सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

पानिपत बद्दल थोडेसे




    “ .... ... आप्त होते, बळवंतराव मातुल व नाना पुरंदरे वगैरे, ते अनाप्त झाले. अनाप्त शाहानवाजखानी भवानीशंकर वगैरे ते आप्त झाले. त्यांचे वाक्याचे ठायी विश्वास तेणेकरून आपली रीत युद्धाची सोडून यवनाची रीत धरली. “

     ( संदर्भ ग्रंथ :- नाना फडनवीस यांचे चरित्र ( आत्मचरित्रासह ) :- वा. वा. खरे )

    जोपर्यंत शाहनवाज खान, भवानी शंकर वगैरे गृहस्थ कोण होते व पानिपत स्वारीतील त्यांची नेमकी भूमिका काय होती याचा उलगडा होत नाही तोवर पानिपत मोहिमेतील किमान ७० ते ८० % सत्य तरी आपणांस समजणार नाही.

    नाना फडणीसच्या आत्मचरित्रातील उपरोक्त नोंद जवळपास सर्वच पानिपत अभ्यासकांनी वाचली असूनही त्याकडे माझ्यासहीत सर्वांचेच अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे आता सिद्ध झाले आहे व हा मूर्खपणा माझ्याही हातून घडल्याचे मी या स्थळी जाहीरपणे कबूल करत आहे.