ज्यांच्यासमोर अटकेपार चमकलेल्या समशेरीदेखील आपली करामत
दाखवू शकल्या नाहीत अशा इंग्रजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या आद्य क्रांतीकारक नरवीर उमाजीराजे नाईक यांच्या प्रतापी मुलांची माहिती फारच थोड्या लोकांना ठाऊक आहे. तुकाजी व म्हंकाळ / मंकाळ या दोघा बंधूंनी आपल्या पित्याच्या पश्चात इंग्रजांविरुद्ध पुकारलेला स्वातंत्र्यलढा तसाच नेटाने चालू ठेवला. या स्वातंत्र्य संग्रामातील एका रोमांचकारी घटनेची माहिती या ठिकाणी देत आहे.
त्याचे असे झाले कि, स. १८४६ मध्ये इंग्रज अधिकारी हट साहेबाचा
मुक्काम पुण्यास होता. त्याच्या बंगल्यावर नाईक बंधुंच्या टोळीने धाड
मारली मात्र त्यावेळी त्यांचा एक साथीदार बापू हा इंग्रजांच्या हाती
लागला . त्याला सासवड येथील पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले . आपल्या सोबत्यास कोणत्याही परीरीस्थितीत सोडवायचेच असा नाईक बंधुंनी निश्चय केला आणि त्यानुसार त्यांनी एका अतिशय धाडसी बेताची आखणी केली. त्यावेळच्या प्रघातानुसार कैद्याला नैसर्गिक विधी करता बाहेर नेले जायचे. त्यानुसार बापूलाही बाहेर काढले जात असे. हीच एक सुवर्णसंधी होती व ती साधण्याचा नाईक बंधूंनी मनसुबा आखला.
त्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधी बापूला परसाकडे चांबळी नदी वर नेण्यात आले. त्यावेळी त्याच्या सोबत दोन हत्यार बंद शिपाई होते व बापूच्या पायात बेड्या होत्या. अशाच संधीची वाट बघत झाडीत दबा धरून बसलेल्या नाईक बंधूंनी आपल्या पाच सहा निधड्या छातीच्या सोबत्यांसह बापूच्या बरोबर असलेल्या पहारेकऱ्यांवर हल्ला चढवून बापूला पायातील बेडी सकट उचलून नेले. या गोंधळाची चाहूल लागताच सासवड ठाण्यातील शिपाई व घोडेस्वार नाईक बंधूंच्या पाठीवर धावून आले. परंतु नाईक बंधूंनी व त्याच्या शूर साथीदारांनी शत्रूचा मुकाबला करत यशस्वीपणे माघार घेतली.
त्या काळी इंग्रजांच्या कैदेतून सुठका करून घ्यायची म्हणजे वाघाच्या
जबड्यातून साजिवंत सावज सोडवण्यासारखं मानलं जात असे. अशाकाळात उमाजी राजांच्या मुलांनी आपल्या सोबत्याला सुखरूप परत तर आणलंच पण या धाडसी मोहिमित त्यांना आपला एकही मनुष्य गमवावा लागला नाही यातच त्यांच्या कल्पक नेतृत्वाची चुणूक दिसून येते.
1 टिप्पणी:
अत्यंत धाडसी कृत्य याबद्दल आधी कधी वाचण्यात आले नाही
टिप्पणी पोस्ट करा