सोमवार, १३ जानेवारी, २०१४

पानिपतचे तिसरे युद्ध :- एक धावता आढवा

                                     


                दि. १४ जानेवारी १७६१ रोजी मराठी व अफगाण सैन्यात पानिपत येथे घनघोर युद्ध झाले. या संग्रामात मराठी सैन्याचे दोन तरुण सेनापती, शेकडो अनुभवी व उमदे सरदार, हजारो रणशूर शिपाई मारले गेले. परंतु, पराभव पदरी पाडून घेताना देखील त्यांनी शत्रूला असा निर्णायक भीमटोला हाणला की, पुढे काही वर्षे हिंदुस्थानच्या राजकारणात अफगाण पक्षाने हस्तक्षेप करण्याचे धाडस केलं नाही. 

                  पानिपत विषयावर आजपर्यंत अनेक -- अगदी देशी - परदेशी इतिहासकारांनी लेखन केलं आहे व करत आहेत. याच विषयावर आधारित सुमारे साडेपाच - पावणेसहाशे पृष्ठांचा ' पानिपत असे घडले ' हा माझा ग्रंथ दीड वर्षांपूर्वी प्रकाशित झाला आहे. परंतु, असे असले तरी या विषयाची मनावरील मोहिनी मात्र  अजून कायम आहे. ' पानिपत असे घडले ' लिहिताना व त्या विषयावर आजवर चिंतन - मनन करत असताना लष्करी डावपेचांच्या दृष्टीकोनातून पाहता दि. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतावर नेमके असे काय घडले कि, ज्याचा फटका मराठी  पक्षाला बसला याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यांपैकी मला जी उत्तरं गवसली ती येथे मी मांडत आहे. अर्थात, वाचक त्या सर्व मुद्द्यांशी सहमत होतील असे नाही, पण असहमतीतूनच नव्या संशोधनास आणि संशोधकांस प्रेरणा मिळतील याची मला पूर्णतः जाणीव आहे. 

                    ता. १४ जानेवारीचा संग्राम घडण्यापूर्वीचे मराठी सैन्यप्रमुख सदाशिवरावभाऊ व अफगाण पक्षप्रमुख अहमदशहा अब्दाली यांचे लष्करी डावपेच अभ्यासता दोघांनीही बळकटपणे बचावाचे आणि थोडे - फार आक्रमणाचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. दोन्ही पक्षांची तयारी जबरदस्त असल्याने परस्परांवर चालून भयंकर अशा युद्धाला तोंड फोडण्याची हिंमत दोघांनाही झाली नाही. लष्करीदृष्ट्या दोघांनी परस्परांना कैचीत पकडले होते. भाऊची छावणी अब्दालीच्या परतीच्या वाटेवर होती तर अब्दालीने भाऊचा दिल्लीकडे जाण्याचा मार्ग रोखला होता. १ नोव्हेंबर ते १३ जानेवारीपर्यंत दोन्ही पक्ष समोरासमोर असे पानिपतावर तळ ठोकून राहिले. पैकी, नोव्हेंबर - डिसेंबर पर्यंत मराठी पक्षाची चलती होती तर जानेवारीपासून अब्दालीचे पारडे जड होऊ लागले. 

                  अब्दालीने भाऊचा दिल्लीकडचा मार्ग रोखला असला तरी लष्करीदृष्ट्या तो एका फार मोठ्या कात्रीत सापडला होता. दिल्लीतील मराठी सैन्याचे ठाणे तसेच शाबूत राखले होते. तेथील पथक्यांनी आसपासच्या परिसरातील मराठी मामलेदारांच्या साथीने अब्दालीची पिछाडी झोडपून काढली असती तर त्याला विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागले असते. भाऊलाही हेच हवे होते. परंतु, दिल्लीतील मराठी सैन्य अगदीच निष्क्रिय राहिल्याने अब्दालीची पिछाडी सुरक्षित राहिली. तरीही सावधगिरी म्हणून पठ्ठ्याने डिसेंबरमध्ये आपली छावणी यमुनाकिनारी नेऊन तिथे नावांचा पूल उभारून रोहील्यांच्या प्रदेशाशी आपले दळण - वळण कायम राखले. इकडे भाऊचा दक्षिणेशी संबंध तुटला असला तरी पंजाबातील शिखांशी त्याचे संधान जुळलेले होते. परंतु, त्यांच्याकडून अन्नधान्य वगळता इतर कसलीही भरीव मदत होऊ शकली नाही. नोव्हेंबर - डिसेंबर असे दोन महिने उलटून गेल्यावर अब्दालीने हळूहळू आपले जाळे विणायला आरंभ केला. त्याच्या पाठीशी जसे दिल्लीला मराठी सैन्याचे ठाणे होते, तसेच त्याने भाऊच्या पाठीवर कुंजपुरा येथे दिलेरखानाच्या रूपाने एक लष्करी केंद्र निर्माण केले. 

                     हा दिलेरखान कुंजपुऱ्याचा किल्लेदार नजाबतखान याचा मुलगा. भाऊने कुंजपुरा घेतला त्यावेळी किल्ला लढवताना प्राणांतिक जखमा झाल्याने नजाबतखानाचा मृत्यू झाला होता. दिलेरखान  बापाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तसेच कुंजपुऱ्याची आपली सत्ता परत एकदा प्रस्थापित करण्यासाठी झटत होताच. त्याला अब्दालीची साथ लाभल्याने त्याने कुंजपुऱ्याचे ठाणे आपल्या ताब्यात घेऊन भाऊचा पंजाबशी असलेला संपर्क साफ तोडला. ' जे इच्छी परा तेयेई घरा ' अशी भाऊची स्थिती झाल्याने त्याने ता. ११ जानेवारी रोजी सर्व सरदारांच्या विचाराने दि. १४ जानेवारी रोजी पानिपतची छावणी सोडून पूर्व दिशेस सुमारे १५ - १६ किलोमीटर्स अंतरावरील यमुना नदीच्या किनारी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत लष्कराची रचना गोलाकार करण्याचे ठरले. तसे शत्रू अंगावर आला तर तेवढ्यापुरता त्याचा सामना करून पुढचा मार्ग तुडवायचा असे ठरले. या ठिकाणी वाचकांनी लक्षात घ्यावे की, शत्रू अंगावर आला असता त्यास सडकून काढण्यासाठी गोलातून बाहेर पडणे अत्यावश्यक होते व तशी मुभा खुद्द भाऊने आपल्या सरदारांना दिलेली होती.   

                      लष्कराचा गोल हा पोकळ असून चारी बाजूंनी लढाऊ पथके व तोफा पेरून मध्यभागी बुणगे, कबिले व जखमी - आजारी सैनिक अशी त्याची ढोबळ रचना होती. शत्रूचा गोलावर जो हल्ला होणार होता तो प्रामुख्याने तीन बाजूंनी. हे लक्षात घेऊन या तिन्ही बाजूंवर बळकट लष्करी पथके नेमण्याचे भाऊने ठरवले. त्यानुसार आघाडी इब्राहीम व त्याची गारदी पलटणे, मध्यभाग स्वतः भाऊच्या हुकुमतीखाली  पिछाडीचे रक्षण त्याने होळकरांवर सोपवले. जोवर हा गोल पूर्वेकडे चालत होता तोवरच या स्वरुपाची रचना -- म्हणजे गोलाची आघाडी - पिछाडी होती. परंतु, जेव्हा युद्धाला तोंड फुटून गोलाचे तोंड पूर्वेकडून दक्षिणेकडे वळले, तेव्हा आघाडी व पिछाडी म्हणजे मराठी सैन्याची डावी आणि उजवी बगल बनले ! पानिपतची छावणी सोडताना मराठी लष्करी परंपरेनुसार निसर्गाच्या मदतीचाही आधार घेण्यात आला होता. नोव्हेंबरपासून उत्तरोत्तर उत्तर हिंदुस्थानात अतिशय कडाक्याची थंडी पडते. कित्येकदा दुपारपर्यंत थंडीच्या प्रभावाने धुक्याचा दाट असा पडदा राहत असे तर कधी सकाळी सूर्य उगवल्यावर काही काळाने धुके गायब होत असे. भाऊने या धुक्याचा आश्रय घेऊन भल्या पहाटे -- म्हणजे सुर्योदयापूर्वीच पानिपतचा तळ उठवून यमुनेकडे जायचे ठरवले. शत्रूच्या नकळत जितके अंतर कापता येईल तितके कापण्याचा त्याचा बेत होता. परंतु, त्याच्या दुर्दैवाने धुक्याची हवी तशी साथ त्याला लाभली नाही आणि अब्दालीच्या टेहळणी पथकांनी शत्रू खंदकाबाहेर पडत असल्याची बातमी त्यास वेळेवर आणून दिल्याने अफगाण सेना युद्धासाठी सज्ज झाली. 

            दिनांक १४ जानेवारी १७६१ रोजी युद्धाला तोंड लागण्याआधी व युद्ध संपेपर्यंत मराठी फौजांचा रोख दिल्लीकडे नसून यमुनेकडे असल्याचे ताडण्यात अब्दालीला साफ अपयश आले. त्याला शेवटपर्यंत शत्रूच्या उद्देशाचा अंदाज काही आलाच नाही. त्याच्या मते, मराठी फौजा फक्त दिल्लीकडेच जाणार व मार्गात आपल्या छावणीचा अडथळा असल्याने ते आपल्यावर हल्ला चढवणार.  या दृष्टीने त्याने आपल्या लष्कराची रचना केली. उजव्या बाजूला अमीरबेग व बरकुरदारखान हे त्याचे अफगाण सरदार. त्यांना लागून डाव्या हाताला हाफिज रहमत, दुंदेखान इ. रोहिला सरदार उभे राहिले. मध्यभाग अफगाण वजीर शहावलीकडे सोपवण्यात आला. त्याच्या डाव्या बाजूला सुजा, जहानखान व नजीब असून नजीबच्याही डावीकडे शहापसंदखान हा अब्दालीचा सरदार होता. हि झाली संरक्षणाची पहिली फळी. यांच्या मागे अब्दालीने दुसरी फळी उभारली. अमीरबेग व रोहिला सरदारांच्या पाठी त्याने हाजी जमालखान यास तर शहापसंद - नजीबच्या मागे मुल्ला सरदार रोहिला यांना नेमले व तो स्वतः वजिराच्या मागे राखीव सैन्य घेऊन उभा राहिला. पानिपतच्या युद्धात अब्दालीने आक्रमक भूमिका स्वीकारली ती दुपारनंतर. पण तत्पूर्वी तो देखील बचावाच्याच दृष्टीने युद्धास ठाकला होता हे लक्षात घ्यावे. 

              पानिपतच्या संग्रामात सहभागी असलेल्या या दोन्ही पक्षांची शस्त्रास्त्रे  काय होती याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. धनुष्य - बाण, भाले, तलवारी, सुरे, उंटावरील तोफा अर्थात जंबुरके, जेजाला, लांब व कमी पल्ल्याच्या तोफा, धुराचा पडदा निर्माण करणारे बाण इ. बाबतीत उभय पक्ष समसमान होते. बंदुकांच्या बाबतीत बोलायचे तर मराठी सैन्यात गारद्यांची बंदूकधारी पायदळ पलटणे होती तर तशीच पलटणे नजीबखानाकडेही होती. अर्थात, गारद्यांच्या तुलनेने त्यांचा दर्जा निम्न होता. गारद्यांच्या तोफा आधुनिक अशा फ्रेंच पद्धतीच्या होत्या तर हुजुरातीच्या व अब्दालीच्या तोफा काहीशा जुनाट पण परिणामकारक मारा करणाऱ्या होत्या. अफगाण स्वार जसे बंदूक बाळगून असत तसेच मराठी सैन्यात देखील काही स्वार होते. पण घोडेस्वारांची बंदूकधारी पथके उभय पक्षात नव्हती. 

                                     युद्धातील ठळक घटना 

                                    

१) अब्दालीची सैन्यरचना बचावाची असल्याने व त्याला आपल्या छावणीचे रक्षण करायचे असल्यामुळे त्याची सैन्यदले एकमेकांशी काही अंतर राखून समांतर असे उभे राहून फळी धरण्याचा प्रयत्न करू लागली. परंतु, घाई - घाईत त्याच्या उजव्या बाजूवरील पथकांत व मध्यभागीच्या तुकडीत जास्त अंतर पडल्याने रोहील्यांचे सैन्य गारद्यांच्या कुशीवर आले. शत्रू नजीक आल्याचे पाहताच गारद्यांनी तोफांना बत्ती दिली. परंतु, रोहिले गारद्यांच्या तोफांना न जुमानता पुढे येत असल्याचे पाहताच विंचूरकर, गायकवाड प्रभूती सरदार गोलातून बाहेर पडले व शत्रूवर तुटून पडले. रोहिला फौज गोलात येऊन थेट भिडली असती तर गोलातच युद्ध पेटले असते, ते टाळण्यासाठी मराठी सरदार बाहेर पडले. अडाणीपणातून गोल फोडायला किंवा गारद्यांच्या ईर्ष्येने नव्हे ! आरंभी सरदारांना चांगले यश आले पण अपुऱ्या सैन्यबळामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. मराठी सरदार मागे वळताच रोहील्यांनी शिस्त बांधून गारद्यांवर हल्ला चढवला. तोवर गारद्यांची बंदुकधारी पलटणे गोळीबाराच्या तयारीने पुढे सरसावली होतीच. या ठिकाणी रोहील्यांच्या उजव्या बगलेवर असलेल्या अमीरबेग व बरकुरदार यांनीही गारद्यांवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ स्पष्ट होता. मराठी सैन्याचा रोख हा दक्षिणेकडेच असल्याचा अब्दालीचा ठाम ग्रह असल्याने त्याला शत्रूची बगल उध्वस्त करणे गरजेचे वाटत होते. एकदा का शत्रूची बगल उध्वस्त झाली कि, मग त्याला गुंडाळणे तितकेसे अवघड पडत नाही असा त्याचा अनुभव होता. आपल्या सेनानीच्या आदेशानुसार अफगाण - रोहील्यांनी प्रयत्नांची शर्थ केली पण शेवटी त्यांना गारद्यांकडून सपाटून मार खाऊन माघार घ्यावी लागली. परंतु, या पराजयातच त्यांच्या विजयाचे बीज रुजले होते. गारद्यांची यावेळी निम्म्याहून अधिक पलटणे निकामी झाल्याने मराठी सैन्याची डावी बाजू दुर्बल झाली होती !

२) गारदी व रोहिले - अफगाणांची झुंज चालू असताना भाऊच्या नेतृत्वाखाली हुजुरात व शहावलीच्या खास दुराणी फौजेची लढाई जुंपली होती. ज्याप्रमाणे रोहिले शहावलीच्या सैन्यदलापासून लांब पुढे गेले होते त्याचप्रमाणे शहावलीदेखील सुजा व नजीबपासून पुढे निघून आला होता. त्यामुळे रणभूमीवर या एकाकी शत्रूदलास झोडपून काढण्याची संधी साधण्याचा भाऊने निर्णय घेतला. युद्धाचा आरंभ तोफांनी होऊन मग काही वेळांतच हुजुरात व इतर मानकरी गोलातून बाहेर शहावलीच्या दुराणी सैन्यावर तुटून पडले. या वेळी झालेल्या संघर्षात अफगाणांचे बरेचसे नुकसान झाले. खासा अताईखान -- वजीर शहावलीचा पुतण्या यात मारला गेला. बव्हंशी अफगाण पथके लढाई सोडून जीव वाचवण्यासाठी अब्दालीकडे धावली. एवढं यश पदरी पाडून हुजुरात मागे परतली. कारण ; त्यांचे युद्धाचे धोरण याआधीच ठरलेलं होतं की, बचावापुरते आक्रमण करायचे ! बस्स. निर्णायक युद्ध यमुना नदी गाठल्यावर. भाऊचा हाच निर्णय त्या दिवशी महागात पडला. युद्धाआधीचे डावपेच काहीही असले तरी प्रत्यक्ष लढाईच्या वेळी त्यात परिस्थितीनुसार बदल करण्याची लवचिकता भाऊकडे नव्हती. अर्थात, याबाबतीत त्याचा अनुभव कमी होता तर त्याचा प्रतिस्पर्धी तुलनेने अधिक हुशार होता. 

३) दुपार पर्यंत गारदी व हुजुरातीच्या मोर्च्यातील युद्ध थंडावले होते. गारद्यांची पथके श्रमाने दमलेली असल्याने त्यांना पुढे यमुनेकडे चाल करणे शक्य नव्हते. हुजुरातीची देखील जवळपास अशीच स्थिती होती. तुलनेने मराठी सैन्याची उजवी बाजू --- शिंदे व होळकर ताज्या दमात होते. इकडे शत्रूपक्षाची देखील निराळी स्थिती नव्हती. परंतु, अब्दालीने आधी उभ्या केलेल्या बचाव फळ्या त्यांच्या उपयोगी आल्या. मुख्य आघाडीच्या मागे उभी केलेली पथके त्याने पुढे पाठवली. तसेच पळून आलेल्या सैन्याला दरडावून राखीव सैन्यासह त्यांना शहावलीच्या मदतीला पाठवले व तिन्ही आघाड्यांना एकाचवेळी शत्रूवर चाल करण्याचा हुकुम सोडला. अब्दालीची इतिहासकारांनी गौरवलेली लष्कराच्या चंद्रकोरीची रचना हि अशी अपघाताने व ती देखील उत्तरार्धात बनून आली ! आगाऊ ठरवून नव्हे !! 

४) शहावलीचा पराभव केल्यानंतर मिळालेल्या फुरसतीचा भाऊला सदुपयोग करून घेता आला नाही. निर्णायक युद्धाला या ठिकाणीच तोंड लागल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. त्याच्या मते, अजूनही आपणांस शत्रूशी झुंज देत सहज यमुना गाठणे शक्य आहे. परंतु, आपल्या गोलाची आघाडीच आता दुबळी झाल्याची वस्तुस्थिती त्याने लक्षात घेतली नाही. तसेच, शत्रूची या ठिकाणीच मुख्य लढाई घेण्याची आतुरता पाहता गोलाच्या पिछाडीला पेरलेली लष्करी पथके पुढे आघाडीवर आणण्याची बुद्धी काही त्याला झाली नाही. त्यामुळे पिछाडीच्या पथकांना लढाईत भाग घेण्याची संधीच मिळाली नाही, तर आघाडीवरील सैन्यावर त्या दिवशी कल्पनातीत ताण पडला. 

५) दुपारनंतर शत्रूसैन्याने मराठी लष्करावर निर्णायक हल्ला चढवला. एकाच वेळी गारदी, हुजुरात व होळकर या तिन्ही मोर्च्यांवर शत्रूसैन्याचा लोंढा येऊन आदळू लागल्याने कोणाचीच कोणाला साथ मिळाली नाही. गारद्यांनी सकाळच्या प्रमाणेच याहीवेळी पराक्रमाची शर्थ केली परंतु, त्यांचा यावेळी निर्णायक पराभव झाला. अफगाण - रोहिल्यांनी मराठी सैन्याची डावी बाजू साफ उध्वस्त केली ! युद्धाचे पारडे त्याचक्षणी अब्दालीच्या बाजूला फिरले !! गारद्यांना लागून उभे असलेले विंचूरकर, पवार, गायकवाड प्रभूती सरदार यावेळी हुजुरातीच्या मदतीला गेल्याने गारद्यांना कोणी वाली राहिला नव्हता. 

६) सकाळी पराभूत झालेला शहावली पुन्हा एकदा बळ बांधून चालून आल्यावर भाऊने यावेळी गोलाच्या जवळच लढाई खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शत्रूसेना पुढे वाढून आल्यावर मराठी स्वार त्यावर तुटून पडले. या संघर्षातही हुजुरात विजयी होऊ लागली होती. याचवेळेस आघाडीवर असलेला विश्वासराव पेशवा मारला गेला. मात्र, त्यामुळे कसलाही फरक न पडता हुजुरातीने अफगाणांना पुन्हा एकदा पिटाळून लावले. 

७) नजीब, सुजा व जहानखान आणि शहापसंद यांनी सर्व जोर एकवटून शिंदे - होळकरांवर चाल केली पण त्या अनुभवी सैन्याने शत्रूला सडकून मार दिला. 

८) हुजुरात शहावलीसोबत लढत असतानाच इकडे गारद्यांचा संहार झाला. त्यावेळी कुंजपुरा येथे मराठी सैन्यात बुणग्यांचे काम करण्याच्या निमित्ताने दाखल झालेले रोहिले उलटले. त्यांनी उघडपणे मराठी गोलात हुल्लड माजवायला आरंभ केला. गारद्यांचा निःपात झाल्याने व विंचूरकर प्रभूती सरदार शहावलीशी लढण्यात गुंतल्याने त्यांना हि उसंत लाभली. तोवर अमीरबेग व हाफिज रहमतचे अफगाण - रोहिले गोलात शिरले होतेच. याचा परिणाम म्हणजे, मराठी सैन्याच्या गोलात व पिछाडीवर घबराटीचे वातावरण निर्माण झाले अन तशात विश्वासराव मरण पावल्याची बातमी कर्णोपकर्णी पसरून या घबराटीचे रुपांतर पळात झाले. मराठी सैन्याचा निर्णायक पराभव या क्षणी झाला ! सकाळपासून पिछाडीचे काम करणाऱ्या मराठी पथकांना पुढे चाललंय याचा पत्ताच नव्हता. आघाडीची जी काही त्यांना बातमी मिळाली ती पळणाऱ्या लोकांकडून. तेव्हा त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. 

९) शहावलीच्या अफगाणांना बडवून विंचूरकर, पवार मंडळी माघारी गोलात आली तेव्हा हा गोंधळ त्यांच्या नजरेस पडला. त्याचवेळी अमीरबेग व हाफिज रहमतच्या सैन्याशी लगोलग लढण्याची वेळ देखील त्यांच्यावर उद्भवली. आल्या प्रसंगाला त्यांनी कसेबसे तोंड दिले, परंतु यशवंतराव पवार मरून पडल्यावर त्याचे पथक उधळताच या सरदारांनीही बाजू सोडून काढता पाय घेतला. युद्धाचा निकाल आता सर्वांनाच कळून चुकला होता. सुरक्षित माघार घेणे हाच एक पर्याय होता व तो त्यांनी अवलंबला. 

१०) हुजुरातीवर दोन हल्ले चढवूनही शत्रूची फळी फोडण्यात आपले सैन्य साफ अपयशी झाल्याचे पाहून खासा अब्दाली चवताळून गेला. त्याने आपले खास अंगरक्षक दल शहावलीच्या मदतीस देऊन परत एकदा तिसऱ्यांदा हुजुरातीवर हल्ला चढवण्याचा आदेश दिला. त्याच्या सुदैवाने यावेळी हुजुरातीची फळी फुटली. सकाळपासून लढणारी पथके आता पार दमली होती. तरीही पिढ्यानपिढ्याची रक्तात सळसळणारी शौर्यपरंपरा हातातील शस्त्र खाली ठेवू देत नव्हती की रणातून काढता पाय घेण्याचा विचार मनात येऊ देत नव्हती. मात्र याही परिस्थितीत ज्यांची डोकी शांत होती, त्यांनी प्रसंग पाहून माघार घेण्यास आरंभ केला. गायकवाड, विंचूरकर निघाल्याचे पाहून नाना पुरंदरे देखील निघाला. यावेळी शिंदे - होळकर शत्रूशी लढत असल्याने, त्यांच्या मोर्च्याच्या आश्रयाने निघून जाण्याचा व्यवहारी निर्णय सरदारांनी घेतला. 

११) डाव्या बाजूचे सरदार आपल्या मोर्च्याकडे येत असल्याचे पाहून शिंदे - होळकरांचे अनुभवी सरदार काय समजायचं ते समजून गेले. त्यांनीही आता काढता पाय घेण्यास आरंभ केला. जनकोजी शिंदे हा आपल्या चुलत्यासह -- तुकोजी शिंदे सोबत भाऊकडे निघाला. मल्हाररावाने आपला सरदार संताजी वाघ यास भाऊकडे पाठवले. पराभव जरी झाला असला तरी मुख्य सेनापतीला आता सुखरूपपणे रणातून बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांना पार पाडायची होती. संताजीला पाठवून होळकर इतर सरदारांच्या पाठोपाठ शहापसंदखानास बगल देऊन व मुल्ला सरदार रोहील्यासोबत झुंज देत दिल्लीच्या वाटेला लागला. 

१२) लढाईचे पारडे शत्रूच्या बाजूने फिरल्याचे भाऊच्या लक्षात आले होते. पण माघार घेण्याचे भान त्याला राहिले नाही. जनकोजी - तुकोजी शिंदे, संताजी वाघ आणि हुजुरातीचे खासे सरदार यांनी आपल्या बेभान सेनापतीला रणभूमीवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मराठी सैन्याची घडी विस्कळीत झाल्याने हुजुराती भोवती शत्रूसैन्याचा वेढा पडू लागला होता. या क्षणी आता फक्त उत्तरेची वाट मोकळी होती. ती बंद होण्यापूर्वीच भाऊ व त्याच्या सरदारांनी निर्णय घेतला. त्यानुसार झुंज देत ते मागे - मागे सरकू लागले. परंतु, तिकडूनही शत्रूची पथके येऊन त्यांच्यावर आदळल्याने आता त्यांचा मार्ग खुंटला ! सूर्यास्ताच्या वेळी शेवटी जी काही झटापट झाली त्यातून समशेरबहाद्दर कसाबसा बाहेर पडला. पण हे भाग्य सर्वांनाच लाभले नाही. जनकोजी जिवंत शत्रूच्या हाती लागला तर तुकोजी शिंदे मारला गेला. संताजीला शरीरावर नवा घाव घेण्यास जागा राहिली नाही. अखेर भाऊ व त्याचे सोबती शेवटच्या झुंजीत मारले गेले व पानिपतचे रण अब्दालीच्या ताब्यात आले ! 
                                            

 ' पानिपत असे घडले ' हे पुस्तक ऑन लाइन विक्रीसाठी उपलब्ध असून त्याचे ई बुक मध्ये ' बुकगंगा ' मार्फत रूपांतरण करण्यात आले आहे. ज्यांना कोणाला हे पुस्तक हवे आहे त्यांनी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी. 


 http://www.sahyadribooks.org/books/PanipatAseGhadle.aspx?bid=829


 http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4900400902881415755                             


पानिपत असे घडले...         ले. संजय क्षीरसागर
प्रकाशक: पुष्प प्रकाशन

प्रुष्ठ्संख्या: ५८८

मुल्य: रु. ५००/- मात्र



येथे उपलब्ध :-  भारत बुक हाउस
१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे – ३०

फोन नंबर :– ०२० – ३२५४८०३२/३३
मोबाईल नंबर :- ९८५०७८४२४६  



 

                           

रविवार, ५ जानेवारी, २०१४

इतिहास विश्लेषण :- एक अनुभव यात्रा


           कोणीतरी म्हटले आहे कि, नावात काय आहे ?  ते खरेच आहे. निदान या लेखाच्या बाबतीत तरी ! या लेखाचे शीर्षक आणि मजकूर यांचा काही संबंध असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत नाही पण स्वतःच्या कल्पना दारिद्र्याची जाणीव मनात ठेवून मी प्रकटपणे सांगू इच्छितो कि, या लेखासाठी मला दुसरे शीर्षक काही सुचले नाही. असो, इतिहासाचा अभ्यास करणारा व त्यावर लेखन करणारा असा दोन महाभागांचा वर्ग आहे. त्यातील पहिला म्हणजे संशोधकांचा व दुसरा कथा - कादंबरीकारांचा ! यातील पहिल्या वर्गाचे प्रवासी मोजके, ध्येयवेडे, घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे असतात. तर दुसऱ्या वर्गात मोडणारे देखील जवळपास असेच --- पण घरचे खाऊन गावच्या भाकऱ्या बडवणारे नसतात ! कारण अशी वेळच त्यांच्यावर सहसा येत नाही. कोणतीही ऐतिहासिक कथा - कादंबरी व संशोधनपर पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या खपाची आकडेवारी मिळवून बघा. संशोधनपर पुस्तकांपेक्षा कथा - कादंबऱ्यांचा खप चांगला असतो. असे का व्हावे ?

              वानगीदाखल आपण तानाजीचे उदाहरण पाहू. सिंहगड ताब्यात घेताना तानाजीने घोरपडीला दोर बांधून तो कडा सर केल्याची कथा प्रसिद्ध आहे. आता शिवभक्तीचा जमाना असल्याने तो घोरपड देखील स्वराज्यनिष्ठ असल्यास नवल नाही. पण त्यावेळची माणसे आणि आत्ताची ग्रामीण भागातील गुराखी मंडळी --- हि कसलीही आधुनिक गिर्यारोहणाची साधने उपलब्ध नसताना इतरांना दुर्गम भासणारे कडे - कपाऱ्या सहज चढून जातात. पण आपल्या माणसांचे गुण हेरण्यापेक्षा कपोलकल्पित आणि अद्भुत कथा रचण्यात व त्यात रमण्यातच आम्हांला आनंद मिळतो. 

                आता हे अपयश नेमके कोणाचे ?  संशोधकांचे कि वाचकांचे ? माझ्या मते, दोघांचेही ! संशोधकांनी आपले संशोधन पक्षीय दृष्टीकोन व अंधभक्ती बाजूला ठेवून आपले कार्य पार पाडले तर या परिस्थितीत बराच बदल घडून येईल. त्याचप्रमाणे वाचकांनीही आता आपल्या बुद्धीचे वय वर्ष १२ - १६ च्या पेक्षा अधिक वाढवायला हवे. ' हे असे असे घडले ' एवढेच ऐकून / वाचून गप्प न राहता ' हे असेच का घडले ? ' अशा प्रकारचे प्रश्न विचारायला आरंभ केला पाहिजे. 

                    इतिहाससंशोधक व ऐतिहासिक कादंबरीकार यांच्या दरम्यानचा एक वर्ग आहे व तो म्हणजे इतिहास विश्लेषकांचा ! भारतीय -- विशेषतः  मराठी इतिहास अभ्यासकांत या गटात मोडणाऱ्या महाभागांचा ! या विभागात मोडणारे  जे अभ्यासक आहेत ते स्वतःला विश्लेषक म्हणवून घेण्यास कचवचतात. कारण ; इतिहास अभ्यासकांचे वर उल्लेखलेल्या दोन गटांखेरीज तिसरा वर्ग असू शकतो यावर वाचकांप्रमाणेच या इतिहास विश्लेषकांचा देखील विश्वास नाही. माझ्यापुरते म्हणाल, तर मी स्वतःला इतिहास विश्लेषकच म्हणवतो. इतिहास संशोधक बनायचे म्हटले म्हणजे मराठी, संस्कृत, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज, उर्दू, फारशी, अरबी, तुर्की, पुश्तु, डच, जर्मन, हिंदी, राजस्थानी, गुजराती, तेलगु, तमिळ इ. देशी - विदेशी भाषा आणि त्यांचे उपप्रकार सामान्यतः अवगत हवेत. त्याखेरीज मोडी वाचन - लेखन कला देखील आली पाहिजे. आता एवढे सर्व शिकून त्यात निपुण झाल्यावर इतिहासाचे संशोधन करण्यास माणसाला जोम तो काय राहणार ? आणि आजवर भारतात निदान असा एकतरी इतिहास संशोधक झाल्याचे मी ऐकले नाही,  ज्याने एकाच घटनेविषयी उपलब्ध विविध भाषांतील सर्व माहिती गोळा करून त्यावर आधारित आपला संशोधनपर निबंध प्रसिद्ध केला असेल ! इतिहास संशोधक बनण्यासाठी जी प्राथमिक तयारी करावी लागते, त्या धास्तीनेच सर्वसामान्य इतिहास अभ्यासक संशोधनाच्या वाटेवरून बाजूला होतात आणि त्यास जर कल्पनाशक्ती व प्रतिभेची देणगी असेल तर मग,  ' मरो ती भाषा - लिपी शिकण्याची, काल मोजण्याची दगदग ! त्यापेक्षा आपली कथा - कादंबरी लिहिलेली बरी ' असाच विचार करून तो कल्पित इतिहास लेखनाच्या वाटेला लागतो. 

                  आता आजवर जे इतिहास संशोधक झाले आहेत, त्यांनी भरपूर मेहनत घेऊन जरी इतिहास लेखन केले असले तरी, कित्येकदा पक्षीय वा जातीय दृष्टीकोन त्यांच्या कार्याआड येऊन त्यांनी इतिहासाचे बऱ्यापैकी विकृतीकरण केले आहे. उदाहरणार्थ :- राजवाडे - शेजवलकर यांचा पानिपत विषयीचा कऱ्हाडे - चित्पावन ब्राम्हण वाद हा वाचकांच्या परिचयाचा आहे. त्याचप्रमाणे सरदेसाई - य.न. केळकर यांचाही एक वाद आहेच. वादाचे कारण म्हणजे घाशीराम प्रकरणी नानाच्या प्रीतीपात्राचा -- ललितागौरीचा सरदेसायांनी केलेला उल्लेख ! केळकर साहेब म्हणतात,  पुराव्याखेरीज. पण नानाच्या नाटकशाळांची नावे असलेला कागद यांच्या सारख्याच एका इतिहास संशोधकाने चवीने वाचून मग मिटक्या मारत खाल्ल्याने सरदेसाई कसला पुरावा देणार ? याच य. न. केळकरांनी ' केसरी ' ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विजय तेंडूलकर लिखित ' घाशीराम कोतवाल हि एक कलाकृती नसून विषवल्ली आहे ' अशा आशयाचे उद्गार  काढले होते. त्याच मुलाखतीमध्ये मुलाखतकर्त्याने नानांना नाटकशाळा होत्या का असा थेट प्रश्न विचारला असता, सरळ उत्तर देण्याचे टाळून त्यांनी तशी त्या काळाची प्रथा होती असे मोघम उत्तर दिले. असो, असे वाद अनेक आहेत. काही महत्त्वाचे तर काही बिनमहत्त्वाचे ! पण यामुळे इतिहास हा विकृत होत जातो याकडे या विद्वानांचे लक्षच जात नाही. संशोधनाच्या भरात कधी - कधी इतिहास संशोधक निष्कर्ष काढण्यात किंवा एखादी घटना ' अशीच घडली ' असे सांगणारा एखादा पुरावा आढळल्यास तर्क व चिकित्सक बुद्धी बाजूला ठेवतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेजवलकरांचे पानिपत ! शेजवलकरांना पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे संशोधन करताना एक पोवाडा प्राप्त झाला. त्या कवनामध्ये पानिपतावर अखेरच्या दिवसांमध्ये मराठी सैन्याला पाण्याचा तुटवडा पडून घागरीमागे अव्वाच्या सव्वा दमड्या मोजून पाणी विकत घेण्याची वेळ आल्याचा उल्लेख आहे. शेजवलकरांनी हा उल्लेख खरा मानून, अब्दालीने मराठी सैन्याच्या छावणीजवळून जाणारा बादशाही कालवा फोडल्याने मराठी सैन्याला पाण्याची टंचाई जाणवू लागली अशा आशयाचे विधान केले. या ठिकाणी त्यांनी पुरावाही पारखला नाही. त्याचप्रमाणे तर्कबुद्धीलाही फाटा दिला. दुसरे म्हणजे, प्रत्यक्ष पानिपत परिसरात फिरून देखील त्यांना आपल्या निष्कर्षातील फोलपणा लक्षात आला नाही. पानिपतपासून यमुना नदी बरीच दूर आहे. भाऊ व अब्दालीची छावणी समोरासमोर असून पानिपत गावाबाहेरीच्या विहिरी भाऊ घेतल्या होत्या. यमुना नदीवर बांधलेला बादशाही कालवा हा मराठी तळाजवळून पुढे तसाच अब्दालीच्या छावणीच्या बाजूने वाहत होता. आता हा कालवा फोडला तर सर्वात जास्त नुकसान अब्दालीचे होणार होते  हे उघड आहे. पण शेजवलकरांनी याविषयी जास्त विचार न करता पोवाडा प्रमाण मानून आपला निष्कर्ष काढला आणि  इतरांनी अधिक डोकं न लावता तो जसाच्या तसा स्वीकारला ! 

                      सनदा, इनामपत्रे, वतनांचे तंटे, घरगुती समारंभांची माहिती असलेल्या नोंदी यांची इतिहास लेखनास मोठी मदत मिळते असे सांगणारे इतिहासकार, जेव्हा महत्त्वाचे संग्राम वा तह सामान्य इतिहास वाचकांपासून दडवतात तेव्हा त्यांच्या निःपक्षपातीपणाविषयी काय बोलावे ? उदाहरणार्थ :- बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे मारला गेल्यावर मल्हारराव होळकराने अब्दालीच्या विरोधात युद्ध आरंभले. होळकराच्या गनिमी काव्याने टेकीस येऊन त्याने ता. १३ मार्च १७६० रोजी होळकरासोबत तह केला. परंतु, दि. १४ मार्च १७६० रोजी भाऊ उत्तरेत  रवाना झाल्याने हा तह फिस्कटला. या तहाने नेमके काय साधले जाणार होते हा प्रश्न महत्त्वाचा नसून हा तह का बनला ? कसा बनला ? याचा शोध घेणे, विचार करणे महत्त्वाचे आहे. रियासतकारांनी या तहाची फक्त नोंद दिली पण तपशील नाही. इतरांना तर त्याची दखल घेण्याची गरजच वाटली नाही ! याचा परिणाम म्हणजे आम्ही हिंदू , अफगाण मुसलमानांकडून सतत मार खाण्यासाठीच जन्माला आलो आहोत अशी भावना पानिपत वाचणाऱ्याची होते ! आपल्याच लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा अजाणतेपणी का होईना, पण केलेला गुन्हा कितपत क्षम्य आहे ? सुदैवाने, श्री. संजय सोनवणी यांनी ता. १३ मार्चच्या तहाकडे पानिपत अभ्यासकांचे लक्ष वेधण्याचे कार्य केले खरे, पण ते सोनवणी आहेत -- जोशी, खरे, कुलकर्णी किंवा गेला बाजार पवार, पाटील नसल्याने त्यांच्या संशोधनासह ते बाजूला फेकले गेले !

             जी गोष्ट १३ मार्चच्या तहाची, तीच १४ जानेवारीच्या युद्धाची ! म्हणे,'  मराठी सरदारांनी गोल फोडल्याने त्यांचा पराभव झाला !' अए, पण गोल म्हणजे काय हे तरी तुम्हांला माहिती आहे का ? त्याशिवाय भाऊचा कैफियतकार किंवा तत्कालीन पत्रांतही याचा उल्लेख नाही. गोलातून बाहेर पडणे, अंगावर येणाऱ्या शत्रूशी तात्पुरते लढून त्यास दूर पिटाळूणे हेच त्या दिवशीचे मराठी सैन्याचे युद्धविषयक धोरण होते. खुद्द भाऊच्या नेतृत्वाखाली मराठी फौज गोलातून बाहेर पडली होती त्याचे काय ? पण विंचूरकर, गायकवाड हे कसे अजागळ होते व त्यांनी गोल फोडून मराठी सैन्याचा कसा घात केला यावरच चऱ्हाट वळत आमचे संशोधक बसले. असाच प्रकार मल्हाररावाच्या बाबतीत केलेला दिसून येतो. मल्हारराव पानिपत युद्धातून बाहेर पडला यात शंका नाही, पण त्याच्याही आधी विंचूरकर, गायकवाड रणभूमीतून बाहेर पडू लागले होते. भाऊचा बालमित्र म्हणवला जाणारा नाना पुरंदरे देखील हुजुरतीजवळच्या मोर्च्यातून बाहेर पडला होता त्याचे काय ? त्यांच्याविषयी कोणी का बोलत नाही ? खुद्द नानासाहेब पेशवा किंवा पानिपतचा ' आय विटनेस ' नाना फडणीस देखील मल्हारराव होळकर पानिपतच्या लढाईतून पळाला असे म्हणत / लिहित नाहीत, पण आमचे ' तथाकथित ' इतिहास संशोधक आपला निष्कर्ष काढून मोकळे ! जणू काय नाना फडणीसच्या ऐवजी तेच रणभूमीवर हजर होते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या जागी भाऊचे प्रेत सापडले, जवळपास त्याच ठिकाणी होळकरांचा सरदार संताजी वाघाचा मृतदेह आढळला. याविषयी कोणी काही चर्चा करत नाही. आता  आपल्या धन्यासोबत जायचं सोडून संताजी भाऊकडे मरायला कशाला गेला याचा कोणी विचार केला आहे ? 

                अलीकडे  एका विद्वान इतिहास संशोधकाने पानिपत प्रकरणी नव्याने शोध लावला आहे की, पानिपतावर मराठी सेना शत्रूच्या कचाट्यात अडकत चालली तेव्हा नानासाहेब पेशवा स्वतःचे लग्न लावण्यात मग्न होता हि गोष्ट खोटी आहे. याविषयीची अस्सल पत्रे आपण आपल्या पानिपत विषयी ग्रंथात प्रसिद्ध करत आहोत. पानिपतावर नव्याने काही माहिती मिळेल म्हणून उत्सुकतेने मी तो ग्रंथ वाचला खरा, पण मला काही त्यात ती ' अस्सल पत्रे ' आढळली नाहीत. वाचकांची दिशाभूल करून त्यांनी काय मिळवले ते त्यांनाच माहित ! आणखी एका विद्वान गृहस्थाने शोध लावला की, मराठ्यांचा सर्वनाश करण्यासाठी ब्राम्हण पेशव्यांनी पानिपत घडवून आणले ! त्या हिशेबाने, कल्पित नॉर्डिक आर्यन वंशाचा ऱ्हास घडवून आणायला इंग्लंड, अमेरिका, रशिया व जर्मन नेत्यांनी दुसरे महायुद्ध घडवून आणले असेच म्हणावे लागेल. 

                    शिवाजी - अफझलखान भेटीची चर्चा करताना शिवाजीने अफझलखानास कसा योजनाबद्ध काटा काढला हे शोधायचे सोडून शिवाजीवर पहिला वार ब्राम्हणाने कसा केला इथपासून ते  कृष्णाजी भास्कर एक कि तीन असले निरर्थक वाद आज होत आहेत. समर्थ रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव, संत तुकाराम अशी तीन मंडळी आलटून पालटून शिवाजीचे गुरुपद भूषवित आहेत. त्यापेक्षा शिवाजीचे मंदिर बनवून त्याला विष्णूचा दहावा / अकरावा अवतार बनवा ! म्हणजे सर्वजण त्यातून सुटतील. विशेषतः विद्यार्थीवर्ग. कारण ; अशा अस्थिर व पूर्वग्रहदुषित संशोधनावर रुजलेले धडे अभ्यासून त्यांची एक मानसिकता बनत आहे याकडे कोणाचेच लक्ष नाही. 

               इतिहास संशोधकांची आजची परिस्थिती अशी आहे तर ऐतिहासिक कथा - कादंबरीकारांची त्यापासून वेगळी नाही. हल्ली एक नवीन फॅशन उदयास आली आहे. इतिहासातील एक अद्भुत अशी घटना घ्यायची व त्यावर कथा - कादंबरी रचायची. इथपर्यंत ठीक आहे, पण आपण लिहित असलेल्या कथेला - कादंबरीला संदर्भ ग्रंथांची यादी का म्हणून जोडायची ? जर तुम्ही एखादी घटना कल्पनाशक्ती व प्रतिभेच्या बळावर रंगवली आहे तर उगाचच संदर्भग्रंथांची नावे ठोकून आपले ' वजन ' वाढवण्याची नसती उठाठेव का करावी ? यांमुळे वाचकांची मात्र दिशाभूल होते. संदर्भग्रंथांची सूची पाहून कथा - कादंबरी जरी असली तरी ती ' पुराव्यावर ' आधारित आहे असे समजून ते वाचत बसतात आणि त्यातील घटना खऱ्याच असल्याचे समजतात. उदाहरणार्थ :- शिवाजी - संभाजी या पिता - पुत्रांतील बेबनाव ! असा काहीसा प्रकार बाप - लेकात घडला हि गोष्ट खरी. कथा - कादंबरी रचण्यासाठी जर तुम्ही खरोखर संदर्भग्रंथ वाचता तर त्यातून या घटनेमागील कारणेही तुम्हांला माहिती असायला हवीत. पण ती बाजूला ठेवून एखादी गोदावरी किंवा असेच कोणतेतरी काल्पनिक स्त्री पात्र निर्माण केले जाते व तिला संभाजीने विषयवासना पुरवण्यासाठी कशी पळवली इथपासून तिचा आणि संभाजीचा बादरायण संबंध जोडण्याचा सोयराबाईचा कसा डाव होता इथपर्यंतच्या कथा जन्माला येतात !  

                     असाच काहीसा प्रकार पेशवेकाळावर आधारित कादंबऱ्यांमध्ये आढळून येतो. नानासाहेब पेशव्यास शाहूने बडतर्फ केले तेव्हा लष्करी बळाच्या धाकावर नानासाहेबाने पेशवेपद परत मिळवले हे अस्सल पत्रांमधून उघड होते. पण हीच घटना कथा - कादंबरीमध्ये विकृत स्वरूपात येते. अर्थात, याची पायाभरणी बखरींनी केल्याने आजच्या लेखकांना दोष का द्यावा ? पानिपतच्या तिसऱ्या युद्धाबद्दल तर बोलायलाच नको ! मराठी सैन्याची उपासमार झाली म्हटल्यावर त्यांनी मृत जनावरांची हाडे दळून खाणे, झाडांच्या मुळ्या - डहाळ्या चघळणे, वाळू खाणे इ. गोष्टी रचण्यात आल्या. सध्या, आमचे संजय सोनवणी साहेब, जनावरांची हाडे दळणारी पेशवेकालीन जात्यांच्या शोधात आहेत. कोणाला माहिती असल्यास कळवावे !

                   सारांश, इतिहास संशोधकांनी जी काही दिव्य संशोधने केली, त्यावर कथा - कादंबरीकारांनी आपल्या कल्पनांचे इमले रचले. एका प्रसिद्ध हिंदी सिनेदिग्दर्शकाच्या आणि अभिनेत्याच्या मते, भारतीय प्रेक्षकांचे बौद्धिक वय १२ वर्षे असल्याचे गृहीत धरूनच चित्रपट बनवले जातात. आपले ऐतहासिक कथा - कादंबरीकार देखील जवळपास त्याच पद्धतीने कार्यरत आहेत. 

                      इतिहास संशोधक व ऐतिहासिक कथा - कादंबरीकारांपेक्षा इतिहास विश्लेषकांची परिस्थिती फारशी वेगळी नाही. वा. वा. खरे, गो. स. सरदेसाई, बाबासाहेब पुरंदरे  इ. इतिहास संशोधकांनी कित्येकदा इतिहास विश्लेषकाच्या भूमिकेतून लेखन केले आहे. उदाहरणार्थ :- खऱ्यांनी लिहिलेलं नाना फडणीसचे चरित्र, तर सरदेसायांच्या रियासती ! शिवशाहीर पुरंदऱ्यांचे ' राजा शिवछत्रपती ' देखील याच परंपरेतील तर शिवराम परांजप्यांचा ' मराठयांच्या लढायांचा इतिहास ' देखील याच मालिकेतील आहे. यांपैकी सरदेसाई व खरे यांनी त्यातल्या त्यात निःपक्षपातीपणे विश्लेषणाचे कार्य केले पण परांजपे, पुरंदरे यांचे तसे नाही. ब्रिटीश अंमलातील आपल्या बांधवांना स्वसामर्थ्याचा आत्मप्रत्यय यावा या हेतूंनी परांजप्यांनी लेखन केले तर तर पुरंदरे हे ' शिवशाहीर ' असल्याने त्यांच्यविषयी अधिक काय बोलणार ? यांच्याशिवाय डॉ. आंबेडकर, बॅ. सावरकर यांनी देखील बरेचसे इतिहास लेखन हे इतिहास विश्लेषकाच्या भूमिकेतूनच केले आहे. पण मनाशी काही एक विशिष्ट हेतू बाळगून. पैकी, आंबेडकरांनी भीमा - कोरेगावचा उद्योग केला तर सावरकरांचे समग्र इतिहास लेखन एका विशिष्ट हेतूंनी प्रेरित होऊन झाल्याचे उघड आहे. मात्र, समाजमनाला आकृष्ट करून घेण्यात हे दोघेही कल्पनातीत यशस्वी झाल्याचे अमान्य करता येत नाही. हि सर्व उदाहरणे पाहताना वाचकांचा असा समज होईल की, खरे अथवा सरदेसाई प्रभूती लेखक हे त्यातल्या त्यात निर्दोष व निर्लेप वृत्तीने लेखन करणारे आहेत. तर तसे नाही. कामाच्या व्यापामुळे, कधी मनोविकारांच्या दबावामुळे उपरोक्त इतिहास लेखकांनी देखील पक्षपाती भूमिका स्वीकारली आहे. पैकी, सरदेसायांच्या रियासतींमधील गोंधळ तर सुप्रसिद्धच आहे. उदाहरणार्थ :- मराठी रियासतीमध्ये पेशवे - इंग्रज युतीने तुळाजी आंग्रेच्या विरोधात जे युद्ध केले त्यावरील सरदेसायांनी परस्परविरोधी मते मांडून वाचकांचा गोंधळ उडवून दिला आहे. तसेच, थोरल्या माधवरावच्या कारकिर्दीत मल्हारराव होळकराने कुरा - काल्पी येथे इंग्रजांचा सडकून पराभव केल्याचा वृत्तांत सांगणारे पत्र प्रसिद्ध करून त्याखाली इंग्रजांनी मल्हाररावास पराभूत केल्याचा निष्कर्ष काढला आहे. अर्थात, हजारो पृष्ठांचे लेखन करणाऱ्या या इतिहासकरांच्या चुका, त्यांचे कार्य पाहता क्षुल्लक अशा दिसत असल्या तरी Nobody's Perfect हे सांगण्यास पुरेशा आहेत. 

        अलीकडच्या काळात ब्रिगेडियर पित्रे यांनी ' मराठ्यांचा युद्धेतिहास ' लिहून प्रसिद्ध केला आहे. परंतु, त्यांचे लेखन बरेचसे सदोष आहे. पूर्वग्रहांचा पगडा बाजूला सारून लेखन करणे त्यांना जमले नाही. त्यामुळे पानिपतपासूनचा भाग वाचताना विविध रणक्षेत्रात मराठी सैन्याने फक्त मारच खाण्याची भूमिका बजावली अशी भावना निर्माण होते. विशेषतः तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धाची माहिती वाचताना ! लेखक स्वतः लष्करी अधिकारी असले तरी उपलब्ध पुरावे व आपला लष्करी सेवेचा अनुभव यांची त्यांना योग्य अशी सांगड घालता आली नाही. प्रतिभा व कल्पनाशक्तीची देणगी तसेच इतिहास संशोधनाचा अनुभव गाठीशी असूनही निव्वळ संकुचित दृष्टीकोनातून केलेले लेखन कसे असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे न. चिं. केळकरांचा ' मराठे व इंग्रज ' हा ग्रंथ होय ! यामध्ये पेशवाई व समस्त मराठी राज्याचा अस्त का झाला याचा विश्लेषणात्मक आढावा घेत असताना कित्येक कारणांचा त्यांनी अपुरा समाचार घेतला आहे. त्यामुळे समग्र ग्रंथ हा एक प्रश्नावली बनून राहिला असल्यास नवल नाही. 

                  सरदेसाई, खरे, परांजपे, आंबेडकर, सावरकर, केळकर, पुरंदरे,  पित्रे  इ. ची उदाहरणे देताना त्यांच्या दोषांचा जरी या  मी उल्लेख केला असला तरी त्यांचे गुण व महत्त्व मी नाकारत नाही. आजही मला इतिहास लेखन करायचे म्हटल्यास यांच्याच ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो हे मी नाकारू शकत नाही. मला फक्त एवढेच स्पष्ट करायचे आहे की, इतिहास संशोधन, ऐतिहासिक कथा - कादंबरी लेखनाप्रमाणेच इतिहास विश्लेषणाचा  तिसरा वर्ग अस्तित्वात असून त्याची परंपरा देखील बरीच मोठी आहे. परंतु, असे असले तरी या प्रकाराकडे पाहण्याचा अभ्यासक व वाचकांचा दृष्टीकोन काहीसा उदासीनतेच आहे. याचे प्रमुख कारण माझ्या मते, इतिहास विश्लेषण हे संशोधनपर निबंधासारखे वाचनास रटाळ आणि कंटाळवाणे जरी नसले तरी ऐतिहासिक कथा - कादंबरीप्रमाणे मनोरंजन करणारे देखील नसते. परंतु, असे असले तरी यात संशोधन व मनोरंजनात्मक लेखनाचा सुवर्णमध्य साधला जातो हे देखील नाकारता येत नाही. इतिहास संशोधक तसेच ऐतिहासिक कथा - कादंबरीकार बनण्यास जे गुण लागतात त्यांपैकी प्रत्येकी थोडे - थोडे गुण जर इतिहास  अभ्यासकाच्या अंगी असतील तर तो उत्तम इतिहास विश्लेषक बनू शकतो.

            

            

बुधवार, १ जानेवारी, २०१४

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - १० )

                                              


              मागील प्रकरणांत आपण स. माधवरावचा अपघात कसा झाला व त्यात त्याचे निधन कशा प्रकारे झाले याविषयी माहिती देणारी काही पत्रे आणि नोंदी पाहिल्या. त्या पत्रांच्या व अस्सल नोंदींच्या आधारे या प्रकरणाचे गूढ उकलण्याचा आपण प्रयत्न करू. 

           वासुदेव खरेंनी पटवर्धन दप्तरातील संपादन केलेल्या पत्र क्र. ३६५७ मधील माहितीचा या ठिकाणी प्रथम विचार करणे आवश्यक आहे. ता. २६ नोव्हेंबर १७९५ रोजी परशुरामभाऊने मिरजेच्या बळवंतराव उर्फ बाळासाहेब पटवर्धनास लिहिलेल्या पत्रातील " श्रीमंतांनी माडीवरून पडावयाचे पूर्वी भाषण कोणाकोणाजवळ केलें तें व माडीवरून पडल्यानंतर बोलिले तें कोणीं कोणीं येउन सांगितले " हे वाक्य महत्त्वाचे आहे. या वाक्याला दुजोरा देणारे याच दिवशी लिहिले गेलेले नीलकंठ आपाजीचे पत्र खरेंनी आपल्या ऐतिहासिक लेखसंग्रहात प्रकाशित केले आहे. त्यातील मसुदा पुढीलप्रमाणे :- " श्रीमंतांनी आपला काल समीप आला असे जाणून श्रीमंत बाईसाहेबांस काही गोष्टी सांगितल्या, व आणखी कित्येकांजवळ कित्येक भाषणें जहाली, त्याची बखर होत आहे." एकाच दिवशी लिहिण्यात आलेल्या या दोन पत्रांतील मजकुरात साम्य आहे. अर्थात, पत्र पटवर्धनी दप्तरातील असल्याने माहितीमधील सारखेपणा विलक्षण आहे अशातला भाग नाही. उलट भाऊच्या पत्रातील मजकूर अधिक स्पष्ट आहे तर नीलकंठ आपाजीच्या पत्रातील माहिती संदिग्ध आहे. भाऊच्या पत्रातून हे तर स्पष्ट होते की, माडीवरून पडण्यापूर्वीच स. माधवराव हा निराशाग्रस्त झाला होता व त्या नैराश्यातून त्याने आपल्या पत्नीजवळ आणि इतरांजवळ काही उद्गार काढले होते. अर्थात, आजारपणात मनुष्य कधी - कधी जीवाला त्रासून काही गोष्टी बोलतो, त्यामुळे त्या कोणी मनावर घेत नाही हे खरे. पण, या प्रकरणात रुग्णाईताने निव्वळ बडबड न करता प्रत्यक्ष कृती केल्याने त्याची दखल घेणे भाग आहे. परशुरामभाऊ हा नानाच्या खास वर्तुळातील असल्याने त्याच्या पत्रांवर विश्वास टाकण्यात काहीच हरकत नसावी. 

               ऐतिहासिक लेखसंग्रहात प्रकाशित करण्यात आलेल्या पत्रांमधील माहितीचा विचार करण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल व ती म्हणजे पेशव्याच्या शेवटच्या दिवसांत तो आपल्या पत्नीजवळ काही गोष्टी बोलला किंवा न बोलला असला तरी त्या माहितीस जास्त महत्त्व देता येत नाही. कारण, त्यांचा विवाहच मुळी स. १७९३ मध्ये झाला होता व तत्कालीन प्रघातानुसार यशोदाबाई हि बालिकाच होती. त्यामुळे तिच्याविषयीचा येणारा उल्लेख किंवा माहिती तारतम्यानेच घ्यावी लागते. हि महत्त्वाची गोष्ट याच विषयावर लिहिलेल्या एका लेखात मी विसरलो होतो व या मुद्द्याला अवास्तव महत्त्व दिलेले होते. अर्थात, त्यावेळी अतिउत्साहाच्या भरात माझ्या हातून ती चूक घडली पण मूर्खपणा तो शेवटी मूर्खपणाच असतो !

             स. माधवरावास ज्या दिवशी अपघात झाला, त्याच दिवशी तुकोजी होळकर त्याच्या भेटीस गेला होता. लाखेरीचे युद्ध होण्यापूर्वी कधीतरी तुकोजीस अर्धांगवायू झालेला होता याची वाचकांनी नोंद घ्यावी. अर्थात, पक्षाघातामुळे मनुष्य शारीरिकदृष्ट्या काहीसा हतबल झाला असला तरी त्या गोष्टीचा त्याच्या बुद्धीवर काही परिणाम होत नाही हे देखील लक्षात घ्यावे.  तुकोजीच्या पत्रानुसार अपघात झाला त्या दिवशी सकाळी पेशवा नित्याच्या वेळेवर किंवा जरा - पुढे मागे असा वेळेत बदल करून उठला. सकाळची आन्हिकं आटोपून तो गणपतीच्या दिवाणखान्यावरील मजल्यावर असलेल्या आपल्या दालनाच्या गच्चीत कठड्याला टेकून बसला होता. यावेळी सूर्योदय होऊन चार घटका ( जवळपास ९६ मिनिटे ) झाल्या होत्या किंवा पहिल्या प्रहराच्या चार घटका उलटून गेल्या होत्या. यावेळी त्याच्या सोबत गंगाबाईची आई -- म्हणजे पेशव्याची आजी आणि शागीर्द पेशाची मंडळी हजर होती. अचानक पेशव्याला उठून उभे राहण्याची इच्छा झाली व तो उठून उभा राहिला खरा पण उभं राहिल्यावर त्याला आपलाच तोल सावरता आला नाही आणि तो तसाच गच्चीवरून खाली कारंजी हौदात / हौदावर पडला. घटनेनंतर पेशवा पाऊण तास बेशुद्ध होता पण नंतर शुद्धीवर आला. पत्रातील मजकुरावरून असे अनुमान बांधता येते की, अपघाताची बातमी समजल्यावर तुकोजी पेशव्याच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी वाड्यावर आला तेव्हा त्यांस हि बातमी मिळाली. विशेष, म्हणजे या प्रसंगी तुकोजी वगळता इतर कोणताही महत्त्वाचा सरदार पुण्यात हजर नव्हता आणि तुकोजीस मिळालेली माहिती हि प्रत्यक्षदर्शी वा नानाकडूनचं प्राप्त झालेली आहे. कारण, पेशव्याचा पालक व संरक्षक नाना फडणीस असून घटना घडल्यावर पेशव्यावर औषधोपचार होत असताना तो तेथे हजर असणार हे उघड आहे. म्हणजे, तुकोजीची माहिती बरीचशी अव्वल दर्जाची आहे. 

      परंतु असे असले तरी, तुकोजी होळकराच्या माहितीला बऱ्यापैकी छेद देणारा तपशील ऐ. ले. सं. मधील पत्र क्र. ३६४४ मध्ये आढळतो. पत्रलेखक हा पटवर्धनांचा पुण्यातील वकील / कारकून असून त्याने घटना घडल्यावर दुसऱ्या दिवशी मिरजेस बळवंतराव पटवर्धनास घडल्या गोष्टीचा तपशीलवार वृत्तांत कळवला आहे. या ठिकाणी वाचकांना मी परत एकदा आठवण करून देतो की, पटवर्धन या सुमारास नानाच्या खास वर्तुळातील सरदार होते. त्यामुळे त्यांच्याकडे कळवली जाणारी बातमी हि नानाकडून वा त्याच्या विश्वसनीय व्यक्तींकडूनच कळवली जात होती. हे अनुसंधान मनाशी बाळगून धोंडो बापूजीच्या पत्राकडे पहावे लागते. या पत्रानुसार पेशवा आजारी असून त्यावर औषधोपचार चालू होते. पेशव्याच्या चित्ताची स्थिरता नव्हती. या काळात पेशव्याचा मुक्काम हा गणपतीच्या दिवाणखान्यावरील माडीवर --- म्हणजे वरच्या मजल्यावर होता. रविवार ता. २५ ऑक्टोबर रोजी सकाळ झाल्यावर दोन - तीन घटकांनी पेशव्याने स्वतः उठून त्या खोलीतला गच्चीकडे जाणारा दरवाजा उघडला आणि खाली उडी टाकली. या गच्चीच्या खाली कारंजाचा हौद असून त्यावर आपटी खाल्ल्याने पेशव्यास जबरदस्त दुखापत झाली. एका पायाचे हाड मांडीजवळ मोडले. दातांना, हातांना व चेहऱ्यालाही मार बसला. धोंडो बापूजीला जो तपशील उपलब्ध झाला, त्याचा उगम बहुधा बाळाजी सहस्त्रबुद्धे व विसाजी वाडदेकर यांच्याकडे आहे. पटवर्धनांचे पुण्यात जे कारकून हजर होते त्यांपैकी हे आणखी दोन गृहस्थ ! यांनी स्वतः वाड्यात जाऊन पेशव्याची भेट घेतल्याचा उल्लेख याच पत्रात आलेला आहे. धोंडो बापूजी बहुतेक पेशव्याच्या भेटीस गेला नसावा किंवा त्याची भेट झाली नसावी. नाहीतर तसा स्पष्ट उल्लेख या पत्रात आला असता. याचा अर्थ वाडदेकर व सहस्त्रबुद्धे यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून धोंडो बापूजीने हे पत्र मिरजेस लिहिले आहे. 

           अपघात होण्यापूर्वी पेशवा आजारी असल्याचे उल्लेख तसे सर्वत्र मिळतात. पण त्याच्या चित्ताची स्थिरता नसल्याचा स्पष्ट उल्लेख याच पत्रात मिळतो. आणि याच अस्थिर मानसिकतेत पेशव्याने स्वतःहून राहत्या खोलीतील गच्चीकडे जाणारा दरवाजा खोलून खाली उडी टाकली अशी माहिती प्राप्त होते. 

           होळकर आणि धोंडो बापूजी या  पत्रांतील मजकुराच्या सत्यतेविषयी शंका नाही. परंतु, या दोघांना ज्यांनी तपशील कळवला त्यांच्या हेतूंविषयी शंका आहे. ता. २५ ऑक्टोबर रोजी तुकोजी जेव्हा पेश्व्यास भेटला तेव्हा त्यास सांगण्यात आले कि, घटना घडते समयी पेशवा एकटा नसून त्याच्यासोबत त्याची आजी व सेवक मंडळी होती आणि तो गच्चीत कठड्याला टेकून बसला होता. आता या कठड्याची उंची किती असावी ? सर्वसाधारणपणे कोणत्याही पाच - साडेपाच फुट उंच व्यक्तीच्या कमरेएवढा तरी तो कठडा उंच असावा. तर अशा कठड्याला टेकून पेशवा बसला. आणि मध्येच त्याला उठून उभे राहावं असे वाटले. म्हणून तो उठला पण अशक्तपणामुळे त्याला स्वतःचा तोल सावरता न आल्याने तो गच्चीतून खाली पडतो. या ठिकाणी पेशव्याला सावरण्यास शागीर्द मंडळी का धावली नाहीत हा मुद्दा अगदीच गैरलागू नाही. पण तत्कालीन स्पर्शास्पर्श रिवाज लक्षात घेता आणि घटना अशा  घडली हे पाहता या मुद्द्यास अधिक महत्त्व देता येत नाही. 
           असो,आता पटवर्धन दप्तरातील पत्राचा तपशील व त्यातील विसंगत्या लक्षात घेऊ. या पत्रानुसार अपघाताच्या वेळी पेशवा त्याच्या खोलीत एकटाच होता. आजारी होता, मानसिकदृष्ट्या अस्थिर होता पण अशक्त नव्हता. सकाळी उठल्यावर काही वेळाने म्हणजे एक - दीड तासाने त्यास अचानक गच्चीत जाण्याची इच्छा झाली. स्वतः तो उठून खोलीला लागून असलेल्या गच्चीकडे निघाला. यावेळी गच्चीचा दरवाजा बंद होता. हा बंद दरवाजा बरंच काही सांगून जातो. काही शंका निर्माण करतो. (१) पेशवा उठून तास - दीड तास उलटला तरी सेवकांनी गच्ची बंद का ठेवला ? (२) पेशव्याची अस्थिर मानसिकता लक्षात घेत त्याच्या आसपास सेवकांनी सदैव हजर असणे आवश्यक होते. इतरवेळी पेशव्याकडे जाण्यास मुंगीलाही वाट मिळू नये असा कडेकोट बंदोबस्त व माणसांचा राबता असताना याच वेळी हि निर्मनुष्यता का ? (३) पेशव्याची मानसिक स्थिती अस्थिर आहे हे माहिती असूनही दरवाजाला कुलूप न घालता तो तसाच का ठेवण्यात आला ? मला कल्पना आहे की, प्रश्न क्र. १ व ३ यांचे खंडन - मंडन केले जाऊ शकते पण मुद्दा / प्रश्न क्र. २ ची वाट काय ?
         त्याहीपुढे जाऊन मी असे विचारतो कि, एकाच घटनेचा वेगवेगळा तपशील पटवर्धन व होळकर यांच्या पत्रांत का आढळतो ? यावरून हे स्पष्ट आहे की, एका पत्रातील मजकूर सजवण्यात आला आहे. मुद्दाम रचण्यात आला आहे तर दुसऱ्यातील काही प्रमाणात किंवा पूर्णतः विश्वसनीय आहे. मग प्रश्न असा आहे की, कोणते पत्र खरी माहिती सांगते. होळकरांचे कि धोंडो बापूजीचे ? 

                गोविंदराव काळेला जे पत्र पुण्याहून गेले त्यातील माहिती बरीचशी धोंडो बापूजीच्या पत्रातील मजकुराच्या वळणाची आहे. या पत्रातही पेशव्यास ज्वरांशात वायू झाल्याचा उल्लेख आहे. पण हा वायू द्वादशीला म्हणजे, अपघात झाला त्याच दिवशी झाला असे पत्रलेखकाचे म्हणणे आहे. यानंतरचा मजकूर थोडा वेगळा आहे. या पत्रानुसार पेशवा पलंगावरून उठून खिडकीकडे गेला तेव्हा सोबत खिजमतगार होता. त्याने पेशव्यास तिथे न उभे राहण्याची विनंती केली पण त्याच वेळी पेशव्याने खाली उडी टाकली. 
   
      याशिवाय पेशवे शकावलीतील मजकूर लक्षात घेता, त्यात गच्चीचा उल्लेखचं नाही. त्यामध्ये "… …. द्वादशीस दिवाणखान्यांत असतां अकस्मात मेघडंबरी बंगल्याचे पायरीवरून कारंजाचे नळीवरून खाली पडले." अशी स्पष्ट नोंद आहे. 

        यावरून पुढील विसंगत्या आढळतात :- 
(१) तुकोजीच्या माहितीनुसार अपघात प्रसंगी पेशव्याजवळ त्याची आजी आणि इतर सेवक मंडळी होती. 
(२) पटवर्धन दप्तरातील पत्रानुसार, अपघाताच्या वेळी पेशव्याच्या जवळ कोणीही नव्हते. 
(३) गोविंदराव काळेस लिहिलेल्या पत्रात, अपघाताच्या प्रसंगी एक खिजमतगार पेशव्याजवळ हजर होता. 
(४) पेशवे शकावलीनुसार घटनेच्या वेळी पेशवा एकटा असून तो बंगल्याच्या पायरीवरून पडला. 
                           पहिल्या तीन पत्रांमध्ये पेशवा गणपती महालाच्या वरील त्याच्या निवासस्थानात होता व त्याने गच्चीतून खाली उडी मारली / तो पडला. तर पेशवे शकावलीनुसार स. माधव मेघडंबरी बंगल्याच्या पायरीवरून खाली पडला. 

           पेशव्याचा अपघात ते त्याचा मृत्यू आणि त्यानंतरच्या घटना यांविषयी सलग अशी तपशीलवार माहिती पटवर्धन दप्तरात मिळते खरी, पण जेव्हा प्रत्यंतर पुरावा समोर येतो तेव्हा या दप्तरावर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न उद्भवतो. प्रस्तुत थोडे विषयांतर करून सांगतो की, श्री. पांडुरंग रानडे यांनी आपल्या ' नारायणराव पेशवे यांचा खून की आत्महत्या ' या ग्रंथात या घटनेचे संदर्भ ग्रंथांच्या व अस्सल पत्रांच्या आधारे विश्लेषण केले असून त्यांच्या मते, नाना फडणीसने स. माधवाच्या स्वभावाचा पूर्ण फायदा घेत त्यास आत्महत्या करण्यासाठी पूरक असे वातावरण / परिस्थिती निर्माण केली. अप्रत्यक्षपणे नाना फडणीसने स. माधवरावाचा खून केला असाच त्यांचा निष्कर्ष आहे. रानड्यांचा हा निष्कर्ष जसाच्या तसा स्वीकारणे योग्य होणार नाही. कारण, त्यांचा ग्रंथ हा स. १९४४ साली प्रकाशित झाला होता. त्यावेळी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांहून अधिक पत्रे सध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे रानडेंच्या निष्कर्षांस उचलून धरणे योग्य नाही. पण खुनाची -- मग ती प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष -- शक्यता डावलता येत नाही. 

       स. माधवरावाच्या खुनाविषयी शंका उपस्थित होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याच्या अपघाताच्या तपशिलांमध्ये असलेली विसंगती हे होय ! त्यामुळेचं स. माधवाच्या अपघाताविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतात. या ठिकाणी स. माधवरावाच्या मृत्यूमुळे नेमके कोणाकोणाचे हित साधले जाणार होते ते पाहू :- 
(१) दुसरा बाजीराव :- स. माधवराव मरण पावल्यावर दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद मिळणार हे उघड होते. त्यामुळे त्यानेच मुद्दाम पेशव्याचा घात केला नसावा ना ? पण हि शंका जरी प्रबळ असली तरी वस्तुस्थिती पाहता ती गैरलागू / निरर्थक आहे. यावेळी बाजीराव नानाच्या नजरकैदेत होता. कट कारस्थानात त्याची मती व गती नानाच्या तोडीची असली तरी सत्ता आणि द्रव्य हाताशी नसल्याने एवढी मोठी मसलत त्याला उभारणे, तसेच ती शेवटास नेणे शक्य नव्हते. साधा त्याला पेशव्यासोबतचा पत्रव्यवहार गुप्त राखता आला नाही तर तो पेशव्याचा घात काय करणार ? 
(२) नाना फडणीस :- स. माधवाच्या मृत्यूने हित साधले जाणारी दुसरी व्यक्ती म्हणजे नाना फडणीस ! सर्वप्रथम नानाचे यावेळी स्थान काय होते ते पाहू. नाना हा लौकिकात पेशव्यांचा फडणीस व कारभारी होता. मात्र व्यवहारात त्याच्या हाती पेशवे आणि छत्रपतीपदाची सत्ता होती. महादजी शिंदेचा मृत्यू व होळकरांच्या घरातील वारसा कलहाने या दोन्ही बलवान सरदाऱ्या त्याच्या मुठीत आल्या होत्या. हरिपंत फडके सारखा प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ता जरी मरण पावला असला तरी त्याच्या पुत्रास त्याने सरदारकी देऊन फडक्यांना नानाने आपल्या लगामी लावले होते. हरिपंत फडके हा दुय्यम कारभारी होता याचीही वाचकांनी आपल्या मनाशी नोंद घ्यावी. पटवर्धन मंडळी आपसांत फटकून असली तरी नानासोबत एकनिष्ठ होती. निजामाचा दिवाण नानाच्या ताब्यात असल्याने हैद्राबाद दरबारही नानाच्या ऐकण्यात होता. व्यवहारात नाना पेशव्याची सत्ता वापरत असल्याने म्हैसूर व कलकत्ता येथेही त्याच्या शब्दांस वजन होते. म्हणजे तख्तावरील बदलण्याची इच्छा - शक्ती यावेळी फक्त नानाकडेचं होती असे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. त्याशिवाय एकहाती सत्ता उपभोगण्याची त्यास चटक लागली होती, हे तर प्रसिद्धचं आहे. अशा परिस्थितीत स. माधवरावास अपघात घडवून आणला वा त्यास आत्मघातास प्रवृत्त केले किंवा तशी परिस्थिती निर्माण केली तर नानाचेचं हित साधले जाणार होते हे उघड आहे. राहता राहिला प्रश्न स. माधवाच्या वारसाचा तर, नारायणाच्या खुनानंतर आणि दादाच्या पदच्युतीनंतर केवळ गंगाबाई गर्भवती आहे या बळावर ज्यांनी सत्ता हाती घेतली त्या मुत्सद्द्यांना वारसाची काय अडचण पडणार होती ? 

           सारांश, बाजीराव रघुनाथ व बाळाजी जनार्दन हेच दोन प्रमुख इसम असे होते की, ज्यांना स. माधवाच्या मृत्यूने फायदा होणार होता. आता एक मुद्दा असाही उपस्थित होतो की, स. माधवराव हयात असतानाही नानाच्याच हाती सत्ता होती मग त्याच्या खुनासाठी नाना प्रयत्न का करेल ? उलट स. माधवराव जिवंत असणेचं त्याच्या हिताचे नव्हते काय ? प्रश्न रास्त आहे पण या ठिकाणी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. घाशीराम प्रकरणी मानाजी फाकडेने जोर केल्याने स. माधवाने योग्य असा न्याय केला असला तरी लौकिकात त्याने नानाच्या विरोधात निकाल दिला होता. मात्र, तरीही नानाने तो विनातक्रार स्वीकारला कारण, महादजी शिंदे त्यावेळी पुण्याच्या वाटेवर होता. नानाने जर तेव्हा ताठरता दाखवली असती तर महादजीचा पाठिंबा मिळवून पेशव्याने नानालाच जाग्यावर बसवले असते आणि महादजी आपली गच्छंती करण्यासाठीच पुण्यास येत आहे असा नानाचा देखील दाट संशय होता. महादजीच्या मृत्यूने नानाचे धोक्यात आलेले स्थान सुरक्षित झाले आणि खर्ड्याच्या मोहिमेचे सर्व नेतृत्व नाना फडणीसने पार पाडले. युद्धाचे निर्णय, तहाचे निर्णय व अटी यांमध्ये कुठेही स. माधवाचा सक्रिय सहभाग नसून तो केवळ शिक्क्याचा धनी बनून राहिला. खर्ड्याच्या नंतर बाजीराव - माधवराव अशी युती बनण्याची चिन्हे दिसू लागली. सत्तेवर आल्यावर बाजीरावाने काय केले हा भाग आपण बाजूला ठेवू. स. १७९५ साली त्याचे गुण - दोष कोणालाच माहिती नव्हते. यावेळी तो २० वर्षांचा एक अननुभवी तरुण पण नात्याने स. माधवाचा चुलता होता. पुतण्याचा कारभार आपण करावा अशी इच्छा त्याच्या मनी असणे स्वाभाविक होते. त्यातचं आपल्या मुलास कारभारात स्थान मिळावे अशा आशयाचा करार रघुनाथराव - महादजी यांच्यात आधी झालेलाचं होता. त्याची बाजीरावास आनंदीबाईने आपल्या मृत्यूपूर्वी कल्पना दिलेली असणारचं. दौलतराव शिंद्याने असह्य असा उपद्रव देऊनही बाजीराव कायम त्याच्या लगामी का राहिला याचे रहस्य रघुनाथ - महादजी यांच्या करारात दडलेलं आहे. खुद्द महादजीनेही पुणे मुक्कामात बाजीरावास कारभारात घेण्याचा मुद्दा उकरून काढलाचं होता की ! तात्पर्य, स. माधवराव व दुसरा बाजीराव हे दोघे एकत्र येण्याची शक्यता नानाला दिसत होती आणि पेशवे परिवाराचे हे दोन्ही तरुण एकत्र आले तर आपले स्थान, अधिकार धोक्यात आहे, हे न समजण्याइतपत नाना राजकारणात नवखा नव्हता. त्यामुळे या दोघांची जोडी फोडण्याचे तो शक्य तितके प्रयत्न करणार हे उघड आहे व ते त्याने केलेही. बाजीराव - माधवराव यांचा पत्रव्यवहार खंडित केला. स. माधवावर आपले नियंत्रण परत एकदा बसवण्याचा शक्य तितका प्रयत्नही केला, हे दसऱ्याच्या समारंभावरून लक्षात येते. 
   
           आता प्रश्न असा पडतो कि, स. माधवाचा नेमका खून झाला की त्याने आत्महत्या केली अथवा त्यास अपघाती मरण आले. या प्रश्नाचे उतर शोधण्याचा आपण प्रयत्न करू. 

               प्रथम पटवर्धनी पत्रांच्या आधारे या गूढाची उकल होते का ते पाहू :- ता. २६ ऑक्टोबरच्या पत्रानुसार स. माधव आजारी होता. त्याच्या चित्ताची स्थिरता नव्हती. अशा परिस्थितीत त्याने राहत्या खोलीतला गच्चीचा दरवाजा स्वतःहून उघडून खाली उडी टाकली. या पत्रात अशक्तपणाचा किंवा तोल जाण्याचा उल्लेख नाही. ता. २७ ऑक्टोबर रोजी परशुरामभाऊने तासगावाहून मिरजेस बळवंतरावास कळवले की, पुण्यास तातडीने फौजेसह बोलावले आहे. तर दि. ३० ऑक्टोबरचे परशुरामभाऊने बळवंतरावास लिहिलेल्या पत्रात, नानाने पुढील विचारासाठी जलदीने पुण्यास येण्याचा उल्लेख आहे. तसेच या पत्रात गादीला वारस म्हणून बाजीरावास आणावे कि दत्तक घ्यावा याचाही उल्लेख आहे. ता. ५ नोव्हेंबरचे परशुरामभाऊचे पत्र आहे. त्यात नानाच्या भेटीचा वृत्तांत असून त्या भेटीत नानाने त्यांस सांगितले की, ' पेशवा शेवटच्या क्षणापर्यंत शुद्धीवर होता व त्याने आपण वाचत नसल्याचे जाणून आपल्या नावाचा दुसरा वारस नेमण्याची नानास आज्ञा केली. तसेच अशाच आशयाची भाषणे पेशव्याने इतरांजवळ / हरिपंत फडकेच्या मुलाजवळ केल्याचा ' उल्लेख आहे.  असो, यानंतर ता. २६ नोव्हेंबरचे नीलकंठ आपाजीचे पत्र आहे. त्यानुसार आपला शेवट जवळ आल्याचे जाणून पेशवा आपल्या पत्नी व इतरांजवळ काही गोष्टी बोलला होता. आता, या संभाषणाच्या गोष्टी अपघाता आधीच्या कि नंतरच्या यांचा खुलासा नाही. याच तारखेचे खुद्द परशुरामभाऊचे पत्रदेखील उपलब्ध असून, त्यानुसार पेशवा माडीवरून पडण्यापूर्वी व त्यानंतरही इतरांजवळ निरवानिरवीची बडबड करत होता हे स्पष्ट होते. तसेच याच पत्रात दत्तकाचा शोध सुरु असल्याचीही माहिती आहे. 
                पटवर्धनी दप्तरातील माहितीवरून पुढील गोष्टी तर स्पष्ट होतात :- (१) आपल्या नावाचा दुसरा वारस नेमणे असे मृत्युपूर्वी स. माधवाने सांगितल्याने नानाने दत्तकाचे राजकारण हाती घेतले. (२) जीवनाला वैतागून म्हणा किंवा इतर कारणांनी म्हणा माडीवरून पडण्याआधी पेशव्याने निरवानिरवीकी बडबड केली होती. 

             हैद्राबादेस गोविंदराव काळयास जे पत्र गेले त्यात पुढील माहिती मिळते :- अपघाताच्या दिवशी पेशव्यास तापात वायू झाला. वाताच्या भिरडीत तो पलंगावरून उठून खिडकीजवळ गेला. सोबत सेवक होता. त्याने त्यास तेथे न उभे राहावे असे सांगितले. तेव्हा पेशव्याने खाली उडी मारली. त्यामध्ये त्याच्या उजव्या मांडीचे हाड मोडले, दातांची कवळी बाहेर पडली, नाकातून रक्त आले. वैद्यांनी उपचार केले. चार घटकांनी तो शुद्धीवर आला, तेव्हाही वायूचा प्रभाव होताच. त्या भ्रमात तो बडबड करत होता. 
                पेशवे शकावलीनुसार रविवारी अकस्मातपणे पेशवा मेघडंबरी बंगल्याच्या पायरीवरून कारंजाचे नळीवर पडला. कोजागरीच्या दिवशी शुद्धीवर असताना कारभाऱ्यांना --- नानाला बोलावून आपण वाचत नाही तेव्हा दादाच्या मुलास राज्याचे वारस म्हणून नेमावे असे सांगून सायंकाळी जीव सोडला. 
                    काव्येतिहाससंग्रहातील नोंदीची माहिती पुढीलप्रमाणे :- आश्विन शु. १२ रोजी माडीवरून पडून अत्यवस्थ. शु. १५ रोजी कैलासवास. मृत्यूपूर्वी नानासाहेबाच्या वंशाचा शेवट झाला व ब्रम्हप्रलय होईल असे पेशव्याने उद्गार काढले. 
               
            खुद्द नाना फडणीसच्या पत्रातील माहिती पुढीलप्रमाणे :- " रावसाहेबांचे शरीरीं किंचित वायूची भावना पांचसात दिवस होऊन गणपतीचे दिवाणखान्याचे दुमजल्यावरून कारंजाचे अंगे संगी फरशावर जमिनीस आले. तिसरे दिवशी कैलासवास केला. " 
    नानाच्या पत्रानुसार अपघातापूर्वीच पेशव्यास वायू झाला होता. अपघात प्रसंगी पेशवा तोल जाउन पडला किंवा त्याने उडी टाकली तसेच त्याप्रसंगी त्याची आजी आणि सेवक मंडळी होते कि फक्त एक सेवक होता याचाही तो खुलासा करत नाही. फक्त पेशवा वरून खाली आला असाच मोघम उल्लेख आहे. 

     गोविंदराव काळेस गेलेले पत्र, पेशवे शकावली, काव्येतिहाससंग्रहातील नोंद यांचा  एकत्रित विचार केला असता पुढील निष्कर्ष निघतो :- पेशवा तापाने आजारी होता. त्यांस वायूचे झटके येत होते. पण तो अशक्त नव्हता हे काळ्याच्या पत्रावरून स्पष्ट होते. पेशव्याने स्वतः उडी मारली असेही त्याच पत्रात दिले आहे तर पेशव्यांची शकावली व काव्येतिहाससंग्रह त्याविषयी काहीही सांगत नाहीत. फक्त पेशवे शकावलीनुसार, मृत्यूपूर्वी स. माधवाने आपल्यामागे दादाच्या मुलास पेशवेपद देण्याची आज्ञा केल्याचा उल्लेख आहे. 

          निष्कर्ष :- सर्व उपलब्ध पुरावे, पत्रे, नोंदी व इतिहासकरांचे निष्कर्ष अभ्यासून माझे मत पुढीलप्रमाणे बनले आहे :- अपघाताच्यापूर्वी स. माधवराव तापाने आजारी होता हे तर उघड आहे. अपघात होण्याच्या आधी त्यांस वाताचे झटके येत होते असा उल्लेख पटवर्धन दप्तरातील पत्रे, गोविंदराव काळेला लिहिलेले पत्र तसेच नानाच्या पत्रातही येतो. पण तुकोजी होळकराच्या पत्रात याचा अजिबात उल्लेख नाही. ज्या पत्रांमध्ये पेशव्यास वायू झाल्याचे उल्लेख आहेत, त्या पत्रलेखकांस व तुकोजीलाही नानाच्याच गोटातून माहिती मिळाली आहे. परंतु, तुकोजी स्वतः शुद्धीवर आलेल्या पेशव्यास भेटला होता व त्यावेळी पेशवा भानावर असून भ्रमात नव्हता हे त्याच्या पत्रावरून उघड होते. याचा अर्थ असा होतो की, पेशव्यास वायू झाला होता हि मुद्दाम उठवण्यात आलेली कंडी आहे. 
     
         दुसरा मुद्दा असा आहे, पेशव्याने उडी मारली तेव्हा त्याच्यासोबत कोण होते का ? तुकोजीच्या माहितीनुसार त्यावेळी सेवकवर्ग व पेशव्याची आजी त्याच्या जवळ होते. पण उभे राहताना त्यास तोल सावरता न आल्याने तो गच्चीतून खाली पडला. परंतु, पटवर्धन दप्तरातील पत्र सांगते कि, अपघाताच्या प्रसंगी पेशवा एकटा होता व स्वतःहून त्याने गच्चीचा दरवाजा उघडून खाली उडी टाकली. तर गोविंदराव काळेस गेलेल्या पत्रात असे दिले आहे की, पेशव्याने जेव्हा खाली उडी मारली तेव्हा एक खिजमतगार जवळ होता. आता या तीन पत्रांमधील नेमके कोणते पत्र सत्य सांगत आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. या तीन पत्रांपैकी फक्त तुकोजीचे पत्र सांगते की, पेशव्याचा अपघात झाला आहे तर इतर दोन पत्रांमधून पेशव्याने आत्महत्या केल्याचे ध्वनित होते. 
           प्रथम एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे व तो म्हणजे या तिन्ही पत्रलेखकांना शनिवारवाड्यात गेल्यावर घटनेचा तपशील मिळाला आहे. या तपशिलाचा मुख्य उगम नाना फडणीस असल्याचे उघड आहे. या ठिकाणी आणखी एका प्रश्नाची उकल होणे गरजेचे आहे व तो म्हणजे पेशवा खरोखर तोल जाऊन पडला कि त्याला ढकलण्यात आले वा त्याने स्वतःहून खाली उडी मारली ?

              पेशव्याला गच्चीतून खाली फेकण्याची शक्यता तशी निराधार आहे. कारण, तसे घडले असते तर तुकोजीला हे वर्तमान समजलेचं असते. अपघातानंतर पेशवा शुद्धीवर आल्यावर त्याची भेट तुकोजीने घेतली तेव्हा पेशव्याने घडला प्रकार जरूर सांगितला असता. त्यामुळे हा मुद्दा बाद होतो. राहता राहिल्या दिन शक्यता, तर त्यातील तोल जाऊन खाली पडण्याची शंका देखील निरर्थक आहे. कारण, खरोखरचं पेशव्याचा तोल गेला असता तर तसाच उल्लेख इतर पत्रांमध्ये आला असता पण तसे नाही. याचाच अर्थ असा की, पेशव्याने स्वतःहून गच्चीतून खाली उडी मारली !

       पेशव्याने स्वतःहून गच्चीतून उडी घेतली खरी पण त्यावेळी तो वायूच्या भ्रमात नव्हता हे देखील तितकेच सत्य आहे. माझ्या मते, आपल्या आजीच्या उपस्थितीतच स. माधवाने आत्महत्येचा प्रयत्न केला. तुकोजीच्या पत्रातील बरीचशी माहिती या ठिकाणी विश्वसनीय मानता येते. फक्त तोल जाऊन खाली पडण्याचा भाग वगळता ! गंगाबाईची आई पेशव्याच्या भेटीस आल्याचा उल्लेख फक्त तुकोजीच्या पत्रात आहे व त्याचे स्थान लक्षात घेत त्यांस सर्वच काही खोटे रचून सांगणे नानाला शक्य नव्हते. त्यामुळे त्याने अर्धी खरी व अर्धी खोटी माहिती दिली. त्याउलट पटवर्धनांचे कारकून व गोविंदरावाचे हस्तक हि मंडळी तुलनेने नगण्य अशी असल्याने त्यांना वाटेल ती कथा रचून सांगणे नानास सहजशक्य होते. त्यामुळेचं पटवर्धन व काळेच्या पत्रांतील तपशीलात विसंगती आढळते. असो, पेशव्याची आजी यावेळी भल्या पहाटे नातवास कशी काय भेटायला आली हा देखील मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. माझ्यामते या ठिकाणी पांडुरंग रानडेंचे मत विचारात घेणे चुकीचे होणार नाही. नानाने पेशव्याच्या आजीस मुद्दाम बोलावले. तिच्या नातवाने आपल्या आज्ञेत / बंधनात राहणे कसे योग्य आहे हे सांगण्यास स. माधवास समजावून सांगण्यास भाग पाडले. बळवंतराव वामोरीकरास अटक झाल्यापासून पेशव्याच्या ' इगो ' ला धक्का बसलेला होताच. खर्ड्याच्या मोहिमेपासून आपले स्थान व आपली नेमकी किंमत काय आहे, हे तो पाहत होता. त्यात या प्रकरणाची भर पडली. हाती सर्वाधिकार असूनही आपण केवळ शोभेचे मालक आहोत याची त्याला जाणीव झालेली होती. त्यामुळे तो स्वतःवर अधिक चिडला होता हे उघड आहे. परिस्थिती प्रतिकूल असेल आणि मनुष्य त्यातून मार्ग काढण्यास हतबल असेल तर स्वतःवर चरफडण्याखेरीज वा निराशाग्रस्त अवस्थेत काहीतरी आततायी मार्ग स्वीकारण्याखेरीज काय करू शकतो ? पेशवा आत्महत्येपूर्वी जी बडबड करत होता ती वायूच्या प्रभावात नसून तो शुद्धीवर असताना हे सर्व करत होता. आपला संताप शब्दांतून व्यक्त करणे यापलीकडे त्याच्या हाती काही नव्हते. या सर्वांचा कडेलोट रविवारी झाला, जेव्हा त्याची आजी त्याला नानाच्याच बंधनात राहण्याचे सांगायला आली आणि वैतागलेल्या स. माधवाने गच्चीतून खाली उडी टाकून आपला संताप प्रकट केला व इहलोकीची यात्रा संपवली !

         आता प्रश्न असा निर्माण होतो कि, असे काही घडेल याची नानास पूर्वकल्पना होती काय ? माझ्या मते, नानाला याची पूर्वकल्पना होती. स. माधव बाजीरावाच्या साथीने आपल्यावर मात करण्यासाठी काही ना काही डाव रचणार किंवा असाच काहीतरी आततायी मार्ग स्वीकारणार हे सुमारे २० वर्षे स. माधवाचे पालन केलेल्या नानाला माहिती नसणार तर इतर कोणाला ? त्यामुळेचं त्याने पुढील सिद्धताही आधीच करून ठेवली होती. त्यानुसार परशुरामभाऊला नानाने सांगितले की, मृत्यूपूर्वी पेशव्याने आपणास दत्तक घेण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पेशव्यांच्या शकावलीनुसार स. माधवाने आपल्या मागे दादाच्या पुत्रास पेशवेपद द्यायला सांगितले होते. या ठिकाणी शकावलीपेक्षा परशुरामभाऊचे पत्र अधिक विश्वसनीय मानता येईल. 

                पेशवे शकावलीतील नोंद कोणी व कधी केली याची मला माहिती नाही. मरणोन्मुख -- जिने जीवाला वैतागून शोभेच्या राज्याच्या मालकीचा व जीवनाचा त्याग केला आहे -- ती व्यक्ती आपल्या मागे राज्याचा वारसा कोणाला द्यायचा याची उठाठेव का करेल ? शकावलीकारास बाजीराव - माधवराव यांच्यातील संबंधांची माहिती होती आणि त्यास अनुसरूनचं याने शकावलीत नोंद दिलेली आहे. नाहीतर, नानाची माणसे पेशव्याच्या सभोवती असताना शकावलीकारास तेवढी वेगळी माहिती कशी मिळाली ? स. माधवाची जर अशीच इच्छा असती तर त्याने तुकोजीला तसे का सांगितले नाही ? असो, नानाने जे परशुरामभाऊस सांगितले ते देखील पूर्णतः सत्य आहे असे मानता येत नाही. दत्तकाच्या उठाठेवीस जोर यावा याकरिताच त्याने हे सर्व संवाद रचल्याचे उघड आहे. मृत व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यास तसेही सर्व तत्पर असतात हे नाना ओळखून होता. त्यामुळेचं त्याने हा बनाव केला. परंतु, नानाचा हा डाव पूर्णतः सफल झाला नाही हे पटवर्धनांच्या पत्रांवरूनच स्पष्ट होते. शिंदे - होळकर आणि इतरांना रघुनाथाच्या वंशजाशिवाय इतरांस पेशवेपद मिळावे हे मंजूर नव्हते. औरस वंशाचा हक्क डावलणे हे त्यांना मान्य नव्हते. 

           तात्पर्य, दत्तकाविषयीची आपली पर्यायी योजना नानाने आधीचं आखलेली होती. नारायणाच्या खुनानंतरची स्थिती व आताची परिस्थिती यांत विलक्षण साम्य आहे. एकात हत्या तर दुसऱ्यात आत्महत्या ! फरक फक्त इतकाच आहे की, त्यावेळी बारभाई मंडळ अस्तित्वात असल्याने कार्य सिद्धीस गेले तर यावेळी सर्व अधिकार नानाने स्वतःच्या हाती राखल्याने त्याचा बेत सिद्धीस जाण्यास सुरवातीपासूनचं अडथळे उभे राहिले. असो, हा पुढील भाग झाला खरा, पण स. माधव नाहीसा झाला तर काय करायचे हे नानाने आधीच ठरवले होते हे अस्सल पत्रांवरून सिद्ध होते एवढे निश्चित ! 

          पेशव्यांच्या इतिहासातील सदाशिवरावभाऊच्या तोतयाचे  प्रकरण या ठिकाणी संदर्भांसाठी वाचकांनी लक्षात घ्यावे. त्या प्रकरणात ज्याप्रमाणे एकदा हाती सापडलेली व्यक्ती हि खरी सदाशिवराव आहे कि तोतया याविषयी जसे सहेतुक मौन बाळगून त्याच्या खरे - खोटेपणाविषयी ज्याप्रमाणे बातम्या उठवण्यात आल्या, तसाच काहीसा प्रकार स. माधवाच्या बाबतीत झाला आहे. त्याला वायू झाला, वाताच्या भिरडीत त्याने गच्चीतून खाली उडी टाकली अशी भूमिका एकदा उठवल्यावर पुढे तीच कायम ठेवण्यात आली आणि मरणोन्मुख व्यक्तीने ' आपल्या मागे दत्तक घ्या ' असे सांगितल्याचा प्रचार करण्यात आला. मात्र, हे सर्व करताना पेशव्याच्या आत्महत्येच्या तपशीलांत बऱ्यापैकी विसंगती निर्माण झाली व हि विसंगती मुद्दाम करण्यात आली किंवा अजाणता झाली असे नाही तर एक खोटं रचल्यावर त्याच्या समर्थनार्थ शंभर खोट्या गोष्टी बोलाव्या लागतात, तद्वत पेशव्याने वाताच्या भिरडीत कसा आत्महत्येचा उपद्व्याप केला हे सांगताना, कधी तो एकटा होता तर कधी एक सेवक हजर होता तर कधी त्याचा सर्वांच्या उपस्थितीत तोल गेला अशा कथा रचण्यात आल्या. 

           या ठिकाणी मी हे देखील कबूल करतो की, श्री. पांडुरंग रानडे यांनी या घटनेचे विश्लेषण करताना, नानाने स. माधवरावास आत्महत्या करण्यास परिस्थिती निर्माण केल्याचा जो सिद्धांत मांडला आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. आपण घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम काय होणार आहे याची नानास पुरेपूर कल्पना होती. स. माधवराव आत्मघात करण्याचा आततायीपणा देखील करू शकतो याचीही त्यास जाणीव होती. पण जी गोष्ट त्याच्या फायद्याची होती ती तो कशाला टाळेल ? 

          सारांश, उपलब्ध पुराव्यांवरून जरी स. माधवरावाने पूर्ण भानावर असताना स्वतःहून गच्चीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असला तरी त्यांस असे आततायी पाऊल उचलण्यास भाग पडावे अशी नाना फडणीसने परिस्थिती निर्माण केली होती हे विसरता येत नाही. ज्याप्रमाणे खुनी इसमास शस्त्र पुरवणारी व्यक्ती त्या खुनात, खुनी इसमाइतकीच दोषी असते ; त्याचप्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त करणारी वा तशी परिस्थिती निर्माण करणारी व्यक्ती देखील प्रत्यक्ष खुनी इसमाइतकी -- निदान खुन्यास शस्त्र पुरवणाऱ्या एवढी व्यक्तीएवढीचं दोषी असते. तात्पर्य, अस्सल पत्रे स. माधवरावाने आत्महत्या केली असे सांगत असली तरी त्याने आत्महत्या करावी असे वातावरण व परिस्थिती नाना फडणीसने निर्माण केली होती हे विसरता येत नाही. त्यामुळेचं नाना फडणीस हा सवाई माधवराव पेशव्याच्या मृत्यूस कारणीभूत आहे असे म्हणण्यापेक्षा बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीसने स. माधवरावाचा खून केला असेच म्हणावे लागेल. 
                
                     


                                           

संदर्भ ग्रंथ :- 

१) मराठी रियासत ( खंड ५ ते ७ ) :- गो. स. सरदेसाई 
२) ऐतिहासिक लेखसंग्रह ( खंड ९ ) :- वा. वा. खरे 
३) नारायणराव पेशवे यांचा खून की आत्महत्या ? :- पांडुरंग गोपाळ रानडे 
४) नाना फडनवीस यांचे चरित्र :- वा. वा. खरे 
५) मराठ्यांचा इतिहास ( साधन परिचय ) :- संपादक - प्रा. अ. रा. कुलकर्णी, डॉ. म. रा. कुलकर्णी, डॉ. मा. रा. कंटक 
६) मराठ्यांचा इतिहास ( खंड - ३ ) :- संपादक - ग. ह. खरे, अ. रा. कुलकर्णी
७) मराठेशाहीतील वेचक वेधक :- य. न. केळकर 
८) भूतावर भ्रमण ( ऐतिहासिक लेखसंग्रह ) :- य. न. केळकर   
                                         ( समाप्त )