रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

श्रीमंत बाजीराव रघुनाथ पेशवे ( भाग - १ )

 श्रीमंत बाजीराव रघुनाथ पेशवे
                                                                    
    ' राज्यसंहारक ', ' नादान ', ' विषयलोलुप ', ' लंपट ', ' कपटी ', ' नीच ', ' विश्वासघातकी ', ' उल्लू ' इ. शेलक्या विशेषणांनी इतिहासकार रघुनाथपुत्र बाजीरावाची संभावना करतात. मराठी राज्याच्या इतिहासात थोरला बाजीराव हा ' बाजीराव ' म्हणून नावाजला जातो तर दुसरा ' रावबाजी ' ! यातच सर्व काही आले. प्रस्तुत लेखांत या रावबाजीच्या राजकीय कारकीर्दीचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. तो खरोखरच --- इतिहासकार म्हणतात तसा नादान, पळपुटा, लंपट, राज्यसंहारक होता कि कि ना. सं. इनामदारांनी म्हटल्याप्रमाणे ' मंत्रावेगळा ' होता हे आपण पाहू.

    जन्म व बालपण :- नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर रघुनाथराव हा पेशवा बनला. परंतु सखाराम बापू, नाना फडणीस प्रभूती मुत्सद्यांनी बारभाई मंडळ स्थापून रघुनाथ उर्फ दादा दादासाहेबांस पदच्युत करून प्रथम नारायणाची पत्नी गंगाबाई व नंतर तिचा अल्पवयी पुत्र सवाई माधवरावाच्या नावाने कारभार आपल्या हाती घेतला व नारायणाच्या खुनाचा ठपका दादावर ठेवून त्यास कैद करण्यासाठी फौजा रवाना केल्या. पाठीवर धावून आलेल्या कारभाऱ्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या सरदारांच्या फौजांना झुकांडी देत, दादा दत्तक पुत्र अमृतरावास घेऊन गुजरातमध्ये इंग्रजांच्या आश्रयास्तव धावला. त्यावेळी त्याची पत्नी आनंदीबाई गर्भवती असून तिचा प्रसूतीसमय जवळ आल्याने, दादाने तिला धारच्या पवारांकडे ठेवले होते. याच ठिकाणी ता. १७ जानेवारी १७७५ रोजी तिला मुलगा होऊन त्याचे नाव बाजीराव असे ठेवण्यात आले. मराठी राज्याच्या इतिहासात हा दुसरा बाजीराव म्हणून (कु)प्रसिद्ध आहे.

    वस्तुतः रावबाजींची राजकीय कारकीर्द स. १७९५ च्या सुमारास सुरु झाली असली तरी  त्यांच्या पूर्वायुष्याचा थोडाफार मागोवा या ठिकाणी घेणे आवश्यक आहे. बाजीरावाचा जन्म झाला तेव्हा दादा गुजरातमध्ये सुरत येथे होता. बाजीरावास घेऊन त्याची आई --- आनंदीबाई सुरतला काही दिवस गेली होती. तिथून ती परत धारेस आली. यावेळी इतिहासप्रसिद्ध असा ' पुरंदरचा तह ' इंग्रज - पेशव्यांमध्ये घडून आला होता. ( दि. १ मार्च १७७६ )

    धारेस आल्यावर आनंदीबाईने पदरी फौज ठेवून कारभाऱ्यांची --- म्हणजे पुणे दरबारची ठाणी उठवण्यास आरंभ केला. बाईचा दंगा मोडून काढण्यासाठी कारभाऱ्यांनी विसाजी गोविंद आठवले व खंडेराव त्रिंबक ओढेकर यांना रवाना केले. त्यांनी धारच्या किल्ल्यास वेढा घालून आनंदीबाईची कोंडी केली. स. १७७६ च्या जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत आनंदीबाईने धारचा किल्ला लढवला व जकीरा ( सामग्री ) समाप्त झाल्यावर तिने शरणागती पत्करली. यावेळी तिने आपणहून कारभाऱ्यांपुढे दोन पर्याय ठेवले. (१) पुण्यास पोहोचवणे (२) अहिल्याबाईजवळ ठेवणे. कारभाऱ्यांनी दुसरा पर्याय स्वीकारून तिला नर्मदेनजीक मंडलेश्वर येथे बंदोबस्ताने ठेवले. तेथून काही मैलांवरच महेश्वर येथे अहिल्याबाईचा मुक्काम होता. या स्थळी आनंदीबाईचा मुक्काम दोन वर्षे झाला. स. १७७९ मध्ये कारभाऱ्यांनी तिला दादाकडे बऱ्हाणपुरावर पोहचवले. तेथून ती दादासोबत सुरतला गेली. सालबाईच्या तहानंतर दादा कारभाऱ्यांच्या स्वाधीन झाला व तेव्हापासून सहपरिवार त्याचा मुक्काम कोपरगावाजवळ कचेश्वर येथे झाला. ( स. १७८३ )
    

    चर्चेच्या ओघात आपण थोडे पुढे आलो. प्रस्तुत लेखाच्या नायकाचे आपल्या पित्यास लिहिलेलं पत्र इतिहासात प्रसिद्ध आहे. पत्राचा लेखक नावाला जरी बाजीराव असला तरी त्यातील मजकूर आनंदीबाईच्या तोंडचा आहे. स. १७७८ च्या १ जानेवारीस आनंदीबाईने बाजीरावामार्फत सुरतेला पाठवलेल्या पत्रात जो मजकूर दिला आहे त्यापैकी प्रस्तुत विषयास उपयुक्त तेवढा येथे देत आहे :- ' …. आम्ही लेकरे, विशेष लिहिले तर तीर्थरुप म्हणतील की, " बायको सारा वेळ आम्हांस गांजीत असते. तिला लेक झाला तोही तसाच खोटा निघाला ! " ' यावेळी बाजीरावाचे वय सुमारे ३ वर्षे होते. तीन वर्षांच्या मुलाचे हे उद्गार असणे शक्य नाही हे उघड गुपित आहे. परंतु आनंदीबाईच्या विषयी दादाची भावना काय होती हे सांगण्यासाठी हे शब्द पुरेसे आहेत.
 

    स. १७८३ च्या ११ डिसेंबर रोजी दादाचे कचेश्वर येथे निधन झाले. तेव्हापासून १० वर्षे आपल्या मुलाबाळांसह आनंदीबाई कोपरगावी राहात होती. पुढे स. १७९२ मध्ये ती आनंदवल्लीस आली आणि तेथेच दि. २७ मार्च १७९४ रोजी तिचा मृत्यू झाला. यावेळी बाजीराव सुमारे १९ वर्षांचा होता. वयाच्या १९ व्या वर्षांपर्यंत बाजीरावाची वर्तणूक कशी होती ? सत्ताप्रप्तीचा हा तंटा नाना फडणीस व रघुनाथरावाच्या वंशात दीर्घकाळ चालला. त्यामध्ये रघुनाथ, आनंदी व नानाच्या मृत्यूनेही खंड पडला नाही. नानाच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने इंग्रजांच्या मदतीने बाजीरावाशी तंटा सुरु ठेवला. मात्र त्याचे स्वरूप वेगळे होते. असो. 

     या ठिकाणी आपण हे पाहू कि, स. १७७५ पासून १७८४ पर्यंत बाजीरावाची वागणूक कशी होती ते :- स. १७७६ ते ७९ हि दोन तीन वर्षे व नंतर स. १७८३ पासून ते पेशवेपद प्राप्त होईपर्यंत बाजीराव आपल्या परिवारासह नानाच्या नजरकैदेत होता. भट कुटुंबातील मुलांना जे शिक्षण देण्यात येई तेच बाजीराव व त्याच्या बंधूंना मिळेल याची खबरदारी नानाने घेतली होती. परंतु, प्रचलित राजकारणास उपयुक्त असे शिक्षण मात्र त्यांस न मिळू देण्याची त्याने दक्षता घेतली होती. अर्थात, तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नानाचे हे कृत्य योग्य असले तरी दूरदृष्टीचे खासच नव्हते. 

    असो, नानाच्या नजरकैदेत असताना बाजीरावास तत्कालीन प्रचलित शिक्षण पद्धतीनुसार जे शिक्षण देण्यात येई त्यात त्याला फारसा रस वाटायचा नाही. पुस्तकी विद्येपेक्षा मैदानी खेळ व शारीरिक कसरतीची त्यांस अधिक आवड होती. घोडेस्वारी, तलवार - तिरंदाजी व भालाफेकीत तो कुशल असल्याचा ग्रांट डफनेच उल्लेख केला आहे याशिवाय तालमीचाही त्यास विशेष शौक होता. खेरीज स्वारी ' वयात ' आल्याने विषयासक्तही झाली होती. आनंदीबाई नानाच्या नावाने जी ओरड करायची ती याच कारणासाठी ! बाजीरावाच्या तैनातीस जी माणसे नेमली होती त्यात चांगली कमी व त्याकाळच्या समजुतीनुसार हलक्या दर्जाची --- म्हणजे सुशिक्षित, सुसंस्कृत नसलेली --- मंडळी जास्त होती. विशेष म्हणजे याच आशयाची तक्रार स. माधवाच्या बाबतीत गोपिकाबाईचीही होती. असो, बाजीरावाच्या पुढील आयुष्यातील दुर्वर्तनाची पाळंमुळं त्याच्या भूतकाळात दडलेली आहेत.

    बाजीरावाच्या वाईट गुणांचा, वर्तनाचा व संगतीचा दृश्य परिणाम आई या नात्याने आनंदीबाईच्या नजरेस लगोलग आला. याबद्दल तिने बाजीरावाची पुष्कळ कानउघडणी केली. प्रसंगी मारहाण केली. पुण्यास नानाला पत्रे पाठवून याविषयी योग्य त्या उपाय योजना करण्याची विनंती केली. परंतु नानाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. यामागील त्याच्या हेतूंची यापूर्वीच्या लेखांमध्ये ठिकठिकाणी चर्चा येऊन गेल्याने पुनरोक्ती करत नाही.  


    मैदानी खेळ, शस्त्रविद्या, कामशास्त्र यांसोबत बाजीरावाची परंपरागत धर्मशास्त्रातही तज्ञ होता. कित्येकदा यज्ञ - होम प्रसंगी करावयाच्या मंत्रोच्चारात यज्ञ - हवनकर्त्या ब्राम्हणांच्या बरोबरीने तो स्वतःही सहभाग घेत असे. खेरीज तो बापाप्रमाणेच कट्टर शिवभक्त होता.

    सारांश, आनंदीबाई मरण पावली तेव्हा अटक प्रसिद्ध राघोभरारीचा मुलगा --- बाजीराव हा १९ - २० वर्षांचा पोथी - पुराण पांडीत्यात पारंगत असलेला ; शस्त्रविद्या जाणणारा ; तालीमबाज ; विषयासक्त असा तरुण होता. जन्मापासूनचा काळ बंदीवासात गेल्याने प्रचलित राजकारणाची, आपल्या कर्तव्याची त्यांस ओळख नव्हती. मात्र, राजनीतीतज्ञ व कारस्थानी ( चांगल्या अर्थाने ) अशा मातेचा --- आनंदीबाईचा त्यांस सहवास भरपूर लाभला होता. रावबाजी बोलण्यात सापडत नाही असा एल्फिन्स्टन प्रभूतींचा सूर आहे. रावबाजीच्या या अंगच्या गुणांच्या विकासाचे मूळ त्याच्या मातृसहवासात दडलेलं आहे.

    स. १७९४ मध्ये आनंदीबाईचा मृत्यू झाल्यावर बाजीरावाची परिस्थिती थोडी बदलली. मार्गदर्शन करण्यासाठी वडील बंधू अमृतरावखेरीज आता त्यास कोणी नव्हते.  अमृतराव यावेळी  २९ वर्षांचा असून तो जाणता व कर्ता पुरुष. पण तो दादाचा दत्तक पुत्र असल्याने बाजीरावावर त्याचा जितक्यास तितकाच वचक होता. तर बाजीरावाचा  धाकटा भाऊ चिमणाजी या समयी अवघ्या १० वर्षांचा होता. सारांश, आनंदीबाईच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने रावबाजीची स्वारी निरंकुश झाली !   

    रावबाजीवर आधारित लेखमालिकेचा हा पहिलाच भाग असल्याने ज्यांचा पुढील विषयांशी फारसा संबंध येणार नाही, त्या ऐतिहासिक व्यक्तींचा, घटनांचा याच लेखात परामर्श घेणे योग्य ठरेल. 


    बाजीरावाचा थोरला भाऊ अमृतराव हा बाजीरावापेक्षा वयाने १० वर्षांनी मोठा. परंतु दत्तक पित्यासोबत --- रघुनाथरावाबरोबर त्याचा बराचसा काळ गेल्याने व पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात बापासोबत इंग्रजी छावणीतून सहभाग घेतल्याने तत्कालीन राजकारणाची त्यांस चांगलीच ओळख झाली होती. समकालीन इंग्रज अधिकाऱ्यांचे अमृतरावाविषयी मत चांगले असले तरी त्याच कारणांस्तव त्यांना बाजीराव प्रिय वाटे. असो, आपण दत्तक असल्याने औरस वंशजाचा मान ( बाजीरावाच्या जन्मानंतरचे हे विवेचन आहे. ) व अधिकार आपणांस लाभणार नसल्याची अमृतरावास जाणीव होती. बाजीरावास पेशवाई मिळाली तेव्हा पूर्वप्रघातानुसार आपणांस त्याचे कारभारीपद मिळेल हि त्याची आशाही फलद्रूप झाली नाही. कारण ; पेशवेपदप्राप्तीच्या वेळी घडलेल्या घटनांनी बाजीरावाचे डोळे व डोके फिरले आणि अमृतराव त्यांस शत्रुवत वाटू लागला. तेव्हा निरुपाय होऊन अमृतरावाने विठोजी - यशवंत या होळकर बंधूंशी हातमिळवणी करून बाजीरावास गादीवरून खेचण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण बाजीरावाने इंग्रजांची मदत घेऊन अमृतरावाचे बेत हाणून पाडले. यानंतर दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धास आरंभ झाला. परंतु त्यात प्रत्यक्ष सहभाग न घेता अमृतरावाने ऑर्थर वेल्स्ली सोबत तह करून सालीना ७ - ८ लक्षांची नेमणूक पदरात पाडून घेतली व इतउत्तर तो राजकारणातून संन्यास घेऊन बुंदेलखंडातील करवी संस्थानाकडे निघून गेला. अमृतरावास दत्तक घेतल्यावर रघुनाथरावाने हे संस्थान त्याच्याकडे सोपवले होते. या संस्थानावर देखरेख करत तो काशीस स्थायिक झाला. इतिहासात हे घराणे पुढे करवी / चित्रकूटचे पेशवे म्हणून प्रसिद्ध झाले. अमृतरावाचे वंशज सध्या पुण्यात स्थायिक असल्याची माहिती माझ्या ' फेसबुक फ्रेंड ' श्री. मोहना जोगळेकर यांनी दिली. ( याविषयी अधिक माहिती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे :-    http://www.loksatta.com/diwali-magazine/peswas-392727/  )  

    बाजीरावाचा धाकटा भाऊ चिमणाजी आपा हा कर्तबगारीने कसा होता हे समजण्याचे काही साधन नाही. कारण याचा बराचसा काळ कैदेतंच गेला. लहानपणी नानाची तर नंतर बाजीरावाची ! आपाचा अपराध काय तर स. १७९६ मध्ये पटवर्धन व शिंद्यांच्या कारस्थानाने अल्पकाळ का होईना बाजीरावाच्या ऐवजी त्यांस पेशवाई मिळाली होती. असो, शरीरप्रकृतीने उभयतां बंधू समसमान होते. तसेच बापाच्या चंचल वर्तणुकीमुळे उभयतांनाही जन्मतः रोगांची देणगी प्राप्त झाली होती. बाजीरावास फिरंग रोग जडलेला तर रघुनाथरावाचे कान फुटण्याचे दुखणे प्राप्त झालेले. बाजीराव रंगाने किंचित सावळा तर चिमणाजी गोरा. बाजीराव रागीट तर चिमणाजी सोशिक वृत्तीचा ! बाजीरावाने बापाचे सर्व रंगढंग उचलले होते तर चिमणाजी कायम बंदिवासात राहिल्याने त्यांस अशी काही चैन करता आली नाही. बाकी, उभयतांच्या गुणांमध्ये फारसा फरक नव्हता. चिमाजीचे पुढील आयुष्यातील वर्तन पाहता बाजीरावाच्या ऐवजी तोच पेशवा म्हणून कायम राहिला असता तर मराठी राज्याचा विनाश इतक्या लवकर झालाच नसता असे म्हणण्यास काही आधार नाही. तिसऱ्या इंग्रज -  मराठा युद्धाच्या अखेरीस चिमाजीने इंग्रजांशी स्वतंत्र तह करून आपल्या तनख्याची सोय पदरात पाडून घेऊन काशी गाठली.

    सवाई माधवरावाचा मृत्यू :- स. १७९४ मध्ये आनंदीबाईचा मृत्यू झाल्यावर पुढच्याच वर्षी इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई घडून आली. त्यावेळी खबरदारी म्हणून नानाने रघुनाथरावाच्या तिन्ही मुलांना आनंदवल्लीतून काढून जुन्नरास ठेवले. निजामावरील मोहीम संपल्यावर या तिघांची काहीतरी व्यवस्था लावण्याचा नानाचा विचार होता. परंतु राजकारणाच्या धांदलीत असेल अथवा या त्रिवर्गाची सोय लावण्याची नानास इच्छा नसेल, ( जे काही असेल ते ) नानाकडून बाजीराव प्रभूतींचे काम काही होईना. त्यामुळे कदाचित असेल किंवा स्वयंप्रेरणेने असेल पण बाजीरावाने थेट पेशव्याशीच संधान बांधण्याचा प्रयत्न केला हे निश्चित !

    दादाच्या मुलांवर नजर ठेवण्यास नानाने बळवंतराव नागनाथ वामोरीकरास ठेवले होते. बाजीरावाने त्यालाच आपल्या लगामी लावून त्याच्या मार्फत स. माधवास चिठ्ठी पाठवली. त्यात राजकीय मजकूर नसून ' परस्परांच्या भेटी घडाव्यात ' अशा आशयाचा मजकूर होता. नानापासून हि गोष्ट लपून राहिली नाही. त्यांनी बळवंतरावास कैद केले आणि घडला मजकूर पेशव्याच्या कानी घातला. पुढचा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहेच. स. माधवाचे ता. २७ ऑक्टोबर १७९५ रोजी निधन झाले. उपलब्ध परस्पर विसंगत पुरावे पेशव्याचा मृत्यू हा अपघाती असल्याचे सांगतात पण त्याच पुराव्यांकडे तटस्थ वृत्तीने पाहिल्यास / अभ्यासल्यास पेशव्याचा खून करण्यात आल्याचे लक्षात येते. असो, स. माधवाच्या मृत्यूने बाळाजी बाजीरावाचा वंश खुंटला आणि भट कुटुंबात रघुनाथ व समशेर बहाद्दरचे पुत्र सोडल्यास इतर औरस संतती हयात नव्हती. पैकी, समशेरच्या मुलांवर मुसलमान असल्याचा शिक्का बसल्याने व ते कर्तुत्ववान, कर्तबगार, फौजबंद असल्याने पुणे दरबारने त्यांना दूरच ठेवले. रघुनाथरावाच्या मुलांना तर गादीवर आणायचे नाही असा नानाचा पण होता. तेव्हा पुढे काय हा प्रश्न सर्वांसमोर पडला.

                                                                                  ( क्रमशः )

रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

गंगाधर शास्त्र्याच्या खुनाचे रहस्य ( भाग - ४ )

    
    दरम्यान गायकवाड प्रतिनिधी या नात्याने पेशव्याची शास्त्र्यासोबत बोलणी होऊन गायकवाडांनी गुजरात प्रांती आपणांस सात लक्षांचा मुलुख दिल्यास मागील देणे माफ करू असे पेशव्याने सुचवले शास्त्र्याने हे बडोद्यास कळवले पण गायकवाडांनी त्यास नकार दिला. यामुळे  शास्त्र्याची कुचंबणा मात्र झाली. इकडे बाजीरावाने आपल्या मेव्हणीचा शास्त्र्याच्या मुलाशी विवाह निश्चित करून लग्नाचे स्थळ देखील ठरवले. अलीकडे दरवर्षी पेशवा तीर्थाटनास बाहेर पडे. तेव्हा या यावर्षीच्या यात्रेत नाशिकला विवाह उरकून घेण्याचा त्याने बेत आखला. पेशवा दीर्घकाळ पुण्याच्या बाहेर राहणार असल्याने रेसिडेंट एल्फिन्स्टन देखील त्याच्या सोबत बाहेर पडणार होता. मात्र बडोद्याहून तहाच्या वाटाघाटीविषयी प्रतिकूल मत आल्याने शास्त्र्याने हा विवाह समारंभ पुढे ढकलण्याची सूचना केली. लग्नाची सर्व तयारी होऊनही शास्त्री डळमळीत झाल्याने पेशव्याने समारंभ रहित केला. हा सर्व प्रकार नाशिकच्या वाटेवर असताना वा नाशिकला पोहोचल्यावर घडला. तत्पूर्वी पुण्यात सर्व मंडळी हजर असताना किंवा पुण्यातला मुक्काम हलल्यावर शास्त्र्याचा खून करण्यास्तव मारेकरी आल्याची भूमिका उठली तेव्हा शास्त्र्याच्या बंदोबस्तासाठी पेशव्याने हत्यारी पथकाची नियुक्ती केली. एल्फिन्स्टनचा मात्र या बातमीवर विश्वास नव्हता. असो, नाशिकहून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पेशवा पंढरपुरास ;निघाला. त्याने एल्फिन्स्टनला कळवले कि, " आम्ही थोडे लोक सोबत घेऊन पंढरपुरास जाऊन परस्पर लगेच पुण्यास येतो. तुम्ही सोबत आला नाहीत तरी चालेल. " त्याचप्रमाणे शास्त्र्याचा सल्लागार बापू मैराळ यासही पुण्याला रवाना करण्यात आले. पंढरपुरास जाताना पेशव्यासोबत त्याचे निवडक सैन्य, इतबारी लोक, त्रिंबकजी डेंगळे व गंगाधरशास्त्री होते. त्याशिवाय गोविंदराव बंधूजीही आता त्यात सामील झाला होता. याविषयी शास्त्र्याने कुरकुर केली पण त्रिंबकजीने त्याचे समाधान केले. एल्फिन्स्टन नाशिकहून अजिंठ्याची लेणी बघायला निघून गेला. इकडे पेशवा, शास्त्री व मंडळीसह पंढरपुरास गेला व दि. २० जुलै १८१५ रोजी संध्याकाळ नंतर त्रिंबकजीच्या आग्रहावरून देवदर्शनास आलेल्या शास्त्री महाशयांचा मुक्कामाच्या स्थळी परत जात असताना खून झाला.  

' पेशवाईच्या सावलीत ' या ना. गो. चापेकर संपादित ग्रंथात चिपळूणकर दप्तरातील याविषयाशी संबंधित काही पत्रे प्रकाशित करण्यात आली आहेत. या पत्रांची विशेष दखल घेण्याचे कारण म्हणजे हि पत्रे पेशव्यास लिहिलेली असून खुनाच्या प्रसंगी नेमके काय घडले याचा वृत्तांत सांगणारी आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेचा तपशील पत्राद्वारे कळवला असून त्याची तारीख १३ सप्टेंबर १८१५ हि दिली आहे. असो, चिपळूणकर दप्तरातील पत्रे व त्या वरील संपादकीय टिपण्णी खालीलप्रमाणे :-

    चिपळूणकर }                                              { श. १७३७ भाद्र. शु. १०
                                                                       { इ. १८१५ सप्टें. १३
  

    श्रीमंत महाराज राजश्री बाबासाहेब स्वामीचे सेवेसी विनंती. सेवक बापुजी गंगाधर चिपळोणकर साष्टांग नमस्कार विज्ञापना. गंगाधरशास्त्री क्षेत्र पंढरपुरी मारले गेले ते समयी तुम्ही बरोबर होता तेथील मजकूर कसा जाला ते लिहून देणे म्हणून आज्ञा त्यास. आषाढ शु. १४ गुरुवारी आम्ही गंगाधरशास्त्री यांचे बिऱ्हाडी बसलो होतो. दोन घटका रात्र अवशीची सुमार जाली तो इतक्यांत राजश्री त्रिंबकजी तात्या यांजकडील कारकून व दोन प्यादे नेहमी शास्त्रीबाबा यांजकडे असत त्यांपैकी एक प्यादा व कारकून सूचनेस आले कीं देवदर्शनास चलावे. तेव्हा शास्त्री यानी उत्तर केले कीं मला ताप आलेला आहे मी येत नाही. नंतर मी शास्त्रीबावास पुसिले कीं मी जातो. नंतर तेथून निघून राजश्री रावजी मराठे व आम्ही उभयतां देवळांत गेलो तेथे राजश्री त्रिंबकजी तात्या बसले होते. यानी आम्हांस पुसिले कीं शास्त्रीबावा का आले नाहीत. आम्ही उत्तर केले कीं त्यांस ताप आलेला आहे. तेव्हा तात्या बोलिले कीं देवदर्शन घेतल्याने देव कृपा करील. नंतर राजश्री रावजी मराठे आमचे बरोबर होते त्यास सांगितले कीं तुम्ही जाऊन तात्या बोलिले हे सांगावे. नंतर मराठे शास्त्रीबावा यांजकडे गेले. मग आम्ही देवदर्शन करून देवळांत बसलो होतो इतक्यांत शास्त्रीबावा दर्शनास आले. ते तात्यापाशी बसून देवदर्शनास गेले. देवदर्शन घेऊन फिरून तात्याजवळ काही बसून निघाले. आम्ही बरोबरच होतो. कमानी दरवाजाचे वाटेने चाललो. शास्त्रीबावा पुढे व त्यांचा हात राजश्री रामचंद्र बडवे यांनी धरला होता व शास्त्रीबावा यांचे माघे ( गे ) आमचा मशालजी, त्याचे माघे ( गे ) आम्ही चालत होतो. भजनीबाबा याचे जाग्यापासून पुढे दहा पंधरा हातचे सुमार गेलो. तो इतक्यांत मागाहून गलबल होऊन आम्हास तरवारेचा परज लागला. नंतर पाहू लागलो तों शास्त्रीबोवा यावर गर्दी होऊन खाली पडले त्याचे मशालची व आमचा मशालची मशाली टाकून पळाले व बडवाही पळाला. नंतर मी इतक्यांत पाठीमागून एकीकडे बाजूस झालो. गर्दी पाहून भयभीत होऊन पळून निघालो. तो राजश्री नरसिंगराव भावे याचे बिऱ्हाडी जाऊन बसलो.
 ( वरील मजकूर ज्या कागदावर आहे त्या कागदावर ' नक्कल ' म्हणून लिहिलेले आहे. यासंबंधाने एकंदर आठ निरनिराळे कागद लिहिलेले आहेत. एका कागदावर ' मसुदा ' म्हणून लिहिलेले आहे. कित्येक ठिकाणी ' शोध ' म्हणून घातलेले आहे. पुष्कळ विचार करून बाजीराव साहेबाला उत्तर काय द्यावयाचे ते ह्यांत ठरविले असावे. दुसऱ्या पत्रांत थोडा जास्त मजकूर आहे तो असा ) --

    देवदर्शनास गेलो तेथे सरकारचे महापुजेची तयारी करिता देवालयांतील दाटी काढून झाडलोट करवीत राजश्री त्रिंबकजी तात्या गरुडखान्याजवळ बसले होते. तेव्हा मी दर्शनाकरितां परवानगी लावून आंत गेलो तो तात्यानी पुसिले कीं दाजी आले कीं काय ? तेव्हा आम्ही बोलिलो कीं त्याचे शरीर स्वस्थ नाही. तेव्हा तात्या म्हणाले कीं वार निवळ आहे आल्यास देवदर्शन होईल तेव्हा आम्ही रावजी मराठे यांस सांगितले कीं जाऊन सूचना करावी म्हणून पाठविले. नंतर तात्या बोलले कीं बरे असल्यास यावे नाहीतर न यावे. तेव्हा मी उतर केले कीं स्वस्थ असल्यास येतील नाही तर येणार नाही. मिति भाद्रपद शु।। १० बुधवार शके १७३७ युवानाम संवत्सरे शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
    ( दुसऱ्या एका लेखांत " कमानी दरवाजाचे वाटेने चाललो " याचे अगोदर " प्रथम देवाचे पायरी जवळ येऊन चोखामेला उजवा घालून त्या गल्लीने " हे शब्द घालून नंतर खोडलेले आहेत.
    रावजी मराठे हा शास्त्रीबोवांचा मेहुणा असे एका कागदांत आहे.
    तसेच शास्त्रीबोवा यास मारतात असा मजकूर प्रथम लिहिला असून तो खोडून शास्त्रीबोवा यावर गर्दी होऊन खाली पडले हा ' शोध ' घातला आहे. त्याचप्रमाणे शास्त्रीबोवा पडले व ' आई आई, मेलो मेलो ' म्हणाले हे शब्द खोडले आहेत. सारांश त्रिंबकजी डेंगळे यांनी शास्त्रीबोवांस मारले असे दिसू नये असा प्रयत्न केलेला दिसतो. ) ( चिपळूणकर रुमाल दप्तर नं. ११ )  

    शास्त्र्याच्या खुनाच्या प्रत्यक्षदर्शीची हि हकीकत अव्वल दर्जाची  मानली पाहिजे. जवळपास अशाच आशयाची माहिती या घटनेचा इतिहास लिहिणाऱ्यांनी दिली आहे. खुनाच्या दुसऱ्या दिवशी शास्त्र्याच्या कारभाऱ्यांनी त्रिंबकजीस भेटून शास्त्र्याच्या खुन्यांचा शोध घेण्याची विनंती केली. तेव्हा त्याने संशयितांमध्ये सीताराम रावजी  कान्होजी गायकवाड यांची नावे घेतली. अर्थात, या दोघांशिवाय आणखीही शास्त्र्याच्या जीवाचे सोबती असल्याने कोणाचा म्हणून संशय घ्यायचा असा प्रतिप्रश्नही त्याने त्या कारकुनांना केला.

     इंग्रज रेसिडेंट एल्फिन्स्टनने आपल्या पद्धतीने सदर प्रकरणाची चौकशी करून या खुनाची जबाबदारी त्रिंबकजीवर टाकून बाजीरावास ' क्लीन चीट ' दिली. समकालीन लेखांतील याविषयीचे उल्लेख माझ्या वाचनात अजून आले नाहीत. परंतु, गो. स. सरदेसाई, ना. गो. चापेकर, सदाशिव आठवले, प्रमोद ओक इ. इतिहासकारांच्या मते शास्त्र्याच्या खुनाच्या कटात बाजीराव - त्रिंबकजी हि दुकली सहभागी असून बडोदेकर मंडळींचाही यात सहभाग होता. याबाबतीत सरदेसायांनी राणी तख्ताबाईकडे निर्देश केला असून भगवंतराव गायकवाड  गोविंदराव बंधुजी हे प्रमुख सूत्रधार असल्याचे त्यांचे मत आहे. नरसोपंत केळकरांनी याविषयी काहीशी तटस्थ भूमिका स्वीकारत बाजीराव - त्रिंबकजी या कटात सहभागी नसल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित करत बडोदा दरबार विषयी संशय व्यक्त केला आहे. ' मराठी दफ्तर, रुमाल दुसरा ' चे संपादक वि. ल. भावे यांनी मात्र उघडपणे आपल्या प्रास्ताविकात बाजीराव - त्रिंबकजीची बाजू घेऊन बडोदेकर मंडळींना दोषी धरले आहे.  त्यातील एक दोन महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख येथे करणे आवश्यक आहे व ते म्हणजे :- (१) गंगाधरशास्त्र्याच्या वंशजांच्या कैफियतीत बाजीरावास दोषी धरले नाही. तसेच शास्त्र्याची मुलगी यमुनाबाई देखील बाजीरावास आपल्या पित्याचा खुनी मानत नाही. (२) गंगाधरशास्त्री व प्रभाकर कवी हे लहानपणापासूनचे मित्र असून त्यांचा नातेसंबंधही होता. शास्त्र्याच्या मुलास प्रभाकरची मुलगी करण्यात आली होती. या प्रभाकरच्या कवनांत शास्त्र्याच्या खुनात बाजीरावाचा हात असल्याचा उल्लेख नाही. इतकेच नव्हे तर रावबाजींची पेशवाई दूर होऊन इंग्रजी अंमल सुरु झाल्यावर शास्त्राच्या खुनावर प्रभाकरने रचलेल्या कवनांत देखील शास्त्र्याच्या खुनात बाजीरावाचा संबंध असल्याचा तो उल्लेख करत नाही.        

    इतिहासकारांच्या मतांमध्ये विभिन्नता आढळत असल्याने सत्य नेमके काय असावे असा प्रश्न साहजिकच वाचकांच्या व अभ्यासकांच्या मनात उद्भवतो. याच प्रश्नाचा थोड्या वेगळ्या पद्धतीने उलगडा करण्याचा आपण प्रयत्न करू.

    १} पेशवे दरबार :- गंगाधरशास्त्री हा इंग्रजांचा हस्तक असून गायकवाडांचा वकील म्हणून पेशव्याकडे आला होता. पेशव्याला गायकवाडांकडून हवी असलेली खंडणी वा प्रांत देणे न देणे त्याच्या हाती नव्हते. तो केवळ एका मध्यस्थ दुव्याचे काम करत होता. त्यामुळे गायकवाडांची बोलणी फिस्कटल्याचा राग पेशव्याने त्याच्यावर काढला असे मानणे मूर्खपणाचे ठरेल. शास्त्र्याने पेशव्याच्या मेव्हणीसोबत आपल्या मुलाचा विवाह पुढे ढकलला म्हणून दुखावलेल्या रावबाजी - त्रिंबकजीने शास्त्र्याचा खून केला असे म्हणणे म्हणजे निव्वळ बालीशपणा आहे. विवाह ठरतात, मोडतात. त्यामुळे खून पडत नाहीत. या संदर्भातील थो. माधवराव पेशव्याच्या लग्नाची गोष्ट इतिहासकारांनी दुर्लक्षिल्याचे आश्चर्य वाटते. सारांश, शास्त्र्याच्या खुनाने पेशव्याचा कसलाही -- आर्थिक वा प्रादेशिक किंवा राजकीय फायदा होणार नव्हता. उलट शास्त्री जिवंत राहता तर कदाचित पेशव्याने त्यास सेवेत घेतलेही असते. दुसरे असे कि, शास्त्र्याचा खून करायचा तर तो पंढरपुरात त्रिंबकजी का करेल ? नाशिक ते पंढरपूर मार्गात ना बापू मैराळ सोबत होता ना एल्फिन्स्टन. अशा परिस्थितीत पेंढारी - लुटारू अशा सबबींचा आधार घेऊन त्यास हे कृत्य उरकता आले असते. त्यासाठी पाक पंढरपुरापर्यंत थांबण्याची गरज काय होती ? त्याशिवाय अनोळखी इसमांनी शास्त्र्याचा खून केल्याचा देखावा रचायचा होता तर शास्त्र्यासोबतच्या माणसांनाही मारण्यात मारण्यात आले असते. परंतु खुन्यांनी नेमके शास्त्र्यालाच मारले. असे का ?    

    २} गायकवाड दरबार :- गंगाधरशास्त्री हा गायकवाडांचा नोकर असून इंग्रजांचा पक्षपाती होता. इंग्रजांचे जोखड मानेवरून काढण्याचे जेवढे प्रयत्न गायकवाडांनी केले त्यातील बव्हंशी बेत हाणून पाडण्यात शास्त्र्याचा सहभाग असल्याने त्यांचा शास्त्र्यावर राग असणे स्वाभाविक आहे. शास्त्र्याला पुण्यास पाठवण्याची त्यांची इच्छा कितपत होती हे सांगण्यास साधन नाही. मात्र त्यांना तो नकोसा झाला होता हे निश्चित ! शास्त्री पुण्यास येण्यापूर्वी गोविंदराव बंधुजी व शास्त्र्याच्या पुणे आगमनानंतर भगवंतराव गायकवाड हे दोघे आले. पुणे व बडोदा दरम्यान जोवर मध्यस्थाची भूमिका इंग्रज बजावत होते तोवर पेशवा शास्त्र्यास साफ उत्तर देत नव्हता. परंतु जेव्हा एल्फिन्स्टनने वाटाघाटीतून अंग काढून घेतले तेव्हा पेशव्याने शास्त्र्यास आपल्या गोटांत वळवण्याची खटपट आरंभली व गायकवाडांशी चाललेल्या वाटाघाटीला तुलनेने कमी महत्त्व दिले. या ठिकाणी आपण बाजीराव -- गंगाधर -- गायकवाड या तिघांच्या हितसंबंधांचा अधिक विचार करू. गंगाधरशास्त्री म्हणजेच इंग्रज अशी गायकवाडांची धारणा असण्याचे काही कारण नाही. राजकारणात पक्षबदल हा सर्वसंमत असा मार्ग आहे. पेशव्याचे नातलग बनणे वा मुख्य कारभारीपद मिळवण्याच्या प्रलोभनाने गंगाधर जर पेशव्याच्या पक्षास मिळणार असेल तर गायकवाडांचे असे कोणते अहित होणार होते ? इंग्रजांच्या दडपशाहीला कंटाळून सुटकेसाठी उलट त्यांनीच बाजीरावाचा धावा केला होता. शास्त्र्याने सात लक्षांचा मुलुख तोडून देण्याची बोलणी केल्याने बडोदेकर रुष्ट झाले असे म्हणता येत नाही. कारण त्याने फक्त तोडगा सुचवला होता. मान्य करणे न करणे हि गायकवाडांची मर्जी होती. शास्त्री पेशव्याचा नातलग बनला काय किंवा कारभारी बनला काय, त्या निमित्ताने तो बडोद्यातून बाहेर पडणार असल्याने हि बाब गायकवाडांच्या पथ्यावरच पडणार होती. मग ते शास्त्र्याचा खून का करतील ? तसेही शास्त्री मूळचा पेशव्याचाच नोकर असल्याने गायकवाडांनी त्याच्यावर रुष्ट होण्याचे काही खास कारण दिसत नाही. त्रिंबकजीने ज्या दोघांचा --- सीताराम रावजी व कान्होजी गायकवाड --- संशयित म्हणून उल्लेख केला ते प्रत्यक्ष इंग्रजांच्या कैदेत होते. तेव्हा त्यातून काय अर्थ घ्यायचा तो घेणाऱ्याने घ्यावा.

    ३} इंग्रज :- गंगाधरशास्त्री हा मूळचा पेशव्यांचा नोकर असून गायकवाडांच्या पदरी रावजी आपजीच्या कृपेमुळे आला. त्याच्याच मार्फत इंग्रजांनी त्यास आपल्या जवळ केले. वरवर गायकवाडांची व आतून इंग्रजांची त्याने नोकरी इमानइतबारे केली. परंतु जेव्हा गायकवाडांच्या वतीने बोलणी करण्यास तो पेशव्याकडे पुण्यास आला तेव्हा एक वर्षाच्या पुणे मुक्कामात त्याची इंग्रजांवरील निष्ठा काहीशी डळमळू लागली. भगवंतराव गायकवाडाचे पुणे दरबारी आगमन होताच एल्फिन्स्टनने --- पर्यायाने इंग्रजांनी शास्त्र्याचा पाठिंबा व पुणे - बडोदा दरम्यानची मध्यस्थी मागे घेतली. किंबहुना शास्त्री, पेशवे व गायकवाडांना त्याची आता जरूर वाटत नव्हती. कारभारीपद व आपली मेव्हणी शास्त्र्याच्या मुलास देण्याच्या निमित्ताने पेशवा शास्त्र्याला आपल्या पक्षात ओढत असल्याचे इंग्रजांनी ताडले. पेशव्याच्या या पवित्र्याने शास्त्री संभ्रमात पडला. त्याची निष्ठा डळमळीत होऊ लागली तर इंग्रज सावध झाले. शास्त्री पेशव्याचा नातलग वा कारभारी बनला तर सर्वात जास्त फायदा इंग्रजांना होता व धोकाही ! शास्त्री इंग्रजांशी एकनिष्ठ असता तर त्याने पेशव्याचे कारभारीपद स्वीकारण्यास एल्फिन्स्टनने आनंदाने संमती दिली असती. परंतु शास्त्र्याची इंग्रजांवरील निष्ठा डळमळीत होऊ लागल्याने एल्फिन्स्टनने मानभावीपणाने नैतिकतेचा मुद्दा पुढे आणत शास्त्र्याला पेशव्याची नोकरी न स्वीकारण्याची सुचना केली. आपण कोणाची चाकरी करायची या गोंधळात शास्त्री पडलेला असल्याने त्याने इंग्रजांची सुचना मान्य करून गायकवाडांना काही काळ तरी चिटकून राहण्याचे ठरवले. पेशवा शास्त्र्यासह नाशिकला वगैरे निघाला तेव्हा एल्फिन्स्टन सोबत होताच. नाशिकमध्ये त्यांची फाटाफूट झाली. एल्फिन्स्टन वेरूळला गेला तर पेशवा शास्त्र्यासह पंढरपूरला ! पंढरपुरास जाऊन पेशवा लगेच पुण्याला मागे फिरणार होता. गायकवाडांच्या सोबत असलेल्या वादाचा निकाल न लागता शास्त्र्याची वकीलात तर फसली होती. पंढरपुरास गेल्याने तिथे काही वेगळा निकाल लागणार नव्हता. पंढरपुराहून पेशवा - शास्त्री पुण्यास आले असते तर फार करून त्यांचा नातेसंबंध जुळला असता वा नसता. त्यानंतर शास्त्री बडोद्याला जाणार होता. तिथून तो पुढे काय करील याचा अंदाज नव्हता. म्हणजे तो गायकवाडांकडेच राहील कि पेशव्याकडे येईल याचा आगाऊ तर्क बांधणे शक्य नव्हते. मात्र इंग्रजांपासून हळूहळू फारकत घेऊ लागल्याचे --- एल्फिन्स्टनच्या सूचनावजा आज्ञा धुडकावून त्याने सिद्ध केले होतेच. यावरून शास्त्र्याचे अस्तित्व इतर कोणाहीपेक्षा इंग्रजांनाच अधिक धोकादायक बनल्याचे उघड होते.

    परदरबारी वाटाघाटी करणाऱ्या व हेरगिरी करणाऱ्यांनी आपल्या मालकावरील निष्ठा सोडून इतरांच्या चरणी आपली सेवा रुजू केल्यावर अशा लोकांचे दुसरे काय होणार ? खुरशेट मोदीने इंग्रजांची सेवा करताना पेशव्याची नोकरी पकडली तेव्हा संधी मिळताच इंग्रजांनी त्याला आपल्या मार्गातून दूर केले. खुरशेट मोदीला एका मांत्रिकाने दिलेल्या प्रसादाचे भक्षण केल्याने मृत्यू आल्याचे एल्फिन्स्टन सांगतो पण, त्या प्रसादाचे विषांत रुपांतर कोणाच्या प्रेरणेने झाले ते का लपवून ठेवतो ? शास्त्र्याला इंग्रजांच्या पासून धोका पोहोचू शकतो म्हणूनच पेशव्याने शास्त्र्याच्या बंदोबस्ताची तरतूद केली होती. पंढरपुरातही पेशव्याचा बंदोबस्त चांगला होता. मात्र ता. २० जुलै रोजी शास्त्र्याचा घात झाला. मारेकरी जर गायकवाड वा पेशव्याचे असते तर आपल्यावर संशय न यावा म्हणून त्यांनी शास्त्र्यासह आणखी एक - दोन जणांची कत्तल करण्याची आज्ञा दिली असती. हटकून एकट्या शास्त्र्यालाच मारण्याची आज्ञा ते का करते ? आपल्या उपस्थितीत त्रिंबकजी वा गायकवाडांमार्फत शास्त्र्याचा खून घडवून आणण्याइतपत बाजीराव राजकारणात कच्चा नव्हता. तसेच बाजीरावच्या नकळत त्याच्या उपस्थितीत गायकवाड तरी शास्त्र्याचा खून का घडवून आणतील ? तसेच या खुनानंतरच्या इंग्रजांच्या संशयास्पद हालचाली देखील दुर्लक्षित करता येण्यासारख्या नाहीत.  

    खुनानंतरच्या घडामोडी :-
एल्फिन्स्टन पुण्याला ६ऑगस्टला आला. पाठोपाठ ९ ऑगस्टला बाजीरावाचे पुण्यात आगमन झाले. पेशवा पुण्यात येताच एल्फिन्स्टनने भेटीचा आग्रह धरला. मात्र पेशवा काही ना काही सबब सांगून भेट टाळण्याचा प्रयत्न करत होता. इकडे एल्फिन्स्टन गप्प बसला नव्हता. शास्त्र्याचा सल्लागार बापू मैराळ यांस रेसिडेन्सीत मुक्कामास बोलावले. खुनाचा आपल्या पद्धतीने तपास चालवून त्रिंबकजी हा शास्त्र्याच्या खुनाच्या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे त्याने पेशव्यास कळवून त्यास आपल्या स्वाधीन करण्याची मागणी पेशव्याकडे केली. ( दि. १५ ऑगस्ट १८१५ ) 

    पेशवा आपल्या मागण्या सहजासहजी मान्य करणार नही याची एल्फिन्स्टनला अटकळ असल्याने त्याने पुण्याच्या आसपास पलटणी जमवण्यास आरंभ केला. चारी दिशांना त्याची पत्रे खेळू लागली. इंग्रजांच्या या डावाला प्रतिशह म्हणून त्रिंबकजीनेही फौज जमवण्यास आरंभ केला. वास्तविक नेपाळ युद्धात इंग्रज अडचणीत असल्याने पेशव्यासोबत निर्णायक युद्ध खेळण्याची इंग्रजांची तयारी नव्हती. खुद्द एल्फिन्स्टनलाही याची जाणीव असल्याने युद्धाच्या धमकीवरच पेशव्याला वेसण घालण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता.    

    अलीकडच्या काळात दुसरा बाजीराव इंग्रजांच्या वाढत्या अरेरावीने वैतागून गेला होता. वसई व पंढरपूरच्या तहाने इंग्रजांनी त्याचे हात - पाय पुरते बांधत आणले होते. त्यामुळे संधी मिळताच इंग्रजांचे वर्चस्व कमी करण्याच्या प्रयत्नात बाजीराव होता. नेपाळ युद्धातील इंग्रजांची हलाखी समजल्यापासून त्रिंबकजीमार्फत त्याने इंग्रजांच्या विरोधात कारस्थाने रचण्यास आरंभही केला होता. परंतु यावेळी खुद्द पेशव्याची लष्करी तयारी बिलकुल नसल्याने नेपाळ युद्धाचा फायदा घेण्याची संधी त्यास साधता आली नाही. तेव्हा राजकीय डावपेचात तो इंग्रजांना पालथे पाडायच्या प्रयत्नास लागला. यातूनच गायकवाडांशी जवळीक करण्याची त्याची धडपड सुरु झाली होती. एल्फिन्स्टनला या गोष्टींची खबर असल्याने भावी युद्धाच्या दृष्टीने पेशव्याची उपद्रव क्षमता कमी करण्याच्या प्रयत्नास तो लागला. कंपनी सरकार विरुद्धची कट - कारस्थाने जरी त्रिंबकजीच्या मार्फत बाजीराव खेळवत असला तरी थेट पेशव्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे शक्य नसल्याने त्याने त्रिंबकजीला सावज बनवले. डेंगळ्याला ताब्यात घेतल्यास बाजीरावास जरब बसेल असा त्याचा होरा होता.

    इंग्रज फौजा पुण्याच्या आसपास येऊ लागल्याने बाजीराव विचारात पडला. इकडे गव्हर्नर जनरलनेही एल्फिन्स्टनला त्रिंबकजी प्रकरणी सर्वाधिकार दिल्याचे पत्र ता. १ सप्टेंबर १८१५ रोजी एल्फिन्स्टनकडे येऊन पोहोचले आणि हाच गंगाधर शास्त्र्याच्या खुनामध्ये इंग्रजांचा हात असल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे.  दि. २० जुलै रोजी शास्त्र्याचा खून झाल्यावर ६ ऑगस्टला एल्फिन्स्टन पुण्यास आला. म्हणजे तोपर्यंत तरी त्रिंबकजीच शास्त्र्याच्या खुनामागे असल्याचा त्याला पुरावा मिळाला नव्हता. कारण खुनाची चौकशी वा तपास त्याने पुण्याला येऊन केल्याचे इतिहासकारांनी नमूद केले आहे. याचाच अर्थ असा होतो कि, ता. २० जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान गव्हर्नर जनरलला शास्त्र्याचा खून झाल्याची खबर देण्यापलीकडे एल्फिन्स्टन जवळ दुसरी बातमी नव्हती. दि. ६ ऑगस्ट नंतर एल्फिन्स्टनने खुनाची चौकशी करून त्रिंबकजी दोषी असल्याचा शोध लावला. एल्फिन्स्टनच्या या शोधाची बातमी गव्हर्नर जनरलला ऑगस्ट महिना संपायच्या आत पोहोचली आणि त्यावर विचार करून त्याने एल्फिन्स्टनला या प्रकरणी दिलेलं मुखत्यारी पत्र पुण्यास पोहोचण्यास सप्टेंबर महिन्याची पहिली तारीख उगवली. याचा अर्थ उघड आहे. दि. ६ ऑगस्टच्या आधीच त्रिंबकजी हाच गुन्हेगार असल्याचा ' दिव्य शोध ' एल्फिन्स्टनने लावून तशा आशयाची पत्रे गव्हर्नर जनरलला पाठवली होती. अथवा ता. २० जुलैच्या घटनेचे वृत्त मिळताच त्याने त्रिंबकजीला या प्रकरणी अडकावण्याचे निश्चित करून त्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या होत्या. गंगाधराचा खून होताच एल्फिन्स्टन व गव्हर्नर जनरलने ज्या तातडीने पुढची पावले उचलली ती लक्षात घेता एकतर गंगाधराचा खून होणार असल्याचा एल्फिन्स्टन वा गव्हर्नर जनरलला दृष्टांत झाला होता यावर विश्वास ठेवावा लागेल किंवा इंग्रजांनीच शास्त्र्याचा काटा काढल्याचे मान्य करावे लागेल.    
    असो, गव्हर्नर जनरलचे पत्र मिळताच एल्फिन्स्टनची भाषा उग्राट होऊ लागली. पेशव्याने याच वेळी इंग्रजांशी युद्ध पुकारण्याचा बेत आखला खरा पण, अपुऱ्या तयारीमुळे बापू गोखल्याने त्यास मोडता घातला. तेव्हा इंग्रजांची समजूत काढण्यास्तव पेशव्याने ता. ५ सप्टेंबर रोजी त्रिंबकजीला अटक केली. परंतु त्रिंबकजीच्या अटकेचा हा केवळ देखावा असल्याचे ताडून एल्फिन्स्टनने सरळसरळ त्रिंबकजीला आपल्या ताब्यात देण्याची पेशव्याकडे मागणी केली. एल्फिन्स्टनची हि मागणी योग्य / अयोग्य होती याची चर्चा करण्याची यास्थळी आवश्यकता नाही. मुळात त्याने हि मागणी कोणत्या हेतूंनी केली हे पाहणे गरजेचे आहे. 


    आज ना उद्या आपल्याला बाजीरावासोबत युद्ध करावे  लागणार याची त्यास पूर्णतः जाणीव होती. तेव्हा बाजीरावास युद्धाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यापेक्षा आजच त्याची सर्व तयारी अपुरी असताना व त्याच्या सहाय्यकांची जूट बनलेली नसताना युद्ध पुकारलेलं काय वाईट ?  त्यातही जलदीने पुण्यावर हल्ला चढवून बाजीरावासच ताब्यात घेतले तर दीर्घकालीन संघर्षाची गरजच उरणार नाही असा एल्फिन्स्टनचा छुपा मनसुबा या सर्व घडामोडींमागे असल्याचे दिसून येते. इंग्रजांच्या चाली पेशवा व त्याचे सल्लागार ओळखून असल्याने सर्व शक्यतांचा विचार करून अखेर दि. ११ सप्टेंबर १८१५ रोजी पेशव्याने त्रिंबकजीस इंग्रजांच्या स्वाधीन केले.

    सारांश, गंगाधरशास्त्र्याच्या खुनापूर्वीचे पुणे - बडोदा - कलकत्ता दरबारांतील राजकारण पाहिले असता व शास्त्र्याच्या खुनानंतरच्या घटना लक्षात घेत गंगाधराच्या मृत्यूने एक इंग्रज अपवाद केल्यास पेशवा किंवा गायकवाड यांचा कसलाही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट होते. यावरून गंगाधराच्या खुनामागे पुणे वा बडोदा दरबारऐवजी कलकत्ता दरबारची प्रेरणा असल्याचे सिद्ध होते.

                                                                                                          
                                                                                   ( समाप्त )

संदर्भ ग्रंथ :-
१) मराठी रियासत ( खंड - ६, ७ व ८ ) :- गो. स. सरदेसाई
२) एल्फिन्स्टन :- प्रमोद ओक
३) मराठे व इंग्रज :- न. चिं. केळकर
४) सरदार बापू गोखले :- सदाशिव आठवले
५) पेशवाईच्या सावलीत :- ना. गो. चापेकर
६) मराठी दफ्तर ( रुमाल दुसरा ) :- वि. ल. भावे

रविवार, ७ सप्टेंबर, २०१४

गंगाधर शास्त्र्याच्या खुनाचे रहस्य ( भाग - ३ )


    स. १८०६ पासून १८१४ पर्यंतच्या सुमारे आठ वर्षांत गंगाधरशास्त्र्याच्या मदतीने इंग्रजांनी बडोदा दरबारास पूर्णतः पोखरून काढले. वॉकरने काही ना काही निमित्ताने गायकवाडांची फौज कमी करण्याचा उपक्रम चालवला पण तो पूर्णतः सिद्धीस जाण्यापूर्वीच स. १८१० मध्ये प्रकृती बिघडल्याने त्यास राजीनामा देऊन जावे लागले. त्याच्या जागी जेम्स कारनॅकची नेमणूक झाली. तसेच याच वर्षी बाबाजी आपाजी मरण पावल्याने रीजन्सी कौन्सिलमध्ये आता इंग्रज रेसिडेंट व शास्त्री प्रमुख होऊन बसले. मधल्या काळात रावजीने कैद केलेला व मेजर वॉकरने पेन्शनीत काढलेला कान्होजी गायकवाड इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारून उभा राहिला. शास्त्र्याच्या मदतीने इंग्रजांनी कान्होजीला पकडून मद्रासला बंदी म्हणून पाठवले. कान्होजी कसाही असला तरी राजघराण्याशी संबंधित पुरुष असल्याने इंग्रजांच्या या कृत्याने व त्यांस असलेल्या शास्त्र्याच्या पाठींब्याने बडोदा दरबारातील इंग्रज विरोधी मंडळी अतिशय नाराज झाली. इंग्रजांनी त्यांना मुद्दाम खिजवण्यासाठी शास्त्र्याची प्रतिष्ठा वाढवून त्यास सालीना ६० हजार तनखा व मुतालिकचा हुद्दा बहाल केला. पुण्यास खुरशेटजी मोदीने जो उपद्व्याप केला जवळपास त्याच धर्तीचा शास्त्र्याचा वर्तनक्रम बडोद्यास सुरु होता. त्यामुळे शास्त्र्याला अनेक विरोधक निर्माण झाले.

    सीताराम रावजी व दरबारी मुत्सद्द्यांनी प्राप्त संकटावर उतारा म्हणून पुन्हा एकदा पुण्यास साकडे घातले. यासाठी त्यांनी गोविंदराव बंधूजी गायकवाड याची पुण्यास रवानगी केली. याच सुमारास भगवंतरावास बाजीरावाने दिलेल्या अहमदाबाद सुभ्याच्या वहिवाटीची मुदत संपत आली होती. बाजीरावाच्या मनात अहमदाबाद आता गायकवाडांकडेच राहू द्यायचे नसल्याने  दुसऱ्या योग्य इसमांचा शोध घेण्यास आरंभ केला. या जागेसाठी पुण्याच्या इंग्रज रेसिडेंटचा सहाय्यक असलेला खुरशेटजी मोदी हा देखील प्रयत्नशील होता. मॅलेट पुण्यास रेसिडेंट म्हणून आला तेव्हापासून हे मोदी महाशय रेसिडेंटचे सहाय्यक म्हणून  कार्यरत होते. इंग्रज रेसिडेंट येत - जात पण मोदी मात्र पुण्यास तळ ठोकून राहिल्याने पुणे दरबारातील मुत्सद्द्यांशी व बाजीरावाशी त्याचे संबंध चांगलेच जुळले होते. स. १८०९ मध्ये तर बाजीरावाने त्याची कर्नाटकची सरसुभा म्हणून नेमणूकही केली. मोदीवर बाजीरावाची एवढी कृपादृष्टी असण्याचे मुख्य कारण म्हणजे तो आतल्या गोटातील बातम्या पेशव्यास कळवत असे. अर्थात, यामुळे मोदी इंग्रजांच्या डोळ्यांत आला नसता तर नवल ! परंतु, स. १८११ मध्ये एल्फिन्स्टन पुण्यास येईपर्यंत मोदीचा ' डबल एजंट ड्युटी ' चा खेळ सुरूच राहिला व इंग्रजांनीही तिकडे दुर्लक्ष केले. स. १८११ मध्ये एल्फिन्स्टन येताच त्याने मोदीस स्पष्ट शब्दांत, " एक तर पेशव्याची नोकरी करा अथवा आमची " असे सुनावल्याने मोदीने कर्नाटकच्या सुभेदारीचा राजीनामा दिला. तसेच त्रिंबकजी डेंगळेच्या मार्फत पेशव्यास निरोप पाठवून एल्फिन्स्टन पासून सावध राहण्याचा इशारा दिला. 

    खुरशेट मोदी हा इंग्रजांचा नोकर आतल्या अंगाने बाजीरावाची नोकरी करत असल्याचे आधी सांगितले आहेच. सीताराम रावजीचा पुण्यातील हस्तक गोविंदराव बंधूजी, त्रिंबकजी डेंगळे व अंतस्थरित्या खुरशेट मोदी हे त्रिकुट इंग्रजांविरुद्ध बाजीरावास भर देऊ लागले. या तिकडीचे खेळ बडोद्याच्या इंग्रजांना देखील बाधू लागले. तेव्हा बडोद्याचा रेसिडेंट जेम्स कारनॅकने एल्फिन्स्टनला मोदीला नोकरीतून काढण्याची सूचना केली तर एल्फिन्स्टनने कारनॅकला कळवले कि, त्याने गोविंदराव बंधुजीस बडोद्यास बोलावून घ्यावे. या परस्परविरुद्ध निरोपांनी दोन्ही बाजूला थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र इंग्रजांनी त्यातूनही हिकमतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

    गोविंदराव बंधूजी पुण्यास जाऊन बसला. त्याला खुद्द पेशवा व त्रिंबकजी डेंगळे उघड पाठिंबा देऊ लागले होते. भगवंतरावाकडे असलेली अहमदाबादची वहिवाट बाजीराव दुसऱ्या कोणाला तरी द्यायच्या विचारात असल्याचे सर्वांना समजले होते. इंग्रजांचा गुजरातमध्ये ठिकठिकाणी मुलुख असल्याने त्यांना गुजरातमध्ये पेशव्याच्या अंमलदाराचे येणे परवडण्यासारखे नव्हते. तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने अहमदाबाद गायकवाडांकडे राहाणे त्यांच्या हिताचे होते. त्याशिवाय बडोदेकर मंडळींना बाजीरावाचा असलेला छुपा पाठिंबाही त्यांना तोडायचा होता. गायकवाड मंडळींना इंग्रजांचा वरचष्मा नको होता. त्याचप्रमाणे अहमदाबाद पण त्यांना गमवायची नव्हती. या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी इंग्रजांनी गायकवाडांचा प्रतिनिधी म्हणून गंगाधरशास्त्रीस पुण्याला पाठवण्याचे ठरवले. अर्थात गंगाधरशास्त्र्याचा पूर्वेतिहास पाहता इंग्रजांनी त्याचीच निवड का केली हे सहज लक्षात येते.

    गंगाधरशास्त्रीचे घराण्याकडे हरीपंत फडक्याचे उपाध्येपण होते. गंगाधरचा जन्म स. १७७५ असून वयाच्या आठव्या वर्षी त्यास पेशव्यांच्या कर्नाटक स्वारीत दफ्तरी कारकुनाची नोकरी मिळाली होती. सवाई माधवरावाची कारकीर्द गंगाधरने जवळून पाहिली. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीच्या आरंभी बाळोजी कुंजरच्या मार्फत त्याने बाजीरावाची मर्जीही संपादून घेतली होती. यामुळे व आणखी एका कारणाने त्याच्यावर नाना फडणीसची गैरमर्जी झाली. नानाचा सासरा दादा गद्रे याची एक रक्षा गंगाधारावर अनुरक्त झाली. त्यामुळे चिडलेल्या गद्र्याने गंगाधरच्या वडिलांस समज दिली. तेव्हा पुण्यास राहणे धोक्याचे मानून गंगाधरचा बाप कृष्णभट --- आपल्या मुलास घेऊन रावजी आपाजी सोबत गुजरातला गेला. बडोदा दरबारातील घडामोडीत गंगाधरला रावजी आपाजी मार्फत वॉकरचा आश्रय मिळाला व त्याचे नशीब फळफळले. एल्फिन्स्टनने व इतरांनी त्याचे जे वर्णन लिहून ठेवले आहे त्यावरून गंगाधरच्या एकूण व्यक्तीमत्वाची थोडी कल्पना येते. ' शास्त्री मजकूर हा धूर्त, हिकमती, हुशार असा असून संभाषण कला त्यास चांगल्या प्रकारे अवगत होती. तत्कालीन समजुतीनुसार त्याचे बोलणे विनोदी असल्याने तो माणसांत सहज मिसळे. तत्कालीन प्रघातानुसार त्याचा हुद्दा व ऐश्वर्य उंचावले असल्याने स्वभावात आवश्यक तो गर्विष्ठपणाही उतरला नसल्यास नवल. तसेच बराचसा काळ इंग्रजांच्या सहवासात गेल्याने सहज संभाषणात देखील इंग्रजी शब्द घुसडून देण्यची त्यास सवय जडली होती. बोलताना तो पेशवा व त्याच्या कारभाऱ्याचा Dam आणि Rascal या शब्दांत गौरव करायचा. तसेच इतरांचाही तो अशाच प्रकारे उद्धार करे. उदा :- होळकराविषयी त्याचे मत " बहुत ट्रीकवाला था, लेकिन बडा अकलमंद काकाय ( Cockeye ) था " असे होते.पुण्याला आल्यावर त्याने आपल्या ऐश्वर्याचे मुद्दाम प्रदर्शन करण्यास आरंभ केला. सर्व शहराच्या नजरेत भरेल अशा तऱ्हेने तो स्वतःची स्वारी काढत असे. ' 

    गंगाधरशास्त्री हा पूर्वी पेशव्यांचा नोकर व बाजीरावच्या मर्जीतला असल्याचे इंग्रजांना माहिती होते. मात्र, आपल्याच एकेकाळच्या नोकराशी आता बरोबरीच्या नात्याने वागण्याचा भलताच प्रसंग त्यांनी बाजीरावावर आणला होता. इंग्रजांनी हे मुद्दाम केले कि नकळतपणे झाले ? असो, गंगाधरशास्त्र्याच्या पुण्यातील नेमणुकीविषयी इतिहासकारांनी परस्पर विरोधी विधाने केली आहेत. त्यानुसार शास्त्र्याला बाजीरावानेच पुण्यास बोलावले इथपासून बडोदेकरांनी गंगाधरास काही ना काही निमित्ताने पुण्यास रवाना केले इथपर्यंतची मते मांडली गेली आहेत. परंतु शास्त्र्याचा पूर्वेतिहास व बडोदा दरबारातील इंग्रजांचा प्रभाव लक्षात घेता इंग्रजांनीच त्यास बडोदा दरबारच्या वतीने पण अंतस्थरित्या आपला हस्तक म्हणून पुण्यास पाठवल्याचे स्पष्टपणे दिसून येते. याविषयी अधिक तपशीलवार असे सांगता येईल कि, गंगाधरशास्त्र्याचे अस्तित्व बडोदेकर मंडळींना जरी असह्य झाले असले तरी इंग्रजांच्या परवानगीशिवाय ते आपला वकील म्हणून वा कोणत्याही कारणांनी शास्त्र्यास दूर करू शकत नव्हते. त्याचप्रमाणे बाजीरावही विशिष्ट व्यक्तीस आपल्या दरबारी वकील म्हणून गायकवाडांनी नेमावे अशी सक्ती वा आग्रही मागणी करू शकत नव्हता. आणि केली तरी इंग्रज थोडी मनावर घेणार होते ? यावरून इंग्रजांनीच शास्त्र्यास पुण्याला पाठवल्याचे निःसंशयरित्या सिद्ध होते.

    गंगाधरशास्त्र्याने स. १८१४ च्या फेब्रुवारी - मार्च दरम्यान पेशव्याची भेट घेतली. यावेळी एल्फिन्स्टन देखील हजर होता. गायकवाडांच्या वकीलासोबत बोलणी करण्यास बाजीराव जरी उत्सुक असला तरी एकेकाळचा आपला नोकर आपल्याच सरदाराचा इंग्रजांच्या पाठींब्याने वकील म्हणून बोलणी करण्यास आल्याने बाजीराव नाराज होता. परंतु राजकीय शिष्टाचार म्हणून त्यास शास्त्र्याची उठाठेव करणे प्राप्तच होते. गायकवाडांकडील नजराण्याच्या तुंबलेली रक्कम व अहमदाबादच्या सुभ्याची वहिवाट असे दोन प्रमुख मुद्दे पुणे - बडोदा दरम्यान वादाचे विषय बनले होते.  यामुळे गायकवाड हे पेशव्यांचे मांडलिक कि इंग्रज म्हणतात त्याप्रमाणे ते स्वतंत्र संस्थानिक असा प्रश्न निर्माण झाला. वास्तविक इंग्रजांनी वेळोवेळी जे पेशवा व इतर मराठी सरदारांशी तह केले होते त्यांतील सुसूत्रबद्धतेच्या अभावी हे तांत्रिक पण गंभीर मुद्दे उपस्थित झाले होते. हरएक बाबतीत इंग्रजांची मध्यस्थी आल्याने कोणतीही बाब त्यांच्या सहभागाशिवाय निकाली निघेना व प्रत्येक वेळी इंग्रज आपलाच फायदा बघत असल्याने वादग्रस्त मुद्दे तसेच राहात होते. उदा :- अहमदाबादचा सुभा पेशव्यांचा असून तो कोणाला दयावा न दयावा हा पेशव्यांच्या मर्जीचा प्रश्न. परंतु चौदा - पंधरा वर्षे अहमदाबादची वहिवाट केलेल्या गायकवाडांना हा प्रदेश सोडवेना व गुजरातमध्ये पेशव्याचा सरदार येणे इंग्रजांना अडचणीचे असल्याने त्यांनाही अहमदाबाद विषयी गायकवाडांचा पुळका आला. तेव्हा तोडगा निघावा कसा ?

     गंगाधरशास्त्री, गायकवाड मंडळी व इंग्रजांच्या मनात काहीही असले तरी अहमदाबादचा निर्णय बाजीरावाने घेतला होता. त्रिंबकजी डेंगळे हा यावेळी बाजीरावाचा मुख्य कारभारी असून इंग्रज वकिलांशी बोलताना पूर्वीच्या कारभाऱ्यांप्रमाणे नरमाईचे धोरण न स्वीकारता तो पेशव्यांचा कारभारी या नात्यानेच बोलत असे. तेव्हा अशा इसमास अहमदाबाद देणे श्रेयस्कर असे जाणून बाजीरावाने त्याची नेमणूक अहमदाबादेस केली. त्रिंबकजीने त्या प्रांती स्वतः न जाता आपल्या तर्फेने मुतालिक नेमून दिला. पेशव्याच्या या कृत्याने शास्त्री व इंग्रज सावध झाले. शास्त्र्याने बडोद्याच्या रेसिडेंटास सीतारामास अटकेत ठेवण्याची विनंती केली. त्यावरून स. १८१४ च्या सप्टेंबर मध्ये कारनॅकने फत्तेसिंहाकडून सीतारामास कैदेत टाकले. यांमुळे पेशवा - इंग्रज यांचा गायकवाड प्रकरणी पहिला सामना बरोबरीत सुटला. यानंतर गायकवाडांकडील बाकी रकमेचा प्रश्न ऐरणीवर आला. बाजीराव रोख रक्कम अथवा ठराविक उत्पन्नाचा प्रदेश तोडून मागत होता. बाजीरावाच्या मागणीनुसार दोन ते तीन कोटींचा भरणा करण्याची गायकवाडांची आर्थिक शक्ती नव्हती व प्रदेश तोडून देण्याचेही त्यांना मान्य नव्हते. त्याउलट गायकवाडांनी पेशव्यास प्रदेश तोडून दयावा असे इंग्रजांचे मत होते.  कारण, गायकवाड जितके दुर्बल होतील तितके त्यांना हवेच होते. या विचित्र परिस्थितीने शास्त्र्याची वकीलात पूर्णतः फसण्याची चिन्हे दिसू लागली. खुद्द एल्फिन्स्टनने देखील स. १८१४ चा दसरा झाल्यावर शास्त्र्याला बडोद्याला परत जाण्याची सूचना केली.

    परंतु पुणे - बडोदा दरम्यानची मध्यस्थपणाची भूमिका इंग्रजांनी सहजासहजी सोडली नव्हती. वरवर जरी एल्फिन्स्टनने शास्त्र्यास पुणे सोडायला सांगितले असले तरी त्याचे मन ओळखून शास्त्री पुण्यातच पाय मुरगाळून बसला. परिणामी बडोद्याहून इंग्रज विरोधी मंडळींनी आनंदरावाचा मुलगा भगवंतराव यास स. १८१५ च्या आरंभी पुण्यास पाठवले. इंग्रजांच्या परवानगी शिवाय बडोदेकरांनी केलेला हा उपदव्याप इंग्रजांना चांगलाच झोंबला. त्याशिवाय खुद्द पेशव्याने भगवंतरावाचे स्वागत भरदरबारी केल्याने इंग्रजांना संभाव्य संकटाची चाहूल लागली. एल्फिन्स्टनने बाजीरावास स्पष्टपणे सांगितले कि, " गोविंदराव बंधूजी व भगवंतराव हे सीताराम रावजीचे पक्षपाती आमच्या विरुद्ध खटपट करतात तेव्हा त्यांस बडोद्याला पाठवून द्यावे. अन्यथा आम्ही शास्त्र्याची बडोद्यास रवानगी करू. " त्यावर बाजीरावाने, गायकवाडांशी बोलणी करण्यास आपणांस इंग्रजांच्या मध्यस्थीची जरूर नसल्याचे सांगितले. याचा योग्य तो अर्थ घेऊन एल्फिन्स्टनने ताबडतोब शास्त्र्यास पुण्यातून निघून जाण्याची सूचना केली. या क्षणी खऱ्या अर्थाने पुणे - बडोदा दरम्यानची इंग्रजांची मध्यस्थी संपुष्टात आली होती. शास्त्र्याने एल्फिन्स्टनची सूचना मनावर न घेता पुण्यातच ठाण मांडून बसण्याचे ठरवले. तेव्हा एल्फिन्स्टन पुढील तयारीस लागला. त्याने बडोद्यास कारनॅकला लिहून आनंदराव मार्फत भगवंतराव व गोविंदराव यांना परत बोलावण्याविषयी पत्रे पाठवली. परंतु हे दोघे काही पुण्यातून हलेनात. एल्फिन्स्टनने पेशव्याकडे त्यांना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली तर पेशवा त्यास दाद देईना. त्यात भर म्हणून नेपाळबरोबर चाललेल्या युद्धात कंपनीची पीछेहाट होत असल्याने इंग्रजांना पडती भूमिका घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

    वस्तुतः इंग्रजांची अंतस्थिती चांगलीच माहिती असणाऱ्या गंगाधरने आता पुणे सोडायला हवे होते परंतु अतिआत्मविश्वास म्हणा वा सीतारामची स्पर्धा त्यांस नडली. एल्फिन्स्टनची सूचना म्हणजे आज्ञा धुडकावून त्याने एकप्रकारे आपल्याच पाठीराख्यांना दुखावले. स. १८१५ चा फेब्रुवारी महिना पुढील राजकीय नाट्याची नांदी ठरला. या महिन्यात वसंतपंचमीच्या दिवशी म्हणजे ता. १४ फेब्रुवारी रोजी बाजीरावाने भरदरबारी भगवंतराव गायकवाडाची भेट घेतली. याच काळात एल्फिन्स्टनने बडोदा - पुणे दरबार दरम्यानची कंपनीची मध्यस्थी काढून घेतली. तसेच आपल्या वकिलातीतून खुरशेटजी मोदीस त्याने सक्तीची निवृत्ती स्वीकारायला भाग पाडून गुजरात मधील आपल्या गावी जाऊन राहण्याचा आदेश दिला. मोदीची आजवरची सेवा लक्षात घेऊन त्यांस दरमहा ५०० रु. ची पेन्शनही बांधून दिली. मोदीची हाकलपट्टी हा बाजीराव, त्रिंबकजी व मोदीस इंग्रजांचा इशारा होता. दि. २७ फेब्रुवारी १८१५ रोजी मोदी विषप्रयोगाने मरण पावला. काहींच्या मते त्याने आत्महत्या केली तर काहींच्या मते त्याचा खून झाला. मोदीच्या मृत्यूने कोणाचा फायदा होता हे सर्वांना माहिती असल्याने त्याविषयी या ठिकाणी अधिक चर्चा करत नाही. मोदीच्या खुनाने खरेतर गंगाधरशास्त्र्याचे डोळे उघडायला हवे होते. परंतु तसे झाले नाही.

    इंग्रजांची पुणे - बडोदा दरबार दरम्यानची मध्यस्थी दूर होताच मार्च - एप्रिल मध्ये बाजीरावाने त्रिंबकजीच्या मार्फत गंगाधरास आपल्या पक्षास मिळवून घेण्याचा प्रयत्न केला. पुणे दरबारच्या या बदललेल्या भूमिकेने शास्त्री अचंबित झाला कि गोंधळात पडला माहिती नाही परंतु, पेशवे दरबारी फक्त गायकवाडांचा प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावण्यास तो हळूहळू तयार होऊ लागला. राजकीय पटलावर इंग्रजांची पीछेहाट यामुळे सुरु झाली. एल्फिन्स्टनने प्रसंगावर नजर देऊन निष्क्रियतेचे धोरण स्वीकारले. दरम्यान ता. १९ एप्रिल १८१५ रोजी शास्त्र्याने आपल्या मुलाच्या मुंजीचा समारंभ मोठ्या थाटाने करून उपस्थित ब्राम्हणांना शालजोड्या वाटल्या. हा पेशव्याचा अपमान  असला तरी राजकारणावर नजर देऊन त्याने तो गिळून टाकला. शास्त्री आपल्या पक्षात मिळत असल्याचे पाहून पेशव्याने त्याच्यासमोर दोन प्रलोभने मांडली. (१) आपले प्रमुख कारभारी पद देऊ केले (२) आपल्या मेहुणीचा त्याने शास्त्र्याच्या मुलाशी लग्न लावून देण्याचा बेत आखला. शास्त्री पेशव्याच्या कृपादृष्टीने भांबावला. पेशव्याचे कारभारीपद स्वीकारण्याविषयी त्याने एल्फिन्स्टनला सल्ला विचारला. एल्फिन्स्टनला हि बाब पसंत पडली नाही.  गायकवाडांच्या वकिलाने पेशव्यांचे कारभारीपद स्वीकारू नये असे त्याचे मत पडले. परंतु माझ्या मते, आजवर अंतस्थरित्या इंग्रजांची नोकरी करणारा शास्त्री बराचसा पेशव्याच्या कह्यात गेल्याचे एल्फिन्स्टनला यानिमित्ताने स्पष्टपणे कळून चुकले होते.

                                                                                                 ( क्रमशः )



शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४

तुकाजी व म्हंकाळ / मंकाळ नाईक


    ज्यांच्यासमोर अटकेपार चमकलेल्या समशेरीदेखील आपली करामत
दाखवू शकल्या नाहीत अशा इंग्रजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या आद्य क्रांतीकारक नरवीर उमाजीराजे नाईक यांच्या प्रतापी मुलांची माहिती फारच थोड्या लोकांना ठाऊक आहे. तुकाजी व म्हंकाळ / मंकाळ या दोघा बंधूंनी आपल्या पित्याच्या पश्चात इंग्रजांविरुद्ध पुकारलेला स्वातंत्र्यलढा तसाच नेटाने चालू ठेवला. या स्वातंत्र्य संग्रामातील एका रोमांचकारी घटनेची माहिती या ठिकाणी देत आहे.
 
    त्याचे असे झाले कि, स. १८४६ मध्ये इंग्रज  अधिकारी  हट  साहेबाचा
मुक्काम  पुण्यास  होता. त्याच्या बंगल्यावर नाईक बंधुंच्या टोळीने धाड
मारली मात्र त्यावेळी त्यांचा एक साथीदार बापू हा इंग्रजांच्या हाती
लागला . त्याला सासवड येथील पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले . आपल्या सोबत्यास कोणत्याही परीरीस्थितीत  सोडवायचेच असा नाईक बंधुंनी निश्चय केला आणि त्यानुसार त्यांनी एका अतिशय धाडसी बेताची आखणी केली. त्यावेळच्या प्रघातानुसार कैद्याला नैसर्गिक विधी करता बाहेर नेले जायचे. त्यानुसार बापूलाही बाहेर काढले जात असे. हीच एक सुवर्णसंधी होती व ती साधण्याचा नाईक बंधूंनी मनसुबा आखला.
    

    त्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधी बापूला परसाकडे चांबळी नदी वर नेण्यात आले. त्यावेळी त्याच्या  सोबत दोन हत्यार बंद शिपाई होते व बापूच्या पायात बेड्या होत्या. अशाच संधीची  वाट बघत  झाडीत दबा धरून बसलेल्या नाईक बंधूंनी आपल्या पाच सहा निधड्या छातीच्या सोबत्यांसह बापूच्या बरोबर असलेल्या पहारेकऱ्यांवर हल्ला चढवून बापूला पायातील बेडी सकट उचलून नेले. या गोंधळाची चाहूल लागताच सासवड ठाण्यातील शिपाई व घोडेस्वार नाईक बंधूंच्या पाठीवर धावून आले. परंतु नाईक  बंधूंनी व त्याच्या शूर साथीदारांनी शत्रूचा मुकाबला करत यशस्वीपणे माघार घेतली.
 

    त्या काळी इंग्रजांच्या कैदेतून सुठका करून घ्यायची म्हणजे वाघाच्या
जबड्यातून साजिवंत सावज सोडवण्यासारखं मानलं जात असे. अशाकाळात उमाजी राजांच्या  मुलांनी आपल्या सोबत्याला सुखरूप परत तर  आणलंच पण या धाडसी मोहिमित त्यांना आपला एकही मनुष्य गमवावा लागला नाही यातच त्यांच्या कल्पक नेतृत्वाची चुणूक दिसून  येते.