सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

प्रकरण १८) सम्राट शिवाजी :- काही दुर्लक्षित बाबी





    स. १६६९ च्या अखेरीस औरंगने शिवाजी सोबत केलेला शांतता करार उधळून लावत त्याविरुद्ध युद्ध पुकारले. परंतु या शांतताभंगाचा फायदा औरंगपेक्षा शिवाजीलाच अधिक झाल्याचे दिसून येते.

शांततेच्या काळात शिवाजीने आपल्या राज्याची बंदोबस्ती करत असतानाच आपली उद्दिष्ट्ये ठरवून त्यानुसार कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची आखणी चालवली होती.


    स. १६६९ अखेर औरंगने शिवाजी विरुद्ध पुकारलेल्या युद्धामागे ज्याप्रमाणे दख्खन सुभेदार शहजादा मुअज्जमची शिवाजी सोबतची वाढती मैत्री कारणीभूत आहे तद्वत स. १६६७ मध्ये उद्भवलेल्या युसुफ्जाई बंडाचा देखील संदर्भ आहे. उपलब्ध माहितीनुसार युसुफजाईंचे बंड त्याचवर्षी दडपून टाकण्यात आले असले तरी या तसेच कित्येक इतर व्यापातून शिवाजीकडे लक्ष देण्यास औरंगला स. १६६९ पर्यंत फुरसद झाली नाही. खेरीज याच काळात औरंगने साम्राज्यातील सर्व देवळांचा नाश करण्याची आज्ञा काढत बनारस येथील विश्वेश्वर व मथुरेच्या केशवरायाच्या मंदिराचा विध्वंस केला. ( स. १६६९ - ७० )


    औरंगच्या या कारवाया विविध हेतूंनी प्रेरित होत्या. राज्यसंपदनार्थ कट्टरपंथीयांची मदत घेतल्याने त्यांना संतुष्ट करणे त्यास भाग होते. अर्थात, येथे त्याच्या कट्टरपणाविषयी वाद होऊ शकतो परंतु तूर्तास त्याचे येथे प्रयोजन नाही. खेरीज कट्टरपंथीयांची संतुष्टी करत असतानाच राज्याविरुद्ध हिंदूंचा उठाव होऊ नये याचीही दक्षता घेणे त्यास भाग होते. त्यामुळे कागदी हुकूम वा एखाद दुसरं देऊळ पाडून तो चाचपणी करत होता व अपेक्षेप्रमाणे हिंदू सत्ताधीशांनी त्याच्या या कृत्यांकडे नेहमीच्या उदासीन दृष्टीने पाहिले.


    तुर्की साम्राज्याला सर्वाधिक धोका त्याच्या सर्वात बलिष्ठ, विश्वासू अशा राजपुतांकडून होता. परंतु ते आपल्या काल्पनिक वैदिक क्षत्रियत्वात इतके गुंगून गेले कि, आपण हिंदू आहोत याचाच त्यांना मुळी विसर पडला होता.


    हिंदुस्थानात चाललेल्या या घडामोडींशी शिवाजीला कसलेच कर्तव्य नव्हते. तो आपल्या मूळच्या धोरणाप्रमाणे वागत असून त्यान्वये --- निजामशाही उभारताना शहाजीने ताब्यात घेतलेला प्रदेश तसेच मूळ निजामशाहीत मोडणारा सर्व भूभाग ताब्यात घेण्याची त्याची मनीषा होती. थोडक्यात सांगायचे झाले तर, शिवाजी हा स्वतःला निजामशाहीचा वारस समजत होता. त्याच्या या धोरणात आणखी काही उद्दिष्टांची भर पडली. ते म्हणजे स्वातंत्र्य अबाधित राखणे, दख्खनमधून तुर्कांना उखडून काढणे. यातील दुसरे उद्दिष्ट पैतृक वारशाचे होते तर प्रथम त्याचे स्वतःचे.

    यात आणखी काही उपप्रकरणांची भर प्रसंगत्वे पडत गेली. त्यानुसार दख्खनमधील सत्तांशी एकजूट करून तुर्की आक्रमण रोखणे. त्यासाठी गरज पडल्यास निजामशहा प्रमाणे या गटाचे नेतृत्व हाती घेणे, जे राज्याभिषेकानंतर शिवाजीने स्वीकारले. तसेच दिल्लीच्या तख्तावर आपल्या पसंतीचा मनुष्य बादशहा म्हणून स्थापित करणे.


    स. १६७० - ८० दरम्यान शिवाजीचे सर्व उद्योग वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच चालले होते. त्यानुसार त्याने तुर्की शहजादे तसेच मनसबदारांशी अंतस्थ सूत जुळवले. विजापुरी दरबारातील दुफळीचा स्वतःच्या राज्य विस्तारार्थ फायदा उचलून घेत भावी तुर्की झगड्यात विजापुरी दरबारातील आपल्या विरोधकांची तुर्कांना मदत होऊ नये याची खबरदारी घेत त्यांचा बंदोबस्त करणे व लष्करी बळ वा सामोपचाराने कुतुबशहाला मैत्रीच्या तहाने बांधून घेणे.


    शिवाजीच्या राजकारणाचे धागेदोरे उकलण्यासाठी सर्वप्रथम आपणांस मुस्लीम शाह्यांची अंतःस्थिती, विशेषतः त्यातील पक्षभेद समजावून घेणे अत्यावश्यक आहे.


    बव्हंशी इतिहासकारांनी शिवचरित्राचे लेखन करताना या लढ्याचे( शिवाजी - तुर्क ) चित्रण हिंदू - मुस्लीम असे धार्मिक स्वरूपाचे केल्याने व इतरांनी त्यांचाच कित्ता गिरवल्याने या राजकारणाचे वास्तववादी आकलन कोणालाच होऊ शकले नाही.


    विजापूर, गोवळकोंडा येथील शासक हे परदेशी मुसलमान असले तरी त्यांच्या दरबारात, लष्करांत दख्खनी मुसलमान, सिद्दींचा मोठा भरणा होता. ज्यातील बव्हंशी हे धर्मांतरीत होत. या दख्खनींना परदेशी मुसलमान -- तुर्क, अफगाण, पठाण, अरब इ. कमी लेखत. किंबहुना यांच्यात शत्रुत्वाची भावना सदोदित वसत असल्याचे इतिहासात दाखले आहेत.


    बहामनी, निजामशाही या बलवान मुस्लीम राजवटी मुसलमानांच्या या अंतस्थ लाथाळ्यांनी धुळीस मिळाल्या होत्या व याची जाणीव बहुधा शिवाजीला जितकी होती, तितकी कोणत्याही हिंदू सत्ताधीशास नव्हती. यामुळेच सुरवातीपासून शिवाजीने दख्खनी मुसलमानांचा पक्ष घेत अफगाण, पठाण, तुर्क इ. विरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले होते. स. १६७० - ८० दरम्यान विजापूर - गोवळकोंडा यांच्याशी त्याचे जे व्यवहार झाले ते याच भूमिकेतून घडून आल्याचे दिसून येते.


    मुस्लिमांविषयी हाच दृष्टीकोन शिवाजीने तुर्की बादशाही विरोधात पुकारलेल्या लढ्यातही स्वीकारला, पण तो थोड्या वेगळ्या पद्धतीने. तुर्क आणि अफगाण तसेच पठाणांतील वैमनस्य त्यास ठाऊक होतेच. अफगाण, पठाण हे तुर्कांच्या चाकरीत जरी असले तरी मनोमन ते त्यांचा द्वेष करीत. यामुळेच तुर्की अधिकारी नेहमी त्यांच्या विषयी साशंक असत. दख्खन मधील बहादूरखान - दिलेरखान या तुर्की - पठाण दुकलीचा यामुळेच जम बसला नाही व परिणामी बहादूरखान शिवाजीला अंतस्थ सहाय्य होऊन दख्खनच्या राजकारणाचे पुढारपण आदिल ऐवजी शिवाजीला प्राप्त झाले. परंतु हा प्रकार राज्याभिषेकानंतर घडून आला. तत्पूर्वीच्या शिवाजीच्या राजकारणाची दिशा व त्यातील प्रमुख टप्पे तसेच राजकीय घडामोडी आपणांस थोडक्यात बघायच्या आहेत. 


    औरंगने शांतता कराचा भंग करताच शिवाजीने प्रथमतः पुरंदर तहात गमावलेला आपला सर्व मुलूख, किल्ले कब्जात घेण्याचा उद्योग चालवला. तसेच स. १६७० च्या ऑक्टोबरात त्याने सुरतेवर पुन्हा एकदा धडक मारत तेथून लुट गोळा करून व मार्गातील तुर्की मनसबदारांचा पराभव करून रायगडी परतला.


    तुर्कांविरुद्ध उघडलेल्या आघाडीवर सलामीलाच एवढं यश प्राप्त होण्याचं मुख्य कारण म्हणजे दिलेरखान व शहजादा मुअज्जम यांच्यातील वैमनस्य व मुअज्जमचा शिवाजीकडे असलेला अंतस्थ ओढा. ज्यामुळे दख्खन मधील तुर्की अंमलदारांत गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन काही काळ बादशहा देखील या दोघांविषयी साशंक बनला. अफगाण युद्धाचा संदर्भ असल्याने दिलेरखान तर शिवाजी सोबतच्या घनिष्ठ मैत्रीने मुअज्जम संशयाच्या भोवऱ्यात आले. परंतु लवकरच हा भ्रम दूर झाला. तोपर्यंत शिवाजीने नाशिकमध्ये आपले हात - पाय पसरले होते.


    शिवाजीची वाढती सत्ता पाहून औरंगने महाबतखानाची दख्खन मोहिमेचा मुख्य सेनापती म्हणून नियुक्ती करत त्याच्या हाताखाली बहादूरखान, दिलेरखान व दाउदखान या नामांकित सरदारांना नेमले. परंतु महाबतखानासही अपेक्षित यश प्राप्त होऊ शकले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे स. १६७२ मध्ये खैबरपरिसरातील टोळीवाल्यांचा बंडावा परत एकदा भडकून त्यात औरंगला आपली अव्वल दर्जाची लष्करी सामग्री ओतावी लागली. त्यामुळे साहजिकच महाबतखानाच्या हाताखील फौजफाट्यात, लष्करी साहित्यास कात्री लागली.


    टोळीवाल्यांचा दंगा इतका वाढला कि शेवटी खासा औरंगजेब स. १६७४ च्या जूनमध्ये पेशावर येथील हसन अबदाल येथे गेला. स. १६७५ च्या अखेरीपर्यंत त्याने साम, दंड, भेदाने हा बंडावा मोडून काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यास मर्यादित यशावरच समाधानी होऊन मागे फिरावे लागले.

    तुर्कांची अफगाण मोहीम स. १६७८ पर्यंत रखडल्याने त्यांचे उत्कृष्ट सैन्यदल, रसद, बव्हंशी खजिना, शस्त्रास्त्रे यांचा ओघ त्या आघाडीवर वळवण्यात आल्याने दख्खन शिवाजीला मोकळी सापडली. इथे लक्षात घेण्याची मुख्य बाब म्हणजे अफगाण मोहिमेमुळे तुर्कांना पुढील काळात आपल्या लष्करात अफगाणांची भरती करून घेणे शक्य झाले नाही. ज्याचा फटका त्यांना लगेचच्या राजपूत युद्धात बसला. ज्याचा शिवाजीच्या उत्तरायुष्याशी घनिष्ट संबंध आहे.


    स. १६७२ मध्ये औरंगने महाबत व मुअज्जम यांना हिंदुस्थानात बोलावून घेत बहादूरखानास दख्खनचा सेनापती व सुभेदार म्हणून नियुक्त केले. या जागेवर त्याने जाने. १६७३ ते ऑगस्ट १६७७ पर्यंत काम पाहिले.


    अफगाण बंडाव्यामुळे बहादूरखानाला शिवाजी, आदिल, कुतुब या तीन सत्तांचा बंदोबस्त करून तुर्की साम्राज्याचा दख्खनमध्ये विस्तार करणे शक्य नसल्याने त्याने मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारत शिवाजीच्या तंत्राने आपले राजकारण चालवले. याचा परिणाम म्हणजे शिवाजीचा राज्याभिषेक व कर्नाटक मोहीम या दोन गोष्टी तुर्की उपद्रवाविना निर्विघ्न पार पडल्या.


    शिवाजीचा राज्याभिषेक :- शिवाजीचा राज्याभिषेक हि अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण घटना आहे. परंतु आपल्याला त्याचा फक्त राजकीय व सामाजिक अंगानेच विचार करायचा आहे.


    दि. २१ एप्रिल १६७२ रोजी अब्दुल्ला कुतुबशहा मरण पावला व त्याचा जावई अबुल हसन हा सुलतानपदी विराजमान झाला. या राजकारणात शिवाजीचा अंतस्थ हात किती होता याचा उलगडा होत नसला तरी या घटनेनंतर गोवळकोंड्यातील शिवाजीचा हस्तक -- निराजीपंताने नव्या कुतुबशहासोबत एक लक्ष होनांचा तह करून सहासष्ट हजार होनांचा खजिना रायगडी आणला. यावरून कुतुबशहाने शिवाजीचे मांडलिकत्व मान्य केले असा तर्क संभवतो परंतु सबळ पुराव्याअभावी असे विधान करने योग्य होणार नाही.


    दि. २४ नोव्हेंबर १६७२ रोजी अली आदिलशहाचा मृत्यू होऊन त्याच्या जागी सिकंदर हा चार वर्षांचा मुलगा तख्तावर विराजमान झाला.

  
    या दोन राजकीय नेत्यांच्या निधनामुळे शिवाजीकडे पुढारपण येणे स्वाभाविक होते व त्याने या संधीचा फायदा अचूक उचलला.


    विजापूरच्या कारभारात दख्खनी व पठाणी असे दोन पक्ष निर्माण होऊन आरंभी तुर्की सुभेदार व शिवाजीने दख्खनींची बाजू घेतली. या झगड्याच्या पुढील टप्प्यात दिलेरखानाचा प्रवेश होऊन त्याने दख्खनी सोडून पठाणांची साथ केली. परंतु हा राज्याभिषेकानंतरचा भाग झाला. सध्या आपणांस राज्याभिषेक प्रकरणाची चर्चा करायची आहे.


    इतर वतनदारांप्रमाणेच शिवाजीही आपल्या नावापुढे ' राजे ' पदवी लावी. परंतु या ' राजे ' पदाचा वतनदारी सत्तेपलीकडे --- सार्वभौम वा स्वतंत्र शासक या अर्थाशी कसलाही संबंध नव्हता. तुर्की शहजाद्याच्या मध्यस्थीने शिवाजीने तत्कालीन सार्वभौम सम्राट औरंगजेबकडून आपणांस -- राजा हा किताब मिळवून घेतला खरा परंतु यामुळे त्याच्या ' राजे ' पदास सार्वभौम सत्तेने वतनदारापेक्षा श्रेष्ठ पण आपलं अंकीत्व स्वीकारण्याच्या बदल्यात दिलेली मान्यता यापलीकडे अर्थ नव्हता व हि पदवीही तुर्कांशी जोवर सलोखा आहेत तोवरच शिवाजीकडे राहणार होती.


    तुर्की बादशाही सोबत युद्ध सुरु झाल्याने त्यांच्याकडून मिळालेली ' राजा ' उपाधी एकप्रकारे निरर्थक झाली परंतु याच सुमारास दख्खन मधील दोन जुन्या मुस्लीम सत्तांचे पुढारी मरण पावल्याने दख्खनचे राजकीय पुढारपण शिवाजीकडे ओघानेच आले. परंतु यांस कायदेशीरता लाभण्याकरता तसेच आजवर केलेल्या उद्योगास स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवण्याकरता त्यांस राज्याभिषेक विधी करवून घेणे आवश्यक वाटले.

    यातूनच मग गागाभट्टला बोलावणे, चिटणीसास राजपुतान्यात पाठवून तेथील घराण्याशी आपला वांशिक संबंध असल्याचे सिद्ध करणे या गोष्टी घडून आल्या.


    शिवाजी शिसोदिया कुलोत्पन्न राजपूत होता व आहे, हि इतिहासकारांची आवडती थियरी. परंतु या थियरीच्या मुळाशी काय आहे ?


    चिटणीसाने मेवाडकरांशी भोसल्यांचा संबंध दर्शवणारी वंशावळ आणली ती बनावट असल्याचे स्पष्ट आहे.


    याकरता भक्कम पुरावा म्हणजे ' शककर्ते शिवराय, खंड १, पृ. क्र. ४९५ ' वर श्री. विजय देशमुखांनी दिलेले पुढील दोन उल्लेख :-


    १) .. शके १४७१ आश्विन शु. १० चे म्हणजे १० ऑक्टोबरचे एक खरेदीपत्र. या पत्रानुसार मालोजी  भोस्ल्याने जिंजी येथील निम्मी पाटीलकी इ. स. १४५९ च्या पूर्वी काही वर्षे विकत घेतल्याचे कळते. हा मालोजी बाबाजीचा पिता आहे हे निश्चित. मृत पित्याचे नाव पुत्राला ठेवण्याच्या तत्कालीन रीतीचा विचार करता बाबाजीने पुत्राचे नाव मालोजीच ठेवले हीही गोष्ट लक्षणीय वाटते.


    २) बाबाजीच्या पित्याचे नाव मालोजी होते हे पैठणच्या राजोपाध्ये यांच्या नोंदीवरूनही सिद्ध होते. ती नोंद अशी --

    भोसले सिसोदे. राजश्री विठोजीराजे पिते बाबाजीराजे आजे मालोजीराजे. पुत्र खेलोजीराजे, मालोजीराजे, महादजी पुत्र खेलोजीराजे. महादजी, काकाजीराजे, नागोजी राजे, खंडोजीराजे मानकोजीराजे मोहरसु. लेख.

    या नोंदीनुसार मालोजी - बाबाजी - विठोजी - खेळोजी वगैरे अशी वंशावळ तयार होते. विठोजी हा शहाजीचा चुलता आहे. तेव्हा या नोंदीवरूनही बाबाजीच्या पित्याचे नाव मालोजीच असल्याचे स्पष्ट होते.    


    या दोन नोंदी विचारत घेता व चिटणीस, शेडगावकर, कोल्हापूर, बृहदिश्वर येथील वंशवाळींची तुलना केली असता एक शेडगावकर बखर सोडली तर बाबाजीच्या पित्याचे नाव मालोजी होते, असे कोणतीही वंशावळ सांगत नाही. तसेच शेडगावकर बखरीतील वंशावळीत मालोजीचा उल्लेख मालकर्ण असा केलेला आहे. तर चिटणीस बखरीतील वंशावळीनुसार बाबाजीच्या पित्याचे नाव संभाजी असे होते.   

     येथे आपणास प्रामुख्याने चिटणीस वंशावळ विचारात घेणे भाग आहे. कारण भोसले - शिसोदिया संबंध त्या घराण्यातील व्यक्तीनेच सिद्ध केलेला होता.


    चिटणीशी वंशावळ हाणून पडणारा दुसरा पुरावा म्हणजे शिसोदिया घराण्याचा वृत्तांत. ज्यानुसार सिसोदे परगण्याचा जागीरदार हमीर हा मेवाड अधिपती बनल्यावर त्याच्या वंशजांस सिसोदिया हे नाम प्राप्त झाले. आणि हमीर हा चिटणीस बखरीतील वंशावळीत दिलेल्या सजणसिंहाचा चुलतभाऊ व अजयसिंहाचा पुतण्या. महत्त्वाचे म्हणजे चिटणीस वंशावळीत अजयसिंहाचे नाव न येता लक्ष्मणसिंहाचे नाव येते जो सजणसिंहाचा आजोबा आहे.


    खेरीज राजवाडे लेखसंग्रह भाग - १ मध्ये पृ. क्र. २३२ वरील चर्चाही भोसले - राजपूत संबंध अमान्य करणारी आहे. त्यातील मुख्य आक्षेप उभय घराण्यांचे धर्माचार - कुलदैवत एक नाही. या आक्षेपाचे निरसन केल्याचे निदान माझ्या तरी वाचनात आले नाही.


     यामुळे शिवाजीने मेवाडकरांशी कागदोपत्री जोडलेला आनुवंशिक संबंध संशयास्पद असल्याचे सिद्ध होते. परंतु या संबंधांचे खापर वा दोष शिवाजीकडे जात नसून देशमुखांनी आपल्या शिवचरित्रात बाबाजी भोसल्याच्या खरेदीपत्राची नोंद जर खरी मानली तर मग शिवाजीच्या घराण्यात ' आपण शिसोदिया राजपूत ' असल्याचा समज किमान तीन चार पिढ्यांपूर्वी प्रचलित असल्याचे स्पष्ट होते.


    परंतु प्रश्न असा आहे कि अशी कोणती आवश्यकता, गरज भासल्याने भोसल्यांनी स्वतःस सिसोदिया राजपूत म्हणवून घेण्यास सुरवात केली ? तसेच जर ते खरोखर सिसोदिया राजपूत असते तर त्यांस ' मराठा ' म्हणवून घेण्याचा अधिकार काय ? कारण शिसोदिया हा राजवंश होता व दख्खनमध्ये या काळात एकाही मराठ्याचे स्वतंत्र राज्य नव्हते. तसेच लौकिकात शिसोदिया क्षत्रिय मानले जात, मराठ्यांना क्षत्रियत्वाचा अधिकार नव्हता. कारण ते हिंदू होते, वैदिक नाही.

यावरून मराठा - राजपूत यांच्यातील तुलनात्मक असमानता लक्षात घेता ' सिसोदिया राजपूत ' उच्च पायरीवरून ' मराठा ' या अवनत स्थानी येण्याची बुद्धी भोसल्यांना का व्हावी ? आजवरच्या इतिहासलेखनात या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.


    माझ्या मते, आपले सामाजिक स्थान उंचावण्यासाठी बाबाजी वा त्याच्या वडिलांनी स्वतःस सिसोदिया राजपूत म्हणून घेतले व तेच या घराण्यात पुढे प्रचलित झाले. परंतु सिसोदियांशी संबंध दर्शवणारी वंशावळ वा माहिती या घराण्याकडे नसून ती शिवाजीच्या राज्याभिषेकप्रसंगी राजपुतान्यात जाऊन निर्माण करण्यात आली. इथे भोसले - सिसोदिया हा अनुवांशिक नसून फक्त राजकीय नातेसंबंध असल्याचे सहजसिद्ध आहे. परंतु शिवाजीचा वैदिक राज्याभिषेक व क्षत्रियत्वाचे इतिहासकार तसेच अभ्यासाकंना पडलेली मोहिनी यांमुळे वास्तवाचे त्यांस आकलन होत नाही कि दर्शन घडत नाही.


    आपले मूळ इतरत्र शोधण्याचा प्रयत्न केवळ भोसले घराण्यानेच केला असे नाही तर ' शिवाजी निबंधावली भाग - २ ' मध्ये श्री. चिं. वि. वैद्यांनी स. १७४० सुमारच्या मराठ्यांच्या ९६ कुळ्यांच्या दोन याद्या दिल्या असून त्या अभ्यासल्या असता असे लक्षात येते कि, काही अपवाद सोडले तर बव्हंशींनी आपले मूळ हिंदुस्थानात असल्याचे नमूद केले आहे.

    कित्येकांचा समज आहे कि, शिवाजीच्या अनुकरणाने हा प्रकार घडून आला असावा. परंतु यातील उपकुळांची नावं पाहता यात तथ्य नसल्याचे दिसून येते.

    उलट शिवाजीच्या पूर्वीपासून -- जसे भोसल्यांचे बाबाजी तद्वत -- हाच प्रकार दख्खनमध्ये सुरु असून यामागे फक्त इतर वतनदारांपेक्षा आपलं असामान्यत्व, पराक्रमाने नव्हे तर जन्म, कुळाने दर्शवण्याचा खटाटोप चालल्याचे दिसून येते. याकरता सादर याद्यांतील उपकुळांची नावंच साक्षी आहेत.


    खेरीज इथे नमूद करण्यासारखी अत्यावश्यक बाब म्हणजे राजपूत तसेच मराठा हा वांशिक समुदायच मुळी नाही. मिश्र वंशांचे लोक या संज्ञांत समाविष्ट झाले आहेत. ज्यांच्या वंशजांनी नंतर कागदोपत्री वडाची साल पिंपळाला लावत स्वतःस ९६ कुली मराठा किंवा नुसतेच मराठा तसेच राजपूत म्हणवून घेतले आहे.


    शिवाजीने राज्याभिषेक प्रसंगी ज्या सिसोदिया कुळाशी आपला संबंध असल्याचे जाहीर केले -- क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी -- त्या शिसोदिया कुलाचे क्षत्रियत्व तरी निर्दोष आहे का ? याचे उत्तर नकारार्थी मिळते.


    सिसोदिया स्वतःस सूर्यवंशी म्हणतात पण त्याने फारसा फरक पडत नाही. तसेच ते स्वतःस रामपुत्र कुशचे वारस मानतात. परंतु तेही संशयास्पद आहे. कारण रामाला लव - कुश नावाचे पुत्र होते हे कुठे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. रामायणाच्या ज्या भागात रामाच्या मुलांचा उल्लेख येतो त्याच भागात रामाचे विलासी जीवनही येते. मग त्याचा विलास प्रक्षिप्त व मुले मात्र अप्रक्षिप्त हा कुठला युक्तिवाद ?


    दुसरे असे कि, सिसोदियांचा मूळ संस्थापक राजा गुहा, गुहील -- ज्याने स्थापलेल्या वंशास गुहीलोत अशी संज्ञा होती. या गुहील राजाचा पूर्वेतिहास उपलब्ध नाही. काही इतिहासकारांच्या मते तो शिलादित्य राजाचा पुत्र असून, त्याचा जन्म पित्याचा मृत्यू शत्रूहाती झाल्यावर झाला व त्याच्या आईने त्यामुळे अग्निप्रवेश करण्यापूर्वी गुहादित्य / गुहील यांस विजयादित्य ब्राह्मणास दत्तक दिला वा दान दिला. तर काहींनी यास ब्राह्मण वंशी मानले आहे.


     गुहील नंतरच्या पिढ्यांतील पराक्रमी राजा म्हणजे बाप्पा रावळ. याचाही पूर्वेतिहास अनुपलब्ध असून याच्या पित्याच्या नावाची स्पष्टता नाही. खुद्द बाप्पा रावळ म्हणजे महेंद्र कि कालभोज यावरही इतिहासकारांचे एकमत नाही. मात्र या बाप्पा रावळचे पालनपोषण ब्राह्मणाने केल्याचे काही इतिहासकार नमूद करतात तसेच तो भिल्लांमध्ये वाढल्याचेही काही जणांचे मत आहे.


    या उल्लेखांवरून गुहीलोत वैदिक धर्मीय वा वैदिक धर्मियांना आश्रय देणारे राजे असावेत असा तर्क करता येतो. परंतु हे क्षत्रिय वा राजपूत असल्याचे निःसंदिग्ध दाखले मिळत नाहीत व राजपुत्र या संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट रूप राजपूत झाले हे कोणत्याही व्युत्पत्तीशास्त्राने सिद्ध होत नाही. 

    गुहीलोत वंशाविषयी आणखी माहिती श्री. बी. एम. दिवाकर यांच्या ' राजस्थानका इतिहास ' ग्रंथात पृ. क्र. ३० वर असून त्यान्वये :- ' राणा कुम्भा ने भी बहुत छानबीन के बाद अपने आपको ब्राह्मण लिखवाया था. ' या विधानास दिवाकरांनी आधार दिला नसला तरी आणखी प्रत्यंतर पुराव्यांनी याची बळकटी करता येते.


    गुहीलोत वा सिसोदिया हे खरोख क्षत्रिय असते तर शिवाजीचा राज्याभिषेक करताना असा विधी करणारा पुरोहित राजपुतान्यातून बोलवण्याऐवजी वा विधीची लिखित प्रत तेथून मागवण्याऐवजी शिवाजीने गागाभटास पाचारण का करावे ? तसेच गागाला हा संपूर्ण विधी नव्याने का तयार करावा लागला ?


    शिवाजीने आपलं क्षत्रियत्व तसेच वांशिक संबंध चितोडशी सिद्ध करणे व चितोडकरांनी त्यास संमती देणे हा सर्व प्रकार राजकीय होता. ज्याचा सामाजिक - राजकीय फायदा शिवाजीला झाला तर त्यातील राजकीय धोका फक्त औरंगला उमगला.


    चितोडकरांशी शिवाजीचा संबंध सिद्ध झाल्याने समकालीन मराठ्यांत त्याचे स्थान उंचावले गेले. तो एका पुरातन राजघराण्याचा वंशज ठरला. त्याचप्रमाणे वैदिक राज्याभिषेक समयी त्यांस क्षत्रियत्वाची प्राप्ती झाली जे इतर मराठ्यांना तेव्हाही व आत्ताही अप्राप्य आहे. आणि यातील गंभीर राजकीय धोका म्हणजे शिवाजी - मेवाड युतीने तुर्की साम्राज्याच्या गळ्याभोवती फास आवळू लागला. तुर्कांना दख्खनमध्ये उतरण्यासाठी माळव्यापेक्षा राजपुताना - गुजरात मार्ग अधिक सोयीस्कर होता व तिकडे त्यांचे व्यापरी केंद्रही होते. यामुळेच निजामशाहीत मोडणारा प्रदेश जिंकत शिवाजी गुजरातकडे सरकू लागला.


     प. सा. सं. मधील ले. क्र. १७२९ मध्ये इंग्रज नोंद करतात कि, ' सुरतेचा सुभेदार व शिवाजी यांचे बरे आहे अशी आमची खात्री नसती तर सुरतेबद्दल आम्हांला काळजी वाटली असती. '

उपरोक्त माहिती खरी मानली तर सुरतेचा तुर्की सुभेदार निरुपायाने शिवाजीला अंतस्थरित्या अनुकूल झाल्याचे सिद्ध होते.


     या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर मेवाडकरांनी शिवाजी सोबत हातमिळवणी करून पदरात काय पाडून घेण्याचा प्रयत्न केला होता याचा जसा अंदाज येतो तद्वत अफगाण युद्ध संपताच औरंगने मुर्खपणाने राजपूत युद्ध अंगावर ओढवून घेतले अशासारख्या विधनातील फोलपणाही परस्पर सिद्ध होतो.


    शिवाजीचे दोन राज्याभिषेक :- दि. ६ जून १६७४ रोजी शिवाजीने स्वतःस वैदिक धर्म पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला तर दि. २३ सप्टेंबर १६७४ रोजी तांत्रिक.  


    प्रथम राज्याभिषेक विधीत शिवाजीचा वैदिक धर्मात प्रवेश होऊन त्यास व त्याच्या मुलांस क्षत्रिय वर्णाची प्राप्ती झाली. तर दुसऱ्या राज्याभिषेकाने शिवाजी परत स्वधर्मात -- हिंदू धर्मात परतला असे वैदिक धर्माचे गाढे अभ्यासक श्री. संजय सोनवणी यांचे मत आहे.


    पैकी, वैदिक राज्याभिषेक प्रसंगी वेदोक्त मंत्रांचा उच्चार झाला असा जरी प्रवाद असला तरी पुढील काळात महाराष्ट्रात घडलेले वेदोक्त प्रकरण व त्या संबंधीचे लो. टिळकांचे केसरीतील लेख पाहता, ज्यार्थी भोसले कुळातील गृह्यसंस्कार पुराणोक्तनेच होत त्यार्थी शिवाजीच्या राज्याभिषेक समयी वेदोक्ताचा उच्चार झाला नसल्याचा किंवा शिवाजीकडून करवून घेतला नसल्याचा प्रवाद खरा वाटू लागतो. असो.


    सध्या आपणांस या चर्चेच्या तापोशिलात शिरायचे प्रयोजन नाही. परंतु एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या धर्मांच्या पद्धतीने स्वतःला राज्याभिषेक का करून घ्यावेत ? याचा विचार आवश्यक आहे.


    राज्याभिषेकाची कल्पना नेमकी कोणाची ? या प्रश्नाचे उत्तर देशमुखांनी ' भट्टवंशकाव्यम् ' आधारे रामदासस्वामी असे दिले आहे. परंतु हे काव्य कधी रचण्यात आले याचा खुलासा देशमुख करत नाहीत. असो.


    क्षणभर देशमुखांचे मत ग्राह्य धरले तरी मग प्रश्न उद्भवतो कि, राज्याभिषेकाचे उपाध्यायपण स्वतः रामदासानेच का करू नये ? त्याचाही तितकाच अभ्यास होता ना ? कि मूर्ती पूजा व मुसलमानी अष्टक रचनेमुळे कट्टर वैदिकांच्या दृष्टीने तो हीन दर्जाचा होता व त्यामुळेच शिवाजीने गागाभट्टास पाचारण केले ? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतात, ज्याची इथे फक्त नोंद करत आहे.


     गागाभट्ट हिंदुस्थानातील नामांकित वैदिक विद्वान असल्याने व शिवाजीला आपले मूळ हिंदुस्थानातील असल्याचे सिद्ध करायचं असल्याने कदाचित गागाभट्टाची योजना झाल्याचे अनुमान संभवते. गंमतीची बाब म्हणजे याच गागाभट्टाच्या चुलत्याने ' शुद्रकमलाकर ' ग्रंथाची रचना केली होती. असो.


    वैदिक राज्याभिषेकामुळे हिंदू धर्मातील धर्मगुरू, साधू - संत मंडळी खवळून उठणे स्वाभाविक होते. ज्यांचे नेतृत्व यावेळी निश्चलपुरी गोसावी करत होता.


    निश्चलपुरीने अशुभ भवितव्ये वर्तवली त्याप्रमाणे वर्तमान घडून आल्याने शिवाजीने तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक केला यावर माझा विश्वास नाही. (१) मुळात निश्चलपुरी उभ्या शिवचरित्रात याच समयी कसा उगवला ? (२) शासकासमोर त्याचे अशुभ कसे काय वर्तवू शकतो ? आणि (३) तांत्रिक अभिषेक समयी शिवाजी निश्चलपुरीकडून मंत्रोपदेश घेणार असता त्याचा उपाध्याय त्यास विरोध करतो अशा आशयचा उल्लेख श्री. देशमुखांनी आपल्या शिवचरित्रात दिला आहे व त्यापुढे निश्चलपुरीच्या कथनानुसार शिवाजीने मंत्रोपदेश स्वीकारल्याची त्यांनी नोंद जोडलीय, तिचा अर्थ काय होतो ?


    गंमतीचा भाग म्हणजे इतका खटाटोप करून शिवाजीने आपणांस शिसोदिया कुलोत्पन्न क्षत्रिय राजपूत सिद्ध केले, त्याचा त्याने व्यवहारात फारसा उपयोग केलाच नाही. उदा :- प. सा. सं. ले. क्र. १९०१ मध्ये शिवाजीने मालोजी घोरपड्यास राज्याभिषेकानंतर पाठवलेले पत्र छापले आहे. घोरपडे - भोसले घराण्याचे संस्थापक वंशावळी नुसार अजयसिंहाची मुले व सख्खे भाऊ होत. त्यामुळे हे दोघेही गोत्राचे समजले जातात. त्यान्वये भोसले राजपूत ठरले तर घोरपडेही राजपूत ठरतात. तरीही राज्याभिषेकानंतर घोरपड्यांना पाठवलेल्या पत्रात शिवाजी त्यांचा उल्लेख ' आपल्या जातीचे मराठे ' असाच वारंवार करतो. इतकेच काय सभासदही शिवाजीचा उल्लेख ' मऱ्हाठ पातशहा ' असाच करतो.


    शिवाजीच्या वैदिक राज्याभिषेकाने व त्यानिमित्त वैदिक धर्म प्रवेशाने हिंदू धर्मात अस्वस्थता निर्माण झाली हे उघड आहे. तो क्षोभ शांत करण्यासाठी व परत स्वधर्मात परतण्यासाठी शिवाजीने निश्चलपुरीचा आधार घेतला. परंतु प्रकरण इतक्यावर संपुष्टात न येता या हिंदू - वैदिक धर्मयुद्धांत पुढे कवि कलश सह संभाजीचा बळी जाऊन हे दोघे  खऱ्या अर्थाने हिंदू धर्मवीर बनले !           

                                                                                                             ( क्रमशः )


* सादर लेखात आधारासाठी घेतलेले बव्हंशी ग्रंथ http://www.dasbodh.com/p/blog-page_707.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

** साहित्यावरील जीएसटी कराचा निषेध **

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

सदाशिवरावभाऊ

                                  

    
    पानिपतावर सदाशिव मारला गेला कि नाही, हा तसा अद्यापही विवादास्पद,अनुत्तरीत असलेला प्रश्न आहे. परंतु एवढं मात्र निश्चित कि, त्या युद्धात भलेही त्याने आडमुठेपणाचे डावपेच वापरून का होईना ज्या तऱ्हेने अब्दालीसोबत झुंज दिली, ती खरोखर कौतुकास्पद आहे. पेशव्याचा एक पार्ट टाईम सेनानीही अब्दालीला खडे चारू शकतो, त्याच्या तोंडचे पाणी पळवू शकतो हि उघड दिसणारी बाब देखील मान्य करण्याचे धाडस आमच्या इतिहासकारांस झाले नाही. हि म्हटले तर खेदाची बाब आहे.
                   

                                                               




    एखाद्याचं लढाईतील संशयास्पद वीरमरण त्यांस इतिहासात अजरामर करून सोडते, या विधानाची प्रचीती सदाशिवरावभाऊच्या चरित्रावरून येते.

    थो. बाजीरावाचा धाकटा भाऊ चिमणाजी याचा हा एकुलता एक मुलगा. जो वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी पानिपतच्या रणभूमीवर गारद झाला. याच्या मृत्यूनंतर त्याचे तोतये निर्माण झाले व त्यांनी देखील पेशवाईच्या इतिहासात स्थान प्राप्त करून घेतले. परंतु या तोतयांचा तपास तेव्हाही व आजही पूर्णपणे न केल्याने या तोतायांतील एक खरोखर सदाशिवराव होता का ? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. अर्थात, प्रस्तुत लेखात या प्रश्नाची चर्चा करायची नसल्याने व पानिपतोत्तर काळात भाऊला तितकेसे व्यावहारिक महत्त्व न राहिल्याने आपणांस फक्त पानिपत पुरताच त्याच्या चरित्राचा धावता आढावा घ्यायचा आहे.

    वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी भाऊला पितृ - मातृ शोक सहन करावा लागला. त्यानंतर त्याचे शिक्षण, संगोपन आजी राधाबी व थोरला चुलत भाऊ नानासाहेब पेशव्याच्या देखरेखीखाली झाले. पेशव्याच्या कुटुंबात त्यावेळी भाऊखेरीज जनार्दन, रघुनाथ हे सख्खे तसेच सावत्र बंधू समशेरबहाद्दर अशी पोरसवदा पुरुषमंडळी होती. पैकी एक भाऊ वयाने मोठा असल्याने त्यातल्यात्यात पेशव्याला त्याचाच आधार मिळण्यासारखा होता. परंतु पेशव्याचे तरुण वय व आरंभीची तडफ यामुळे त्यांस आपल्या भावांची व्यवहारात मदत घेण्याचे प्रयोजनच पडले नाही. मात्र यामुळे त्याने त्यांच्या व्यावहारिक - राजकीय शिक्षणाची हेळसांड होऊ दिली नाही.

    थो. बाजीरावापासून पेशव्याच्या घरची खाशी व्यक्ती सातारकर छत्रपतीच्या दरबारी राहण्याचा प्रघात होता. त्यांस अनुसरून नानासाहेब पेशवा बनल्यावर हि जबाबदारी कधी भाऊ तर कधी रघुनाथ यांच्यावर येई.

    घरात वडीलधाऱ्यांचा म्हणावा तसा धाक नसल्याने तसेच पेशवे पदास महत्त्व, वलय, सत्ता प्राप्त झाल्याने पेशवे घराण्यातील या सख्ख्या, चुलत, सावत्र भावांचा परस्परांशी सामान्यतः असावा तसा बंधुभाव असला तरी परस्परांविषयी मत्सर, संशय इ. भावना यांचा उद्गम बालपणातच झाल्याचे उपलब्ध पत्रव्यवहारावरून दिसून येते. भाऊ दादापेक्षा मोठा असला तरी दादा त्याच्यापासून थोडा फटकून वागायचा त्याचप्रमाणे जनार्दन हा दादाचा सख्खा मोठा भाऊ. त्याच्याशीही या पठ्ठ्याचे पटत नसल्याचे उपलब्ध पत्रव्यवहारातून दिसून येते.

    पुढे जनार्दन अल्पायुषी झाला व घरात नाना खेरीज भाऊ व दादा हेच कर्ते पुरुष उरले. समशेरबहाद्दर हा जरी पेशव्याचा औरस पुत्र व बुंदेलखंडातील बाजीरावाच्या खासगत जहागिरीचा वारस असला तरी नानासाहेब पेशव्याने त्यांस त्याच्या जहागिरीच्या कारभारावर न पाठवता किंवा दादा, भाऊ प्रमाणे स्वतंत्र मोहिमा न देता सरदाराप्रमाणेच वागणूक दिली. पेशवे दरबारचा सरदार, वकील या भूमिका समशेरने बजावल्याचे आपणांस या काळातील घटनांवरून दिसून येते.

    पेशवाई प्राप्त झाल्यावर नानासाहेबाने सुमारे एक दशकभर एकहाती कारभार केला. या काळात राजकारण, मोहिमांत भाग घेण्याइतपत भाऊचे वय झाले खरे, परंतु पेशव्याने त्याच्यावर स्वतंत्र मोहिमा न सोपवता नेहमी त्यांस आपल्या अधिकाराखाली वागवल्याचे दिसून येते.

    कर्नाटक प्रांती काही वेळा भाऊने स्वतंत्रपणे स्वाऱ्या केल्याचे जरी इतिहासात नमूद असले तरी या मोहिमांचा खरा सेनापती, सूत्रधार पेशवाच होय. त्याच्या आदेशाखेरीज भाऊला कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य कधीच मिळाले नाही व हि स्थिती प्रत्यक्ष पानिपत युद्धाच्या दिवसापर्यंत कायम होती.

    पेशव्याच्या फडावरील अधिकारी, सरदार म्हणून भाऊने भूमिका पार पाडल्या असल्या तरी या जबाबदाऱ्या पार पाडण्यास तो मनापासून राजी असल्याचे दिसून येत नाही. उलट त्याच्या बापाला जे पेशवाईत स्थान, पद होते ते प्राप्त करण्याचा त्याचा उद्देश होता. पेशव्याला याची थोडीबहुत जाणीव असल्यामुळे बहुतेक त्याने भाऊला याकाळात आपल्या दाबाखाली ठेवले असावे असाही तर्क करता येतो.

    छ. शाहू मरण पावल्यावर ताराबाईने उभा केलेल्या रामराजास छत्रपतीपदी बसवण्यात आले. या नामधारी छत्रपतीस हाताशी धरून सातारकर राजमंडळ निष्प्रभ करत पेशव्यांची सत्ता लौकिक व व्यवहारात वाढवण्याचे कार्य भाऊने रामचंद्र सुखठणकरच्या सल्ल्याने केले. इतिहासात स्वतन्त्रपणे म्हणता येईल अशी त्याची हि एकमेव कामगिरी असावी.

    भाऊच्या या कर्तबगारीमुळे पेशवाही पुढील काळात त्याच्या विषयी साशंक राहू लागला. पण उभयतांतील वैर, द्वेष भाव ताराबाईने रामराजास कैद केल्यावर निर्माण झालेल्या राजकीय गोंधळाच्या स्थितीत लोकचर्चेत उघड झाला. याच काळात जयाजी शिंद्यास लिहिलेल्या एका पत्रात पेशवा नमूद करतो कि, सदाशिवास ' जर भाऊ असेल तर पत्र दर्शनी येणे ' अशा आशयाचा निरोप पाठवला आहे.
याच काळात भाऊने कोल्हापूरची पेशवाई प्राप्त करून घेण्याची खटपट केली होती. परंतु पेशव्याने त्याची समजूत घालून आपले कारभारीपद त्यांस सोपवले व कोल्हापूरची पेशवाई आपल्या पदरात पाडून घेतली. भाऊ पेशव्याचा मुख्य दिवाण झाल्याने पेशव्यांचा तीन पिढ्यांचा कारभारी पुरंदरे घरी बसला. ज्याचा परिणाम छत्रपती - पेशवे तसेच हिंदुस्थान - दख्खनच्या राजकारणावर घडून आला. ज्याची अद्याप कोणत्याही इतिहासकाराने चिकित्सा केलेली नाही.

    स. १७५० नंतरचा कालखंड हा जसा बाहेरील तसाच पेशव्याच्या कौटुंबिक राजकारणामुळे राजकीय इतिहास अभ्यासकास अतिशय गोंधळात टाकणारा विषय बनला आहे.
    या काळात घरगुती, दरबारी स्पर्धेने पेशवा गोंधळून जाऊन त्याने ऐन वेळी अनेक घातकी निर्णय घेतले ज्याचे पर्यवसान पेशवाईच्या इतिश्रीत झाले.
    
    भाऊला त्याने आपल्या दिवाणीवर घेत दादाकडे सेनापतीपद सोपवले. परिणामी या त्रिवर्गांत राजकीय वर्चस्वासाठी शीतयुद्ध सुरु झाले. जमेची बाब हीच कि, भाऊ व दादा या वेळी पेशवेपदासाठी नव्हे तर पेशव्याच्या मुख्य कारभारीपदासाठी आपसांत स्पर्धा करत होते. नानासाहेब या काळात थोडाफार विलासात मग्न झाला असला व अधूनमधून आजारी पडू लागला तरी तुर्की बादशहा प्रमाणे भोगविलासात पूर्णपणे न बुडाल्याने सरदार मंडळी, मुत्सद्दी यांवर त्याचा वचक असून सैन्यावरही हुकुमत असल्याने भाऊ - दादाची स्पर्धा कागदावरच राहिली.

    पेशव्याच्या या घरगुती राजकारणात आणखी एका व्यक्तीची याच काळात एन्ट्री झाली व ती म्हणजे गोपिकाबाई ! गोपिकाबाईला घराबाहेरचे राजकारण कितपत समजत होते हा वादाचा मुद्दा होऊ शकतो परंतु घरगुती राजकारणात मात्र तिचा हात कोणीही धरू शकत नव्हते. अगदी इतिहासकारांनी बदनाम केलेली आनंदीबाईही ! आपल्या नवऱ्याची स्थिती व दिरांची चलती पाहून तिने आपल्या जेष्ठ पुत्रास --- विश्वासरावास व्यवहारात पुढे केले. सिंदखेड, उदगीर, पानिपत मोहिमांत विश्वासराव येतो तो यामुळेच.

    स. १७५० नंतर दिल्ली दरबारचे राजकारण पूर्णतः बदलले. या बदलत्या राजकारणात पेशव्याचा हिंदुस्थानातील मुतालिक --- जयाजी शिंदे, मल्हारराव होळकरासह सहभागी झाल्याने पेशवाही यात ओढला गेला. विशेष म्हणजे दिल्लीची ब्याद अंगावर घेण्यापेक्षा शाहू छत्रपतीपासून वाटणीस आलेला प्रयागचा सुभा ताब्यात घेण्याची पेश्व्यास विशेष उत्कंठा होती. तसेच यानिमिताने साधल्यास काशी वगैरे तीर्थक्षेत्रेही सोडवण्याची त्याची खटपट होती. पैकी, हा सर्व प्रदेश अयोध्येच्या नवाबाच्या --- प्रथम सादतखान, सफदरजंग व नंतर सुजाउद्दौला --- ताब्यात असल्याने पेशवा त्यांच्याशी कधी गोडीगुलाबीने तर कधी शस्त्रबळाच्या धाकाने वाटाघाटी करत राहिला.

    स. १७४२ मध्ये ज्ञानवापी मशीद पाडून तिथे पुन्हा विश्वेश्वराचे मंदिर उभारण्याची मल्हारराव होळकराची इच्छा होती. परंतु त्या क्षेत्री मुस्लिमांचे वर्चस्व असल्याने पंच द्रविड ब्राह्मणांनी यास मोडता घातला. खेरीज हिय्या करून एकदम हा सर्वच प्रदेश जिंकून घेण्याची होळकर वा पेशव्याची या वेळी तयारी नसल्याने प्रकरण इतक्यावरच मर्यादीत राहिले.

    काशी - प्रयाग संबंधी एवढी चर्चा करण्याचे कारण म्हणजे, या प्रयाग तसेच बंगाल - बिहार प्रान्तावरील स्वारीपोटीच पेशव्याने पानिपतला एकप्रकारे जन्म दिल्याचे ऐतिहासिक पत्रांवरून आता सिद्ध होत आहे.
    यमुनेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले रोहिलखंडातील रोहिले, पठाण, नजीबखान व सुजा यांच्यातील परस्पर संबंध, भेद व दिल्लीतील त्यांचे हितसंबंध आणि शाही परिवाराचा यांपैकी कोणत्या मंडळींकडे ओढा आहे - नाही व अब्दालीशी तह करण्यास वा त्याचे हल्ले थांबवण्यास कोण उपयुक्त - अनुपयुक्त याची पेशव्यास बिलकुल उमज पडली नाही.

    स. १७५० नंतर पेशवा एकदाही हिंदुस्थानात न गेल्याने असे झाले म्हणावे तर दोन वेळा हिंदुस्थान स्वारी करणाऱ्या दादालाही याचे साधे आकलन न व्हावे याचे आश्चर्य वाटून राहते. परंतु पेशव्यांची एकंदर कार्यपद्धती पाहता राजकारण जरी त्यांस थोडेफार करता आले तरी राज्यकारभार करणे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येते. राज्यकर्त्यास जी दृष्टी लागते ती पेशव्यांकडे बिलकुल नव्हती. हा त्यांच्या धर्मशिक्षणाचा -- वैदिक धर्माचाच प्रभाव होता. त्यामुळे हिंदुस्थानात मराठी सत्तेला जे थोडेफार महत्त्व  प्राप्त झाले ते शिंदे - होळकर या दोन हिंदू सरदारांमुळेच असे माझे मत बनले आहे.

    रघुनाथरावची इतिहासप्रसिद्ध अटक स्वारी झाली व अब्दालीशी तंटा उद्भवून त्याची आणखी एक स्वारी होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी पेशव्याचा आग्रह -- रघुनाथरावास -- साधल्यास पटणे - बिहारकडे जाण्याचाच होता. जो दादाने युक्तीने दुसऱ्यावर --- म्हणजे शिंद्यांवर ढकलला.
शिंद्यांकडे पेशव्याची मुतालकी असल्याने त्यांस आपल्या पदास अनुसरून बळकट सैन्य पदरी ठेवणे भाग होते व त्यामुळेच एकहाती मोहिमा पार पाडण्याचे त्यांस सामर्थ्यही प्राप्त झाले होते. यामुळे स. १७५० नंतर हिंदुस्थान वा दख्खनमधील प्रत्येक मोहिमेत शिंद्यांचा सहभाग हि एक अनिवार्य बाब बनल्याचे दिसून येते.
    
    यामुळेच दादा दिल्लीहून परत येताना व शिंदे दख्खनमधून हिंदुस्थानात जात असताना पेशव्याने शिंद्यांवर पंजाबच्या बंदोबस्ताची व बंगाल स्वारीची जबाबदारी टाकून दिली. या कामगिरीत अपयश येऊन दत्ताजी बुराडी घाटावर अब्दाली, सुजा व नजीब या त्रिवर्गाच्या हल्ल्यात मारला गेला तर जनकोजी जखमी झाला. शिंद्यांच्या या वाताहतीस बव्हंशी इतिहासकार होळकरास जबाबदार मानत असले तरी उपलब्ध माहितीवरून शिंद्यांना मुळी तिथले राज्कारांचे आकलनच न झाल्याने त्याच्यावर हि आपत्ती ओढवल्याचे दिसून येते.

     यानंतर होळकराचे अब्दाली व त्याच्या मित्रांशी युद्ध झाले. यात उभयपक्षी बरोबरी होऊन अखेर दि. १३ मार्च १७६० रोजी शांतता करार झाला. परंतु याच्या दुसऱ्याच दिवशी सदाशिवरावाची हिंदुस्थान प्रांती नियुक्ती झाल्याने उपरोक्त करार फिस्कटून प्रकरण मूळ पदावर आले.

    पानिपत मोहिमेआधी भाऊने सिंदखेड, उदगीर येथे निजामाविरुद्ध जय मिळवला होता. हि त्याची अब्दाली विरुद्ध लढण्याकरता निवड करण्यासाठीची पात्रता मानण्यात आली. परंतु या मोहिमांचे विश्लेषण करू पाहता एक सेनानी म्हणून त्याचा फार मोठा रोल असल्याचे यात दिसून येत नाही. सिंदखेडला दत्ताजी शिंदे तर उदगीरला दादा यांनी निजामाला चेपल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून स्पष्ट होते. यावरून भाऊ हा पेशव्याहून सरस तर दादापेक्षा कमी प्रतीचा सेनानी असल्याचे सिद्ध होते. तरीही पेशव्याने त्याची हिंदुस्थान प्रांती जाण्याकरता निवड केली. ती अब्दालीशी भिडण्याकरता नव्हे तर बंगाल - बिहार वा प्रयागकडे जाण्यासाठी !

     पानिपत मोहिमेत भाऊने इतरांना पाठवलेली पत्रे उपलब्ध असली तरी भाऊला इतरांनी पाठवलेली पत्रे तितकीशी उपलब्ध वा प्रसिद्ध नाहीत. त्यामुळे वरील विधान साधार सिद्ध करणे अवघड असले तरी अशक्य मात्र नाही.

    आगऱ्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासाचा मार्ग व गोविंदपंत तसेच इतरांना पाठवलेली पत्रे पाहता भाऊचा प्रथम बेत इटावा अथवा त्या आसपास यमुना पार करून जाण्याचा होता, ते अब्दालीला नव्हे तर सुजाला दबवण्यासाठी. परंतु अब्दाली आरंभापासून यमुनेच्या पूर्व किनाऱ्यावर तळ ठोकून राहिल्याने त्यास हे साधता आले नाही व तो तसाच पश्चिम किनाऱ्याने दिल्लीला गेला.

    इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे, आग्ऱ्यास येईपर्यंत अब्दालीशी सामना करावा लागेल अशी भाऊ वा त्याच्या सल्लागारांची बिलकुलही कल्पना नव्हती. त्यांच्या मते नेहमीसारखा अब्दाली उन्हाळ्यात मायदेशी रवाना होईल व त्याच्या गैरहजेरीत आपला कार्यभाग साधून घेता येईल.  
    आगऱ्याहून दिल्ली व दिल्ली मुक्कामातील त्याच्या सर्व राजकीय हालचाली या बव्हंशी पेशव्याच्या आज्ञेने झाल्याचे दिसून येते. अतिरिक्त सैन्य ठेवणे न ठेवणे तसेच तह - करारमदार व दरबारातील महत्त्वाची पडे कोणास द्यायची, न द्यायची हे सर्व निर्णय तातडीने घ्यायचे असले तरी पेशव्याच्या संमतीविना घेणे शक्य नव्हते व याचाच फायदा शत्रूपक्षाने अचूक घेतला.

    नांसाहेब पेशव्याची अदूरदर्शीता अशी कि, त्याने सुजला वजिरी देण्याचा भाऊला आदेश दिला. ज्याचा परिणाम मराठी पक्षाच्या दृष्टीने हानीकारकच ठरला. सुजाकडे वजिरी गेल्याने ना त्याच्यात व अब्दालीत तंटे झाले, ना त्याने उभयपक्षांत तह घडवून आणला. उलट असा तह घडून येणे त्याच्याकरता हानिकारक होते. कारण अब्दालीकडून पेशवा न मोडला गेल्यास मराठी सैन्याची टोळधाड त्याच्या राज्यावर येणार हे उघड दिसत होते. परंतु राजकारणातील हि बाब जशी पेशव्याला कळली नाही तशीच इतिहासकारांनाही. व ते नजीबला बडवत सुटले.
    वस्तुस्थिती अशी होती कि, याक्षणी मराठी पक्ष मोडल्यास त्याचा सर्वधिक फायदा फक्त सुजालाच होणार होता.

    इकडे सुजाकडे वजिरी गेल्याने आधीचा वजीर गाजीउद्दिन नाराज होऊन जाट राजाकडे आश्रयार्थ निघून गेला. खेरीज दिल्ली सोडून पानिपतला जाताना भाऊने स्वतःहून वा पेशव्याच्या आज्ञेने केलेली अक्षम्य चूक म्हणजे ज्या तुर्की बादशाही रक्षणासाठी तो हिंदुस्थानात आला होता त्या तुर्की बादशाही परिवारातील एकही प्रतिनिधी त्याने स्वारीत सोबत घेतला नाही. म्हणजे लौकिकात हे युद्ध पेशवा व अब्दाली यांच्यात झाले. बादशाही संरक्षक पेशवे व अफगाण लुटारू यांच्यात नव्हे !

    दिल्लीहून भाऊ कुंजपुऱ्यास गेला. तिथल्या गढीला ताब्यात घेऊन गोविंदपंतास पत्रात लिहिल्याप्रमाणे तिथून यमुनापार न होता, तो तसाच पुढे कुरुक्षेत्राकडे निघाला. यामागे शिखांची मदत मिळवण्याचा त्याचा हेतू असला तरी पलीकडच्या काठावर शत्रू प्रबळ असून तो तसाच किनाऱ्याने वर पुढे आल्यास शिखांची मदत कितपत प्राप्त होईल याविषयी कसलीच शंका त्याच्या मनात आली नाही.
येथे तुलनेकरता दादाची अटकस्वारी पाहिली तर त्यात पठाण, रोहिले, तुर्क, शीख या सर्वांची त्यात मराठी पक्षास सक्रीय मदत होती. भाऊच्या वेळी कोणीच नाही. असे का व्हावे ? हा प्रश्न अद्याप एकाही इतिहास अभ्यासकास पडलेला नाही.

    कुंजपुरा ते कुरुक्षेत्राच्या निम्म्या वाटेवरून अबाउट टर्न करून पानिपत. असा भाऊचा प्रवास झाला. कारण कुरुक्षेत्राच्या नजीक पोहोचल्यावर बागपत येथे अब्दाली यमुनापार झाल्याची बातमी आली. तेव्हा योजलेले सगळे बेत जागच्याजागी राहून आता शत्रूच्या तंत्राने वागणे भाग पडले !
यानंतरचा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहे. यापुढील घटनांच्या अधिक विवेचनाकरता इच्छुकांनी माझे ' पानिपत असे घडले ' वाचून बघावे अशी मी शिफारस करतो. फक्त त्यामध्ये न आलेला, पाच - सहा वर्षांपूर्वी मला ज्ञात नसलेला तसेच अनावश्यक वाटलेला भाग मी इथे मांडत आहे.

    नाना फडणवीस आपल्या आत्मवृत्तात भाऊ हा शहनवाजखान व भवानीशंकर या दोन सल्लागारांच्या तंत्राने चालत असल्याची माहिती मिळते. पैकी, शहानवाजखान कोण हे जरी समजले नसले तरी एका उल्लेखावरून भवानी शंकर हा सुजाचा वकील असल्याचे कळते. जर हा उल्लेख खरा असेल तर मग भाऊच्या एकूण शहाणपणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते. असो.

    पानिपतच्या तळावर अडकल्यानंतर सुटकेचे शक्य ते प्रयत्न भाऊने करून पाहिले. तहाची देखील जोरदार वाटाघाट करून पाहिली. परंतु हि सगळी धडपड त्याने सुजासारख्या विश्वासघाती मित्रावर विसंबून केल्याने व्यर्थ गेली.
    मला एक समजत नाही कि, आपल्या इतिहासकारांनी -- विशेषतः मराठी -- सुजाचे एवढे लाड, कोडकौतुक का केले आहे ? केवळ तो इराणी, शिया पंथी मुसलमान म्हणून ? कि ऋग्वैदिक कालीन वैदिक धर्मीय टोळीचा वंशज म्हणून ? सुजा वारंवार दगाबाजी करतोय हे स्पष्टपणे दिसत असूनही इतिहासकार त्याच्या गुणवर्णनात मग्न ! असो.

    सदाशिवरावची राजकीय व लष्करी आघाडीवरील कामगिरी पाहता त्याची योग्यता फारतर समशेरबहाद्दरच्या एवढी असल्याचे म्हणता येते. कारण त्याला दिलेला निर्णयस्वातंत्र्याचा अभाव. ज्यामुळे त्याचे यश - अपयश हे कधीच धवल राहू शकले नाही.
    महसूल विभागात त्याची कामगिरी उत्तम असल्याचे सांगितले जाते परंतु पेशव्याच्या कर्जाची रड मात्र त्याच्या करड्या कारभारातही मिटली नसल्याचे दिसून येते. अर्थात, पेशव्याचे कर्जप्रकरण ऐच्छिक किती व अनैच्छिक किती हा वेगळ्या विषयाचा मुद्दा आहे.
    पेशव्याचा दिवाण व सल्लागार म्हणून त्याने पेशव्याच्या आदेशाने इब्राहीमखान गारदीस आपल्या लष्करात दाखल करून घेतले खरे पण या फ्रेंच प्रशिक्षित पथकाच्या उणीवा त्याच्या लक्षात आल्या नाहीत. अर्थात हा दोष त्याला फारसा देता येत नाही. कारण, फ्रेंच युद्धतंत्र सदोष असल्याचे पुढील काळात महादजी शिंदे सारख्या लढवय्यास जिथे उमगले नाही तिथे भाऊसारख्या पार्टटाईम सेनानीस दोष का द्यावा !