मंगळवार, २६ मार्च, २०१९

पानिपत ( भाग ३ )





    बुराडीच्या संग्रामानंतर हिंदुस्थानचे राजकारण बदललं. जे संस्थानिक दखनी कि अब्दाली असे डळमळीत होते, त्यांच्या मनाचा कल अब्दालीच्या पक्षाकडे झुकू लागला. दत्ताजीने ज्या प्रकारे बुरडीचा घाट स्वतःवर ओढवून घेतला, त्याचे हे फलित होय.

    बुराडीनंतर कोटपुतळी येथे शिंदे होळकरांच्या फौजा एकत्र आल्या. त्यानंतर अब्दाली विरोधी लढ्याची सूत्रे मल्हारराव होळकराच्या हाती जाऊन राजकारणास वेगळाच रंग चढला.  

भाऊ बखरीच्या आधारे किंवा कसल्याही समकालीन पुराव्याशिवाय होळकर अब्दालीच्या सामन्यास घाबरत होता अशी बालिश विधानं करणाऱ्या निर्बुद्ध इतिहासकारांची थोबाडं फोडण्याजोगी कामगिरी यावेळी होळकराच्या हातून घडल्याची नोंद इतिहासाने केली आहे.

    शिंदे होळकरांच्या फौजा एकवटल्यावर प्रथमतः कबिले - बुणगे सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. जाट अब्दालीचा विरोधक, शिंद्यांचा पगडभाई असला तरी होळकराने त्यावरही अविश्वास दाखवला, यावरून त्याची राजकीय परिपक्वता व योग्यतेचा अंदाज यावा.

    बुणगे कबिले स्वमुलखांत सुरक्षित पोहचताच होळकर -शिंद्यांच्या फौजांनी अफगाण - रोहिल्यांविरुद्धचा लढा नेटाने चालू ठेवला. यातूनच सिकंदऱ्याचे प्रकरण घडले. या लढाईत होळकराचा मोठा पराभव तथा पोळजत्रा झाल्याचे म्हटले असले तरी या पराभवानंतरसुद्धा धावपळीच्या युद्धांत होळकराने अब्दालीला इतके दमवले कि, दि. १३ मार्च १७६० रोजी त्याने होळकरासोबत तह करून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. दुदैवाने या संग्रामाचे तसेच तहाचे तपशील आज उपलब्ध नाहीत. आहेत, त्या फक्त नोंदी. परंतु या नोंदीच पुरेशा बोलक्या आहेत. जगाच्या पाठीवर कोणताही विजयी सेनानी आपल्या पराक्रमाची, विजयाची पुरेपूर किंमत वसूल केल्याखेरीज मागे जात नाही. हे लक्षात घेता केवळ नजीबखानाच्या ताब्यातील प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या बोलीवर होळकराने अब्दालीसोबत तह करून केवढा मोठा राजनैतिक विजय मिळवला होता, याची कल्पना यावी.

इतिहासात जर तर या शब्दांना स्थान नाही. कारण यामुळे प्रत्यक्ष वस्तुस्थितीत फरक पडत नसतो तरीही, कित्येकदा अपरिहार्य परिस्थितीत या संज्ञांचा आधार घ्यावाच लागतो. दि. १३ मार्च १७६० रोजीच्या होळकर - अब्दाली तहासंबंधी असेच म्हणावे लागते.

    दि. १३ मार्च रोजी होळकराने अब्दालीसोबत तह करून त्याला मायदेशी जाण्यास प्रवृत्त केले खरे परंतु दुसऱ्याच दिवशी इकडे दख्खनमधून सदाशिवराव मोठ्या फौजेनिशी हिंदुस्थान प्रांती येण्यास परतूडहुन निघाल्याने होळकराने केलेल्या तहाचा परिणाम काय होतो हे पाहण्यासाठी अब्दाली काही काळ इथेच थांबला. पुढे पेशव्याने होळकराचा तह बहुधा नामंजूर केल्याने किंवा नजीबला मराठी सरदार व पेशव्याच्या हेतूंविषयी संशय वाटल्याने होळकराने घडवून आणलेला तह बाजूला राहून उभय पक्षांची पावलं युद्धाच्या दिशेने पडू लागली.

                                                                                           ( क्रमशः )

शनिवार, १६ मार्च, २०१९

मल्हारराव होळकर : आक्षेप निरसन







    पानिपत म्हणजे मराठी मनातील एक सल. ज्याला इतिहासात अजिबात रस नाही अशा व्यक्तीच्या ऐकण्या - बोलण्यातही हा शब्द येऊन राहिलाय. मग ते कधी पानिपत झालं या शब्दप्रयोगाद्वारे तर कधी सतराशे साठ भानगडी, या लाक्षणिक म्हणीद्वारे. खेरीज कथा - कादंबऱ्यांवर पोसलेला एक असाही वर्ग आहे -- ज्याचे प्रमाण पानिपत अनभिज्ञ व तज्ञांहून अधिक आहे -- त्याच्या लेखी पानिपतच्या अरिष्टाचे दोन खलनायक ठरलेले असतात. एक मल्हारराव होळकर तर दुसरा नजीबखान. किंबहुना होळकर आणि नजीबखान या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. अर्थात, यामागे त्यांचीही चूक नाही. कारण त्यांचा तसा समज करून देण्यात आमचे तज्ञ इतिहास संशोधकच अधिकाधिक जबाबदार आहेत. उदाहरणार्थ :- पानिपत संबंधी मल्हारराव होळकरावर इतिहासकारांनी प्रामुख्याने केलेले दोन आरोप म्हणजे (१) हाती जिवंत सापडलेल्या नजीबखानास सोडून देण्याकरता रघुनाथरावास भाग पाडणे व (२) बुराडी घाटच्या लढाईत दत्ताजी शिंद्याच्या मदतीस न जाणे. या लेखामध्ये या दोन आरोपांचा आपणांस समाचार घ्यायचा आहे.


  १]  मल्हारराव होळकरावरील प्रथम आरोप म्हणजे त्याने हाती जिवंत सापडलेल्या नजीबखानास जीवनदान देण्यासाठी, कैदमुक्त करून त्याच्या जहागिरीच्या प्रदेशात परत जाऊ देण्यासाठी रघुनाथराव उर्फ दादासाहेबास गळ घातली व यामुळेच पानिपतचे अरिष्ट उद्भवले. जर नजीब जिवंत सुटलाच नसता तर पानिपत घडलेच नसते.


    या आरोपाचे समर्थक अगदी इतिहासाचार्य राजवाड्यांपासून ते अलीकडच्या नवजात इतिहासकारांपर्यंत अनेकजण असून या आरोपाच्या निश्चितीकरता पुराव्यादाखल ते भाऊसाहेबांच्या बखरीतील पृष्ठ क्र. ५० - ५१ वरील मजकूर उद्धृत करतात. खेरीज राजवाड्यांसारखे पुराव्याखेरीज न बोलणारे साक्षेपी, सत्यवचनी इतिहासकार आपल्या ' मराठ्यांच्या इतिहासाची साधने : १७५० पासून १७६१ पर्यंत ' यामधील ले. क्र. ४८  च्या आधारे " मल्हाररावाने नजीबखानाचे साधन करून ठेविले. " असे प्रास्ताविकात बेधडकपणे बोलून मोकळे होतात. परंतु वास्तविकता काय आहे ?


    प्रस्तुत चर्चेतील प्रसंग हा रघुनाथरावाच्या दुसऱ्या हिंदुस्थान मोहिमेतील ( हिलाच अटक स्वारी असेही म्हणतात. ) असून दादाची हि स्वारी स. १७५७ - ५८ मध्ये घडून आली.


    स. १७५७ च्या जून - सप्टेंबर दरम्यान रघुनाथरावाच्या नेतृत्वाखालील मराठी सरदारांनी दिल्लीभोवती फास आवळत सप्टेंबर मध्ये दिल्लीचा ताबा नजीबखानाकडून घेतला. यावेळी दिल्ली जिंकण्याच्या कामी रघुनाथरावाने जे सरदार योजले होते त्यामध्ये होळकरासोबत विठ्ठल शिवदेव विंचूरकराचाही समावेश होता व याच विंचूरकराने दिल्लीतून नजीबखानाला हुसकून लावण्याच्या कमी विशेष पराक्रम गाजवल्याबद्दल दिल्लीच्या तुर्की बादशहाने त्याला उंची पोशाख, अलंकार, ' राजे उमदेतुल्मुल्क बाहादर ' हा किताब, तलवार आणि नऊ गावं इनामादाखल दिल्याचे ' विंचूरकर घराण्याचा इतिहास ' मध्ये श्री. हरी रघुनाथ गाडगीळ यांनी नमूद केलं आहे. विशेष म्हणजे नजीबखानाला विंचूरकराने जिवंत पकडल्याची उल्लेख गाडगीळ करत नाहीत.


    श्री. यदुनाथ सरकारांनी आपल्या ' फॉल ऑफ मुघल  एम्पायर Vol. 2 '  मध्ये या प्रकरणाची अस्सल संदर्भ साधनांद्वारे विस्तृत चर्चा केली असून त्यामध्ये रघुनाथरावासोबत नजीबखानाने तहाच्या वाटाघाटी करून दिल्लीचा ताबा सोडल्याचे त्यांनी नमूद केलं असून या वाटाघाटी मल्हारराव होळकराच्या मार्फत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. परंतु युद्ध प्रसंगी नजीबखान जिवंत मराठी सैन्याच्या हाती लागला व कैद झाल्याचा प्रसंग घडल्याचे त्यांनी दिलेलं नाही.


     तहाची वाटाघाट होण्यास मध्यस्थ होणं वेगळं व शत्रू जिवंत हाती लागला असता त्यांस मोकळं सोडण्यास भाग पाडणं वेगळं हे सरदेसाई, राजवाडे सारख्या इतिहासकारांस माहिती नव्हतं काय ? तरीही यांनी हरामखोरी करत खुशाल वाटेल तशी विधानं ठोकत होळकरास खलनायक ठरवण्याचा निंदनीय प्रयत्न केला. मग याच न्यायाने कुंभेर प्रसंगी सुरजमल जाटाच्या वतीने जयाजी शिंद्याने केलेल्या कृत्यास हे विद्वान स्वामीद्रोह का म्हणाले नाहीत ? किंवा यांचे सध्याचे बगलबच्चे कुंभेरी प्रसंगी शिंद्याच्या वर्तनावर मूग गिळून का बसतात ?


     तह घडवून आणताना मध्यस्थास पैसे देण्याची प्रथा तेव्हा होती व असे पैसे सर्वच अंतस्थ घेत होते. अगदी पेशव्यांपासून नाना फडणवीसापर्यंत सर्वांनी आपले खासगी खजाने याद्वारे भरून घेतले मग होळकराने केलेली मध्यस्थी तेवढी यांना का खुपावी ? आणि स. १७५७ मध्ये होळकरास काय स्वप्न पडले होते कि, चार वर्षांनी याच नजीब - अब्दालीकडून आपल्या सत्तेचे बारा वाजणार आहेत म्हणून ! माणसाने आरोप करावेत परंतु ते इतकेही बेछूट नसावेत कि. जेणेकरून भविष्यात आपल्याच अकलेचे दिवाळे निघाल्याचे सिद्ध व्हावे.


  २]  मल्हारराव होळकरावरील दुसरा महत्त्वाचा आक्षेप म्हणजे, तो मुद्दामहून दत्ताजी शिंद्याच्या मदतीस दिल्लीला गेला नाही. त्यामुळे दत्ताजीला नजीब - अब्दाली सोबत एकाकी लढा देणे भाग पडून त्यातच त्याचा अंत झाला.


     या आक्षेपास बळकटी देणारा एकही अस्सल कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही. तरीही इतिहासाचार्य राजवाड्यांसारखे निःपक्षपाती इतिहासकार आपल्या ' मइसा : १७५० ते ६१ ' मधील ले. १५७ या नानासाहेब पेशव्याच्या पत्रांतील "... मल्हारबांनी आधी काम कोणते करावे ? मग कोणते करावे ? माधोसिंगाचा मजकूर काय ? जेव्हा म्हटले तेव्हा पारपत्य होते तो विचार त्यांनी न केला " या वाक्यांवरून होळकरास मराठी राज्याचा गृहशत्रू संबोधतात व साक्षात इतिहासाचार्यांच्या निष्कर्षास ब्रम्हवाक्य समजून इतरजण त्यांस प्रमाण मानतात. परंतु वस्तुस्थिती इथेही वेगळीच आहे.

प्रस्तुत प्रसंग डिसें. १७५९ ते जाने. १७६० दरम्यानचा असून डिसेंबरच्या पूर्वार्धापर्यंत दत्ताजी शिंदे शुक्रताल जवळ नजीबखान - सुजाउद्दौला सोबत लढत होता तर मल्हारराव होळकराने पेशव्याच्या आज्ञेने खंडण्यांच्या वसुलीकरता राजपुतान्यातील मोहिमा हाती घेतल्या होत्या.


    विशेष म्हणजे स. १७५९ च्या नोव्हेंबरात लाहोरास असलेला साबाजी शिंदे अब्दालीकडून पराभूत होऊन त्याच महिन्याच्या अखेरीस शुक्रताली दत्ताजीस रुजू झाला होता. पाठोपाठ पंजाबात ठिकठिकाणी प्रथमतः रघुनाथराव व मागाहून दत्ताजीने तैनात केलेली मराठी सरदारांची पथके अब्दालीकडून पराभूत होऊन वा त्याच्या दहशतीने माघार घेत दत्ताजी शिंदेच्या छावणीत गोळा होऊ लागली होती. तेव्हा दि. ११ डिसेंबरच्या सुमारास अब्दालीला रोखण्याच्या इराद्याने दत्ताजी दिल्लीकडे निघून गेला.


    यासंबंधी श्री. सरकारांनी आपल्या फॉल ऑफ मुघल एम्पायर Vol. 2  मध्ये अस्सल संदर्भ साधनांद्वारे हे स्पष्ट केलं आहे कि, अब्दालीच्या आगमनाची वार्ता येताच दत्ताजीने प्रथम होळकरास आपल्या मदतीला येण्याकरता पत्र रवाना केली होती. त्यानुसार मल्हाररावाने राजपूत युद्ध आटोपतं घेण्याच्या उद्देशाने आपला तोफखाना रामपुऱ्यास लावून दिला व तो स्वतः दिल्लीकडे निघणार तोच शिंद्याची पत्रे आली कि, अब्दाली येण्याचा संभव नाही. तूर्तास नजीबला उखडून काढत आहोत. तेव्हा होळकराने दिल्लीकडे जाण्याचा निर्णय रद्द करून रामपुऱ्यास पाठवलेला तोफखाना परत बोलावला व बलवड्यास मोर्चे लावले. परंतु दि. २७ डिसेंबर रोजी दत्ताजीची कुमकेकरता तातडीने निघून येण्याची पत्रे येताच मल्हाररावाने पुन्हा राजपूत युद्ध आवरतं घेत दि. २ जाने. १७६० रोजी झिलाडा येथून दिल्लीकडे प्रस्थान ठेवले.


    सरकारांच्या विधानांना श्री. त्र्यं. शं. शेजवलकरांनी आपल्या ' पानिपत : १७६१ ' ग्रंथांत दुजोरा दिला आहे. म्हणजेच बुराडी घाटावर शत्रूसोबत एकाकी लढण्याचा जो प्रसंग दत्ताजी शिंद्यावर ओढवला, तो समजुतीच्या घोटाळ्यातून उद्भवला असला तरी राजवाड्यांसारखे लबाड, ढोंगी इतिहासकार ले. क्र. १५७ च्या आधारे दत्ताजीच्या मृत्यूचे माप होळकराच्या पदरात घालतात.


    बरं, त्या ले. क्र. १५७ मधील नानासाहेब पेशव्याची विधानं तरी त्यांनी सरळपणानं मांडावीत. तिथेही या मुजोर इसमाने चलाखी केली आहे. मूळ पत्रात वाक्यांचा क्रम " .. ऐशास अबदाली आला याजकरितां राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे रोहिल्याचा कारभार ठेऊन गेले तेच समयी राजश्री मल्हारजी होळकर यासहि सामील करून जावयाचे होते ते न केले  मल्हारबांनी आधी काम कोणते करावे ? मग कोणते करावे ? माधोसिंगाचा मजकूर काय ? जेव्हा म्हटले तेव्हा पारपत्य होते तो विचार त्यांनी न केला ..." असा आहे. त्यातील ' ऐशास अबदाली आला याजकरितां राजश्री दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे रोहिल्याचा कारभार ठेऊन गेले तेच समयी राजश्री मल्हारजी होळकर यासहि सामील करून जावयाचे होते ते न केले ' हा भाग त्यांनी चर्चेत घेतलाच नाही व ' मल्हारबांनी आधी काम कोणते करावे ? मग कोणते करावे ? माधोसिंगाचा मजकूर काय ? जेव्हा म्हटले तेव्हा पारपत्य होते तो विचार त्यांनी न केला.. ' यावर आपल्या आरोपांची इमारत रचली आहे. परंतु जिथे पेशव्याला शिंदे - होळकरांदरम्यान झालेल्या पत्रव्यवहाराची, किंबहुना बुराडी घाटचे युद्ध घडून गेल्याची मुळातच वार्ता नाही, तिथे या विधानांची किंमत ती काय ? ( ले. क्र. १५७ ची तारीख २९ जाने. १७६० अशी राजवाड्यांनीच निश्चित केलीय. )


     रियासतकार सरदेसाई तर याबाबतीत राजवाड्यांचे बाप ! त्यांना राजवाडे मंजूर व सरकार, शेजवलकरही !!

    त्यामुळेच मराठी रियासतीच्या एका पानावर होळकराने शिंद्याच्या मदतीला जाण्यास कुचराई केली म्हणायचं व दुसरीकडे तो निर्दोष असल्याचा खुलासा करत आपण मात्र नामनिराळं राहायचं. वर रियासतीच्या एका प्रास्ताविकात एक इतिहासकार म्हणून आपल्यावर केवढी मोठी जबाबदारी आहे याचे स्वमुखेंच गुणगान करण्यास रावबहादूर मोकळे !


     इतिहासकाराने इतिहासलेखन तटस्थ वृत्तीनबे करावे अशी जरी अपेक्षा असली तरी शंभर टक्के अशी तटस्थ वृत्ती कोणासही साध्य होत नाही. मात्र, पुरयांच्या मर्यादेत राहून इतिहासलेखन करणे तर तर शक्य आहे ना ? मग तरीही हे नामवंत, प्रतिष्ठित इतिहासकार असे वाहवत कसे गेले ? ज्यांनी आधुनिक इतिहास लेखनाचा पाया रचला त्यांनीच हा असत्य इतिहास लेखनाचा पायंडा का पाडावा ? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इतिहासकारांच्या मनावर जातीधर्माचे असलेले प्राबल्य. यामुळेच राजवाडे, सरदेसाई, शेजवलकर सारख्या वैदिक धर्मीय इतिहास्कारास पानिपतच्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी हिंदू धर्मातील एक बळीचा बकरा हवा होता, जो त्यांना मल्हारराव होळकराच्या रूपाने प्राप्त झाला. परंतु एकट्या होळकरास टार्गेट करणे सोयीस्कर जात नाही. म्हणून मग त्याच्या डोक्यावर रघुनाथरावास बसवत थोडे दोष त्याच्या पदरी बांधा. जरासे दत्ताजीच्या अभिमानी, अहंकारी वृत्तीचे उदात्तीकरण करा व नसलेल्या पुराव्यांच्या आधारे होळकरास बडवा असे बहुमुखी कार्यच या इतिहासकारांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी अवलंबिले आहे. अन्यथा ज्या भाऊ बखरीचा कर्ता अज्ञात आहे, ज्या बखरीत बव्हंशी मजकूर कल्पित आहे, घटना विपर्यस्त मांडल्या आहेत, ती तेवढी अधिक विश्वसनीय व ज्या बखरीचा कर्ता ज्ञात आहे, समकालीन कागदपत्रांचा आधार घेऊन ज्याने लेखन केलं आहे त्या रघुनाथ यादवची पाणिपतची बखर मात्र अधिक अविश्वसनीय हा पंक्तिप्रपंच राजवाड्यांनी आपल्या ' मइसा १७५० ते १७६१ ' च्या प्रास्ताविकात केला नसता. असो. कोळसा उगाळावा तितका काळाच असला तरी इतिहासाचे काही अंशी का होईना शुद्ध स्वरूप लोकांसमोर यावं यासाठी हे अप्रिय कार्य करणे तुम्हां - आम्हांला भाग आहे व ते आपणांस करावेच लागणार !


संदर्भ ग्रंथ :-

१) मराठी रियासत ( खंड ४ ) :- गो. स. सरदेसाई

२) मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( १७५० पासून ते १७६१ ) :- वि. का. राजवाडे

३) Fall of the mughal empire vol. 2 :- Sir Jadunath Sarkar

४) विंचूरकर घराण्याचा इतिहास :- हरी रघुनाथ  गाडगीळ

५) पानिपत असे घडले :- संजय क्षीरसागर 

सोमवार, ११ मार्च, २०१९

पानिपत ( भाग २ )








    बुराडीचा रणसंग्राम म्हणजे मराठी पक्षाच्या ढिसाळ लष्करी व राजकीय डावपेचांचा एक उत्कृष्ट नमुना होय. कोणत्याही लष्करी मोहिमेचं नियोजन करताना प्रथम राजकीय आघाडीवर त्याची पूर्वतयारी करावी लागते. याबाबतीत दत्ताजी शिंदे खूपच कमी पडला तर अब्दाली - नजीब शेर ठरले.

    अब्दालीने कुरुक्षेत्रावर दत्ताजीला बगल देत नजीब सोबत हातमिळवणी केली. याचे मुख्य कारण म्हणजे, स्वबळावर तो दत्ताजीचा पराभव करू शकत नव्हता हे होय. दिल्ली दरबारातील प्रमुख मुत्सद्दी - सरदारांचा अब्दालीला सक्रिय पाठींबा असल्याने हिंदुस्थान स्वारीकरता पंचवीस तीस हजारांहून अधिक सैन्य सोबत आणण्याची त्यांस कधीच गरज भासली नाही. त्यामुळे कुरुक्षेत्रावर दत्ताजी जवळपास तेवढ्याच सैन्यासह आडवा आल्यावर त्याने निर्णायक लढा टाळून आपल्या लष्करी सामर्थ्याचा बचाव साधला. त्यानंतर नजीबच्या रोहिल्यांची मदत घेऊन त्याने दत्ताजी शिंदे दिल्लीनजीक एकटा आहे तोच त्याचा निकाल लावण्याचे निश्चित केले.

    त्याउलट दत्ताजीचे वर्तन झाले. अब्दालीच्या बातम्या दत्ताजीला शुक्रताली थोड्या विलंबानेच मिळालेल्या दिसतात. त्यामुळेच प्रथमतः त्यास जेव्हा अब्दालीच्या आगमनाची वार्ता प्राप्त झाली तेव्हा त्याने होळकरास राजपुतान्यातून त्वरेने मदतीस येण्याकरता पत्रे पाठवली. त्यावेळी होळकर जयपूर नजीक माधोसिंगासोबत लढण्यात गुंतला होता. शिंद्यांची पत्रे येताच त्याने मोहीम आवरती घेण्याच्या उद्देशाने आपला तोफखाना रामपुऱ्यास लावून दिला तोच शिंद्यांचा निरोप आला कि, अब्दाली चालून येण्याची चिन्हं दिसत नाहीत. तेव्हा होळकराने रामपुऱ्याच्या वाटेस लावलेला आपला तोफखाना मागे परत बोलावून माधोसिंगवरील मोहीम तशीच जारी राखली. दरम्यान अब्दाली नेटाने पुढे पंजाबातून चालून येत असल्याच्या खात्रीशीर वार्ता दत्ताजीकडे आल्याने व पंजाबात ठिकठिकाणी तैनात केलेल्या मराठी सैन्याच्या तुकड्याही पाठोपाठ शुक्रताली निघून येऊ लागल्याने दत्ताजीला वस्तुस्थितीची जाणीव होऊन त्याने अब्दालीला वाटेत रोखण्याचा निर्णय घेत होळकरास मदतीकरता येण्यासाठी परत एकदा निरोप धाडला. दत्ताजीचे पत्र होळकरास दि. २७ डिसेंबर रोजी प्राप्त झाले. तेव्हा परत त्याने आपला तोफखाना रामपुऱ्यास लावून देत माधोसिंगावरील मोहीम आटोपती घेत दत्ताजीच्या मदतीसाठी प्रस्थान ठेवले.

    इकडे शत्रुपक्षाच्या सामर्थ्याचा अंदाज घेण्यात दत्ताजीकडून चूक झाल्याचे उघड आहे. त्याचप्रमाणे त्यांस शत्रूच्या डावपेचांचेही पुरेपूर आकलन न झाल्याचे दिसून येते. नजीब आणि अब्दाली एकत्र आल्यास आपला निभाव लागणार नाही, हे त्याने अचूक ताडले. परंतु त्यावर उपाय म्हणून दोघांना एक एकटं गाठून बुडवण्याचा डाव त्याच्या अंगाशी आला. कारण नजीब - सुजा एकत्र असल्याने त्यांचा अल्पावधीत पराभव करणे त्यास शक्य नव्हते व अब्दालीला तर शिंद्यासोबत मुळी निर्णायक लढाच द्यायचा नव्हता. शिवाय दत्ताजीने कितीही ठरवले असले तरी अब्दालीला गुडघ्यावर आणण्यासाठी आवश्यक असे तोफखान्याचे बळही त्याच्यापाशी नव्हते व चारी बाजूंनी घोडेस्वार फिरवून अब्दालीची रसद मारून याचा वाटेत कोंडमारा करण्याइतपतही त्याच्याकडे वेळ नव्हता. अशा स्थितीत शुक्रतालहुन थेट पंजाबात धाव घेण्याऐवजी रेवाडीकडे सरकून त्याने होळकरासोबत हातमिळवणी करायला हवी होती. नानासाहेब पेशव्याचेही तेच मत होते. परंतु दत्ताजीकडून ते झाले नाही.

     पुढे अब्दाली रोहिल्यांच्या प्रदेशात निघून गेल्यावर तरी त्याने होळकराकडे निघून जावे, तेही केले नाही. केवळ अभिमानास बळी पडून त्याने दिल्लीच्या रक्षणाचा निर्णय घेतला. स्वतःहून शत्रूच्या कचाट्यात आपली मान दिल्यावर त्याने सूरी फिरवली असता मागाहून बोंब करण्यात काय अर्थ !
होळकराने कितीही त्वरा केली तरी चार दोन दिवसांत तो दिल्लीला पोहोचू शकत नव्हता. अशा स्थितीत अफगाण, रोहिला, तुर्कांच्या संयुक्त सैन्याला तुलनेनं अल्प फौज रोखू शकेल हा दत्ताजीचा अतिआत्मविश्वास त्याच्या अंगलट आला.

    अब्दाली - नजीब दिल्ली घेण्याचा प्रयत्न करणार हे हेरून दत्ताजीने दिल्ली नजीकचे यमुनेचे पायउतार मजबूत लष्करी चौक्या नेमून बंदिस्त केले. शिंद्याला होळकराची मदत मिळाल्यास प्रकरण जड जाईल हे हेरून अब्दालीने दि. १० जानेवारी १७६० रोजी एकाच वेळी शिंद्याच्या नदी घाटावरील सर्व लष्करी चौक्यांवर हल्ला चढवला. यावेळी यमुनेचं पाणी बऱ्यापैकी कमी झाल्याने पात्रातील वाळूची बेटं उघडी पडून त्यावर बऱ्यापैकी उंच वनस्पती, झाडींची दाटी झाली होती. बंदूकधारी रोहिले - अफगाण या बेटांतील झाडीच्या आडोशाने मराठी सैन्यावर गोळ्यांचा वर्षाव करत होते. खेरीज नदी किनाऱ्यावरून तोफांचा माराही केला जात होता.

     बुराडी घाटच्या संग्रामाचे भाऊ बखरीत जे वर्णन दिलंय त्यावरून असे दिसून येते कि, घाट रक्षणासाठी दत्ताजीने तोफांची योजना केली नव्हती. त्यामुळे मराठी सैन्याची बरीच हानी झाली. मात्र बुराडी घाटावर शिंद्यांची फौज केवळ तलवार, भाले, धनुष्यबाणांनी लढली या इतिहासकारांनी प्रसृत केलेल्या गैरसमजास काही अर्थ नाही. शिंदेशाही इतिहासाची साधनांत एका टीपेत संपादकांनी अस्सल कागद्पत्राधारे नमूद केलं आहे कि, पानिपतपूर्वीच होळकर - शिंद्यांच्या पदरी गारदी होते. अर्थात, पेशव्याइतकी गारद्यांची पलटणं सरदारांकडे नसली तरी निश्चितच काही प्रमाणात बंदूकधारी पायदळ त्यांच्याकडे होते असे बुराडीच्या संग्रामावरून दिसते. अन्यथा नदी पात्रातील बेटांवर लपलेले रोहिले - अफगाण तसेच पुढे गोळ्यांचा वर्षाव करत चालून आले असते. असो.

    रोहिला - अफगाणांनी नदी घाटांवर चढाई केली त्यावेळी दत्ताजी बुराडी पासून तीन मैलांवरील आपल्या मुख्य छावणीत होता. हल्ल्याची वार्ता येताच तो बुराडी घाटाकडे निवडक पथकांसह गेला व शत्रुसैन्याला प्रतिकार करणाऱ्या आपल्या फौजेला मार्गदर्शन करत असता, हिंमत देत असताना शत्रूकडील बंदुकीने त्याचा अचूक वेध घेतला. दत्ताजी घोड्यावरून खाली येण्यापूर्वी वा त्यानंतर जनकोजीही अशाच प्रकारे घायाळ होऊन पडला होता. मात्र जनकोजीला उजव्या दंडावर गोळी लागल्याने व सहकाऱ्यांनी त्वरित त्याला रणभूमीवरून मागे नेल्याने त्याचा बचाव झाला. आपले दोन्ही नेते दिसेनासे झाल्यावर शिंद्यांच्या फौजेने लढाई सोडून तळावरील सर्व सामानसुमान तसेच टाकून कोटपुतळीकडे माघार घेतली. तिथे त्यांना दिल्लीतील संग्रामाधी दत्ताजीने रवाना केलेले कबिले व बुणगे भेटले. तसेच होळकराचीही येथेच गाठ पडली. ( दि. १५ जानेवारी १७६० )

    इकडे नदी घाटावरील शिंद्यांच्या चौक्या उधळून लावल्यावर दत्ताजीच्या मृतदेहाची ओळख पटून त्याचे शीर कापून विजयाचे प्रतीक म्हणून अब्दालीकडे नेण्यात आले. खेरीज शिंद्यांच्या मुख्य छावणीतील सामान, शिंद्यांचा हत्ती जव्हेरगज व पंजाबातील बंदोबस्ताकरता रघुनाथरावाने नेमलेल्या आदिनाबेगचा कारभारी लक्ष्मीनारायण, सादिकबेगची मुले नजीबच्या हाती सापडली.

    बुराडी घाटच्या संग्रामात दत्ताजी जखमी अवस्थेत नजीबच्या हाती लागला असता दत्ताजीने काढलेले ' बचेंगे तो और भी लढेंगे ' उद्गार व त्यामुळे चिडून जाऊन नजीबने कुतुबशाह करावी त्याचा केलेला खून, या सर्व भाकडकथा होत. दत्ताजी सारखा बलवान सरदार जिवंत हाती लागला असता त्याला कैद करून नेण्यात जितका नजीब - अब्दालीचा फायदा होता, तितका ठार करण्यात नव्हता, हे बारकं पोरही सांगेल.

    बुराडी घाट प्रसंगी शिंद्याच्या फौजेची वाताहत झाली वा भरपूर मनुष्यहानी झाली अशातला भाग नाही. गोळीबारात आपले नेते पडताच शिंद्यांच्या सरदारांनी माघार घेतली व बुणग्यांसह ते सुरक्षितपणे शत्रूच्या कचाट्यातून बाहेर पडले. केवळ भाऊ बखर प्रमाण मानून लेखन करणाऱ्यांनी या प्रसंगास पदरचे तिखटमीठ लावत स्वतःची विकृत हौस भागवून घेत इतिहासाचेही विकृतीकरण केले.

    पुढील राजकारणाची चर्चा करण्यापूर्वी यास्थळी क्षणभर थांबून युद्धप्रसंगात शत्रूपक्षीयांच्या मनुष्यांची शिरे कापण्याच्या पद्धती संबंधी थोडं विवेचन करणं आवश्यक आहे. प्रतिपक्षावरील विजयाचं प्रतीक म्हणून शत्रुपक्षाकडील मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्याचा प्रघात आदिम आहे. यामध्ये गुलाम म्हणून मनुष्य, जनावरे, सोन्यासारखे मौल्यवान धातू, शस्त्रास्त्रे, सत्ता निदर्शक चिन्हे इ. सोबत विरुद्ध पक्षीय नेतृत्वाच्या शिराचाही समावेश होतो. अगदी आपल्या महाभारत वा पुराणांत तसेच प्राचीन इतिहासांतही याचे दाखले असून या गोष्टीचा कोण्या एका विशिष्ट धर्माशी अजिबात संबंध नाही. 


                                                                                                                                                           ( क्रमशः )