शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

प्रकरण ८) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





    मागील प्रकरणात आपण औरंगच्या साम्राज्यविस्तार धोरणातील शिवाजीच्या भूमिकेची थोडक्यात चर्चा केली. प्रस्तुत प्रकरणात आपण शिवाजीच्या स्वतंत्र राज्यस्थापन, विस्तार व अफझलखानाच्या स्वारीची थोडक्यात माहिती पाहू.


    स. १६५८ च्या आरंभी औरंगजेब वारसा युद्धांत सहभागी होण्यासाठी उत्तरेत रवाना झाला. तोपर्यंतची मोगलांची स्थिती अशी होती :- स. १६५७ च्या डिसेंबरमध्ये गुजरातचा सुभेदार शहजादा मुरादने स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत लष्करी तयारीकरता सुरतेची लुट केली. तिकडे बंगालमध्ये सुजानेही स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत गडबड उडवून दिली होती. दिल्लीला दारा शुकोहने बादशाही पद वा तख्त हाती न घेता फक्त सर्वाधिकार हाती घेऊन पडद्यामागील सूत्रधाराची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. जो त्याच्या अंगी आला. त्याउलट औरंगने आपलं धोरण आगाऊ जाहीर न करता परिस्थितीनुसार वागण्याचा निर्णय घेतला.


    या चार शहजाद्यांच्या महत्त्वाकांक्षा, भूमिका काहीही असल्या तरी त्यांपैकी आपल्या बंडखोरीचा --- यशस्वी झाल्यास न् झाल्यास हा भाग वेगळा --- मोगल साम्राज्याला अधिक फटका बसू नये याची सर्वधिक काळजी औरंग घेत असल्याचे दिसून येते. असो.


    औरंगने दख्खन सोडताना आपल्या पाठीमागे शिवाजी - आदिल परस्परांशी झुंजत बसतील असाही सोय केली होती असं म्हणणं सयुक्तिक ठरणार नाही. कारण शिवाजीची नव्याने उदयास येणारी सत्ता मोगल - आदिलच्या सरहद्दी दरम्यान असल्याने व शिवाजीचा प्रमुख उद्योग आपल्या ताब्यातील भूप्रदेशास सलग असलेला भाग जिंकून घेण्याचा --- विशेषतः आधीच्या निजामशाहीत मोडणारा प्रदेश ताब्यात घेण्याचा असल्याने आदिल व शिवाजी यांचं झगडा जुंपणे अपरिहार्य होते.


    इथे एक महत्त्वाची बाब मी नमूद करू इच्छितो व ती म्हणजे शिवाजीचं राज्य मूळ आदिलशाहीत मोडणाऱ्या भूप्रदेशाचं मिळून बनलेलं, अशा आशयाच्या सिद्धांताचा पुरस्कार आजवर इतिहासकारांनी केला आहे, तो पुराव्यांनी साफ चुकीचा असल्याचे दिसून येते.


    स.१६३६ पर्यंत शहाजीने निजामशाही उभारण्याकरता जो भूप्रदेश ताब्यात घेतला --- ज्यातील बव्हंशी मूळ निजामशाहीचाच भाग होता --- तोच प्रदेश शिवाजीने फिरून जिंकण्याची खटपट आरंभली होती. मात्र, शहाजी - शिवाजीच्या भूमिकांतील फरकामुळे दोघांच्या योजनांना वेगवेगळे फळ प्राप्त झाले. शहाजीने सर्व उद्योग निजामशहाच्या नावाने केला. परंतु शिवाजीने प्रथमपासूनच स्वतंत्र वर्तनाचा मार्ग स्वीकारला होता. ज्यामुळे त्याच्या पदरी असणाऱ्यांच्या वृत्तीला एक वेगळे वळण लाभले, त्याचप्रमाणे त्यांस आपल्या स्वतंत्र भूमिका, वर्तनाचा फायदाही झाला. तसेच शिवाजीने आपला राज्यविस्तार करताना संरक्षण व आक्रमण या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊनच पद्धतशीरपणे मोहीम आखल्याचे दिसून येते. परंतु या सर्वांची चर्चा करण्यापूर्वी आणखी एका मुद्द्याची आपण संक्षिप्त चर्चा करू.


    शिवाजीने निर्मिलेलं राज्य निजामशाही प्रदेशात असलं तरी त्यांस इतकं यश, तेही अल्पावधीत कसं काय लाभलं असावं ? स. १६३६ मध्ये जीवाचं रान करून आदिल - मोगल या संयुक्त आघाडीने निजामशाही खालसा केली खरी, परंतु निजामशाहीच्या प्रदेशावर पूर्णतः ताबा बसवणे त्यांना शक्य झालं नाही. उदाहरणार्थ, जंजिरेकर सिद्दी स. १६४२ पर्यंत विजापूरकरांना जुमानत नव्हता. आदिलशहाने महत्प्रयासाने त्यांस आपली चाकरी बजावण्यास भाग पाडले. स. १६४६ पर्यंत कुडाळकर सावंतही विजपुरकरांकडे सामील झालेला नसल्याचा तर्क बांधता येतो. म्हणजेच कोकणात विजापूरकरांचा तितकासा जोर दिसत नव्हता. या प्रदेशातील मुळचे संस्थानिक नाममात्र मांडलिकत्व स्वीकारत होते व त्यावरच निजाम, आदिल वा मोगलांसारखे सत्ताधीश खुश होत असत. असो.


    शिवाजीने जावळी पालथी घालताच कोकणात उतरून तिकडून आदिलशाहीस चाप लावत आपल्या राज्यविस्तारास आरंभ केला. तेव्हा शिवाजीचा बंदोबस्त करण्याच्या हेतुस्तव आदिलशहाने स. १६५८ मध्ये रुस्तमेजमानला कुडाळवर स्वारी करण्यास पाठवले. रुस्तमने कुडाळकरांना चांगलेच रगडून काढले खरे, परंतु त्याचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजीला होऊन पुढच्याच वर्षी --- म्हणजे स. १६५९ मध्ये कुडाळकर सावंताने शिवाजीचं मांडलिकत्व स्वीकारणारा पुढील तह पदरात पाडून घेतला :-


ले. १ ]                       [ श. १५८० फा. व. ७ 

(४११) ]                       [ ता. ५ मार्च १६५९

                     श्री

सन १०६८ फसली                   फेरीस्त नंबर

       तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ

प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे.                  कलम १


किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे.      कलम १


स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे.  कलम १


प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे.            कलम १


प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे.   कलम १


शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "


( संदर्भ ग्रंथ :- काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रें यादी वगैरे लेख

संपादक :- गो. स. सरदेसाई, या. मा. काळे व वि. स. वाकस्कर. )       


    उपरोक्त तहाची चर्चा करण्यापूर्वी स. १६५६ च्या एका संदिग्ध पत्राचा येथे विचार होणे अत्यावश्यक आहे. पत्रसार संग्रह ले. क्र. ( २३२० = ७२० अ ) नुसार महंमद आदिलशहा खेम सावंतास लिहितो कि, " तुम्ही वडिलार्जित चाकरीवर आला, ठीक केले. कोणते तऱ्हेने राजा संभाजीशी ममता राखून मोगल याजबरोबर मैत्री न ठेवावी. बादशाही मुलखाची आबादानी करून कुमकेकरितां हुजूर फौजेत येणे. एक हुशार मनुष्य पाठवणे. " या पत्रातील राजा संभाजी कोण, याचा उलगडा होणे आवश्यक आहे. कदाचित शिवाजी ऐवजी संभाजी असेही वाचन झाल्याची शक्यता आहे. परंतु यावर पुराव्याअभावी अधिक काथ्याकुट करता येत नाही. दुसरे असे कि, उपरोक्त पत्रान्वये स. १६५६ मध्ये सावंतही आदिलशहाला पूर्णतः रुजू नसल्याचे दिसून येते. बहुधा यामुळेच स. १६५८ च्या पूर्वार्धात विजापूरकरांनी कुडाळवर स्वारी पाठवली असावी. असो.


    यास्थळी हे देखील नमूद करणे योग्य ठरेल व ते म्हणजे स. १६५८ च्या ऑक्टोबर मध्ये शिवाजी कर्नाटक स्वारीत होता. परंतु त्याची मोहीम नेमकी कोणत्या भागात चालली होती याची स्पष्टता होत नाही. असो. आता आपण शिवाजी - कुडाळकरांमधील तहाची चर्चा करू. 


    या तहाच्या संदर्भात ' शककर्ते शिवराय ' मध्ये विजय देशमुखांनी अशा आशयाचं विधान केलंय कि, प्रस्तुत तह शिवाजीच्या स. १६६४ च्या कुडाळ स्वारी वेळी बनला असावा. परंतु आपल्या मताच्या पुष्टीकरता त्यांनी संदर्भ वा पुरावे दिले नाहीत. प्रस्तुत तहनाम्यावरील हा आक्षेप लक्षात घेऊन खरे जंत्री नुसार यांच्या तारखांचा तपास केला असता तारखांचा घोळ नसल्याचेही स्पष्ट होते. तेव्हा सदर तहनामा हा स. १६५९ चाच असल्याचे सिद्ध होत असले तरी काही बाबी निश्चितच संशयास्पद आहेत, ज्यांचे निरसन करण्यास आवश्यक ते पुरावे उपलब्ध झाले नाहीत.


    या तहातील एका कलमात बेद्नुर संस्थानच्या खंडणी वसुलीचा उल्लेख आहे. त्यावरून स. १६५९ मध्ये बेद्नुरकर शिवाजीचा मांडलिक असल्याचे दिसून येते. परंतु याला प्रत्यंतर पुराव्याची जोड, मला मिळाली नाही. त्याचप्रमाणे फोंड्याबाबतही तीच स्थिती आहे.

कुडाळकरांना आपल्या अंकित करून शिवाजीने कोकणात जशी आपली सत्ता विस्ताराली त्याचप्रमाणे कोकणातून कोल्हापूर - पन्हाळ्यावर झडप घालण्यासाठी त्याला एक सोयीस्कर मार्गही खुला झाला. पन्हाळ्याचा मजबूत किल्ला विजापूरच्या सरहद्दीच्या रक्षणाची मोठी भूमिका बजावत असल्याने पन्हाळा जिंकून विजापूरच्या उरात भाला खुपसण्याची इच्छा यावेळी कदाचित शिवाजीच्या मनी असल्याने त्याने या अनुषंगानेही कुडाळकरांना आपल्या पंखाखाली घेतले असावे. तसेच शिवाजी याच समयी आपलं नौदल उभारत असल्याने किनाऱ्यावरील चौल, वसई, गोव्यासारखी स्थळे व्यापणाऱ्या पोर्तुगीजांसारख्या प्रबळ युरोपियन सत्तेला धाकात ठेवण्यासाठीही कोकण किनारा, शक्य तितक्या सलग प्रमाणात त्यांस ताब्यात ठेवणे अत्यावश्यक होते. मिळून या स्वारीमुळे शिवाजीचे एकाहून अधिक हेतू साध्य होणार होते.


    या स्थळी एक प्रश्न उद्भवतो कि, यासमयी रुस्तमेजमान व विजापूरकर काय करत होते ? इतिहासकारांच्या मते रुस्तम व शिवाजीचा पूर्वापार मैत्रीसंबंध होता. त्याचा बाप रणदुल्लाखान हा शहाजीचा मित्र असून मैत्रीचा वारसा पुढच्या पिढीतही चलला असल्याने रुस्तमने शिवाजीच्या कोकणातील प्रवेशाकडे सहेतुक दुर्लक्ष केले तर आदिलशाही दरबार यावेळी डचांकडून पैसा उकळून पोर्तुगीजांवर स्वारी करण्याच्या प्रयत्नांत होता. वस्तुतः अशी स्वारी होऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी एक लक्षाचा नजराणा दरबारात भरला होता. परंतु डचांनी याहून अधिक मोठा नजराणा देऊ केल्याने आदिलशहाने हा सौदा स्वीकारला. याचं फलित म्हणजे मडगावजवळ त्याला मार खाऊन परत यावं लागलं. ( स. १६५९ ) असो.


    कुडाळकरांनी जरी शिवाजीचं मांडलिकत्व स्वीकारलं असलं तरी ते फार काळ त्यांस रुजू राहिले नाहीत. विजापूरकरांनी अफझलखानाची रवानगी शिवाजीवर करताच कुडाळकरांनीही लगेच रंग बदलला असा पसासं ले. क्र. ( २३२१ = ७७१ अ ) स. १६५८ - ५९ मधील " घाटाचे पायाखालील तमाम परगणे इनाम दिले. जमाबंदी करणे. वाजवी वसूल घेणे. आदलखान अमलांत हिंदवीत लिहिल्याप्रमाणे मसुरा वगैरे १३ गावे हक्कासह इनाम दिली. घाटावरून फौजा येतील तेव्हा हजर राहणे. रहदारीस हरकत न होईसा बंदोबस्त करणे. " या मजकुरावरून तर्क करता येतो. परंतु सदर पत्राची निश्चित तारीख उपलब्ध नसल्याने यावर अधिक चर्चा अशक्य आहे.


    शिवाजीची वाढती सत्ता जमल्यास नियंत्रणात आणण्यासाठी वा नष्ट करण्यासाठी आदिलशाही विशेष उत्सुक असली तरी याकरता लागणारे पुरेसं सैनिकी सामर्थ्य त्यांच्याकडे अजिबात नव्हतं. त्यामुळेच हरप्रयत्ने शिवाजीचा बंदोबस्त करण्याकरता त्यांनी आपला सर्वोत्तम सरदार --- अफझलखान याकामी नेमला.


    अफझलच्या निवडीमागे बऱ्याच इतिहासकारांनी अफझल व भोसले घराण्याचा दावा असल्याचा एक सिद्धांत प्रचलित केला आहे. त्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याआधी काही गोष्टी येथे विचारात घेणे आवश्यक आहे. विजापूरची आदिलशाही मोडकळीस आली असून काही मोजके एकनिष्ठ सरदार अपवाद केल्यास उर्वरित आदिलशाही सरदारांचा भर सवता सुभा निर्माण करण्यावरच होता. दुसरे असे कि, महंमद नंतर तख्तावर बसलेला अली हा अनौरस पुत्र असल्याने शहाजी, बहलोलखान, रुस्तमजमा इ. चा त्याच्या वारसा हक्कावर आक्षेप होता. अशा स्थितीत निव्वळ आदिलशाही अभिमानी व पराक्रमी असा अफझलखान आदिलशहास शिवाजीरुपी संकटावर उतारा वाटल्यास त्यात नवल ते काय !


    शिवाजीवर अफझखानास रवाना करण्यामागे आदिलशहा --- विशेषतः बडी बेगमचे निश्चितच एक धोरण ठरलेलं होतं. शिवाजीचं अस्तित्व व त्याचं वाढत जाणारं प्रस्थ आदिलशाहीच्या नाशास कारणीभूत ठरण्याची तिला रास्त भीती वाटत होती. जरी मोगल दख्खनी सत्तांचे स्वाभाविक शत्रू असले तरी समानधर्मीय तसेच प्रसंगी गोवळकोंड्याच्या मदतीच्या भरवशावर आदिलशाही स्वतःचा बचाव करू शकत होती. शिवाय अफझलची शिवाजीवर नियुक्ती करेपर्यंत जरी वारसा युद्धाचा निकाल लागला नसला व अफझल विजापूरातून निघण्यापूर्वी औरंग तख्तावर बसला असला तरी आधी म्हटल्याप्रमाणे धार्मिक कट्टरता वा प्रेमाच्या बळावर मोगली तडाख्यातून या शाहीचा बचाव करण्याची बडी बेगमला उमेद असावी. अर्थात, जास्त व्यावहारिक विचार केला असता शहजादा औरंगने स्वतःच्या मर्जीने अनाधिकारपणे का होईना विजापूरकरांना निजामशाही कोकणचा भूप्रदेश देऊ केल्याने --- जो सध्या शिवाजीच्या ताब्यात होता --- तो प्रदेश फिरून जिंकून घेऊन आपले बळ वाढवणे व भविष्यातील मोगल - शिवाजी अशा संभाव्य युतीला मुळातच खुडून टाकणे असाही दृष्टीकोन विजापूरकरांचा असू शकतो. तात्पर्य, शिवाजी - आदिलशहा यांच्यातील झगडा एका निर्णायक टप्प्याजवळ येऊन पोहोचला होता. या लढ्यात जो जिंकेल त्याचेच नंतर वर्चस्व राहणार होते, हे उघड आहे.


    विजापूरकरांनी शिवाजीवरील स्वारी आखली खरी परंतु अलीकडच्या काळातील सततच्या मोहिमांमुळे लष्करीदृष्ट्या त्यांना आवश्यक तितके बळ जमवता न आल्याचे उपलब्ध साधनांवरून दिसून येते. अफझलच्या सैन्याचा सरासरी आकडा पंधरा ते वीस हजारांच्या दरम्यान जातो. त्याउलट शिवाजीकडे याहून अधिक सैन्य असल्याचे दिसून येते. परंतु इतिहासकारांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने घटनेचं आकलन करून न घेता, या प्रकरणाचे एकंदरच काल्पनिक - अद्भुत वर्णन करण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येते.


    उदाहरणार्थ, अफझलखानाची शिवाजीवरील मोहिमेसाठी नियुक्ती जरी एप्रिल - मे मध्ये झाली असली तरी प्रत्यक्षात तो स्वारीकरता विजापुरातून सप्टेंबर मध्ये बाहेर पडला. परंतु तत्पूर्वीच शिवाजीला त्याच्या हालचालींची आगाऊ वार्ता लागली होती. इतिहासकार सांगतात, समजतात त्याप्रमाणे शिवाजीच्या अनुरोधाने खानाच्या हालचाली होऊन तो जावळीत शिरला. परंतु वस्तुस्थिती वेगळीच दिसते. जावळीकर मोऱ्यांचा एक वंशज -- प्रतापराव मोरे विजापूरच्या आश्रयास असून विजापूरकरांच्या सहाय्याने त्यांस आपलं गमावलेलं राज्य मिळवण्याची मोठी आशा वाटत होती. प्रतापराव व त्याचे सैन्य त्या प्रांताचे माहितीगार असल्याने, तो प्रांत नुकताच शिवाजीकडे नुकताच आल्याने व वाईकडचा सरसुभेदार म्हणून खानाची नियुक्ती झालेली असल्याने अफझलखानाच्या स्वारीचा मुख्य रोख जावळी प्रांताकडेच असल्याचे शिवाजीने ताडले होते व अफझलही जवळपास याच आराखड्यांनी चालला होता. ( मूळ सिद्धांत शिवचरित्र निबंधावलीत असून शब्दांकन माझे असल्याची नोंद घ्यावी. )


    खानाचे हे नियोजित बेत उधळून लावण्याची शिवाजीने दोन आघाड्यांवर तयारी चालवली. खान आला तर थेट वाई वा जावळी परिसराच्या रोखानेच येणार हे हेरून शिवाजीने जशी बचावाची सिद्धता चळवळी --- ज्यामध्ये ओस पडलेला जासलोडगडाचे ' मोहनगड ' असे नामांतर करून तो वसवण्याची त्याने तजवीज केली --- त्याचप्रमाणे खानाच्या जहागीर प्रदेशात -- तेरदळ भागावरही एक आघाडी रवाना केली. जेणेकरून खान आपल्या जहागिरीच्या बचावार्थ पुण्याचा रोख सोडून कर्नाटकात गुंतून पडेल. परंतु शिवाजीच्या सैन्याला त्या भागातील कृष्ण गौड देसाईने उधळून लावले व खानानेही या स्वारीची फारशी तमा बाळगल्याचे दिसून येत नाही.


    या संदर्भात शिवचरित्र प्रदीप मध्ये पृष्ठ क्र. ८३ ते ८६ वर छापलेली पत्रं विशेष उपयुक्त असून त्यानुसार शिवाजीने या प्रांती सुभेदार गंगाजी महादेवला पाठवल्याचे स्पष्ट होते. या स्वारीत कृष्ण गौडा मारला गेल्याचा एका पत्रात उल्लेख आहे परंतु हा प्रकार नेमका कधी घडला --- म्हणजे दि. ७ ऑक्टोबर १६५९ चं अफझलचं पत्र तेरदळ परगण्याच्या कारकुनांना उद्देशन लिहिलेलं असून त्यानुसार शिवाजीच्या सैन्याचा बंदोबस्त केल्याबद्दल कृष्ण देसाईला इनाम दिल्याचा उल्लेख आहे. परंतु कृष्ण देसाई मेल्याविषयीचा उल्लेख नाही. असो. परंतु यावरून असे दिसून येते कि, खान शिवाजीला मोकळ्या मैदानात खेचायला बघत होता व शिवाजी खानला जावळीत ओढू पाहत होता, असा सर्वसाधारण समज असल्याप्रमाणे प्रकार नसून प्रत्यक्षात उभयतांचे डावपेच काही वेगळेच असल्याचे दिसून येते. असो.


    वाईजवळ आल्यावर खानाने शिवाजीच्या प्रदेशात ठिकठिकाणी आपले सरदार रवाना करून शिवाजीचे राज्य ताब्यात घेण्याची व त्याचे लष्करी बळ ठिकठिकाणी विखुरले जावे यासाठी कारवाई आरंभली. त्यानुसार पुणे प्रांती सिद्दी हिलाल, सुप्यावर जाधव, शिरवळवर नाईकजी पांढरे, सासवडवर खराटे तर तळकोकणात सैफखानास खानाने रवाना केले. या सरदारांच्या प्रतिकारार्थ शिवाजीने काय योजना आखल्या याची पुरेशी माहिती मिळत नाही. लष्करी कारवाई सोबत खानाने --- विशेषतः आदिलशहाने शिवाजी विरोधात राजकीय आघाडीवरही बरीच मुसंडी मारली होती. शिव्जीला सामील झालेल्या व त्याच्या राज्यातील बहुतांशी देशमुख वतनदारांना फितवण्याची त्याने पराकाष्ठा केली व त्याच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही आले. शेवटी दीडशे वर्षांच्या प्रस्थापित राजवटीचे जनमानसावरील परिणाम हे त्या राजवटीस अनुकूल असेच होणार !


    वाईला तळ ठोकून खानाने जी काही राजकीय - लष्करी मोहीम शिवाजीविरुद्ध चालवली होती त्यांस शक्य तितका प्रतिकार करण्याची शिवाजीने शिकस्त केली असली तरी या लढ्याचा निर्णायक टप्पा नजरेत येत नव्हता व या पद्धतीने निकाल लागणंही शक्य नव्हतं. लष्करीदृष्ट्या उभय पक्ष तुल्यबळ असले तरी एकाच लढाईत सर्व बळ एकवटण्याचा जुगार खेळणे शिवाजीच्या नव्या सत्तेला परवडणारे नव्हते. त्याचप्रमाणे मोहिमेकरता आदिलशहाने कितीही प्रचंड प्रमाणात आर्थिक तसेच दारुगोळा, अन्नधान्याची तरतूद केली असली तरी औरंगजेब तख्तारूढ झाल्याने मोगलांच्या हस्तक्षेपाची शक्यताही नाकारता येत नव्हती. तात्पर्य, मोहीम कशाही प्रकारे का होईना शक्य तितक्या लवकर आटोपणे उभयतांनाही आवश्यक झाले होते व त्यानुसार खानाने वाटाघाटीचा मार्ग अवलंबला. ज्यानुसार शिवाजीने तहास प्रवृत्त होऊन आपल्या भेटीस येण्यास तयार व्हावे अशी खानाने खटपट आरंभली.


    खानाच्या हेतूंची शिवाजीस कल्पना असल्याने त्याने खानाच्या गोटात जाण्याचे अखेरपर्यंत टाळले व खानाचे आवडते भक्ष्य -- म्हणजे जावळीचा प्रांत व स्वतः शिवाजी --- यांची त्याने खानास लालूच दाखवत त्यांस जावळीत खेचण्याचा उपक्रम आरंभला. इथे जावळीचे रणक्षेत्र कोणाच्या सोई वा अडचणीचे हा प्रश्नच मुळी उद्भवत नाही. कारण हे रणक्षेत्र तसेही उभयतांच्या सोईचेच होते. शिवाजी व त्याचे सहाय्यक जसे या प्रदेशाचे जाणकार होते तद्वत खानाच्या फौजेतील मोरे, खोपडे प्रभूती मंडळीही इथली माहितीगार होती. शिवाय आरंभी खान जावळीकडे न यावा अशी शिवाजीचीच इच्छा असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. परंतु एकदा खानाचा कल त्या भागातच घुसण्याकडे विशेष असल्याचे लक्षात येताच शिवाजीने स्थिती अनुकूल बनवण्याकरता शक्य तितके प्रयत्न केले.


    त्याने प्रथम खानास हरप्रयत्ने ससैन्य जावळी खोऱ्यात, प्रतापगडानजीक येण्यास भाग पाडले. लष्करासह त्या प्रदेशात शिरण्याचे प्रलोभन खानास आवडणारेच होते. अनायासे त्या प्रदेशात होणारा शिरकाव व प्रत्यक्ष भेटीचा होणारा लाभ या गोष्टींचा मोह तो कसा काय टाळणार होता ? खान प्रतापगडानजीक येईपर्यंत त्याला कसलाही उपसर्ग पोहोचू नये याची शिवाजीने पुरेपूर काळजी घेतली. याचाच अर्थ असा कि, सावज टप्प्यात येईपर्यंत गप्प राहून वाट पाहण्याची त्याने भूमिका त्याने स्वीकारली. त्याचप्रमाणे अंतस्थरीत्या त्याने आणखी एका डावाची तयारी आरंभली होती ज्याची अफझल वा आदिलशहास बहुधा अजिबात कल्पना नव्हती !    

    शिवाजीच्या विनंतीवरून खान प्रतापगडाकडे निघाला खरा परंतु मार्गातील मोक्याच्या जागा ताब्यात ठेवण्याचा त्याने काही प्रयत्न केल्याचे उल्लेख आढळून येत नाहीत. जर तो जावळी जिंकण्यास आत शिरला होता तर त्याने अशी बेपर्वाई दाखवावी याचं मोठं आश्चर्य वाटते. असो. प्रत्यंतर पुराव्यांअभावी याविषयी अधिक न लिहिणे श्रेयस्कर.


    वकिली बोलाचाली होऊन खान - शिवाजीच्या भेटीचा तपशील, सावधगिरीच्या उपाययोजना कशा प्रकारे ठरल्या याची तपशीलवार चर्चा बऱ्याच शिवचरित्रांत आल्याने त्याची इथे उजळणी करत नाही. मात्र प्रत्यक्ष भेटीच्या आरंभी उभयपक्षी परस्परांना दगा करण्याची इच्छा मनात भरपूर असल्याचे सूचक निर्देश करणारे तपशील मात्र उपलब्ध साधनांत भरपूर प्रमाणात आढळत असल्याचे नमूद करतो.

ससैन्य खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ येताच शिवाजीने चौफेर लष्कराचा पेरा करून ज्या प्रकारे त्याची छावणी वेढून घेतली होती, त्यावरून भेटीचा निकाल काहीही लागला तरी खानाचे सैन्य बुडवण्याचा त्याचा निर्धार यातून स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे खान शक्यतो एकाकी भेटीस कसा येईल याकडेही त्याने विशेष लक्ष पुरवले होते. शेवटी विजापुरी दरबारचा तो मुख्य आधारस्तंभ होता. त्यालाच फोडल्याशिवाय विजापुरी सत्ता नरमणार नाही, याची शिवाजीला पुरेपूर जाणीव होती.


    इकडे खानही काही कमी नव्हता. भेटीचे तपशील, स्थळ निश्चित झाल्यावर प्रत्यक्ष भेटीच्या वेळी छावणीतून बाहेर पडताना त्याने प्रत्येक अटीचा भंग करण्यास आरंभ केला होता. भेटीस जाताना बरोबर जी माणसे सोबत घेण्याची मर्यादा होती, त्यापेक्षा कितीतरी अधिक मनुष्यबळ त्याच्या समवेत होतं. त्यात बंदुकधारी पथकाचाही समावेश होता.


    शिवाजी - खानाच्या या ज्या काही चाल्चाली होत्या, त्या सावधगिरीच्या उपाययोजनाही म्हणता येतील परंतु त्यांचे अंतिम हेतू लक्षात घेता यांना सावधगिरीच्या उपाययोजना म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. भेटीत दगा न व्हावा अशी शिवाजीची इच्छा होती असं क्षणभर जरी गृहीत धरलं तरी या भेटीअंती त्याच्या हाती नक्की काय येणार होतं ? शिवाजीच्या सत्तेचा नाश हाच खान तसेच आदिलशाहीचा मुख्य हेतू, उद्दिष्ट असल्याने या भेटीतून निष्पन्न काहीच होणार नव्हतं. दुसरीकडे खानाने भेटीत दगा न व्हावा असं ठरवून भेटीस येण्याचं मान्य केलं असलं तरी फारतर शिवाजी आदिलशाही मांडलिक बनेल यापलीकडे दुसरं काय पदरी पडणार होतं ? शिवाय या भोसले पिता - पुत्रांचे उद्देश खानास बऱ्यापैकी माहिती होते. परिस्थिती पाहून आज जरी शिवाजीने माघार घेतली तरी पुन्हा आपली पाठ वळताच तो मूळ पदावर येणार नाही याची काय शाश्वती ? शिवाय तेरदळ प्रांती शिवाजीचे हल्ले, कर्नाटकातील शिवाजीचा वाढता प्रभाव व पुणे व आसपासच्या भूप्रदेशावर विस्तारत जाणारी शिवाजीची सत्ता, यांच्यादरम्यान विजापूरची सत्ता आकुंचित होतं कोंडली जाणार होती, हे त्यांस दिसत नव्हते काय ?

 तात्पर्य, भेटीच्या निमित्ताने प्रतिपक्षाचा संहार करण्याची मनीषा उभयपक्षी सारखीच वस्त होती हेच खरे. त्यामुळेच खानाने स्वसंरक्षणार्थ म्हणण्यापेक्षा शिवाजीला पकडून नेण्यासाठी वा संधी साधून प्रतापगडासह शिवाजीचा ताबा घेण्यासाठी बंदुकधारी पथकं सोबत घेतली असंच म्हणावं लागेल. खानाचा पूर्वलौकिक व त्यांस दाखवलेलं आमिष लक्षात घेऊन शिवाजीनेही प्रत्येक पावलावर त्याचे बेत हाणून पाडत त्यांस स्वतःच्या अटींवर भेट घेण्यास भाग पाडले व दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या या भेटीत खानाचा निकाल लावला.


    उभयतांच्या मगरमिठीची वर्णनं विजापुरी व मराठी साधनांत विपुल प्रमाणात असली तरी प्रत्यक्ष भेटीत नेमकं काय झालं याची निश्चित माहिती कशातच आढळून येत नाही. खरोखर खानाने दगा केला कि शिवाजीने प्रथम चाल केली, याचा निकाल करणे शक्य नाही व असा वाद उत्पन्न करणेही योग्य ठरणार नाही. उलट या दोघांची प्रत्यक्ष भेटीपूर्वीची मनोभूमिका व त्यात अंती नियोजित उद्दिष्ट पूर्तीत कोण यशस्वी झाले हे लक्षात घेऊनच या घटनेकडे बघणे योग्य ठरले.  


    खानाचा काटा काढल्यावर शिवाजी गडावर परतला व इशारतीची खुण होताच त्याच्या सरदारांनी खानाच्या छावणीवर हल्ला चढवला. आरंभी बेसावध असलेली खानाची छावणी नंतर सावरून लढू लागली तरी सेनापतीच्या मृत्यूची बातमी व शत्रूचा हल्ला, दोन्ही लागोपाठ आल्याने त्यांच्या नीतीधैर्यावर परिणाम होऊन काही वेळाने शरणागती स्वीकारत त्यांनी आपला बचाव केला.


    प्रतापगडाच्या या युद्धात शिवाजीचा आर्थिक, नैतिक, राजकीय असा लाभ बराच घडून आला. तात्कालिक लाभ म्हटल्यास अफझलचा सारा खजिना, दारुगोळा, युद्धोपयोगी जनावरे त्याच्या ताब्यात आली. खानाचा मृत्यू व शिवाजीची चढती कमान पाहून सिद्दी हिलाल, पांढरे, खराटे आदि सरदार त्याच्या सेवेत दाखल झाले. नैतिक लाभ म्हणजे या घटनेमुळे शत्रू - मित्रांवर त्याचा भयंकर वचक बसला व राजकीय फायदा म्हटल्यास या धक्क्यातून त्याचा मुख्य शत्रू --- आदिलशाह सावरण्याच्या आतच शिवाजीने आपल्या पूर्वनियोजित मोहिमेस आरंभ केला. त्यानुसार खानाच्या वाईच्या तळाचा कब्जा घेऊन त्याची पथके चंदन - वंदन किल्ले काबीज करून खटाव, वडूज, मायणी, मसूर, विसापूर, तासगाव वरून अष्टीच्या पुढे पन्हाळ्यास येऊन धडकली व दि. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी त्यांनी पन्हाळ्याचा ताबा घेतला. अफझलच्या मृत्यूनंतरचा हा दुसरा मोठा आघात होता ! 

                                                           ( क्रमशः )

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

शिवाजी व कुडाळकर सावंतांमधील तहनामा





ले. १ ]                       [ श. १५८० फा. व. ७  
(४११) ]                      [ ता. ५ मार्च १६५९
                     श्री
सन १०६८ फसली                   फेरीस्त नंबर
       
 तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ

प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे.                           कलम १

किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे.       कलम १

स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे.                               कलम १

प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे.                                     कलम १

प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे.                       कलम १

शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "


टीप :- पत्र जसे छापले आहे तसे उतरवण्याचा प्रयत्न केल्याची नोंद घ्यावी.

संदर्भ ग्रंथ :- काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रें यादी वगैरे लेख
संपादक :- गो. स. सरदेसाई, या. मा. काळे व वि. स. वाकस्कर.         

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

प्रकरण ७) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





    प्रस्तुत लेखमालिकेतील प्रकरण ५ मध्ये शहाजी संदर्भात मी पुढील विधान केलं होतं कि, ' दि. १६ मे १६४९ रोजी आदिलशहाने शहाजीची सुटका करत शाही कृपा दर्शवण्यासाठी बंगळूर प्रांताची जहागीर काही स्थळे वजा करून त्याच्या ताब्यात दिल्याचे जेधे शकावली - करीन्यावरून दिसून येते. यावेळी बहुतेक त्याला ' महाराज ' हि पदवी देण्यात आली असावी असा माझा तर्क आहे. कारण या घटनेपूर्वी कोणत्याही सरकारी पत्रात शहाजीच्या नावाआधी महाराज पदवी लावल्याचे दिसून येत नाही. ' परंतु शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड ३ मधील पत्र क्र. २५३६ नुकतेच माझ्या अवलोकनात आले ज्यात महमंद आदिलशहाने शहाजीचा उल्लेख ' महाराज फर्जंद शहाजी भोसले ' असा केलाय. सदर पत्राची तारीख दि. ११ जानेवारी १६४८ असल्याने ते शहाजीच्या अटकेपूर्वीचे असल्याचे स्पष्ट होते. तेव्हा अनवधानाने चुकीची माहिती / विधान केल्याबद्दल मी वाचकांची माफी मागत आहे.

    मागील प्रकरणांत आपण शहाजीच्या कैद - सुटकेची तपशीलवार चर्चा केली. त्यानुसार स. १६५४ पर्यंत तरी शहाजी - शिवाजी या पिता - पुत्रांना इच्छा असूनही विजापूरकरांविरोधात उघड कारवाया करता येत नव्हत्या. परंतु परिस्थिती अनुकूल नसल्यास उद्योगी, कर्तबगार व्यक्ती स्थितीला अनुकूल करतात व या काळातील विविध राजकीय दरबारांतील घडामोडी पाहता, ऐतिहासिक व्यक्तींची कर्मे पाहता या विधानाची सत्यता पटून येते. उदाहरणार्थ, स. १६५३ मध्ये कंदाहार मोहिमेत मार खाल्लेल्या औरंगजेबाची दख्खनच्या सुभ्यावर नेमणुक होणं. मीर जुम्लाचे याच काळात गोवळकोंड्याच्या सेवेतून मुक्त होऊन कर्नाटकात स्वतंत्र सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु होणे. दरबारांतर्गत भांडणे, कौटुंबिक कलह, आजारपण, सीमेवरील शत्रू तसेच सरदारांची बंडखोरी या सर्व कटकटींना तोंड देत महंमद आदिलशहाचे आपले राज्य कायम राखणे इ. गोष्टी त्या त्या व्यक्तीच्या पराक्रमाचे, कर्तबगारीचे द्योतकच आहेत.

    उपरोक्त परिच्छेदात उल्लेखलेल्या प्रत्येक व्यक्तीचा, घटनेचा स्वतंत्र व मनोवेधक इतिहास आहे परंतु विषय मर्यादेस्तव आपणांस त्या चर्चेत खोलवर जाता येत नाही. परंतु उपरोक्त घटना ज्यावेळी घडत होत्या, त्यावेळी शहाजी - शिवाजी हे पिता - पुत्र त्या घटनांचा, घटना घडण्यास कारणीभूत व्यक्तींचा आपापल्या राजकारणाकडे सोयीस्कररित्या कसा उपयोग करून घेत होते, हे पाहणे योग्य ठरेल.

    आदिलशहाने शहाजीवर लाख निर्बंध लादले तरी शहाजीचे अंतस्थ राजकारण काही थांबले नव्हते. शिवाजी - औरंगजेबचा स. १६५७ चा जो काही पत्रव्यवहार उपलब्ध आहे त्यानुसार औरंगजेब दख्खनचा सुभेदार म्हणून नियुक्त झाल्यापासून त्याचा व शिवाजी वा शहाजीशी पत्रव्यवहार सुरु झाल्याचे दिसून येते. कंदाहार मोहिमेतील अपयशामुळे औरंगवर जरी शहाजहानची गैरमर्जी झाली असली व दख्खनमधील त्याची नियुक्ती प्रामुख्याने तेथील सुभ्याचा आर्थिक कारभार सुधारण्यासाठी झाली असली तरी केवळ हाच या नियुक्तीमागील प्रधान हेतू होता असे नाही. शहाजहानच्या मुलांमधील अंतस्थ कलह --- विशेषतः दारा व औरंगजेब, तसेच मोगलांचे दक्षिणेतील राज्यविस्ताराचे धोरण या गोष्टी देखील त्यांस तितक्याच कारणीभूत असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते.

    दख्खनला आल्यावर औरंगने प्रथम येथील महसूल व्यवस्था सुधारणा संबंधात तसेच लष्कराचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने जसे उपाय योजले त्याचप्रमाणे विजापूर, गोवळकोंडा हि राज्ये जिंकण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न चालवले. त्यानुसार उपरोक्त दरबारातील असंतुष्ट सरदारांना फोडणे, बंडखोरांना चिथावणी देणे, इ. प्रकार त्याने आरंभले. मोगलांच्या प्रदेशाला लागूनच शिवाजीची नव्याने उदयास येणारी सत्ता असल्याने औरंगजेबाने थेट शिवाजीशी पत्रव्यवहार केला कि पूर्वसंबंध पाहता शहाजी सोबत अथवा शहाजीने प्रथम औरंगजेबाशी पत्रव्यवहार आरंभला याचा निर्णय करणे पुराव्याअभावी शक्य नसले तरी या पिता - पुत्रांना विजापूर विरोधात चिथावण्याचे औरंगने शक्य तितके प्रयत्न केले यात शंका नाही.
यावेळी मोगलांशी अंतस्थ संधान जोडून शहाजीला नेमकं काय साध्य करून घ्यायचं होतं हे जरी समजायला मार्ग नसला तरी याकाळात शिवाजीही स्वस्थ बसलेला नव्हता. मोगलांच्या चिथावणीमुळे म्हणा वा स्वयंप्रेरणेने, शिवाजीने जावळीच्या मोऱ्यांना उकसवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले होते. उभयतांचा पत्रव्यवहार उत्तरोत्तर अधिकच तिखट होत गेला. यासंबंधी जी माहिती मिळते ती लक्षात घेता मोऱ्यांना डिवचून त्यांना आपल्यावर चालून येण्यास --- अर्थात प्रथम आगळीक करण्यास भाग पाडण्याचा शिवाजीचा डाव होता, असा संशय येतो. कारण शहाजी यावेळपर्यंत पूर्णतः बंधमुक्त झाला नव्हता. परंतु शिवाजीवर उघड चालून येण्याची बुद्धी मोऱ्यांना झाली नाही व स. १६५५ मध्ये शहाजीही विजापूरकरांच्या निर्बंधातून मोकळा झाला तेव्हा शिवाजीने त्वरा करून झपाट्याने जावळी मारली. आपल्या राज्याच्या सीमेवर झालेल्या या घटनेकडे विजापूरकरांना लक्ष देण्यास वा त्यावर उपाययोजना करण्यास वेळ मिळाला नाही. याचं मुख्य कारण म्हणजे महंमद आदिलशहाचं आजारपण व औरंगजेबाची गोवळकोंड्यावरील चढाई !

    औरंगजेबाची तडफ व कामाचा उरक पाहता कंदाहार मोहिमेतून दख्खनला रवाना होतानाच त्याने विजापूर, गोवळकोंडा बुडवण्याची तयारी आरंभली होती कि काय अशी शंका मनात येते. कारण इथली सूत्रे हाती घेताच ज्या त्वरेने त्याने येथील मोगली प्रशासन, लष्कराची स्थिती सुधारली व ज्या तडफेने त्याने प्रथम गोवळकोंडा व नंतर विजापुरावर आक्रमण केले, ते पाहता त्याच्या उद्योगशीलतेचे, पराक्रमाचे कौतुक करावे, थोडेच आहे ! 

    या संदर्भातील उपलब्ध माहिती पाहता स. १६५५ मध्येच औरंगजेब मीर जुम्लाच्या निमित्ताने विजापूर वा गोवळकोंड्यात घुसण्यास आतुर झाला होता. परंतु हे वर्ष मीर जुम्लाच्या धरसोडीने वाया गेले. त्यामुळे औरंगला काही काळ गप्प बसावे लागले इतकेच.
इथे मीर जुम्लाविषयी वाचकांना थोडी माहिती देऊ इच्छितो. मीर जुम्लाचे नाव महंमद सईद. तो पर्शियातील आर्दीस्तानमधल्या एका तेल व्यापाऱ्याचा मुलगा. इतरांप्रमाणेच नशीब आजमावण्यास हिंदुस्थानात आला व अंगच्या गुणांनी प्रथम हिऱ्यांचा व्यापारी व नंतर गोवळकोंड्याच्या बादशहाचा मुख्य सेनापती व प्रधान बनला. मीर जुम्ला हे त्याचे पद असले तरी त्याची राहणी, वर्तन हे बादशहा सारखेच होते व महत्त्वाकांक्षेला पराक्रमाची जोड असल्याने कर्नाटकात कुतुबशाहीचा विस्तार करता करता त्याने स्वतःचे एक प्रबळ सैन्यदल --- ज्यात सुसज्ज तोफखान्याचा समावेश होता --- व सुमारे ३०० मैल लांब व ५० मैल रुंदीचा भूप्रदेश जहागिरीदाखल मिळवला. आपल्या या जहागिरीचे रुपांतर त्याला स्वतंत्र राजसत्तेत करायचे होते व त्यानुषंगाने त्याने प्रयत्नही करून पाहिले. त्यातूनच मोगलांशी त्याचा संबंध येऊन औरंगजेबला गोवळकोंड्यावर चालून जाण्याची सबब प्राप्त झाली. तात्पर्य, जी महत्त्वाकांक्षा महंमद सईद सारखा उपरा मनुष्य इथे येऊन धारण करतो व प्रत्यक्षात आणू पाहतो तर मूळ येथील निवासी असलेल्या शहाजी - शिवाजीने तीच आकांक्षा धरल्यास त्यात गैर ते काय !

    मोगल, विजापूरकर गोवळकोंडा प्रकरणात गुंतल्याचे पाहून शिवाजीने जावळीसह कोकणातील  रायगडापर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला. तसेच ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ३ मधील लेखांक क्र. १८, ७६ वरून असे दिसून येते कि, स. १६५६ च्या अखेरीस शिवाजीने कर्नाटकात धारवाडकडे एक स्वारी पाठवली होती. या मोहिमेत त्याचे सैन्य धारवाडच्या दक्षिणेस असलेल्या मासूर ( म्हैसूर नव्हे ) पर्यंत पोहोचले. परंतु विजापुरी सरदारांनी त्यांचा पराभव केल्याने त्यांना माघार घ्यावी लागली.

    या मोहिमेसंदर्भात अधिक तपशीलवार माहिती मिळत नाही. तसेच या संदर्भात इतिहासकारांनी विविध अनुमाने काढली असली तरी त्यांनी दोन गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. पहिली म्हणजे, स. १६५६ मध्ये पुण्यापासून अगदीच दूर अंतरावर असलेल्या धारवाड - मासूर पर्यंत स्वारी करण्याइतपत शिवाजीकडे लष्करी बळ होते तसेच या मोहिमेला प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष शहाजीचाही पाठिंबा असावा. कारण, मार्गातील विजापुरी सरदार व इतर संस्थानिकांना झोडपत एवढ्या दूरवर सैन्य पाठवणे, स्वबळावर निदान शिवाजीला यावेळी तरी शक्य नव्हते.

    याच अनुषंगाने काही गोष्टींचा उल्लेख येथे करणे योग्य ठरेल. ज्ञात माहितीनुसार स. १६५४ मध्ये शिवाजीच्या मोठ्या भावाचा, संभाजीचा झालेला मृत्यू व स. १६५७ च्या एप्रिलात शिवाजीने तिरूमल रायला दिलेली सनद.

    संभाजीच्या मृत्यूपूर्वी शिवाजीला कर्नाटकातील जहागिरीत शहाजीने काही वाटा दिला होता का ? तसेच संभाजीचा पुणे जहागिरीत काही हक्क होता का ? तिरूमल रायला शिवाजीने दिलेली सनद / रौप्यपट कोणत्या अधिकाराने दिला होता ? शहाजीचा मुलगा म्हणून कि एक स्वतंत्र सत्ताधीश म्हणून ? जर शिवाजी याचवेळेस एक प्रबळ, स्वतंत्र सत्ताधीश म्हणून उदयास आला असेल व कर्नाटक प्रांतातही त्याचा दबदबा निर्माण झाला असेल तसेच राज्यविस्तारही तर उपरोक्त कोड्याची उकल होऊ शकते. परंतु उपलब्ध पुरावे तसे सांगत नाहीत. त्याउलट कर्नाटकात शिवाजीचं बस्तान बसण्यास स. १६७८ साल उगवावं लागल्याचं सर्वमान्य, सर्वज्ञात आहेच. तेव्हा कर्नाटक प्रांतातील शहाजी भोसलेच्या जहागिरीचा एक वारसदार या नात्यानेच शिवाजीने उपरोक्त सनद दिली असावी, असा एक तर्क करता येतो. किंवा विजापुरी चाकरीत राहूनही आपला सवता सुभा स्थापन करण्याचा जो शहाजीचा प्रयत्न चालला होता, त्याचाही हा एक परिणाम असून शकतो. परंतु रौप्यपटातील मजकूर पाहता तिरूमल शहाजीकडे न जाता थेट शिवाजीकडे येतो, याचा काहीतरी वेगळा अर्थ निश्चितच असू शकतो. परंतु प्रत्यंतर पुराव्यांच्या अनुपलब्धतेमुळे अधिक काही लिहिणे शक्य नाही. असो.

    औरंगजेबाची गोवळकोंड्यावरची स्वारी स. १६५५ च्या डिसेंबर अखेर सुरु होऊन स. १६५६ च्या मार्च अखेर संपुष्टात आली. खासा औरंगजेब कर्नाटक भागात उतरल्याने व इतर कारणांमुळे वाईचा मुख्य अधिकार अफझलखानही तिकडेच अडकून पडल्याचे दिसून येते व याच काळात म्हणजे स. १६५६ च्या जानेवारी पासून ते मे पर्यंत शिवाजीने जावळीचे प्रकरण निकाली काढल्याचे दिसून येते. औरंगजेबाची गोवळकोंडा मोहीम समाप्त झाल्यावर विजापूरकरांनी मनात आणलं असतं तरी त्यांना शिवाजीचा बंदोबस्त करणे लगोलग शक्य नव्हते. कारण पावसाळा तोंडावर आला होता व मोहिमेचे दिवस सुरु होत असतानाच त्यांना शिवाजी - औरंगजेबच्या संयुक्त चढाईस तोंड देण्याची वेळ आली.
    

     स. १६५६ च्या ४ नोव्हेंबर रोजी महंमद आदिलशहा मरण पावला व त्याच्या जागी अली हा बादशाही तख्तावर विराजमान झाला. नवा बादशहा अनौरस संतती असल्याच्या व वारस  नियुक्तीकरता मोगल बादशहाची परवानगी न घेतल्याच्या सबबीवर औरंगजेबाने शहाजहानकडून विजापूरवर स्वारी करण्याची परवानगी मिळवली. या काळातील राजकीय घडामोडींचे इतके परस्पर विरोधी वृत्तांत इतिहासकारांनी नमूद केले आहेत तसेच आपापल्या सोयीने उचलून धरले आहेत कि, त्यामुळे घटनाक्रमाची व्यवस्थित संगती जुळवणे अशक्य आहे. उदाहरणार्थ, औरंगजेबाची गोवळकोंडा मोहीम शहाजहानच्याच आज्ञेने अर्धवट सोडण्यात आली असली तरी उपलब्ध माहितीनुसार विजापूरचे प्रकरण सामोचाराने सिद्धीस गेल्यास त्याने फिरून शहजाद्याला --- औरंगला गोवळकोंड्यावर चढाई करण्याची सूचना केली होती.

    या संदर्भात इतकेच नमूद करता येईल कि, दख्खन मध्ये मोगल बादशाहीचा विस्तार करण्याची अनुवांशिक मन्शा शहाजहान तसेच औरंगच्या मनात वसत होती. त्यानुषंगाने पिता - पुत्रांच्या हालचाली सुरु होत्या परंतु त्यासोबत शाही परिवारातील मतभेद, वैमनस्यंही असल्यामुळे त्यांचा हा हेतू निदान याक्षणी तरी सिद्धीस गेला नाही.

    औरंगजेबच्या विजापूर स्वारीची उपलब्ध माहिती पाहता असे दिसून येते कि, दख्खनच्या सुभेदारीवर दाखल होताच त्याचा प्रथम हेतू विजापुरी सत्ता पालथी घालण्याचाच होता व त्यादृष्टीने त्याने तेव्हापासूनच तयारी चालवली होती. प्रतिपक्षाच्या शत्रूंना, असंतुष्ट सरदारांना चिथावणी देणे वगैरे प्रकार आधीच सुरु झाले होते. त्यांस यावेळी विशेष बळ लाभले इतकेच. मात्र शहजाद्याची इच्छा काहीही असली तरी येथील शिवाजी सारखे संस्थानिक तसेच शहाजी सारखे असंतुष्ट सरदारही काही कमी धूर्त नव्हते. सत्तेच्या राजकारणात ते औरंगजेबाइतकेच तुल्यबळ असून दख्खनचा सत्तासमतोल कशा प्रकारे राहिल्यास आपला निभाव लागेल याची त्यांस पूर्ण जाणीव होती. यांमुळेच महंमद आदिलशहा मरण पावताच मोगली आक्रमणाचा झपाटा सुरु झाला व आरंभी अपयश येत गेले तरी विजापूरकरांनी आपला चिवट प्रतिकार अजिबात थांबवला नाही. दरम्यान याच काळात उत्तरेत शहाजहान आजारी पडून मोगलांचे अंर्तगत राजकारण व गृहकलह उफाळून आल्याने त्यांचा बचाव झाला.

    या स्थळी आपणांस शिवाजीचे राजकीय धोरण प्रामुख्याने समजावून घ्यायचे आहे. पण तत्पूर्वी विजापूर स्वारीमागे मोगलांचे हेतू काय होते हे प्रथम अभ्यासणे योग्य ठरेल. विजापूरवरील चढाईमागे मोगलांचे कमाल उद्दिष्ट ते राज्य पूर्णतः नष्ट करणे हे असून किमान उद्दिष्ट स. १६३६ च्या तहान्वये निजामशाहीचा जो प्रदेश विजापूरकरांना मिळाला होता तो परत मिळवून घेणे हे होते. जर स. १६३६ च्या तहान्वये विजापूरला मिळालेला भूप्रदेश जिंकून घेतला गेला तर विजापूरचे राज्य कायम ठेवण्याच्या अटीवर दीड कोट खंडणी व मोगलांचे मांडलिकत्व मान्य करण्याची तयारी दर्शवल्यास औरंगने गोवळकोंडा जिंकून घेण्यासाठी मोहीम काढावी अशी शहाजहानची आज्ञा होती. निव्वळ लष्करी बळाचा विचार करता औरंगजेबाकडे समस्त विजापुरी राज्य नष्ट करण्याइतपत सैन्यदल कधीच नव्हतं. परंतु अशाच समयी राजकारणी व्यक्तीचा कस लागत असतो. कोणत्याही सत्तेचं बळ तिच्या लष्करी सामर्थ्यात असते व तेच बळ खच्ची करण्याच्या प्रयत्नास तो लागला. विजापूरवरील चढाई संदर्भात त्याने शहाजीसोबत काय बोलणी केली हे कळण्यास मार्ग नसला तरी शिवाजीसोबत त्याचा जो काही पत्रव्यवहार झाला व आज जो उपलब्ध आहे, त्यावरून त्याच्या धोरणांचा काहीसा अंदाज करता येतो. या संदर्भात जदुनाथ सरकार लिखित व डॉ. भ. ग. कुंटे अनुवादित ' औरंगजेबाचा इतिहास ' या ग्रंथातील पृ. क्र. १६० ते १६३ वर छापलेली पत्रे विशेष अभ्यासनीय आहेत.

    त्यानुसार स्पष्ट होणाऱ्या बाबी अशा :- (१) स. १६५६ पासून मीर जुम्लाच्या मार्फत औरंगजेब शहाजीच्या निमित्ताने विजापुरी राजकारणात हस्तक्षेप करून ते राज्य पालथं घालण्यासाठी धडपडत होता. याप्रकरणी त्याचा व शहाजीचा पत्रव्यवहार सुरु असला तरी शहाजीच्या मागण्यांची पुरेशी स्पष्टता होत नाही. (२) याच काळात औरंगचा शिवाजीशीही पत्रव्यवहार सुरु असावा किंवा शहाजी - शिवाजी एकविचाराने वर्तत असून शिवाजी शहाजीच्याच तंत्राने मोगलांशी आपला व्यवहार उलगडत असावा असा तर्क करता येतो.

    यासंदर्भात स. १६५७ मधील शिवाजी - औरंगजेब दरम्यानचा पत्रव्यवहार अधिक उपयुक्त ठरतो. त्यानुसार :- (१) शिवाजीने आजवर जो काही आदिलशाही भूप्रदेश, किल्ले ताब्यात घेतले होते व जे तो घेऊ पाहत होता त्यासही मोगलांनी मान्यता द्यावी अशी शिवाजीची इच्छा होती. शिवाजीच्या या दोन्ही अटींना औरंगने सशर्त मान्यता दिली खरी परंतु त्याच्या अटी व त्यावरील शिवाजीची लेखी प्रतिक्रिया काय होती, हे समजायला सध्या माझ्याकडे पुरेशी साधनं नाहीत. मात्र औरंग - शिवाजी दरम्यान जी काही बोलाचाली झाली ती औरंगने शहाजीसही कळवल्याचे त्याच्याच एका पत्रात नमूद आहे. परंतु त्यासंदर्भात शहाजीचे म्हणणे काय होते, हेही समजायला सध्या माझ्याकडे साधनं नाहीत. (२) औरंगजेबाशी सलोख्याची बोलणी करत असतानाच शिवाजीने मोगल अंमलाखालील प्रदेशात चढाई आरंभली. यावेळी औरंगजेबाने बेदरचा किल्ला जिंकून कल्याणीला वेढा घातला होता. रणांगणावर विजापुरी सैन्याला मोगलांवर विजय प्राप्त होत नव्हता. अशा स्थितीत शिवाजीने मोगलांची मैत्री तोडून अप्रत्यक्षरीत्या विजापूरकरांचा बचाव केल्याचे इतिहासकारांचे मत आहे. परंतु याच संदर्भात मला थोडं अधिक स्पष्टीकरण करायचं आहे.

    विजापुरी सत्ता कायम राहावी हे स. १६५७ - ५८ मध्ये शिवाजी किंवा शहाजीचं मत होतं, नव्हतं यावर मर्यादित साधनांच्या आधारे वाद घालत बसण्यापेक्षा मोगल - आदिल झगड्यात शिवाजीने आपल्या पदरी नेमकं काय पाडून घेतलं हे पाहणं आवश्यक ठरेल. याकरता प्रथम आपण शिवाजीच्या या काळातील प्रमुख हालचालींच्या नोंदी पाहू.

दि. १५ जानेवारी १६५६ :- जावळीचे खोरे काबीज.
एप्रिल - मे १६५६ :- रायगड घेतला.  
ऑगस्ट - सप्टेंबर १६५६ :- चंद्रराव मोरेला ठार केले.
दि. ४ नोव्हेंबर १६५६ :- महंमद आदिलशहा मृत.
स. १६५६ नोव्हेंबर ते स. १६५७ जानेवारी :- शिवाजीचे सैन्य धारवाडच्या दक्षिणेस मासूरपर्यंत.
स. १६५७ एप्रिल अखेर :- अहमदनगर, जुन्नर, चांभारगोंदे या मोगली प्रदेशावर शिवाजीचे आक्रमण.
दि. ३१ जुलै १६५७ :- दंडाराजपुरी काबीज.
दि. २४ ऑक्टोबर १६५७ :- कल्याण - भिवंडी जिंकले.
दि. ९ जानेवारी १६५८ :- कोकणातील माहुली किल्ला घेतला.
दि. ५ फेब्रुवारी १६५८ :- कांगोरी, तुंग, तिकोना, भोरप इ. किल्ले जिंकले.

आता याच काळातील औरंगजेबाच्या हालचालींची नोंद पाहू.
दि. ४ नोव्हेंबर १६५६ :- महंमद आदिलशहा मृत.
दि. २६ नोव्हेंबर १६५६ :- औरंगजेबला विजापुरावर स्वारी करण्यासाठी शहाजहानची परवानगी मिळाली.
दि. १८ जानेवारी १६५७ :- मीर जुम्ला उत्तरेतून औरंगच्या मदतीकरता औरंगाबादला येऊन दाखल झाला व त्याच दिवशी औरंगने मोहिमेसाठी प्रस्थान ठेवले.
दि. २ मार्च १६५७ :- औरंगने बेदरला वेढा घालून याच महिन्याच्या अखेरीस किल्ला जिंकून घेतला.
स. १६५७ एप्रिल ते दि. १ ऑगस्ट १६५६ :- औरंगचा कल्याणीला वेढा व विजय.

    कल्याणीच्या पाडावानंतर विजापूरकरांचा धीर खचून त्यांनी तहाची वाटाघाट आरंभली. याच समयी त्यांचे दिल्ली दरबारातील वकीलही याकरता प्रयत्नशील होते व विजापूरवरील औरंगच्या चढाईने त्याचं पारडं जड होण्याची शक्यता लक्षात घेत दारा शुकोहने विजापूरकरांतर्फे शहाजहानकडे मध्यस्थी केली. तेव्हा आदिलशहाने कल्याणी, बेदर, परिंडा हे किल्ले व त्या अंमलाखालील भूप्रदेश मोगलांना देणे तसेच युद्धखर्च म्हणून एक कोटी रुपये देण्याच्या शर्तीवर तह करण्याची शहाजहानने औरंगला आज्ञा केली. या धक्क्यातून औरंग सावरतो न सावरतो तोच दि. ६ सप्टेंबर १६५७ रोजी शहाजहान आजारी पडला व दाराच्या अतिसावधगिरीच्या वर्तनामुळे संपूर्ण साम्राज्यात शहाजहानच्या मृत्यूची वार्ता पसरून राजकारणाचे सर्व रंग, संदर्भ बदलून गेले. त्यामुळे विजापूरकरांशी तहाची वाटाघाट करत औरंगने दि. ४ ऑक्टोबर १६५७ पासून कल्याणीमधून माघार घेण्यास आरंभ केला.

    या पार्श्वभूमीवर शिवाजी - औरंगजेब यांच्या राजकारणाचे बदलणारे संदर्भ पाहू. स. १६५६ च्या अखेरीस औरंगची नियोजित विजापूर मोहीम सुरु होण्यापूर्वीच शिवाजीचे आदिलशाहीवर आक्रमण सुरु झाले होते. त्यानंतर स. १६५७ च्या एप्रिलपर्यंत त्याचे मोगलांशी मैत्रीचेच संबंध होते. या काळात म्हणजे -- दि. २३ एप्रिल १६५७ रोजीच्या पत्रात शिवाजीच्या मागण्यांवर मोगल बादशाहीचा प्रतिनिधी म्हणून औरंगने दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे :- " ... सांप्रत जे किल्ले व मुलूख विजापुराकडील तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्याजखालील मुलूख तुम्हांस दिला असे. ऐशियास इकडील दौलतीची किफायत मदत जी करणे असेल तिचा समय हाच आहे. जाणोन करण्यात आणावे. आणि हुजूर भेटीस यावे. याखेरीज जे मतलब तुमचे मनात असतील ते सर्व घडोन येतील. हाली तुमचे वकील यांस परत जाण्याची जलदी होती, सबब निरोप दिल्हा आहे. ... "

( संदर्भ ग्रंथ :- जदुनाथ सरकार लिखित व डॉ. भ. ग. कुंटे अनुवादित औरंगजेबाचा इतिहास )

याच सुमाराचे औरंगने आपल्या अधिकाऱ्यास लिहिलेलं पत्र खालीलप्रमाणे :-

फरुकीकृत औरंगजेब चरित्र पृ. ३५४ {(२६१६ )  { श. १५७९ वैशाख
आदबमधील उतारा.             {         { इ. १६५७ एप्रिल
औरंगजेब -- ( मोगल अधिकारी ).
शाहूच्या मुलाने ( शिवाजीने ) या दरबारकडे एका वकीलामार्फत असे विनंतीपत्र पाठविले आहे की, " विजापूरकरांच्या मुलखा पैकी जो प्रांत माझ्या ताब्यांत आहे तो मजकडे ठेऊन मला जर मनसब देण्यांत येईल तर राजनिष्ठा व आज्ञाधारकत्व यास अनुसरून तो प्रांत मी बादशाही राज्यांस देईन. " या पत्रास मी जे उत्तर पाठविले आहे त्यांत काही अटी लिहिल्या आहेत व शाहूसहि ( = शहाजीस ) याविषयी कळविले आहे. ( शिवाजीकडून ) उत्तर आले म्हणजे मी तुम्हांस कळवीन. त्याने माझ्या हुकमातील अटी मान्य केल्या तर ठीक आहे. नाहीतर आमची सैन्ये त्याला तुडवून टाकतील( trample him ).

( संदर्भ ग्रंथ :- शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड ३ )  

    पैकी दुसऱ्या पत्राच्या लेखनाची नेमकी तारीख उपलब्ध नाही परंतु दि. २३ एप्रिल १६५७ च्या पत्रानंतर शिवाजीने याच महिन्याच्या अखेरीस मोगली प्रदेशावर चढाई आरंभली. याम्गे त्याचा विजापूरच्या बचावाचा हेतू असला तरी तो दुय्यम वा तिय्यमच गणावा लागेल. कारण, आजवर त्याने जो काही भूप्रदेश जिंकून घेतला होता त्यांस एका सार्वभौम सत्तेची मान्यता व्यवहारात अत्यंत आवश्यक होती. जी औरंगजेबाच्या पत्रान्वये मिळाली. दुसरे असे कि, मोगली मदतीचे निमित्त करत शिवाजी त्याच्या नवराज्यविस्ताराकरता सलग भूप्रदेश, किल्ले ज्याप्रमाणे जिंकून घेत होता, त्याचप्रमाणे निजामशाहीच्या उभारणीकरता शहाजीने जो भूभाग, किल्ले ताब्यात घेतले होते त्यांनाही जिंकून घेण्याचा सपाटा लावला होता व यासही मोगलांची मान्यता मिळावी अशी त्याची इच्छा असून औरंगनेही त्यांस अंशतः मान्यता दिली होती हे त्याच्या दि. २३ एप्रिलच्या पत्रांतील " सांप्रत जे किल्ले व मुलूख विजापुराकडील तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन " या ओळींवरून स्पष्ट होते. परंतु याच सुमाराचे त्याने आपल्या अधिकाऱ्यास लिहिलेल्या पत्राचा विचार केला असता असे दिसून येते कि, औरंगने शिवाजीच्या मागण्यांना सशर्त संमती दिली होती. परंतु त्या शर्तींची स्पष्टता मात्र या दोन्ही पत्रांत होत नाही. असो.

    एप्रिल अखेर शिवाजीने मोगली प्रदेशात चढाई आरंभताच औरंगजेबानेही त्याच्याविरोधात कारवाई आरंभली. परंतु उभयतांचा संघर्ष जास्त काळ चालला नाही. कारण पावसाळाही लगेच सुरु झाला व विजापूरकरांनीही मोगलांशी समझोत्याचे प्रयत्न आरंभले. अशातच शहाजहान आजारी पडल्याची वा मृत झाल्याची वार्ता पसरली. याचा फायदा उचलण्याचा पुरेपूर प्रयत्न शिवाजी तसेच विजापूरकरांनी केला. या दोघांना आवरण्याची निरर्थक, केविलवाणी धडपड करण्यापलीकडे औरंगजेब काही करू शकला नाही.
उदाहरणार्थ, वारसा युद्धांत सहभागी होण्याचा निर्णय घेत त्याने आपली पिछाडी तसेच भविष्यात आश्रयाची जागा रहावी या उद्देशांनी आदिल व कुतुबशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न केला. कुतुबला थकीत खंडणीचा भरणा करण्याबद्दल ताकीदपत्रे रवाना केली तर त्या दरबारातील मोगल वकिलास सबुरीचे धोरण स्वीकारण्याची सूचना केली. यामागील मुख्य कारण म्हणजे कुतुबचा नेभळटपणा ! 
परंतु आदिलशाही बाबत मात्र त्यांस नरमाई बाळगावी लागली. मयत महंमद शहाच्या पत्नीला -- बडी बेगमची मर्जी राखण्यासाठी गोडीची पत्रे, भेटवस्तू रवाना करण्यात येऊन आदिलशहाला राजी राखण्यासाठी त्याने आपल्या अधिकारात असा प्रस्ताव मांडला कि, " तुम्ही आमच्याशी एकनिष्ठ रहावे आणि आपली वचने पाळावी. मी असे कबूल करतो की - (१) परेंड्याचा किल्ला आणि किल्ल्याच्या बंदोबस्ताखालील प्रदेश, कोकण साम्राज्याला पूर्वी जोडण्यात आलेला वांगीचा महाल आणि त्याशिवाय मरहूम आदिलशहाला तोडून देण्यात आलेला कर्नाटकचा भाग पूर्वीप्रमाणेच तुमच्याकडे राहू देऊ आणि (२) तुम्ही तहात वचन दिल्याप्रमाणे तुम्हाकडून येणाऱ्या १ कोटीच्या युद्धखर्चापैकी तीस लाख रुपये तुम्हाला माफ करू. ह्या प्रदेशाचे संरक्षण करा, त्याचा राज्यकारभार सुधारा, या प्रदेशातील काही किल्ल्यांचा ताबा चोरून शिवाजीने घेतलेला आहे, त्याची हकालपट्टी करा. माझ्याकडे तुम्ही कमीतकमी १०,००० घोडदळाची रवानगी करा. तुम्हाला बाणगंगेच्या काठापर्यंतचा असलेला सर्व प्रदेश मी तोडून देईन. " 

    याच काळात शिवाजीने एक सावधगिरीचा उपाय व भविष्याची तरतूद म्हणून औरंगजेबला खुश करण्यासाठी वकीलासोबत पत्र पाठवले. त्यांस उत्तर देताना दि. २४ फेब्रुवारी १६५८ रोजी औरंग लिहितो कि, " .... तुमची अर्जदास्त कृष्णाजी भास्कर पंडित याचे पत्रासुद्धा रघुनाथपंत वकील यांबरोबर पाठवून ( दिलेली पाहून ) मजकूर ध्यानास आला. यद्यपि तुमच्या पेशजीच्या गोष्टी विसरावया जोग्या नाहीत, तथापि तुम्ही आपले कृतकृत्यांचा पश्चाताप केला आणि हा दरबार उपेक्षेचा नाही जाणोन, वडिलांचे लक्ष निभ्रंत इकडे आहे असे समजोन, तुमचे पूर्व कृत्य मनात आणीत नाही. याविषयीचा संतोष मानून, इकडील दौलतीविषयी कोशिष करीत जावी. आपले वतनी महाल, किल्ले व कोकण देशसुद्धा नगरवाले खेरीज विजापूरकर आदिलखानाचे इलाख्यात जे आहेत ते त्यांजकडून मुलूख हस्तगत झाल्यानंतर बंदोबस्त होण्याविषयी वचन असावे, म्हणजे सोनोपंत यांस हुजूर पाठवितो आणि इकडील लक्षात वागून सरकारी मुलुखाची सरहद्द रक्षण करून कामदारांशी षरीक होतो की ज्यायोगे बंड वगैरे बखेडे न होवोत, म्हणोन लिहिले. त्यास तुम्ही लिहिल्या अन्वये वर्तून हा फर्मान पाहताच आपले मजकुराची अर्जी लेहून सोनोपंतांबरोबर पाठवून देणे. म्हणजे त्याप्रमाणे केले जाईल. जाणोन लक्षात वागोन आमचे लोभाची पूर्णता समजावी. छ १ माहे जमादिलाखर सन १०६८ हिजरी. "

( संदर्भ ग्रंथ :- जदुनाथ सरकार लिखित व डॉ. भ. ग. कुंटे अनुवादित औरंगजेबाचा इतिहास )   

    या दोन पत्रांतील मजकूर अभ्यासनीय आहे. औरंगने विजापूर - शिवाजी युती तोडण्यासाठी व त्यांच्यात भांडणं जुंपावीत व मोगली प्रदेशास त्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून वरील आश्वासनांची उभयपक्षी खैरात केली. आदिलला पाठवलेल्या पत्रान्वये त्याने कोकणचा मुलूख विजापूरकरांना देऊ करत त्या भागात हातपाय पसरु लागलेल्या शिवाजीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. वास्तविक औरंगला असं आश्वासन देण्याचा वा अंतस्थ तह करण्याचा काहीच अधिकार उरला नव्हता. कारण तोपर्यंत शहाजहान आजारी वा मृत झाल्याबद्दल साशंकता असून सुजा व मुरादने स्वतःला बादशाही पदाचे दावेदार तथा बादशाह म्हणून घोषित केले होते तर दारा शुकोहने शहाजहानच्या प्रकृतीविषयी वर्तमान जाहीर न करता व बादशाही पद धारण न करता अधिकार हाती ठेवून भावांच्या बंदोबस्ताचे प्रयत्न चालवले होते. अशा स्थितीत औरंगची वचनं, आश्वासनं म्हणजे वारसा युद्धांत उतरणाऱ्या शहजाद्याचे शब्द होते --- जर औरंग हे वारसा युद्ध जिंकला तरच त्यांस किंमत अन्यथा काहीच नाही. कारण जहांगीरच्या जमान्यापासून मोगली वारसा युद्धाचे एक समीकरणच बनून गेले होते. बादशहा होणाऱ्याने इतर दावेदारांची कत्तल उडवणे. त्यामुळे या खाटिकखान्यातून कोणता शहजादा सलामत बाहेर येऊन बादशाह बनेल याविषयी अनिश्चितताच होती. अशा स्थितीत औरंगच्या वचनांची, आश्वासनांची किंमत ती काय ! परंतु यदाकदाचित औरंग जिंकलाच तर हीच वचनं, आश्वसनं उपयुक्त ठरण्याचीही शक्यता होती. सारांश, राजकारणाचे एक नाही अनेक संदर्भ असतात व त्यात निर्णायक, स्थिर असे काहीच नसते. औरंगच्या कृत्याचा परिणाम इतकाच झाला कि, विजापूरकरांनी मोगली प्रदेशावर चढाई न करता शहजाद्याने दिलेला भूप्रदेश काबीज करण्यासाठी शिवाजीवर चढाई करण्याचे धोरण आखले. ज्यातून पुढे अफझलखानाची स्वारी उद्भवली. असो.     

    औरंग बादशहा बनल्यावर शिवाजीने आपला वकील त्याच्या दरबारी अभिनंदनपर संदेश घेऊन रवाना केला असता प्रत्युत्तरादाखल औरंगने दि. १४ जुलै १६५९ रोजी पुढील पत्र पाठवले :-
" सह्हल वसलसमकालीन व बरोबरीच्या लोकांत श्रेष्ठ, उमराव मंडळात अग्रेसर, कृपेस पात्र, इस्लामचा आज्ञांकित, बादशहाचा कृपाकांषी, शिवाजी याने जाणावे की, सर्वात श्रेष्ठ व अतुल असा जो सर्वशक्तीमान परमेश्वर त्याने सत्कृत्ये व दानशूरता यांचा प्रसार करण्याकरीता, न्यायाचा स्तंभ उभारण्याकरीता व जुलुमाचा पाया खणून काढण्याकरीता आमच्या राज्याची ध्वजा विजयाच्या अवतंसाने सुशोभित करून शनीच्या कळसास पोहोचविली ; व आमचे करवी सामर्थ्यवान शत्रूंचे व ज्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचे वेड शिरले होते व जुलुमाचे वारे भणाणत होते असे जे धर्माचे व राज्याचे द्वेष्टे त्यांचे निर्दालन केले. आपल्या पूर्वीच्या मेहरबानीस अनुसरून आम्ही शुभ रमजानच्या २४ व्या तारखेस आदितवारी ( ५ जून १६५९ ) खलीफाच्या सिंहासनाला आपल्या बसण्याने अलंकृत केले व सुखाचे दरवाजे सर्वास खुले केले. तुम्ही या सुखसमयी आपल्या नोकराबरोबर अर्जदास्ती पाठविली ती खलीफाच्या सिंहासनाच्या पायथ्याशी उभे राहणाऱ्या आमच्या नोकराचे द्वारा आमच्या पवित्र व उच्च नजरेखालून जाऊन त्यातील आशय जगाला सुशोभित करणाऱ्या आमच्या मनाला विदीत जाला. गगनाचा भेद करणाऱ्या आमच्या या दरबारच्या उंबरठ्यावर राजनिष्ठा व सेवा याही निश्चयपूर्वक पायरव करून श्रेष्ठ अशा या राज्याच्या आधारस्तंभ, विश्वासपात्र, ईश्वराचे भजन करणरा, सुखाची चिन्हे असणारा असा सरदारश्रेष्ठ उमदतुल्मुलुक ज्यास दक्षिणेची सुभेदारी देण्यात आली आहे व ज्याला पूर्णाधिकार देण्यात आल्यामुळे जो उच्चपदाला पोहोचला आहे त्याच्या मर्जीनुरूप तो मला सला देईल. त्याप्रमाणे तुम्ही काम करावे. आमच्या कृपाछत्राखाली असणार्यात्या अंमलदाराच्या सल्ल्याबाहेर तुम्ही वागू नये. जी जी कामे तुमचेकडे येतील त्यांचा तुम्ही उत्तमरितीने फडशा पाडावा आणि अर्जाचा निकाल करण्यात न्यायाचे परिपालन करावे. अदृश्य सृष्टीचे पूर्णत्वाने अवलोकन करणाऱ्या आमच्या अंतःकरणापुढे जी जी कामे आम्ही ठेविली होती ती ती चांगल्याप्रकारे पार पाडून राज्याची इमारत भरभक्कम उभारली गेली. ईशकृपेने व नशिबाने आमच्या अभागी शत्रूस केल्या कर्माचे फळ मिळाले व ते मुलांबाळांसह भक्करच्या सरहद्दीवर पकडले गेले. कृतघ्न सुजाची पाळमुळे लवकरच खणली जातील. आमची अतिश्रेष्ठ अशी मेहेरबानी तुमचेवर आहे, असे जाणून योग्य ती नोकरी बजावून आमच्या वांछा धरून असावे. तुमचा दर्जा वाढविण्याकरीता तुम्हास पोशाख पाठविला आहे. ता. ४ जिल्काद सन १०६९ हिजरी ( २४ जुलै १६५९ ) "            
( संदर्भ ग्रंथ :- जदुनाथ सरकार लिखित व डॉ. भ. ग. कुंटे अनुवादित औरंगजेबाचा इतिहास )

शिवाजी व औरंगजेब जशास तसे होते असं म्हटलं जातं ते उगीच नाही !      
                                         ( क्रमशः )