रविवार, २९ डिसेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ९ )

   

       बाजीरावाची धडपड :- खर्ड्याची मोहीम आटोपून स. माधव पुण्यास परतला. तेव्हा एक नवीन वादळ त्याची वाट पाहत थांबले होते. जुन्नर मुक्कामी रघुनाथरावाचे तिन्ही पुत्र नानाच्या नजरकैदेत होते. त्यांच्या बंदोबस्तास्तव असलेल्या बळवंतराव नागनाथ वामोरीकर या नानानेच नियुक्त केलेल्या सरदारास बाजीरावाने आपल्या पक्षास वळवून घेतले. रघुनाथपुत्र  बाजीरावाचा जन्म दि. १० जानेवारी १७७५ चा असून या समयी तो २० वर्षांचा होता आणि आपण कोण आहोत व आपले महत्त्व काय आहे याची त्यास पुरेपूर जाण होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजीरावाची आई आनंदीबाई हिचे नुकतेच -- ता. १२ मार्च १७९४ रोजी निधन झाले होते. सालबाईच्या तहापासून रघुनाथराव व त्याचा परिवार नानाच्या नजरकैदेत होता. इतक्या दीर्घ कालावधीत रघुनाथरावाच्या परिवाराचे नानाविषयीचे मत किती कलुषित झाले असेल याची आपण कल्पना केलेली बरी ! असो, या पार्श्वभूमीवर बाजीरावाच्या कारवायांकडे आपणांस पहावयाचे आहे. महादजी शिंदे जेव्हा पुण्यास आला तेव्हा त्याने पेशवे घराण्याच्या चालीनुसार तख्तनशीन पेशव्याचा कारभार पेशवे घराण्यातील व्यक्ती करत असे, या प्रथेचा उल्लेख करून बाजीरावास कारभारात घेण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. किंबहुना, रघुनाथराव - महादजी यांच्यात  याविषयी जो करार झाला होता, त्याला अनुसरूनच महादजीने हि बोलाचाल आरंभली होती. या सर्व घटनांची कल्पना बाजीरावास कितपत होती याची माहिती मिळत नसली तरी यापासून तो सर्वथा अनभिज्ञ होता असे म्हणता येत नाही. इकडे वारंवार बाजीरावाचे नाव चर्चेत येऊ लागल्याने स. माधवास आपल्या चुलत्याविषयी एक प्रकारचे आकर्षण निर्माण झाले. त्याशिवाय जे काही घडले ते मागील पिढीत झाले. त्यामध्ये बाजीराव आणि  त्याच्या बंधूंचा काय दोष असाही पेशव्याच्या मनी विचार आला असावा. इकडे दरबारात व पुणे शहरात वेळप्रसंगानुसार रघुनाथरावाचे समर्थक बाजीरावाचे गुणविशेष प्रसिद्ध करत होतेच. या सर्वांचा असा परिणाम झाला कि, स. माधवास बाजीरावाशी पत्रोपत्री संधान जुळवण्याचा मोह पडला व त्याने बळवंतराव वामोरीकराच्या मार्फत तो प्रयत्न केला. परंतु, एक - दोन चिठ्ठ्यांची देवाण - घेवाण होते न होते तोच याची बातमी नानास लागली व त्याने बळवंतरावास कैदेत टाकून एकांतात पेशव्यास चार शब्द सुनावले. या घटनांच्या तारखा अजून तरी मला उपलब्ध न झाल्याने याविषयी अधिक काही लिहिणे या ठिकाणी शक्य नाही.

            स. माधवरावाची अखेर :- उपलब्ध माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यापर्यंत पेशव्याची प्रकृती व वर्तन दोन्ही सुरळीत होते. खर्ड्याच्या मोहिमेत सहभागी झालेला रघुजी भोसले यावेळी पुण्यात होता व दसऱ्याआधी तो नागपुरास रवाना झाला होता. नवरात्राच्या सुमारास पेशव्यास ताप येऊ लागला होता, इथपर्यंत वासुदेव खरे लिखित नाना फडणवीस चरित्रातील माहितीवर विश्वास ठेवता येतो. पण त्यांनी दिलेली पुढील माहिती मात्र काहीशी विवादास्पद आहे. "  नवरात्रात श्रीमंतांस ज्वर येऊ लागला व  त्या ज्वरानंतर त्यांस वेडाचे झटके येऊ लागले. वाताच्या लहरीत त्यांच्या हातून भलतेच काही न घडावे म्हणून रात्रंदिवस त्याच्याभोवती पहारा असे."   हे अवतरण किंवा हि माहिती स्वीकारता येत नाही. कारण, स. माधवास ताप आल्यावर तो काही बडबडत असे वा त्यांस वाताचे झटके येत असा पूर्वीचा दाखला कोणताही इतिहासकार देत नाही. तसेच वाताचे झटके आणि वेडाचे झटके यांत जमीन - अस्मान इतका फरक असतो. असो, सरदेसाई यांनी आपल्या मराठी रियासत खंड - ७ मध्ये अशी माहिती दिली आहे की, भाद्रपद महिन्यापासून पेशवा आजारीच होता. त्यांस वारंवार ताप येत होता. ता. २३ ऑक्टोबर १७९५ रोजी विजयादशमी होती. त्या दिवशीही पेशवा आजारी असून त्याची प्रकृती क्षीण झाल्याने त्यास बऱ्यापैकी अशक्तपणाही आलेला होता. तरीही दसऱ्याच्या दरबारास त्याने हजेरी लावली. तसेच संध्याकाळी हत्तीवरून शमीपूजनास तो निघाला असताना त्यांस अंबारीत धडपणे बसताही येत नव्हते. तेव्हा आपा बळवंतने त्यास शेल्याने अंबारीस बांधले व वाड्यात परत आणले.

                         स. माधवरावाची शरीरप्रकृती नेमकी कशी होती याविषयी  स्पष्ट आणि निश्चित अशी माहिती मिळत नाही. मैदानी खेळांची त्यांस आवड असली तरी लांबवरचे प्रवास त्यास झेपत होते कि नाही हा प्रश्न उद्भवतोचं ! त्याच्या हयातीत त्याने खर्ड्याला लावलेली हजेरी हा त्याचा सर्वात मोठा दूरचा प्रवास होता. हवा - पाण्याचा बदल त्यास त्यामुळे मानवला कि नाही हा प्रश्न म्हणूनचं उद्भवतो. कारण, त्याला या मोहिमेनंतरच ताप येऊ लागला हे स्पष्ट आहे. मात्र, यापूर्वी किंवा त्यास ताप येत असताना बाजीरावाचे प्रकरण घडून गेले असावे हे विसरून चालता येत नाही. पण त्यास कितपत महत्त्व द्यावे हा देखील एक प्रश्नचं आहे ! अर्थात, एक गोष्ट स्पष्ट आहे की, पेशवा याच काळात जबरदस्त निराशाग्रस्त झाला होता. तापातून आलेला अशक्तपणा हा मनस्तापाचा देखील अप्रत्यक्ष परिणाम असू शकतो ! सरदेसाई यांनी दिलेली माहिती पाहता, दसऱ्याच्या दिवशी दरबारास पेशव्याची हजेरी जरी अत्यावश्यक असली तरी शमीपूजनाचा कार्यक्रम नानाने टाळायला हवा होता असे माझे मत आहे. पेशव्याच्या प्रकृतीची नाना इतकी जास्त कल्पना इतर कोणाला असणे शक्य नाही. अशा परिस्थितीत स्वतःचा तोलही सावरता न येण्याइतपत अशक्त झालेल्या पेशव्यास दिवसभर दरबारी कामकाजात थांबवून घेणे आणि मग शमीपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी करून घेणे हि नानाची एकप्रकारे जबरदस्तीचं म्हटली पाहिजे. दसऱ्याचा समारंभ जसातसा पार पडला आणि ता. २५ ऑक्टोबर १७९५ रोजी सकाळच्या पहिल्या प्रहरी शनिवारवाड्यातील गणपतीच्या दिवाणखान्याच्या माडीवरील राहत्या खोलीतून पूर्वेकडील कवाड उघडून त्याने खाली उडी टाकली. 

                   इथपर्यंतची माहिती खरे, सरदेसाई, य. न. केळकर यांच्या लेखांमधून घेतली आहे. यापुढे आता उपरोक्त त्रिकुटाच्या माहितीवर विसंबून राहणे धोक्याचे आहे. ते का व कसे हे पुढील भागात स्पष्ट होईलंच. स. माधवाचा हा अपघात व त्याचे निधन याविषयी तत्कालीन अस्सल पत्रांत व लेखांत माहिती मिळते तीच या ठिकाणी देत आहे. 

             ऐतिहासिक लेखसंग्रह खंड - ९ :-   प्रथम एका महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा करणे योग्य होईल कि, सदर लेखसंग्रहातील पत्रे ज्येष्ठ इतिहास संशोधक वासुदेव खरे यांनी संपादित केली असून ती सर्व पटवर्धन दप्तरातील आहेत. 

१} नं. ३६४४                      २६ ऑक्टोबर १७९५

                        श्री
              श्रीमंत राजश्री बाळासाहेब स्वामींचे सेवेशी.
   विनंती सेवक धोंडो बापूजी जोशी. दोन्ही कर जोडून त्रिकाळ चरणांवर मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार विज्ञापना तागायत आश्विन शु. १३ तिसरा प्रहरपावेतों सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. विशेष. इकडील सविस्तर पेशजी चंदा सांडणीस्वार याजबरोबर लिहून पाठविले होते. दसऱ्याच्या सुमारे येऊन पावला असेल. श्रीमंत राजश्री रावसाहेब यांजला शरीरी समाधान नव्हते. औषधी उपाय चालत होते. चित्ताची स्थिरता अलीकडे नव्हती. आश्विन शु. १२ रविवारी दोन तीन घटका दिवस सुमारे. श्रीगणपतीचे दिवाणखान्यावर माडीवर राव निजत होते तेथून पूर्वेचे अंगचे कवाड उघडून खाली उडी टाकिली. खाली कारंज्याचा हौद होता त्यांत पडले. दातांस व हातांस व गालास व पाय इतके लागले. परंतु पाय भारी दुखावला. आंतील हाड मांडीजवळ मोडले. कांबी लावून बांधिले. फार पायाचे दुःख आहे. हे सर्व मजकूर राजश्री बाळाजी विष्णु सहस्त्रबुद्धे व विसाजी नारायण  वाडदेकर याणी वाड्यांत जाऊन रुबरु राव याजला पाहून वडिलांकडे वर्तमान कच्चे लिहून पाठविले असेल. राव यांची प्रकृति ठीक नाही. देवी मानवी उपाय बहुत होत आहेत. श्रीहरी आरोग्य करील. बहुत काय लिहिणे सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना. 
==============================================

२]  नं. ३६४५           आश्विन शु. १४ -- २७ ऑक्टोबर १७९५   
  परशुरामभाऊंकडून बाळसाहेबांस पत्र. रवाना छ. १५ रविलाखर सीत तिसैन ---
“ सरकारचे पत्र फौजेची तयारी करून जलदी निघून यावे म्हणून आले आहे. आपलेही नांवे लखोटा आहे.”
==============================================

३] नं. ३६४६                        २९ ऑक्टोबर १७९५
 
               धोंडो बापूजी जोशी यांचे बाळासाहेबांस पत्र पुण्याहून आश्विन व।। २ चे ------
  “ आपण जिन्नस खरेदी करून पाठविण्याविषयी लिहिले, त्यास कैलासवासी रावसाहेब आश्विन शु।। १४ मंगळवारी गजराचे वेळेस देवाज्ञा जाहले. चौकी पहारे बंदोबस्त पत्री काय लिहूं ? शेटी पवार व संताजी जासूद यांणी पाहिला आहे. दुकाने बंद. रस्त्यांतून कार्यकारण मनुष्य फिरते. यास्तव जिन्नस घेण्याचे तूर्त राहिले. “ 
==============================================
 
४] नं. ३६५०              आश्विन व. ९ ---- ५ नोव्हेंबर १७९५

                         श्री 
 
          चिरंजीव राजश्री बळवंतराव यांसी प्रती परशुराम रामचंद्र. आशीर्वाद. ……… ……… ……… ते बुधवारच्या सकाळच्या सहासात घटका दिवसास शिवऱ्याजवळ आलो. तेथे स्नानसंध्या करून अस्तमानी शहरानजीक पोंचलों. आवशीच्या नऊ घटका रात्रीस सुवेळ होती. त्या समयीं राजश्री नाना यांजकडे जाऊन मग आपल्या ठिकाणास वाड्यांत आलों. चिरंजीव राजश्री हरिपंत बाबा यांस लोकांसुद्धां वसंतबागेजवळ उतरविले आहे. चिरंजीव राजश्री रघुनाथराव दादा अद्यापि आले नाहींत. येतील. श्रीमंत आमरणांत बोलत होते. बोलून चालून राजश्री नानांस सांगितले, “ आमची वेळ जवळ आली. आम्हांस राज्याची इच्छा नाही. तुम्ही आमचे नांवाचा दुसरा करणे. आपण सूर्यमंडळ भेद करून जातो ” अशी अनेक प्रकारची अन्यांजवळ # भाषणे केली. ते समयी कोणास खरी वाटली नाहींत. आता सर्वांस वाटते ! असो. त्यांनी आपला अवतार समाप्त केला. आतां पुढे हे विवंचना करितात ! आमचे दर्शन ## मात्र जाहले. पुढे काय लिहिणे लोभ कीजे हे आशीर्वाद.

चिन्हांचा खुलासा :- (१) # - अन्यांजवळ चा अर्थ इतरांजवळ असाही होतो आणि हरीपण फडकेचा मुलगा मोरोपंत याचे टोपण नाव ‘ अन्या ‘ होते, कदाचित हा उल्लेख त्यास उद्देशून असावा. (२) ## - दर्शन नानाचे. [टीप - खुलासा खरे यांचा.]
==============================================


५] नं. ३६५६                कार्तिक शु. १५ --- २६ नोव्हें. १७९५
      
                         श्री      
        पै।। छ. १३ जमादिलावल. सीत तिसैन. कार्तिक पौर्णिमा.
सेवेशी नीलकंठ आपाजी. विज्ञापना. स्वामींनीं स्वदस्तूरचे पत्र पाठविलें ते पावले. मजकूर समजला. …… …… …… …… श्रीमंतांनी आपला काल समीप आला असे जाणून श्रीमंत बाईसाहेबांस काही गोष्टी सांगितल्या, व आणखी कित्येकांजवळ कित्येक भाषणें जहाली, त्याची बखर होत आहे. एक दोन रोजांत स्वामींजवळ येईल. किती लिहिले असतां गोष्टी संपावयाच्या नाहींत. त्यांतील हांसील कलमवार तयार करण्याकरितां श्रीमंत राजश्री भाऊसाहेब यांनी आज्ञा केली आहे. लवकरच येईल. प्रस्तुतचा मजकूर दत्त आणावा अशी गोष्ट ठरली. येविशीचे परवां लिहिले आहे त्याजवरून समजेल. विदित होय हे विज्ञापना.
==============================================

६] नं. ३६५७         श्रीगणपति  ( कार्तिक शु. १५ -- २६ नोव्हें. १७९५ )
          पै।। छ. १७ जमादिलावल. सन सीत तिसैन.
  चिरंजीव राजश्री बळवंतराव यांसी प्रती परशुराम रामचंद्र आशीर्वाद उपरी. पुढे कर्तव्यतेचा मजकूर ठरावांत आला तो परवां लिहिला आहे. मुलाचा शोध श्रीवर्धन व केळसी व वरसई व वसई येथे करविला. त्यास दहा मुले तीन घराण्यांत आहेत, त्यांपैकी सहा जणांच्या मुंजी जाहल्या आहेत. चौघांच्या मुंजी जाहल्या नाहींत, अशी बातमी आली आहे. मुलांस आणावयाकरितां पालख्या व घोडी वगैरे सामान सरकारांतून रवाना जाहले आहे. येथें आल्यावर त्यांतून कोणाचा निश्चय होतो पहावें. ठरेल ते लिहून पाठवितो. श्रीमंतांनी माडीवरून पडावयाचे पूर्वी भाषण कोणाकोणाजवळ केलें तें व माडीवरून पडल्यानंतर बोलिले तें कोणीं कोणीं येउन सांगितले तें अलाहिदा कलमवार लिहिलें आहे. त्यावरून कळेल. त्याची नक्कल करून चिरंजीव राजश्री रामचंद्रपंत आपा यांजकडे पाठवावी. गोष्ट चमत्कारिक आहे. कृष्णावतारसमाप्तीसारखे केले ! परम आश्चर्य आहे ! रवाना. छ. १३. जमादिलावल. बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनंती. 
==============================================
==============================================
  
  मराठी रियासत खंड - ७ :-  १]   ता. २५ ऑक्टोबर १७९५ रोजी स. माधवास अपघात झाल्यावर तुकोजी होळकर त्याच्या भेटीस गेला होता. त्याने या भेटीचे वृत्त आपल्या मुलास -- काशिराव होळकरास पत्राद्वारे लिहून कळवले ते पत्र खालीलप्रमाणे :- 
  
    आज शुद्ध १२ रविवारी श्रीमंत मुखमार्जन करून गणपतीचे दिवाणखान्यावरील माडीवर प्रातःकाळचा चार घटका दिवस आला ते समयीं कठड्याशी टेकून बसले होते. समीप त्यांची आजी ताईसाठीं, शागीर्द व खिजमतगार वगैरे मंडळी असतां, श्रीमंत उठून उभे ठाकले, तों भोंड येऊन सावर न धरितां, खाली दक्षिणेकडे कारंजी हौद आहेत, तेथें येऊन पडले. दोन घटका बेहोष होते. नंतर सावध होऊन बोलूं लागले. ईश्वरे कृपा केली, बचाव जाला.  
==============================================

 २] पेशवे शकावलीमधील नोंद मराठी रियासतमध्ये देण्यात आली आहे ती खालीलप्रमाणे :- 

 खर्ड्याहून आल्यावर श्रीमंत पर्वतीखाली रमण्यांत जाऊन घोडी फेरू लागले व हत्तीच्या वगैरे लढाया लावूं लागले. भाले, बोथाट्या खेळून हरणामागे शिकारीस जात होते. कारभारी नाना यांनी नवी पेठ वसवून हनमंत पेठ ठेविले, ( तिचे नाव हल्ली नानाची पेठ चालते.*) विजयादशमीचा उत्सव करून आल्यानंतर द्वादशीस दिवाणखान्यांत असतां अकस्मात मेघडंबरी बंगल्याचे पायरीवरून कारंजाचे नळीवरून खाली पडले. कोजागरीचे दिवशी सावध असतां कारभारी यांस बोलावून म्हणो लागले की, आमचे शरीराचा भरंवसा नाही, दादासाहेबांचे पुत्रास आणवावे, तों सायंकाळी अवतार समाप्त जाला. 
==============================================

३] बाळाजी रघुनाथ व केशवराव कोंडाजी यांनी हैद्राबाद दरबारातील पुणे दरबारच्या वकिलास --- गोविंदराव काळे यांस प्रस्तुत घटनेची माहिती पत्राद्वारे कळवली. ते पत्र खालीलप्रमाणे :- 

 द्वादशीचे दिवशी श्रीमंतांस ज्वरांशांत वायू झाला होता. प्रातःकाळी गणपतीचे दिवाणखान्यावर रंगमहाल आहे, तेथें निद्रेचे स्थान, तेथें गेले. पलंगावर बसले होते. वायूचे भिरडीत, काय मनास वाटले न कळे, पलंगावरून उठून दक्षिणेकडील खिडकीत उभे राहिले. खिजामतगार याने शालेस हात लाविला की, येथे उभे राहणे ठीक नाही. तों एकाएकीं तेथून उडी टाकिली. खाली दीड भाला खोल कारंजी हौद आहे, तेथें कांठावर पडून आंत पडले. उजवी मांडी मोडून हाड बाहेर निघालें. दांताची कवळी पडली. नाकावाटे रक्त निघाले. तेथून उचलून नानांनी ऐने महालांत नेले. तबीब आणून हाड बसवून, टाके देऊन शेक केला. चहूं घटकेनंतर शुद्धीवर येऊन डोळे उघडले. वायूचा प्रकोप होताच. कांही सावध होऊन बोलत. कांही वेळ भ्रंश होऊन बोलत, आश्विन शुद्ध १४, सात घटकांनंतर पौर्णिमा मंगळवार, ते दिवशीं प्रथम घटका रात्रौ कैलासवासी जाले. म्हणोन बाळाजी रघुनाथ व केशवराव कोंडाजी यांचे पत्र मुक्काम हैदराबाद येथें आले. 
==============================================


भूतावर भ्रमण ( ऐतिहासिक लेखसंग्रह ) :-  श्री. य. न. केळकर लिखित या ग्रंथात काव्येतिहाससंग्रहातील ले. ३३२ मधील सवाई माधवरावच्या अपघाताविषयी नोंद देण्यात आली आहे ती येथे देत आहे :- 
          सन सीत तिस्सैन. खासा आश्विन शु. १२ माडीवरून पडून अत्यस्वस्थ झाले. ते शु. १५ कैलासवास केला. राज्याचा शेवट नानासाहेबांचे वंशाचा झाला. ब्रह्मप्रळय होईल रावसाहेब बोलले. त्याप्रमाणे पुढे निदर्शनास आले. 
==============================================

   येथून पुढील भाग म्हणजे किचकट विश्लेषणाचा असून अनेक वाचकांना तो कंटाळवाणा भासणार आहे पण ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेताना किंवा त्यांचे विश्लेषण अभ्यासताना कधी - कधी हा किचकट आणि कंटाळवाणा वाटणारा भाग देखील वाचावा / अभ्यासावा लागतो याची त्यांनी आपल्या मनाशी नोंद घ्यावी हि विनंती !
                                      ( क्रमशः )   
  
   


            

     

    

 

 

 

  

शनिवार, २८ डिसेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ८ )


      लाखेरीची लढाई :-   स. १७९२ च्या ऑक्टोबर मध्ये होळकर - शिंद्यांची एक झुंज घडून त्यात होळकर पराभूत झाले. तेव्हापासून महादजी व तुकोजी वरकरणी पुणे दरबारास ' आमच्यात समेट करून द्या ' असे म्हणत असले तरी उभयता लढाईची कसून तयारी करत होते. खुद्द नाना व हरिपंत वरवर या दोन सरदारांत गोडी निर्माण होण्यासाठी मध्यस्थी करण्याचा देखावा करत होते. अखेर होता - होता मे महिन्यात लाखेरीच्या आसमंतात शिंदे - होळकरांच्या सेना समोरासमोर आल्या. तुकोजी जवळ पाराजीपंतासारखे होळकरशाहीतील अनुभवी मुत्सद्दी होते. त्यांनी तुकोजीला संग्राम टाळण्याची विनंती केली, पण याच सुमारास तुकोजीचा मुलगा मल्हारराव हा इंदूरहून बापाच्या मदतीस आला. त्यास पाराजीपंताचे सामंजस्याचे धोरण पटले नाही. त्याने बापाला युद्धाचा सल्ला दिला. तेव्हा ता. २८ मे १७९३ रोजी लाखेरीजवळ उभय फौजांचा  सामना जुंपला. दोन्ही पक्षात घोडदळ व पायदळ पलटणांचा भरणा होता. त्याशिवाय जोडीला अद्ययावत तोफखानाही असून, विशेष महत्त्वाची बाब म्हणजे दोघांच्याही कवायती पलटणींचे सेनापती फ्रेंच होते. शिंद्यांचा डीबॉईन तर होळकरांचा ड्युड्रनेक ! आरंभी किरकोळ चकमकी घडून ता. १ जून रोजी लाखेरीची मुख्य लढाई घडून आली. युद्ध मोठे निकराचे होऊन अखेर होळकरी सैन्य पराभूत होऊन मागे हटले. खासा मल्हारराव बंदुकीच्या गोळीने जखमी झाला. लढाईच्या वेळी तुकोजी रणभूमीपासून बराच दूर होता. त्यास पराभवाचे वर्तमान समजताच त्याने रागाच्या भरात शिंद्यांची उज्जैन लुटून घेतली. 

               लाखेरीच्या संग्रामाची बातमीपत्रे पुण्यास येऊन पोहोचल्यावर नाना व महादजीच्या गोटात बरीच खळबळ माजली. आता शिंद्यांशी नरमाईचे धोरण स्वीकारल्याखेरीज नानासमोर दुसरा पर्याय उरला नव्हता. इकडे शिंद्यांचीही काही चांगली परिस्थिती नव्हती. होळकर पराभूत झाले असले तरी त्यांची फौज मोडली नव्हती. स्वतः अहिल्याबाई तुकोजीसोबतचे मतभेद विसरून सैन्याची जमवाजमव करू लागली होती. लाखेरीच्या युद्धानंतर होळकरांची पराभूत फौज खेचीवाड्यात सरकू लागली होती तर त्यांच्या पाठी शिंद्यांची पथके लागली होती. इकडे पुण्यात पेशवा, नाना व हरिपंत यांनी महादजीसोबत बोलणी करून होळकरांशी मिटते घेण्याची सूचना केली. महादजीने देखील त्यास वरवर मंजुरी दिली. उत्तरेत होळकरांच्या समजुतीकरता सरकारचे हुजरे व बळवंतराव काशी कात्रे यांना पाठवण्याची तजवीज सुरु झाली. पाठोपाठ पेशव्यांचे विश्वासू वकील हिंगणे होळकरांकडे शिष्टाईसाठी जाणार होते. याच सुमारास बेदरला तळ ठोकून बसलेल्या निजामाने सैन्य भरतीस आरंभ केला असून त्याचे काही हस्तक पुण्यात येऊन मराठी फौजांत द्रव्य वाटप करून फितुरीचे कार्य करत असताना हस्तगत झाले. या सर्व पार्श्वभूमीवर केव्हातरी नाना - महादजी यांच्यात सख्य घडून आले खरे, पण यानंतर लवकरच महादजी तापाने आजारी पडला. यानंतरचा  त्याचा बहुतेक काळ आजारपणातच गेला. इकडे लाखेरीवर पराभूत झालेल्या होळकरी सैन्याने कोट्याजवळ शिंद्यांच्या पाच हजार फौजेचा व दोन कवायती पलटणांचा पराभव केल्याची वार्ता जुलै १७९३ मध्ये पुण्यास आली. कोट्याच्या लढाईनंतर महादजीने देखील नरमाई स्वीकारत पुणे दरबार सोबत मिळते - जुळते घेतले. सोबत्यांचा दम चमत्कार तो पुरेपूर ओळखून होता. आपल्या गैरहजेरीत आपले सरदार होळकरांचा संघटीतपणे तितकासा मुकाबला करू शकत नाहीत हे तो जाणून होता. तशात होळकरांना नानाचा --- म्हणजेच पर्यायाने पुणे दरबारचा पाठिंबा असल्याने त्याने आपला हात आवरता घेतला. यापुढे म्हणजे ता. १२ फेब्रु. १७९४ रोजी पर्यंत त्याच्या हातून विशेष असे काही कार्य घडून आले नाही. नानाने त्याच्यावर हिशेबाची बाकी दाखवली होती त्याचीही तडजोडीने वासलात लागली. शिंद्याने उत्तरेत कमावलेला प्रदेश त्याचे कर्ज फिटेपर्यंत त्याच्याकडेच राहावा असे ठरवण्यात आले. हिशेबाचा घोळ मिटताच महादजीच्या तक्रारी जवळपास संपुष्टात आल्या. या दरम्यान श्रावणमासाचा समारंभ होऊन त्यातही महादजीने सहभाग घेतल्याचा उल्लेख आहे.

               खर्ड्याच्या मोहिमेची पूर्वतयारी :- पुणे दरबारातील वादळ शांत होत असताना इकडे निजामाची मात्र मोठी धामधूम सुरु झाली होती. नाना - महादजीची युती झाल्याने पुणे दरबारने निजामाकडे चौथाई व सरदेशमुखीच्या थकबाकीबद्दल तगादा लावण्यास आरंभ केला. अर्थात, पत्रोपत्री हा व्यवहार आधीच सुरु झाला असला तरी महादजी नानाच्या पक्षास मिळाल्याने पुणे दरबारची भाषा आता चढाईची बनली. पुणे दरबारच्या या चालीस तोड म्हणून निजामाने इंग्रजांना मध्यस्थीची विनंती केली. परंतु याच काळात हिंदुस्थानच्या इंग्रजी अधिकार मंडळात एक फेरबदल घडून आला होता. टिपूला लोळवणाऱ्या लॉर्ड कॉर्नवॉलिसची मुदत संपून सर जॉन शोअर हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल बनला होता. इंग्लंडमधून त्यास कंपनी चालकांची स्पष्ट शब्दांत ऑर्डर होती की, एतद्देशीय राजकारणात गुंतून युद्धाच्या भानगडीत पडू नये. कॉर्नवॉलिसने अलीकडे टिपूसोबत केलेल्या युद्धात कंपनीला विजय मिळाला असला तरी त्यांचे आर्थिक नुकसान बरेच झाले होते. त्यामुळे शोअरने वरिष्ठांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे ठरवून त्यानुसार पुणे व हैद्राबाद येथील आपल्या वकिलांना सूचना दिल्या. वस्तुतः, निजाम - पेशवे तंट्यात प्रत्यक्ष सहभाग न घेणेच इंग्रजांच्या हिताचे होते. इंग्रजांनी निजामाची मदत केली असती तर टिपू पुणे दरबारला मिळाला असता असे म्हटले जाते खरे, पण नुकत्याच झालेल्या इंग्रज - पेशवे - निजाम या त्रिवर्गाच्या चढाईत त्याचे बरेचसे लष्करी व आर्थिक नुकसान झाल्याने आपल्या राज्याच्या बाहेर पडून त्याने पुणे दरबारची  अशी किती मदत केली असती याचा विचार करणे गरजेचे आहे. निजाम - पेशवे यांच्या संघर्षात दोघांपैकी एकाने धुळीस मिळणे हे इंग्रजांच्या पथ्यावरचं पडणार होते. '  दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ ' अशातील हि गत होती. 

            पुणे - हैद्राबाद - कलकत्ता अशी राजकीय पत्रे फिरत असताना ता. १२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजी शिंदे मरण पावला तर दि. २० जून १७९४ रोजी हरिपंत फडकेचे निधन झाले. पुणे दरबारचे हे दोन अनुभवी व लढवय्ये सेनानी अल्पावधीत मरण पावल्याने निजामाला जोर चढला  आणि त्याने इंग्रजांच्या मदतीची पर्वा न करता पुणे दरबारसोबतचा तंटा वर्दळीवर आणण्याचा निश्चय केला. अर्थात, याबाबतीत निजामापेक्षा  दिवाण गुलाम सय्यदखान यास अधिक खुमखुमी होती. गुलाम सय्यदखान यास मुशीरुन्मुल्क अशी पदवी असून याच नावाने तो इतिहासात प्रसिद्ध आहे. खर्ड्याची लढाई म्हणजे नाना व या मशीरचा तंटा असून दोघेही आपापल्या राज्याचे कट्टे अभिमानी असले तरी त्याबाबतीत मशीर हा नानापेक्षा सरस असल्याचे दिसून येते. असो, मशीरने निजामाला लढाईची भर दिली. पुणे दरबारला सालोसाल चौथाई व सरदेशमुखी देण्याऐवजी तोच पैसा लष्कर उभारणीस लावला असता पुण्यावर आपले नियंत्रण बसवता येईल अशी स्वप्ने त्याने निजामाला दाखवली. तेव्हा निजामाने हे प्रकरण वर्दळीवर आणण्याचे ठरवले पण अखेरपर्यंत त्याचे मन दोलायमान राहिले. त्याला वाटत होते की, इंग्रजांनी यात मध्यस्थी करून सन्मानजनक तोडगा काढावा. पण नानाला इंग्रजांची मध्यस्थी बिलकुल नको होती. टिपूचा शक्तिपात झाल्यावर नानाला दक्षिणेतील राजकीय सत्तासमतोल बिघडल्याची जाणीव झाली. अशा स्थितीत निजामाच्या तंट्यात इंग्रजांना मध्यस्थ करून त्यांना आपल्या बरोबरीचे स्थान मिळावे हे त्यांस खपण्यासारखे नव्हते. त्यामुळे इंग्रजांना या प्रकरणांत हस्तक्षेप करणे अवघड झाले. त्यातच ब्रिटीश गव्हर्नर जनरल शोअरने या वादात अलिप्तपणाचे धोरण स्वीकारल्याने नानाला एकप्रकारे हायसे वाटले. वस्तुतः इंग्रजांना यावेळी निजाम व पेशवे यांच्यात मध्यस्थी करून आपले महत्त्व वाढवण्याची तीव्र इच्छा झाली होती. निजामाचे राज्य मोडकळीस आल्याचे त्यांना माहिती होते. आता फक्त पुणे दरबारास त्यांना गुडघ्यावर आणायचे होते. 

                   शिंदे - होळकरांच्या रक्तरंजित लढाया, महादजी - हरिपंत यांचे मृत्यू यांमुळे मराठी राज्य कमकुवत झाल्यासारखे भासत असले तरी अजून ते आपल्या पायावर समर्थपणे उभे होते. मराठी राज्याचा चालक सवाई माधवराव हा प्रचलित राजकारणात क्वचित लक्ष घालत असला तरी त्याच्यावर सरदारांची काही प्रमाणात निष्ठा होती. छत्रपती पेशव्यांच्या नजर कैदेत असले तरी पेशव्यांच्या विरोधात जाण्याची त्यांची शक्ती नव्हती. पुणे दरबारची सर्व सूत्रे यावेळी नानाच्या हाती असून पेशवा त्याच्या मुठीत होता. शिंद्यांची बलवान सरदारकी महादजीच्या निधनाने नानाच्या अंकित झाली होती. शिंद्यांच्या नव्या वारसास -- दौलतरावास नानाची मनधरणी केल्याशिवाय पर्याय नव्हता. होळकरांच्या दौलतीत तुकोजी हयात असतानाच वारसा हक्कासाठी कलह लागल्याने ते घराणे देखील नानाच्या कह्यात गेले होते. अशा परिस्थितीमध्ये नानाला खुश ठेवण्यात आपले हित असल्याचे ताडून इंग्रजांनी नानाच्या मर्जीविरोधात निजामाच्या तंट्यात हस्तक्षेप करण्याचे नाकारले. इंग्रजांची हि दूरदृष्टी खर्ड्याच्या संग्रामानंतर त्यांच्या मदतीस आल्याचे दिसून येते. असो, इंग्रजांनी निजामाच्या प्रकरणी तटस्थता स्वीकारल्याने नानाने आपल्या मागण्या निजामास कळवल्या. त्यांचा प्रमुख आशय असा की, ' निजामाने आजवरची थकलेली चौथाई व सरदेशमुखीची बाकी एकदम चुकती करावी आणि इतउत्तर आपल्या सल्ल्याने कारभार करावा. ' पैकी यातील पहिली मागणी निजामाला मान्य होती, पण नारायणरावच्या खुनापासून ते पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात आपण पुणे दरबारला मदत केली तर त्याबदल्यात त्यांनी हा हक्क सोडून द्यावा अशी त्याची अपेक्षा होती. बाकी, पुणे दरबारच्या तंत्राने आपला कारभार चालवण्यास तो तयार नव्हता. कारण, असे केल्यास त्याचे स्वातंत्र्य ते काय राहिले ? या वादाचा निकाल समक्ष भेटीगाठीने व्हावा अशीही निजामाने इच्छा व्यक्त केली. इंग्रजांनीही  हि गोष्ट नानाने मनावर घेतली नाही. त्यातच निजामाच्या दिवाणाने भर दरबारात नाना व पेशव्याची सोंगे घेतलेल्या लोकांचा तमाशा घडवून आणला आणि पुण्यावर स्वारी करून पेशव्यांना हाती भिक्षापात्र घेऊन देशोधडीला पाठवण्याची वल्गना केली. हैद्राबाद दरबारातील मराठी वकील गोविंदराव काळेने घडला प्रकार नानास कळवल्यावर त्याने झटून युद्धाची तयारी चालवली. महादजी सोबत आलेली शिंद्याची पथके पुण्यात हजर होतीच. त्याशिवाय दौलतरावाने उत्तरेतील आणखी कवायती पलटणे व सैन्य दक्षिणेत आणले. तुकोजी होळकरास पुण्याला येण्याची पत्रे रवाना झाली. तसेच नागपूरकर भोसल्यांनाही मोहिमेत हजर राहण्याविषयी खलिते रवाना झाले. नाना फडणीसची पत्रे अहिल्याबाईस मिळाली तेव्हा तिने शिंद्याच्या बंदोबस्तासाठी नव्याने उभारलेली पथके व जुनी फौज तुकोजीसोबत देऊन त्यास दक्षिणेत रवाना केले. लाखेरीच्या युद्धात थोरल्या मल्हारराव होळकराच्या निशाणास जो डाग लागला आहे तो शिंद्याचा पराभव करून वा सरकारकाम करून धुवून टाकावा असे अहिल्याबाईचे मत होते. त्यामुळे पुणे दरबारच्या पत्रावरून तिने जय्यत तयारी केली. याव्यतिरिक्त दक्षिणेतील सर्व लहान - मोठ्या सरदारांना नानाने या स्वारीत सहभागी होण्याची आज्ञापत्रे काढली.

               खर्ड्याची लढाई व तह :- स. १७९४ - ९५ च्या नोव्हेंबर मध्ये बेदरहून पुढे येऊ लागल्याची बातमी येताच नाना फडणीस पेशव्यासह डिसेंबरात पुण्यातून बाहेर निघाला. विशेष खबरदारी म्हणून रघुनाथरावाच्या तिन्ही मुलांना नोव्हेंबर महिन्यातच आनंदवल्लीहून जुन्नरला आणून ठेवले. बेदरहून निघालेला निजाम पुण्याच्या रोखाने येत असल्याचे लक्षात येताच त्या अनुषंगाने मराठी फौजांची हालचाल होऊ लागली. नेहमीच्या प्रघातानुसार सर्व मराठी फौजा एकवटून न चालता आपापल्या मर्जीनुसार शत्रू जवळ करत होत्या. निजामाशी लढा जुंपणार हे आता उघड असले तरी नानाने या मोहिमेचे अधिकृतरित्या सेनापतीपद अजून कोणालाच दिलेलं नव्हतं. पुढे उभयतांच्या फौजा खर्ड्याजवळ समोरासमोर आल्या. या मोहिमेत उभयतांचे बलाबल सामान्यतः पुढीलप्रमाणे होते :- 
      पेशवे :- ८४ हजार घोडदळ, ३८ हजार पायदळ, १९२ तोफा 
      निजाम :- ४५ हजार घोडदळ, ४४ हजार पायदळ, १०८ तोफा

                   अर्थात, उभय  फौजांची हि आकडेवारी अगदी अचूक अशी नाही. परंतु, या मोहिमेसाठी गोळा केलेल्या मराठी सैन्याची आकडेवारी व सरदारांची खानेसुमारी पाहता मराठी राज्याच्या इतिहासात पानिपत खालोखाल या स्वारीचा क्रमांक लागतो हे निश्चित ! पानिपत नंतर प्रथमच आणि शेवटचेच मराठी सरदार शत्रूविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आले होते. काही दिवसांपूर्वी एकमेकांचे गळे कापण्यास आतुर झालेले शिंदे - होळकर आता निजामाच्या विरोधात लढण्यासाठी एकजूटीने उभे राहिले होते. मराठी सरदारांच्या या स्वभाव वैशिष्ट्यांचे तटस्थपणे निरीक्षण करत इंग्रज वकील मॅलेट हा आपल्या भावी शत्रूचे गुण - दोष टिपून घेत होता. नानाने इंग्रजांना आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी मॅलेटला सोबत घेतले खरे, पण मॅलेटला पुणे दरबारची मजबुती न दिसता छिद्रे मात्र नजरेस पडली !  
                       असो, खर्ड्याच्या रणांगणात निजामाच्या फौजेची व मराठी सैन्याची ता. ११ मार्च १७९५ रोजी गाठ पडली. तत्पूर्वी केव्हातरी नानाने आपल्या अत्यंत विश्वासातील परशुरामभाऊ पटवर्धनास मोहिमेचे सरसेनापतीपद दिले. तसेच सैन्याची आघाडी देखील त्याने पटवर्धनांवर सोपवली. नानाच्या या युद्धनीतीचे अत्यंत मार्मिक शब्दांत वाभाडे काढण्याचे कार्य श्री. रानडे यांनी आपल्या नारायणराव पेशव्यांविषयी ग्रंथात केलेलं असल्याने याविषयी अधिक काही न लिहिलेलं बरे ! असो, खर्ड्याच्या लढाईत सरसेनापतीपद परशुरामभाऊला देण्याचा नानाचा निर्णय योग्य होता पण, खुद्द पेशवा स्वारीत हजर असताना त्यास मोहिमेचा सरसेनापती मानून परशुरामभाऊला दुय्यम पद दिले असते तर अधिक चांगले झाले असते. त्यामुळे मोहिमेच्या निकालावर काही फार पडणार नव्हता परंतु पेशव्याला काही प्रमाणात उमेद येऊन सैन्यावर देखील त्याची छाप पडली असती.  या गोष्टीचा नानाने विचार केल्याचे दिसून येत नाही. पानिपत मोहिमेत जसा विश्वासराव नामधारी सरसेनानी होता तसाच स. माधवराव या मोहिमेत राहिला असता. परंतु, नानाने हि गोष्ट शक्य असूनही घडून दिली नाही. अर्थात, हे त्याने हेतुपुरस्सर केले कि अजाणतेपणी त्याच्याकडून हि चूक झाली हे समजायला मार्ग नाही. याखेरीज आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सरसेनानी परशुरामभाऊच्या हाताखाली खासे भोसले, शिंदे, होळकर रणात उतरले नाहीत तर त्यांनी आपल्या वतीने पुढील अधिकारी भाऊच्या हाताखाली नेमले ते असे :- शिंदे - जिवबादादा व लखबाबा नाना ;  भोसले - विठ्ठलपंत सुभेदार ; होळकर - काशिराव व बापूराव होळकर. 
          खर्ड्याच्या युद्धाचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये कवायती पलटणींचे नेतृत्व फ्रेंच अधिकाऱ्यांकडे होते.  निजामाचा रेमंड , शिंद्यांचा पेराँ तर होळकरांचा ड्यूड्रनेक ! उभय पक्षांचा प्रमुख लढा हा कवायती पलटणी व तोफखान्याच्या बळावर झाल्याने  गनिमी काव्याची लढाई  मराठी सैन्यावर आला नाही. 

                   खर्ड्याच्या लढाईविषयी जी अस्सल पत्रे मला उपलब्ध झाली, त्यातील माहितीवरून असे दिसून येते की, ता. ११ मार्च रोजी शत्रूची टेहळणी करण्यासाठी मोहीमप्रमुख परशुरामभाऊ हा आपल्या एका लहानशा पथकासह मुख्य सैन्यापासून खूप पुढे निघून गेला. दुसऱ्या बाजूला शत्रूही आपल्या फौजांची मांडणी करत होता. त्याने मराठी सैन्यसागरातून फुटून बरीच लांब आलेली हि लहानशी तुकडी पाहून तिच्यावर चाल केली. यावेळी भाऊचा पुतण्या विठ्ठलराव मारला गेला व त्याचे पथक उधळून मागे आले. या लहानशा चकमकीत खासा भाऊच्या कपाळावर देखील एक वार झाला होता. पटवर्धनांना माघार घ्यावी लागल्याचे पाहताच शिंद्यांनी आपला तोफखाना सुरु केला. तेव्हा पटवर्धनांवर चालून आलेली निजामाची पथके शिंद्यांकडे वळली. शिंदे - निजाम यांची झंगडपक्कड जुंपेपर्यंत होळकर, भोसले, हुजुरात यांनीही शत्रूवर हल्ला चढवला. दरम्यान, परशुरामभाऊने आपल्या पथकास सावरून परत एकदा रणात उतरवले. दिवसभर हातघाईचे व तोफांचे युद्ध होऊन अखेर सूर्यास्तास दोन - अडीच तास बाकी असताना निजामाची सेना पराभूत होऊन माघार घेऊ लागली. खासा निजाम खर्ड्याच्या किल्ल्यात आश्रयास गेला. या संग्रामात शत्रूचे कित्येक लहान - मोठे सरदार व हजार - पंधराशे सैनिक मृत वा जखमी झाले. निजामाची फौज रणातून निघून गेल्यावर मराठी सैन्यातील पेंढाऱ्यांनी रात्र पडताच शत्रूच्या छावणीत प्रवेश करून हुल्लड माजवत काही तोफा व दारुगोळा लांबवला. इकडे रात्र पडल्यावर शिंद्यांनी आपला तोफखाना सुरु करून निजामाच्या सैन्याची बरीच दमछाक केली. या प्रसंगी स्वतः निजामाने दोनवेळा निरोप पाठवून तोफांचा मारा बंद करण्याची विनंती केली असे नानाने आपल्या पत्रात नमूद केले आहे. पुढे दुसऱ्या दिवशी, म्हणजेच दि. १२ मार्च १७९५ रोजी दोन्ही बाजूंनी प्रामुख्याने तोफांची लढाई झाली. तेव्हा ता. १३ मार्च रोजी निजामाने प्रातःकाळी भाऊकडे जासूद पाठवून युद्ध थांबवण्याची विनंती करून तहाची वाटाघाट सुरु केली. यानंतर उभयपक्षी युद्ध तहकूब होऊन सलुखाची जी चर्चा सुरु झाली ती ता. १० एप्रिल १७९५ रोजी शेवटास गेली. 

                   खर्ड्याच्या तहाविषयी अनेक इतिहासकारांनी आपापली मते आजवर मांडली आहेत. त्यामुळे याविषयी प्रस्तुत ठिकाणी अधिक काही लिहिणे अनावश्यक आहे असे नाही, परंतु प्रस्तुत विषयास धरून ते होणार नाही. या तहाच्या बनावाविषयी काही गोष्टींची चर्चा मात्र या ठिकाणी केली जाणार आहे. तहाच्या बोलाचाली सुरु झाल्या तेव्हा निजामाने पेशव्याच्या प्रत्यक्ष भेटीचा आग्रह धरला. पेशव्याची मुलाखत घेऊन त्यातल्या त्यात सौम्य अटींवर तहाचे प्रकरण निकाली काढण्याचा निजामाचा बेत होता. तर त्याचा फ्रेंच सरदार रेमंड यास मात्र तहापेक्षा युद्धाची अधिक खुमखुमी होती. त्याने निजामाकडे लढाईची परवानगी मागितली पण, निजामाने त्यास साफ नकार दिला आणि तहाचेच घोडे पुढे दामटले. यावेळी खर्ड्यावर गोळा झालेल्या मराठी सरदारांना निजामासोबत तह करण्यापेक्षा त्यांस साफ बुडवण्याची अधिक उत्कंठा होती. याविषयीचा उल्लेख खुद्द नाना फडणीसने बाबूराव आपट्यास लिहिलेल्या पत्रात आहे. परंतु असे असले तरी, नानाने सरदारांचे मानस बाजूला ठेवून वेगळीच वाट अवलंबली. निजामावर पूर्ण शह बसवण्याची हि संधी होती, अशा परिस्थितीत नानाने त्याच्याकडे पुढील प्रमुख मागण्या कळवल्या :- (१) मशीर यास दिवाण पदावरून दूर करणे. (२) चौथाई, सरदेशमुखीच्या बाकी बद्दल व सदर मोहिमेचा खर्च मिळून सुमारे ५ कोटी रुपये द्यावेत. (३) दौलताबादचा किल्ला दरबारास द्यावा. (४) भोसल्यांचे जे महाल निजामाने दाबले होते ते त्यांस परत देणे आणि त्यांच्या ऐवजाचा भरणा करणे.   हो, ना करत निजामाने या सर्व अटी मान्य केल्या. त्याचा दिवाण नानाहून अधिक धोरणी निघाला. तो स्वतःहून नानाच्या कैदेत जाण्यास तयार झाला. दौलताबादचा किल्ला व ३० लाखांचा मुलुख देण्याचे मान्य करण्यात आले आणि पाच कोट रुपयांपैकी ३० लाखांचा भरणा ताबडतोब करण्यात येऊन उर्वरीत रकमेच्या बंदोबस्तासाठी ३ वर्षांची मुदत मागितली. 

                      महत्त्वाची गोष्ट म्हणजे तहाची हि वाटाघाट नानाने एकप्रकारे स्वबळावर व स्वस्वार्थावर नजर ठेवून केली. या तहात मराठी राज्याचे आणि पेशव्याचे कसलेही हित पाहण्यात आले नाही. तसेच ज्या पेशव्याच्या नावे नाना राज्यकारभार करत होता त्यास या तहात बिलकुलही सहभाग घेता आला नाही. तो फक्त शिक्क्याचा धनी राहिला ! उदगीरला ज्याप्रमाणे निजामाने आपले सैन्य रक्षून स्वतःचा बचाव केला होता तद्वतचं त्याने खर्ड्यालाही केले ! निजामाच्या सैन्याचा कणाटा मोडला असता तर निजाम एक संस्थानिक बनून राहिला असता किंवा नसताही !  समस्त मराठी सरदारांनाही निजामाचा हा काटा मुळापासून उखडून काढायचा होता हे नानाच्याच पत्रावरून स्पष्ट होते. मग असे असताना नानाने आपल्या सरदारांना सबुरीचे धोरण घेण्यास का भाग पाडले असावे ? या गूढाची उकल होणे अत्यावश्यक आहे.  

                   असो, स. माधवरावाने प्रत्यक्ष भाग घेतलेली हि पहिली आणि अखेरचीच स्वारी आहे. या मोहिमेत त्यास अभूतपूर्व असे म्हणता येत नसले तरी बऱ्यापैकी यश मिळाले असेच म्हणावे लागेल. निजामाचा दिवाण आपणहून मराठी शिबिरात दाखल झाल्याने कागदोपत्री तह होण्यास फार वेळ लागला नाही आणि विजयी सैन्य व शाही कैद्यासह सवाई माधवराव ता. १ मे १७९५ रोजी पुण्यास दाखल झाला. बाकी, खर्ड्याच्या युद्धात पुणे दरबारला फक्त ३० लाख रुपये आणि मशीरला काही काळ कैदी म्हणून पोसणे एवढेचं प्राप्त झाले. याउपर खर्ड्याच्या उठाठेवीचा मराठी राज्याला वा पुणे दरबारास कसलाही फायदा झाला नाही. 
                                                                          ( क्रमशः )            

   

    

                      

                            

बुधवार, २५ डिसेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ७ )

 
                 मागील भागात आपण नाना - महादजी यांच्या वादाची पार्श्वभूमी थोडक्यात पाहिली. वस्तुतः नाना - महादजीच्या अखेरच्या शीतयुद्धाचा तो पहिला अंक होता. याच्या दुसऱ्या अंकात नाना - महादजी यांचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष दरबारी सामना जुंपला. मात्र या वादात होळकरांचा काहीसा निष्कारण बळी गेला. स. १७८० मध्ये महादजीने जे माळव्यात प्रयाण केले, त्यानंतर तो स. १७९२ मध्येच पुण्यास आला. मात्र, तुकोजी होळकर काही ना काही निमित्ताने स. १७८७ पर्यंत पुणे दरबारशी संबंधित होता. याच काळात व यानंतरही काही वर्षे तुकोजी आणि अहिल्याबाईचा राज्यकारभारावरील हक्काच्या मुद्द्यावरून कागदोपत्री तंटा जुंपला होता. या तंट्यात आरंभी नाना कधी तुकोजी तर कधी अहिल्याबाईची बाजू घ्यायचा, पण नंतर महादजीचे वर्चस्व वाढत चालल्याचे ध्यानी येताच त्याने तुकोजीचा पक्ष स्वीकारला. होळकरांच्या घरगुती भांडणात पुणे दरबारच्या सांगण्यावरून आणि पूर्वापार स्नेहसंबंध लक्षात घेऊन महादजीने भाग घेतला आणि अहिल्याबाईचा पक्ष घेतला. तुकोजी व महादजीच्या चुरशीचे हे प्रमुख कारण होय !

       नानाला याची कल्पना असल्याने त्याने शिंदे - होळकरांच्या वादात तुकोजीचा पक्ष घेतला. परिणामी स. १७८७ मध्ये लालसोट प्रकरणी महादजीच्या मदतीस रवाना केलेले तुकोजी होळकर व समशेरबहाद्दरपुत्र अलीबहाद्दर हे मुद्दाम उशीरा उत्तरेत गेले. आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी महादजीच्या विरोधात राजकारण चालवले. त्याच्या विरोधात राजपुतांना भर देण्याचे कार्य त्यांनी केले. महादजीने स्वबळावर शत्रूचा पराभव केला खरा, पण यामुळे शिंदे - होळकरांतील दरी आणखीन रुंदावली. उत्तरेतील राजकारण आपल्या सरदारांवर व होळकरांवर सोपवून महादजी पुण्यास आला. बादशाही फर्मानांचा स्वीकार झाल्यावर त्याचे व नानाचे दरबारी भांडण सुरु झाले. त्यावेळी नानाने तुकोजीला शिंद्यांच्या उत्तरेतील सरदारांचा समाचार घेण्याची भर दिली. अर्थात, नाना व होळकर अशी काही चाल करणार याची महादजीला आगाऊ अटकळ होतीच. नानाची फूस मिळाल्याने होळकरांचे उत्तरेतील वर्तन चढेलपणाचे बनले. तेव्हा महादजीच्या परवानगीने शिंद्यांच्या सरदारांनी आक्रमणाचा बेत आखला. ता. ८ ऑक्टोबर १७९२ रोजी सवाई माधोपुर जवळ बनास नदीच्या दक्षिणेस सुरवली येथे शिंद्यांचा विश्वासू सरदार गोपाळराव भाऊ याने तुकोजी होळकरवर हल्ला चढवला. लढाई निकराची झाली पण होळकरांना शेवटी पराभूत व्हावे लागले. याविषयी स. १७९३ च्या १३ जानेवारी रोजी यशवंत गंगाधर यांस लिहिलेल्या पत्रात तुकोजी लिहितो की, “ आम्ही आजपावेतो सरकारची आज्ञा उलघन केली नाही. त्याजकडून ( शिंदे ) दगा जाला असता, उतावली करू नये, आसी पत्रे येत गेली. त्यावरून तीन मास येथेच दम खाऊन चिरंजीव बापूंसही इकडे बोलावून घेतले.” यावरून स्पष्ट होते की, शिंद्याने प्रथम चाल करून होळकरांना दुखावले. अर्थात, हे प्रकरण एखाद - दुसऱ्या चकमकीने निकाली निघायचे नव्हते. या  पुण्यास पोहोचली त्यावेळी नाना - महादजीचा दरबारी वाद हळूहळू रंगात येऊ लागला होता. नानाने शिंद्यांकडे आजवर केलेल्या मोहिमांचा व मिळालेल्या जहागिरीचा हिशेब मागितला. तेव्हा शिंद्याने उलटे सरकारवरच सात कोटींचे कर्ज येणे दाखवले. यावरच न थांबता महादजीने, मोरोबा फडणीसला कैदेतून मुक्त करून त्याला पुन्हा कारभारात घेण्याची पेशव्याला विनंती केली. याशिवाय स्वराज्य व परराज्यातून ' दरबारखर्चासाठी ' जी रक्कम नाना फडणीसला मिळत होती, त्यातील निम्म्या भागावर मोरोबाचा अधिकार असल्याचे सांगत गेल्या १४ वर्षांतील जी काही संपत्ती नानाने दरबारखर्च म्हणून गोळा केली होती, त्यातील निम्मा वाटाही मोरोबाला मिळावा असाही महादजीने सूर आळवला. शिंद्यांच्या या जबरदस्तीच्या राजकारणाला तोड म्हणून नानाने होळकरांना आपले हात मोकळे सोडण्यास सांगितले. नाना - महादजीचा वाद अशा प्रकारे मराठी राज्याच्या नाशास कारणीभूत ठरत असताना धनी म्हणून आपले कार्य बजावण्याची वेळ स. माधवरावावर अशी आलीच नाही. या घटना त्याला माहिती होत्या कि नाही हे समजायला मार्ग नाही पण जोवर दोघांपैकी एकजण उघडपणे त्याच्याजवळ आपल्या न्याय्य बाजूची मांडणी करत नव्हता तोवर त्याने या बाबतीत सरळसरळ दुर्लक्षच केले. अर्थात, त्याने स्वतःहून लक्ष घातले असते तरी नाना वा महादजीने त्यास किती किंमत दिली असती हा भाग वेगळा !

          असो, नाना - महादजीच्या या शीतयुद्धादरम्यान उत्तरेत शिंदे - होळकरांच्या फौजा शत्रूच्या नरडीचा घोट घेण्याऐवजी परस्परांचे गळे घोटण्यास सज्ज झाल्या होत्या. याच सुमारास म्हणजे स. १७९३ च्या जानेवारी महिन्यात स. माधवरावाची पत्नी -- रमाबाईचे निधन झाले. तेव्हा ता. ३ मार्च १७९३ रोजी पेशव्याचा विजयदुर्ग येथील गोखल्यांच्या कन्येशी --- यशोदाबाईसोबत द्वितीय विवाह संपन्न झाला. याच सुमारास पुणे दरबारच्या चौथाईच्या वरवंट्याखालून स्वतःची सुटका करून घेण्याचा निजामाने उपक्रम चालवला होता. त्यासाठी त्याचे वकील महादजीच्या गोटात दाखल झाले होते. निजामाचे वकील शिंद्याकडे आल्याने नानास दहशत बसली. त्याने या ना त्या निमित्ताने पुणे दरबारच्या पटवर्धन प्रभूती सरदारांना मुद्दाम पुण्यातच अडकवून ठेवले. महादजीला याची जाणीव होती पण त्याचीही बरीच कुचंबणा झाली होती. गेल्या दहा - बारा वर्षात पार पाडलेल्या मोहिमा व पदरी बाळगलेल्या फौजांचा खर्च त्याच्या डोक्यावर कर्जरूपाने वावरत होता. त्याचा निकाल लावायचे सोडून नानाने उलट त्याच्याकडेच मागील हिशेबाची थकबाकी मागितल्याने त्याने नानाच्या नाकात काड्या घालण्यास आरंभ केला. त्यातच उत्तरेत होळकरास आपल्या विरोधात नाना चिथावणी देत असल्याची त्याची जी भावना होती, ती अनाठायी नसल्याचे त्यास पुणे मुक्कामात आढळून आले. त्यामुळे तो आणखीनच बिथरून गेला. परिणामी त्याची व निजामाची घसट अधिक वाढून तो आणि निजाम मिळून नानाला कारभारातून काढून टाकणार अशा अफवा उठू लागल्या. अर्थात, हा सर्व बनाव किंवा अफवा ऑक्टोबर १७९२ मध्येच उठल्या असल्या तरी त्यात तथ्यांश कितपत होता हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. नानाच्या ऐवजी प्रमुख कारभारीपद आपल्या हाती यावं अशी महादजीची मुख्य इच्छा होती. ती ओळखून नानाने आपणहून राज्यकारभार सोडून काशीयात्रेस जाण्याची तयारी आरंभली. अर्थात हा सर्व वरवरचा देखावा होता. परंतु या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणजे, दरबारी मुत्सद्दी नाना - महादजीमध्ये समझौता घडवून आणण्याचा प्रयत्न करू लागले. दरम्यान पेशव्याचा लग्न समारंभ उरकला गेला. पेशव्याच्या लग्नाला हजर राहण्याचे निमित्त करून निजाम ससैन्य बेदरला येऊन ठेपला. मधल्या काळात पेशव्याचे लग्न होऊनही गेले तेव्हा आपल्या समाधानास्तव पेशव्यांनी आपल्या उपस्थितीत तृतीय विवाह करावा अशी निजामाने बतावणी सुरु केली. याचा योग्य तो अर्थ घेऊन पुणे दरबारने कागदावर तरी युद्धाची तयारी चालवली. ( स. १७९३, एप्रिल )

     याच सुमारास म्हणजे, स. १७९३ च्या १३ मार्च रोजी रंगपंचमीचा मोठा समारंभ महादजी शिंद्याने घडवून आणला. वरकरणी तरी नाना या समारंभात हजर असला तरी त्याचे सर्व लक्ष यावेळी उत्तरेत लागून राहिले होते. तुकोजीने एकदा महादजीच्या सैन्याचा मोड केला म्हणजे आपली सुटका होईल अशी त्याची भावना होती. इकडे महादजीला नानाचे कारभारीपद आपल्या हाती घेण्याची मोठी उत्सुकता लागली होतीच. त्याने नानाला अडचणीत आणण्यासाठी मोरोबा, बाजीराव इ. प्रकरणे दरबारात काढण्यास सुरवात केली. रघुनाथरावाच्या मुलांना कैदेत किती काळ ठेवणार ?  राजघराण्यातील आहेत. आपल्या कर्माची फळे भोगत दादा परलोकवासी झाला पण त्याच्या मुलांना अजून नजर कैदेत ठेवण्याचे कारण काय ? असे नानाविध प्रश्न उपस्थित करत बाजीरावास कारभारात प्रवेश मिळावा अशी भूमिका महादजीने घेतली. गायकवाडांच्या दौलतीवर फत्तेसिंग मरण पावल्यामुळे गोविंदराव आणि मानाजी यांनी आपापला हक्क दर्शविला होता. महादजीने त्या वादात देखील हस्तक्षेप केला. यामुळे नानाची दरबारी कामकाजात कोंडी होऊ लागली. त्यातचं सचिव प्रकरणाची भर पडल्याने नानाची पुरती नाचक्की  होण्याची वेळ आली. 

          रघुनाथ चिमणाजी सचिव ता. ११ एप्रिल १७९१ रोजी वारला. पश्चात सचिवपद त्याचा मुलगा शंकराजी उर्फ अत्यापंत यांस मिळाले. शंकराजीला तीन बायका असून पैकी प्रथम पत्नी हि सखारामबापूची कन्या होती. सचिवाचे प्रकरण महादजीने उचलून धरण्यामागील हे प्रमुख कारण आहे. शंकराजीस सचिवपद मिळाले आणि पेशवे सरकारातून बाजीराव मोरेश्वर यास त्याची दिवाणगिरी प्राप्त झाली. या बाजीरावाचे शंकराजी सचिवाच्या सावत्र मातेशी जरुरीपेक्षा अधिकचं जवळचे संबंध प्रस्थापित झाले. सचिवास हे समजताच त्याने मातेच्या केशवपनाचा आग्रह धरला आणि जबरदस्तीने तिचे वपन करण्यात आले. हि घटना घडल्यावर किंवा तत्पूर्वी सचिवाने आपल्याला बाजीरावाच्या ऐवजी दुसरा कारभारी नेमून द्यावा अशी नानाकडे मागणी केली. मात्र, नानाने त्यास नकार दिला. हि गोष्ट बाजीरावास समजताच त्याने उघडपणे सचिवाविरोधात कारवाया सुरु केल्या आणि नानास कळवले की, सचिव वेडसर आहे. महादजी शिंद्याच्या कारकुनाचे ' मराठी रियासत खंड - ७ '  मध्ये छापलेले या संदर्भातील पत्र महत्त्वाचे आहे. त्यानुसार असे दिसून येते कि, सचिवाच्या बापाचे व नानाचे पूर्वीपासूनचं वाकडे होते. अर्थात, नानाच्या मनात पूर्वीची अढी कायम नव्हतीच असे ठासून सांगणे त्यामुळे अवघड आहे. असो, बाजीरावाची कड नाना घेतो हे पाहून सचिवाने घर सोडले व तो सहपरिवार जेजुरीस जाऊन राहिला. तेव्हा बाजी मोरेश्वराने नानास विपरीत समजावून सचिवाच्या बंदोबस्ताची परवानगी मिळवून जेजुरीस गारदी पाठवले. त्यावेळी झालेल्या झटापटीत सचिवाची काही माणसे मारली गेली. खुद्द सचिवास काही किरकोळ जखमा झाल्या तर सखारामबापूच्या मुलीच्या बोटावर वार झाला. सचिवाचे सर्व वित्त लुटून घेण्यात आले. घडला प्रकार महादजीला समजताच त्याने पेशव्यास याची कल्पना दिली आणि पेशव्याची माणसे सचिवाकडे जाण्यापूर्वीच आपली माणसे पाठवून त्याने सचिवास स्वतःच्या गोटात आणले. घडल्या घटनेची महादजीने भर दरबारात चौकशी आरंभून नाना फडणीस हा कारभार करण्यास कसा अयोग्य आहे, हे पेशव्याच्या व इतरांच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न केला. कारण ; सातार दरबारातील छत्रपतींसह सर्वांचे वजन व तेज मावळले असले तरी लौकिकात सचिव हा पेशव्याहून वरिष्ठ दर्जाचा अधिकारी होता. त्यामुळे या प्रकरणात नानाची चांगलीच कोंडी झाली होती. नानाचा सहाय्यक हरिपंत फडके याने सदरहु प्रकरण वर्दळीस येण्यापूर्वीच बाजी मोरेश्वरास सचिवाच्या विनंतीनुसार कारभारातून काढण्याची सूचना केली होती. परंतु, नानाने हरिपंतास धुडकावून लावले होते. भर दरबारात या सर्व घटना उघडकीस येऊ लागल्या तेव्हा नानाची बरीच तारांबळ उडाली. अखेर स. माधवरावाने नानाची बाजू कशीबशी सावरून सचिव प्रकरणातील अपराध्यांना शिक्षा ठोठावल्या. घडल्या प्रकाराने नाना - महादजीचे वैर चव्हाट्यावर आले. सचिवाचे प्रकरण जसे तसे उलगडले आणि एकदा संधी साधून महादजीने पेशव्याकडे नानाच्या ऐवजी आपणास कारभारीपद देण्याची विनंती केली. यावेळी पेशव्याने त्याची समजूत काढून त्या दोघांच्या एकीतचं राज्याचे हित असल्याचे त्यांस सांगितले. इकडे हरिपंत प्रभूती मुत्सद्दी देखील नाना - महादजीच्या दरम्यान सौरस्य व्हावे यासाठी झटत होतेच !

                      मात्र, आधी सांगितल्यानुसार नानाने होळकरांना शिंद्यांची खोड मोडण्याची सूचना केलेली होती. महादजीला याची कल्पना होतीच. त्यामुळे उभयताही उत्तरेत काय होते याची वाट बघू लागले. याविषयी मराठी रियासत खंड - ७ मध्ये छापलेले कोटेकर पंडित दप्तरातील दि. १५ मे १७९३ चे पत्र विशेष महत्त्वाचे असल्याने ते येथे देत आहे. 
         " कारभाऱ्यांची [ नाना फडणीस ] व बावांची [ महादजी शिंदे ] कुन्हा परस्परे वाढत चालली. तूर्तच बखेडा माजावयाच्या रंगास गोष्ट आली. इतक्यांत हरिपंतांनी पांच चार वेळां येऊन स्वच्छतेची बोलणी घातली. पुन्हा ते व नाना उभयतां येऊन खुशामतीच्या गोष्टी सांगोन समाधान केले. परंतु उभय पक्षीं खातरजमा नाहीं. दोघेही आपले जागां सावध आहेत. होळकराकडील मसलतीचा फडशा जाला म्हणजे बलाबल पाहून सल्ला करणे ती करतील. जर स्वच्छतेवर आले तर उत्तम जाले, नाहीं तर बखेडा आहे. होळकराची सरशी जाली तर हे सर्व टाकोन उठोन बऱ्हाणपुरचे रोखे जातील. आपली सरशी जाली तर हे कंपू सुद्धां झाडून फौजा बऱ्हाणपुरचे सुमारे बोलावतील. नंतर कारभाऱ्यांशी काय बोलणे तें बोलतील. होळकराची सरशी जाली म्हणजे अलीबहादरांस व जागजागां रजवाडे यांस लिहून दंगा माजवावा, आणि इकडे मोगल, भोसले, इंग्रज सुद्धां आणून जमाव पाडवा असें कारभारी यांचे मानस आहे. पाटीलबावांस इकडे गोंवून तिकडील फौज तिकडे गोंववावी, असा सगळा जाबसाल होळकराचे लढाईवर येऊन ठेपला आहे. होळकराचा पराभव जाल्यावर कारभारी यांस जड पडेल. श्रीहरीची इच्छा असेल तसे घडेल."  

         या पत्रावरून रावबाजीच्या कुप्रसिद्ध वसईच्या तहाच्या आधीच मराठी राज्य विनाशाकडे वाटचाल करू लागल्याचे दिसून येते.          

                                                                           ( क्रमशः )