बुधवार, ३१ जुलै, २०१३

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस ( भाग - ५ )

               

                 सवाई माधवराव मरण पावला त्यावेळी दौलतराव शिंदे यावेळी सुमारे १५ - १६ वर्षांचा असल्याने त्याचा कारभार बाळोबातात्या व जिवबादादा लाड हे दोघे पाहत होते. महादजीचे हे विश्वासू सरदार आणि सल्लागार असून शिंद्यांच्या सरदाराकीचे रक्षण करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. महादजी हयात असताना नानाने कित्येक प्रसंगी शिंद्यांचा घात करण्यासाठी केलेले प्रयत्न हे दोघे विसरले नव्हते. तसेच लाखेरीचा प्रसंग तर अजून ताजाच होता. त्यामुळे नानाच्या प्रत्येक मसलतीकडे ते काहीशा साशंक नजरेनेच बघत. दत्तकाच्या योजनेस त्यांचा आरंभी पाठिंबा होता पण शिंद्यांच्या कारभाऱ्यांची मनःस्थिती बाजीरावास माहित असल्याने त्याने बाळोबातात्या, लखबादादा, जिवबादादा प्रभूती शिंद्यांच्या सरदारांशी गुप्त करार करून असे ठरवले कि, शिंद्यांनी बाजीरावास पेशवेपदी बसवावे. बदल्यात बाजीरावाने शिंद्यांना एक कोट रुपये रोख व २५ लाखांची जहागीर देण्याचे मान्य केले. हा करार होताच शिंद्यांच्या कारभाऱ्यांनी नानाच्या दत्तक योजनेस विरोध करण्यास आरंभ केला. बाजीराव - शिंद्यांच्या गुप्त कराराची नानास अजिबात कल्पना नव्हती. परंतु लवकरच त्यास निजामाकडून या बनावाची बातमी कळली आणि त्यासोबत निजामाने नानास निरोप पाठवला की, प्रसंगी आम्ही तुमची कुमक करू.  बस्स … ! नानाने मग त्यास प्रसंग पडताच पंधरा हजार कवायती पायदळ व पंधरा हजार फौज पाठवण्याची सूचना केली. 
                  सवाई माधवराव पेशव्याच्या मृत्युनंतर पुणे दरबारात इतके गोंधळाचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले कि, दिल्लीचा मोगल दरबार आणि पुण्याचा पेशवे दरबार यांत काडी इतकाही फरक नसल्याचे दिसून येते. घटकेत एक कारस्थान रचावे आणि दुसऱ्या घटकेत दुसरे ! एका योजनेस सर्वांनी मान्यता देऊन त्यासाठी शपथक्रिया करायची आणि काही तासांनीच पहिल्या योजनेतील नाराज इसमांनी नवी योजना करून आधीची शपथक्रिया मोडून टाकावी. सारांश, दुसरा बाजीराव सत्तेवर आल्यावर नाना फडणीसचा मृत्यू होईपर्यंत हि कट - कारस्थाने सारखी चालूच राहिली. नाना हयात असेपर्यंत बाजीरावास स्वस्थता लाभली नाही तर बाजीराव गादीवर असेपर्यंत नानास आपल्या जीविताची शाश्वती वाटत नव्हती. असो, नानाच्या राजकीय कारकिर्दीतील आणि आयुष्याच्या अखेरील भागाचा आढवा या लेखात घेऊन हि लेखमालिका पूर्ण करतो.  सवाई माधवरावाचा मृत्यू झाला त्यावेळी रघुनाथराव पेशव्याची ३ मुले हयात होती. पैकी थोरला अमृतराव हा दत्तकपुत्र असून यावेळी तो वयाने प्रौढ होता. परंतु तो दत्तक असल्या कारणाने त्यास पेशवेपदावर स्थापने शक्य नव्हते. दुसरा बाजीराव हा यावेळी १९ - २० वर्षांचा असून तिसरा चिमाजीआपा सुमारे १२ वर्षांचा होता. पेशवेपदासाठी बाजीराव व चिमाजी या दोघांचीच नावे यावेळी पुढे आली. रघुनाथरावाचा वंश पेशवेपदी येणे नानास नको होते. परंतु, दत्तकाच्या योजनेस सरदार व मुत्सद्दी मंडळ राजी नसल्याने नानाचा नाइलाज झाला. मात्र, हार मानेल तो नाना कसला ? त्याने सारासार विचार करून रघुनाथपुत्र चिमाजीस सवाई माधवराव पेशव्याची पत्नी यशोदाबाईस दत्तक देण्याची मसलत मांडली. यामागील कारणे अशी :- (१) बाजीराव २० वर्षांचा असल्याने व कळत्या वयात तो नानाच्या कैदेत पडल्याने त्याच्या मनात नाना विषयी अढी निर्माण झाली होती. (२) बाजीराव दत्तक म्हणून गादीवर बसणार नाही याची नानाला पूर्ण खात्री होती. (३) सज्ञान बाजीरावापेक्षा अज्ञ चिमाजीस यशोदाबाईस दत्तक देऊन त्याच्या वतीने पेशवाईचा कारभार पूर्ववत प्रमाणे आपल्या हाती घेणे नानास शक्य होते. नानाच्या या योजनेस आरंभी सर्व सरदार व मुत्सद्द्यांनी संमती दर्शवली पण बाजीरावास याची कुणकुण लागताच त्याने पुणे दरबारातील आपल्या वडिलांच्या पक्षातील मंडळींना चिथावणी देऊन नानाच्या या योजनेस विरोध करण्यास प्रवृत्त केले. वस्तुतः शास्त्रानुसार देखील नानाची मसलत योग्य नव्हती. कारण, नात्याने चिमाजी हा सवाई माधवरावाचा चुलता असल्याने यशोदाबाईचा सासरा लागत होता व सुनेच्या मांडीवर सासऱ्यास दत्तक देणे कोणत्या धर्मशास्त्रात बसते ? नानाच्या या दत्तक योजनेस एक परशुरामभाऊ अपवाद केल्यास इतरांनी हळूहळू विरोध करण्यास आरंभ केला.
                            यावेळी अमृतराव, बाजीराव व चिमाजी जुन्नरला होते. शिंदे अजून पुण्याहून दूर होते. अशा परिस्थितीत रघुनाथरावाच्या तिन्ही मुलांना किंवा चिमाजीला ताब्यात घेऊन त्यास यशोदाबाईस दत्तक देण्याचे नानाने ठरवले व तातडीने त्याने परशुरामभाऊस जुन्नरला पाठवले. जुन्नरला भाऊ गेला तेव्हा बाजीरावाने त्याची भेट घेतली. भाऊने चिमाजीस आपल्या सोबत पाठवण्याची विनंती केली असता बाजीरावाने ती धुडकावून लावली व पेशवेपदी आपणच बसणार असल्याचे जाहीर केले. बाजीरावाच्या दट्ट्यापुढे भाऊचा नाईलाज झाला. त्यातही त्याने बळाने चिमाजीचा ताबा घेतला असता पण याच वेळी शिंद्यांचा सरदार रामजी पाटील जुन्नरजवळ आल्याने भाऊला सबुरीचे धोरण स्वीकारावे लागले. दरम्यान जिवबादादा बक्षीचा मृत्यू झाल्याने दौलतरावास पुण्याला तातडीने निघून येणे शक्य नसल्याचे लक्षात येताच बाजीरावाने आपला पहिला पवित्रा साफ बदलून भाऊचे पाय धरून आपणांस गादीवर बसवण्याची विनंती केली. तेव्हा भाऊने बाजीरावासह चिमाजीआपास ता. ३ मार्च १७९६ रोजी पुण्याजवळ खडकी येथे आणले. तेथे नाना - बाजीराव यांची भेट होऊन दोघांनी मागील प्रकार विसरून परस्परांशी निष्कृत्रीम वर्तन ठेवण्याचे मान्य केले. दरम्यान बाजीराव नानाच्या मदतीने पेशवा बनणार याचा अर्थ आपणांस रोख रक्कम व जहागीर मिळणार नाही हे बाळोबास समजले. तेव्हा तो शिंद्यांची सेना घेऊन तातडीने पुण्यास येऊ लागला. नानाला पुढील संकटाची चाहूल लागली. बाजीरावाचे मन आपल्याविषयी साफ नसल्याचे त्यास माहिती होतेच. तेव्हा त्याने आपल्या पक्षातील मंडळींना सर्व परिवारासह पुणे सोडण्याची सूचना केली आणि स्वतःच्या कुटुंबाची रायगडी रवानगी करून तो साताऱ्यास निघून गेला. यावेळी नानासोबत फक्त पाच - सात हजारांची फौज होती. साताऱ्यास जाण्याचा निर्णय नानाने मोठा विचारपूर्वक घेतला होता. पेशवेपद मिळवण्यासाठी कितीही उमेदवार उभे राहिले तरी जोपर्यंत छत्रपती आपल्या ताब्यात आहेत तोपर्यंत पेशवेपदाची वस्त्रे कोणालाही मिळणार नाहीत हे नानास पक्के ठाऊक होते. तेव्हा छत्रपतींना हाताशी धरून त्याने बाजीरावाला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. 
                     इकडे नानाच्या अनुपस्थितीमध्ये बाजीराव पुण्यास गेला. पाठोपाठ शिंदेस्वारी देखील आली आणि दोघांच्या भेटी झाल्यावर शिंद्यांनी मुद्द्याची गोष्ट काढली. प्रथम त्यांनी एक कोट रुपयांची व पंचवीस लक्षांच्या जहागिरीची मागणी केली आणि नानास कारभारातून काढण्याची बाजीरावास ' विनंती ' केली. बाजीरावास शिंद्यांच्या मागण्या अवास्तव वाटल्या. प्रथम त्याने एक गोष्ट स्पष्ट केली कि, करारानुसार शिंद्यांनी वेळेवर आपणांस मदत न केल्याने त्यांना जहागीर व रोख रक्कम देण्याचा प्रश्नच येत नाही. राहता राहिला नानास कारभारातून काढण्याचा प्रश्न तर ते आम्ही घडू देणार नाही. खरे तर, नानास आत्ताच दुखवले तर त्याच्या ताब्यात छत्रपती असल्याने आपणांस पेशवेपद मिळणार नाही हा खोड ओळखून बाजीरावाने यावेळी नानाच पक्ष घेतला होता. परंतु, शिंद्यांना बाजीरावाच्या अडचणीचे काय ? त्यांनी पाहिले की, बाजीराव हा अतिशय बेभरवशी आहे. तेव्हा त्यांनी परशुरामभाऊस विश्वासात घेऊन चिमाजीआपस यशोदाबाईस दत्तक देण्याची योजना आखली आणि बाजीराव - नानाला कैदेत टाकण्याचे ठरवले. त्यानुसार, बाजीरावास शिंद्याने कैद केले पण नानास कैद करण्याच्या बेतास परशुरामभाऊ अनुकूल होईना. त्याने स्पष्टपणे सांगितले की, नानाच्या जीवितास व अब्रूस धक्का लावू नये. पाहिजे तर त्यास तुम्ही कारभारातून काढून टाका. तेव्हा बाळोबातात्याने हि गोष्ट मान्य केली पण, नानाने आपल्या ताब्यातील सर्व मुलुख आणि किल्ल्यांच्या सोडचिठ्ठ्या देऊन राजकारणातून संन्यास घ्यावा अशी अट घातली. नानाच्या रक्षणासाठी भाऊने या अटी मान्य केल्या आणि आपल्या दिवाणास साताऱ्याला नानाच्या भेटीसाठी पाठवले. परशुरामभाऊचे चरित्र अभ्यासले असता असे दिसून येते की, हा एक लढवय्या सरदार असून कारस्थान व मुत्सद्देगिरीत हा फारच कच्चा होता, नव्हे त्यास यामध्ये फारसा रसही नव्हता. त्यामुळे बाळोबाच्या अटी त्यास सरळसोट वाटून त्याने त्या नानांस कळवल्या. बाळोबाच्या अटींचा अर्थ जाणून नानाने सातारा सोडून वाईजवळ मेणवलीस आपला मुक्काम हलवला. तेव्हा भाऊने साताऱ्यास जाउन छत्रपतींकडून चिमाजीआपासाठी पेशवेपदाची वस्त्रे आणली. इकडे मेणवलीस जाउन नानाने बाजीरावास पेशवेपदावर स्थापण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी त्याने निजाम - भोसल्यांशी गुप्त कारस्थाने रचण्यास आरंभ केला. नानाच्या पाळतीवर शिंद्यांचे हेर होतेच. त्यांनी हि बातमी बाळोबास कळवताच त्याने भाऊला या प्रकारची माहिती देऊन नानास बंदोबस्ताने काशीस रवाना करण्याचे ठरवले. भाऊने आपला दिवाण चिंतोपंत लिमये यांस, नानाकडे रवाना करून सांगितले की,  तूर्त तुम्ही टोक्यास राहा. माझा मुलगा महादजी सहा हजार सैन्यासह तुमच्या रक्षणास राहिला. तुमचे वित्त, प्राण वा अब्रूला धोका होणार नाही यासाठी मी जामीन आहे. भाऊचा हा निरोप मिळाल्यावर नानाने दि. ४ जून १७९६ रोजी मेणवलीहून रायगडी प्रयाण केले. तेथे त्याचा एक दोन दिवस मुक्काम पडून तेथील हवामान न मानवल्याने त्याने महाडला आपला तळ ठोकला. महाडला येणारे सर्व घाटमार्ग त्याने तोडून व वाटा बुजवून बंद केले. कमीत कमी चार महिने तरी पुण्याची फौज आता महाडपर्यंत येण्याचा धोका नव्हता. 
                                महाडच्या मुक्कामात नानाने आपल्या आयुष्यातील अतिशय कल्पनारम्य व अचाट आणि मुख्य म्हणजे यशस्वी असे कारस्थान रचले. यावेळी परिस्थिती सर्वथा त्यास अनुकूल होती पण त्याने फक्त एकच चूक केली व ती म्हणजे त्याने बाजीरावावर विश्वास टाकून त्यास आपल्या कारस्थानात घेतले ! शिंदे व भाऊ चिमाजीला पेशवा बनवणार या बातमीने बाजीराव हवालदिल झाला होता. त्याची अस्वस्थता ओळखून नानाने आपले जाळे विणण्यास आरंभ केला. लवकरच उभयतांमध्ये बाळोजी कुंजर नामक शिलेदाराच्या मार्फत गुप्त करार घडून आला. त्यानुसार नानाने बाजीरावास पेशवेपद मिळवून दिल्यास बाजीरावाने त्याच्या सल्ल्याने कारभार करण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे याकामी निजाम, भोसले, इंग्रज इ. ची मदत लागल्यास नानाने ती घ्यावी व त्या बदल्यात नाना त्यांना जे काही कबूल करेल ते सर्व करार अंमलात आणण्याचे बाजीरावाने मान्य केले. बाजीराव आपल्यास अनुकूल झाल्यावा नानाने शिंद्यांना शह देण्यासाठी इंग्रजांना जवळ केले. ज्यांनी रघुनाथरावास दूर लोटले नाही ते इंग्रज नानाची उपेक्षा का करतील ? आपल्या मदतीने नाना परत कारभारावर स्थापन होणार असेल तर इंग्रजांना ते नको होते असे नाही. नानाच्या मदतीसाठी देशभरातील प्रमुख इंग्रजी ठाण्यांमध्ये कवायती पलटणे जमा होऊ लागली. इंग्रज दिल्ली ताब्यात घेणार असल्याच्या बातम्या पसरू लागल्या. उत्तरेतील शिंद्यांच्या सरदारांनी दौलतरावास तातडीने दिल्लीच्या बचावासाठी निघून येण्याची विनंती केली. इंग्रजांचे प्रकरण चालीस लावून नानाने निजाम - भोसल्यांना मधाचे बोट लावले. त्यानुसार निजामाला खर्ड्याच्या तहातील मुलुख व खंडणी माफ करण्यात आली तर त्याच तहात नमूद केल्याप्रमाणे भोसल्यांना देऊ केलेला गढेमंडळ प्रांत देण्याचे नानाने मान्य केले. निजाम, भोसले, इंग्रज या तिघांशी एकाचवेळी लढण्याची कुवत शिंद्याच्या सैन्यात नव्हती. त्यातच त्यांच्या सरदारांत मतभेदही बरेच होते. बाळोबातात्या, लखबादादा इ. चे कारभारातील वाढते प्रस्थ रायाजी व रामजी पाटलासारख्या मुत्सद्द्यांना सहन होत नव्हते. त्यांनी दौलतरावास नानाशी मिळतेजुळते घेण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्यांच्याच मार्फत दौलतरावाने नानासोबत गुप्त करार करून बाजीरावास पेशवेपदावर स्थापण्याच्या कामी नानास मदत करण्याचे मान्य केले. बदल्यात नानाने त्यास १ कोटी रुपये, दहा लाखांची जहागीर व अहमदनगरचा किल्ला देण्याचे कबूल केले. अशा प्रकारे शिंद्याचा बंदोबस्त केल्यावर नानाने परशुरामभाऊचे प्रकरण हाती घेतले. त्याने पटवर्धन घराण्यातील भाउबंद मंडळीत तेढ उत्पन्न करून भाऊचे सामर्थ्य खच्ची केले. तसेच कोल्हापूरच्या छत्रपतींना पैसा पुरवून त्यांना भाऊच्या सरंजामी मुलखावर स्वाऱ्या करण्यास प्रोत्साहन दिले. त्यावेळी छत्रपतींनी शंका उपस्थित केली की, पुढे - मागे तुम्ही व भाऊ एक झाल्यास भाऊ आमचा सूड घेईल त्याचे काय ? त्यावर नानाने भाऊपासून आम्ही तुमचे रक्षण करू, असे वचन दिले. बाळोबातात्या व भाऊच्या विरोधात अशी कारस्थाने रचतानाच नानाने पुण्यातील आपल्या हस्तकांच्या मार्फत शिंद्याच्या व भाऊच्या सैन्यात फितूर करण्यास आरंभ केला. दोघांच्याही फौजांना अनेक महिने पगार न मिळाल्याने त्या तशा बेदील झालेल्या होत्याच, तेव्हा त्यांना फितवणे नानाच्या सहाय्यकांस फारसे जड गेले नाही. इकडे बाळोबा व भाऊने नानाचा पुण्यातील वाडा आपल्या ताब्यात घेऊन त्यातील सामानाची जप्ती केली. त्याचे सरंजामी मुलुख जप्त करण्यास आरंभ केला. खर्ड्याच्या लढाईनंतर पुणे दरबारच्या स्वाधीन झालेला निजामाचा दिवाण मशीरउल्मुल्क यावेळी पुण्यास नजरकैदेत होता. त्याने तात्या - भाऊसोबत बोलणे लावले की, मला तुम्ही कैदेतून मुक्त कराल तर निजामाशी तुमची गोडी करून देतो. मग आपण सर्व मिळून नानाचा सूड घेऊ.  मशीरच्या बोलण्यात तथ्य असल्याचे जाणून या दोघांनी मशीरला मोकळे केले व त्याने गुलटेकडीस आपला तळ ठोकून लष्कर भरतीस आरंभ केला. वस्तुतः, मशीरला नानाने यापूर्वीच अनुकूल करून घेतले होते. खुद्द त्याचा धनीच नानाला सामील असल्याने मशीरला तरी दुसरा पर्याय काय होता ? नानाच्या सांगण्यानुसारच मशीरने सुटकेची धडपड करून फौज गोळा केली होती. 
               राजकारणाच्या या धांदलीत ता. २ जून १७९६ रोजी चिमाजीआपास पेशवेपदाची वस्त्रे मिळून पेशवा म्हणून तो अधिकारावर दाखल झाला होता. नानाने जर कारस्थान उभारले नसते तर चार दोन महिन्यात तात्या - भाऊचा कारभारात जम बसून चिमाजीची राजवट स्थिर झालीही असती. परंतु, नानाच्या बुद्धीसामर्थ्याने हे घडून आले नाही. दरम्यान दसऱ्याचा सण येउन गेला आणि पाठोपाठ चिमाजीची औटघटकेची पेशवाई संपुष्टात आली. स. १७९६ च्या ऑक्टोबर अखेर दौलतराव शिंद्याने बाळोबातात्या व त्याच्या सहाय्यकांस कैद केले. या बनावाची वार्ता समजताच परशुरामभाऊ चिमाजीला घेऊन जुन्नरला पळाला पण त्याच्या पाठीवर टाकोटाक फौजा धावून आल्याने त्याने नाईलाजाने शरणागती पत्करली. पुण्यातील भाऊच्या मदतनीसांनाही कैद करण्यात आले. अशा प्रकारे नानाचे ' महाड कारस्थान ' फळास येउन बाजीरावाचा पेशवा बनण्याचा मार्ग निष्कंटक झाला. आपल्या बुद्धीबळाने नाना कारस्थान रचण्यात मग्न असताना बाजीरावानेही आपल्या अक्कलहुशारीचा असा काही झटका नानाला दिला कि, त्यामुळे नानाचे महाड कारस्थान एकप्रकारे मोडीतच निघाले. बाजीरावाने दौलतरावासोबत एक गुप्त करार केला. त्यानुसार नाना हयात असेपर्यंत बाजीरावाच्या रक्षणासाठी दौलतरावाने पुण्यातच राहायचे. बदल्यात त्यास दोन कोटी रुपये देण्याचे बाजीरावाने मान्य केले. तसेच पुण्यात जितका काळ दौलतरावाचा मुक्काम होईल तितका काळ फौजेचा खर्च चालवण्याचेही त्याने मान्य केले. दौलतराव - बाजीराव यांच्या गुप्त मैत्रीचा नानाला अखेरपर्यंत पत्ताच लागला नाही. असो, स. १७९६ च्या अखेरीस बाजीराव पेशवा बनला. बाजीरावाने पेशवेपद स्वीकारताच नानाने कारभाराची सूत्रे हाती घेण्याचा प्रयत्न केला, पण सलामीलाच त्याला बाजीराव - शिंद्याने झटका दिला. 
                          महाडच्या कारस्थानात कबूल केल्यानुसार निजामास खर्ड्याच्या तहातील खंडणी व मुलखाची माफी देण्यास बाजीरावाने ठाम नकार दिला. तसेच भोसल्यांना गढेमंडळ प्रांत देण्याचेही त्याने नाकारले. शिंद्याने या प्रकरणी बाजीरावाची बाजू घेतली. तसेच करारानुसार नानाने आपणांस एक कोटी रुपये व नगरचा किल्ला ताबडतोब द्यावा अशी मागणीही केली. त्यामुळे नाना वैतागून गेला. त्याने सर्व कारभार सोडून काशीयात्रेस जाण्याचा निर्णय घेतला आणि पेशव्यासोबत स. १७९७ च्या जानेवारीत करार करून, दत्तक पुत्र घेतल्यास त्याच्याकडून फडणीशीचे काम करून घेण्याचे मान्य करवून घेतले. या करारातील एकूण १३ कलमांपैकी १२ कलमे बाजीरावाने कबूल करून नानाला काशीयात्रेची परवानगी मात्र दिली नाही. दरम्यान, महाडच्या कारस्थानात कबूल केल्याप्रमाणे बाजीराव आपली वचने पाळत नाही हे पाहून निजाम - भोसल्यांनी संयुक्त चढाईचा धाक दाखवला. त्याबरोबर वठणीवर येउन बाजीरावाने नानाच्या मार्फत निजाम - भोसल्यांना कबूल केलेल्या प्रदेशाचे दान देऊन टाकले. याचवेळी शिंद्यांना कबूल केल्याप्रमाणे जहागीर व नगरचा किल्ला देण्यात आला. नानाला वाटले कि, जहागीर व किल्ला मिळताच शिंदे उत्तरेत जाईल पण तो काही पुणे सोडायचे नाव घेइना. उलट फौजेचे देणे थकल्यामुळे नानाने आपणांस कबूल केल्यानुसार एक कोटी रुपये आत्ताच द्यावे असा तगादा त्याने लावला. दरम्यान स. १७९७ च्या ऑगस्टमध्ये तुकोजी होळकराचा मृत्यू झाल्याने होळकरांच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाला. तुकोजीला दोन औरस व दोन अनौरस असे चार पुत्र असून थोरला काशिराव हा शारीरिक दौर्बल्याने लष्करी चाकरीस सक्षम नसल्याचे जाणून धाकटा मल्हारराव यास सरदारकी देण्याचा सर्वांचा विचार होता. परंतु यात दौलतरावाने हस्तक्षेप करून होळकरांची सरदारकी काशिरावासच मिळावी यासाठी खटपट करून त्यास वस्त्रे देववली. याचा परिणाम म्हणजे काशिराव शिंद्यांच्या आहारी गेला आणि हि गोष्ट इतर होळकर बंधूंना अजिबात आवडली नाही. कित्येक इतिहासकारांनी काशिराव हा वेडसर असल्याचे नमूद केले आहे. अनेकांनी तर होळकरांच्या घराण्यात वेड हे आनुवांशिक असल्याचे सांगत आपले मानसिक संतुलन ढासळल्याचे दाखवून दिले आहे. राज्यकारभारविषयक काशिरावची उपलब्ध पत्रे पाहता तो वेडसर असल्याचे अजिबात दिसून येत नाही. 
                            दौलतराव - बाजीराव हि अनिष्ट युती फोडल्याशिवाय आपणांस स्वस्थता लाभणार नाही हे ओळखून नानाने शिंद्याची खोड मोडण्यासाठी मल्हारराव होळकरास हाताशी धरले. तुकोजीच्या पश्चात मल्हाररावास सरदारकी मिळावी असे होळकरशाहीतील कित्येक जुन्या सरदारांचे मत होते. त्यांनी देखील मल्हाररावास पाठिंबा दर्शविला. तेव्हा मल्हारराव हा पाच सात हजार सैन्यासह पुण्यास तळ ठोकून राहिला. दौलतरावाच्या डोक्यात एव्हाना सत्तेची घमेंड व मस्ती चांगलीच भिनली होती. त्याने ता. १४ सप्टेंबर १७९७ रोजी भर दिवसा कवायती पलटणे व घोडदळाच्या तुकड्या पाठवून मल्हाररावावर छापा घातला. त्यासमयी मल्हारराव मारला गेला. विठोजी व यशवंतराव कसेतरी निसटून गेले. या घटनेमुळे पुण्यातील मुत्सद्दी मंडळ पुरते हादरून गेले. प्रत्यक्ष पेशव्याच्या उपस्थितीत हा प्रकार घडावा याचा त्यांना भारी खेद वाटला. होळकरांना हाताशी धरून शिंद्यांना शह देण्यात नानाला अपयश आले तरी त्याने हार मानली नाही. तत्पूर्वीच त्याने अमृतरावास चिथावणी व द्रव्याची मदत देऊन बाजीरावाकडे प्रमुख कारभारीपद मागण्यास प्रवृत्त केले. पेशव्याचा मुख्य कारभार आपल्या हाती येणार म्हटल्यावर अमृतराव उघडपणे नानाचा पक्ष घेऊन लागला. याखेरीज नानाने दौलतरावाच्या घरात देखील दुफळी माजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. महादजीच्या स्त्रियांचे व दौलतरावाचे कधीच पटले नाही. नानाने त्यांना दौलतरावाच्या विरुद्ध चिथावणी देऊन दुसरा दत्तक घेण्याची सूचना केली, तेव्हा त्यांनी दौलतरावाविरुद्ध बंड पुकारले. नानाच्या या कारस्थानांनी पेशवे - शिंदे अगदी त्रस्त झाले. त्यांनी विश्वासघाताने नानास पकडून कैद करण्याची योजना आखली. त्यनुसार शिंद्याच्या सैन्यातील मुकीर नामक फ्रेंच सरदार होता, त्यास विश्वासात घेण्यात आले. हिंदुस्थानी लोकांच्या वचनापेक्षा नानाचा युरोपियन लोकांच्या शब्दावर अधिक भरवसा असल्याचे सर्वांना माहिती होते. मुकीरने बायबलवर हात ठेऊन नानांच्या रक्षणाची शपथ घेतली तेव्हा त्याच्या मध्यस्थीने नाना दौलतरावाच्या भेटीस गेला आणि कैदेत सापडला. ( डिसेंबर स. १७९७ ) 
                             शिंद्याने नानास तीन महिने आपल्या छावणीत ठेऊन घेतले. यामागे त्याचा हेतू, नानाचा सर्व द्रव्यसंचय आपल्या ताब्यात घेण्याचा होता. परंतु नानाने त्यास अजिबात भीक घातली नाही. तेव्हा त्याने नानाची रवानगी नगरच्या किल्ल्यावर केली. नाना कैदेत पडताच बाजीराव - दौलतरावात वितुष्ट निर्माण झाले. मुळात बाजीरावास दौलतरावाचा सहवास देखील नकोसा झाला होता पण नानाच्या भीतीमुळे त्याने शिंद्याला आजवर जवळ बाळगले होते. त्याच्यामार्फत नानाचा काटा निघताच त्याने शिंद्याला अडचणीत आणण्यासाठी निजाम व महादजीच्या स्त्रियांशी राजकारणाचे सूत्र लावले. तेव्हा चिडून जाउन दौलतरावाने दहा लक्ष रुपये रोख व पंधरा लाख रुपये देण्याच्या वायद्यावर नानाला नगरच्या कैदेतून मुक्त केले.( स. १७९८, जुलै ) त्याशिवाय बाजीराव - निजाम यांची जमत असलेली युती फोडण्याचे व शिंदे बायांची समजूत काढण्याचेही नानाने मान्य केले व कैदेतून सुटका झाल्यावर शब्द दिल्यानुसार त्याने दोन्ही प्रकरणे निकाली काढली. 
                      कैदेतून सुटका झाल्यावर नाना फडणीस आता खरोखर राजकारणातून संन्यास घेण्याच्या बेतात होता. दरबारातील भानगडीत त्याने आता फारसे लक्ष न घालता आपले उरलेलं आयुष्य सुखाने काढण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यास स्वस्थता कोण लाभू देणार ? ज्या इतिहासप्रसिद्ध महाडच्या कारस्थानाने बाजीराव पेशवा बनला होता, त्या कारस्थानाची सर्वच फळे अजून नानास कुठे भोगावी लागली होती ? महाडच्या कारस्थानात आपल्या वतीने नानाची अधिकारपदावर स्थापना करण्याचा जो डाव हुकला होता, तो पूर्ण करण्याच्या उद्देशाने ब्रिटीशांनी जाळे टाकण्यास आरंभ केला. स. १७९८ - ९९ मध्ये गव्हर्नर जनरल वेलस्लीने टिपूवर मोहीम काढून त्यास ठार केले. करारात ठरल्यानुसार पेशव्यांची फौज वेळेवर मदतीस न आल्याने टिपूच्या राज्यातील काही भाग पुणे दरबारास देण्यास इंग्रज - निजाम नाखूष होते. परंतु, पेशवे दरबारात आपले हात - पाय पसरण्याची हि एक चांगली संधी आहे असे जाणून इंग्रजांनी टिपूच्या राज्यातील काही भूप्रदेश पेशव्यांना देण्याचे ठरवले पण त्या बदल्यात आपली तैनाती फौज पदरी बाळगण्याची अट त्यांनी मांडली. बाजीरावाने यावेळी तरी हि अट अमान्य केली. तेव्हा, इंग्रजांनी पेशव्यांच्या वाटणीचा प्रदेश निजाम व आपल्यात परस्पर वाटून घेतला. इंग्रजांशी पुणे दरबारचे असे संबंध बिघडत चालले होते तो,  तिकडे कोल्हापूरचे प्रकरण उद्भवले. महाडच्या कारस्थानानुसार कोल्हापूरकर छत्रपतींनी पटवर्धनांच्या आणि पेशव्यांच्या प्रदेशात बरीच धामधूम माजवली होती. बाजीरावास छत्रपतींच्या या दंग्याची उपेक्षा करून चालणार नव्हते. त्याने कोल्हापूर स्वारीची जबाबदारी परशुरामभाऊवर टाकली पण दुर्दैवाने त्या मोहिमेत भाऊ जीवानिशी गेला. पूर्वी अमृतरावाच्या मार्फत नाना बाजीरावास धाकात ठेवायचा प्रयत्न करत होता, आता तोच नाना शिंद्यांच्या मदतीने कारभारावर आल्याने अमृतरावाने नानाला कैदेत टाकण्यासाठी कारस्थाने रचण्यास आरंभ केला. सारांश, शिंद्यांच्या कैदेतून सुटका झाल्यावर नानास असे आढळून आले कि, आता कारभारात आपल्याला काहीही स्थान नाही ! 
                  येथून पुढे त्याने प्रसंगावर नजर ठेऊन फडणीशीचे आणि राज्यकारभाराचे काम केले, परंतु त्याने आपल्या वतीने नारोपंत चक्रदेव यास पेशव्याजवळ नेमले. त्याने राज्यकारभार विषयी पेशव्यास नानाचा सल्ला कळवण्याच्या मध्यस्थाची भूमिका स्वीकारली. मिळून बाजीरावाशी प्रत्यक्ष संबंध येऊ न देता नानाने राज्यकारभारात अशा प्रकारे अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेतला. नानाने राजकारणातून कितीही विरक्ती घेण्याचे योजले असले तरी परिस्थिती त्यास अशी सहजासहजी निवृत्ती घेऊ देण्यास राजी नव्हती. तत्कालीन हिंदुस्थानच्या राजकारणाची राजधानी म्हणून पुण्याचा नावलौकिक होता. त्या पुणे दरबारात बाजीराव आणि दौलतराव या जोडगोळीच्या व मुत्सद्यांच्या धरसोडीच्या राजकारणाने परस्पर अविश्वासाचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. टिपूचा पाडाव झाल्याने आज ना उद्या इंग्रज आपल्यावर चालून येणार हे सर्वांनी ओळखले होते. इतकेच काय पण, नादान म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाजीरावास देखील हा धोका कळत होता. परंतु, भावी संकटाचे निवारण करण्यासाठी धडपड करण्याच्या मनःस्थितीत आता कोणी नव्हते. अशा वेळी नानाने परत एकदा आपले बुद्धिबल वापरून संकटातून मार्ग काढण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. वस्तुतः, कैदेतून मुक्तता झाल्यापासून नानाची शारीरिक शक्ती तशी क्षीण होत चालली होती. तरीही त्याने अखेरचा डाव टाकला. या सुमारास होळकर घराण्याचा एक वंशज उत्तरेत शिंद्यांच्या उरावर पाय देऊन ठासून बसला होता. पुण्याच्या मल्हार गर्दीतून मोठ्या संकटाने बचावलेल्या यशवंतरावाने स्वपराक्रमाच्या बळावर उत्तरेतील होळकरांच्या कोसळत्या सत्तेचा डोलारा समर्थपणे सावरून तर धरला होताच, पण शिंद्यांच्या सैन्याचा ठिकठीकाणी पराभव करून त्यांच्या सत्तेला जबरदस्त हादरा दिला होता. नानाने यशवंतरावासोबत संधान जोडून त्यास पुण्याला येण्याची सूचना केली. होळकराच्या मदतीने शिंदे व बाजीरावाचा बंदोबस्त करून पेशवाई सावरण्याचा नानाने डाव आखला. परंतु, आता वेळ निघून गेली होती. कारण, सैन्याची जमवाजमव करून बुंदेलखंडाच्या सरहद्दीपर्यंत येण्यास यशवंतरावास स. १८०० चा मार्च महिना उगवावा लागला. तत्पूर्वीच दि. १३ मार्च १८०० रोजी नानाने आपला अखेरचा श्वास घेतला होता ! होळकरास मिळवून घेऊन बाजीराव - दौलतराव या जोडगोळीचा बंदोबस्त करण्याच्या नानाच्या या कारस्थानाची पूर्तता पुढे अमृतराव पेशव्याने केली !
                             ता. १२ फेब्रुवारी १७४२ रोजी बाळाजी उर्फ नानाचा जन्म झाला होता. मृत्यूसमयी त्याचे वय सुमारे ५८ वर्षांचे होते. या ५८ वर्षांच्या त्याच्या हयातीमधील आरंभीची १५ - १६ वर्षे वजा केल्यास जवळपास ४२ वर्षांची त्याची प्रदीर्घ अशी राजकीय कारकीर्द होती. या ४२ वर्षांमध्येही स. १७७९ ते स. १७९५ अशी सुमारे पंधरा वर्षे पेशव्यांची मुख्य सत्ता त्याने अप्रत्यक्षपणे उपभोगली. प्रत्यक्ष कारभारातून बाजूला असतानाही केवळ तोंडी निरोपांवर त्याने मोरोबाचे व महाडचे कारस्थान यशस्वीपणे पार पाडून दाखवले हे लक्षात घेता त्याच्या कर्तबगारीचे आणि अक्कल हुशारीचे मोठे कौतुक वाटते. 
                      आजवर अनेक इतिहासकरांनी नानाचे जितके गुणवर्णन केले आहे तितक्याच त्यास शिव्याही घातल्या आहेत. अर्थात, पूर्वग्रहदुषित वृत्तीने त्यांनी नानाचे चरित्र अभ्यासल्याने असे घडले असावे. वस्तुतः, तत्कालीन काळातील प्रचलित प्रघात - रिवाजांच्या विरोधात नाना वागल्याचे दिसून येत नाही. रघुनाथरावास हटवण्याचे जेव्हा बारभाईंनी कारस्थान रचले, तेव्हाच पेशव्यांची सत्ता कोणा तरी मुत्सद्द्याच्या वा सरदाराच्या हाती जाणार हे स्पष्ट झाले होते. हि राज्यक्रांतीची वेळ होती. यात भरभक्कम लष्करी सामर्थ्य हाताशी असणारी व्यक्तीच यशस्वी होणार असे दिसत असताना हा डाव नानासारख्या लष्करीदृष्ट्या दुबळ्या मुत्सद्द्याने हातोहात जिंकला हि नानाच्या बुद्धीसामर्थ्याची चुणूक दाखवणारी घटना आहे. सत्तेच्या राजकारणात नाना - महादजीचा अनेकदा सामना घडून आला. त्यात त्यांनी परस्परांना अडचणीत आणणारी कारस्थानेही रचली. त्यावरून नारायणरावाच्या खुनानंतर मराठी राज्य झपाट्याने विनाशाच्या मार्गाने जात असल्याचे दिसून येते. कारण, या नाना - महादजी वादाचे अनेक कंगोरे असून त्यात होळकरांचेही उपकथानक आहे. यातचं शिंदे - होळकरांच्या रक्तरंजित लढ्याची बीजे दडल्याचे दिसून येते.
                   राज्याचे हित साधताना आपलाही स्वार्थ साधण्याचा तेव्हाचा प्रघात होता. तो लक्षात घेता नानाने महाडला बसून जे कारस्थान रचले त्याचे आपण संक्षिप्त मूल्यमापन करु :- महाडच्या कारस्थानाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नानाला मुख्य कारभार स्वतःच्या हाती हवा होता. पेशवेपदी चिमाजी असो वा रावबाजी, राज्यकारभार आपल्या तंत्राने चालला म्हणजे बस्स, अशी त्याची भावना होती. त्यावेळी भाऊ व तात्याने चिमाजीचा पक्ष घेतल्याने नानाने नाईलाजाने बाजीरावास उचलून धरले व स्वतःचा नाश ओढवून घेतला. बाजीराव आणि आपले पटणे शक्य नाही हे त्यास माहिती होते. पण, पेशवे घराण्यात यावेळी बाजी - चिमाजी हे दोनचं औरस वंशज हयात असल्याने नानाचा निरुपाय झाला होता. असे असले तरी, महाडचे कारस्थान रचून बाजीरावास पेशवा बनवण्यापेक्षा नानाने सातारच्या छत्रपतींनाच जर सर्व मदत पुरवून त्यांनाच राज्यकारभार हाती घेण्याची विनंती केली असती तर ? महादजीने मोठ्या मिजाशीने पेशव्यास वकील - इ - मुतलकीची वस्त्रे व पदे आणून दिली, पण या कार्यक्रमाच्या वेळी पेशव्यास नजर करण्यास मराठे मंडळी आली नव्हती. कारण, कित्येकांना मुळात हा उपक्रम पसंतच नव्हता. छत्रपतींनीही खरेतर नाईलाजाने या वस्त्रांच्या स्वीकृतीची परवानगी दिलेली होती. या गोष्टी नानास माहिती नव्हत्या अशातला भाग नाही. या सर्व घटनांचा फायदा उठवून जर त्याने बाजीरावा ऐवजी छत्रपतींचा पुरस्कार केला असता तर राज्याचा विनाश इतक्या लवकर ओढवला नसता. परंतु, छत्रपतींवर आपला शह राखता येणार नाही या कारणामुळे नानाने रावबाजीस जवळ केले. पुढे महाडचे कारस्थान यशस्वी होऊन देखील नानास कैदेचे सोहळे भोगावेचं लागले. त्यानंतर त्याने राजकारणा फारसा सहभाग असा घेतलाच नाही. बाजीरावाने मराठी राज्य घालवले असे सर्वच म्हणतात परंतु त्या बाजीरावाची नालायकी माहिती असून देखील महाडच्या कारस्थानानुसार त्यास परत राज्यावर आणण्याची जी नानाने घोडचूक केली, त्यावरून मराठी राज्याच्या विनाशाच्या कृत्यात त्याचाही अंशतः का होईना पण वाटा होता असे नमूद करावे लागते. अर्थात, आपल्या अखेरच्या दिवसांत नानास आपली चूक उमगून यशवंतरावास हाताशी धरून त्याने बाजीरावाची उचलबांगडी करण्याच्या दृष्टीने काही हालचाली केल्या हे खरे, पण हे शहाणपण त्यास -- बाजीराव व दौलतरावापुढे आपले काही चालत नाही हे दिसून आल्यावर सुचले हे देखील विसरता येत नाही. तात्पर्य, तत्कालीन प्रघात व परंपरा लक्षात घेता नाना हा त्याच्या समकालीन इतिहासप्रसिद्ध मुत्सद्द्यांपेक्षा काही फारसा वेगळा वा सरस होता असे म्हणता येत नाही.
                                                                                   ( समाप्त )
संदर्भ ग्रंथ :- 
१) मराठी रियासत ( खंड ४ ते ८ ) :- गो. स. सरदेसाई 
२) नाना फडणवीस यांचे चरित्र :- वा. वा. खरे
                     

मंगळवार, ३० जुलै, २०१३

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस ( भाग - ४ )

     

                    
                       स. १७८७ मध्ये निजाम - पेशव्यांची टिपूवरील स्वारी तशी निष्फळ ठरली होती आणि इंग्रजांनी तटस्थ राहून दुरून गंमत पहिली होती. परंतु, पुढील दोन - तीन वर्षांत राजकारणाचे रंगरूप साफ पालटले होते. उत्तरेत महादजीने आरंभीचे अपयश पचवून स. १७९० च्या सुमारास अभूतपूर्व यश संपादले होते. दक्षिणेत निजामाचे तसे पाहिले तर नाममात्र अस्तित्व उरले होते. टिपूचे सामर्थ्य वाढीस लागून इंग्रज - मराठे - टिपू असा तिरंगी सामना जुंपण्याची चिन्हे दिसत होती. पैकी टिपूची राजवट एकमुखी व एकसूत्री असल्याने आणि मुख्य म्हणजे मर्यादित असल्याने त्याच्याकडून इंग्रज वा मराठ्यांना फार मोठा धोका पोहोचणार नव्हता. मात्र, त्याने इंग्रजांना मराठ्यांविरुद्ध अथवा मराठ्यांना इंग्रजांविरुद्ध मदत करण्याचे ठरवले तर मात्र दोघांपैकी एकाच काटा निश्चित निघणार होता. राजकारणाचा हा रंग ओळखून हिंदुस्थानचा तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिसने यावेळी मराठ्यांची मदत घेऊन टिपूला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने टिपूलाच लक्ष्य करण्यामागे काही कारणे होती. मराठेही तसे इंग्रजांचे शत्रू असले तरी देशभर त्यांच्या सत्तेचा पसारा असल्याने त्यांच्याशी चालाणारे युद्ध एक - दोन वर्षांत निकाली निघणे शक्य नसल्याचा अनुभव पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात आला होता आणि सध्या तरी दीर्घकालीन युद्ध खेळण्याइतपत कंपनीचा खजिना समृद्ध नसल्याचे कॉर्नवॉलिसला माहिती होते. त्यामानाने टिपूवरील मोहीम तुलनेने सोपी होती. तेव्हा प्रथम टिपूचा निकाल लावून आपल्या मार्गातील एक काटा काढून मग आस्तेकदम पेशवाई गिळण्याचा बेत इंग्रजांनी आखला. स. १७८८ पासून दक्षिणेतील जवळपास सर्वच लहान - मोठ्या सत्ताधीशांशी कॉर्नवॉलिसने टिपूविरोधात लढण्यासाठी संधान बांधण्यास आरंभ केला. पैकी निजामाला तर त्याने सहज गुंडाळले पण पुणे दरबार मात्र टिपूविरोधात इंग्रजांची मदत करण्यास सहजासहजी तयार झाला नाही. कॉर्नवॉलिसचा नेमका काय डाव आहे याची यावेळी प्रमुख मराठी मुत्सद्द्यांना जाणीव झालेली असल्याने ते इंग्रजांची मदत करण्यास नाखूष होते. परंतु, निजाम इंग्रजांच्या गोटात गेल्याने पुणे दरबारास दक्षिणेतील सत्तासमतोल संतुलित राखण्यासाठी टिपूविरुद्ध आघाडीत सहभागी व्हावे लागले. इंग्रजांच्या मदतीस मराठी सेना रवाना करण्यापूर्वी नानाने निजामाशी गुप्त करार केला की, इंग्रज जर टिपूला साफ बुडवण्याचा प्रयत्न करतील तर तसे करण्यापासून आपण त्यांना परावृत्त करायचे. निजाम - इंग्रज - पेशवे या त्रिकुटामधून पुणे दरबारास फोडण्याचा टिपूने बराच प्रयत्न केला पण त्यात त्यास यश आले नाही आणि स. १७९० मध्ये निजाम - इंग्रज - पेशवे यांच्या फौजा तीन वेगवेगळ्या दिशांनी टिपूवर चालून गेल्या. या त्रिकुटाच्या विरोधात टिपूने वर्ष - दीड वर्ष सामना दिला खरा पण, पुढे त्यास माघार घेणे भाग पडून स. १७९२ च्या फेब्रुवारीमध्ये कॉर्नवॉलिसने श्रीरंगपट्टण घेण्याची तयारी सुरु केली. तेव्हा हरिपंत व निजामाने कॉर्नवॉलिसला गळ घालून तहासाठी राजी केले. टिपूही आता टेकीस आला होता. त्यानेही तहाची आतुरता दाखवून अर्धे राज्य आणि तीन कोटी रुपये देऊन युद्ध संपुष्टात आणले. कॉर्नवॉलिसच्या या मोहिमेने टिपूचे महत्त्व लयास जाउन श्रीरंगपट्टणचे पूर्वीचे सामर्थ्य साफ मावळून गेले. इतउत्तर टिपूची अवस्था दात व नखे काढलेल्या वाघासारखी बनून इंग्रजांची सत्ता दक्षिणेत काही प्रमाणात निर्वेध झाली. 
                              दक्षिणेत टिपूची मोहीम सुरु असताना पुण्यात एक लहानशी पण इतिहासात प्रसिद्ध असलेली घटना घडून आली. स. १७९१ च्या श्रावण मासाच्या दक्षिणा समारंभानंतर देशभरातून पुण्यास गोळा झालेले ब्राम्हण परतीच्या वाटेस लागले होते. पैकी काही द्रविड तेलंगी ब्राम्हण पुण्याचा तत्कालीन कोतवाल - घाशीराम सावळादासच्या बागेत तळयाजवळ मुक्काम ठोकून राहिले. त्यावेळी ब्राम्हणांनी कणसेमळ्यातील काही कणसे तोडली. तेव्हा तेथील माळ्याची व त्यांची भांडणे होऊन माळ्याने कोतवालास फिर्याद केली. कोतवालाने शिपाई पाठवून सुमारे सव्वीस - सत्तावीस ब्राम्हणांना कैद करून भवानी पेठेतील आपल्या वाड्याच्या भुयारात कैदेत डांबले. रविवार रात्री हा प्रसंग घडला. दुसरा दिवस उजाडला. घडल्या प्रकाराची आसपास कुजबुज मात्र झाली. कोतवालाने कैदी ब्राम्हणांकडे लक्ष दिले नाही. मंगळवारी मात्र हि वार्ता सर्वत्र पसरली आणि सरदार मानाजी शिंदे उर्फ फाकडेच्या कानी पडली. त्याने ताबडतोब कोतवालाच्या वाड्यात जाउन भुयारातील ब्राम्हण कैद्यांची सुटका केली. पण पाहतो तो काय ? अठरा ब्राम्हण मरण पावले होते. उर्वरीत नऊ जणांपैकी तिघांनी मंगळवारी सायंकाळी जीव सोडला तर सहाजण कसेबसे जिवंत राहिले. मानाजीने घडला प्रकार पेशव्याच्या कानी घातला. ( दि. ३० ऑगस्ट १७९१ ) इकडे घाशीरामास मानाजीचा पराक्रम समजला होता. त्याने घाईघाईने नानाची भेट घेऊन कैदेत मेलेले ब्राम्हण फितुरी व चोर असल्याचे सांगून त्यांनी अफू व विष घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. अशा घटना नेहमी घडत असल्याने नानाने त्यास मृत कैद्यांच्या दहनाची परवानगी दिली. तेव्हा कोतवाल ब्राम्हणांची शवे ताब्यात घेण्यास गेला असता मानाजीने त्यास धुडकावून लावले व पेशव्यांनी आज्ञा दिल्याखेरीज मृतदेह ताब्यात देण्यास नकार दर्शविला. घडले वर्तमान सवाई माधवराव पेशव्यास समजत होतेच. त्याने नानाला याविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले. नानाने घाशीरामास दरडावून खरा प्रकार विचारला मात्र, त्याने आधीचीच हकीकत परत एकदा सांगितली. तेव्हा नानाने त्यास कैद केले आणि चौकशीस आरंभ केला. तोपर्यंत हजारभर तेलंगी ब्राम्हण नानाच्या वाड्यासमोर गोळा झाले होते. रात्र पडली तरी ब्राम्हण हटेनात तेव्हा नानाने अय्याशास्त्रीस बोलावून त्याचा सल्ला घेतला. अय्याशास्त्रीने कोतवालास देहांत शिक्षा देण्याची नानास सूचना केली. तेव्हा रात्रीच हत्ती आणून त्याच्यावर कोतवालास पाठीवर उपडे बांधून चार पेठांमधून फिरवले. दुसऱ्या दिवशी उंटावरून त्यास शहरभर मिरवले आणि सायंकाळी भवानी पेठेच्या पलीकडे सुमारे १ किमी अंतरावर सोडले. या सर्व समारंभात तेलंगी ब्राम्हणांनी उत्साहाने सहभाग घेऊन कोतवालास शिपायांनी मुक्त करताच दगड - धोंडे मारून ठार केले. घडल्या प्रकरणात नानाचा अजिबात दोष नसता इतिहासकरांनी त्यास या बाबतीत दोषी मानले आहे. कदाचित, कैदेत ब्राम्हण मरण पावल्याने त्यांना या गोष्टीचा अधिक राग आला असावा ! दुसरे काय ? 
                              स. १७९२ मध्ये हिंदुस्थानात आणखीही कित्येक घटना घडत होत्या पण त्यातील एक अतिशय महत्त्वाची आणि काही काळ का होईना नानाचे आसन डळमळीत करणारी एक घटना घडून आली व ती म्हणजे महादजी शिंदेचे पुण्यास आगमन ! स. १७८० मध्ये महादजीने पुणे सोडले तो, त्यानंतर तब्बल १२ वर्षांनीच पुण्यास परतला. या अवधीत पुणे दरबारात नानाचे तर दिल्ली व पुणे दरबारात महादजीचे वजन अतोनात वाढले होते. लौकिकात पाहिले तर नाना हा पेशव्यांची सत्ता हाती असलेला कारकून होता तर महादजी हा मोगल बादशहाचा अधिकार हाती असलेला नोकर होता ! १२ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात नाना - महादजीच्या स्नेहसंबंधात बराच दुरावा आला होता. नानाची होळकरांशी जवळीक महादजीला खटकत होती. मोगल दरबारची सूत्रे हाती आल्यावर पेशवाईची सत्ता आपल्या ताब्यात घेण्याची त्याची महत्वकांक्षा परत एकदा उफाळून आली होती. मात्र हे कार्य प्रत्यक्ष युद्धाने न करता केवळ लष्करी बळाचे प्रदर्शन आणि राजकीय दबावाने घडवून आणण्याचा त्याचा मानस होता. महादजीचा अंतस्थ हेतू नानाने ओळखला. या सुमारास टिपूवरील मोहीम जवळपास संपुष्टात आलेली होती. तेव्हा त्याने पटवर्धन व फडकेला पत्र लिहून ताबडतोब परत येण्याची आणि येताना इंग्रजांची दोन पलटणे सोबत आणण्याची आज्ञा केली. परंतु, नानाच्या सूचनेचा अर्थ जाणून कॉर्नवॉलिसने इंग्रज पलटणी पुण्यास पाठवण्यास साफ नकार दिला.  दरम्यान तुकोजीचे ' आपण लवकरचं दक्षिणेत येत असल्याचे ' पत्र नानास मिळाल्याने तो काहीसा निश्चिंत झाला. प्रसंग पडला तर पटवर्धन, फडके व होळकरांच्या सहाय्याने आपण शिंद्यांचा नक्षा उतरवू शकतो अशी त्यास उमेद वाटू लागली. 
                               स. १७९२ च्या पूर्वार्धात महादजी पुण्यात आला. पुण्यात आल्यावर प्रथम त्याने आग्रह धरला की, बादशहाने पेश्व्यास प्रदान केलेल्या वकील - इ - मुतलकीच्या वस्त्रांचा स्वीकार करण्याचा कार्यक्रम व्हावा. नाना फडणीसने यास विरोध केला. अर्थात, यामागे सत्तास्पर्धा नसून तात्विक आणि व्यावहारिक भेद होता. मोगल बादशहाने पेशव्यांना वकील - इ - मुतलकीचे पद देताना ' महाराजा ' हा किताब दिला होता. लौकिकात पेशवे हे छत्रपतींचे नोकर असताना त्यांनी बादशहाकडून ' महाराज ' हा किताब कसा घ्यायचा हा प्रश्न नानाने उपस्थित केला. नानाच्या मते यांमुळे छत्रपतीपद दुय्यम राहून पेशवे त्यांचे नोकर असूनही वरचढ झाल्याचे दिसून येते. नानाप्रमाणेच अहिल्याबाई होळकरची भूमिका होती, पण त्यामागील दृष्टीकोनात फरक होता.  परंतु, महादजीने नानाचा युक्तिवाद धुडकावून लावत साताऱ्यास आपले सेवक छत्रपतींच्या भेटीस पाठवून त्यांच्याकडून परस्पर परवानगी मागवली आणि ता. २२ जून रोजी फर्मानबाडीचा समारंभ होऊन पेशव्यांनी वकील - इ - मुतलकीची वस्त्रे व फर्मानाचा स्वीकार केला. यावेळी मराठे मंडळींनी या समारंभात फारसा सहभाग घेतला नाही. प्रस्तुत, वादाविषयी उपलब्ध पत्रव्यवहार आणि त्यावरील विविध इतिहासकारांची मते अभ्यासल्या नंतर माझे असे मत बनले आहे कि, छत्रपती शाहूने बादशाही मांडलिकत्व स्वीकारल्या नंतरची मराठी राजकारणात घडून येणारी हि दुसरी चूक होती. महादजीने थोडा जरी विवेक दाखवला असता तर हि अनिष्ट घटना टाळता आली असती. असो, हा कार्यक्रम आटोपल्यावर महादजीने नानाचे आसन डळमळीत करण्यासाठी दरबारात एक नाजुक मुद्दा उपस्थित केला. 
                              स. १७७८ पासून कैदेत असलेल्या मोरोबा फडणीसची सुटका करून त्यास पुन्हा अधिकारपदी नेमण्यात यावे अशी महादजीने मागणी केली. यामागे नानाची अडवणूक करण्यापलीकडे महादजीचा दुसरा हेतू नव्हता. तसेच अलीकडे नानाने सातारच्या छत्रपतींवर अनेक निर्बंध लादले होते ते सैल करून घेण्याचाही महादजीने मर्यादित प्रमाणात यशस्वी प्रयत्न केला. महादजी राज्यकारभारात अशा प्रकारे हस्तक्षेप करू लागला तेव्हा नानाने आपले हुकमी अस्त्र बाहेर काढून त्यास नरम करण्याचा प्रयत्न आरंभला. गेल्या दहा वर्षांतील शिंद्यांच्या जहागिरीचे व नव्याने संपादन केलेल्या मुलखाची गोळाबेरीज करून सुमारे सहा कोटी रुपयांच्या थकबाकीची मागणी केली. नानाच्या अपेक्षेप्रमाणे महादजी थंड पडला नाही. उलट त्यानेच आपल्या आजवरच्या मोहिमांत केलेल्या खर्चापोटी पेशवे दरबार आपणांस पाच कोटींचे देणे लागत असल्याचे दाखवले. अशा परिस्थितीत उभयपक्षांनी तडजोड करून महादजीचे कर्ज फिटेपर्यंत उत्तर हिंदुस्थानात त्याने नव्याने जो मुलुख संपादन केला आहे तो त्याच्याकडेच राहावा आणि सर्व देणे फिटल्यावर पेशव्यांच्या वाटणीचा प्रदेश त्यांच्या ताब्यात द्यावा असे ठरले. जहागिरीच्या हिशेबावरून शिंद्याला कात्रीत पकडण्याचा उद्योग निष्फळ ठरल्याने नानाने दुसरा डाव टाकला. दिल्ली दरबारात महादजीचे प्रस्थ अतोनात वाढल्याने तुकोजी होळकर मनातून नाराज झाला होता. त्याच्या मते अहिल्याबाईने त्यांस वेळेवर द्रव्यपुरवठा न केल्याने महादजीला हे मोठेपण प्राप्त झाले. तसेच वेळोवेळी आपली कोंडी करण्यासाठी महादजीने अहिल्याबाईस पाठिंबा दिल्याचेही तो आणि त्याचे पुत्र विसरले नव्हते. त्यात आता अहिल्याबाईचीही भर पडलेली होती. इतकी वर्षे तिचे व महादजीचे बहिण - भावाप्रमाणे असलेले नाते काही राजकीय व आर्थिक व्यवहारांनी तुटल्यासारखे झाले होते. लालसोट प्रसंगी महादजीने वारंवार मागणी करूनही आणि शक्य असूनही अहिल्याबाईने महादजीला सैनिकी वा आर्थिक मदत न केल्याचा दंश महादजीच्या मनी होताच. त्यात आणखी सत्वास प्रकरणाची भर पडली. नर्मदेच्या दक्षिणेस असलेल्या नेमावर महालात शिंदे - होळकरांची सामाईक मालकी होती. तेथे अहिल्याबाईने सत्वास येथे लष्करी ठाणे उभारले. महालात निम्मी वाटणी असल्याने ठाण्यातही महादजीने निम्म्या वाटणीची मागणी केली, पण बाईने ठाणे उभारण्यासाठी व सांभाळण्यासाठी केलेल्या खर्चाची मागणी केल्याने महादजी नाराज झाला आणि पुण्यास येताना मार्गात त्याने सत्वासचे ठाणे जबरदस्तीने ताब्यात घेतले. अहिल्याबाई व महादजी मध्ये इतका दुरावा वाढला होता की, दक्षिणेत येताना महादजीने पूर्वप्रघातानुसार अहिल्याबाईची भेट देखील घेण्याचे कटाक्षाने टाळले. नानाला या सर्व प्रकाराची कल्पना असल्याने त्याने होळकरांना चिथावून शिंद्यांच्या सैन्याचा पाडाव करण्याची योजना आखली. त्यानुसार नानाच्या अंतस्थ आणि अहिल्याबाईच्या सक्रिय पाठींब्यामुळे तुकोजीपुत्र मल्हारराव, विठोजी व यशवंतराव यांनी लाखेरी येथे शिंद्यांच्या फौजांशी लढाई केली. या संग्रामात होळकरांचा पराभव होऊन शिंद्यांची सेना विजयी झाली. घडल्या घटनेचा कोणालाच खेद वाटला नाही. आपली सर्व अस्त्रे निष्फळ ठरल्याचे पाहून नानाने मग कारभार सोडून काशीयात्रेस जाण्याचे ढोंग केले. अखेर हरिपंत फडके आणि स्वतः सवाई माधवराव पेशव्याने नाना - महादजीमध्ये सन्मान्य तडजोड घडवून आणून उभयतांमधील संघर्ष संपुष्टात आणला. 
                                   नाना - महादजीच्या वादात मराठी राज्यकारभाराचे जवळपास एक वर्ष फुकट गेले. त्यात शिंदे - होळकरांचा वैराग्नी आणखी प्रज्वलित करण्याचे कृत्य घडवून आणण्याचे श्रेय तेवढे नानाच्या पदरी पडले. मात्र, एका बाबतीत नानाला यश आले व ते म्हणजे पुणे दरबारची प्रमुख सूत्रे आपल्या हाती घेण्याची महादजीची जी हाव होती, ती जागच्या जागी त्यांस जिरवता आली. होळकर जरी लाखेरीवर पराभूत झाले असले तरी त्यांचे सामर्थ्य अबाधित होते. त्यात अहिल्याबाई परत एकदा लढाईच्या दृष्टीने तयारी करत असल्याच्या बातम्या उठल्या होत्या. पुणे दरबारचे फौजबंद सरदार पूर्ण भरात होते. अशा वेळी नानाला आपण कारभारातून दूर करू शकत नाही हे ओळखून महादजीने आपला हात आवरता घेतला. यानंतर लवकरच म्हणजे दि. १२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजीचा मृत्यू होऊन नाना पूर्णतः निर्धास्त झाला परंतु पाठोपाठ ता. २० जून १७९४ रोजी हरिपंत फडके मरण पावल्याने त्याची एक बाजू खचली. 
                               महादजीच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या दौलतराव हा शिंदे घराण्याचा वारस बनला. नाना - महादजी मधील बेबनाव संपुष्टात आला त्या सुमारासच निजाम मराठी राज्यावर आक्रमण करण्याच्या हेतूने बेदरला येउन ठाण मांडून बसला होता. महादजी व हरीपंताचा मृत्यू झाल्यावर त्याने पुणे दरबारसोबत युद्ध करण्याचा निर्णय घेतला. मात्र, निजाम - पेशवे यांच्यात तंटा निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रघुनाथराव आणि इंग्रजांच्या बंदोबस्तासाठी नानाने त्यास जो वेळोवेळी भूप्रदेश तोडून दिलेला होता, तो त्यास आता परत आपल्या ताब्यात घ्यायचा होता आणि ज्याप्रमाणे टिपू दुर्बल होऊन शांत बसला आहे त्याचप्रमाणे निजामालाही थंड करून भविष्यात इंग्रजांना आपल्या विरोधात त्याची कसलीही मदत न व्हावी यादृष्टीने बंदोबस्त करण्याचा त्याचा विचार होता. पण प्रकरण वर्दळीवर आणण्यासाठी काहीतरी खुसपट काढावे म्हणून नानाने निजामाकडे आजवर राहिलेल्या चौथाई - सरदेशमुखीच्या तीन कोटी रुपयांचा ताबडतोब भरणा करण्याचा तगादा लावला. पुणे दरबारास एवढी मोठी रक्कम देण्यास निजाम व त्याचा दिवाण मैनुद्दौला उर्फ मशीरउल्मुल्क बिलकुल तयार नव्हते. त्यांनी नानाची मागणी फेटाळून लढाईची तयारी चालवली. त्यांना वाटले की, महादजी व हरिपंताच्या मृत्यूने पुणे दरबारचे सामर्थ्य आता घटले आहे. परंतु, महादजीच्या मृत्यूमुळे शिंद्याची सर्व फौज एकप्रकारे नानाच्या हुकुमतीखाली आल्याचे निजामाच्या लक्षात आलेच नाही. असो, अखेर दोन्ही पक्ष चीडीस पेटून ता. १० मार्च १७९५ रोजी निजाम - पेशव्यांचा खर्डा येथे मोठा संग्राम घडून आला आणि त्यात निजामाचा पराभव होऊन त्याने तह करून आपल्या सैन्याची होणारी फुकट हानी टाळली. यावेळी झालेल्या तहानुसार उदगीरच्या तहानंतर निजामाने मराठ्यांचा  भूप्रदेश दाबला होता वा प्रसंग पाहून पुणे दरबारने त्यास दिला होता तो सर्व परत देण्याचे निजामाने मान्य केले. तसेच चौथाई - सरदेशमुखीच्या बाकीबद्द्ल ३ कोटी रूपये पुणे दरबारास देण्याचे मान्य करून वर त्याने नानाच्या मागणीनुसार आपल्या दिवाणास पुणेकरांच्या हवाली केले. खर्ड्याचा हा विजय म्हणजे नानाच्या राजकीय कारकिर्दीच्या उत्कर्षाचा परमोच्च बिंदू होता. येथून पुढे त्याच्या राजकीय प्रगतीस उतरती कळा लागण्यास आरंभ झाला. 
                                         स. १७९४ च्या मार्च महिन्यात रघुनाथरावाची पत्नी आनंदीबाई मरण पावली. यावेळी तिचा मुलगा बाजीराव हा १८ - १९ वर्षांचा होता. पैकी त्याच्या आयुष्याची ८ - ९ वर्षे नानाच्या नजरकैदेत गेल्याने त्याच्या मनात नानाविषयी अढी तर बसलेली होतीच, पण त्याशिवाय आपण पेशवे घराण्यातील असल्याचाही त्यास विसर पडला नव्हता. सवाई माधवराव हा त्याचा तसा नात्याने पुतण्याच होता. माधवरावाचा बाजीरावाशी कसलाही संबंध न यावा यासाठी नाना दक्ष होता पण, तरीही बाजीरावाने आपल्या पुतण्यासोबत पत्राद्वारे सुत जुळवण्याचा प्रयत्न केला. सवाई माधवरावाने देखील आपल्या चुलत्याशी गुप्त पत्रव्यवहार करण्यास आरंभ केला पण नानाने तो पकडला आणि याविषयी पेशव्याकडे खुलासा मागितला. आरंभी, बाजीरावासोबत पत्रव्यवहार केल्याचे पेशव्याने नाकारले पण नानाने पुरावाच समोर ठेवल्यावर त्याचा नाईलाज झाला. त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. तेव्हा नानाने बाजीरावाची कैद शक्य तितकी कडक केली. याच दरम्यान खर्ड्याची मोहीम घडून आली आणि स. १७९५ च्या ऑक्टोबरात सवाई माधवराव तापाने आजारी पडला व दि. २५ ऑक्टोबर १७९५ रोजी शनिवारवाड्यातील आपल्या महालाच्या गच्चीतून तोल जाऊन खाली पडला. या अपघातात जखमी होऊन दिनांक २० ऑक्टोबर १७९५ रोजी सवाई माधवराव पेशवा मरण पावला आणि नानाच्या आसनास जबरदस्त हादरा बसला.        
                                अनेक इतिहासकारांनी सवाई माधवरावाच्या अपघाती मृत्यूस आत्महत्येचे स्वरूप दिले असून नानाची करडी शिस्त असह्य झाल्याने पेशव्याने आत्महत्या केल्याचे पुराव्यांनिशी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी, या आरोपाची शहानिशा करण्याचा हेतू नाही परंतु, त्यात कितपत तथ्य आहे तेवढंच येथे बघायचे आहे. राज्यकारभारात पेशव्याला कित्येकदा नानाच्या सल्ल्याने प्रकरणांचा निकाल करावा लागे व त्याचे अल्पवय आणि नानाचा प्रदीर्घ अनुभव पाहता ते स्वाभाविक होते. तसेच खर्ड्याच्या मोहिमेदरम्यान देखील त्यास नानाची करडी शिस्त वा वर्चस्व जाचत असल्याचे उल्लेख आढळून येत नाहीत. बाजीरावासोबत त्याने केलेल्या गुप्त पत्रव्यवहाराचे उठसुठ भांडवल केले जाते परंतु, केवळ त्या एका प्रकरणावरून पेशव्याने इतका टोकाचा निर्णय घेतला असावा असे अनुमान बांधता येत नाही. त्याचप्रमाणे, जर नानाचे वर्चस्व पेश्व्यास खरोखर असह्य झाले असते तर त्याने स्वतः पुढाकार घेऊन महादजी - नानामध्ये सलोखा घडवून आणण्याऐवजी महादजीच्या मदतीने नानाची कारभारातून उचलबांगडी केली असती. तात्पर्य, नानाने सवाई माधवरावाचा छळ वा जाच केला ही सरळसरळ कपोलकल्पित कथा असल्याचे दिसून येते. असो, सवाई माधवरावाच्या निधनाने नानाच्या राजकारणाचा सर्व पायाच ढासळून गेला. सवाई माधवराव निपुत्रिक असल्याने गादीचा वारस निवडण्यासाठी मुत्सद्द्यांच्या बैठकांवर बैठका भरू लागल्या. नाना व त्याच्या पक्षीयांच्या मते, सवाई माधवरावाची पत्नी यशोदाबाई हिला दत्तकपुत्र देऊन त्याच्या नावाने पेशवाईची वसते आणावीत असे ठरू लागले. तर दुसऱ्या एका गटाच्या मते, भट घराण्याचा औरस वंश रघुनाथरावाच्या मुलांच्या रूपाने हयात असताना दत्तकाची उठाठेव का करावी ? या प्रश्नातच नानाचे आणि समस्त मराठी राज्याच्या भवितव्याचे उत्तर दडले होते.
                                                                             ( क्रमशः )  

रविवार, २८ जुलै, २०१३

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस ( भाग - ३ )

    

               
                     मोरोबाचा निकाल लावल्यावर देखील नाना व त्याच्या सहाय्यकांस स्वस्थता लाभली नाही. कारण, स. १७७८ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईची इंग्लिश पलटणे पुण्याच्या रोखाने चालून येऊ लागली होती. या सैन्याला अडवण्यासाठी मराठी सरदारांनी बोरघाटाजवळ चांगली तयारी केली आणि तळेगाव - वडगाववर इंग्रजांचा पराभव करून त्यांना तह करण्यास भाग पाडले. ता. १७ जानेवारी १७७९ रोजी झालेल्या वडगावच्या तहानुसार इंग्रजांनी दादाला शिंद्याच्या ताब्यात दिले. तसेच घेतलेले प्रांत सोडून देण्याचे व बंगालची फौज माघारी पाठवण्याचेही मान्य केले. महादजीने मोठ्या धूर्तपणाने हा तह आपल्या मार्फत घडवून आणला. इंग्रजांशी ठ करताना महादजीने त्यांना कमीत कमी दुखवण्याची दक्षता घेतली. परिणामस्वरूप इंग्रजांनी त्यास भडोचचे ठाणे, त्याखालील मुलखासह बक्षीस म्हणून दिले. वडगावचा तह झाल्यावर दादा महादजीच्या ताब्यात आला. नाना व बापूने त्याची भेट देखील घेतली नाही, तेव्हा बापूच्या या वर्तनाने चिडून जाउन दादाने बापूच्या फितुरीची पत्रे महादजीला दाखवली. तहानुसार दादाला झांशी प्रांतात मोठ्या बंदोबस्ताने रवाना करून महादजीने सखारामबापूस कैदेत घातले. महादजीच्या या खेळीने नानाचा मार्ग काहीसा निष्कंटक झाला. कारण, मोरोबानंतर पुणे दरबारात बापूचं त्याच्या मार्गातील अडथळा होता. मात्र, यासोबतच नानाने हे देखील ताडले की, दादा कैदेदाखल महादजीच्या ताब्यात असल्यामुळेच महादजीने बापूला अटक केली आहे. म्हणजे प्रसंगी आपणांस वाकवण्याचे एक साधन अजूनही शिंद्याच्या हाती आहे ! बापू ठिकाणी बसल्यावर नानाने महादजीचे वर्चस्व झुगारून लावण्यासाठी हरिपंत फडकेला कारभारात घेतले. हरिपंत हा लढवय्या सरदार असल्याने लष्करी बाबतीत आता नानाला महादजीवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. नानाचा हा डाव महादजीने ओळखला पण परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघत बसण्याखेरीज त्याच्या हाती काय होते ? मात्र, उभयतांमध्ये याच सुमारास एक मैत्री करार घडून आला त्यानुसार, दोघांनी प्रसंग पडला असता एकमेकांची पाठराखण करण्याचे मान्य केले. 
                               स्वाऱ्या  - शिकाऱ्या थंडावताच नानाने ता. २१ एप्रिल १७७९ रोजी पर्वतीवर सवाई माधवराव पेशव्याच्या मुंजीचा कार्यक्रम मोठ्या समारंभाने उरकून घेतला. यावेळी हा कार्यक्रम पुण्यात न करता पुरंदरावर करावा असे अनेक सरदारांचे मत होते परंतु, नानाने कोणाचेही न ऐकता हा समारंभ पुण्यात घडवून आणला आणि लागलीच पेशव्याचा शनिवारवाड्यात गृहप्रवेश देखील करवला. यावेळी सर्वांना वाटले कि, आता स्वस्थतेचे दिवस येतील. पण मे महिन्यात सर्वांची मनःशांती हिरावून घेणारा प्रकार घडून आला. शिंदे - होळकरांच्या लष्करी तुकड्यांच्या बंदोबस्तात दादाची स्वारी झांशीला निघाली होती पण, नर्मदेवर दादाने सरदारांच्या फौजेस उधळून लावले आणि तो सुरतेस निघून गेला. दादा पळून इंग्रजांच्या आसऱ्यास गेल्याचे समजताच नानाने महादजीला पत्र पाठवून तातडीने दादाला पकडण्याची सूचना केली. पण पावसाळा तोंडावर आल्याने आणि दादाला इंग्रजांनी फिरून आश्रय दिल्याने महादजीने हे कार्य अंगावर घेतले नाही. त्यामुळे नाना - महादजीमध्ये वितुष्ट निर्माण झाले. नानाच्या आज्ञेनुसार महादजी ताबडतोब दादाच्या पाठीवर न गेल्याने इंग्रज - दादा युतीने गुजरातचा घास घेतला. इंग्रजांच्या आक्रमण शक्तीचे यावेळी सर्वांनाच आकलन झालेले नव्हते. महादजी आपल्या लष्करी बळाच्या घमेंडीत होता पण नानाला मात्र हि चिन्हे काही ठीक दिसत नव्हती. दरम्यान निजामाने इंग्रज विरोधात निजाम, हैदर, पेशवे व भोसले असा चौकडीचा संघ उभारण्याची कल्पना नानासमोर मांडली. हि योजना सर्वांच्याच फायद्याची असल्याने नानाने ती उचलून धरली. हि योजना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आज कित्येक वर्षे हैदर आणि पुणे दरबारचे जे युद्ध चालले होते ते बंद करणे आवश्यक होते. हैदरला नेमके काय हवे आहे याची नानाला कल्पना असल्याने त्याने हैदरला तुंगभद्रा आणि मलप्रभा या नद्यांच्या मधील सर्व प्रदेश देऊन त्यास चौकडीच्या कारस्थानात सहभागी करून घेतले. यामुळे मद्रासच्या इंग्रजांवर हैदरचा शह बसून, आज कित्येक वर्षे हैदरच्या विरोधात लढणाऱ्या मराठी फौजा कर्नाटक आघाडीवरून मोकळ्या होऊन त्यांना इंग्रजांच्या विरोधात वापरण्याची संधी नानास प्राप्त झाली. चौकडीचे हे कारस्थान शिजत असतानाच नाना - महादजी यांचा स. १७७९ च्या अखेरीस बेबनाव दूर होऊन नानाने त्यास जहागीर देऊन राजी केले. तेव्हा कुठे महादजीबावा होळकरांना घेऊन गुजरातमध्ये रवाना झाले !
                      पहिल्या इंग्रज - मराठा युद्धाचा हा उत्तरार्ध होता. आघाडीवर मराठी सरदार लढत होते आणि पुण्यात बसून नाना त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवत होता. देशभर युद्धाचा धडाका उडाला असला तरी अजून पुण्यावर शत्रूच्या आक्रमणाची छाया पडली नव्हती. नेमकी हीच बाब हेरून दादाने इंग्रजांच्या मागे ' आपणांस पुण्याला घेऊन जाण्याची ' टोचणी लावली. त्यानुसार इंग्रज सेनानी गॉडर्ड दादाला घेऊन स. १७७९ च्या आरंभी बोरघाट चढून पुण्याच्या दिशेने येऊ लागला. तेव्हा हरिपंत फडके, तुकोजी होळकर, परशुराम पटवर्धन इ. सरदारांनी त्यांस घाटाखाली पिटाळून लावले. गॉडर्डच्या पराभवाने इंग्रजांना मोठाच हादरा बसला. कारण; त्यावेळी मद्रासमध्ये हैदरने इंग्रजांना जवळपास प्रत्येक रणांत खडे चारून प्रांताची धुळदाण उडवली होती. माळव्यात महादजी पाय रोवून उभा होता. येउन जाउन वसई व गुजरातच तेवढे इंग्रजांना मिळाले होते, पण हैदर - मराठ्यांचा असाच जोर वाढत राहिला तर जिंकले तेही गमवावे लागेल अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण होऊन ग. ज. वॉरन हेस्टिंग्सने प्रथम महादजी सोबत स्वतंत्र तह करून माळव्यातील युद्ध आटोपते घेतले आणि त्याच्याच मार्फत पुणे दरबारशी तह घडवून आणला. ( सालबाईचा तह, स. १७८३ )   या तहानुसार पुरंदर तहाच्या नंतर इंग्रज - मराठ्यांनी जे काही एकमेकांचे प्रांत ताब्यात घेतले होते ते सोडण्याचे मान्य केले,पण साष्टी व लगतची तीन बेटे मात्र इंग्रजांनी आपल्याकडे ठेऊन घेण्याची सवलत प्राप्त करून घेतली. दादाला आपणहून पुणे दरबारच्या स्वाधीन करण्याचे इंग्रजांनी टाळले. पेशव्यांनी इतर युरोपियन राष्ट्रांच्या लोकांस आश्रय देऊ नये अशी जाचक अट इंग्रजांनी घातली आणि पाटीलबावांनी ती मान्य देखील केली. गायकवाडांकडील मागील खंडणी बुडाली. त्याशिवाय तहाच्या पूर्ततेसाठी उभयपक्षीयांच्या वतीने महादजी शिंदे जामीन राहिला. सारांश, पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात वडगावचा तह अपवाद केल्यास पुरंदर वा सालबाईच्या तहात पुणे दरबारचे साफ नुकसान झाल्याचे दिसून येते. मात्र याची सर्व जबाबदारी नानापेक्षा महादजीवर अधिक असल्याचे दिसून येते. महादजीने दिल्लीच्या राजकारणास आणि रोहील्यांच्या बंदोबस्तास वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देऊन व इंग्रजांचे मन राखून पुणे दरबारचे -- पर्यायाने मराठी राज्याचे बरेच नुकसान घडवून आणले. खुद्द नानाने याबाबतीत त्याची कानउघडणी केली असता थातूरमातूर कारणे सांगून त्याने वेळ मारून नेली. 
                            सालबाईच्या तहानंतर रघुनाथराव पुणे दरबारच्या स्वाधीन झाला. मात्र आपल्या रक्षणासाठी पटवर्धन, होळकर इ. सरदारांशी शपथक्रिया करून घेतली. पुढे लवकरचं म्हणजे ता. ११ डिसेंबर १७८३ रोजी कोपरगावी त्याचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने विधीवत प्रायश्चित्त घेताना नारायणरावाच्या खुनात आपला सहभाग असल्याची कबुली दिली होती. असो, दादाचा अवतार समाप्त झाल्याने नाना आता बिनघोर झाला. शांत चित्ताने त्याने दक्षिणेतील राजकारणाकडे आपले लक्ष केंद्रित केले. महादजीने मोठ्या मिजाशीने पुणे दरबार व इंग्रजांच्या दरम्यान जामीन राहून सालबाईचा तह घडवून आणला. त्या तहातील काही कलमे पुणे दरबारचा मित्र हैदरअली याच्यासाठी जाचक अशी होती. सालबाईचा तह बनत असताना हैदरचा मृत्यू होऊन टिपू सुलतान हा राज्याचा उत्तराधिकारी बनला. सालबाईच्या तहान्वये मराठ्यांनी आपल्या बापाचा विश्वासघात केल्याची त्यास टोचणी लागून राहिली. सध्या तरी म्हैसूर व पुणे दरबारचा तह कायम असल्याने त्याने इंग्रजांशी युद्ध सुरु ठेऊन त्यांचा उच्छेद आरंभला. तेव्हा महादजीच्या मार्फत इंग्रजांनी पुणे दरबारची टिपू विरुद्ध मदत मागितली. त्यावेळी परस्पर टिपूशी तह कोणी करू नये या अटीवर नानाने टिपूच्या विरोधात मराठी फौजा रवाना केल्या. परंतु तत्पूर्वीच मद्रासच्या इंग्रजांनी स. १७८४ च्या मार्चमध्ये टिपूसोबत पुणेकरांना आगाऊ सूचना न देत किंवा आपल्या गव्हर्नर जनरलची परवानगी न घेत परस्पर तह करून पुणे दरबारास तोंडघशी पाडले.  या घटनेने हेस्टिंग्स व महादजी दोघेही अडचणीत सापडले. मद्रासकरांनी गव्हर्नर जनरलच्या परवानगी शिवाय तह केल्याने हिंदुस्थानातील ब्रिटीश कंपनीच्या कारभारात विसंगती असल्याचे दिसून आले. ज्या हेस्टिंग्सने, मुंबईकर इंग्रजांनी वडगावचा तह आपणांस न विचारता केल्याचे कारण सांगून मराठ्यांशी देशभर युद्ध पुकारले होते त्याच हेस्टिंग्सला आता मद्रासकरांच्या या कृत्याचे समर्थन करून पुणेकरांच्या समोर आपली लाज वाचवण्याची धडपड करावी लागली. इंग्रजांच्या या दुटप्पी वर्तनाने नाना इंग्रजांच्या पेक्षाही महादजीवर अधिक संतापला. बिचारा महादजी ! कावेबाजपणात इंग्रज आपणांस भारी असल्याचे त्यास उशिरा का होईना लक्षात आले. परंतु उघडपणे आपली चूक कबूल न करता त्याने गोड बोलून हि वेळ मारून नेली. 
                                   इंग्रजांच्या मदतीसाठी पुणे दरबारने टिपूच्या विरोधात युद्ध पुकारून त्याचे शत्रुत्व ओढवून घेतले होते. तेव्हा आता इंग्रज मदतीस येवो न येवो, टिपूचा बंदोबस्त करण्याचे कार्य हाती घेण्याचे नानाने यावेळी ठरवले होते. यामागे दोन कारणे प्रमुख होती. पहिले कारण म्हणजे, चौकडीच्या कारस्थानात जो मुलुख हैदरला तोडून देण्यात आला होता तो परत मिळवणे आणि दुसरे कारण म्हणजे, टिपूने हिंदूंना बाटवून सक्तीचे धर्मांतर कार्य चालवले होते त्यास आळा घालणे हे होय ! जे कृत्य करण्यास निजामासारखा बलवान सत्ताधीश देखील कचरत होता, ते सक्तीचे धर्मांतराचे कार्य टिपूने मोठ्या धडाक्याने सुरु केले होते. त्याची दखल घेणे नाना फडणीसास भागच होते. मात्र टिपूचा बंदोबस्त करण्याचे कार्य हाती घेण्यापूर्वी त्याने खबरदारी म्हणून निजाम आणि इंग्रजांना राजी राखण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रथम त्याने, कलकत्त्यास पत्र लिहून पुणे दरबारी इंग्रज वकील पाठवण्याची सूचना केली. वस्तुतः, सालबाईच्या तहानुसार महादजीच्या पदरी इंग्रज वकील होता. मात्र यामुळे महादजीचे प्रस्थ अतोनात वाढून व्यवहारात पुणे दरबार दुय्यम ठरून महादजीला महत्त्व येऊ लागले. पुणेकरांना इंग्रजांशी जो व्यवहार करावा लागे त्यात महादजीची मध्यस्थी अपरिहार्य ठरे, तसेच महादजीच्या मार्फत हा व्यवहार उलगडण्यास बराच कालावधीही लागे. हे टाळण्यासाठी नानाने कलकत्त्यास पत्र लिहून पुणे दरबारी स्वतंत्र इंग्रज वकिलाची मागणी केली. नानाच्या मागणीनुसार इंग्रज वकिलाचे पुणे दरबारी आगमन होण्यास स. १७८६ चा मार्च महिना उगवावा लागला. इंग्रजांचा वकील पुणे दरबारी मागवण्याची खटपट केल्यावर नानाने स. १७८४ च्या मध्यावर निजामाची भेट घेऊन टिपूविरोधी मोहिमेत त्यास सहभागी करून घेतले. निजामाला आपल्या सोबत घेण्यामागील नानाचा प्रमुख हेतू म्हणजे टिपूला निजामाची मदत मिळू नये हा होय. टिपूचा बंदोबस्त स्वबळावर करण्यात पुणे दरबार तितकासा समर्थ नसल्याची नानास जाणीव होती. निजामाची उघड मदत घेऊन आपण आपले दौर्बल्य शत्रूस उघड उघड करून दाखवत आहोत हे देखील त्यास समजत होते. परंतु, निव्वळ स्वबुद्धीच्या बळावर त्याने हा साहसी डाव मांडला. याचसोबत नानाने आणखी एक क्रांतिकारी पाउल उचलले व ते म्हणजे आजपर्यंत शिंदे - होळकर यांच्या सत्तास्पर्धेत पेशव्यांनी नेहमी शिंद्यांची पाठराखण केली होती, परंतु सध्याच्या सत्तेच्या चुरशीमध्ये नानाने होळकरास हाताशी धरून शिंद्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आरंभला. नानाने होळकरांना हाताशी धरण्याचे जे धोरण अवलंबिले त्याचे मर्म महादजीच्या लक्षात येण्यास जवळपास ४ - ५ वर्षांचा काळ उलटून जावा लागला. याचे प्रमुख कारण म्हणजे होळकर घराण्यातील अंतर्गत कलह होय !
                                  मालेराव होळकराच्या मृत्यूनंतर मल्हारराव होळकराचा वंश संपुष्टात आला होता. सरदारकीचा सर्व कारभार जरी अहिल्याबाई होळकर करत असली तरी लष्करी जबाबदारी पेलण्यास तिला मर्यादा असल्याने मल्हारराव होळकराच्या हाताखाली वाढलेला सरदार तुकोजी होळकरवर तिने लष्करी जबाबदारी सोपवली. मात्र, असे करताना सर्व मुख्य सूत्रे बाईंनी आपल्याच हाती राखून ठेवण्याची दक्षता तेवढी घेतली होती. लौकिकात जरी तुकोजी स्वतःस मल्हाररावाचा पुत्र म्हणवत असला तरी त्याचा रीतसर दत्तकविधी असा झालाच नव्हता. होळकरांची सरदारकी तुकोजीस प्राप्त झाल्यावर काही काळातचं त्याचे अहिल्याबाईशी वितुष्ट येऊ लागले. यामागील मुख्य कारण म्हणजे होळकरांच्या खजिन्यावर कोणाची मालकी असावी हे होय ! नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर जवळपास १० वर्षे सर्वच मराठी सरदारांना प्रमाणाबाहेर फौजा बाळगाव्या लागल्या होत्या. तुकोजीही यास अपवाद नव्हता. पण, होळकरांच्या पद्धतीनुसार दिवाणी कारभार अहिल्याबाईच्या ताब्यात असल्याने पैशांसाठी त्यास बाईंकडे वारंवार याचना करावी लागे. तुकोजीने पैशांची मागणी केली कि बाई त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असे. याचे कारण असे की, मुलूखगिरीवर फौजेचा खर्च परस्पर बाहेर  भागवावा असे तिचे मत होते. त्याशिवाय तुकोजी हा पैशांची निरर्थक उधळपट्टी करतो अशी तिची समजूत होती. याचा परिणाम म्हणजे, होळकरांचे लष्कर कोणतीही मोहीम पार पाडण्यास हळूहळू असमर्थ बनू लागले. कारण, पुणे दरबारने तुकोजीवर मोहीम सोपवावी आणि त्याने ती पार पाडण्याचा प्रयत्न करावा तर त्याचे सैन्य पगारासाठी धरणे धरून त्यास पुढे जाऊ देत नसे. याचा परिणाम म्हणजे महादजी शिंद्याचे प्रस्थ वाढत जाउन तुकोजी होळकर मागे पडू लागला. तुकोजी - अहिल्याबाईच्या वादात महादजीने अहिल्याबाईचा पक्ष घेतला तर नानाने तुकोजीचा !   
                     महादजीने अहिल्याबाईची बाजू घेण्यामागे काही कारणे निश्चित होती. मल्हारराव होळकराने व अहिल्याबाईने पानिपतनंतर महादजीला बऱ्यापैकी मदत केली होती. तसेच मरतेसमयी मल्हाररावाने महादजीकडून, प्रसंगी मालेराव व अहिल्याबाई यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे संरक्षण करण्याची शपथ देखील घेतली होती. त्यास अनुसरून तुकोजी - अहिल्याबाई वादात महादजीने अहिल्याबाईचा पुरस्कार केला. त्याउलट नानाने बाजू होती. दक्षिणेत त्याचे भरवशाचे सरदार फडके, पटवर्धन इ. असले तरी महादजीच्या तोडीचा म्हणून नानाने तुकोजीला जवळ केले होते. लष्करी कामगिरीत तुकोजी नालायक असल्याचा जो गवगवा  काही मान्यवर इतिहासकारांनी केला आहे तो साफ चुकीचा असून याच तुकोजीने प्रसिद्ध अटक स्वारीत मोठा पराक्रम गाजवला होता. इतकेच नव्हे तर शिंद्यांच्या वतीने साबाजी शिंदे आणि होळकरांच्या वतीने तुकोजी हे दोघेही सुमारे वर्षभर सरहिंद ते अटक पर्यंतच्या प्रांतात तळ ठोकून राहिले होते. कित्येक प्रसंगी त्यांनी सिंधूपार गिलचे, गक्कर यांचे बंड मोडून काढल्याचे इतिहासात नमूद आहे. त्याशिवाय नुकत्याच झालेल्या पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात गॉडर्डला बोरघाटात रोखण्याचे श्रेय देखील तुकोजीकडे जाते. अशा पराक्रमी तुकोजीला हाताशी धरून नाना महादजीला शह देऊ पाहत होता. दिवाणी कारभार अहिल्याबाईकडे असल्याने तिच्याकडून तुकोजीला वेळेवर आर्थिक पुरवठा व्हावा अशी नानाची अपेक्षा होती पण, या बाबतीत अहिल्याबाई मुद्दाम दिरंगाई करत असल्याने नानाने महादजीला कळवले कि, खासगी खर्चापुरते बाईंना महाल तोडून देऊन बाकीचे सर्व महाल तुकोजीच्या हवाली करण्यासाठी अहिल्याबाईंचे मन वळवा ! या गोष्टीला महादजीने ठाम नकार तर दिलाच पण अहिल्याबाईने देखील नानाच्या वकिलास सुनावले की, " मी सुभेदारांची सून आहे. केवळ तुकोजीबावाच दौलतीचे धनी आणि मी कोणी नाही, असे समजू नका. तुकोजीबावा माझे हातचे कामास लावलेले आहेत. निमकहरामीचे फंद केल्यास आणि दौलत करू म्हटल्यास त्या गोष्टी दुरापास्त आहेत. त्यांस पाटीलबावांस दम असेल तर उभयतांनी फौज सुद्धां मजवर चालून यावे, श्रीमार्तंड समर्थ आहे. "    या प्रसंगामधून अहिल्याबाईच्या मनात होळकर घराण्याविषयी असलेला अभिमान व आत्मविश्वास जसा दिसून येतो, त्याचप्रमाणे तिच्या बाणेदार, लढवय्या आणि करारी स्वभावाचे दर्शन घडून येते. वकिलाने बाईंचे हे शब्द नानास कळवले, तेव्हा प्रसंगी बाई पुणे दरबार विरोधात शस्त्र देखील उपसण्यास मागे - पुढे पाहणार नाही याबाबत त्याची खात्री पटली. इतउत्तर अहिल्याबाईस अधिक न दुखवता त्याने तुकोजीला बगलेत मारले. पण त्या तंट्यात महादजीने स्वीकारलेल्या भूमिकेमुळे तुकोजी आणि त्याच्या पुत्रांच्या मनात शिंद्यांच्या विरोधी चांगलीच अढी निर्माण झाली. 
                                   स. १७८४ मध्ये राजकीय आघाडीवर नाना आपले जाळे विणत असताना टिपूने त्यास एक जबरदस्त हादरा देऊन आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवली. निजाम - पुणे दरबार यांच्या गुप्त मैत्री कराराची कुणकुण टिपूला लागली होती. तेव्हा त्याने पुणे दरबारी तहाची वाटाघाट करण्यासाठी आपला वकील पाठवला आणि स. १७८५ च्या आरंभी नरगुंद संस्थानास वेढा घातला. नरगुंदचे संस्थान मुळात पेशव्यांचे मांडलिक असून चौकडीच्या कारस्थानात नानाने ते हैदरअलीस दिले होते. परंतु, तेथील संस्थानिक भावे, हे पटवर्धनांचे आप्त असल्याने त्यांनी अनेकदा हैदर व टिपूची ताबेदारी झुगारून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना धडा शिकवण्यासाठी टिपूने डाव टाकला आणि दुर्दैवाने  नाना व नरगुंदकर त्यात फशी पडले. टिपूचा वकील पुणे दरबारी तहाची बोलणी करत असताना टिपूच्या फौजांनी नरगुंद ताब्यात घेतले. त्यावेळी परशुराम पटवर्धन जवळच होता आणि त्याने नरगुंदच्या बचावासाठी जाण्याविषयी नानाकडे परवानगी देखील मागितली. परंतु, टिपूच्या वकिलाशी बोलण्यात गुंग झालेल्या नानाने परशुरामभाऊच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि शत्रू चालून आला तरच त्याचा प्रतिकार करण्याची सूचना केली. परंतु, भाऊने नरगुंदच्या बचावास जाऊ नये अशी साफ आज्ञा दिली. त्याच्या मते आपली व निजामाची तयारी झाल्यावर मग टिपूवर मोहीम काढण्याचे आधीच निश्चित झाले होते. नरगुंद प्रकरणी हस्तक्षेप केला असता अपुऱ्या तयारीनिशी टिपूसोबत युद्ध करून पदरी फक्त पराभवचं पडणार होता. त्यामुळे त्याने पटवर्धनांना अडवून धरले. परिणामी, नरगुंद संस्थान टिपूच्या ताब्यात गेले. तेथे त्याने आपले नेहमीचे अत्याचार केले आणि लगोलग कित्तूरवर त्याचे मोर्चे बसले. नरगुंदप्रमाणेच कित्तूरकर देखील पेशव्यांचे मांडलिक होते, पण मराठी फौजांच्या देखत टिपूने नरगुंद घेतल्याचे पाहून कित्तूरने शरणागती पत्करली. मात्र, कित्तूरमध्येही टिपूने नरगुंदच्या अत्याचारांची पुनरावृत्ती केली. परशुरामभाऊस या सर्व प्रकरणाचा इतका उबग आला कि, टिपूवरील पुढे निजाम - पेशव्यांच्या संयुक्त स्वारीत त्याने बिलकुल सहभाग घेतला नाही. स्वबळावर नरगुंद व कित्तूरचा बचाव करण्यास तो समर्थ होता पण नानाने त्यास परवानगी न दिल्याने तो मनातून नाराज झाला. नरगुंद व कित्तूरच्या उदाहरणांनी नानाचे डोळे उघडले.  त्याने टिपूवरील स्वारीची तयारी जोरात चालवली पण सर्व सरदारांची मर्जी राखण्याच्या उद्योगात मराठी फौजा म्हैसूरच्या दिशेने रवाना होण्यास स. १७८६ चा उन्हाळा उगवला. प्रसंगी माघार घेण्याची वेळ  ओढवू नये यासाठी नानाने नागपूरकर भोसल्यांनाही आपल्या मदतीस घेतले. अखेर स. १७८६ च्या एप्रिलमध्ये नानाच्या नेतृत्वाखाली निजाम - पेशव्यांची संयुक्त सेना टिपूवर चालून गेली. खुद्द नानाने यावेळी सैन्याचे नेतृत्व करून बदामीचा किल्ला २० दिवसांत जिंकला. याप्रसंगी मराठी सैन्याची बरीच हानी झाली पण २० दिवसांत बदामीसारखे मजबूत स्थळ हाती आल्याने सरदारांचा आत्मविश्वास बराच दुणावला. बदामीचा किल्ला ताब्यात येताच नानाने हरीपंतास सैन्याचे नेतृत्व सोपवून पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. नाना जाणार म्हटल्यावर मुधोजी भोसल्यानेही प्रकरणातून अंग काढून घेतले आणि बिचाऱ्या हरीपंतावर होळकर, भोसले, निजाम व पेशवे यांच्या विस्कळीत संयुक्त फौजेकडून टिपूच्या सुसज्ज व एकसंध सैन्याचा मुकाबला करण्याचा प्रसंग ओढवला !  बदामीनंतर निजाम - पेशव्यांची टिपूवरील मोहीम रेंगाळत चालली. चार दोन प्रसंगांचा अपवाद केल्यास टिपूने ठिकठीकाणी मराठी फौजांचा चांगलाच समाचार घेतला आणि स. १७८७ मध्ये आपणहून त्याने पेशव्यांशी तह करून युद्ध थांबवले. या मोहिमेने पेशव्यांचे वा निजामाचे कसलेही हित साध्य झाले नाही. त्याउलट टिपूच्या फौजांची या स्वारीत जी हानी झाली त्याचा फायदा इंग्रजांना मात्र भरपूर मिळाला. 
                           कर्नाटकात मराठी फौजा टिपूसोबत लढत असताना याचवेळी उत्तरेत महादजी शिंदेने मोगल बादशहाकडून पेशव्यांच्या नावे बादशाही कारभारातील सर्वश्रेष्ठ असे वकील - इ - मुतलकीचे पद स्वीकारून राजपुतांवर स्वारी करून लालसोट येथे राजपूत - मोगलांकडून सपाटून मार खाला होता. लालसोटच्या पराभवाने महादजीला डीगपर्यंत माघार घ्यावी लागली. तेव्हा टिपूवरील स्वारी संपताच स. १७८७ च्या पावसाळयानंतर नानाने पहिल्या बाजीराव पेशव्याचा नातू व समशेरबहाद्दरचा पुत्र अलीबहाद्दार आणि तुकोजी होळकर यांना महादजीच्या मदतीस तातडीने पाठवले. परंतु, महादजीविषयीच्या असूयेने आणि फौजेच्या देण्याने उत्तरेत पोहोचण्यास तुकोजीला स. १७८८ चालाचा उत्तरार्ध उजडावा लागला. महादजीच्या मदतीस जाण्यास तुकोजीने दिरंगाई केल्यामुळे अलीबहाद्दारने देखील महादजीच्या सहाय्यास जाण्यासाठी विशेष उत्सुकता दाखवली नाही. अर्थात, तुकोजी - अलीबहाद्दारच्या या वर्तनास थोडीफार नानाची देखील फूस होतीच ! महादजीचे उत्तरेत प्रस्थ वाढणे नानाला खपण्यासारखे नव्हते. त्याने तुकोजीच्या मार्फत राजपुतांशी स्वतंत्रपणे व्यवहार करण्यास आरंभ केला. बऱ्याच इतिहासकारांनी याबाबतीत नानास सडकून दोष दिला आहे. परंतु, वस्तुस्थिती पाहता नानासमोर याखेरीज दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येते. 
                               स. १७८४ अखेर महादजीने पेशव्याचे नावे ' वकील - इ - मुतलकी ' व मीरबक्षीचे पद मोगल बादशहाकडून मिळवले होते. पैकी वकील - इ - मुतलकी म्हणजे बादशहा खालोखाल ज्याचा अधिकार समजला जातो अशा पदाची सत्ता या वेळी पेशव्यांना प्राप्त झाली. परंतु पेशवे यावेळी दूर दक्षिणेत असल्याने पेशव्यांची नायाबी बादशहाने महादजीला दिली. याचा परिणाम म्हणजे उत्तरेतील किंवा समग्र हिंदुस्थानातील सत्ताधीशांशी शिंद्यांचा दुहेरी संबंध जुळला. एक, पेशव्यांचा सरदार म्हणून आणि दुसरा, मोगल बादशहाचा प्रतिनिधी म्हणून ! एकप्रकारे एकाचवेळी दोन धन्यांची चाकरी करण्याची जबाबदारी महादजीने गळ्यात बांधून घेतली. अर्थात, यामागे स्वतःचे महत्त्व आणि सामर्थ्य वाढवण्याचा त्याचा उद्देश असल्याने त्याने त्यादृष्टीने प्रयत्न करण्यास आरंभ केला व राजपूत - मोगलांकडून लालसोटवर मार खाल्ला ! पेशवे व दिल्ली दरबारची चाकरी करण्यामागील शिंदेच्या हेतूंची नानास कल्पना असल्याने त्याने पेशव्यांच्या हितास प्राधान्य देऊन तुकोजी मार्फत राजपुतांची प्रकरणे निकाली काढण्यास सुरवात केली. परंतु, आर्थिक दैन्यामुळे तुकोजीकडून अपेक्षित कार्यभाग साधला न गेल्याने उत्तरेच्या राजकारणातून नानाने आपले मन व लक्ष काढून घेतले. मात्र, अलीबहाद्दारला त्याने बाजीराव पेशव्याच्या खासगी जहागिरीचा बंदोबस्त करण्याच्या कामी बुंदेलखंडात जाण्याची आज्ञा पाठवली. दिल्ली दरबारातील महादजीच्या वाढत्या वजनाचा धार्मिक क्षेत्रात फायदा उचलण्याचा नानाने वारंवार प्रयत्न केला. मथुरा, काशी, प्रयाग, अयोध्या इ. हिंदूंची तीर्थक्षेत्रे मुसलमानांच्या हातातून सोडवण्यासाठी महादजीने खटपट करावी तसेच काशीविश्वेश्वराचे मंदिर पाडून औरंगजेबाने तेथे मशीद उभारली होती. तेव्हा तिथे मशीद पाडून त्या ठिकाणी पूर्ववत मंदिर बांधावे अशी नानाने महादजीस सारखी टोचणी लावली. पैकी, मथुरा - वृंदावन तेवढे मोकळे करण्यात महादजीला यश आले. काशीचा प्रश्न राजकीय असल्याने त्याने नानाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. मात्र, स. १७८९ मध्ये महादजीने मोगल बादशहास सबंध हिंदुस्थानात गोवध मनाईचे फर्मान काढण्यास भाग पाडून एक मोठीच कामगिरी बजावली !
                                                                          ( क्रमशः )  

गुरुवार, २५ जुलै, २०१३

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस ( भाग - २ )

                                     
                       ( सवाई माधवराव पेशवा आणि नाना फडणीस )
             सवाई माधवराव पेशव्याच्या जन्मानंतर बारभाई मंडळात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष अशी अस्वस्थता माजू लागली. यावेळी बापू व नाना हे दोघे मुख्य कारभारी असून या दोघांच्या नजरेसमोर वेगवेगळी उद्दिष्ट्ये तरळत होती. सखारामबापूच्या दृष्टीने पाहता, त्याच्यासमोर काही मुलभूत प्रश्न उभे होते. सवाई माधवरावाच्या जन्मामुळे दादा आता निव्वळ बंडखोर बनला असला तरी त्याच्या बंडाचा बीमोड कसा करायचा हा मोठा प्रश्नचं होता. बापू हा हा फौजबंद सरदार नसल्याने दादाला आपण कायमस्वरूपी कैदेत ठेवू असा त्यास बिलकुल विश्वास नव्हता. दादाला मारून टाकण्याचा पर्याय त्याच्या समोर उपलब्ध होता पण कितीही झाले तरी बापू जुन्या वळणाचा मुत्सद्दी असल्याने त्याच्या मनात असा विचार आला तरी त्याने त्यांस थारा दिला नाही. रघुनाथराव कसाही असला तरी तो आपल्या घराण्याला उर्जीतावस्थेला आणणाऱ्या भट घराण्याचा वंशज आहे हि भावना केवळ बापूच्याच नव्हे तर राज्यातील सर्वचं लहान - मोठ्या अधिकाऱ्यांच्या मनात जागृत होती. त्यातचं बापूचे वय झाल्याने आणि पोटी पुत्रसंतान नसल्याने त्याच्या अधिकारलालसेस आणि महत्त्वकांक्षेस अनेक मर्यादा पडल्या होत्या. खेरीज, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवाई माधवरावास आता प्रतिस्पर्धी असे दोनचं प्रमुख इसम होते. एक रघुनाथराव व दुसरा त्याचा दत्तक पुत्र अमृतराव ! पैकी, दादा हा नारायणाचा खुनी असल्याने त्यास पेशवा म्हणून सरदार व मुत्सद्दी मंडळाकडून मान्यता मिळणे शक्य नव्हते पण त्याचा दत्तकपुत्र अमृतराव हा तर त्याबाबतीत निर्दोष असल्याने पुढे - मागे पेशवाईवर तो हक्क सांगू शकत होता. तसेच सवाई माधवराव हा अगदीच अल्पवयीन असून तो किती काळ जगतो, पुढे तो सद्गुणी निघतो कि दुर्वर्तनी इ.चाही भरवसा नव्हता. तात्पर्य, दादाला राजी राखून पण कैदेत ठेवून भटवंश संपुष्टात न आणता पेशवाई त्याच वंशाकडे कायम राहावी या दृष्टीने बापू धडपडू लागला. 
               याउलट नानाचा दृष्टीकोन होता. यावेळी नानाचे वय सुमारे ३२ वर्षांचे असून तो ऐन तारुण्यात होता. अधिकारलालसा आणि महत्त्वकांक्षा त्याच्या ठायी जबरदस्त होती. भट घराण्याशी जरी त्याचे वाडवडिलांपासून ऋणानुबंधाचे नाते असले तरी त्याविषयी तो तितकासा भावनिक देखील नव्हता. मात्र, पेशवाई हि भट घराण्याकडेच कायम राहिली पाहिजे हे बापूप्रमाणेचं त्याचेही ठाम मत होते. पण त्यासोबत आपले हित, स्वार्थ देखील साधले गेले पाहिजेत याकडेही त्याचे पुरेपूर लक्ष होते आणि मुख्य म्हणजे पेशवेपदाची अप्रत्यक्ष सत्ता हाती घेण्याची -- राज्यक्रांतीची वेळ आता चालून आली आहे याची चाहूल त्याच्या महत्त्वकांक्षी आणि धोरणी स्वभावास लागली होती. बापूप्रमाणेचं नाना देखील लाशाक्री बाबतीत सर्वथैव दुर्बल होता. त्याच्या हाती सरंजामी अशी चार दोन हजारांची फौज होती. त्या बळावर तो दादा वा इतर कोणा प्रबळ सरदारासोबत उघड सामना शकत देऊ शकत नव्हता. पण, त्याचे बुद्धीसामर्थ्य अफाट होते आणि त्यावरचं त्याचा सर्व भरवसा होता ! बापूप्रमाणे दादाचे वा अमृतरावाचे पुढे काय करायचे हा प्रश त्याला पडला नाही. आपण दादाला मारून टाकू शकत नाही याची नानाला जाणीव होती. त्याचप्रमाणे त्याला व त्याच्या परिवाराला आपण कायमस्वरूपी कैदेत ठेवू शकतो हा आत्मविश्वास देखील त्यास होता. त्रिंबकराव पेठे जरी आता हयात नसला तरी हरिपंत फडके, आपा बळवंत, पटवर्धन इ. प्रमुख दक्षिणी सरदारांच्या बळावर आपण दादाचा बंदोबस्त सहज करू असा त्यास विश्वास होता. सवाई माधवराव अल्पवयीन असल्याने तो सज्ञान होईपर्यंत सर्व सत्ता नानाच्या हाती राहणार होती. माधवराव अल्पायुषी ठरला अथवा दुर्वर्तनी निघाला तर त्याचाही पर्याय त्याने मनाशी योजून ठेवला होता. एकूण, पेशव्यांच्या सर्वाधीकाराची प्राप्ती करून घेण्याची संधी नानासमोर चालून आलेली होती. परंतु, अजून फळ पूर्णतः पिकलेलं नव्हतं. तसेच या फळाचा गंध नानासोबत इतरांच्याही नाकास लागला होता. पैकी या फळाचा प्रमुख इच्छुक होता, नानाचा चुलतभाऊ मोरोबादादा फडणीस ! पण त्याचा आवाका आणि त्यास असलेले पाठबळ अगदीच अल्प होते. त्याशिवाय सखारामपंत देखील होते. पण या वृद्धाच्या पाठीशी प्रबळ सरदार मंडळी नसल्याने त्याची उपद्रव क्षमता मोरोबापेक्षाही कमी होती. परंतु त्याचे राजकीय वजन लक्षात घेत तूर्त तरी त्याला गोंजारण्याचे धोरण स्वीकारून राहाणे नानास भाग होते. राहता राहिले शिंदे आणि होळकर ! हे दोनचं सरदार आपले खरे प्रतिस्पर्धी असणार याचा अचूक अंदाज नानाने आपल्या मनाशी बांधला होता. 
              चतुर आणि धोरणी नानाने पुढील घटनांविषयी आपल्या मनाशी काही ठोकताळे बांधलेले होते. बालपेशव्याचे संगोपन, संरक्षण व त्याचे शिक्षण या जबाबदाऱ्या अतिशय अवघड आणि तितक्याच नाजूक होत्या. सखारामबापू हा उघड उघड दादाचा पक्षपाती असल्याने तो स्वतःहून बालपेशव्याची जबाबदारी घेणार नाही आणि त्याने तशी घेण्याचा प्रयत्न केला तरी इतर लोक त्याकडे बालपेशव्यास सोपवणार नाहीत. आणि त्याउपर देखील बालपेशवा बापूच्या हाती गेला व दुर्दैवाने त्यास काही दगाफटका झाला तर बापूचीच मान कापली जाणार होती. शिंदे - होळकरांचा प्रश्न जर वेगळा होता. होळकरांचे सर्व हितसंबंध उत्तरेत असल्याने अहिल्याबाई दक्षिणेत येउन पेशव्याची जबाबदारी आपल्या गळ्यात घेणार नाही हे उघड होते. तुकोजी हा सरदार असल्याने तो या कामास योग्य नव्हता. त्यामुळे होळकरांचा प्रश्न तर निकाली निघाला. राहता राहिला महादजी शिंदे, तर त्याच्या बाबतीत मात्र निश्चित असे काही आडाखे बांधणे शक्य नव्हते. होळकरांचा कारभार द्विमुखी असल्याने त्यांचे सामर्थ्य विभागलेलं होतं. त्याउलट महादाजीची परिस्थिती होती. होळकरांप्रमाणेच शिंद्यांचे देखील हितसंबंध उत्तरेत गुंतले असले तरी महादजी अजून त्यात विशेष असा गुरफटला नव्हता. त्याशिवाय त्याचा मूळ स्वभाव आणि कर्तुत्व अजूनही स्वतंत्र असे झळकले नसल्याने त्याच्या विषयी अंदाज बांधणे इतरांना तितकेसे सोपे नव्हते. परंतु, फडणीस पदावर कार्यरत असल्याने नानाच्या नजरेला जे काही महादजीचे रूप पडले होते ते इतरांपेक्षा वेगळे होते. 
                    सारांश, नाना फडणीसाच्या समोर त्यावेळी फक्त एक महादजी शिंदेच तेवढा प्रतिस्पर्धी होता. त्याच्याइतकाच सावध, चतुर, प्रसंगावधानी, स्वार्थी, पेशव्यांचा अभिमानी व महत्त्वकांक्षी अशा महादजीचा आपणांस पुढेमागे अडथळा होणार हे नाना ओळखून होता आणि त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे देखील त्याने मनाशी योजले होते. परंतु, या सर्व लांबच्या गोष्टी असून तुर्तास, बालपेशव्याचा आणि स्वतःचा बचाव कसा करायचा हा त्याच्यापुढे यक्षप्रश्न होता. कारण, कासेगावची लढाई जिंकून दादा पुरंदरच्या दिशेने येऊ लागला होता. परंतु, नानाची समस्या दादानेच आपणहून सोडवली आणि तो माळव्याकडे निघून गेला. दादाच्या प्रत्यक्ष आक्रमणाचा धोका तात्पुरता टळल्यावर नाना - बापूने इतर महत्त्वाच्या प्रश्नांना हात घातला. नारायणरावाच्या खुनात सहभागी असलेल्यांना पकडून देहांत शिक्षा देण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. शेजारच्या सत्ताधीशांना पत्रे पाठवून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शिंदे - होळकरांना खलिते पाठवून दादाला नर्मदापार करू न देण्याची सूचना करण्यात आली. दादा आपणहून उत्तरेत गेल्याने नानाची एक चिंता मिटली असली तरी दुसरी निर्माण झाली होती. शिंदे वा होळकर यांपैकी एकाने जरी दादास हाताशी धरून बालपेशव्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास आपले काय होईल ? नानाची काळजी अगदीच अनाठायी नव्हती. दादा उत्तरेत येत असल्याचे पाहून शिंदे - होळकरांच्या, विशेषतः महादजीच्या महत्त्वकांक्षेला पालवी फुटली. बालपेशव्याला हाताशी धरून सत्ता गाजवण्याची नानाची इच्छा अजून कोणाच्या ध्यानात आली नव्हती. महादजी मात्र त्यास अपवाद होता ! त्याने प्रथम होळकरांना आपल्या बाजूला वळवले आणि दादाच्या पाठलागावर असलेल्या हरीपंतास सांगितले की, आम्ही दादाला नर्मदापार करून देत नाही. त्याचवेळी दादा विनासायास नदीपार कसा होईल याचीही त्याने दक्षता घेतली. शिंद्यांच्या भरवशावर हरिपंत दादाचा पाठलाग करत पुढे आला नाही. याचा फायदा घेऊन शिंद्याने दादाशी आपले संधान बांधण्याचा यत्न केला. दादाची मर्जी प्रसन्न करून नानाला शह देण्याची त्याची योजना होती. मात्र, दादा हा काही भोळासांब नव्हता. शिंदे - होळकरांचे खेळ त्यास परिचित असल्याने माळव्यात येण्यापूर्वीचं त्याने गुजरातमध्ये गायकवाड आणि इंग्रजांशी सुत जुळवले होते व या गोष्टीची नाना किंवा महादजीला कल्पना नव्हती ! 
                     माळव्यात शिंदे -  होळकरांशी निरर्थक वाटाघाटी करत दादाने कालहरण केले आणि गुजरातमध्ये इंग्रजांच्या आश्रयास जाण्याची योजना आखली. इकडे, शिंदे - होळकर दादाला घेऊन पुण्याच्या रस्त्याला लागले. दादा पुण्यापर्यंत येईल न येईल या आशंकेने बापू - नाना हे दोघे शिंदे - होळकरांमार्फत दादाची भेट घेण्यासाठी तापीच्या दिशेने रवाना झाले. दादाला ताब्यात घेऊन सर्व सत्ता हाती बळकावण्याची संधी यावेळी नानासमोर चालून आली होती पण दैव नानाला अनुकूल नव्हते ! स. १७७४ अखेर दादाच्या भेटीसाठी बापूसोबत नाना पुरंदरावरून निघून गेला आणि इकडे पूर्वसंकेतानुसार मुंबईकर इंग्रजांनी साष्टी प्रांतावर हल्ला चढवून ठाण्याचा किल्ला ताब्यात घेतला. इंग्रजांनी उचल खाण्यापूर्वीचं दादा हरिपंतासह शिंदे - होळकरांना गुंगारा देऊन सुरतेला निघून गेला. बिचारे नाना - बापू ! सरदारांवर चरफडत अर्ध्या वाटेतून मागे फिरले. रस्त्यांत निजामाची गाठ घेऊन त्याची आणि बालपेशव्याची पुरंदरावर भेट घडवून आणली. दादा इंग्रजांना मिळाला याचा अर्थ ओळखून निजामाने पुणे दरबारकडे दौलतबादचा किल्ला व अठरा लक्ष उत्पनाच्या प्रांताची मागणी केली. काळावर नजर देऊन बापू व नानाने ती मान्य केली. पुढे गुजरातमध्ये दादा - इंग्रज यांच्या संयुक्त फौजेशी हरीपंताने गायकवाडांच्या मदतीने यशस्वी सामना दिला. दरम्यान, ब्रिटीश पार्लमेंटने नव्याने मंजूर केलेल्या रेग्युलेशन कायद्याची अंमलबजावणी करण्याची हिंदुस्थानचा ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींग्सला हुकी आली. त्यानुसार त्याने मुंबईकर इंग्रजांना पुणे दरबारसोबत चालवलेलं युद्ध बंद करण्याची आज्ञा करून आपला वकील अप्टन यांस त्याने पुणेकरांशी तह करण्यासाठी पाठवले. अप्टनच्या मार्फत दि. १ मार्च १७७६ रोजी पुरंदरचा तह घडून आला आणि इंग्रज - मराठ्यांचे युद्ध काही काळ थंडावले. या तहाने उभयपक्षीयांचे सर्वचं प्रश्न काही निकाली निघाले नाहीत. दादाचा ताबा मिळवण्यास नाना फडणीस विशेष उत्सुक होता पण दादाला पुणे दरबारच्या हवाली करण्यास इंग्रज नाखूष होते. पुणे दरबारात भेद करण्यासाठी त्यांना दादासारखा मोहरा हाती असणे आवश्यक वाटत होते. पुरंदरचा तह घडून येत असताना एक म्हटले तर सामान्य आणि म्हटले तर क्रांतीकारी घटना घडून आली. 
                      पानिपतच्या युद्धात सदाशिवरावभाऊ मारला गेल्याची खात्री नानासाहेब पेशव्यासह सर्वच मुत्सद्द्यांची केव्हाच झाली होती. पण, राजकीय अपरिहार्यता म्हणून तो जिवंत असल्याच्या बातम्या त्यांनी त्यावेळी उठवल्या होत्या. दरम्यान राज्याच्या रक्षणाकरता मुद्दाम उठवण्यात आलेल्या वावड्या लगेच सत्यही होऊ लागल्या. भाऊसारखे दिसणारे कित्येक इसम ठिकठीकाणी प्रकट होऊ लागले. त्यांपैकी सुखलाल नामक कनोजी ब्राम्हणाचे प्रकरण पेशवाईत बरेच गाजले आणि हे प्रकरण आजही कित्येक इतिहासकारांसाठी संशोधनाचा विषय म्हणून अतिशय जिव्हाळ्याचे वाटत आहे. थोरल्या माधवराव पेशव्याच्या कारकिर्दीतच सुखलालचा बंडावा मोडून काढण्यात आला होता. पेशवे कुटुंबातील सर्वांनी त्याची परीक्षा घेऊन तो तोतया असल्याचे मान्य केले होते. अपवाद फक्त पार्वतीबाईचा ! तिची आणि भाऊच्या तोतयाची कधीही भेट घडवून आणण्यात आली नाही. आपल्या कैदेत असलेली व्यक्ती भाऊ नसून तोतया असल्याची माधवरावास कितपत खात्री होती याविषयी निश्चित काही विधान करणे शक्य नाही. कारण, कैदेत असलेली व्यक्ती हि तोतया आहे अशी जर त्याची पूर्ण खात्री असती तर त्याने त्याला कधीच ठार केले असते. विशेषतः, दादाचा उपद्व्याप पाहता भाऊच्या तोतयास जीवनात ठेवणे त्यास तसे परवडणारे नव्हते. परंतु तरीही त्याने तोतयास ठार केले नाही. असो, माधवाच्या मृत्युनंतर राज्यात जी धामधूम उडाली त्यात बारभाईंच्या शत्रूंनी या तोतयास रत्नागिरीच्या किल्ल्यातील कैदेतून मुक्त करून कारभाऱ्यांची अडचण वाढवली. इंग्रजांच्या छावणीत हजर असलेल्या दादाला माहिती होते कि, तोतया हा खरा सदाशिवराव नाही. पण, पुणे दरबारास कात्रीत पकडण्यासाठी त्याने खुशालपणे हाच खरा सदाशिवराव असल्याचे जाहीर केले. खुद्द दादाचा पाठिंबा मिळाल्याने तोतयाचे बंड वाढले. त्यास पुढे बाजीराव पेशव्याची बहिण अनुबाई आपल्या मुलासह जाउन मिळाली. त्याशिवाय पार्वतीबाईचा भाऊ रघुनाथराव कोल्हटकर आणि गंगाबाईचा मामा नारो शंकर हे देखील तोतयास सामील झाले. पेशवे कुटुंबीय तोतयास जाउन मिळाल्याने कारभाऱ्यांनी घाईघाईने पुरंदर येथे इंग्रजांशी तह उरकून घेतला व महादजी शिंद्याच्या मार्फत त्यांनी तोतयास पकडून घेतले. निवडक मंडळींसमोर त्याची परत एकदा चौकशी करण्यात येउन तो तोतया असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आणि त्यास देहांताची शिक्षा देण्यात आली. ( डिसेंबर १७७६) मुख्य तोतयाचा बंदोबस्त झाल्यावर त्याला सामील असलेल्यांना देखील कठोर शिक्षा ठोठावण्यात आल्या. याकामी बापूपेक्षा नानाने जास्त पुढाकार घेतला. पेशव्यांच्या आप्त मंडळींकडून तसेच धनाढ्य व्यक्तींकडून तोतयास सामील झाल्याबद्द्ल मोठमोठे आर्थिक दंड वसूल करण्यात आले. वरकडांना कैद वा मृत्यूची शिक्षा देण्यात आली. यावेळी गुन्हेगार ब्राम्हण असला तरी त्यास दया न दाखवता ठार करण्याची नानाने आज्ञा काढली होती. याशिवाय तोतयाच्या सहवासात राहण्याने जो संसर्गदोष घडला होता त्यासाठी सर्वांना प्रायश्चित्त देण्यात आले. तोतयाचा बंडावा मोडताना नानाने जो कठोरपणा दाखवला त्यामुळे बापू आणि रघुनाथराव चपापून गेले. आपल्या तरुण सहकाऱ्याची महत्त्वकांक्षा आत्ता कुठे बापूच्या नजरेत येऊ लागली. जे कृत्य करण्याचे साहस खुद्द माधवराव पेशव्यास झाले नाही ते नानाने करून दाखवल्यामुळे दादाला आपल्या भवितव्याची काळजी वाटू लागली. सुखलाल हा तोतया होता आणि आपण तर नारायणाच्या खुनाची आज्ञा दिली होती. त्याचे भांडवल करून नाना आपला कायमचा निकाल लावले हि भीती दादाच्या मनात घर करून राहिली. 
                      इकडे मोरोबादादास आपल्या चुलत भावाचा उत्कर्ष असह्य होऊ लागला. बारभाईच्या आरंभीच्या कारभार मंडळात जरी तो सहभागी असला तरी अलीकडे बापू आणि नाना स्वबळावर मोठमोठी कार्ये पार पाडू लागल्याने बारभाई मंडळ निकालात निघाले होते. परिणामी, मोरोबासारखे मुत्सद्दी अडगळीत पडल्यासारखे झाले होते. आपली उपेक्षा करवून घेण्याइका मोरोबा अजून विरक्त न झाल्याने त्याने थेट इंग्रज आणि दादासोबत सुत जुळवायला आरंभ केला. मोरोबाची चलबिचल पाहून नाना व बापूने त्यास कारभारात घेऊन त्याला राजी राखण्याचा यत्न केला, पण त्यामुळे कसलाही फायदा झाला नाही. बापू व नानाला घरी बसवून सर्व कारभार हाती घेण्याची मोरोबाची इच्छा होती. परंतु, बालपेशव्याचा ताबा नानाकडे असल्याने तो जिवंत असेपर्यंत आपणांस मुख्य कारभार हाती घेता येणार नाही हे मोरोबा ओळखून होता. तेव्हा त्याने नानाला शह देण्यासाठी सखारामबापूस जवळ केले. नानाची धडाडी पाहून अलीकडे बापूही साशंक झाला होता. नानाइतकाच बुद्धिमान पण वस्तुस्थितीची जाणीव नसलेला आणि काहीसा घमेंडी मोरोबा जर आपल्यास अनुकूल झाला तर नानाला जाग्यावर बसवून आपण आपले महत्त्व परत प्रस्थापित करू अशी बापूला उमेद वाटू लागली. सर्व शक्यता लक्षात घेऊन बापू - मोरोबा यांनी इंग्रजांशी गुप्त करार करून रघुनाथरावास पुण्यास आणण्याची मसलत योजली. खरेतर रघुनाथराव परत सत्तेवर येणे बापू किंवा मोरोबा यांपैकी कोणालाही परवडण्यासारखे नव्हते. पण, बालपेशव्याचे बाहुले नानाच्या हाती असल्याने त्यांनी दादाचे मोहरे पुढे दामटवण्याचा उपक्रम स्वीकारला. मोरोबा हा दादाचा पक्षपाती असून इंग्रजांशी त्याची जरुरीपेक्षा जास्त घसट असल्याचे नानाच्या नजरेतून सुटले नव्हते. परंतु, त्याला बापूचा पाठिंबा असल्याची नानाला अजिबात कल्पना नव्हती. कारस्थानात जरी मोरोबा आपल्या तोडीस तोड असला तरी कारस्थानामागे जे लष्करी पाठबळ लागले ते मोरोबाकडे नसल्याने नाना काहीसा निश्चिंत होता. मात्र, मोरोबाच्या आडून आपल्याशी विरुद्ध वागणाऱ्या इंग्रजाना वठणीवर आणण्यासाठी नानाने फ्रेंच वकिलास पुणे दरबारात मोठ्या सन्मानाने ठेऊन घेतले. त्याउलट इंग्रज वकील मॉस्टिनची पुणे दरबारात उपेक्षा होऊ लागली. नानाचे हे वर्तन इंग्रजांना असह्य होऊन त्यांनी नानाला कारभारातून काढण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गव्हर्नर जनरल हेस्टींग्सने बंगालहून ब्रिटीश फौज दक्षिणेत भूमार्गाने रवाना केली. वस्तुतः इंग्लिश सैन्य आजवर जलमार्गानेच दक्षिणेत येत असे, पण हेस्टींग्सने यावेळी मुद्दामहून खुष्कीच्या मार्गाने फौजा रवाना करून पुरंदरचा तह मोडण्याच्या दिशेने एक पाउल पुढे टाकले. मात्र, इंग्रजांनी अजून तरी उघडपणे पुणे दरबारविरुद्ध अधिकृतपणे युद्ध पुकारले नव्हते. ( फेब्रुवारी स. १७७८ ) 
                        उत्तरेतून इंग्लिश सैन्य दक्षिणेत येत असल्याच्या बातम्या मिळताच त्याचा योग्य तोच अर्थ घेऊन नाना, बापू व मोरोबा आपापल्या उद्योगास लागले. नानाने ओळखले की, आता इंग्रजांशी युद्ध अटळ आहे. त्याने सर्व सरदारांना आवश्यक त्या सूचना देऊन युद्धाची तयारी सुरु केली. बापूने यावेळी पलटी खाल्ली. बंगालचे इंग्रज दक्षिणेत येत आहे याचा अर्थ मुंबईकर दादास पेशवाईवर आणल्याखेरीज राहात नाहीत. दादाला पेशवेपदावरून पदच्युत करण्यात आपण पुढाकार घेतल्याने दादा सत्तेवर आल्यास आपली वाट लावण्यास तो मागेपुढे पाहणार नाही. तेव्हा मोरोबाची समजूत काढून दादाला पुण्यास न आणता त्याची व नानाची दिलजमाई घडवून आणावी असा विचार करून बापूने त्यादृष्टीने मोरोबाची मनधरणी चालवली. मोरोबा मात्र यावेळी हट्टास पेटला होता. त्याने निजामाच्या हद्दीत गुप्तपणे चाकरीस ठेवलेल्या गारदी व पठाण सैन्याला पुण्याला येण्याची आज्ञा केली. विना परवाना शस्त्रधारी लष्करी तुकड्या औरंगाबादहून पुण्याकडे येत असल्याचे नानाला समजताच त्याने पथके पाठवून घोडनदीजवळ कित्येक गारदी - पठान मारून काढले व उरलेल्यांना कैद केले. ताब्यात आलेल्या गारद्यांची चौकशी केली असता ते मोरोबाचे नोकर असल्याचे समजले. हि बातमी बापूला कळताच त्याने तातडीने मोरोबास पुढील संकटाची सूचना दिली. 
                मोरोबाने चिंतो विठ्ठल, बजाबा पुरंदरे, गोपाळ तांबवेकर, सदाशिव रामचंद्र इ. च्या मदतीने पुणे ताब्यात घेतले.  तत्पूर्वीच नाना पुरंदरावर जाउन लढाईच्या बंदोबस्ताने राहिला होता. ता. २६ मार्च १७७८ रोजी मोरोबाने पार्वतीबाईकडून मुख्य कारभाऱ्याची वस्त्रे घेऊन पुरंदरकडे प्रस्थान ठेवले. पुण्यातील घटनांची माहिती मिळताच आपा बळवंत, बाजीपंत अण्णा, पटवर्धन, फडके इ. नानाचे सहाय्यक सावधगिरीने पुण्याच्या दिशेने येऊ लागले. दरम्यान नानाने निजाम, भोसले यांनाही पत्रे पाठवून आपल्या मदतीस बोलावले. यावेळी वस्तुस्थिती अशी होती की, नानाचे पक्षपाती लांब होते तर मोरोबाचे त्याच्या समीप ! यावेळी बापूने जर त्यास मनापासून साथ दिली असती तर नानाचा ग्रंथच आटोपला जाणार होता !! परंतु, बापूच्या मनाने पलटी खाल्लेली असल्याने त्याने मोरोबा - नानाची भेट घडवून उभयतांमध्ये सख्य निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आपले फौजबंद सरदार दूरवर असल्याने नानाला वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारणे भाग पडून त्याने तात्पुरती माघार घेतली. नानाने अशी शरणागती पत्करताच बापूने मोरोबाचे मन वळवून त्यास इंग्रजांची मद आणण्यापासून परावृत्त केले, आणि सर्व कारस्थान रचून त्याचा उपशम केल्याचे श्रेय मिळवले. मात्र या क्षणिक विजयाच्या आनंदात त्यांना वस्तुस्थितीचे भान राहिले नाही. बंगालची फौज अजून नर्मदेपर्यंत आली नव्हती आणि मुंबईकरांनी पुण्यावर चालून यायचे ठरवले तरी अखेरीचे दिवस असल्याने ते या भरीस पडणार नव्हते. तात्पर्य, तोंडावर आलेला पावसाळा यावेळी नानाची कुमक करणार होता आणि नेमक्या याच महत्वाच्या घटकाकडे बापू - मोरोबाचे दुर्लक्ष झाले. मोरोबा सोबत तडजोड करत असतानाच नानाने महादजी शिंदे सोबत अंतस्थपणे संधान जोडले होते. मोरोबाच्या कारस्थानात जरी तुकोजी होळकर अंशतः सहभागी असला तरी अहिल्याबाई व महादजी हे दोघे एकविचाराने वागतात हे नानास पक्के माहिती होते. तेव्हा महादजीला आपल्या पक्षात ओढल्यास तुकोजी कुठे जाणार नाही याची त्याला खात्री होती. मात्र, नाना - महादजी यांच्या गुप्त मैत्रीचा बाहेर कोणासही पत्ता नव्हता. महादजीचे वर्तनचं असे होते की, त्यावरून तो नानास सामील असल्याचा संशयही न यावा ! वास्तविक नानाची बाजू घेण्यात महादजीचा देखील स्वार्थ साधला जाणार होता. मोरोबाचा पक्ष घेऊन जर त्याने नानाचा पाडाव केला असता तर राज्यात इंग्रजांचे वजन वाढून त्याचे महत्त्व घटणार होते. तसेच खुद्द दादा हा एक लढवय्या सेनानी असल्याने लष्करी बाबतीत महादजीच्या ओंजळीने पाणी पिण्याची त्यास थोडी गरज होती ? त्याउलट नाना हा लष्करी बाबतीत दुबळा असून त्याचे आपल्याविना काही एक चालणार नाही याची महादजीला जाणीव होती. त्यामुळे त्याने पूर्ण विचारांती नानाची बाजू घेण्याचा निर्णय घेतला आणि कोल्हापूर स्वारी जशीतशी आटोपून तो पुण्याकडे रवाना झाला. 
                          महादजी शिंदे पुण्याकडे येत असल्याचे समजताच बापू व मोरोबा गडबडून गेले. बापूने शिंद्यांची भेट घेऊन त्याच्याशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न केला तर मोरोबाने महादजीची मोठ्या मिनतवारीने गाठ घेऊन देखील महादजी त्याच्याशी एक शब्दही न बोलता केवळ मुखावलोकन करून बैठकीतून निघून गेला. बापू व मोरोबाची भेट घेतल्यावर महादजीने तुकोजी होळकराचे मन वळवून त्यास मोरोबाच्या पक्षातून फोडले.  होळकराचा बंदोबस्त होताच महादजीने बापू व नानाची दिलजमाई घडवून आणली. यावेळी बापू हा मोरोबास सामील असल्याचे नाना आणि महादजीला माहिती नव्हते. आणि जरी माहिती असते तरी महादजीने नानाला बापूसोबत मिळते जुळते घेण्यास भाग पाडले असते. कारण, कारभारात एकट्या नानाचे प्रस्थ वाढू देणे आपल्या हिताचे नाही हे महादजी कधी विसरला नाही. नानालाही महादजीच्या अंतस्थ हेतूची जाणीव होती पण इतर काही पर्याय उपलब्ध नसल्याने त्याने नाईलाजाने बापूसोबत तडजोड केली. ता. ५ जून १७७८ रोजी झालेल्या बापू - नाना यांच्या करारनुसार दोघांनी एकमेकांशी निष्कृत्रीमपणे वागण्याचे मान्य केले. एकंदर कारभार एकविचाराने करण्याचे ठरवण्यात आले आणि आपल्या पश्चात नानाने आपल्या मुलास कारभारात घ्यावे अशी बापूने मागणी केली व नानाने ती मान्यही केली ! खरेतर बापूचा एकुलता एक मुलगा आकोपंत हा यापूर्वीच वारला होता. परंतु मुलगा होईल या आशेवर बापूने लग्न केले होते आणि मुलगा न झाल्यास दत्तक घेण्याचीही तयारी केली होती. मिळून अस्तित्वात नसलेला मुलाला बापूच्या माघारी कारभारात घेण्याचे मान्य करण्यात नानाला कसलीही अडचण वाटणार होती ? बापूचा अशा प्रकारे बंदोबस्त केल्यावर महादजीने तुकोजी होळकराचा कारभारी नारो गणेश यांस कैद केले. त्याच्याच सल्ल्यावरून तुकोजी मोरोबास सामील झाला होता. असो, सर्व लहान - मोठे फितूर जाग्यावर बसले तेव्हा नाना - महादजीने मोरोबाला पकडण्याचे कार्य हाती घेतले. ता. २२ जून रोजी हरीपंताने त्याच्या गोटावर चाल केली तेव्हा मोरोबा पराभूत होऊन पळून गेला. परंतु सरकारी फौजांनी त्यास बहुल मुक्कामी ताब्यात घेतले आणि नानासमोर हजर केले. नानाने त्यास नगरच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. 
                सारांश, मोरोबाच्या कारस्थानात सखारामबापू सामील झाल्याने नानाची कारभारातून उचलबांगडी होण्याचा प्रसंग उद्भवला होता. परंतु, बापूचा धरसोडपणा नानाच्या पथ्यावर पडून त्याचा या समयी निभाव लागला. तसेच मोरोबाचे बंड मनोडून काढण्यात नानाने जी चतुराई दाखवली त्यावरून त्याच्या कारस्थानी स्वभावाविषयी काहीसा अंदाज बांधता येतो.  खरे तर परिस्थिती पूर्णतः प्रतिकूल असताना आणि त्याचे जीवन - मरण हे शत्रूच्या मर्जीवर अवलंबून असताना देखील त्याने हा जो डाव यशस्वी करून दाखवला त्यावरून नानाच्या कर्तबगारीची आणि बुद्धिमत्तेची कल्पना येते.
                                                                                   ( क्रमशः )
                                                                                     
                                                                         
                         

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस ( भाग - १ )

                          

              बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीसाचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास हे असून त्याचे पूर्वज हे त्या गावचे वतनदार होते. वेळास गाव बाणकोट खाडीच्या दक्षिण तीरास असून त्याच खाडीच्या उत्तर तीरी श्रीवर्धन हे गाव आहे. या ठिकाणी त्या प्रांताचे देशमुख असलेले बाळाजी विश्वनाथ भटाचे घराणे नांदत होते. निवासाचे व कार्याचे क्षेत्र एकच असल्याने भट व भानू या दोन घराण्यांचे तसे स्नेहसंबंध होतेचं. 
                  स. १७०० - १७१०  च्या दरम्यान आंग्रे व जंजिरेकर सिद्द्यांचा झगडा जुंपला. त्यावेळी बाणकोट खाडीवर हबश्यांचा अंमल होता. सिद्द्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आंगऱ्यांनी श्रीवर्धनच्या देशमुखांची म्हणजेच बाळाजी विश्वनाथची मदत घेतली. हि बाब सिद्द्यांना समजताच त्यांनी बाळाजी विश्वनाथ व जानोजी विश्वनाथ या भट बंधूंना कैद करण्यासाठी शिपाई पाठवले. त्यावेळी भट बंधू वेळास येथे हरी महादेव, रामजी महादेव व बाळाजी महादेव या भानू बंधूंच्या आश्रयास आले. तेथे या सर्वांचा विचारविनिमय होऊन त्यांनी कोकण सोडून घाटावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्रिवर्ग भानु व भट बंधू निघून जात असताना अंजनवेलीच्या किल्लेदाराने भट बंधूंना कैद केले. त्यावेळी त्रिवर्ग भानूंनी हरतऱ्हेने प्रयत्न करून भट बंधूंची सुटका केली. भानूंचे हे ऋण बाळाजी विश्वनाथ व त्याचे वंशज कधी विसरले नाहीत. योग्य समय येताच बाळाजीने भानूंच्या उपकारांची परतफेड करण्याचा मनोमन निर्धार केला. 
                       पुढे यथावकाश बाळाजी विश्वनाथास सातारकर छत्रपतींची पेशवाई मिळाली. त्यावेळी त्याने राज्याची फडणीशी स्वतःकडे मागून घेतली आणि फडणीशीची वस्त्रे हरी महादेव भानूस प्रदान केली. ( जानेवारी स. १७१४ ) त्याखेरीज रामजी महादेवला लोहगडाची सबनिशी व हरी महादेवला नाणे मावळची मुजूमदारीही देण्यात आली. इथपासून मराठी राज्यात भट घराणे पेशवेपदी तर भानू फडणीसपदी विराजमान झाले. मात्र, फडणीशी पदाचा उपभोग घेण्याचे भाग्य काही हरी महादेवास लाभले नाही. फडणीसपद प्राप्त झाल्यावर अवघ्या काही महिन्यांतच जेजुरी मुक्कामी त्याची मृत्यू झाला. तेव्हा फडणीशीचा दरख पेशव्याने रामजी महादेव व बाळाजी महादेव या बंधूंकडे सोपवला. स. १७१८ - १७१९ मधील बाळाजी विश्वनाथच्या प्रसिद्ध दिल्ली स्वारीत बाळाजी महादेव मारला गेला. तेव्हा फडणीशीची सर्व सूत्रे रामजी महादेवच्या हाती गेली, परंतु तो देखील लवकरचं मरण पावल्याने त्याचा मुलगा बाबुराव रामचंद्र आणि बाळाजी महादेवचा मुलगा जनार्दन बाळाजी यांना पहिल्या बाजीरावाने फडणीशी दिली. प्रस्तुत प्रसंगी हे दोन्ही चुलत बंधू अल्पवयीन असल्याने फडणीसाचे काम त्यांच्या जवळच्या आप्तामार्फत घेण्यात येत असे पण हे दोघेही वयात येताच त्यांनी कारभार आपल्या हाती घेतला. पुढे स. १७५६ मधील दादाच्या पहिल्या उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीत पोटशूळाच्या विकाराने जनार्दन बल्लाळचे निधन झाले व  त्याच्या पश्चात ता. २९ नोव्हेंबर १७५६ रोजी बाळाजी जनार्दन उर्फ नाना यांस फडणीशीची वस्त्रे प्राप्त झाली. यावेळी नानाचे वय अवघे १४ वर्षांचे होते.  
                            नाना अल्पवयीन व प्रकृतीने अशक्त असल्याने स्वारीची फडणीशी व दरबारची प्रमुख कामे त्याचा चुलता बाबुराव रामचंद्र हाच पाहत असे. स. १७६० - ६१ च्या पानिपत मोहिमेत नाना फडणीस आपली पत्नी व आईसह सहभागी झाला होता. या स्वारीत त्याचा मामा व मोहीमप्रमुख सदाशिवरावभाऊचा विश्वसनीय सरदार आणि मित्र बळवंतराव मेहेंदळे हा देखील सामील झाला होता. ता. १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठी फौजांचा मोठा पराभव झाला. पराभवानंतर झालेल्या लुटालुटीत आणि धावपळीत नानाची त्याच्या आई व पत्नीपासून ताटातूट झाली. पुढे सुदैवाने नानाची व त्याच्या बायकोची गाठभेट घडून आली परंतु त्याच्या आईचा काही ठावठीकाणा लागला नाही. पानिपतच्या पराभवानंतर झालेल्या जीवघेण्या पाठलागातील अनुभव आणि मातेचा वियोग यांमुळे नानाच्या स्वभावात बराच बदल घडून आला असे मानले जाते. नानाचे चरित्रकार श्री. वासुदेवशास्त्री खरे यांच्या मते ' पूर्ववयातील विपत्तींच्या योगाने नानाच्या स्वभावावर काहीशी खिन्नतेची छाया पडून राहिली ती शेवटपर्यंत नष्ट झाली नाही. त्याच्या वृत्तीमध्ये गांभीर्य उत्पन्न होऊन ; चैनी, लहरी व रंगेल स्वभावाच्या लोकांचा त्यास तिटकारा येऊ लागला. ' खरे शास्त्रींनी नानाच्या स्वभावाचे जे वर्णन केले आहे आणि त्याच्या या स्वभावाचा व पानिपतचा जो संबंध जोडला आहे तो मला अजिबात मान्य नाही. नानाचे आत्मवृत्त पाहिले असता असे दिसून येते की, तो लहानपणापासूनचं अतिधार्मिक व श्रद्धाळू स्वभावाचा होता. तसेच त्याची प्रकृती अशक्त असल्याने त्याचा स्वभाव तब्ब्येतीने कमजोर असलेल्या व्यक्तींचा ज्याप्रमाणे चिडचिडा वा अंतर्मुख असतो तसा एकलकोंडा बनला होता. प्रसंगोत्पात व्यक्तीच्या स्वभावात बदल घडून येत असतात हे जरी सत्य असले तरी बदललेल्या स्वभावाचे बीज त्या व्यक्तीमध्ये पूर्वापार असल्याखेरीज टोकाचे बदल घडून येत नाहीत. तात्पर्य; नानाचा स्वभाव पूर्वीपासूनचं अंतर्मुख असून पानिपत नंतर तो जर जास्तचं प्रकर्षाने प्रकट झाला इतकेच काय ते सत्य असून त्याच्या या स्वभावाचा आणि पानिपतच्या पराभवाचा तसा फारसा काही संबंध नाही. तसाच संबंध जोडायचा असेल तर बळवंतराव मेहेंदळेचा मुलगा आपा बळवंत याचाही जोडावा लागेल. त्याने तर अल्पवयात आई व बापाला या स्वारीत गमावले होते. त्याच्या डोळ्यांदेखत त्याची आई, नवऱ्याच्या शवासोबत सती गेली होती. परंतु आपा बळवंतचा स्वभाव नानाप्रमाणे धीरगंभीर किंवा खिन्न बनल्याचा उल्लेख आढळत नाही. 
                 भानू व भट घराण्याचे पूर्वापार संबंध, नानासाहेब व भाऊचे नाना आणि मोरोबा या चुलत बंधूंवर असलेले प्रेम यांमुळे हे दोन्ही बंधू , विशेषतः नाना हा भट घराण्याशी -- त्यातल्या त्यात नानासाहेब पेशव्याच्या वंशजांशी जास्त एकनिष्ठ राहिला. असो, पानिपत नंतर नानासाहेब पेशव्याचे निधन होऊन माधवराव पेशवेपदी विराजमान झाला. त्यावेळी नाना आणि त्याचा चुलता बाबुराव हे फडणीशी पाहात होते परंतु ; दादासाहेब आणि माधवरावाच्या कलहात भानूंना उभयतांची मर्जी रक्षून आपला निभाव करणे भाग पडले. राक्षसभुवनच्या संग्रामानंतर दादाचे प्रस्थ कमी होऊन माधवरावाचे स्वतंत्र कर्तुत्व झळकू लागल्याने नानाच्या उदयकालास प्रारंभ झाला. येथून पुढे म्हणजे माधवराव पेशव्याच्या मृत्युपर्यंत त्यास फडणीशी व्यवहार सांभाळत असताना रघुनाथरावाची मर्जी रक्षून मोहिमेवर असलेल्या पेशव्याच्या माघारी तो काही कट - कारस्थान रचणार नाही याचीही दक्षता घेण्याची बिकट जबाबदारी त्यास पार पाडावी लागली. सुमारे ७ - ८ वर्षे हे कार्य नानाने मोठ्या निष्ठेने आणि सावधतेने पार पाडले. खरेतर हि कामगिरी पार पाडणे म्हणजे निव्वळ तारेवरची कसरत होती. चुलत्याने कितीही उपद्व्याप केले तरी त्यास नजरकैदेत ठेवण्यापलीकडे त्यास जीवे मारण्याचा अथवा त्यास अधू करून जाग्यावर बसवण्याचा विचार माधवरावाच्या मनात कधीच आला नाही. दादा जरी नजरकैदेत असला व पेशव्याच्याविरोधात कट - कारस्थान रचत असला तरी तो पेशवे घराण्यातील असल्याने त्याचा योग्य तो आदर आणि मान राखण्याची खबरदारी घेण्यास स्वतः माधवराव चुकत नसे. या पार्श्वभूमीवर नानाला दादाचा मानसन्मान रक्षून त्याच्यावर देखरेख करण्याचे कार्य पार पाडण्यास किती प्रयास पडत असतील याची वाचकांनी कल्पना करावी. 
              ता. १८ नोव्हेंबर १७७२ रोजी थेउर मुकामी माधवराव पेशव्याचा मृत्यू होऊन दि. १३ डिसेंबर १७७२ रोजी नारायणराव पेशवा बनला. माधवराव आणि नारायणराव या दोन बंधूंमध्ये कमालीचे अंतर होते. व्यक्तीच्या गुणांची पारख करून त्यांच्याकडून आपल्यास अनुकूल असे कार्य काढून घेण्याची हातोटी माधवरावाकडे होती. याबाबतीत नारायण कमी पडला. अर्थात, पेशवेपद प्राप्त झाले त्यावेळी नारायणाचे वय १७ वर्षांचे असल्याने राज्यकारभाराचा अनुभव घेऊन स्वतःचे बरे - वाईट मत बनवण्याची योग्यता त्याच्या अंगी येण्यास काही कालावधी लागणे स्वाभाविक होते. परंतु, रघुनाथरावच्या कारस्थानामुळे त्याची आयुष्यमर्यादा अगदी अल्प बनली. राज्यकारभार करताना माधवराव वेळप्रंसगी दादाच्या पक्षपात्यांचाही सल्ला घेत असे. अर्थात, अनुभवाने त्यास शहाणपण आलेले असल्याने कोणाचे कधी ऐकावे याची त्यास चांगलीच जाणीव होती. नारायणास हा पोच येण्यास अवधी मिळाला नाही. तरीही त्याने जो काही आठ महिने राज्यकारभार केला त्यात त्याचे प्रमुख सल्लागार सखारामबापू आणि हरिपंत फडके हे दोघे होते. पैकी बापू हा दादाचा पक्षपाती तर हरिपंत माधवाचा ! मात्र यामुळे कारभारात विसंवाद असा निर्माण झाला नाही. नाना फडणीस यावेळी मुख्य राजकारणापासून अलिप्त असा आपली फडणीशी सांभाळून राहिला होता. मुख्य धन्याचा त्यास पाठिंबा नसल्याने त्याने यावेळी फक्त आपल्या पायापुरते पाहण्याचे धोरण स्वीकारले होते.              नारायणरावाचा खून होण्यास ज्या घटना कारणीभूत ठरल्या, त्या तशा वरवर पाहता स्वतन्त्र दिसत असल्या तरी त्यांत एकसूत्रता होती. उदाहरणार्थ, दादाचे कैदेतून पलायन करण्यासाठी वारंवार प्रयत्न करणे -- त्यासाठी हैदरअली आणि नागपूरकर भोसल्यांच्या वकिलांनी त्यास मदत करणे -- ब्राम्हण - प्रभू वादात नारायणराव पेशव्याने प्रभूंना शुद्र ठरवल्याने प्रभू मुत्सद्द्यांनी दादाची बाजू घेणे इ. या ज्या काही घटना आहेत त्या तशा स्वतंत्र वा विस्कळीत दिसत असल्या तरी त्या घटना घडून येण्यामागे नारायणराव पेशवा कारणीभूत असल्याने उपरोक्त घटनांतील संबंधित व्यक्तींमध्ये त्याच्याविरोधात नाराजी उत्पन्न होणे स्वाभाविक होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे नारायणरावास कैद करून त्याच्याजागी दादासाहेबास पेशवेपदी बसव्ण्याच्ये कारस्थान घटू लागले. मुद्दाम लक्षात घेण्याची बाब म्हणजे नारायणास ठार करण्याची इच्छा पेशवे कुटुंबीय अपवाद केल्यास इतर कोणाच्याही मनात आली नव्हती ! नारायणास कैद करण्याच्या कटात जसा बापू सहभागी होता तसाच नानाचा चुलतभाऊ मोरोबादादा देखील सामील होता. याखेरीज कित्येक लहान - मोठे मुत्सद्दी व सरदार या कटात शरिक होते. राहता राहिला नारायणास ठार करण्याचा निर्णय कोणी घेतला हा मुद्दा तर, रघुनाथरावानेच आयत्यावेळी गारद्यांच्या सांगण्यावरून नारायणास पकडण्याऐवजी त्यास मारून टाकण्याचा निर्णय घेतला. 
            नारायणराव पेशव्यास कैद करण्याचा कट रचला जात असल्याची बातमी पुण्यात जवळपास सर्वांनाच माहिती झाली होती. खुद्द नाना फडणीसास देखील याची कल्पना होती.  परंतु, माधवाच्या वेळी राज्यकारभारात जसे त्याचे वजन होते तसे नसल्याने आणि नारायणाचा  देखील नानावर फारसा विश्वास नसल्याने नाना याबाबतीत उदासीन राहिला. त्याशिवाय एखादा कट रचला जाउन फारतर नारायणास कैद केले जाईल अशी त्याची प्रामाणिक समजूत होती, पण त्याचा खून करण्यापर्यंत कटवाल्यांची मजल जाईल अशी त्यास अजिबात कल्पना नव्हती. असो, दि. ३० ऑगस्ट १७७३ रोजी शनिवारवाड्यात गारद्यांनी नारायणराव पेशव्याचा खून करून रघुनाथरावास कैदेतून सोडवले. शनिवारवाड्यात नेमके काय घडले याची बातमी त्याच दिवशी संध्याकाळी दरबारातील सर्व प्रमुख मुत्सद्द्यांना व सरदारांना समजली. दादाची कैदेतून सुटका होऊन तो पेशवा बनला याचे कोणाला फरसे वाईट वाटले नाही पण नारायणराव मारला गेल्याबद्दल दादाच्या पक्षपात्यांनाही बराच खेद वाटला. दादाचा कट्टा अभिमानी सखारामबापू तर या बनावाने गळाठून गेला. दादाचा निरोप घेऊन त्याने दुसऱ्या दिवशी पुणे सोडले. नाना व मोरोबा मात्र दादाच्या आज्ञेनुसार त्याच्या सेवेत दाखल झाले. 
                       मराठेशाहीत वा पेशवाईत नारायणराव पेशव्याचा खून ही एक मोठी राजकीय उलथापालथ घडवण्यास कारणीभूत ठरलेली घटना होती. या खुनामुळे मराठी राज्याच्या सत्ताकेंद्रात बदल घडून आला असे पुढील इतिहास सांगतो. छत्रपती शाहूच्या निधनानंतर छत्रपतींची सत्ता जशी पेशव्यांच्या हाती आली त्याचप्रमाणे नारायणरावाच्या खुनानंतर पेशव्यांची सत्ता नाना फडणीससारख्या एका कारकुनाच्या हाती एकवटली. पण सत्तेचे हे हस्तांतरण काही सहजासहजी घडले नाही. किंबहुना, शाहूच्या मृत्यूनंतर छत्रपतींची सत्ता पेशवा बळकावणार हे  सर्वांना माहिती होते पण, नारायणरावाच्या खुनानंतर पुणे दरबारातील कोणी सरदार वा मुत्सद्दी आत्ताच्या भाषेत ' सत्तेचा रिमोट कंट्रोल ' हाती घेईल असे कोणाच्या मनात देखील आले नव्हते. उलट, नारायणाचा खून झाल्यावर आता आपल्या हाती काही पर्याय नाही असे समजून सर्व मुत्सद्द्यांनी आणि सरदारांनी दादासाहेबास मनोमन आपला धनी मानला होता. असो, नारायणाचा खून झाला त्यावेळी त्याची पत्नी -- गंगाबाई --  ही गर्भवती होती. यावेळी मुत्सद्दी मंडळात अनेक अनुभवी आणि कारस्थानी पुरुष मौजूद होते. मात्र दादाला पदच्युत करून त्याच्याजागी प्रथम गंगाबाई व नंतर ती प्रसूत झाल्यावर तिच्या मुलास पेशवा बनवण्याची योजना आखण्यास सखारामबापूने तेवढा पुढाकार घेतला. त्यास हरिपंत फडके, त्रिंबकराव पेठे इ. माधवरावाच्य पक्षपात्यांचा पाठिंबा होता. आरंभी नाना फडणीस या कटात सहभागी नव्हता. त्यास बापूचा भरवसा नसल्याने सुरवातीला तो काहीसा तटस्थ राहिला. पण नंतर मात्र त्याने या कारस्थानाच्या कामी आपली सर्व शक्ती पणास लावली. यावेळी सिंहगड, पुरंदर व लोहगड हे पुण्याजवळचे किल्ले नानाच्या ताब्यात असून त्याखेरीज पेशव्यांची खासगी मालमत्ता आणि सातार संस्थानचा कारभार देखील त्याच्या हाती होता. 
                   नाना बारभाई मंडळात आल्याने या मंडळाचे सामर्थ्य वाढले. नारायणरावाचा खून झाल्यावर दादाने पेशवेपद धारण केल्यावर निजाम आणि हैदरवर स्वारी करण्यासाठी तो पुण्यातून बाहेर पडला. या मोहिमेत पेठे, पटवर्धन, फडके,  नाना व बापू हे बारभाई कारस्थानाचे मुख्य शिलेदार दादासोबत हजर होते. गंगाबाईचा मुक्काम या सुमारास पुण्यात होता. स्वारीत असताना दादा आणि आनंदीबाईने गंगाबाईचा गर्भपात करण्याचा वा तिला ठार करण्याचा खटाटोप चालवला. हे वर्तमान समजताच बारभाई मंडळातील एकेक मुत्सद्दी काही ना काही निमित्ताने दादाची छावणी सोडून पुण्यास परतू लागला. ता. १७ जानेवारी १७७४ रोजी नाना - बापू यांनी गंगाबाईस शनिवारवाड्यातून बाहेर काढून पुरंदरावर नेले आणि पुण्यात तिच्या नावाने द्वाही फिरवून कारभार आपल्या हाती घेतला. यावेळी कारभारीमंडळाची रचना बनून त्यात प्रमुख कारभारी बापू असून दुय्यम कारभाऱ्याचे पद नानाकडे आले आणि प्रमुख सेनापतीपद त्रिंबकराव पेठ्यास देण्यात आले. ता. १७ जानेवारी ते १८ एप्रिलपर्यंतचे ४ महिने बारभाई मंडळास मोठ्या संकटाचे गेले. ता. २७ फेब्रुवारी १७७४ रोजी कारभाऱ्यांच्या विनंतीवरून सातारकर छत्रपतींनी दादासाहेबास पेशवेपदावरून बडतर्फ केल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामुळे चिडून जाउन दादा पुरंदरच्या रोखाने येऊ लागला. त्यावेळी त्याला अडवण्यासाठी पुढे गेलेल्या त्रिंबकराव पेठ्याची व दादाची कासेगाव येथे ता. २६ मार्च रोजी लढाई घडून आली. यात पेठ्याचा पराभव होऊन तो जखमी अवस्थेत दादाच्या हाती लागला व काही दिवसांनी जखमा असाध्य होऊन मरण पावला. त्रिंबकरावाच्या मृत्यूने कारभारी काही काळ कुंठीत झाले. परंतु लवकरचं त्यातून सावरून बापूने आपल्या सहकाऱ्यांना धीर दिला. त्यातच त्रिंबकरावाची उणीव भरून काढण्यास हरिपंत पुढे सरसावल्याने कारभाऱ्यांची खचलेली बाजू काहीशी सावरली. दरम्यान, आपल्या विरोधात दादाला निजाम - भोसल्यांनी मदत करू नये म्हणून कारभाऱ्यांनी निजाम - भोसल्यांना पैसा आणि काही भूप्रदेश तोडून देऊन त्यांना आपल्या लगामी लावून घेतले. 
                                इतके सर्व उपद्व्याप करून देखील गंगाबाई प्रसूत झाल्यास तिला मुलगाच होईल याची शाश्वती नव्हती ! पण ज्या कारस्थानाचे बापू - नाना सारखे आधारस्तंभ होते, ते अशा संकटाला थोडी भिक घालणार ! गंगाबाईस जर मुलगी झाली तर गंगाबाईस दत्तकपुत्र देऊन त्याच्या नावे पेशवेपद घेण्याची त्यांची तयारी होती. त्याहीउपर म्हणजे, मुलगा झाल्यास काही हितशत्रू मुद्दाम असा आक्षेप घेतील कि मुलगी झाली असता मुलांची अदलाबदल करून मुलगा झाल असे जाहीर करण्यात आले आहे. हि शक्यता लक्षात घेऊन आणि विरोधकांना हि संधी देखील  साधण्याची मोकळीक न राहावी यासाठी बापू व नानाने छत्रपतींना विनंतीपत्र पाठवून आपले विश्वासू हुजरे आणि दोन स्त्रिया पाठवण्यास सांगितले. गंगाबाईच्या प्रसूतीसमयी छत्रपतींनी पाठवलेल्या स्त्रिया समक्ष हजर असल्याने मुलांची अदलाबदल केल्याचा आरोप कोणी करणार नाही आणि केला तरी तो टिकणार नाही असा या उभय कारभाऱ्यांचा विश्वास होता. अखेर दि. १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाई प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्याचे नाव माधवराव असे ठेवण्यात येउन हाच पुढे ' सवाई माधवराव पेशवा ' म्हणून ओळखला जाऊ लागला. बापू व नाना यांनी माधवरावाच्य नावाने छत्रपतींकडून पेशवेपदाची वस्त्रे मागवून त्यास वयाच्या ४० व्या दिवशी म्हणजे ता. २८ मे १७७४ रोजी देण्यात आली.
                                                                                    
                                                                                         ( क्रमशः )