मंगळवार, १७ मार्च, २०१५

इतिहास लेखनाविषयी चार शब्द ....! ( भाग – २ )






    प्रश्न अनेक आहेत पण उत्तरं नाहीत. किंबहुना उत्तरे आहेत पण सांगण्याची तयारी नाही असेच साधारण चित्र आहे. उदाहरणार्थ, पेशवाईच्या इतिहासात ज्याप्रमाणे खलपुरुषांची चित्रं रंगवलेली आहेत तद्वत खलनायिकाही त्यात आहेत. त्यांपैकी एक म्हणजे आनंदीबाई ! नानासाहेब पेशव्याच्या मृत्यूपर्यंत आनंदीबाईचा राजकारणात प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सक्रीय सहभाग नाही. तिचं नाव राजकारणी कागदांत येतं तेच मुळी नारायणरावाच्या खून प्रकरणात ! त्यानंतर बारभाई मंडळ व दादाच्या लढाया, इंग्रजांचा मराठी राज्यात प्रवेश या सर्व वावटळीत आनंदीबाईही सक्रीय सहभाग घेते. एकीकडे पुणेकरांचा उच्छेद करत असताना दुसरीकडे, घरच्या भांडणामुळे ‘ ब्राम्हणी दौलतीत ‘ इंग्रजांचा प्रवेश होत असल्याचा ती दावाही करते. आता आनंदीबाईने ‘ ब्राम्हणी दौलत ‘म्हणून ज्याचा उल्लेख केला ती पेशवाईची दौलत. पेशव्यांचे राज्य. परंतु असे मत मांडण्याचा अवकाश कि, विरोधक लगेच चवताळून येतात. केवळ आनंदीबाई म्हणते म्हणून पेशव्यांचे राज्य ब्राम्हणी दौलत बनत नाही असे म्हणतात. मला एक समजत नाही, नारायणरावाच्या खुनाच्या व त्यानंतरच्या भानगडींत तिचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे म्हणत तिच्या राजकीय कारस्थानी बुद्धीची तारीफ करायची व तिच्याच पत्रातील फक्त एक शब्द, तो अमान्य करायचा हि कोणती नीती ?

    वास्तविक, पेशव्याच्या राज्याला उद्देशून आनंदीबाईने ‘ ब्राम्हणी दौलत ‘ हा योजलेला शब्द अगदी योग्य आणि बरोबर आहे. कारण, थो. शाहूच्या कारकिर्दीतील उत्तरार्धात मराठी राज्य वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विघटीत होत गेले होते. उदाहरणार्थ :- नागपुरकर भोसले, गुजरातचे प्रथम दाभाडे आणि नंतर गायकवाड, कोकणात आंग्रे इ. फार लांब कशाला. खुद्द पेशव्याचेच सरदार शिंदे – होळकरांचे उदाहरण देखील याच मासल्याचे आहे. उत्तर हिंदुस्थानची जबाबदारी या दोघांच्या  शिरावर असून पेशव्याच्या अनुपस्थितीत वा त्याच्या वतीने परदरबारांशी तह – युद्ध करण्याचा अधिकार पेशव्याने त्यांना दिला होता. याबाबतीत पेशव्याची मुतालकी शिंद्याकडे होती. मात्र यांमुळे होळकरास वैषम्य वाटू नये म्हणून शिंदे – होळकरांनी आपसांत विचार विनिमय करून अशी तोड काढली असावी कि, स्वारी व मुक्कामात निशाणाच्या उजीकडे राहण्याचा मान होळकरांचा तर डाव्या बाजूचा शिंद्यांचा ! खेरीज, शिंदे – होळकरांना स्वतंत्रपणे तह – युद्ध कारणाचेही अधिकार होते. त्याशिवाय तत्कालीन पत्रांमधून यांचा उल्लेख ‘ श्रीमंत ‘, ‘ राव ‘, ‘ महाराज ‘ इ. विशेषणांनी केल्याचे दिसून येते. ( प्रस्तुत मुद्दा ‘ शिंदेशाही इतिहासाची साधने ‘ चे संपादक आनंदराव फाळके यांनी मांडला आहे. ) या संदर्भातील महत्त्वाचे आणि अपरिचित उदाहरण म्हणजे वसईच्या तहावरील दौलतराव शिंद्याचा आक्षेप ! सालबाईचा तह शिंद्याच्या मध्यस्थीने झालेला असल्याने वसईचा तह करताना इंग्रज आणि पेशव्याने त्यांस साधी विचारणाही न केल्याने त्यांस हा आपला अपमान वाटला व त्याने या संदर्भात आपला निषेध इंग्रजांकडे नोंदवला. अर्थात, इंग्रजांनी त्याचा आक्षेप फेटाळून लावला खरा, पण यातून इतिहास अभ्यासकांनी योग्य तो बोध घ्यावा.

    या सर्व उदाहरणांचा अर्थ असा कि, आजही आम्ही इतिहासकार मंडळी व संशोधक तत्कालीन मराठी राज्याचे स्वरूप, परस्परसंबंध समजावून घेण्यात साफ अपयशी ठरलो आहोत. आम्ही आमच्या मनातील भावनांना संक्ल्पनांचे स्वरूप देऊन तत्कालीन संबंधांवर शिक्कामोर्तब करत कोणाला श्रेष्ठ मुत्सद्दी – योद्धा तर कोणाला स्वार्थी – राज्यद्रोही म्हणण्यात धन्यता मानली. या दोषापासून प्रस्तुत लेखकही मुक्त नाही ! आमचा आंधळेपणा इतका वाढला, आमच्या बुद्धीला इतके मांद्य आले कि, क्वचित खरे बोलणाऱ्या इंग्रजांनी तत्कालीन मराठी साम्रज्याचे वर्णन करताना योजलेल्या ‘ Maratha Confederacy ‘ म्हणजेच ‘ मराठा राज्यांचा संघ ‘ शब्दाचा अर्थही उमगला नाही. काय म्हणावे या दळभद्रीपणास ?

    सातारकर – कोल्हापूरकर छत्रपती, सातारकर छत्रपती – पेशव्याचे नाते, पेशवा – कोल्हापूरकर, पेशवा आणि राजमंडळातील सरदार, पेशवा व त्याचे सरदार, पेशव्याच्या सरदारांची पेशवे दरबारप्रती असलेली निष्ठा व स्वसंस्थानांची आसक्ती इ. गोष्टी आम्ही आजही पुरेपूर समजावून घेतलेल्या नाहीत. उदाहरणार्थ :- वारणेच्या तहाने कोल्हापूरचा संभाजी हा तांत्रिकदृष्ट्या शाहूचा मांडलिक झाला. पुढे शाहूच्या पश्चात सातारकर छत्रपती पेशव्याच्या छत्रछायेत आल्याने स्वाभाविक काही बाबतीत करवीरकरही पेशव्याचे अंकित बनले. यांमुळे कोल्हापूरकर संभाजीच्या निधनानंतरचा वारसा प्रश्न काही प्रमाणात चिघळला. या व अशा कित्येक बाबींसाठी शाहूने नानासाहेब पेशव्याला दिलेल्या सनदांचा पुनर्विचार होणे, नव्याने अन्वयार्थ लावणे अत्यावश्यक ठरते. 
       
    इथवरच्या विवेचनावरून इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता का व कशी भासते याचा काहीसा उलगडा होतो पण इतिहासाचे पुनर्लेखन नेमकं कसं करायचं हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. आजवर जे काही इतिहासलेखन झालं आहे त्याचा आपण संक्षिप्तपणे आढवा घेतला आहे. आजवरच्या इतिहासलेखनाने आपली हानीही झाली आहे व फायदाही ! 

    आपल्या पूर्वजांच्या प्रसिद्ध / अप्रसिद्ध पराक्रमांच्या वर्णनांनी आपण भारावून जातो. इंग्लिश मनुष्य ज्याप्रमाणे ‘कधी काळी आमच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता ‘ असे प्रौढीने सांगतो – समजतो त्याचप्रमाणे, एके काळी आम्हीही ज्ञात – अज्ञात टापू – प्रदेशांत आपल्या समशेरीनं व रक्ताने इतिहास घडवला आहे. रंगवला आहे. याची जाणीव मनाला सुखद स्पर्शाचा व अभिमानाचा आनंद प्राप्त करून देते. परंतु त्याचबरोबर विकृत, एकांगी इतिहासलेखनाने कित्येकांची चरित्रे काळवंडली गेली. खऱ्या – खोट्याचा विधिनिषेध न बाळगल्याने कित्येकांवर मरणोत्तर अन्याय घडले. अन्यायी, अनिष्ट प्रथांना जन्म दिला गेला तर कित्येक प्रथा – परंपरा, घटना योग्य ती दखल न घेतल्याने लुप्त झाल्या. आजवरच्या इतिहासलेखनाची किंमत हि ना नफा, ना तोटा अशीच आहे !

    इतिहास लेखनाचा एक दंडक असा आहे कि, उपलब्ध माहितीचा पुरेपूर वापर करत तटस्थवृत्तीने, निर्लेप मनाने इतिहास लेखन करावे. यांतील दोन्ही मार्गांचे – नियमांचे पालन फारच कमी इतिहासकारांनी केलेलं आहे. तसेच जसजशी नवीन संदर्भ साधने उजेडांत येतील --- ज्यामुळे आधीच्या सिद्धांतांना धक्का बसत असेल वा त्यांना चुकीचा ठरवत असेल तर त्यांचा स्वीकार करून जुन्या सिद्धांतांची नव्याने पुनर्मांडणी करणे अत्यावश्यक असते. परंतु हा विवेक सर्वचजण पाळतात असे नाही.

    इतिहास लेखन नेमके कसे असावे ? विशिष्ट हेतूंनी वा गटांना अनुकूल म्हणजेच लोकानुरंजन करणारे इतिहास लेखन असावे असा एक मतप्रवाह आहे. त्याचप्रमाणे इतिहासाची मांडणी अशी असावी कि ज्यातून चालू व भावी पिढीला मार्गदर्शन – बोध घेता यावा. प्रेरणा घेता यावी. मागील पिढीत घडलेल्या चुकांची जाणीव होऊन वर्तमान व भविष्यात ती चूक टाळण्याची वृत्ती निर्माण व्हावी अशीही एक अपेक्षा असते. उपरोक्त दोन मतप्रवाहांचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे सावरकर लिखित ‘ १८५७ चे स्वातंत्र्य समर ‘ हा ग्रंथ होय. सावरकरांनी मनाशी विशिष्ट हेतू बाळगत या ग्रंथाचे लेखन केले. या ग्रंथाच्या वाचनाने – अभ्यासाने एका पिढीचे मत बनले पण जेव्हा सावरकरी विचारांचे अनुयायी प्रा. शेषराव मोरे लिखित ‘ १८५७ चा जिहाद ‘ हा ग्रंथ प्रकाशित झाला तेव्हा सावरकरांच्या इतिहासावर – विचारांवर पोसलेल्या एका पिढीच्या समजुतींना भयंकर हादरा बसला. सावरकरांनी स. १८५७ च्या बंडाकडे हिंदू – मुस्लिमांचे इंग्रज राजवटी – पारतंत्र्याविरूद्धचा स्वातंत्र्यलढा म्हणून पाहिले. एकतेचे प्रतीक म्हणून पाहिले तर सावरकरांची हि मतं वस्तुस्थिती व उपलब्ध पुराव्यांशी विसंगत असल्याचे मोऱ्यांनी साधार सिद्ध केले. यातून काय बोध घ्यायचा ?     
    अशा प्रकारच्या इतिहासलेखनाचा धोका लक्षात घेता तटस्थ व निःपक्षपाती इतिहासलेखनाची महती व आवश्यकता आपणांस पटते. वास्तविक इतिहासलेखन हे तटस्थवृत्तीने, निःपक्षपातीपणेच करावे असा दंडक असला तरी त्याचे १००% पालन करणे हे कोणत्याही इतिहासकारास शक्य नाही. हि महत्त्वाची उणीव – दोष जरी लक्षात घेतला तरी किमान ८० ते ९०% तरी इतिहासकाराने तटस्थपणे लेखन करण्याची अपेक्षा बाळगणे गैर ठरणार नाही. असे लेखन आपल्याकडे यापूर्वी झाले नाही वा अशी परंपरा आपल्याकडे नाही अशातलाही भाग नाही. उदाहरणार्थ, पेशवाईतील युद्ध – मोहिमांविषयीची पत्रे अभ्यासली असता मराठी सत्ताधीशांखेरीज इतर संस्थानिकांच्या पत्रांत कित्येकदा वस्तुस्थितीचा विपर्यास वा अतिरंजितपणा असल्याचे दिसून येते तर त्याउलट मराठी पत्रांत समतोल दृष्टीने – वृत्तीने लेखन केले आहे. उदाहरणार्थ, भाऊची कैफियत व बखर. यांमध्ये उभयपक्षांच्या बलाबलाचा, चुकांचा जवळपास जसाच्या तसा वृत्तांत दिला आहे. याचाच अर्थ असा कि, तटस्थ वृत्तीने लेखन करण्याची आपली परंपरा बरीच जुनी आहे. मग जे तेव्हा शक्य झाले, साध्य झाले ते आत्ताच्या पिढीला का असाध्य व्हावे ?  

इतिहास लेखनास आवश्यक गोष्टी :- इतिहासकाराला विविध भाषांचे, लिप्यांचे ज्ञान असायला पाहिजे अशी एक समजूत आहे. अर्थात, इतिहासकारास या गोष्टींचे ज्ञान असले पाहिजे याविषयी दुमत नाही परंतु, असायलाच पाहिजे याविषयी मात्र माझा आक्षेप आहे. कारण, विविध भाषा – लिप्यांचे ज्ञान असूनही त्या व्यक्तीला उपलब्ध झालेल्या माहितीचे सुसंबंद्ध, तर्कशुद्ध व निरपेक्ष इतिहासलेखनात रुपांतर करता येईलच असे नाही. या विषयीची कित्येक उदाहरणे देता येतील. तात्पर्य काय कि, उपलब्ध माहितीचा योग्य तो --- संबंधित पुराव्यांच्या आधारे --- तर्कशुद्ध व निःपक्षपातीपणे अर्थ लावणे, त्याची मांडणी करणे हेच इतिहासकाराचे प्रमुख वैशिष्ट्य मानले पाहिजे. 

    आज या घडीला किती जणांना मोडी लिपी येते ? बरे, निव्वळ मोडीचे ज्ञान असून भागत नाही. फारसी भाषा व लिपीही अवगत असायला हवी. त्याखेरीज इंग्रजी, पोतुगीज, डच, फ्रेंच, अरबी इ. भाषाही आल्या पाहिजेत. खेरीज, देशी प्रचलित भाषांची मूळ रुपेही अवगत हवीत. सारांश, एवढ्या समग्र भाषा व लिप्या शिकलेल्या माणसानेच इतिहासलेखन करावे मगच आम्ही ते प्रमाण मानू अशी हट्टी व आग्रही भूमिका धरणे योग्य ठरेल का ?

    गेल्या शतकातील कित्येक इतिहास संशोधकांनी काळाची पावलं व आपापल्या मर्यादा ओळखून या प्रश्नाचे उतर शोधले होते. प्रत्येकाने स्वतःला ज्ञात असलेल्या भाषेतील – लिपीतील कागदपत्रांचे भाषांतर – लिप्यंतर करून व शक्य तिथे संदर्भ, तळटीपा व संपादकीय लेख लिहून भावी इतिहासकारांना मार्गदर्शक व उपयुक्त ठरतील अशा संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन केले. त्यामागील हेतूंचा विसर आपणांस इतक्यातच का पडावा ? काळाच्या ओघात, जगरहाटीत कोण एका व्यक्तीला विविध भाषा – लिप्या शिकून व मिळवलेल्या माहितीचा योग्य तो अन्वयार्थ लावून इतिहासलेखन करणे सहजासहजी शक्य होणार नाही याची त्यांना जाणीव होती. खुद्द त्यांच्या काळी तरी इतिहासलेखकांची अर्थप्राप्ती अशी कितीशी होती ? घरच्या जबाबदाऱ्या, इतिहास लेखनासाठी आवश्यक ती सामग्री जमवणे, माहितीचे लेखनात रुपांतर करून मग पुस्तक निर्मिती, प्रकाशन, वितरण इ. आर्थिक बाबी पेलणे तेव्हाही आवाक्याबाहेरचे होते व आजही !

    यातूनच टीमवर्कची अघोषित कल्पना उदयास आली. राजवाडे, सरदेसाई, खरे, पुरंदरे प्रभूतींनी त्यासाठीच विविध ठिकाणची दप्तरे धुंडाळून निवडक कागदपत्रे प्रकाशित केली. यामागील त्यांचा उद्देश, हेतू स्पष्ट होते. या इतिहाससंशोधकांनी व त्यांच्या नंतरच्या काळातील व्यक्तींनी अथक प्रयत्न केले तरीही अजून लक्षावधी कागदपत्रे संशोधकांच्या हस्तस्पर्शाची वाट बघत आहेत. त्यात अजूनही आपला अव्यक्त असा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व आर्थिक इतिहास दडलेला आहे. आपल्या पूर्वसुरींप्रमाणेच इतिहास संशोधकांनी या कागदपत्रांचे संशोधन केले आणि इतिहासप्रेमी संघटना तसेच सरकारने या संशोधकांना योग्य ते आर्थिक बळ पुरवले तर हि कागदपत्रे नष्ट होण्यापूर्वीच त्यातील अमुल्य माहितीचा खजिना इतिहास वाचकांना, अभ्यासकांना व भावी इतिहासलेखकांस उपलब्ध होईल ! अन्यथा उपलब्ध तुटपुंज्या सामग्रीवरील इतिहासाचे केलेलं पुनर्लेखन हा काळाचा, वेळेचा, पैशांचा व इतिहास अभ्यासक - वाचकांच्या बुद्धीचा अपव्यय ठरेलचं पण त्यातून इतिहासाचं वाढत जाणारं विकृतीकरणही थांबवता येणार नाही !
                                                                     ( समाप्त )  

शनिवार, १४ मार्च, २०१५

इतिहास लेखनाविषयी चार शब्द ....! ( भाग – १ )




    
    इतिहासलेखन म्हणजे एकप्रकारे इतिहासाचे पुनर्लेखन असते. या पुनर्लेखनात नव्याने उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या - संदर्भ साधनांच्या आधारे ऐतिहासिक घटनांचा नव्याने अन्वयार्थ लावण्याची जबाबदारी इतिहासलेखकावर - इतिहासकरावर असते. परंतु दुर्दैवाने कित्येक इतिहासकार या जबाबदारीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृष्टीस पडते. यांमुळे इतिहासाच्या पुनर्लेखनाचे कार्य अव्याहतपणे सुरु असूनही एकाच पद्धतीचा इतिहास वाचकांच्या समोर मांडला जाऊन त्यांची एक विशिष्ट विचारसरणी बनून जाते. अर्थात, इतिहासकार हे विशिष्ट लोकमत तयार करतात असेही आपण म्हणू शकतो व याची कित्येक उदाहरणे देता येतील. त्याचप्रमाणे प्रस्थापित लोकमताला धक्का देणारे निष्कर्ष योग्य पुराव्यांसह वाचकांसमोर मांडण्याचेही कित्येक इतिहासकार टाळतात. यांपैकी कोणतीही पद्धती इतिहासलेखनाच्या दृष्टीने योग्य असूनही इतिहासशास्त्राच्या दृष्टीने अयोग्यच आहे.
  

    आपल्याकडे इतिहासलेखनाची अगदी प्राचीन परंपरा आहे. विविध दरबारी पंडितांनी आपापल्या राजाच्या स्तुतीपर रचलेली काव्यं, बखरी हे याचं उत्तम उदाहरण आहे. प्रतीक आहे. त्यावेळी शास्त्रशुद्ध लेखनाची --- इतिहासलेखन शास्त्राची माहिती नसल्याने, तोंडओळख नसल्याने जो आश्रय देतो, उदरनिर्वाहाची सोय करतो त्याचं गुणगान करणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. त्यामुळे या पद्धतीच्या लेखन परंपरेची वृद्धी होत जाऊन हिंदुस्थानावरील ब्रिटीश अंमलात तिचा ऱ्हास झाला. इंग्रजांच्या निकट सहवासाने आपल्याला इतिहासशास्त्राची खऱ्या अर्थाने ओळख झाली खरी परंतु, पूर्वीची जी पद्धती होती ती काही आपल्यातून लुप्त झाली नाही. यांमुळे आधुनिक इतिहासलेखनावर देखील एकांगी, विशिष्ट उद्दिष्ट / हेतू नजरेसमोर ठेवून केलेल्या लेखनाची छाप राहिली. अर्थात हे विधान सरसकट सर्वच इतिहासकारांच्या इतिहासलेखनास लागू नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. 


    जेव्हा शास्त्र म्हणून तुम्ही इतिहासाकडे पाहता त्यावेळी इतिहासलेखनात तुमच्याकडून काही विशिष्ट अपेक्षाही बाळगल्या जातात. त्यांपैकी एक महत्त्वाची अपेक्षा / आशा म्हणजे जे पुरावे तुमच्यासमोर येतात त्यांचा योग्य तो अन्वयार्थ लावून घटनांची मांडणी वा विश्लेषण करून वाचकांच्या समोर मांडणे. परंतु, आपल्यात इतिहासाकडे शास्त्र म्हणून पाहताना बव्हंशीवेळा या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलंय. हि वस्तुस्थिती असली तरी तिला शोकांतिका म्हणायचे कि नाही हा ज्याच्या त्याच्या विवेकबुद्धीचा प्रश्न आहे. 


    विज्ञान वा गणितात ज्याप्रमाणे प्रयोगाने प्रमेय वा सिद्धांत मांडण्याची, तपासून घेण्याची सोय आहे तशी इतिहासात नाही असे म्हटले जाते. परंतु, मग न्यायशास्त्र अथवा राज्यशास्त्राचे काय ? तिथे हि अडचण का उद्भवत नाही ? माझ्या मते, न्याय, राज्यशास्त्रात ज्याप्रमाणे व्यक्तिगत विकार बाजूला ठेवून, पूर्वग्रह बाजूला सारून लेखन केलं जाते, प्रमेय – सिद्धांतांची मांडणी केली जाते त्याप्रमाणे इतिहासलेखनात होत नाही. यामागील कारणपरंपरा काय असावी ? 


    सामान्यतः गणित वा विज्ञानातील सिद्धांतांशी लोकांचे भावनिक संबंध जुळलेले नसतात. या शास्त्रांशी त्यांचा व्यावहारिक संबंध येत असल्याने यांत भावनातिरेक वा भावनांवर आधारित लेखनास, सिद्धांतास स्थान नसते. त्याउलट सामाजिकशास्त्रांचे आहे. सामाजिकशास्त्रे थेट लोकजीवनालाच स्पर्शिली जात असल्याने त्यामध्ये व्यक्तीची भावनिक गुंतागुंत असणे स्वाभाविक आहे. परंतु या भावनिकतेची तीव्रता कितपत असावी ?    


    राज्यशास्त्राच्या मर्यादेत एखादी संकल्पना मांडताना लोकभावनेचा फारसा विचार केला जात नाही तितका न्यायशास्त्रात करावा लागतो. कारण, न्याय वा कायदेशास्त्र हे थेट मनुष्यजीवनाचे नियमन करत असल्याने त्यांस अनन्यसाधारण असे महत्त्व असणे स्वाभाविक आहे. परंतु, आपल्याकडे या बाबतीतील चित्र थोडसं वेगळं असल्याचे माझे मत आहे. आपण न्यायविषयक संकल्पनांच्या बाबतीत असंवेदनशील असून इतिहासातील संकल्पनांविषयी अधिक संवेदनशील आहोत. 


    ज्या शास्त्राचा आपल्या दैनंदिन व भविष्यकालीन जीवनाशी निकटचा संबंध आहे त्याच्याविषयीची उदासीनता व ज्या शास्त्रात केवळ गतकाळातील घटनांचा उल्लेख आहे त्याविषयीची कमालीची आत्मीयता हा आपल्या वर्तणुकीतला विरोधाभास तर नाही ना ? माझ्या मते आपण वर्तमानात जगतो, भविष्यातील स्वप्नं पाहतो आणि भूतकाळात रमतो. यांतील वर्तमान अपवाद केला तर भूत व भविष्यातच आपण अधिक रमणारे आहोत. समाजाच्या या विचारसरणीचा --- स्वभावाचा परिणाम स्वाभाविकच इतिहासकारावरही होतो. कारण, तो देखील या समाजाचा सदस्यच असतो. अर्थात, समाजाच्या विचारांचे त्याच्यावर बंधन नसले तरी प्रभाव मात्र असतो. अर्थात याची व्याप्ती कितपत असते वा असावी हाच खरा प्रश्न आहे. मुद्दा आहे.


    या संदर्भात आपण पेशवाईच्या इतिहासाचे उदाहरण घेऊ. अर्थात, प्रस्तुत लेखक याच इतिहासकालखंडाचा अभ्यासक असल्याने विषय स्पष्टीकरणासाठी याच कालखंडाचा उपयोग करणे आम्हांस सोईचे वाटते. असो, पेशवाईच्या इतिहासाला जरी बाळाजी विश्वनाथ भटापासून आरंभ होत असला तरी त्याचा ( पेशवाईच्या कालखंडासंदर्भात ) खरा जनक थोरला बाजीरावच मानला जातो आणि या वैभवशाली कालखंडाचा शेवट सवाई माधवरावाच्या निधनासोबत होतो अशी सामान्यतः एक समजूत आहे. या समजुतीशी या ठिकाणी आपणांस काही देणं – घेणं नाही. आपल्याला फक्त हेच बघायचं आहे कि, नव्याने मिळत जाणाऱ्या संदर्भ साधनांचा योग्य तो उपयोग करून घेण्यात आपले इतिहासकार कुठे व कसे कमी पडतात. 


    पेशवाईच्या इतिहासाविषयी आपल्या इतिहासकारांत आणि वाचकवर्गात अनेक भेद आहेत. त्यातील एक गट मराठा छत्रपतीचे प्रतिनिधित्व करतो तर दुसरा ब्राम्हणी पेशवाईचे. तिसरा या उभयतांचा हिंदुत्व रक्षणास्तव लढणारे वीर म्हणून गौरव करतो तर चौथा या दोन जातीं व्यतिरिक्त बहुजन समाजातील म्हणजे ब्राम्हण – मराठेतर जातीतील लोकांच्या पराक्रमगाथांचा गौरव करण्यात धन्यता मानतो. वाचकांना हि वर्गवारी जातीय स्वरुपाची वाटेल परंतु वस्तुस्थितीच तशी असल्याने आम्हांस हि मांडणी करावी लागत आहे याची कृपया नोंद घ्यावी. उपरोक्त गटांशिवाय जाती – धर्मापलीकडे पाहणारा आणि ऐतिहासिक पुरुषांच्या भव्य दिव्य पराक्रमांनी भारावलेलाही एक वर्ग आहे. ज्यांना आपापला प्रिय इतिहास नायक हा त्याच्या समकालीनांपेक्षाही थोर वाटतो.

सारांश, आपले इतिहासलेखन इतके विशिष्ट आणि विविध वर्गांत विभागले गेले आहे कि, त्यातून वाचकांना खऱ्या इतिहासाची तोंडओळख फार क्वचित होते.  


    आधी नमूद केल्याप्रमाणे आपल्याकडे ज्याप्रमाणे काव्यं, बखरी इ. साहित्यप्रकारातून तत्कालीन घटनांची नोंद केली जायची त्याचप्रमाणे मध्ययुगीन कालखंडातील आढळणारी तत्कलीन पत्रे, दरबारी नोंदी, रोजनिशा, शकावल्या यांचाही इतिहास लेखनात अंतर्भाव होतो. मध्ययुगीन कालखंडातील पत्रांमधून तत्कालीन राजकीय घटनांचे स्वरूप जसे कळून येते तसे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक स्वरूप अजूनही परिपूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. याशिवाय तत्कालीन कालखंडात होऊन गेलेल्या संतमंडळींच्या अभंग – श्लोकांमधूनही त्यावेळची सामाजिक परिस्थिती सुस्पष्ट होत नाही किंवा आम्हांला ती समजावून घेता आली नाही. 


    अशा स्थितीत जो काही आपल्यापुढे पूर्णतः राजकीय स्वरूपाचा इतिहास आहे त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे ? मध्ययुगीन कालखंडातील आर्थिक परिस्थिती --- ज्यात समाजातील खरेदी – विक्रीचे व्यवहार कोणत्या पद्धतीने प्रामुख्याने होते असत ? रोख पैशांच्या स्वरूपात व्यवहार होत असेल तर समाजातील प्रत्येक घटकाकडे कोणकोणत्या स्वरूपाचे चलन उपलब्ध असायचे ? सर्वत्र चाललेल्या युद्धांमुळे समाजजीवनाच्या आर्थिक अंगावर कसे परिणाम होत ? त्यातून काही नव्या आर्थिक व सामाजिक परंपरा निर्माण झाल्या अथवा जुन्या परंपरांचा लोप झाला कि त्यांची उत्क्रांती झाली ? इ. ; सामाजिक परिस्थिती --- हिंदुस्थानातील समाजजीवन हे विविध जातींत विभागलेलं आहे. या जातींच्या आपापसांतील संबंधांचे चित्र नेमके कसे होते ? खान – पान तसेच पेहराव, विविध चालीरीती या कशा होत्या ? जातींचे जे काळेकुट्ट चित्र आज रंगवलं जातंय ते खरोखर तितकं गडद काळं होतं का ? विविध जातींची व जाती नियमांची निर्मिती आणि लोप कसा झाला ? स्त्रियांचे समाजातील स्थान व त्याचे नेमके स्वरूप कसे होते आणि त्यांचे अधिकार काय होते ? इ. गोष्टी पुरेशा स्पष्ट झाल्या आहेत का ? ; सांस्कृतिक इतिहास --- ज्यात या देशातील मूळ धर्मीयांची संस्कृती व त्यानंतर बाहेरून आलेल्या व इथेच स्थायिक झालेल्यांच्या सांस्कृतिक मिलनानंतरचे स्वरूप, संक्रमण काळातील सामाजिक जीवनावर झालेले दृश्य – अदृश्य परिणाम इ. ची पुरेशी चर्चा अद्याप झाली आहे का ? मला नाही वाटत याचं उत्तर कोणताही इतिहास अभ्यासक होकारार्थी देईल म्हणून. मग अशा सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक इतिहासाच्या अभावी निव्वळ राजकीय स्वरुपाचं झालेलं इतिहास लेखन म्हणजेच परिपूर्ण इतिहास लेखन आहे का ? 


    सर्व उणीवा जमेस धरून, मान्य करून आहे त्या स्वरूपातील राजकीय इतिहासाकडे पाहिलं तर काय चित्र दिसते ? आधीच्या कलमांत म्हटल्याप्रमाणे आता प्रत्येक गटाचा, समुदायाचा, जातीचा स्वतंत्र इतिहास बनला आहे. अर्थात, जातीनिर्मितीचा इतिहास असता तर एक वेळ चालण्यासारखे होते पण, ‘ आमच्या जातीत हे हे नररत्न / स्त्रीरत्न जन्माला आले ‘ अशा आशयाची इतिहासलेखनं हल्ली जोर धरत आहेत. आता याचा अर्थ असा होत नाही कि, यापूर्वी असे लेखन झालेच नाही. कोणतीही गोष्ट वा घटना अकस्मातपणे घडून येत नाही. त्याची बीजं नजीकच्याच काळात रुजलेली असतात. मुद्दाम पेरलेलीही असतात. जातवार लिहिल्या जाणाऱ्या इतिहासलेखनामागेही तिच पार्श्वभूमी आहे. याचं आपल्या परिचयाचं सर्वसाधारण उदाहरण म्हणजे शिवाजी आणि त्याचे गुरु – दादोजी, रामदास, तुकाराम कि जिजाबाई ?   


    उपरोक्त उदाहरण विशिष्ट समुदाय, गट वा जातीवर आधारित इतिहासलेखनाचे एक आदर्श उदाहरण आहे. आता विशिष्ट व्यक्तीविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेमुळे इतिहासलेखनावर कसा परिणाम होत जातो याचे काही नमुने थोडक्यात पाहू.


    रियासतकार सरदेसायांनी सर्वप्रथम मराठी सत्तेचा अव्वल ते अखेर समग्र इतिहास लिहिला. कालौघात त्यांच्या मराठी रियासती कित्येक प्रकरणी निरुपयोगी वाटत असल्या तरी मार्गदर्शक जरूर आहेत. या रियासतींच्या अखेरच्या भागात सरदेसायांनी नाना – महादजी या दुकलीपैकी नानाच्या तुलनेने महादजी श्रेष्ठ असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप य. न. केळकरांनी केला होता. यासंदर्भातील रियासतींची त्यांनी तसेच दत्तोपंत आपटेंनी  केलेली समीक्षा केलेली समीक्षा वाचनीय आहे.




    नाना फडणीसचा विषय निघालाच आहे तर एका प्रख्यात इतिहास संशोधकाने नानाच्या रक्षांच्या नावांची नोंद असलेला अस्सल दस्तऐवज खाऊन कसा फस्त केला याचे वर्णन आचार्य अत्र्यांनी आपल्या आत्मचरित्रात केलेलं आहे. वास्तविक नानाच्या अंगवस्त्रांची यादी प्रसिद्ध झाली असती तर त्याच्या राजकीय कारकीर्दीवर वा बुद्धीमत्तेवर कसलाही ठपका ठेवला जाणार नव्हता कि दोषारोप केले जाणार नव्हते. ती एक त्यावेळची सर्वमान्य प्रथा होती. परंतु, त्या सत्यवचनी, प्रामाणिक इतिहाससंशोधकास इतका विवेक थोडी होता ? विचारांचे खाद्य बुद्धीला लागते अशा आशयाच्या उक्तीला स्मरून त्याने त्या दुर्मिळ कागदास जठराग्नीत झोकून एका संदर्भाचे तर दहन केलेच पण यांमुळे समस्त इतिहाससंशोधक जमातीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे घोर पातकही केले !


    इतिहासकारांच्या आवडी- निवडीतला आणखी एक भाग म्हणजे दुसरा बाजीराव ! काही वर्षांमागे संभाजी हा व्यसनी, दुर्वर्तनी, राज्य चालवण्यास नालायक इसम असल्याचा समज होता. काही इतिहास संशोधकांच्या व इतिहासकारांच्या अथक प्रयत्नांनी संभाजीचा विकृत इतिहास बाजूला पडून काही प्रमाणात स्वच्छ आणि खरा इतिहास उजेडात आला. जे संभाजीच्या बाबतीत झालं तेच दुसऱ्या बाजीरावाच्याही संदर्भात घडून आलं. बाजीराव पेशवाईवर येण्यापूर्वीच कितीतरी आधी पेशवाई आणि समस्त मराठी सत्ता ऱ्हासाकडे, अवनतीकडे वाटचाल करत होती. परंतु, अपयशाचे –-- पापाचे खापर फोडण्यासाठी बाजीरावाइतका भरगच्च बळीचा बकरा कुठे भेटणार ? मग बाजीराव कसा लंपट होता, नालायक होता याची रसभरीत वर्णने रचण्यात आली. त्याने केलेल्या – न केलेल्या लीलांचे किस्से रंगवण्यात येऊ लागले. आता दुसरा बाजीराव हा काही सद्गुणांचा पुतळा नसला तरी त्याच्या अंगी जे दुर्गुण चिटकवण्यात आले त्यापासून अलिप्त असं त्यावेळी कोणी होतं का ? परंतु इतका विचार करण्यात आला नाही. बाजीरावाच्या विकृतीकरणाची लाट जशी ओसल्री तशी त्याच्या ‘ तथकथित उदात्तीकरणाची ‘ लाट आली. ज्या हिरीरीने प्रथम बाजीराव विरोधकांनी आरोप केले त्याच उत्साहाने त्यांचे निवारण करून नवीन तर्काची – सिद्धांतांची मांडणी करण्यात आली. त्यांपैकी महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे बाजीरावाने जेव्हा इंग्रजांशी स. १८१८ मध्ये तह करून पेशवेपद आणि राज्यावरील आपला अधिकार सोडला त्यापूर्वीच छत्रपतींनी त्यांस बडतर्फ केलेलं असल्याने राज्यनाशास बाजीराव जबाबदार नाही. उलट इंग्रजांपासून राज्याचं रक्षण करण्यासाठी, स्वातंत्र्य रक्षणासाठी तो झगडत असताना त्याच्या मालकाने --- छत्रपतीने इंग्रजांशी हातमिळवणी करून पेशव्याला बडतर्फ केल्याने त्याचा पर्याय खुंटला व राज्यनाश झाला. अर्थात पापाचे धनी छत्रपती !   


    या सिद्धांताची मांडणी व समर्थन वि. ल. भाव्यांनी केलं. सिद्धांत योग्य. पण पाया भरपूर कच्चा. बाजीरावाचे पक्षपाती बनल्याने भाव्यांना तत्कालीन स्थितीचे पुरेसे भानही राहिले नाही. दुसरा बाजीराव हा पेशवा असून छत्रपती प्रतापसिंह त्याचा धनी होता. थोरल्या शाहूच्या पश्चात छत्रपतीला न विचारता पेशव्यांनी आजवर राजकारणं केली त्याच धर्तीवर बाजीरावाने वसईचा तह केला. पण तो छत्रपतीला बंधनकारक नव्हता. त्यानंतर स. १८१८ मध्ये बाजीरावाने शरणागती पत्करण्यापूर्वीच छत्रपतीने त्यांस नोकरीतून बडतर्फ केल्याने बाजीरावाच्या शरणागतीने मराठी राज्याची इतिश्री झाल्याचा दावा कोसळून पडत असला तरी मराठी राज्याचे स्वातंत्र्य नेमके कधी लोपले याची चर्चा भाव्यांनी केलीच नाही. हा त्यांच्या आत्यंतिक बाजीराव प्रेमाचा अप्रत्यक्ष पुरावाच आहे. अन्यथा, पेशव्याच्या इंग्रज विरोधी कारवायांना छत्रपतीने पाठिंबा न दिल्याबद्दल व पेशव्यास बडतर्फ केल्याबद्दल त्यांनी प्रतापसिंहास ठपका दिला नसता. असो, एक विधान – सिद्धांत खोडून काढताना त्यांनी दुसरा सिद्धांत मांडला परंतु मराठी सत्तेचा नाश नेमका कधी झाला वा मराठी सत्तेचे स्वातंत्र्य नेमके कधी लुप्त झाले याची चर्चा त्यांनी न करताच बाजीरावाची बडतर्फी आणि शरणागती म्हणजेच मराठी सत्तेच्या स्वातंत्र्यलोप अशी विचित्र मांडणी करून टाकली. आता यातून वाचकांनी काय बोध घ्यायचा ? वस्तुस्थिती अशी आहे की, सातारच्या प्रतापसिंहाशी इंग्रजांनी जो काही तह केला तोच मुळी स. १८१९ मध्ये ! म्हणजेच बाजीरावची शरणागती वा स. १८१८ मध्ये मराठी राज्याचे स्वातंत्र्य लोपले या विधानास – सिद्धांतास कसलाही अर्थ – महत्त्व राहात नाही. वास्तविक हे कार्य भाव्यांनीच करायला पाहिजे होते पण बाजीरावावरील अतिरिक्त प्रेमामुळे ते त्यांना शक्य झालं नाही. 
                                
                                            ( क्रमशः )