शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३

‘ पानिपत असे घडले ‘ मध्ये नेमके काय आहे ?

                                       


         अडीचशे वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची मराठी मनावर झालेली जखम अजूनही काही भरून आलेली नाही. अर्थात हे भावनेला हात घालणारे किंवा भावनिक आवाहन करणारे ठरीव ठशाचे वाक्य नसून एक वस्तुस्थिती आहे. विविध कारणांनी विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटी – गाठीचा योग येतो. इकडच्या तिकडच्या गप्पा करताना मराठी साहित्य हा विषय चर्चेला येऊन गाडी पानिपतवर येऊन अडखळते. श्री. विश्वास पाटील यांची ‘ पानिपत ‘ कादंबरी वाचली नाही वा तिचे नाव ऐकले नाही अशी उभ्या महाराष्ट्रात फार कमी माणसं असतील. पाटलांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला मराठी मनात व साहित्यात जे मानाचे स्थान आपल्या कादंबरीच्या रूपाने मिळवून दिले आहे, त्याबद्दल तमाम मराठी इतिहासप्रेमी मंडळी नेहमी त्यांचे ऋणी राहतील. याला मी देखील अपवाद नाही.
             नशीबाचा काय खेळ असतो माहिती नाही पण पाटलांच्या पानिपत कादंबरीने ‘ पानिपतच्या ‘ विषयाची मला तोंडओळख झाली आणि या विषयाने मी झपाटून गेलो. अर्थात, अठरा – वीस वर्षांपूर्वीच्या त्या काळात पानिपतने झपाटलेले असे कित्येक वेडे होते आणि आजही आहेत. परंतु, ज्या पानिपतवर मराठी भाषेत जे काही साहित्य उपलब्ध असेल ते हरप्रयत्ने मिळवून वाचण्याच्या वेडाने झपाटून गेलेला माझ्यासारखा – जगाच्या दृष्टीने अपंग – अशा वेड्या पीराने त्याच विषयावर लेखन करून त्याचे ग्रंथात रुपांतर करावे हा केवळ नशीबाचा खेळ वा परमेश्वरी कृपाच म्हणावी लागेल !
                   ‘ पानिपत असे घडले ‘ या ग्रंथाचे लेखन करण्यास मला किती वर्षे अभ्यास करावा लागला याची मी कधी नोंद ठेवली नाही. त्यामुळे अमुक इतक्या वर्षांनी संशोधन करून मी ‘ पानिपत असे घडले ‘ चे लेखन केले असे नक्की सांगू शकत नाही. बरे, यास इतिहास संशोधन म्हणावे तरी पंचाईत ! कारण, मोडी लिपीचा मला अभ्यास नाही. तेव्हा मान्यवर संशोधकांनी संशोधित करून प्रकाशित केलेल्या अस्सल पत्रांच्या अभ्यासावर माझी मुख्य मदार असल्याने मी नेमका संशोधक आहे की कथा – कादंबरीकार असा अनेक ‘ पढत पंडितांना ‘ प्रश्न पडला आहे. मी कधीच गटबाजीच्या फंदात पडलेलो नसल्याने मला  कोणत्या गटात ढकलायचे हे मी त्या गटबाजांवर सोडून देतो.
                पानिपत विषयावर लेखन पुष्कळजणांनी केले आहे. मात्र, अनेकदा मला असे आढळून आले आहे की, वाचकांना विश्वास पाटलांच्या पानिपत पलीकडे वा अलीकडे काही काही माहिती नसते. वैद्यांची ‘ दुर्देवी रंगू ‘ किंवा बापटांची ‘ पानपतची मोहीम ‘ तर आता फारशी कोणाच्या स्मरणातही नाही. शेजवलकरांचे ‘ पानिपत : १७६१ ‘ इंग्रजीच काय मराठीत पण वाचण्याची तसदी घेणारे असे किती महाभाग आज आहेत ? याचा परिणाम म्हणजे, कादंबरीकार विश्वास पाटलांना ‘ इतिहास संशोधकाचा ‘ दर्जा प्राप्त झाला आहे व त्यांची पानिपत कादंबरी हि कादंबरी न राहता तो एक संदर्भ साधनाचा ग्रंथ बनला आहे. आजपर्यंत खुद्द पाटलांनी आपली ‘ पानिपत ‘ हि एक कादंबरी आहे असेच म्हटले आहे, पण वाचकांनी त्यांचे हे म्हणणे अजूनही गंभीरपणे घेतले नाही. याला पाटील तरी काय करणार म्हणा ? वाचकांनी पाटलांच्या कादंबरीलाच संदर्भ ग्रंथाचा दर्जा दिल्याने त्यातून निर्माण होणारे जे गोंधळ आहेत त्यांचे निरसन कसे करायचे हा एक मोठा प्रश्नचं आहे.
        उदाहरणार्थ :- (१) पानिपतावर मराठ्यांची उपासमार झाली अशा आशयाची वर्णने काही बखरींमध्ये आढळून येतात. पाटील हे सिद्धहसत लेखक असल्याने त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने मराठ्यांची हि उपासमार अतिशय प्रभावीपणे रंगवली. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं ‘ उपाशी लोकांनी मृत जनावरांची हाडे दळून त्यांचे पीठ पाण्याबरोबर खाणे, झाडांचा पाला – मुळ्या चावून खाणे इ. ‘ गोष्टी वाचकांनी खऱ्या घडल्याचे मानून घेतले. आता यातून नेमका काय अर्थ निघतो याची कोणी कल्पना केली आहे का ? पाटलांनी दिलेलं उपासमारीचे वर्णन खरे मानले तर त्यावेळी पानिपतावर हजर असलेल्या स्पृश्य – अस्पृश्य व्यक्तींनी – त्यात पेशवे व त्यांचे ब्राम्हण सरदार आणि ब्रम्हवृंद मंडळी देखील आली –- अभक्ष्य भक्षण व ते देखील मृत जनावरांचे केले असेच सिद्ध होते.
(२) पानिपतच्या युद्धात पूर्वेकडे निघालेलं मराठी सैन्य थेट पूर्वेला न जाता आग्नेय दिशेला का वळालं याचे समाधानकारक उत्तर खुद्द शेजवलकर आपल्या पानिपत विषयक ग्रंथात देऊ शकले नाहीत. परंतु वाचकांना देखील अब्दालीच्या छावणीच्या जवळून जाण्याइतका भाऊ मूर्ख होता का असा प्रश्न सहसा पडला नाही. कारण, शेजवलकर हे प्रत्यक्ष पानिपतला भेट देऊन आले होते. मान्य आहे, शेजवलकरांनी पानिपतला भेट दिली होती, पण त्यावेळी काय पानिपतचे युद्ध सुरु होते का, कि ज्यामुळे शेजवलकरांना, भाऊ आग्नेय दिशेला अब्दालीच्या छावणीजवळून जात असल्याचे दिसून आले ?
(३) पानिपतच्या युद्धात लढाईच्या पूर्वार्धात मराठी सैन्याची डावी बाजू – अर्थात गारद्यांची पथके – अर्ध्याहून अधिक निकालात निघाली होती हे सर्वजण मान्य करतात. मग लढाईतून जेव्हा मराठी सरदारांनी माघार घेण्यास आरंभ केला तेव्हा त्यात गारद्यांच्या शेजारी असलेल्या विंचूरकर, गायकवाड यांच्यापेक्षा मल्हाररावाचा – जो मराठी सैन्याच्या उजव्या बगलेवर उभा होता, त्याचा – पहिला क्रमांक का लावला जातो ? प्रथम गायकवाड, विंचूरकर, पुरंदरे निघाले व नंतर होळकर निघून गेला हे अस्सल पत्रांमध्ये नमूद असताना देखील पानिपत युद्धातून होळकराने सर्वप्रथम माघार घेतली असे का सांगितले जाते ? बरे, होळकर निघाला असला तरी समोरचा शत्रू काय त्याला सुखासुखी जाऊ देणार होता का ? नजीबची व होळकराची मैत्री असली तरी नजीबच्या आजुबाजूला असलेले अफगाण सरदार होळकरास काय असाच जाऊ देणार होते ? शेजवलकरांनी हे प्रश्नच मुळी विचारात घेतले नाहीत व पाटील हे तर कादंबरीकार असल्याने त्यांना या चर्चेत शिरण्याचे काही प्रयोजनच नव्हते. त्यांनी मान्यवर इतिहास संशोधकांचे निष्कर्ष जमेस धरून होळकर भर दुपारी कसा पळून गेला याचे चित्रण केले. अर्थात, कादंबरीकार या नात्याने त्यांना इतिहासाशी वा ऐतिहासिक सत्याशी बांधून घेणे बंधनकारक आहे असे नाही. त्यामुळे त्यांना या बाबतीत दोष देणे चुकीचे आहे. पण त्यांची कादंबरी म्हणजेच खरं इतिहास असे मानणाऱ्या वाचकांना काय म्हणावे तेच समजत नाही.
(४) पानिपतावर लाख मराठा कापला गेला, लाख बांगडी फुटली असे नेहमी म्हटले जाते. प्रत्यक्षात, खरोखर एवढी माणसे मारली गेल्याचे कोणत्या अस्सल कागदपत्रात नमूद केलेलं आहे हे कोणी सांगेल का ?
(५) पानिपत युद्धातील पराभवाच्या धक्क्याने नानासाहेब पेशवा मरण पावला हे एक विनोदी प्रकरण आहे. पानिपत घडून येण्यापूर्वीच पेशवा अतिशय आजारी असल्याचे उल्लेख असेलेली कित्येक पत्रे आजवर प्रकाशित करण्यात आली आहेत. या मुद्द्याकडे वाचकांचे लक्ष वेधून घेण्याचा खुद्द शेजवलकरांनी देखील आटोकाट प्रयत्न केला पण त्यात त्यांना अपयशचं आले असे म्हणावे लागेल.
             या पानिपतशी प्रत्यक्ष संबंधित अशा गोष्टी झाल्या. पण प्रत्यक्ष पानिपतपूर्व देखील अनेक अशा महत्त्वाच्या गोष्टींकडे अक्षम्य असे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
उदाहरणार्थ :- (१) बुराडी घाटचे प्रकरण झाल्यावर होळकराने अब्दालीला जेरीस आणून तह करण्यास भाग पाडले होते. या तहाची नोंद अनेक इतिहासकारांनी घेतली पण त्याचे महत्त्व मात्र कधी लक्षात घेतले नाही. शेजवलकरांनी तर या घटनेकडे अजिबात दुर्लक्ष केले व विश्वास पाटील हे कादंबरीकार असल्याने त्यांना घटनेचे महत्त्व फारसे वाटले नाही. अर्थात, कादंबरीकाराच्या दृष्टीने हा मुद्दा ग्राह्य धरला वा गाळला तर फारसा फरक पडत नाही म्हणा. त्यामुळे त्यांना दोष का द्यावा ?
(२) पानिपत मोहिमेवर दादाच्या ऐवजी भाऊची नेमणूक का करण्यात आली याविषयी कित्येकांनी विपुल चर्चा केली आहे व आजही केली जात आहे. मात्र, विश्वासरावाची या स्वारीवरील नियुक्ती हि पूर्वनियोजित होती याकडे फारसे कोणी लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.
                सारांश, ‘ पानिपत असे घडले ‘ या माझ्या सुमारे साडेपाचशे पानी ग्रंथात या सर्व आणि इतर अनेक प्रश्नांची मी चर्चा उपलब्ध पुराव्यांच्या – संदर्भ साधने व अस्सल पत्रांच्या – आधारे केलेली आहे. या ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैगुण्य असे म्हणता येईल की, या ग्रंथास संदर्भ ग्रंथांची सूची जोडण्यात आली नाही. परंतु, आज या घडीला असे कित्येक लेखक आहेत की, न वाचलेल्या / अभ्यासलेल्या ग्रंथांची नावे ते संदर्भ ग्रंथ सूचीत बेधडकपणे लिहून टाकतात. वाचक केवळ त्या ग्रंथांच्या यादीने दडपून जाऊन त्या लेखकाने केलेलं विधान प्रमाण मानतो. जर संदर्भ ग्रंथ सूचीला एवढेचं महत्त्व असेल तर मग ती समाविष्ट केली काय अन न केली काय, दोन्ही सारखेचं ! म्हणूनचं मी या ग्रंथात संदर्भसूचीचा समावेश केला नाही.
                    
                                                                            
पानिपत असे घडले…                                     
ले. संजय क्षीरसागर
प्रकाशक: पुष्प प्रकाशन
प्रुष्ठ्संख्या: ५८८
मुल्य: रु. ५००/- मात्र    

  भारत बुक हाउस
१७८८, सदाशिव पेठ, देशमुखवाडी, पुणे – ३०

फोन नंबर :– ०२० – ३२५४८०३२/३३
मोबाईल नंबर :- ९८५०७८४२४६                                         

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१३

पां. गो. रानडे लिखित ‘ नारायणराव पेशवे यांचा खून कि आत्महत्या ? ‘



       स. १९४४ साली पांडुरंग गोपाळ रानडे यांनी ‘ नारायणराव पेशवे यांचा खून कि आत्महत्या ?’ नावाचा पाठपोठ असा सुमारे तेराशे पृष्ठांचा ग्रंथ लिहून तत्कालीन इतिहास संशोधकांत आणि अभ्यासकांत कमालीची खळबळ माजवली होती. या ग्रंथाची दखल खुद्द आचार्य अत्र्यांनी आपल्या वर्तमानपत्रात घेतली तर होतीच पण याविषयी आपल्या आत्मचरित्रात देखील त्यांनी नोंद केलेली आहे.
  रानडे यांनी लिहिलेला हा ग्रंथ नुकताच माझ्या वाचनात आला. अलीकडे ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात जुन्या दुर्मिळ ग्रंथांच्या ( भावी इतिहास संशोधक व लेखकांच्यासाठी महत्त्वाची सूचना, इतिहासाचे कोणतेही पुस्तक – मग ते १० पानी असो कि १००० पानी – त्यास नेहमी ग्रंथच म्हणावे. यामुळे होणारे फायदे सुज्ञांस सांगणे न लगे !) अभ्यासासाठी सध्या मी जात असतो. ( ‘ तू कुठे का जाईनास ? आम्हांला त्याचे काय ?’ हा प्रश्न वाचकांच्या मनी पडला आहे हे मी ओळखले आहे !) त्यावेळी सर्वप्रथम याच ग्रंथाचे वाचन करण्याचा मी निर्णय घेतला.
  प्रस्तुत ग्रंथ जेव्हा वाचण्यास हाती घेतला तेव्हा यात काय आहे याची मला पुरेपूर कल्पना होती परंतु, प्रत्येक प्रकरणागणिक जसजसे वाचन पुढे होत गेले तसतसे आपल्याला सांगितलेला इतिहास आणि प्रत्यक्षातला इतिहास यात जमीन – अस्मानचा फरक असल्याचे दिसून आले. कोणताही वाचक कोणत्याही लेखकाच्या मतांशी १००% सहमत नसतो. ( व्वा ! काय वाक्य जमले आहे राव !!)  हा नियम या ग्रंथास देखील लागू आहे पण याचा अर्थ असा नाही कि, या ग्रंथातील सर्वच लेखन त्याज्य असे आहे. सर्वप्रथम या ग्रंथाची जी प्रमुख वैशिष्ट्ये मला आढळली ती याठिकाणी नमूद करतो.
१)    या ग्रंथाला श्री. श्रीधर बळवंत नगरकर यांची जवळपास १०० पानांची प्रस्तावना लाभली आहे.
२)    प्रस्तावनेनंतर या ग्रंथास ७ मान्यवर व्यक्तींचे अभिप्राय जोडण्यात आले आहेत. पैकी पहिला अभिप्राय रियासतकार सरदेसाई यांचा असून तो ग्रंथास सर्वस्वी प्रतिकूल असा नाही हे विशेष !
३)    या ग्रंथास सुमारे ५५ संदर्भ ग्रंथांची यादी जोडण्यात आली आहे. पैकी ६ ग्रंथ इंग्रजी भाषेतील आहेत. उर्वरीत ४९ ग्रंथापैकी सुमारे ९ बखरी आहेत तर ९ ग्रंथ हे इतिहासकारच्या तर्कांना / अनुमांना आधार म्हणून वापरलेल्या आरोग्य, वैद्यक शास्त्रांशी संबंधित आहेत. राहता राहिले ३१ ग्रंथ तर, ते सर्व अव्वल दर्जाचे असून त्यांना त्याकाळी आणि आजही संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगात आणले जात आहे. असा हा ग्रंथ सहजासहजी दुर्लक्षित करण्यासारखा अजिबात नाही. तरीही स. १९४४ नंतर याची द्वितीयच काय पण कोणतीच आवृत्ती का निघाली नाही हा एक मोठा प्रश्नचं आहे. पण तो अनुत्तरीत नाही हे नशीब !

       ग्रंथाच्या नावावरून ग्रंथलेखनाचा मुख्य विषय काय आहे याची वाचकांना कल्पना येण्यासारखी आहे. या ग्रंथामध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला कि त्यांनी आत्महत्या केली याची तपशीलवार आणि पुराव्यांच्या आधारे साधार अशी चर्चा करण्यात आली आहे. त्याखेरीज या निमित्ताने पेशवाई आणि पर्यायाने मराठी राज्याच्या विनाशाचीही चर्चा करण्यात आली असून याचे खापर नाना फडणीसवर फोडण्यात आले आहे. अर्थात, नाना फडणीसच्या तत्कलीन – म्हणजे रानडेंचा ग्रंथ प्रकाशित झाला त्या वेळचे – आणि आजच्या पाठीराख्यांना रानडेंचा हा निष्कर्ष अजिबात पटणार नाही हे मी जाणतो. परंतु, माझ्या मते सर्वचं पेशवेकालीन इतिहास ( ‘ स्वतःच्या ब्लॉगची प्रसिद्धी करतोयस काय बेट्या ? ‘ असाच प्रश्न तुमच्या मनात आला आहे ना ?) वाचक मंडळींनी या ग्रंथाचा जरूर अभ्यास करावा. कारण, स. १७६१ ते स. १८०० पर्यंतच्या पेशवे काळातील व घराण्यातील घडामोडी समजून घेण्यासाठी या ग्रंथाइतका माहितीपूर्ण असा दुसरा ग्रंथ अजून तरी माझ्या वाचनात आलेला नाही. शाहू छत्रपती आणि नानासाहेब पेशवे यांच्यातील संबंध, सांगोल्याच्या मोहिमेत पेशव्यांनी छत्रपतींच्या कडून अधिकारांचा घेतलेला राजीनामा, सदाशिवरावाचे तोतये व त्यामागील सत्य, सवाई माधवराव पेशव्याची आई - गंगाबाईचा मृत्यू, महादजी शिंदेचे निधन, नारायणराव पेशव्यास पकडण्याचा कट रचण्यात नाना फडणीससह सर्वच मुत्सद्दी कसे सहभागी होते याची आलेली माहिती, नारायणरावस पकडण्याचा कट रचण्यात आला त्यावेळी आनंदीबाई अथवा इतर कोणी ‘ध’ चा ‘मा’ केला होता कि नव्हता याची केलेली चर्चा, नारायणराव पेशव्याच्या खुनात रघुनाथराव खरोखर दोषी आहे कि नाही ? न्यायाधीश रामशास्त्र्यांनी नारायणरावच्या प्रकरणात खरोखर न्याय केला कि नाही ? परशुरामभाऊ पटवर्धनचा लढाईत मृत्यू झाला कि करवीरच्या छत्रपतींनी त्याची हत्या केली, सवाई माधवराव पेशवा तोल जाऊन गच्चीतून पडला कि त्याने आत्महत्या केली ? अशा अनेक गूढ आणि उघड घटनांचा रानडेंनी जो आढावा घेतला आहे तो खरोखर विस्मयकारक आहे. रानडेंनी ६० – ६५ वर्षांपूर्वी जे लेखनकार्य करून ठेवले आहे, त्या तोडीचे १% देखील इतिहासलेखन आजच्या घडीला कोणी करू शकेल असे वाटत नाही.  

गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

पानिपत असे घडले


              
पानिपत असे घडले


       ' पानिपत असे घडले ' या ग्रंथात पानिपत विषयी मी नव्याने काय संशोधन मांडले आहे याची चर्चा या ठिकाणी करता येणे शक्य नाही. मात्र पानिपतच्या युद्धाविषयी प्रस्तुत ग्रंथात वाचकांना नवीन काय वाचावयास मिळेल याची या ठिकाणी ग्रंथातील उतारांच्या सहाय्याने थोडीशी तोंड ओळख करून देत आहे, तसेच या ग्रंथाच्या ebook ची तसेच हार्ड कॉपीच्या ऑनलाईन खरेदीसाठीची लिंक देखील सोबत जोडण्यात आली आहे.  

 
          पानिपतावर मराठे हरले, हे कोणीचं अमान्य करत नाही, पण पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्याऐवजी बव्हंशी मराठे हे शाकाहारी होते, त्यांच्या अंगावर गिलच्यांप्रमाणे चामड्याची जाड जाकिटे नव्हती किंवा अंगी चिलखत नव्हते अशा तऱ्हेची फालतू कारणे सांगून आपल्या इतिहासकारांनी, स्वतःच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे दाखवून दिले आहे. युद्धातील विजयाची किंवा घटनांमागची कारणे याच कोटीक्रमाने शोधायची म्हटल्यास, मग असेही म्हणता येते कि, अताईखान हा शुद्ध शाकाहारी होता ! पानिपतच्या युद्धात मारले गेलेले सर्व अफगाण हे ' उघड्या पाठीचे ' होते !! आहार - पोशाख हि जर मराठ्यांच्या पराभवाची कारणे आहेत, तर हीच कारणे / हेच नियम अब्दालीच्या बाजूने लढून मृत्यू पावणाऱ्या लोकांना लावता येऊ शकतात. एवढी हिंमत आमच्या विद्वान इतिहासकारांमध्ये आहे का ? सारांश, खाण - पान अथवा वस्त्रे यांच्या माध्यमातून एखाद्या समुदायाच्या संस्कृतीचा मागोवा घेता येतो पण युद्धातील पराभवाच्या कारणांचा आढावा घेता येत नाही.

भाऊने अब्दालीशी तह केला नाही किंवा योग्यवेळी त्याने लढाईचा निर्णय घेतला नाही म्हणून सर्व इतिहासकार त्याला गर्विष्ठ, घमेंडी, दुराग्रही, हट्टी इ. विशेषणांनी संबोधतात. वास्तविक हि दुषणे इतर ठिकाणी किंवा प्रसंगी म्हणा, अयोग्य अशीच आहेत. परंतु, पानिपत युद्धाच्या संदर्भात जर बोलायचे झाले तर हि विशेषणे भाऊसाठी योग्य अशीच आहेत !! पानिपतचे युद्ध चालू झाल्यावर त्याने आपला दुराग्रह जर बाजूला ठेवला असता तर अंती परिणाम निश्चित वेगळा झाला असता असे म्हणता येईल. भाऊचा मुख्य उद्देश म्हणजे, अब्दालीसोबत निर्णायक युद्ध टाळून, किरकोळ झुंजी देत यमुनेकडे निघून जाणे हा होय ! निर्णायक युद्ध न करता लढाई देत यमुनेकडे जायचे असल्यामुळे, लष्करी गोलाची रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. गोलाच्या रचनेत, आपल्या सैन्यातील घोडदळाचा मोठा भरणा लक्षात घेऊन, जरुरीपुरते काही बदल करण्यात आले. त्यानुसार, शत्रू सैन्य गोलाच्या नजीक आल्यास, गोलाच्या त्या बाजूला उभ्या असलेल्या सरदाराने गोलातून बाहेर पडून शत्रू सैन्याला सडकून काढावे आणि परत आपल्या मोर्च्यात येऊन उभे राहावे असे ठरवण्यात आले. याचा परिणाम म्हणजे, शहावलीचा पराभव झाला आहे व त्याचे सैन्य पळत सुटले आहे हे पाहून देखील हुजुरातीचे सरदार परत मागे फिरले. कारण ; शत्रू सैन्याला पळवून लावण्याचे मुख्य काम त्यांनी बजावले होते. आता काही काळापुरता तरी त्यांचा मार्ग निर्धोक राहणार होता.

        
पानिपत युद्धातील भाऊच्या दुराग्रही किंवा नानासाहेब पेशवा आपल्या पत्रात लिहितो त्यानुसार, ' आधी उगीच कुतर्क करावा हा भाऊचा जातिस्वभाव ' असल्याने त्याचा व मराठी सैन्याचा अंती घात झाला !! आपल्या लष्कराच्या कार्यक्षमतेवर त्याचा पुरेपूर विश्वास होता. आपली फौज गिलच्यांना भारी आहे हे त्याला माहिती होते. इथपर्यंत त्याचा तर्क ठीक होता असे म्हणता येईल, परंतु त्याचबरोबर गोलाच्या रचनेचा वापर करून, शत्रूचे निर्णायक हल्ले परतवून लावत, एकप्रकारे आक्रमण - बचाव अशी संमिश्र लढाई खेळत आपण यमुना गाठू हा त्याचा कुतर्क म्हणता येईल.  


मराठ्यांकडे जसे दारूचे बाण होते, तसेच नजीबकडे देखील असल्याचा उल्लेख मिळतो. एकावेळी तो हजार - हजार बाणांचा मारा करत असे. या बाणांच्या दणदणाटाने ' आकाश आणि पृथ्वी दिसेनाशी होत आणि कान फुटून जात ' अशी माहिती काशीराज आपल्या बखरीत देतो. मराठ्यांनी त्या दिवशी शत्रूवर चाल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण या बाणांच्या माऱ्यापुढे त्यांचे काहीएक चालले नाही अशा आशयाचे विधान काशीराज आपल्या बखरीत करतो. शेजवलकरांचे देखील जवळपास असेच मत आहे...... ...... ...... ......
प्रथम हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि, हुजुरातीकडे  अशा बाणांचा साठा असून देखील अफगाण सैन्याला ते फारसे त्रस्त करू शकले नाहीत. याचा अर्थ, या बाणांचा विशेष असा फायदा हुजुरातीला मिळाला नाही. त्याचप्रमाणे, काशीराज किंवा शेजवलकर म्हणतात त्यानुसार दारूच्या बाणांचा नजीबला काही विशेष फायदा मिळाला असे म्हणता येत नाही. तसेच, नजीबने मुक्तहस्ताने केलेल्या या बाणांच्या वापरामुळे शिंदे - होळकरांना त्याच्यावर आक्रमण करता आले नाही हे देखील साफ खोटे आहे.  मुळात शत्रू सैन्य व शिंदे - होळकरांच्या फौजा समोरासमोर म्हणजे दोन - तीन किलोमीटर्स अंतरावर समोरासमोर आल्या त्याच मुळी दुपारी दोनच्या सुमारास.

 
विश्वासराव हा हुजुरातीचा नामधारी का होईना पण प्रमुख नेता असल्याने फारतर हुजुरातीच्या सैन्याचा धीर खचला, अशा आशयाच्या विधानावर एकवेळ भरवसा ठेवता येऊ शकतो पण विश्वासरावाच्या मृत्यूमुळे सबंध मराठी सैन्याने कच खाल्ली हे विधान चुकीचे आहे. उलट, विश्वासराव मेला आहे हे समजूनसुद्धा मराठी पथके रणभूमीवरून रेसभरसुद्धा मागे हटली नाहीत ! कदाचित यावर असाही युक्तिवाद केला जाऊ शकतो कि, भाऊ रणात हजर असल्यामुळे विश्वासराव मेला तरी मराठी सैन्य लढले. पण अशा तऱ्हेच्या युक्तिवादात काही दम नाही. कारण ; मग भाऊ जिवंत असतानाचं मराठी लष्कर पळत सुटले होते, त्याचे कारण काय असावे ?  

  
होळकरासमोर नजीबच्या सैन्याचे मोर्चे असल्यामुळे लढाई न करता होळकर पळून गेला अशा आशयाची कित्येक विधाने आधुनिक इतिहासकारांनी पानिपतच्या लढाईसंदर्भात लेखन करताना, मल्हाररावाविषयी लिहिलेली आहेत. अर्थात, होळकराविषयी असलेला हा गैरसमज केवळ आजचा नसून त्यावेळी देखील तत्कालीन लोकांच्या मनात होता हे फारसी बखरींवरून लक्षात येते. .... ....... ....  होळकाराने पानिपतच्या लढाईत सक्रीय सहभाग घेतला होता. तो जर लढला नसता तर चार - साडेचारच्या दरम्यानचं अब्दालीच्या डाव्या आघाडीवरील पथके हुजुरातीच्या उजव्या कुशीवर येऊन आदळली असती ! परंतु, या मुद्द्याकडे आजवर सर्वांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. ...... ...... नजीबने होळकरास पळून जाण्यासाठी वाट दिली असे मान्य केले तर मग प्रश्न असा उद्भवतो कि, नजीबच्या डाव्या बाजूला असलेल्या शहापसंदखान, मुल्ला सरदार रोहिला या दोघांनी होळकरास सहजासहजी कसे जाऊ दिले ? ........... ........
पानिपतच्या लढाईमध्ये आणि पानिपत घडून गेल्यावर देखील कित्येकदा होळकर व नजीब एकमेकांच्या विरोधात लढल्याचे इतिहासकारांनीचं नमूद केलेले आहे. हे लक्षात घेता, पानिपतावर होळकर - नजीब एकमेकांविरुद्ध अजिबात लढले नाहीत असे म्हणणे एकदम चुकीचे आहे, होळकरावर अन्याय करणारे आहे ! 


पवारांची फौज पळून जात असल्याचे दृश्य नजरेस पडतांच, इतर सरदारांच्या  फौजेची हिंमत खचली. विपरीत प्रसंग पाहून विंचूरकर, गायकवाड व माणकेश्वर यांनी लढाई सोडून जाण्याचा निर्णय घेतला. या क्षणी माघार घेणे हेच श्रेयस्कर असे त्यांचे मत बनले. त्यानुसार गोलाच्या मधून हे सरदार आपापल्या निवडक लोकांसह पानिपतच्या दिशेने सटकले. या सरदारांनी पाच – सव्वापाचच्या  आसपास डावी बाजू सोडली असावी. गोलाच्या डाव्या बाजूचे सरदार निघून गेल्यावर मराठी लष्कराची गळती सुरु झाली. या सरदारांपासून प्रेरणा घेऊन भाऊच्या खास वर्तुळातील नाना पुरंदरे लढाई सोडून निघून गेला. नाना पुरंदरे साधारण साडेपाचच्या आसपास होळकरांच्या मोर्च्याजवळ पोहोचला. यावेळी मल्हारराव होळकर लढाई सोडून निघाला होता किंवा निघण्याच्या तयारीत होता. नाना पुरंदरे निघून गेल्यावर काही मिनिटांनी नाना फडणीसने देखील आपल्या घोड्याचे तोंड पानिपतकडे वळवले.    


भाऊच्या सोबत, म्हणजे जवळपास यावेळी समशेरबहाद्दर, जनकोजी शिंदे व संताजी वाघ हे व आणखी काही प्रमुख सरदार होते. या सरदारांची व भाऊची प्रत्यक्ष भेट घडून आली असल्याचा किंवा अशी भेट घडली नसल्याचा देखील पुरावा आता उपलब्ध नाही व भविष्यात अशा प्रकारचा पुरावा उपलब्ध होण्याची शक्यता अजिबात नाही. परंतु, तर्काच्या आधारे असे म्हणता येते कि, या सरदारांपैकी काहींची भाऊसोबत गाठभेट घडून आली होती व सरदारांच्या सल्ल्याने भाऊने लढाई सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला.




या अखेरच्या गुद्दगुद्दीत, झीटीस आलेले मुसलमान व जीवावर उदार झालेले मराठे एकमेकांवर निकराने तुटून पडले. या भयंकर गोंधळातचं सदाशिवरावभाऊ अडकला होता. बाहेर निसटून जायचे सर्व मार्ग आता बंद झाले होते. आजूबाजूला असलेल्या मराठी सैनिकांची संख्या वेगाने घटू लागली होती. आता आपल्या निसटून जाता येणार नाही हे भाऊने ओळखले. आल्या परिस्थितीला सामोरे जाण्याखेरीज आपल्या हाती काही नाही हे ओळखून मराठ्यांचा हा हट्टी, गर्विष्ठ, घमेंडी सेनापती मोठ्या धैर्याने मृत्यूला समोर गेला. यावेळी पानिपत येथे सूर्यास्त होऊन गेला होता !





http://www.bookganga.com/eBooks/Book/4900400902881415755.htm 

 http://www.sahyadribooks.org/books/PanipatAseGhadle.aspx?bid=829