मंगळवार, २६ मार्च, २०१९

पानिपत ( भाग ३ )





    बुराडीच्या संग्रामानंतर हिंदुस्थानचे राजकारण बदललं. जे संस्थानिक दखनी कि अब्दाली असे डळमळीत होते, त्यांच्या मनाचा कल अब्दालीच्या पक्षाकडे झुकू लागला. दत्ताजीने ज्या प्रकारे बुरडीचा घाट स्वतःवर ओढवून घेतला, त्याचे हे फलित होय.

    बुराडीनंतर कोटपुतळी येथे शिंदे होळकरांच्या फौजा एकत्र आल्या. त्यानंतर अब्दाली विरोधी लढ्याची सूत्रे मल्हारराव होळकराच्या हाती जाऊन राजकारणास वेगळाच रंग चढला.  

भाऊ बखरीच्या आधारे किंवा कसल्याही समकालीन पुराव्याशिवाय होळकर अब्दालीच्या सामन्यास घाबरत होता अशी बालिश विधानं करणाऱ्या निर्बुद्ध इतिहासकारांची थोबाडं फोडण्याजोगी कामगिरी यावेळी होळकराच्या हातून घडल्याची नोंद इतिहासाने केली आहे.

    शिंदे होळकरांच्या फौजा एकवटल्यावर प्रथमतः कबिले - बुणगे सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. जाट अब्दालीचा विरोधक, शिंद्यांचा पगडभाई असला तरी होळकराने त्यावरही अविश्वास दाखवला, यावरून त्याची राजकीय परिपक्वता व योग्यतेचा अंदाज यावा.

    बुणगे कबिले स्वमुलखांत सुरक्षित पोहचताच होळकर -शिंद्यांच्या फौजांनी अफगाण - रोहिल्यांविरुद्धचा लढा नेटाने चालू ठेवला. यातूनच सिकंदऱ्याचे प्रकरण घडले. या लढाईत होळकराचा मोठा पराभव तथा पोळजत्रा झाल्याचे म्हटले असले तरी या पराभवानंतरसुद्धा धावपळीच्या युद्धांत होळकराने अब्दालीला इतके दमवले कि, दि. १३ मार्च १७६० रोजी त्याने होळकरासोबत तह करून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. दुदैवाने या संग्रामाचे तसेच तहाचे तपशील आज उपलब्ध नाहीत. आहेत, त्या फक्त नोंदी. परंतु या नोंदीच पुरेशा बोलक्या आहेत. जगाच्या पाठीवर कोणताही विजयी सेनानी आपल्या पराक्रमाची, विजयाची पुरेपूर किंमत वसूल केल्याखेरीज मागे जात नाही. हे लक्षात घेता केवळ नजीबखानाच्या ताब्यातील प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या बोलीवर होळकराने अब्दालीसोबत तह करून केवढा मोठा राजनैतिक विजय मिळवला होता, याची कल्पना यावी.

इतिहासात जर तर या शब्दांना स्थान नाही. कारण यामुळे प्रत्यक्ष वस्तुस्थितीत फरक पडत नसतो तरीही, कित्येकदा अपरिहार्य परिस्थितीत या संज्ञांचा आधार घ्यावाच लागतो. दि. १३ मार्च १७६० रोजीच्या होळकर - अब्दाली तहासंबंधी असेच म्हणावे लागते.

    दि. १३ मार्च रोजी होळकराने अब्दालीसोबत तह करून त्याला मायदेशी जाण्यास प्रवृत्त केले खरे परंतु दुसऱ्याच दिवशी इकडे दख्खनमधून सदाशिवराव मोठ्या फौजेनिशी हिंदुस्थान प्रांती येण्यास परतूडहुन निघाल्याने होळकराने केलेल्या तहाचा परिणाम काय होतो हे पाहण्यासाठी अब्दाली काही काळ इथेच थांबला. पुढे पेशव्याने होळकराचा तह बहुधा नामंजूर केल्याने किंवा नजीबला मराठी सरदार व पेशव्याच्या हेतूंविषयी संशय वाटल्याने होळकराने घडवून आणलेला तह बाजूला राहून उभय पक्षांची पावलं युद्धाच्या दिशेने पडू लागली.

                                                                                           ( क्रमशः )

1 टिप्पणी:

Unknown म्हणाले...

बहुदा पेशव्याना हा तह मंजूर नसल्याने ?? ?? ?? ?? हे *बहुदा* काय आहे. बहुदा म्हणजे तर्क ? होळकरांची बाजू उजळायला पेशव्यांना काले कशासाठी फासता.