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड - ४ )
      रामाजीपंताच्या पत्रांत या संग्रामाची आलेली माहिती खालीलप्रमाणे आहे :- " आम्ही मनवरावरी इंग्रजांचे भेटीस गेलो, आंगरे तह करावयाबद्दल भेटीस येतात म्हणोन सांगितले. त्यांनी उत्तर केले, तह करावयाचा जनरलचा हुकूम नाही, तरी तुम्ही म्हणत असाल तर माझे तरांडियावर यावे. तेव्हां सरखेलांकडून चार भले माणूस मोघमच निरोप घेऊन जहाजावर आले. इंग्रजांनी त्यांस साफ सांगितले, तह करावयाचा असेल तर पांच सहा घटकांत रामाजीपंतास घेऊन यावे. न आले तर बंदरांत जाईन. पण सरखेलांच्या मनोदयाचा अर्थ ठरावास नये. इंग्रज तीन - चार घटका अधीकच वाट पाहोन बंदरांत आला. किल्ल्यांतून तोफा होऊ लागल्या तेव्हां इंग्रज तोफा मारो लागला. आम्ही आरमार घेऊन सड्याजवळ आलो. सूर्योदय होय तो मारगिरी होतच होती. गरनाळांचे मारांनी किल्ल्याजवळ बंदरांत आंगऱ्याचे आरमार होते त्यास जागांजागां अग्न लागली. सरकारचे निशाण किल्ल्यांत येणार हे वर्तमान इंग्रजांस कळतांच अतिशयास पेटून चहूंकडून उतरून आले. मीठगावण्याहून तुळाजी आंगरेही आम्हांजवळ न आले. इंग्रजांनी चार घटका अतिशय मारा केला, तेव्हा किल्ल्यांतील लोकांचा आव जाऊन त्यांनी इंग्रजांचे निशाण व लोक आंत घेतले. आमचा उपाय राहिला. दुसरे दिवशी मनवरावर इंग्रजांचे भेटीस गेलो. त्याने तुळाजीस हाती द्यावा अशी अट घातली. जनरलाचे पत्र आल्याविना किल्ला देववत नाही, तुमचे निशाण तेवढे आंत पाठवा, असे बोलो लागला. लोभी होऊन अशा गोष्टी सांगो लागला. कजिया करावा तरी इंग्रज पातशाही मनवराचा सरदार, आम्ही पातशाही चाकर तुमचे ऐकत नाही, ऐसे उत्तर आल्यावरून जनरलास पत्र लिहिले आहे. दरम्यान जनरल व तहनामा आहे म्हणोन उतावीळ न करतां आहों."  ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड - ४ )
                   विजयदुर्गच्या लढाईचा प्रत्यक्षदर्शींनी लिहिलेला वृत्तांत वर दिलेला आहे. हा वृत्तांत पाहता असे दिसून येते कि, विजयदुर्ग घेण्याच्या कमी पेशव्याच्या आरमाराने व भूदलाने कसलाही सहभाग घेतला नाही. याचे कारण म्हणजे इंग्रज - पेशवा यांच्या संयुक्त फौजा व आरमार जेव्हा विजयदुर्गाजवळ आले तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तुळाजीने तातडीने तहाची वाटघाट रामाजीपंतासोबत सुरु केली. वस्तुतः स. १७५५ पासून तुळाजी पेशव्यासोबत तह करण्यासाठी आपले वकील पाठवत होता पण तो सर्व वेळकाढूपणाचा प्रकार होता. परंतु, जेव्हा विजयदुर्गावरचं शत्रूची धाड येउन पडली तेव्हा त्याचे अवसान गळून त्याने खऱ्या अर्थाने समेटाची बोलणी रामाजीसोबत सुरु केली. पण रामाजीने आरंभी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. इकडे तुळाजीचे वकील रामाजीकडे आल्याची बातमी क्लाइव्ह व वॉटसन यांना समजातच त्यांनी गव्हर्नरच्या आदेशानुसार वागण्याचे ठरवले. नाममात्र एक दिवसाची वाट पाहून तहाची वाटाघाट कोणत्या वळणाने होत आहे याचा त्यांनी अंदाज घेतला व दुसऱ्या दिवशी निकराने विजयदुर्गावर हल्ला चढवला. या हल्ल्यात इंग्लिश जहाजांवरील लांब पल्ल्याच्या तोफांनी विजयदुर्गाच्या आसऱ्यास उभे असलेल्या तुळाजीच्या आरमाराचा अपघाती वेध घेऊन त्यास भस्मसात केले. इंग्रजांनी तुळाजीचे आरमार निकामी केल्याचे समजताच रामाजी महादेवने दुसऱ्या दिवशी किल्ल्यावर हल्ला चढवण्याचे निश्चित केले. परंतु, क्लाइव्ह त्याचा बाप निघाला. गलबतांवरील तोफांच्या छायेत त्याने आपली फौज किनाऱ्यावर उतरवून विजयदुर्गावर चढाई केली. आरमार जळाल्याने किल्ल्यातील लोकांचे आधीच अवसान खचले होते. तरीही सायंकाळ पर्यंत त्यांनी झुंज दिली व निरुपाय जाणून अखेरीस शरणागती पत्करली. पांढरे निशाण किल्ल्यावर फडकताच इंग्लिश जहाजांवरील तोफा बंद झाल्या. इंग्रजांचा तोफखाना थंडावताच व किल्ल्यावर शरणागतीचा पंधरा बावटा चढताच मराठी फौजांनी किल्यात घुसण्याचा प्रयत्न केला पण तत्पूर्वीच ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा घेऊन मराठी सैन्याची वाट रोखल्याने त्यांचा नाइलाज झाला. 
           विजयदुर्गाचा ताबा घेण्यावरून पुढे पेशव्याचे आणि इंग्रजांचे पत्रोपत्री मोठे युद्ध झाले पण तो भाग प्रस्तुत विषयाच्या मर्यादेत येत असला तरी लेखाच्या मर्यादेच्या बाहेर असल्याने त्याची चर्चा येथे अप्रस्तुत आहे. इथे फक्त एवढेचं नमूद करतो कि, स. १७५६ च्या ऑक्टोबरमध्ये विजयदुर्ग पेशव्याच्या हाती आला. 
                 विजयदुर्गावर इंग्रजांचा ताबा बसल्यावर तुळाजीने सहपरिवार रामाजी महादेवकडे शरणागती पत्करली. पेशव्याच्या आज्ञेने तुळाजी, त्याची आई, त्याच्या बायका व मुलांना निरनिराळ्या किल्ल्यांवर कैदेत ठेवण्यात आले. तुळाजीची प्रथम राजमाची किल्ल्यावर स. १७५६ च्या मे महिन्यात रवानगी झाली. तेथून मग विसापूर, अहमदनगर, चाकण, अहमदनगर, दौलताबाद, अहमदनगर, पुणे, वंदन अशा विविध ठिकाणी कैदेदाखल यात्रा घडून स. १७८६ मध्ये वंदन किल्ल्यावर त्याचा मृत्यू झाला. सागरावर प्रभुत्व गाजवणाऱ्या तुळाजीची ३० वर्षे अखेर कैदेत गेली. या ३० वर्षांत कैदेतून निसटण्याचे तुळाजीने अनेक प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले. तुळाजी व विजयदुर्ग ताब्यात आल्यावर तुळाजीच्या हाताखाली जे काही त्याचे उरले सुरले आरमार बाकी राहिले होते, ते  पेशव्याच्या नाविक दलात सामील करण्यात आले. पेशव्याने आपल्या तर्फेने धुळप यांस आरमारप्रमुख बनवून विजयदुर्गास आरमारी सुभा स्थापन केला. धुळपांनी आपले आरमारी सामर्थ्य वाढवण्याचा व आंग्रेकालीन मराठी नौदलाचा समुद्रावर असलेला दरारा कायम राखण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण मराठी आरमाराचे जे तेज स. १७५६ मध्ये तुळाजी आंग्रेच्या जहाजांसोबत जे जळून गेले ते गेलेचं ! इतउत्तर मराठी आरमाराची इंग्रजांना धास्ती राहिली नाही. कमजोर नाविक दलाचा फटका पुढे पहिल्या इंग्रज - मराठा युद्धांत पुणे दरबारला चांगलाच जाणवला. प्रबळ आरमाराच्या बळावर बंगाल, मद्रास, सुरत, मुंबई येथील ब्रिटीश पलटणी मराठी राज्यात चारी बाजूंनी जेव्हा घुसल्या तेव्हा त्यांना आवरून धरताना मराठी सरदारांच्या तोंडाला फेस आला होता हे विसरता येत नाही.