शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

यशवंतराव होळकर ( मुक्त चिंतन )


महाराजा यशवंतराव होळकर या व्यक्तीचा इतिहास समजावून घेणे व तो कथन करणे अतिशय अवघड काम आहे. अवघड यासाठी की ज्यावेळी मध्ययुगीन कालखंड संपुष्टात येऊन आधुनिक कालखंडास आरंभ होत होता अशा संधीकाळात या व्यक्तीचा तत्कालीन हिंदुस्थानच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला. बरं दुसरी गोष्ट अशी की, रूढार्थाने यशवंतरावाला मराठी साम्राज्याचा आधारस्तंभ किंवा पेशव्यांचा सरदार असेही म्हणता येत नाही. भलेही तो पेशवाईत उदयास आलेल्या होळकर घराण्याचा वंशज असला व त्याने होळकरशाही दौलतीची धुरा काही वर्ष यशस्वीरित्या सांभाळली असली तरी, यशवंतराव पूर्वीची होळकरशाही व यशवंतरावाच्या कारकिर्दीतील होळकरशाही यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हा फरक समजावून घेण्यापूर्वी घेण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. 

डोईजड सरदारांना संधी मिळताच चेपण्याचं धोरण हे थो. बाजीराव पेशव्याच्या काळापासून सुरू होतं. पानिपतचा फायदा घेऊन बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याने शिंदे, होळकर, पवार या तीन सरदारांच्या सरंजामाची जप्ती चालवली. पैकी, मल्हारराव होळकर त्यावेळी हयात असल्याने पेशव्याला त्याच्यावर फार काळ निग्रह करणे शक्य झाले नाही. परंतु शिंदे आणि पवार यात बराच काळ भरडले गेले.

पुढे मल्हारराव तसेच त्याचा नातू मालेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर होळकरशाहीच्या वारसाचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी जर पेशवे घराण्यात भाऊबंदकी माजलेली नसती तर थो. माधवराव पेशव्याने होळकरांची दौलत जप्त केलीच नसती असे निश्चयपूर्वक म्हणता येत नाही. याप्रसंगी होळकरशाहीचा बचाव करण्याचं जे चातुर्य व धाडस अहिल्याबाईने दाखवलं त्याला खरोखरच तोड नाही. पुढे राजकीय कारभार अहिल्याबाईकडे व लष्करी कामगिरी तुकोजी होळकरकडे अशी कार्यभागाची विभागणी झाली. आणि ही अहिल्याबाईच्या निधनापर्यंत कायम राहीली.

अहिल्याबाईच्या मृत्यूनंतर तुकोजी होळकर हा होळकरशाहीचा प्रमुख ठरला. परंतु त्याचाही वृद्धापकाळ आणि घरात मुलांची भांडणं. परिणामी त्याच्या अखेरच्या दिवसात थोरला मुलगा काशीरव व धाकटा मुलगा मल्हारराव यांच्यामधील संघर्ष टोकाला पोहोचला. उभयतांमध्ये दौलतीची विभागणी करण्याचा तुकोजीने प्रयत्न केला खरा पण तो यशस्वी होऊ शकला नाही. होळकरशाहीच्या या अंतस्थ भांडणाला पेशवे दरबारच्या राजकारणाचाही उपसर्ग पोहोचला.

 ज्याप्रमाणे कमकुवत सरदारांना गिळून टाकण्याचं पेशव्यांचं धोरण होतं तेच थोड्याफार फरकाने होळकरांच्या सोबत्याचं म्हणजे शिंद्यांचही होतं. महादजीच्या मृत्यूनंतर शिंद्यांच्या  गादीवर आलेल्या दौलतरावाने काशीरावास हाताशी धरून होळकरी दौलत गिळंकृत करण्याचा प्रयत्न आरंभला. 

 दरम्यान याच काळात सवाई माधवराव पेशव्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पेशवाईचा नवा धनी कोण हा प्रश्न मुत्सद्दी - सरदारांसमोर उभा राहिला. आपल्या पसंतीचा इसम पेशवा म्हणून नेमल्यास पेशव्याचे सर्व अधिकार आपल्या हाती येतील हे उघड गुपीत आता सर्वांनाच कळून चुकलं होतं. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्याचा डाव हाणून  पाडण्यास प्रवृत्त झाला होता. या यावेळी पेशवाईचे अधिकृत वारस म्हणजे मृत रघुनाथरावाचे दोन मुलगे --  बाजीराव व चिमणाजी हेच खरे हक्कदार होते. परंतु नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर रघुनाथराव व त्याच्या कुटुंबीयांशी सर्वांनीच --  विशेष करून नाना फडणवीसने शत्रुत्वाची भूमिका स्वीकारल्याने या दोघांपैकी गादीवर येणे नाना फडणवीसला पसंत नव्हते. त्यामुळे त्याने प्रथम बाहेरच्या दत्तकाची खटाटोप केली. परंतु ती सिद्धीने न गेल्याने बाजीराव ऐवजी अल्पवयीन चिमाजीला स. माधवरावची पत्नी यशोदाबाई, हिच्या मांडीवर दत्तक देऊन पेशवा बनवण्याचा घाट घातला. वस्तुतः नातेसंबंधाने पाहिलं तर बाजीराव आणि चिमाजी हे यशोदाबाईचे चुलत सासरे होत. परंतु राजकारणात असला शास्त्रार्थ पाहिला जात नसतो हेच खरं !

पुढे अनेक कटकारस्थानं होऊन चिमाजीला यशोदाबाईकडे दत्तक देण्यात आले व त्याला पेशवाईची वस्त्रेही मिळाली. परंतु ही मसलत परशुराम भाऊ पटवर्धन आणि शिंदे यांनी सिद्धीस नेली व नानाला राजकारणातून निवृत्त करण्याचा घाट घातला. तेव्हा बुद्धीसागर नानाने महाडचे कारस्थान रचून बाजीरावाला पेशवे पदावर स्थापित केलं. आणि जर खरोखर तटस्थपणे या घटनेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे झाल्यास पेशवाईची इतिश्री याचवेळी झाली, असेच म्हणावे लागते. कारण या राजकारणासाठी नानाने निजाम, भोसले यांसोबत इंग्रजांची मदत घेतली होती. असो.  ( यासंबंधी विस्तृत विवेचन दुसऱ्या बाजीराव आणि नाना फडणवीस या दोघांविषयीच्या लेख मालिकांमध्ये याच ब्लॉगवर करण्यात आलेलं आहे. )

 दु. बाजीराव गादीवर येताच त्याचे आणि नानाचे शीतयुद्ध पुन्हा सुरू झाले. यावेळी नानाने हाताशी धरलं होतं रघुनाथ रावाचा दत्तक मुलगा अमृतराव याला. अमृतरावाला पुढे करून बाजीरावाला दाबण्याचा किंवा सत्तेवरून खाली खेचण्याचा त्याने प्रयत्न आरंभला आणि या राजकारणात होळकरशाही आपोआप खेचली गेली. कारण काशीराव होळकर हा दौलतराव शिंदेच्या प्रभावाखाली आला होता. तर मल्हाररावाने नाना फडणवीसचा पक्ष स्वीकारला. परिणामी मल्हारराव बेसावध असताना काशीराव आणि शिंद्यांच्या फौजेने  त्याच्यावर हल्ला चढवून त्यास ठार केले. आणि इथून पुढे सुरू होते यशवंतराव होळकराची कहाणी.


 काशीराव होळकरला हाताशी धरून शिंद्याने होळकरी दौलत घशात घालण्याचा जो उपक्रम आरंभला, त्याला विरोध करण्याची जबाबदारी यशवंतराव व त्याचा भाऊ विठोजी यांनी स्वीकारली. आणि या भावांना अंतःस्थ प्रेरणा होती नाना फडणवीसची. विठोजी होळकरने पंढरपूर वगैरे प्रदेशात जो धुमाकूळ घातला असे इतिहासकार सांगतात, तो आरंभी नाना फडणवीस व नानाच्या मृत्यूनंतर अमृतराव पेशव्याच्या आज्ञेनेच. इतकेच नव्हे यशवंतराव होळकर पुढे पुण्यामध्ये आला ती मसलत देखील नानाच्याच सल्ल्याने उभी राहिली होती. फरक फक्त इतकाच की नाना हयात असताना यशवंतरावाला इकडे येण्याची सवय प्राप्त झाली नाही. पुढे नानाच्या मृत्यूनंतर अमृतरावाने बोलावणं पाठवल्यामुळेच तो पुण्याला आला होता ही गोष्ट कागदोपत्री नमूद आहे, परंतु सहसा सांगितली जात नाही.

 चर्चेच्या ओघात आपण थोडं पुढे आलो. यशवंतरावाचा प्रवास इतका सुलभ झाला नाही. नागपूरकर भोसल्यांनी विश्वास देऊन त्याला कैद केलं होतं. तिथून त्याने स्वतःची सुटका केली. नंतर काही काळ तो माळव्यामध्ये पवारांकडे राहिला होता. स्वतःचे लष्करी बळ वाढवत त्याने अशी सेना उभारली जी त्यावेळच्या बलाढ्य गणल्या जाणाऱ्या शिंद्यांच्या फौजेला खुल्या मैदानात समोरासमोर तोंड देऊ शकेल. आणि त्यानंतर सुरू झाली शिकार !

होळकरी दौलत उघड उघड घशात घालण्याचा दौलतरावाने डाव आरंभल्याने यशवंतराव त्याच्या पाठी हात धुवून लागणार हे निश्चित होतं आणि झालंही तसंच ! मग यातून परस्परांच्या मुलखांवर स्वाऱ्या झाल्या, शहरांची नासधूस झाली आणि सरते शेवटी पेशवा ताब्यात घेण्याची वेळ आली. इथे आपल्याला हेतू लक्षात घेणे आवश्यक आहे.

 अमृतरावाने जरी होळकर बंधूंना हाताशी धरलं असलं तरी त्याचा मुख्य उद्देश हा बाजीरावाला सत्तेवरून खाली खेचण्याचा नव्हता तर मुख्य कारभारी पद मिळवण्याचा होता. याचाच अर्थ शिंद्यांचे वजन कमी करणे आणि त्यांना दख्खन मधून हिंदुस्तानात परत पाठवून देणे. आणि ही बाब विना लढाई घडवून येण्यासारखी नव्हती. परिणामी हडपसर येथे शिंदे-पेशवे यांच्या संयुक्त फौजांशी यशवंतरावाचं खूप मोठे युद्ध झालं. ज्यामध्ये यशवंतरावाने उभयतांच्या सैन्याचा पराभव केला. लष्करी आघाडीवर जरी यशवंतराव विजयी झाला तरी राजकीय आघाडीवर मात्र यावेळी त्याचा पराभव  घडून आला. ज्या कामासाठी तो पुण्याला आला होता ते तर झालं नाही. बाजीराव पुणे सोडून वसईला जाऊन बसला. रिकाम्या झालेल्या मसनदीवर बसण्याची हिंमत अमृतरावाला होईना. अमृतरावाच्या मुलाला यशोदा बाईच्या मांडीवर दत्तक द्यावे तर ती रायगडावर बाजीरावाच्या नजरकैदेत. त्यात राजकीयदृष्ट्या अडचण अशी होती की यशवंतराव हा पेशव्यांचाच नव्हे तर होळकरांचाही अधिकृत सरदार नव्हता. म्हणजे तो एक बंडखोरच. त्यामुळे लष्करी जोर असून देखील दुबळ्या अमृतरावामुळे यशवंतरावाचे ही धडाडी वाया गेली.

 बाजीरावाने वसईचा तह करून ब्रिटिश फौज मदतीला आणली. इंग्रजांनी प्रथम बाजीरावाच्या पक्षपात्यांना -/ भोसले व शिंद्याला लोळवून आपल्या सामर्थ्याची झलक दाखवून दिली. इतिहासात नमूद असलेल्या या दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धामध्ये शिंदे-भोसले यांना मदत करण्याची यशवंतरावाची भरपुर इच्छा होती. परंतु त्याचा काटा काढण्याची बाजीरावास असलेली आतुरता व यशवंतरावाचा काटा काढण्यासाठी  शिंदे आणि बाजीराव यांच्यात चाललेल्या गुप्त वाटाघाटी अमृतराव पेशव्याने यशवंतरावास कळवल्यानंतर त्याने या युतीत सहभागी होण्याचे टाळले. परिणामी एकेकाळचे अजिंक्य योद्धे ईस्ट इंडिया कंपनीचे मांडलिक बनवून राहिले.

 शिंदे आणि भोसले जाग्यावर बसताच इंग्रजांनी होळकरांकडे मोर्चा वळवला. पेशवाई आणि त्यांचे मुत्सद्दी काहीही म्हणत असले तरी इंग्रजांच्या लेखी यशवंतराव हाच होळकरशाहीचा अधिकृत वारस होता. त्यामुळे त्यांनी राजकीय व सामारिकदृष्ट्या त्याची नाकेबंदी करण्यास आरंभ केला. नागपूरकर भोसल्यांचा गनिमी कावा व शिंद्यांचे कवायती कंपू, यांचा अल्पवकाशात पराभव केल्याने यशवंतरावाचा पण सहज बंदोबस्त करू अशी इंग्रजांना साधार घमेंड होती. परंतु अल्पवकाशात त्यांना वास्तवाची जाणीव झाली.

 धावपळीच्या तसेच खुल्या मैदानी युद्धांमध्ये यशवंतरावाने इंग्रजांना अक्षरशः रडवले. मॉन्सनला तर आपल्या तोफा सोडून पळून जावं लागलं. जी अत्यंत नामुष्कीची गोष्ट समजली जाते. हिंदुस्थानातील ब्रिटिश सेनापती लॉर्ड लेकला महादजी शिंद्याने उभारलेलं बलदंड लष्कर बुडवल्याचा जो अभिमान होता, अभिमान गर्व होता तो भरतपूरच्या युद्धात यशवंतरावाने पुरेपूर उतरवला.

यशवंतरावाच्या या पराक्रमाची अद्यापही आपल्याला म्हणावी तशी जाणीव नाही. पण एक गोष्ट इथे नमूद करणे मी आवश्यक समजतो की यानंतर ईस्ट इंडिया कंपनीवर हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल बदलण्याची नामुष्की ओढवली. पेशवा, शिंदे, भोसले यांना आपल्या पंखाखाली आणणाऱ्या रिचर्डला वेलस्लीला गव्हर्नर जनरलच्या पदावरून हटवून कॉर्नवॉलिसला परत आणण्यात आले. कॉर्नवॉलिसने बरोबरीच्या नात्याने यशवंतराव बरोबर तह करून हे युद्ध आटोपतं घेतलं. या संघर्षात यशवंतरावाने दिल्लीच्या बादशहाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता जो यशस्वी झाला नाही. पंजाबात जाऊन शिखांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, तोही अपयशी ठरला.  परिस्थिती अशी की बाह्य जगत यशवंतरावाला मराठी साम्राज्याचा घटक मानत होतं.पण ते साम्राज्य किंवा त्या साम्राज्याचे घटकावयव त्याला आपलं मानत नव्हतं. त्यामुळे जिथे पेशवा, शिंदे, भोसले, गायकवाड इत्यादी सरदार त्याच्या पाठीशी उभा राहण्यास कचरत होते तिथे इतरांनी आपले हात का पळून घ्यावेत !

ब्रिटिशांसोबतच्या तहानंतर यशवंतरावाने आपल्या लष्कराची पुनर्रचना आरंभली. तोफांचे नवीन कारखाने काढले. परंतु अविश्रांत परिश्रम व असाध्य रोगाने ग्रस्त असा हा वीर योद्धा दि. २८ ऑक्टोबर १८११ रोजी मरण पावला. परंतु या व्यक्तीच्या पराक्रमाची दहशत अशी की ,मृत्यू पश्चातही सात वर्षे होळकरांच्या राज्याकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत इंग्रजांना झाली नाही.

यशवंतराव होळकर केवळ एक वीर योद्धाच नव्हता तर कुशल राजकारणी देखील होता. पुण्यात जो डाव फसला तो भरून काढण्यासाठी त्याने जो प्रयत्न आरंभला, त्याची सुरुवातच मुळी त्याने स्वतःला राज्याभिषेक करून केली. जी जग दुनिया त्याला उपटसुंभ, बंडखोर, लुटारू म्हणत होती..  त्यांना त्याने स्वतःला अभिषेक करून महाराज म्हणण्यास भाग पाडले. लष्करात नोकरीसाठी येणारे युरोपियन्स..  विशेष करून इंग्रज हे ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढण्यास तयार होत नसत किंवा किंवा ऐन युद्धाच्या वेळी ते आपल्या देशबंधूंना सामील होत. त्यांना धडा शिकवण्यासाठी यशवंतरावाने अशा उद्धट अधिकाऱ्यांच्या गर्दनी उडवल्या. ज्यामुळे अधिकारी वर्गाला दहशत बसली व या कृत्यामुळे इंग्रज इतिहासकारांचा यशवंतरावावर अत्यंतिक रोष ओढवला. असो.

 जाता जाता येथे एका मुद्द्याची चर्चा करणे मला आवश्यक वाटते व तो म्हणजे यशवंतरावावर करण्यात आलेला पुणे शहर लुटीचा आरोप. या संदर्भातील सरदेसायांच्या मराठी रियासत खंड ८ मधील पुरावे पाहता अमृतराव पेशव्याने यशवंतरावास लष्करी मदतीच्या बदल्यात काही रक्कम देणे मान्य केले होते. यशवंतराव पुण्याला आला. हडपसरची लढाई जिंकला आणि त्याने अमृतरावाला पुण्यात आणले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होळकराला कबूल केलेली रक्कम देणे अमृतरावास शक्य नसल्याने त्याने पुणे शहरातून खंडणी वसुलीचा धडाका लावला. या वसुलीचे काम अमृतरावाचा सरदार हरीपंत भावे हा करत होता व त्याच्या मदतीकरता यशवंतरावाने आपले काही सरदार नेमले होते. त्यामुळे यावेळी जे काही अत्याचार अनाचार झाले त्यांची जबाबदारी यशवंतराव पेक्षा अमृतराव पेशव्यावर अधिक येते. परंतु इतिहासकारांचा दुटप्पीपणा असा की पेशवे घराण्याशी संबंधित कुठल्याही व्यक्तीवर उघड  दोषारोप करण्यास त्यांचे मन धजावत नाही. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचं खापर यशवंतरावाच्या माथी मारलं. असो.

लेखाचा समारोप करताना मी एकच म्हणेन की यशवंतराव होळकर यांचे चरित्र अधिकाधिक संशोधित स्वरूपात लोकांसमोर येणे अतिशय आवश्यक आहे. व अनेक ताज्या दमाचे तरुण इतिहासकार या कामी प्रयत्नशील असल्याचे आशादायी चित्रही दिसत आहे. ज्यामुळे केवळ यशवंतरावच नव्हे तर अनेक अशा ज्ञात - अज्ञात,  इतिहासकारांनी हेतूतः खलपुरुष/व्यक्ती म्हणून प्रसिद्ध केलेल्या चरित्रांची उजळ बाजू आपल्यासमोर येत राहील.

शुक्रवार, १० जून, २०२२

नवं पानिपत - कच्चा खर्डा २

प्रकरण २)


दि. २८ एप्रिल १७४० रोजी बाजीराव पेशव्याचा अल्पशा आजाराने मृत्यू घडून आला. पश्चात दि. २५ जून रोजी बाजीरावाचा थोरला मुलगा बाळाजी उर्फ नाना यांस छ. शाहूने पेशवाईची वस्त्रे प्रदान केली. तेव्हापासून ते मृत्यूपर्यंत, मधल्या चार दोन महिन्यांचा काळ वजा केल्यास -- नानासाहेबाकडे साधारणतः वीस वर्षे पेशवेपद होते. त्यातही शाहूचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे स. १७४९ डिसें. पर्यंत आरंभीची नऊ वर्षे त्याची सत्ता छत्रपतींमुळे नियंत्रित होती. पुढे शाहूच्या पश्चात झालेल्या राजकारणात त्याची दोन तीन वर्षे खर्ची पडली तरी नंतर आठ नऊ वर्षे नानासाहेबाने अनियंत्रित सत्ता उपभोगली. याच उर्वरित आठ नऊ वर्षांच्या काळात पेशवाईचे भाग्य कळसास पोहोचले खरे, परंतु भरतीची लाट ओसरून जितक्या त्वरेने ओहोटीस आरंभ होतो, तसाच काहीसा प्रकार नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीतील अखेरच्या टप्प्यात घडून आल्याचे आपणांस दिसून येते.


पानिपत प्रकरण उभारणीत नानासाहेब पेशव्याचा देखील मोठा वाटा असल्याने त्याच्याविषयी संक्षेपात जाणून घेणे आपणांस भाग आहे.


नानासाहेबाचा जन्म दि. १२/१६ डिसेंबर १७२० रोजी झाला. रणशूर पित्याप्रमाणे नानासाहेब लष्करी नेतृत्वात कुशल नसला तरी महादोबा पुरंदरे व चुलत चिमाजी आपाच्या हाताखाली राजकारणाचे त्यांस शिक्षण मिळाल्याने प्रामुख्याने प्रशासकीय कामकाजावर त्याची पकड होती. खेरीज कट कारस्थानांत तर तो बाजीराव - चिमाजी पेक्षाही सवाई होता.


नानासाहेबाचा स्वभाव राजकारणी व्यक्तिप्रमाणे संशयी असला तरी त्यांस खुनशीपणाची जोड असल्याने हा अतिशय धोकादायक मनुष्य होता. पेशव्याची पत्रांतील भाषा कितीही गोड, प्रेमळ, लाघवी तसेच विद्वत्तापूर्ण असली तरी स्वसामर्थ्याची घमेंड व अनिवार हांव हे त्याचे दुर्गुण आपणांस तेव्हाच कळून येतात. त्यामुळेच जरी पेशव्यास लष्करी अंग नसले तरी सरदारांवर त्याची दहशत असल्याने धनीपणाचा बोज राखून त्यांस आपली कामं साधून घेता आली. अर्थात, कधी कधी सरदार त्याची अवज्ञाही करीत, परंतु त्यांना परस्पर शिक्षा देऊन सावरून घेण्याचीही अजब हातोटी पेशव्याकडे होती. याचे प्रत्यंतर जयाजी शिंद्याच्या मारवाड तसेच रघुनाथरावाच्या हिंदुस्थान स्वाऱ्यांत आपणांस दिसून येते, ज्याची पुढे तपशीलवार चर्चा केली जाणार आहे.


नानासाहेबाच्या कारकिर्दीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने दोन पिढ्यांचा -- विशेषतः बाजीरावाने आरंभलेला उद्योग शेवटास नेण्याचा प्रयत्न केला. अर्थात या प्रयत्नांना राजकीय समजूतदारीची जोड नसल्याने पेशवाईस, परिणामी समस्त मराठी राज्यास त्याचे परिणाम भोगावे लागले, ज्याची खऱ्या अर्थाने सुरुवात पानिपताने झाली.


यासंबंधात माळवा, बंगाल, कर्नाटक ही प्रकरणे पुरेशी बोलकी आहेत. पैकी आपल्या विषयाशी संबंधित माळवा, बंगालची येथे आपण थोडक्यात चर्चा करू.


माळव्याची सुभेदारी मिळवण्यासाठी बाजीरावाने शक्य तितके प्रयत्न करूनही त्यांस प्राप्त झाली नाही. पश्चात पेशवेपद प्राप्त होताच नानासाहेबाने प्रथमतः माळव्यावर लक्ष केंद्रित करत एकीकडे स. जयसिंहाच्या मध्यस्थीने बादशहा सोबत बोलणी आरंभली तर दुसरीकडे निजामाला त्याच्या मुलाविरुद्ध -- नासिरजंग -- मदत करत त्याच्याकडून आपणांस अडथळा होणार नाही याकडे लक्ष पुरवले.

स. जयसिंहामार्फत माळव्याच्या सुभेदारीकरता दिल्ली दरबार सोबत चाललेल्या वाटाघाटींना जोर यावा म्हणून पेशव्याने सरदारांकरवी धारचा कब्जा घेतला. परिणामी बादशाहने स. जयसिंह, प्रयागचा सुभेदार अमिरखान, अयोध्येचा सफदरजंग, खानडौराचा मुलगा समसामुद्दौला, अजमखान इ. उमरावांना माळव्यावर स्वारीचा हुकूम दिला.

पैकी, पेशव्याने सरदारांकडून सफदरजंग व अमिरखान यांस मार्गात अडथळा उत्पन्न केल्याने स. जयसिंहाने पेशव्यासोबत तहाची बोलणी आरंभली. प्रथेस अनुसरून पेशव्याने समग्र हिंदुस्थानच्या चौथाईची मागणी करत बादशाही मुलखाच्या संरक्षणाची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली परंतु स. जयसिंहाने त्यांस माळवा आणि गुजरात या दोन प्रांतांच्या सुभेदारीची फर्मानं मिळवून देण्याचे मान्य करताच पेशव्याने आपली संमती दर्शवली. त्यानुसार दि. ७ सप्टें. १७४१ रोजी माळव्याची सुभेदारी शहजादा अहमदच्या नावे करत नायब सुभेदार म्हणून पेशव्याची नियुक्ती करून बादशहाने आपली अब्रू राखली.  ** {१}


** तळटीप :- वाटाघाटींमध्ये माळव्यासोबत गुजरात सुभ्याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात सनदा फक्त माळव्याच्याच मिळाला. 

माळव्याची सनद नानासाहेब पेशव्यास कधी मिळाली याबाबत इतिहासकारांमध्ये एकमत नाही. 

ग. ह. खरे संपादित ' ऐतिहासिक फार्सी साहित्य ४ था खंड,'  यामध्ये माळव्याची सनद दिली असून त्यावरील तारीख दि. १७ सप्टें. १७४१ अशी आहे.

अ. रा. कुलकर्णी व ग. ह. खरे संपादित ' मराठ्यांचा इतिहास खंड दुसरा ' मधील पेशवा बाळाजी बाजीराव प्रकरणाचे लेखक सदाशिव आठवले यांच्या मते माळव्याच्या नायब सुभेदारीच्या सनदा स. १७४३ च्या ऑगस्टमध्ये तयार झाल्या परंतु बादशाही मोहर होऊन प्रत्यक्ष पेशव्याच्या हाती स. १७५० साली पडल्या.





माळव्या सोबत गुजरात सुभ्याच्या सनदांसाठी पेशवा प्रयत्नशील का होता हे थोडक्यात समजावून घेतलं पाहिजे.

गुजरातमध्ये सेनापती दाभाडे व त्यांचे हस्तक गायकवाड कार्यरत असताना बाजीरावाने गुजरात सुभेदार सरबुलंदखानाकडून छ. शाहूच्या नावे चौथाई व सरदेशमुखीची सनद प्राप्त केली. ( पे. द. १५, पृ. क्र. ८४-८५, सदर लेखांकांची तारीख दि. ९/०२/१७२८ )


छ. शाहूने चिमणाजी बल्लाळ उर्फ चिमाजी आपाला गुजरातमध्ये निम्मा मोकासा देऊ केला. ( शाहू रोजनिशी ले. क्र. १०५, स. १७२५-२६ )

चिमाजी आपाकडील गुजरातमधील निम्मा मोकासा दूर करण्यात येऊन तो खंडेराव दभाड्यास परत देण्यात आला. ( शाहू रोजनिशी ले. क्र. १५९, स. १७२७-२८ ) 


दि. १५/१२/१७३० रोजी चिमणाजी बल्लाळ कडील गुजरात मधील निम्मा मोकासा दूर करण्यात येऊन तो त्रिंबकराव दाभाड्यास देण्यात आला. ( पे. द. ३०, पृ. क्र. २९९ )


प्रश्न असा आहे कि, चिमणाजी बल्लाळ कडून मोकासा दूर केल्याच्या दोन वेगवेगळ्या सालांतील नोंदी आहेत परंतु मोकासा दिल्याची नोंद मात्र एकच.

दुसरे असे की, चिमणाजी कडील मोकासा दूर करून दाभाड्यांना देण्यामागे छ. शाहूच्या मनात सेनापती - पेशवे यांदरम्यान कज्जा निर्माण व्हावा अशी भावना असल्याचा थेट आरोप बाजीराव पेशव्याने चिमाजीला लिहिलेल्या एका पत्रात केला आहे. ( पे. द. १२, ले. क्र. ३९, दि. १२/११/१७३० )


उपलब्ध पत्रव्यवहारातील घटनाक्रम लक्षात घेता गुजरात जर छत्रपतींकडून मिळणार नसेल तर देशाची सार्वभौम सत्ता – दिल्लीच्या तुर्की बादशाहीकडून त्या प्रांताच्या सुभेदारीची सनद घेण्याचा पेशव्याचा खटाटोप दिसून येतो.




या सर्व व्यवहारात निजामाच्या गृहकलहांत भाग न घेता किंवा नासिरजंगास निजामाविरुद्ध मदत करून पेशव्याला निजामास या प्रकरणापासून दूर राखता आले असते व यदाकदाचित नासिरजंग विजयी होऊन पेशव्यावर उलटल्यास, त्याच्या वडील भावास -- गाजीउद्दीन फिरोजजंग -- हाताशी धरून गृहकलह अधिक चेतवता आला असता ( हाच डाव पुढे आठ नऊ वर्षांनी नानासाहेबाने अंमलात आणला ही गोष्ट निराळी. ) व पर्यायाने दख्खनमधील मराठी सत्तेचा मुख्य प्रतिस्पर्धी त्याला परस्पर निर्बल करता आला असता. परंतु स्वबुद्धी वा सल्लागारांच्या भरीला बळी पडून त्याने निजामास एकप्रकारे जीवनदान प्राप्त करून दिले. असो.


माळव्याची सनद प्राप्त केल्यानंतर स. १७४२ - ४३ मध्ये नानासाहेब पेशव्याने बादशाही मदतीच्या नावाखाली रघुजीच्या बंगाल स्वारीत व्यत्यय आणण्याचे पुण्य गाठीशी बांधले. त्याची पेशव्यापुरती पूर्वपरंपरा बघायची झाल्यास बाजीराव पेशव्याने स. १७३२ - ३८ दरम्यान केव्हातरी दिल्लीच्या तुर्की बादशहाकडे तहासाठी पाठवलेल्या मागण्यांची यादी पेशवे दप्तर १५, पृ. क्र. ९५ वर देण्यात आली आहे, त्यामध्ये पेशव्यास झालेल्या कर्जाबाबत बंगालमधून पन्नास लक्ष देण्यात यावे तसेच प्रयाग, काशी व मथुरा येथे पेशव्यास जहागीर देण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे. दुसरे म्हणजे, नादिरशाहच्या हिंदुस्थान  स्वारीसमयीच बाजीराव आणि रघुजी भोसल्यात एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील हस्तक्षेपाबाबत तंटा निर्माण झाला होता. त्याचवेळी बाजीराव हा प्रश्न शस्त्रबळाच्या जोरावर निकाली काढायच्या विचारात असता नादिरशाहच्या स्वारीमुळे त्याने हा वाद क्षणभर बाजूला ठेवला. बापाची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचे नानासाहेब पेशव्याने मनावर घेतले. 


बंगालचे राजकारण :-  फर्रूखसेयरच्या कारकिर्दीत मुर्शीदकुलीखानाकडे बंगाल व ओरिसाची सुभेदारी होती. मुर्शीदकुलीखानाच्या मृत्यूनंतर त्याचा जावई शुजाउद्दीन याच्याकडे उपरोक्त दोन्ही प्रांतांची सुभेदारी राहून त्यात स. १७३३ मध्ये बिहारची भर पडली. सारांश, बंगाल बिहार व ओरिसा या तीन सुभ्यांवर त्याची हुकूमत सुरू झाली. पैकी, बिहारच्या सुभ्यावर त्याने आपला दुय्यम म्हणून अलीवर्दीखान याची नेमणूक केली होती. 

दि. १३ मार्च १७३९ रोजी शुजाचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा सरफराजखान हा सुभेदारीवर दाखल झाला. काही कारणांस्तव उभयतांमध्ये वितुष्ट निर्माण होऊन अलीवर्दीने बंगालवर स्वारी केली. त्यावेळी घेरिया येथे झालेल्या युद्धात सरफराज मारला जाऊन बंगाल सुभ्याची अलीवर्दीस प्राप्ती झाली. ( दि. १० एप्रिल १७४० ) 

यानंतर पुढच्याच वर्षी त्याने ओरिसावर स्वारी करून तो प्रांत देखील आपल्या कब्जात घेतला. ( मार्च १७४१ )

आपल्या या कृत्यास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून अलीवर्दीने बादशहा व दरबारातील प्रमुख मानकऱ्यांना मिळून सुमारे एक कोटी रुपयांचा भरणा केला.  {२}


बंगालमध्ये ही राज्यक्रांती घडून येत असताना नागपूरकर रघुजी भोसले छ. शाहूच्या आज्ञेने तत्कालीन कर्नाटक स्वारीवर होता. ( ज्यामध्ये प्रामुख्याने आजचे कर्नाटक राज्य तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा व तामिळनाडू मधील काही प्रदेशाचा समावेश होतो. ) {३}


अलीवर्दीसमोर निभाव न लागल्याने ओरिसाचा दुय्यम सुभेदार व मृत बंगाल नबाब शुजाचा जावई रुस्तुमजंग मच्छलीपट्टणला पळून आला होता. तेथून रुस्तुमचा जावई बाकरअली याने रघुजी भोसल्याशी संधान बांधून त्याच्याकडे ओरिसा ताब्यात घेण्यासाठी मदत मागितली. 

रघुजीने त्याच्या सोबत काही लष्करी पथके मदतीसाठी पाठवली. ज्यांच्या बळावर बाकरअलीने कटकचा ताबा घेत तेथील अलीवर्दीचा जावई व दुय्यम सुभेदार सईद अहमद यांस कैद केले. ओरिसाची बातमी मिळताच अलीवर्दीने पुन्हा कटकवर स्वारी करून बाकरअली व त्याच्या सोबतच्या मराठी सैन्याचा पराभव करून त्यांना ओरिसातून बाहेर काढले. या घटनेमुळे रघुजीला त्वेष चढून त्याने बंगाल स्वारीचे प्रकरण हाती घेतले. {४}


स. १७४१ अखेरीस रघुजीने आपला विश्वासू सरदार भास्करराम कोल्हटकर यांस अलीवर्दीखानाच्या मुकाबल्यास पाठवले. तेव्हापासून अलीवर्दी व रघुजीचा जो झगडा जुंपला, तो स. १७५१ मध्ये उभयतांत तह होऊन मिटला. त्यान्वये -- (१) आधी नबाबाच्या सेवेत असलेला परंतु नंतर रघुजीला सामील झालेला मीर हबीब याने, अलीवर्दीचा नायब म्हणून ओरिसाचा कारभार बघावा व प्रांताचा खर्च भागून जो शिल्लक राहिल तो वसूल भोसल्यांना द्यावा. (२) बंगाल,बिहार, ओरिसा सुभ्यातून भोसल्यांना दरसाल बारा लाख चौथाई खातर देण्यात यावे. (३) सुवर्णरेखा नदी, ही उभयतांची सरहद्द समजण्यात यावी. {५}


जवळपास दहा वर्षे चाललेल्या या झगड्यात केवळ मत्सर आणि अनिवार हांव यांमुळे कारण नसताना नानासाहेब पेशव्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला व त्या नादात हिंदुस्थानच्या राजकारणावरून त्याचे लक्ष विचलित होऊन पेशवाईचे तारू पानिपतच्या खडकावर जाऊन फुटले असे परिणामावरून म्हणता येते. 


रघुजी व पेशव्याच्या बंगाल स्वाऱ्या ( स. १७४१ - १७४७ )  :- स. १७४१ अखेरीस नागपूरकर भोसल्यांनी आपला विश्वासू सरदार भास्करराम कोल्हटकरास बंगाल स्वारीकरता रवाना केले. याच सुमारास अनेक हेतू मनाशी बाळगत नानासाहेब पेशवा हिंदुस्थानची वाट चालू लागला. मार्गात त्याने गढा मंडळवर स्वारी केली. तेथील गोंड राजा लढाईत मारला गेल्यावर स्थळ पेशव्याच्या हाती पडले. खेरीज भोसल्याच्या मुलखातील काही स्थळांना उपद्रव देऊन पेशवा माळवा - बुंदेलखंडात शिरला. {६}


यास्थळी तत्कालीन राजकारणाचा थोडक्यात आढावा घेणे आवश्यक आहे. स. जयसिंहाच्या अंतस्थ पाठिंब्याने पेशव्याला -- पर्यायाने मराठी सत्तेला माळवा प्रांताची प्राप्ती झाली असली तरी, मराठी सत्ता माळव्यात प्रस्थापित व्हावी अशी जयसिंहाची मनापासून अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळेच एकीकडे पेशव्याला माळव्याची सुभेदारी मिळावी यासाठी दिल्ली दरबारी खटपट करत असतानाच त्याने दुसरीकडे राजपुताना, माळवा व बुंदेलखंडातील राजपुतांचा मराठी सत्तेविरुद्ध संघ उभारण्याचा प्रयत्न आरंभला. ज्याचे दृश्य स्वरूप आपणांस पे. द. २१, ले. क्र. ८,९ मध्ये दिसून येते. ज्यामध्ये माळवा,बुंदेलखंडातून मराठी सरदारांना उखडून काढण्यासाठी आखलेल्या योजनांची आपणांस थोडीफार माहिती मिळते. विशेष म्हणजे ले. क्र. ८ नुसार ज्यावेळी जयपूर दरबार पेशव्याच्या सरदारांविरुद्ध आखलेल्या योजनांना मूर्त स्वरूप देत होता, त्यावेळी पेशवा बंगाल स्वारीत गुंतला होता.


याच काळातील दिल्ली दरबारचे राजकारणही आपणांस लक्षात घेतले पाहिजे. दरबारात आपले पूर्वीचे स्थान, महत्व प्राप्त करून घेण्यासाठी अमीरखानाने बादशहाला असा सल्ला दिला की, शाही नियमानुसार सरकारी अधिकारी मरण पावल्यास त्याची मालमत्ता सरकारजमा होते. बंगालमध्ये मुर्शीदकुलीखान, सरफराजखान हे दोन सरकार नियुक्त नबाब मरण पावले असून सर्व सत्ता अलीवर्दीने बळकावली आहे. तसेच मृत नबाबांची मालमत्ता तो सरकार दरबारी रुजू करत नाही व याक्षणी तो शत्रूशी -- रघुजी भोसल्यासोबत झगड्यात गुंतल्यामुळे अयोध्येचा नबाब सफदरजंग याच्या करवी आपण अलीवर्दीने बळकावलेले प्रांत पुन्हा ताब्यात घेऊ शकतो.

याच सुमारास रघुजीच्या आक्रमणाने त्रस्त होऊन अलीवर्दीने दिल्ली दरबारकडे मदतीची मागणी केली होती. चालून आलेल्या संधीचा फायदा उचलण्याच्या बुद्धीने बादशहा महमदशहाने सफदरजंगास बिहार - बंगाल प्रांती जाण्याची आज्ञा केली. त्यानुसार सफदरजंग डिसें. १७४२ मध्ये पाटण्यास पोहोचला. मात्र नानासाहेब पेशवा देखील याच काळात अलीवर्दीखानाच्या मदतीसाठी बुंदेलखंडातून तसाच पुढे बिहारकडे येत असल्याचे समजताच सफदरजंग स. १७४३ जानेवारी पूर्वार्धात आपल्या प्रांतात परतला. {७}


नागपूरकर भोसल्यांना बंगालमध्ये शह देण्यासाठी नानासाहेब पेशवा संधी शोधत होता. ती त्यांस स. १७४२ च्या उत्तरार्धात मिळाली. रघुजीच्या फौजांचे दडपण वाढू लागल्यावर अलीवर्दीखानाने बादशहाकडे मदतीची मागणी केली व बादशाहने याकामी पेशव्याची योजना केली. {८}


यानुसार पेशवा बंगाल प्रांतात शिरला. दि. ३१ मार्च १७४३ रोजी बऱ्हामपूर जवळ प्लासीच्या निकट अलीवर्दीसोबत पेशव्याची भेट होऊन उभयतां दरम्यान तहनामा झाला. त्यानुसार :- (१) अलीवर्दीने छ. शाहूला वार्षिक चौथाई देणे व

(२) पेशव्याला लष्करी खर्चाकरता बावीस लक्ष रुपये देण्याचे मान्य केले. बदल्यात (३) रघुजी भोसल्यास बंगाल स्वारीपासून रोखण्याची जबाबदारी पेशव्याने घ्यावी असे ठरले. {९}


तहनामा झाल्यावर लगेचच अंमलबजावणीस सुरुवात झाली. रघुजी भोसले यावेळी बंगाल स्वारीवर असून त्याचा मुक्काम नजीकच कटवा - बरद्वान दरम्यान होता. पेशवा आणि अलीवर्दीचे जोडसैन्य आपल्यावर चालून येत असल्याचे  समजताच त्याने बिरभूमकडे माघार आरंभली. तेव्हा पेशव्याने अलीवर्दीच्या सैन्याशी फारकत घेत वेगाने रघुजीचा पाठलाग करत त्यास बेंडूच्या घाटात गाठले. त्याच्या सैन्याचा पराभव करून लुटले. रघुजीला बंगालमधून पिटुन काढल्यावर पेशवा गयेस गेला. तिथे धार्मिक विधी करून त्याने पुण्यास प्रयाण केले. {१०}


रघुजी - पेशवा युद्धाचे पडसाद सातार दरबारात उमटले.छ. शाहूने पेशवे - रघुजी दरम्यान चौथाई वसुली क्षेत्राची विभागणी केली, ज्यान्वये – माळवा, आग्रा, अजमेर, अलाहाबाद पेशव्याकडे तर ओरिसा, बंगाल, अयोध्या रघुजी भोसल्याकडे नेमून देण्यात आले. खेरीज बिहार सुभ्याची दोघांमध्ये वाटणी होऊन टिकारी, भोजपुर हे दोन सालीना बारा लाख उत्पन्नाचे प्रांत पेशव्याच्या वाटणीस आले तर उर्वरित बिहार रघुजीकडे सोपवण्यात आला. {११}

 

छ. शाहूने पेशवा - नागपूरकर भोसल्यांत समझोता घडवून आणला त्यामुळे तांत्रिक आणि व्यावहारिकदृष्ट्या घोटाळेच माजले. 

कारण – (१) चौथाई - सरदेशमुखी तहान्वये छ. शाहू हा बादशाहचा मांडलिक असून त्याचे स्थान दख्खन सुभेदाराच्या हाताखाली होते. (२) माळव्याची नायब तथा दुय्यम सुभेदारी मिळाल्याने लौकिकात पेशवा हा छत्रपतींपेक्षा अधिकारपदाने मोठा ठरतो. (३) रघुजी भोसल्याने एकप्रकारे छ. शाहूच्या संमतीने बंगाल मोहीम हाती घेतली होती. (४) पेशवा, बादशाही आज्ञेने बंगाल नवाबाच्या बचावार्थ रघुजी भोसल्याविरुद्ध चालून गेला होता. (५) याकरता बंगाल नवाब पेशव्याला युद्धखर्च म्हणून बावीस लाख रोख रक्कम व छ. शाहूला बंगाल सुभ्यातून चौथाई देण्यास तयार होता. (६) शाहूने आपल्या अधिकारांत पेशव्यास बिहार मधील दोन प्रांतांतून चौथाई वसुलीचे अधिकार दिले. ज्यांस बादशाहची पण मान्यता दिसते. {१२}

परंतु प्रश्न उपस्थित झाला तो बंगाल सुभ्याच्या चौथाई बद्दल. बादशाह व अलीवर्दीने चौथाई छ. शाहूस दिली असली तरी वसुलीचे अधिकार पेशव्यास दिले होते. व ते देखील रघुजी भोसल्याचा त्या प्रांतांना होणारा उपद्रव रोखण्यासाठी. मात्र 

शाहूच्या योजनेने बंगाल व इतर सुभ्यांचे संरक्षण बाजूला राहून फक्त मराठी सरदारांकरता लुटीचे राखीव क्षेत्र असेच स्वरूप बनले. अलीवर्दीने पुढे भोसल्यांच्या भास्कररामास भेटीस बोलावून दग्याने मारले, त्यांस शाहूचे हे अदूरदर्शी धोरण काही अंशी कारणीभूत ठरले असे निःसंशयाने म्हणता येते. 

(७) उपलब्ध पुराव्यांवरून खुद्द पेशव्याला देखील हा समझोता मनापासून मान्य नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच रघुजीच्या बंगाल संबंधी हालचालीं विषयक माहिती घेत त्यांस शक्य झाल्यास अटकाव करण्याच्या उपाययोजनाही तो आखत असल्याचे दिसून येते. या संदर्भात पु. द. भाग १, ले. क्र. १५९ हा अत्यंत महत्वाचा आहे. संपादकांना याची तारीख निश्चित करता आली नसली तरी प्रत्यंतर पुराव्यांवरून सदर लेखांक हा स. १७४६ अखेरचा – सदाशिवरावाच्या प्रथम कर्नाटक स्वारीआधीचा असल्याचे दिसून येते. ज्यानुसार रघुजी विरुद्ध अलीवर्दीस भर देत त्यांस चौथाई न देण्याचा तसेच प्रसंग पडल्यास अलीवर्दीला भोसल्याविरुद्ध लष्करी मदत करण्याचा पेशवेबंधूंचा मानस असल्याचे दिसून येते. यासंबंधी शिं. इ. सा. भाग १, ले. ५९ अत्यंत महत्वाचा आहे. सदर लेखांक दि. २९ एप्रिल १७४७ रोजीचा असून यामध्ये जयाजी शिंदे कोट्याच्या बाळाजी यशवंतास लिहितो की, ' आमचे वर्तमान तरी बगाले प्राते जावयाचे प्रयोजन नाहीसारखे जाले. त्या प्राते फौज कोणाची न गेली म्हणून माघारे फिरोन बघेलखडातून दरमजलीने उजेनीकडे येत असो '

याचे कारण असे दिसते की, अलीवर्दीने रघुजीच्या मुलाला – जानोजी भोसल्यास पराभूत करून माघार घेण्यास भाग पाडले होते. {१३}



स. १७४७ नंतर नानासाहेब पेशव्याचे बंगाल विषयक धोरण :-  स. १७४७ पासून नानासाहेब पेशव्याच्या बंगाल तसेच समस्त हिंदुस्थान विषयक धोरणात बदल झालेला दिसून येतो. यामागील तात्कालिक कारणे अनेक असली तरी मुख्य फक्त तीन आहेत, ती म्हणजे – (अ) स. १७४७ च्या पूर्वार्धात छ. शाहूने नानासाहेबाची पेशवेपदावरून केलेली हकालपट्टी ** (ब) दि. २१ मे १७४८ रोजी हैद्राबाद संस्थान संस्थापक व दख्खन सुभेदार चीन किलीचखान निजाम उल्मुल्क याचा झालेला मृत्यू आणि (क) दि. १५ डिसें. १७४९ रोजी छ. शाहूचे निधन.



** तळटीप :- बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबाचे स्वार्थी राजकारण, राज्याचे कर्ज फेडण्यातील अपयशादी कारणांमुळे स. १७४७ च्या पूर्वार्धात काही काळ छ. शाहूने त्यांस पेशवेपदावरून दूर केले होते, जे त्याने प्रथम नम्रतेने वागून व नंतर लष्करी बळाचा धाक दाखवून परत मिळवले. ( संदर्भ :- मराठी रियासत खंड ४, पृ. क्र. १४७ ते १५६ )




या सलग तीन वर्षांत घडलेल्या मुख्य तीन घटनांनी – विशेषतः छ. शाहूचे निधन व त्यानंतरची सातार दरबारातील राज्यक्रांती, पेशव्यास सर्वाधिकार प्राप्ती व त्याची आसन स्थिरता यामध्ये स. १७५२ चा सप्टेंबर उजाडला. त्यानंतर निरंकुश पेशव्याने बंगाल प्रकरण निकाली काढण्याचे योजले.

याकरता त्याने आपल्या धाकट्या बंधूची – रघुनाथरावाची योजना केली. रघुनाथराव उर्फ दादासाहेबाच्या प्रथम हिंदुस्थान स्वारीत, त्याने अलीवर्दीकडे मागील तीन वर्षे थकलेल्या चौथाईची मागणी केली. प्रकरण रघुजी भोसल्याकडे जाताच त्याने याबद्दल रघुनाथरावाच्या वर्तनाचा निषेध पत्राद्वारे पुण्यास सदाशिवरावाकडे व्यक्त केला व सोबत रघुनाथरावास अशा कृत्यापासून परावृत्त करण्याची मागणीही केली. {१४}


रघुनाथरावाच्या मागणीचा शेवट काय झाला हे समजायला मार्ग नसला तरी दि. १४ फेब्रुवारी १७५५ रोजी रघुजी भोसलेच्या मृत्यूनंतर पेशव्यास नागपूरकरांवर आपला शह बसवण्याची संधी प्राप्त झाली. आपल्या पश्चात धाकट्या स्त्रीचा परंतु सर्वात जेष्ठ मुलगा जानोजी गादीवर यावा अशी रघुजीची इच्छा असून तसे त्याने पेशव्यासही कळवले होते. परंतु रघुजीच्या इतर मुलांस – विशेषतः प्रथम पत्नीचा मुलगा मुधोजी यांस – ही व्यवस्था मंजूर नव्हती. भावांभावंतील हा तंटा निर्णयासाठी पेशव्याकडे आला. ज्याचा निकाल दोन वर्षांनी लागला.


 दरम्यान स. १७५६ मध्ये अलीवर्दीखान मरण पावल्यावर त्याच्या जागी खानाचा नातू सिराजउद्दौला बंगालच्या नबाबीवर आला. सिराज व बंगालच्या इंग्रजांचा तंटा याच सुमारास विकोपास जाऊन दि. २३ जून १७५७ रोजी प्लासी येथे इंग्रजांनी सिराजचा पराभव केला. हा तोच काळ आहे, ज्यावेळी अब्दाली हिंदुस्थानात लुटालूट करून मायदेशी परतला होता तर रघुनाथराव आणि होळकर दिल्लीच्या वाटेवर होते.


 विस्तारभयास्तव बंगालमधील इंग्रज तसेच पेशव्याच्या राजकारणासंबंधी फारसे विवेचन करत नाही. फक्त मुख्य मुद्द्यांचा येथे निर्देश करत प्रकरण आटोपते घेतो ** :- 

(१) दख्खनमध्ये हैद्राबाद संस्थान संस्थापक निजामाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये वारसा हक्कासाठी संघर्ष झाले. ज्यामध्ये फ्रेंचांचे निजामदरबारी वजन वाढले. 

(२) निजाम दरबार तसेच कर्नाटकीय राजकारणातील फ्रेंचांचा प्रभाव कमी करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन पेशव्याने इंग्रजांना जवळ केले. 

(३) स. १७५५ च्या आरंभी, पेशव्याने तुळाजी आंग्र्याविरुद्ध इंग्रजांची मदत घेतली.

(४) दि. १२ फेब्रु. १७५६ रोजी पेशवा - इंग्रजांच्या संयुक्त चढाईत विजयदुर्गाचा पाडाव होऊन आंग्र्यांचे आरमार जळून खाक झाले. 

(५) सहेतुक असो वा कसेही, दोन वर्षे भोसले बंधूंना दख्खनमध्ये गुंतवून ठेवत एकप्रकारे पेशव्याने बंगालमधील राज्यक्रांतीत इंग्रजांना अप्रत्यक्षपणे मदत केली.

(६) ज्याप्रमाणे कर्नाटक प्रांतातील, सातार दरबारमधील प्रतिस्पर्ध्यांना बाहेर काढण्या व तो प्रांत आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी नानासाहेब पेशव्याने निजामाचा वापर केला ; तसाच काहीसा प्रकार त्याने बंगाल प्रांतासाठी योजला.

(७) काशी, प्रयाग ताब्यात घेण्याचे स्पष्ट आदेश नानासाहेब पेशव्याने रघुनाथरावास, त्याच्या प्रथम हिंदुस्थान स्वारीत दिले होते.

(८) रघुनाथरावाच्या दुसऱ्या हिंदुस्थान स्वारीत देखील त्याने दिल्लीच्या भानगडीत न पडता बंगाल स्वारी हाती घ्यावी अशी पेशव्याची आज्ञा होती. विशेष म्हणजे याच काळात नुकतीच प्लासीची लढाई घडून आली होती.

(९) दत्ताजी व जनकोजी शिंदे शुक्रताली जाण्याच्या मुळाशी देखील बंगाल स्वारीच असल्याचे उपलब्ध साधनांवरून स्पष्ट होते.

(१०) स. १७५९ अखेर वा स. १७६० च्या आरंभी रघुनाथराव शिंद्यांच्या मदतीला बंगाल स्वारीकरता जाणार होता परंतु आयत्या वेळी सदाशिवरावाची योजना करण्यात आली.

(११) अब्दालीचा मुकाबला करणे हा मुळात हेतूच नसल्यामुळे सदाशिवराव उर्फ भाऊसाहेबाने मोहीम कूर्मगतीने चालवली.

(१२) पानिपतचा अकल्पित फटका व नादुरुस्त प्रकृती, यांमुळे नानासाहेब पेशव्याची बंगाल मोहीम गुंडाळली जाऊन भविष्यात अशी स्वारी होण्याचा संभव देखील राहिला नाही.

(१३) बंगाल प्रकरणी नानासाहेब पेशवा आणि इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या उद्दिष्टांमधील फरकही लक्षात घेणे आवश्यक आहे. पेशव्याला बिहार - बंगालचे आकर्षण तेथून होणारी द्रव्यप्राप्ती व राज्यविस्तार इथपर्यंत मर्यादित होते. त्याउलट इंग्रजांना द्रव्य तसेच प्रादेशिक लोभाखेरीज मुख्य आकर्षण होते बिहार मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादीत होणाऱ्या सोऱ्याचे. त्यापासून बनल्या जाणाऱ्या दारुगोळ्याने त्यांच्या तोफा - बंदुका, पर्यायाने सैन्य अजिंक्य ठरणार होते. सारांश, नानासाहेब पेशव्याकडे राज्यकर्त्याचे धोरण तरी कितपत होते, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.



** सदर कलमासाठी संदर्भ ग्रंथ :- 

१) पेशवा-इंग्रज संबंध तसेच कर्नाटकचे राजकारण यासाठी :- मराठी रियासत खंड ४, ब्रिटिश रियासत खंड १

२) पेशव्यांच्या स्वार्थी राजकारणाच्या चर्चेसाठी :- निजाम-पेशवे संबंध

३) स. १७५० नंतर पेशव्याच्या बंगाल-बिहार संबंधी राजकारण व स्वारीकरता :- शिंदेशाही इतिहासाची साधने भाग ३, ले. क्र. ५९,६१,६२,९०,९४,९६,९७,९८,९९,१००,१०१,१०२,१०५,११२ इ.




संदर्भ ग्रंथ :- 

१) मालवा में युगान्तर :- पृ. क्र. २९९ - ३०२


२) मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ६३ तळटीप क्र. २


३) मराठी रियासत खंड ४ :- पृ. क्र. ११० - १११


४) मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ४६ - ४७


५) उक्त :- पृ. क्र. ९७ व १०५


६) मराठी रियासत खंड ४ :- पृ. क्र. ६० - ६३


७) मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ५८


८) उक्त :- पृ. क्र. ५८ ; तसेच पे. द. १५, पृ. क्र. ८९


९) मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ६० तसेच पृ. क्र. ६० ६१ वरील तळटीप


१०) मराठी रियासत खंड ४ :- पृ. क्र. ६६ - ६९ ; तसेच मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ६१


११) मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- पृ. क्र. ६३ 


१२) उक्त :- पृ. क्र. ७६


१३) उक्त :- पृ. क्र. ८१ - ८२


१४) उक्त :- पृ. क्र. १०१










शनिवार, २३ एप्रिल, २०२२

नवं पानिपत, कच्चा खर्डा - १

  प्रास्ताविक :- गेल्या काही वर्षांत वाचकांकडून ' पानिपत असे घडले ' च्या प्रतींची सातत्याने मागणी होत असल्याने सदर ग्रंथाची दुसरी आवृत्ती काढण्याचा विचार होता. परंतु दशकभराच्या कालावधीत बऱ्याच दुर्मिळ संदर्भ साधनांची उपलब्धतता झाल्याने आहे त्याच लेखनाची ( आमच्या मते ) दोषपूर्ण आवृत्ती काढण्यापेक्षा सुधारित आवृत्ती काढण्याचा विचार मनात आला. वास्तविक हे काम आतापर्यंत हातावेगळं व्हायला हवं होतं पण अनेक कारणांनी रखडत गेलं. ती रडकथा येथे न देता यास्थळी प्रस्तावित ग्रंथाचे पहिले प्रकरण, कच्चा खर्डा येथे सादर करत आहे. यात काही उणिवा असतील तर त्या जरूर सांगाव्यात हि अभ्यासू वाचकांना विनंती आहे. 



 प्रकरण १)


कोणतीही घटना म्हणजे तिच्यामागील कार्यरत कारणांचा दृश्य परिणाम असतो. या अनुषंगाने पाहिल्यास पानिपतच्या तिसऱ्या युद्धास कारणीभूत ठरलेल्या बाबींचा आपणांस मुळातून शोध घेणे भाग आहे. 


सामान्यतः अब्दालीचे हिंदुस्थानवरील आक्रमण किंवा स. १७५२ मध्ये होळकर - शिंद्यांनी पुणेकर पेशव्याच्या वतीने दिल्लीकर तुर्की बादशहाच्या वजीरासोबत केलेल्या बादशाही संरक्षक कराराकडे पानिपतचे आद्य कारण म्हणून पाहिले जाते. परंतु अधिक अभ्यासांती हे अर्धसत्य असल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. याचं महत्वाचं कारण म्हणजे अब्दालीचा हिंदुस्थानच्या राजकारणातील प्रवेश वा स. १७५२ चा बादशाही संरक्षक करार या सर्व तात्कालिक घटना होत, कारणे नव्हेत. या घटनांमगील कारणपरंपरा -- किमान अब्दालीच्या हिंदुस्थानातील राजकारणातील हस्तक्षेपाची -- अगदीच निराळी आहे.

त्यामुळे उपरोक्त दोन कारणांकडे पानिपतच्या बनावाचे मूळ म्हणून पाहणे आम्हांस आत्मसंतुष्टता -- जी अत्याधिक मेहनती अभावी येते -- वाटते.


अलीकडच्या काळात पेशव्याचा माळव्यातील प्रवेश हे पानिपतचे आद्य कारण असावे असे आम्हांला वाटत होते. परंतु अभ्यासांति हा निष्कर्ष देखील त्याज्य वाटला. तीच गत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यास ओढ वाटणाऱ्या बंगाल स्वारीची.

अखेर प्रदीर्घ चिंतनानंतर आम्ही या निष्कर्षास आलो की, अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात भोसलेशाहीची -- ज्यावर पुढे पेशवाईचे कलम लावण्यात आले -- राज्यघटना सिद्ध करणाऱ्या स. १७१८ - १९ मधील दिल्लीकर तुर्की बादशहा व छ. शाहूच्या दरम्यान झालेल्या चौथाई व सरदेशमुखीच्या करारात पानिपत स्वारीची बीजं लपलेली आहेत. कित्येकांना हा निष्कर्ष वा सिद्धांत धक्कादायक वा मुर्खपणाचा वाटेल. परंतु सदर ग्रंथात यासंबंधी जे साधार विवेचन करण्यात आले आहे, त्याचे अभ्यासपूर्वक चिंतन, मनन केल्यास कोणताही वाचक आमच्या मताशी सहमत होईल अशी आशा आहे. किमान अंशतः जरी त्यांस आमच्या निष्कर्षांत तथ्य आढळले तरी घेतल्या परिश्रमाचे आम्हांस सार्थक वाटेल.


स. १७१८ - १९ मध्ये सातारकर छ. शाहू व दिल्लीचा तुर्की बादशहा रफीउद्दराजत  यांदरम्यान अनुक्रमे शंकराजी मल्हार, बाळाजी विश्वनाथ व सय्यद बंधूंच्या विद्यमाने झालेल्या चौथाई व सरदेशमुखी करारानुसार सातारकर शाहूला भोसलेशाही संस्थापक छ. शिवाजीच्या राज्याचे कायदेशीर वारस म्हणून दिल्लीच्या तुर्की बादशहाने मान्यता दिली. {१} **

यांमुळे भोसलेशाहीत अनिवार झालेल्या सातारा - कोल्हापूर या दोन गाद्यांच्या वारसा कलहास थोड्याफार प्रमाणात आळा बसला. 


** टीप :-  तांत्रिकदृष्ट्या रफीउद्दराजतने शाहूला दिलेल्या स्वराज्य, चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा बाद ठरतात. बाळाजी विश्वनाथ सनदा घेऊन दक्षिणेत परतल्यावर दिल्लीत राज्यक्रांती होऊन रफीउद्दराजतच्या जागी रोशन अख्तर मुहम्मदशाह तख्तावर बसला. यावेळी निघालेल्या आदेशान्वये फर्रुखसेयर नंतर मुहम्मदशाहची कारकीर्द धरण्यात आल्याने रफीउद्दराजतची कारकीर्द बाद ठरून त्याने दिलेल्या सनदांना कसलाही कायदेशीर आधार राहत नाही. मात्र राजकीय हक्कांमागे नैतिक - अनैतिकतेपेक्षा शस्त्रबळाचे महत्त्व अधिक असल्याने शाहूने या सनदांची अंमलबजावणी लष्करी सामर्थ्याच्या जोरावर करण्याचा प्रयत्न केला. 

दिल्ली दरबारातील गटबाजीच्या राजकारणामुळे दख्खनमध्ये निजामाने शाहूला दिलेल्या सनदांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा त्यांस सिंहासनावरून खाली खेचणे श्रेयस्कर मानले. पालखेडचा संग्राम ही त्याचीच फलनिष्पत्ती होय.

(  उत्तरकालीन मुघल, निजाम - पेशवे संबंध )





करारातील मुख्य अटी :- 

(१) शिवाजीच्या वेळचे स्वराज्य, तमाम  गडकोट सुद्धा शाहूचे हवाली करावे.

(२) अलीकडे मराठे सरदारांनी जिंकलेले प्रदेश म्हणजे खानदेश, गोंडवण, वऱ्हाड, हैद्राबाद, कर्नाटक या भागातले यादीत नमूद केल्याप्रमाणे मोगलांनी सोडून देऊन ते मराठ्यांच्या स्वराज्यात दाखल करावे.

(३) मोगलांच्या दक्षिणेतील मुलुखांवर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतः वसूल करावे. या चौथाईचे बदल्यात आपली पंधरा हजार फौज मराठ्यांनी बादशहाचे मदतीस ठेवावी आणि सरदेशमुखीच्या बदल्यात मोगलांचे मुलखांत मराठ्यांनी चोऱ्या वगैरेंचा बंदोबस्त करावा. 

(४) कोल्हापूरच्या संभाजीस शाहूने उपद्रव करू नये. 

(५) मराठ्यांनी दरसाल बादशहास दहा लाख रुपयांची खंडणी द्यावी. 

(६) शाहू राजांची मातोश्री, कुटुंब, छत्रपती संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग वगैरे दिल्लीस बादशहाचे कबजात आहेत, त्यांस सोडून स्वदेशी पावते करावे. {२} 



विवेचन :- उपरोक्त करारान्वये शाहू हा तुर्कांचा मांडलिक बनल्याची टीका अनेकांनी केली असली तरी वास्तविकता वेगळीच आहे.

शाहू औरंगजेबाच्या नजरकैदेत असताना बादशहाने त्याला सात हजार मनसबदारी व राजा ही पदवी बहाल केली होती. {३} 

महत्वाची बाब म्हणजे तुर्की साम्राज्यात शाही परिवारातील सदस्या व्यतिरिक्त व्यक्तीस दिली जाणारी ही सर्वोच्च मनसबदारी होती. {४} 

यावरून भविष्यात पुढे मागे शिवाजीच्या राज्याचा काही भाग त्याच्या वारसांना आपले अंकित करून द्यायचा झाल्यास तुर्कांची पहिली पसंती शाहू असणार हे ओघानेच आले. यदाकदाचित शाहू मरण पावला तरच बदलत्या राजकारणाचा विचार करून त्यांना इतर पर्याय अवलंबता येणार होते. ज्यामध्ये तुर्कांचे अधिपत्य मान्य केल्यास ताराबाईपुत्र देखील शिवाजीच्या राज्याचे कायदेशीर वारस म्हणून घोषित केले जाऊ शकत होते.


एखादी पुरातन राजवट नष्ट झाल्यावर त्या जागी तितकीच समर्थ सत्ता येणे अत्यावश्यक असते. अन्यथा मुलखांत अंदाधुंदी निर्माण होते.

औरंगजेबाच्या महत्वाकांक्षी दख्खन मोहिमेत विजापूर, गोवळकोंडा या विस्तीर्ण भूभागावर शासन करणाऱ्या दोन पुरातन ( किमान दीड दोन शतक ) सत्ता नष्ट झाल्या खऱ्या, परंतु त्या जागी आपले प्रतिनिधी नेमून त्या प्रदेशांत शांतता व सुव्यवस्था राखण्यात औरंगजेबास अपयश आले. परिणामी निर्माण झालेल्या या पोकळीचा फायदा घेण्यास अनेक महत्वकांक्षी, धाडसी तरुण पुढे सरसावले. ज्यामध्ये औरंगजेबाचा मृत्यू व भविष्यातील आपल्या हितावर दृष्टी ठेऊन असलेले झुल्फिकारखान सारखे बादशाही उमराव देखील होते. 


अफगाण, राजपुताना व दख्खन या तीन मुख्य प्रांतांत दीर्घकाळ चाललेल्या लष्करी मोहिमांवर तुर्की साम्राज्याचा खजिना व लष्करी बळ खर्ची पडले होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर उसळलेल्या वारसा युद्धांनी त्यात भरच पडली. दख्खन स्वबळावर सांभाळण्याची कुवत आता तुर्कांच्या लष्करी सामर्थ्याबाहेर होती. अशा वेळी त्यांना एका सहाय्यकाची गरज होती, जी शाहूच्या रूपाने त्यांस लाभली. सदर करारावर टीका करताना या सर्व बाबी लक्षात घेतल्यास शाहूने बदललेल्या राजकीय स्थितीचा अधिकाधिक फायदाच घेतल्याचे दिसून येते.


या करारान्वये शाहूला भोसलेशाहीचा कायदेशीर वारस म्हणून हिंदुस्थानच्या सार्वभौम सत्तेकडून मान्यता मिळाली. दख्खनच्या सहा सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी वसुलीचे अधिकार मिळाले, जे दख्खनमध्ये तुर्की सत्ता बलवान असती तर कधीच मिळाले नसते. खेरीज शाहूच्या सरदारांनी, शाहूला मिळालेल्या भोसलेशाहित मोडणाऱ्या प्रदेशाव्यतिरिक्त, जे भूप्रदेश आपल्या ताब्यात घेतले होते त्यांस तुर्कांनी मान्यता दिली. याबदल्यात शाहूने दिल्ली दरबारास दरसाल दहा लाख रुपये खंडणीदाखल देण्याचे मान्य केले. तसेच बादशहाचा दख्खनमधील प्रतिनिधी -- दख्खन सुभेदाराच्या हाताखाली काम करण्याचे मान्य केले. 

दख्खनमध्ये शाहू तसेच पुढील काळात पेशवे निजामाला उखडून का काढू शकले नाहीत किंवा निजामाने आपणांस स्वतंत्र सत्ताधीश म्हणून अधिकृत घोषणा का केली नाही, याचे गुपित या करारात दडलेलं आहे.

त्याचप्रमाणे कोल्हापूरकरच्या संभाजीला तुर्कांकडून परस्पर संरक्षण लाभल्याने जर शाहू कराराविरुद्ध वागल्यास कोल्हापूरच्या संभाजीला त्याच्या जागी शिवाजीच्या राज्याचा वारस म्हणून नियुक्त करण्याची मोकळीक बादशहाने स्वतःकडे ठेवली. 

एवंच, सातारकर छत्रपतींनी स्वतःच्या नावाने स्वतंत्र नाणी का पाडली नाहीत किंवा बादशाही अंमल पूर्णतः का झुगारून दिला नाही इ. प्रश्नांची उत्तरे आपणांस उपरोक्त करारात मिळतात.


प्रस्तुत करारातील चौथाई व सरदेशमुखी या संज्ञांचे अल्पसे विवेचन आवश्यक वाटते.

चौथाई :- एखाद्या दुर्बल सत्तेच्या रक्षणार्थ केलेल्या मदतीच्या बदल्यात बलवान सत्तेने घेतलेला मोबदला म्हणून त्या दुर्बल सत्तेच्या एकूण उत्पन्नापैकी चौथा हिस्सा असे याचे थोडक्यात वर्णन करता येईल. विचाराधीन कालखंड व प्रकरणात मात्र या चौथाईचा अर्थ वेगळाच दिसतो.

दख्खनच्या सहा सुभ्यांना परचक्राची धास्ती कोणाकडून होती ? किंवा या सुभ्यांना उपद्रव प्रामुख्याने कोण देणार होते ? या प्रश्नाचे सर्वात जास्त संभवणारे उत्तर म्हणजे सातारकर व कोल्हापूरकर छत्रपतींच्या नावे मुलखांत फिरणारे फौजबंद मराठी सरदार. यांना आळा घालण्याचे म्हणजेच आपसांत झुंजण्याचे काम देऊन सय्यदांनी एकप्रकारे मराठी सत्तेला दुर्बल करण्याचाच डाव आखला असे म्हणावे लागते. त्यामुळे शाहूला चौथाई देणे म्हणजे दिल्लीकर तुर्कांनी भोसल्यांची प्रबळ सत्ता मान्य करणे वा त्यांना आपले संरक्षक म्हणून बरोबरीच्या नात्याने किंवा किंचित वरचढ मानणे असा केवळ आत्मप्रौढीस्तव अल्प अर्थ गृहीत धरणे आम्हांस योग्य वाटत नाही. मात्र त्याचबरोबर या चौथाई मान्यतेमुळे दख्खनमध्ये तुर्क दुर्बल असल्याच्या समजुतीस खुद्द तुर्की सम्राटानेच कबुली दिल्यासारखे झाले, हेही दृष्टीआड करता येत नाही. याचा फायदा शाहूच्या सरदारांना आपापल्या संघराज्यांतर्गत सत्ता विस्तारार्थ कसा झाला याचे विवेचन पुढे येणारच आहे.


सरदेशमुखी :-  {५} सरदेशमुखी संबंधी विवेचन करण्यापूर्वी आपणांस प्रथम हे लक्षात घ्यावे लागेल की, मराठी राज्याच्या अंमलात सुमारे साठ गावांचा एक तर्फ ; दीडशे ते दोनशे गाव म्हणजे दोन ते चार तर्फ मिळून एक महाल अथवा परगणा बनत असे आणि काही परगणे मिळून एक सुभा. 

देशमुख हा परगण्यावरील अधिकारी, वतनदार असून सरकारी वसूल गोळा करणे; परगणा वा महालात शांतता, सुव्यवस्था राखणे ही त्याची मुख्य दोन कामे. याबदल्यात त्यांस वसुलाचा एक दशांश भाग देशमुखास प्राप्त होई. त्याची विभागणी शेकडा पाच टक्के धान्य वा रोख रकमेच्या रुपात व पाच टक्के जमिनीच्या रूपाने अशी होती.

खेरीज प्रसंगोत्पात मुख्य सत्तेच्या मदतीकरता परगण्यातून  लष्कर भरतीचे कामही त्याला करावे लागे.

या देशमुखांवरील मुख्य अधिकारी म्हणजे सरदेशमुख. 

सुक्ष्मार्थाने पाहिलं तर तुर्कांकडून मिळणाऱ्या अधिकाराच्या जोरावर तुर्की साम्राज्यावर आपल्या राज्याचे कलम लावण्यासाठी या सरदेशमुखीचा वापर करता येऊ शकत होता. 

आता या सरदेशमुखी वतनप्राप्तीतून शाहूने नेमके काय साधलं हे पाहू गेल्यास आपणांस फक्त दोन गोष्टी आढळून येतात व त्या म्हणजे (१) दिल्लीची तुर्की बादशाही, देशाची सार्वभौम सत्ता असून त्यांनी दिलेल्या इनाम - वतनांच्या सनदाच कायम राहतात, कायदेशीर समजल्या जातात.

(२) सरदेशमुखी वतनातून शाहूने आपल्या व राज्याच्या निश्चित उत्पन्नाचा एक स्रोत सुरक्षित करून ठेवला.


स. १७१८ - १९ च्या शाहू - तुर्की बादशहा दरम्यान झालेल्या चौथाई करारानुसार शाहूला दख्खन मधील पुढील सहा सुभ्यांतून चौथाई वसुलीचे अधिकार मिळणार होते :- खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, बिदर, विजापूर आणि हैद्राबाद


या सहा सुभ्यांतून चौथाई वसुली तसेच राज्यसंरक्षण - वृद्धीकरता शाहूने आपल्या प्रमुख सरदारांना पुढीलप्रमाणे कार्यक्षेत्र विभागून दिले होते :- पेशवे - खानदेश व बालाघाटचा काही भाग ; सेनासाहेब सुभा भोसले - वऱ्हाड, पाईनघाटचा प्रदेश व गोंडवनच्या पूर्वेकडील भाग ; सरलष्कर - गंगथडी व औरंगाबाद ; फत्तेसिंग भोसले - कर्नाटक ; प्रतिनिधी - नीरेपासून वारणेपर्यंतचा प्रदेश व हैद्राबाद - बेदर कडील मुलुख ; चिटणीस व आंग्रे - कोकण ; सचिवाने आपली जहागिरी सांभाळून साहोत्राचा अंमल करावा.


दिल्ली दरबारातील गटबाजीच्या राजकारणात मराठी सत्तेचा प्रवेश :- इतिहासात जर तरला स्थान नसते. त्याचप्रमाणे व्यवहारात सर्व घटना आपल्या मनानुरूप घडतील असेही नसते. सय्यदांच्या मार्फत शाहूने दिल्लीकर तुर्की बादशाही सोबत करार केल्यानंतर मराठी सत्तेच्या चालकाच्या मनी असो नसो, त्याचा दिल्ली दरबारातील गटबाजीच्या राजकारणात प्रवेश झाला होता. एक बलदंड नसले तरी बऱ्यापैकी उपद्रवमूल्य असलेल्या शाहूची उपेक्षा करणे दिल्ली दरबारच्या मुत्सद्द्यांना आता शक्य नव्हते.


दिल्ली दरबारचे राजकारण समजावून घेण्यासाठी प्रथमतः आपणास त्या दरबारातील प्रमुख गट, त्यांचे प्रमुख व उद्दिष्टांची तोंड ओळख करून घेणे भाग आहे.


दिल्ली दरबारातील मुख्य गट तुराणी तुर्कांचा असून प्रामुख्याने निजाम व त्याचे नातलग या गटाचे एकप्रकारे अध्वर्यू होते. खुद्द निजामाची महत्वाकांक्षा, दरबारी राजकारणाच्या गटबाजीत अडकण्यापेक्षा वेगळी होती. त्याला दख्खनचे सहा सुभे व गुजरात आणि माळवा हे दोन सुभे मिळून एक भले मोठे राज्य स्थापन करायचे होते. बाकी त्याचा चुलतभाऊ मुहम्मद अमीनखान व त्याचे वंशज मात्र दरबारी कट कारस्थाने व दरबारातील आपल्या घराण्याचा वरचष्मा टिकवण्याच्या धडपडीत असल्याचे आपणांस दिसून येते. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे, तख्तावर बसलेले बाबर व त्याचे वंशज देखील तुराणी तुर्क होते. 


दरबारातील दुसरा महत्वाचा गट इराणी तुर्कांचा होय. इराणी व तुराणी या प्रादेशिक संज्ञा असून सामान्यतः इराणातील ते इराणी तर इराणच्या उत्तरेकडील व सैबेरियाच्या दक्षिणेकडच्या प्रदेशातील ते तुराणी अशी सामान्यतः विभागणी केली जाते. {६} 

या इराणी गटाचा म्होरक्या सादतखान असून पुढील काळात त्याचा भाचा व जावई सफदरजंग व पश्चात त्याचा मुलगा सुजाउद्दौला यांनी या गटाचे पुढारपण केले. विशेष म्हणजे हे शिया पंथीय होते. 


दरबारातील तिसरा गट हिंदू सरदारांचा असून त्यामध्ये राजपूत संस्थानिकांचा खूप मोठा भरणा होता. बाबर - अकबरचे तुर्की साम्राज्य विस्तारले, स्थिरावले ते या राजपुतांच्या बळावरच ! परंतु औरंगजेबाची कारकीर्द राजपुतांना भोवल्याने हा गट वरवर साम्राज्याप्रति राजनिष्ठ तर आतून कट्टर विरोधी बनू लागला होता. दरबारात या गटाचे नेतृत्व अंबरचा सवाई जयसिंह व जोधपूरचा अजितसिंह करत होते. हे दोघेही वरकरणी बादशाही तख्ताशी एकनिष्ठता दर्शवत आतून साम्राज्यविरोधी कारवाया करत आपापल्या राज्यांच्या विस्तारात गुंतले होते. 


खेरीज अफगाणांचा एक छोटा परंतु शक्तिशाली गट असून या गटाच्या मनात देखील दिल्लीच्या तख्ताप्रति तितकीशी आदराची, निष्ठेची भावना नसल्याचे आपणांस उपलब्ध इतिहासावरून दिसून येते. 


या चारही गटांतील प्रमुख उमरावांना तुर्की बादशाहीचा पोकळ डोलारा राखून आपापलं स्वतंत्र संस्थान थाटायचं होतं, थाटलेलं विस्तारायचं होतं. वरवर ते सम्राट, साम्राज्याविषयी निष्ठावान असल्याचा देखावा करीत असले तरी मनात साम्राज्याचे लचके तोडून आपापल्या राज्यांना कसे जोडता येतील याचे डावपेच अहर्निश घोळत असत.

परंतु एक गोष्ट नाकबूल करता येत नाही व ती म्हणजे तुर्की बादशाहीचा जर थोडाफार अभिमान कोणास असेल तर देशबंधुत्व या नात्याने फक्त तुराणी गटासच. 

अशा या अंतस्थ गटबाजीने ग्रासलेल्या दिल्लीकर तुर्की दरबारात सय्यदांनी घडवून आणलेल्या चौथाई - सरदेशमुखीच्या तहा निमित्ताने शाहूचा -- पर्यायाने मराठी सत्तेचा प्रवेश झाला.  


आरंभी, म्हणजे मराठी सत्तेचा माळव्यात शिरकाव होऊन तिथे तिचा अंमल प्रस्थापित होईपर्यंत राजकारणी पटावरील एक सोंगटी, यापलीकडे फारसा उपयोग असल्याचे प्राप्त इतिहासावरून दिसत नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे दरबारातील दोन बलिष्ठांचे -- जयपूरकर सवाई जयसिंह व चीनकिलीचखान उर्फ निजाम उल्मुल्क या दोघांचे माळव्यात गुंतलेले हितसंबंध. {७} 


जयसिंहाला आपल्या राज्याचा विस्तार यमुना ते नर्मदेच्या किनाऱ्यापर्यंत करायचा होता. माळव्यातील अंतर्गत स्थिती त्याच्या महत्वाकांक्षेस प्रेरक अशीच होती. माळव्यातील बव्हंशी संस्थानिक, जमीनदार घराणी राजपुतांची असून त्यावर मेवाड, जयपूर, जोधपूरकरांचा -- विशेषतः जयपूरच्या जयसिंहाचा प्रभाव होता. त्यामुळे जयसिंहाला माळव्याप्रति अभिलाषा उत्पन्न होणे स्वाभाविक होते.


स. जयसिंह प्रमाणेच माळव्यावर निजमाचीही दृष्टी खिळलेली होती. दख्खनमध्ये स्वतंत्र सत्ता स्थापायची तर माळव्यावर नियंत्रण -- संरक्षण व आक्रमण, दोन्ही दृष्टीने -- अत्यावश्यक होते. त्यामुळे माळवा घशात घालण्यासाठी तो टपून बसला होता.


प्राचीन काळापासून आर्थिक, सामरिकदृष्ट्या असलेलं माळव्याचं महत्त्व या दोन बलाढ्य तुर्की मनसबदारांनी पुरेपूर ओळखलं असल्यानं माळव्याबाबत या दोघांचीच मुख्य स्पर्धा सुरु असली तरी या दोघांचे डाव हाणून पाडण्याच्या इतरही घटना घडत होत्या. परिणामी आपला बेत सिद्धीस नेण्यासाठी यांनी तिसऱ्या पक्षाचा -- माळव्यात औरंगजेबाकडून बीजगड येथे जहागीर प्राप्त व दख्खनच्या चौथाईची सनद मिळण्यापूर्वीच माळव्यावर चढाई करण्यास उत्सुक असलेल्या सातारकर शाहूचा वापर करण्याचे योजले.


निजाम आणि जयसिंहाचे माळव्यासंबंधी कारस्थानी बेत व शाहूचा त्यांनी केलेला वापर समजण्यासाठी आपणांस माळव्याचे सुभेदार, विचाराधीन कालखंडात कोण कोण होते, हे पाहणे आवश्यक आहे.


स. जयसिंह :- फेब्रु. स. १७१३ - नोव्हें. १७१७

मुहम्मद अमीनखान :- नोव्हें. स. १७१७ - डिसें. १७१८

निजाम :- फेब्रु. स. १७१९ - ऑगस्ट १७२२    

गिरधर बहादूर :- ऑगस्ट स. १७२२ - मे १७२३

निजाम :- मे स. १७२३ - जून १७२५   ( निजामाने नायब सुभेदार म्हणून अजीमुल्लास नियुक्त केले. ) 

गिरधर बहादूर :- जून स. १७२५ - १७२८ {८}


या जोडीला आणखी तीन नोंदींची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे व त्या म्हणजे :-  स. १७२० मध्ये निजामाला दख्खनची सुभेदारी प्राप्त झाली.

दि. १० ऑगस्ट १७२० रोजी बाळापूरच्या लढाईत सय्यद बंधूंचा पुतण्या आलम अली - निजामाचा मुकाबला होऊन आलमअली मारला गेला व निजाम विजयी झाला. ही घटना सय्यद बंधूंचा विनाशारंभ म्हणूनही ओळखली जाते.

दि. १३ फेब्रु. १७२२ रोजी निजामास दिल्लीच्या तुर्की बादशाहने आपली वजिरी बहाल केली व दि. ७ डिसें. १७२३ रोजी निजामाने वजिरीचा राजीनामा देत दख्खनची वाट धरली. {९}


या सर्व घटनाक्रमांवरून स्पष्ट होणारी बाब म्हणजे -- स. १७२० मध्ये निजामास प्राप्त झालेली दख्खन सुभेदारी व बाळापूरच्या लढाईत आलमअली मारला जाऊन सय्यद पक्षीयांचा झालेला पराभव, या दोन घटनांचा दृश्य एकत्रित परिणाम म्हणजे शाहूचा कल सय्यद बंधूंकडून वळून निजामाच्या बाजूने झुकला. अर्थात, चौथाई करारानुसार तो दख्खन सुभेदाराचा ताबेदार होता, तेव्हा त्याला निवडीकरता पर्यायच नव्हता.


बाळापूरच्या लढाईने निजामाचे दख्खनमधील आसन स्थिर झाले. या लढाईनंतर अवघ्या काही महिन्यांत दिल्ली दरबारातून सय्यदांचा नायनाट झाल्यानंतर तुराणी गटास महत्व क्रमप्राप्त होते. तेव्हा या बड्या तुराणी उमरावास दुखावण्याची जोखीम शाहू व त्याचे सरदार उचलणे शक्य नव्हते. यामुळेच की काय, निजामाच्या माळवा सुभेदारीच्या काळात ( स. १७१९ - २२ व स. १७२३ - २५ ) शाहूच्या सरदारांनी माळव्यावर प्रखर हल्ले चढवले नाहीत. {१०} 


स. १७२४ च्या  मध्ये निजामाने शाहूच्या मदतीने बादशाह तर्फे घोषित दख्खन सुभेदार मुबारिझखानाचा साखरखेडल्याच्या लढाईत पराभव केला. युद्धात मुबारिझखान मारला गेल्याने हताश बादशहाने निजामासच दख्खन सुभेदार म्हणून फेरनियुक्त केले. 

साखरखेडल्यावर मुबारिझखान -- पर्यायाने बादशाही पक्षास धूळ चारून निजामाने दख्खनमधील आपले आसन बळकट करत पुढील काळात शाहूच्या वाढत्या सत्तेला आळा घालण्याचा प्रयत्न केला. 



साखरखेडल्यावर निजामाची मदत करण्यामागे, तो आपणांस दख्खनमधील आपल्या चौथाई - सरदेशमुखी हक्क वसुलीस अडथळा करणार नाही व त्याच्या मार्फत माळवा - गुजरात मधून चौथाई व सरदेशमुखी मिळेल अशी शाहू पक्षीयांची अपेक्षा होती. परंतु निजाम मोठा धूर्त राजकारणी होता. प्रथम त्याने शाहूच्या मदतीने आपली सत्ता निष्कंटक केली. नंतर  कोल्हापूरकर संभाजीला पुढे करून शाहूच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. ज्याची परिणती पुढे पालखेडच्या रणभूमीवर निजामाच्या पराभवात झाली. ( फेब्रु. - मार्च स. १७२८ )



इकडे माळव्याच्या सुभेदारीत बदल होऊन निजामाच्या जागी गिरधर बहादूरची नियुक्ती झाली. नव्या सुभेदाराकडे शाहूच्या हस्तकांनी रीतसर चौथाई व सरदेशमुखी वसुलाची मागणी केली असता त्याने ती धुडकावून लावली. दरम्यान निजामाचा माळव्यातून उठावा झाल्यावर स. जयसिंहास आपले राजकारण खेळण्याची मोकळीक मिळून त्याने माळव्यातील जमीनदार - संस्थानिकांना गिरधर बहादूर विरुद्ध -- पर्यायाने बादशाही सत्तेविरुद्ध चिथावणी देत दुसरीकडे शाहू व मुत्सद्द्यांना माळव्यावर आक्रमणाची भर दिली. 

यामागे त्याचा प्रधान हेतू, गिरधर बहादूर वा अन्य कोणा तुर्की मनसबदारास माळव्याच्या सुभेदारीवर काम करणे अशक्य होऊन ती जबाबदारी आपल्यास प्राप्त व्हावी व शाहू आपला स्नेही असल्याने त्यांस वार्षिक निश्चित एक रक्कम भरून माळव्यातील आपली सत्ता निष्कंटक व दृढ करावी असा होता.


स. जयसिंहाचा प्रेरणेने पेशवे बंधू हिंदुस्थानची वाट चालू लागले. बाजीराव बुंदेलखंड तर चिमणाजी आपा माळव्यात उतरला. यावेळी माळव्यात अमझेरा वगैरे ठिकाणी झालेल्या संघर्षात गिरधर बहादूर, दया बहादूर हे मातबर शाही उमराव मारले जाऊन बादशाही पक्षाचा पराभव झाला. ( दि. २९ नोव्हेंबर १७२८ )


वस्तुतः माळव्यात इतकं यश मिळेल अशी खुद्द पेशवे बंधूंनाही अपेक्षा नव्हती. उलट राज्याचे कर्ज निवारण्यासाठी व कुठून तरी चौथाई, सरदेशमुखीच्या रकमा वेळेवर वसूल व्हाव्यात यासाठी त्यांनी आपले प्रयत्न आरंभले होते. {११}


गिरधर बहादूरचा नाश झाल्यावर अपेक्षेप्रमाणे दिल्ली दरबारने माळव्याच्या संकटावर उतारा म्हणून स. जयसिंहास माळव्याची सुभेदारी देऊ केली. 

मनाशी आखलेल्या डावाप्रमाणे जयसिंहाने शाहूकडे वकील पाठवून गुजरात - माळव्याकरता अनुक्रमे पंधरा व अकरा लक्ष देण्याचे कबूल केले. बदल्यात मराठी सरदार नर्मदा पार करून उपरोक्त प्रांतांना तसदी देणार नाही याची ग्वाही शाहूने दिली. {१२} 

परंतु ही बोलणी, तहनामा आकारास येण्यापूर्वीच स. जयसिंहाकडून माळव्याची सुभेदारी काढून घेत महंमद खान बंगशला देण्यात आली. परिणामी माळव्याच्या बाबतीत शाहू - बादशाह दरम्यान समझोता होण्याची आशा दुरावली.



महंमद खान बंगशने स. १७३०सप्टें. ते १७३२ सप्टेंबर अशी जवळपास दोन वर्षे माळव्याची सुभेदारी केली. दरम्यान मराठी सरदारांना माळव्यातून बाहेर काढण्याचे त्याने शर्थीचे प्रयत्न केले. आरंभी त्यांस यश येण्याची चिन्हे दिसत होती.


सातार दरबारातील पेशवे - सेनापती दरम्यान चुरस विकोपास गेली होती. सेनापती त्रिंबकराव दाभाडेने पेशव्याचा बंदोबस्त करण्यासाठी निजामाची मदत मागितली. खेरीज कोल्हापूरकर संभाजी सोबत देखील त्याचे राजकारण खेळू लागले. पालखेडचा पराभव निजामाच्या मनाला लागून राहिला होता. तो गमावलेला डाव, स्वतःस अधिक तोशीस न पडता, भरून काढण्यासाठी त्याने संभाजी व दाभाड्याला चिथावणी देण्याचे काम केले.


या तिघांनी आखलेल्या नव्या मसलतीनुसार दाभाडे, कंठाजी कदम बांडे, उदाजी पवार वगैरे मंडळी बाजीरावाचा बंदोबस्त करणार होती. इकडे कोल्हापूरकर संभाजी शाहुवर चढाई करणार होता. अशा प्रकारे छत्रपती व पेशव्याला एकेकटे गाठून त्यांचा निकाल लावण्याचा या त्रिकुटाचा बेत होता. तो साधल्यास कोल्हापूरकर संभाजी छ. शिवाजीच्या राज्याचा कायदेशीर वारस बनणार होता. तख्तावरील धनी बदलला उत्तम, न बदलल्यास व पेशव्याचा बंदोबस्त झाला तर दरबारात सेनापतीचा वरचष्मा राहणार होता. या दोघांचेही मनोरथ साधल्यास चौथाई - सरदेशमुखीच्या जोखडातून आपली सुटका होईल बहुधा निजामास आशा असावी. 

सारांश, आपले अस्तित्वच धोक्यात आल्याने माळव्याकडे शाहू व पेशव्याचे दुर्लक्ष होणे स्वाभाविक होते. 

या काळात बंगशने आरंभी आक्रमक भूमिका घेत उज्जैन पर्यंत धडक मारली. परंतु ही उभारी शेवटपर्यंत टिकू शकली नाही.


स. १७३० च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत शाहूने चढाई करून कोल्हापूरकर संभाजीस तहाची याचना करण्यास भाग पाडले.  तेव्हा पेशव्याविरोधात एक दाभाडेच हुकमी बाण राहिला होता. 


राजकारणाचा बदलता रंग पाहून निजाम मार्च महिन्याच्या उत्तरार्धात नर्मदेकिनारी आला. इथे पूर्वसंकेतानुसार बंगशने त्याची भेट घेतली. दहा बारा दिवस दोघांची गुप्त खलबतं चालून निजाम दाभाड्याच्या मदतीसाठी गुजरातकडे वळणार त्यापूर्वीच दि. १ एप्रिल १७३० रोजी डभईच्या लढाईत बाजीराव पेशव्याने त्रिंबकराव दाभाड्यास ठार करून निजामाच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले.


यानंतर पेशवा व त्याच्या सरदारांनी माळव्यावर आपले लक्ष केंद्रित केले. परिणामी बंगशची पीछेहाट होऊन त्याने मराठी सरदारांशी तडजोड आरंभली. {१३} 

दिल्ली दरबारास बंगशची भूमिका न पटल्याने माळव्याच्या सुभेदारीवर त्याच्या जागी स. जयसिंहाची फेरनियुक्ती करण्यात आली. ( सप्टें, स. १७३२ ) 


स. जयसिंहाची सुभेदारी ( स. १७३२ - ३७ ) विशेष संस्मरणीय आहे. या पाच वर्षांच्या काळात तुर्की सम्राटाने माळव्यातून मराठी सरदारांना बाहेर काढण्याचे शक्य तितके सर्व प्रयत्न करून पाहिले. परंतु अंती त्याच्या निराशाच पदरी पडली. माळव्याची सुभेदारी लाभताच स. जयसिंहाने देखील राजकारणाचा बदलता रंग पाहून प्रथमतः मराठी सरदारांवर शस्त्र धरण्याचा प्रयत्न करून पाहिला. परंतु मंदसोर जवळ होळकर शिंद्याने त्यांस घेरून तहास भाग पाडले. सहा लाख रुपये व माळव्यातील अठ्ठावीस परगणे देण्याच्या शर्तीवर त्याची सुटका झाली. ( स. १७३३ फेब्रु. ) {१४}

याच काळात आणखी एक महत्वाची घटना घडून आली, ज्यामुळे राजपुतांशी असलेल्या मराठी सत्तेच्या संबंधांना एक निराळेच वळण लाभले.


राजपुतान्यातील आपलं महत्व व राज्य वाढवण्याची जयसिंहाची मोठी हाव होती. त्यामुळे संधी मिळताच आपल्या राज्याशेजारील लहान लहान संस्थानं या ना त्या प्रकारे गिळंकृत करण्याचा त्याने सपाटा लावला होता. त्याच्या याच विस्तारवादी धोरणातून बुंदीचे प्रकरण उद्भवले.

बुंदीला त्यावेळी बुधसिंह राज्य करत होता. स. जयसिंहाने अनुकूल संधी साधून बुधसिंहास पदच्युत करत त्याजागी दलीलसिंह हाडाची स्थापना करत त्याला आपली मुलगी देत त्याच्याशी नातेसंबंधही प्रस्थापित केले. दलीलसिंहाच्या थोरल्या भावास -- प्रतापसिंहास हा प्रकार आवडला नाही. त्याने बुधसिंहाचा पक्ष घेत छ. शाहूकडे मदत मागितली. तेव्हा शाहूच्या हुकुमावरून स. १७३४ च्या एप्रिलांत शिंदे, होळकर, पवार इ. नी बुंदीवर हल्ला चढवून ते संस्थान बुधसिंहास बहाल केले. याप्रसंगी बुधसिंहाच्या पत्नीने होळकरास राखी बांधून त्यांस आपले भाऊ मानले. मात्र मराठी सरदारांची पाठ फिरताच स. १७३४ स. जयसिंहाने फिरून बुंदीचा ताबा घेत दलीलसिंहास तेथील गादीवर बसवले. {१५}


बुंदी प्रकरणाने स. जयसिंहाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. भविष्यातील संकटावर उतारा म्हणून स. १७३४ च्या जुलैमध्ये प्रमुख राजपूत राजांची एक बैठक बोलावली. त्या बैठकीत पावसाळ्यानंतर मराठी सरदारांविरुद्ध एकत्रित मोहीम आखण्याचे निश्चित झाले खरे, परंतु करारानुसार कारवाई मात्र झाली नाही. इकडे जयसिंहाने देखील यावेळी दुटप्पी राजकारण खेळत एकीकडे राजपूत राजांची मराठी सरदारांविरुद्ध फळी उभारत दुसरीकडे अंतस्थरित्या पेशव्यासोबत तहाची बोलणी आरंभली. {१६}


इकडे दिल्ली दरबारात माळव्यातून मराठी सरदारांना हाकलून लावण्यासाठी जोरदार तयारी चालली होती. खासा वजीर कमरुद्दीनखान, मीरबक्षी खानडौरा इ. बडे उमराव स्वतः सैन्याचे नेतृत्व करत मैदानात उतरले. 


स. १७३४ च्या पावसाळ्यापासून ते स. १७३८ च्या जाने. पर्यंत माळव्याकरता तुर्क व मराठी सरदारांत बराच संघर्ष झाला. तटस्थपणे पाहिले असता या प्रचंड मोठ्या भासणाऱ्या झगड्यातून पेशव्याच्या पदरी पडलेला फायदा अत्यंत अल्प होता.


प्रथमतः त्यांस माळव्याची नायब सुभेदारी मिळाली. बादशहाकडून जहागीर व मनसबदारीचे फर्मान प्राप्त झाले. {१७}

पैकी पेशव्याची नायब सुभेदारी, स. १७३८ मध्ये माळव्यावर  निजामाच्या मोठ्या मुलाची -- गाजीउद्दीनची सुभेदार म्हणून नियुक्ती झाल्यावर आपोआप संपुष्टात आली तर मनसबी बद्दल माहिती मिळत नाही.


बादशहा - पेशवा संघर्षातील बाजीराव पेशव्याची दिल्ली स्वारी ही अत्यंत महत्वाची घटना मानली जाते. वस्तुतः पेशव्याच्या या स्वारीने राजकारण वा संघर्षावर कसलाही परिणाम न होता उलट बादशहाने दख्खनमधून निजामास आपल्या मदतीकरता बोलावत त्याच्यामार्फत माळव्यावर आणखी एक स्वारी करवली. दिल्लीला धडक मारून दख्खनला परतलेल्या पेशव्यास पुनः माळव्याच्या बचावार्थ नर्मदापार यावे लागले. भोपाळ येथे त्याने निजामाला कोंडीत पकडून तहास भाग पाडले.

पेशव्याच्या यावेळी मुख्य मागण्या -- (१) माळव्याच्या सुभेदारी व जहागिरीची सनद बादशहाकडून मिळवून देणे. 

(२) पेशव्याच्या खर्चासाठी पन्नास लक्ष बादशाहकडून मिळवून देणे. 


भोपाळचा संग्राम आटोपल्यावर निजाम दिल्लीला परतला. त्यावेळी हिंदुस्तानच्या सरहद्दीवर इराणचा सम्राट नादिरशहा येऊन थडकल्याने दिल्ली दरबाराचे लक्ष तिकडेच गुंतून राहिले व त्यामुळे भोपाळच्या तहातील अटी कागदावर राहून बाजीरावाच्या पदरी पोकळ लौकिक व सैन्याचा खर्च यापलीकडे फारसे काही पडले नाही. 


नादिरशाहची हिंदुस्थान स्वारी {१८}:- स. १७३८ पासून ते स. १७३९ च्या मे पर्यंत नादिरशहाची हिंदुस्थान स्वारी चालली.

यामध्ये त्याने -- दि. १३ फेब्रुवारी १७३९ रोजी कर्नाळच्या रणभूमीवर बादशाही सैन्याचा पराभव करत महमदशहास नजरकैदेत टाकून दिल्लीस प्रस्थान ठेवले.

दि. मार्च रोजी नादिरशाहने दिल्लीत स्वतःस हिंदुस्थानचा बादशहा घोषित करत आपल्या नावाची द्वाही फिरवली, नाणी पाडली.

नादिरशाह कदाचित माळव्यात उतरेल या धास्तीने बाजीराव पेशवा मार्च - एप्रिलांत बुऱ्हाणपुरास येऊन दाखल झाला. मात्र दि. १ मे रोजी महमदशहास हिंदुस्थानची बादशाही सोपवून नादिरशाहने मायदेशीचा रस्ता धरल्याने पेशव्यास पुढे जाण्याचे प्रयोजन उरले नाही.


नादिरशाहच्या स्वारीतून प्रकर्षाने उठून दिसणाऱ्या मुख्य बाबी म्हणजे -- राजपुतांनी तुर्की साम्राज्याचे खड्ग - ढाल ही आपली पूर्वपरंपरा पूर्णतः त्यागली. कर्नाळची लढाई शाही फौजांनी लढली असली तरी त्यात स. जयसिंहासारख्या मातबर मनसबदारांनी भाग घेतला नव्हता.

दुसरे असे की, नादिरशाहच्या हल्ल्याचा मुकाबला करताना शाही सैन्याची जी हानी झाली, ती लगेचच भरून न निघाल्याने इतउत्तर बादशाहीचा केवळ पोकळ डोलाराच शिल्लक राहिला.

काळाची पावलं ओळखण्यास यावेळीही मराठी मुत्सद्द्यांना खूपच उशीर झाला. अर्थात, यामागे स. १७४० मध्ये झालेला बाजीराव पेशव्याचा अनपेक्षित मृत्यू जरी गृहीत धरला तरी आपलं नर्मदोत्तर राजकारण दिल्ली दरबारातील घडामोडींवर अवलंबून ठेवावं की स्वतंत्र चालवावं याची निश्चिती त्यांना लवकर करता आली नाही. याचा परिणाम म्हणजे सफदरजंगच्या मार्फतीने स. १७५२ चा बादशाही संरक्षक करार करेपर्यंत दिल्ली दरबारात त्यांचे स्थान दुय्यमच राहिले. ज्याचा फटका त्यांच्या राजकीय भूमिकेस चांगलाच बसून संधीसाधू लुटारू ही त्यांची प्रतिमा कायम राहिली.


नादिरशाहच्या आक्रमणाचा व त्याने यावेळी केलेल्या तुर्की बादशाह सोबतच्या तहाचा थेट फटका जवळपास एक दशकानंतर मराठी सत्तेस बसला. यासंबंधी अधिक विवेचन पुढे योग्य स्थळी येईलच. तूर्त नादिर व तुर्की बादशाही दरम्यान झालेल्या तहाची, आपल्या विषयमर्यादेस उपयुक्त तेवढी कलमे येथे देत आहे :- 

(१) काबुलचा सुभा तसेच सिंधू नदीच्या पश्चिम काठावरील दक्षिणेस समुद्र किनाऱ्यापर्यंतचा तुर्की साम्राज्यात मोडणारा सर्व प्रदेश -- ज्यामध्ये दक्षिण सिंधमध्ये मोडणारा सागरी किनारा व त्यावरील बंदरे तसेच पंजाबच्या काही भागाचा समावेश होता -- नादिरशाहने आपल्या साम्राज्यास जोडून घेतला.

(२) खेरीज, काबुलचा सुभा आर्थिकदृष्ट्या तोट्याचा असल्याने तुर्कांनी या सुभ्याच्या खर्चाकरिता सियालकोट, पसरूर, औरंगाबाद व गुजरात या चार महालांचा शिलकी वसूल लावून दिलेला होता. नादिरशाहने काबुल ताब्यात घेतल्यानंतर याच कारणांस्तव उपरोक्त चार महालांचा सालीना २० लाखांचा महसूल स्वतःकडे लावून घेतला.





हिंदुस्थान स्वारी आटोपून नादिरशाह मायदेशी परतल्यानंतर दिल्ली दरबारच्या अंतर्गत गटबाजीस उत आला. नादिरशाह विरुद्ध लढ्यात निजाम तटस्थ राहिल्याने दरबारातील निजामविरोधी गट सक्रिय झाला. या गटाचे नेतृत्व यावेळी महमदशहा बादशहाच्या खास मर्जीतील उमराव अमीरखान याने स्वीकारले. हा इराणी असून यासमयी दरबारातील इराणी शिया पंथीयांचे नेतृत्व याच्याकडे होते. 

अमीरखानाने निजामाचा चुलतभाऊ कमरुद्दीनखान यांस वजिरीवरून दूर करून ते पद स्वतःस मिळवण्याचा देखील पर्याय चालवला होता. 


या द्विपक्षीय भांडणापासून दरबारातील हिंदुस्थानी उमरावांचा -- राजपुतांचा पक्षही तटस्थ राहू शकला नाही. नादिरशाहच्या हल्ल्यात मीरबक्षी खानडौरा मारला गेल्याने दरबारात एकाकी पडलेल्या स. जयसिंहाने बादशहाचे निजामाविरुद्ध कलुषित झालेले मत ओळखून त्याच्या विरोधात मोर्चेबंदी आरंभली. ज्यामध्ये त्याला बाजीराव पेशव्याचे सहाय्य अपेक्षित होते व तत्संबंधी त्याची पेशव्यासोबत बोलणीही सुरू होती.

पेशव्याच्या मार्फत निजामाचा काटा काढण्याचा यावेळी जयसिंहाचा डाव असून त्याबदल्यात तो पेशव्याला, शाही खजिन्यातून काही लाख रुपये मदतखर्च व कर्ज निवारण्यासाठी मिळवून देणार होता. अर्थात बादशहाच्या मंजुरीनेच जयसिंहाने पेशव्यास हे आश्वासन दिले होते.


इकडे आपल्या विरोधात दरबारी मानकऱ्यांनी चालवलेली कट - कारस्थाने लक्षात घेऊन निजामानेही प्रसंग जाणून पेशव्यासमोर मैत्रीचा हात पुढे करत त्यांस कित्येक गोड वचनं देऊ केली. परंतु यावेळी निजामाचा पुरता बंदोबस्त करण्याची पेशवे बंधूंची -- बाजीराव व चिमाजीआपाची इच्छा असल्याचे दिसून येते. त्यामुळेच त्यांनी निजामाचा पक्ष न घेता बादशाही पक्षाचा स्वीकार केला खरा परंतु दि. २८ एप्रिल १७४० रोजी बाजीराव पेशव्याचा अनपेक्षित मृत्यू झाल्याने या मसलतीस प्रथम हादरा बसला. तदोपरांत चिमाजीने जरी ही मसलत पेशव्याच्या वतीने उचलून धरली असली तरी खुद्द दिल्ली दरबारात बादशहाचे मन फिरून त्याने अमीरखानास निजाम व कमरुद्दीनसोबत मिळतंजुळतं घेण्याची आज्ञा करत कमरुद्दीनची वजिरी कायम ठेवली. निजामाने संधीचा फायदा उचलत अमीरखानास दिल्ली सोडून त्याच्या सुभ्याच्या ठिकाणी -- अलाहाबादेस जाण्याची सूचना करून त्यांस राजधानीतून बाहेर काढले. पेशव्याला दहशत बसवण्यासाठी त्याने आपल्या तर्फेने अजीमुल्लाखानास माळव्यावर नियुक्त करत स्वारीची हुल उठवली. त्यामुळे पेशव्यास माळव्याच्या बंदोबस्ताची फिकीर पडून तो त्यातच गुंतून पडला. खेरीज बाजीरावाच्या पश्चात पदावर आलेल्या बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यास अनेक कारणांनी लगोलग हिंदुस्थान स्वारी हाती घेणे शक्य नसल्याने पाहता पाहता निजामाविरोधी उभारलेला व्यूह साफ ढासळून गेला.


परंतु राजकारणाचा प्रवाह इतक्यावरच थांबणारा नव्हता. निजामाचा मुलगा नासिरजंग याने दख्खनमध्ये बापाविरुद्ध बंड पुकारल्याने निजामास घाईघाईने दिल्लीतून दख्खनला निघून यावे लागले. यावेळी पिता - पुत्र मदतीसाठी पेशव्याकडे आले असता त्याने निजामाचा पक्ष घेतला. परिणामी नासिरजंगाचा पराभव होऊन निजामाचे दख्खनमधील डळमळीत झालेले आसन पुन्हा एकदा स्थिरावले. शेजवलकरांच्या मते पेशव्यास ही मसलत शिंदे, होळकर, पुरंदरे, जाधव प्रभूती सरदार - मुत्सद्द्यांकडून मिळाली असावी. खुद्द नानासाहेब पेशव्याने या संदर्भात लिहिलेल्या पत्राचा आधार घेतला तरी त्याच्या या भूमिकेबाबत आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. {१९} 


या प्रसंगी निजाम नेस्तनाबूत झाला असता तर नासिरजंग व निजामाचा थोरला मुलगा गाजीउद्दीन फिरोजजंग -- जो यावेळी दिल्लीत होता -- यांचा सामना जुंपण्याची शक्यता होती. निजामाच्या वारसांत कलह पेटवून आपलं स्वतंत्र राजकारण चालवण्याची एक अमूल्य संधी पेशवा आणि त्याच्या सल्लागारांनी दवडली असेच म्हणावे लागेल.


धूर्त निजामाने या आणीबाणीच्या प्रसंगीही आपली कावेबाज बुद्धी वापरत स. जयसिंह व पेशव्यात कलह उत्पन्न करण्याची संधी सोडली नाही. पेशव्यास पाठवलेल्या एका पत्रात त्याने, नादिरशाह विरोधी लढ्यात राजपुतांनी बादशहास मदत न केल्याने क्रुद्ध बादशाह त्यांना धडा शिकवणार असल्याचे सांगत त्याने पेशव्यास असे सुचवले की, या समयी पेशवा जर निजामाशी हातमिळवणी करेल तर त्यांस माळवा सुभा, शाही खजिन्यातून वीस लक्ष रुपये, प्रयाग येथे हिंदू यात्रेकरूंना करमाफी, वाराणसी येथे पेशव्यास जहागीर तसेच बादशाह सोबत भेट घडवून आणण्याची आश्वासनं देऊ केली. {२०} 


अर्थात या पोकळ वचनांना जरी पेशवा भुलला नाही तरीही प्रत्यक्ष भेटीनंतर आदरातिथ्य सत्कारादी उपायांनी त्याने नानासाहेबास इतके भारून टाकले की, रोहरामेश्वरच्या भेटीनंतर बाजीरावाने निजामाला कर्नाटकात मोकळीक देण्याची जी चूक केली, तिचीच उजळणी त्याच्या पुत्राने या प्रसंगी करत स. १७४६ पर्यंत सातार दरबारातून कर्नाटकची स्वतंत्र मोहीम मिळेपर्यंत तिकडे अजिबात लक्ष घातले नाही. इतकेच नव्हे तर याच काळात कर्नाटकांत मोहिमा करून मराठी सत्तेची जरब बसवू पाहणाऱ्या रघुजी भोसलेच्या कामगिरीवरही अप्रत्यक्षरित्या पाणी फिरवण्याचे पुण्य त्याने गाठीशी जोडून घेतले. यासंबंधी विस्तृत विवेचन त्र्यं. शं. शेजवलकरांनी आपल्या निजाम - पेशवे संबंध ग्रंथात केले असून जिज्ञासू वाचकांनी ते लक्षपूर्वक वाचावे अशी मी सूचना करतो.





संदर्भ ग्रंथ :- 


१) मराठी रियासत खंड ३ :- संपादक -  गो. स. सरदेसाई, पॉप्युलर प्रकाशन, नवीन संपादित आवृत्ती स. १९८९  

उत्तरकालीन मुघल खंड दुसरा, वुइल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित “ LATER MUGHALS “ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा अनुवाद, अनुवादक – प्रा. प्रमोद गोविंद ठोंबरे, प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रथमावृत्ती ऑगस्ट १९९८  

महाराष्ट्राचा इतिहास, मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८१८ :- डॉ. वि. गो. खोबरेकर, प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रकाशन वर्ष स. १९८८


२) मराठी रियासत खंड ३ :- संपादक -  गो. स. सरदेसाई, पॉप्युलर प्रकाशन, नवीन संपादित आवृत्ती स. १९८९ 

महाराष्ट्राचा इतिहास, मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८१८ :- डॉ. वि. गो. खोबरेकर, प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रकाशन वर्ष स. १९८८



३) महाराष्ट्राचा इतिहास, मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८१८ :- डॉ. वि. गो. खोबरेकर, पृ. क्र. ३२१  


४) दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास ( डॉ. ब. प्र. सक्सेना लिखित History of shahajahan of Delhi चा अनुवाद ) :- श्री. भ. ग. कुंटे, प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, प्रथमावृत्ती जानेवारी १९८९


५) प्रस्तुत कलमास मुख्य आधार :-

गावगाडा :- त्रिंबक नारायण आत्रे

महाराष्ट्राचा इतिहास, मराठा कालखंड ( भाग २ ) १७०७ ते १८१८ :- डॉ. वि. गो. खोबरेकर

मराठी रियासत खंड ३ :- संपादक -  गो. स. सरदेसाई


६) मुसलमानी रियासत खंड १, गो. स. सरदेसाई पृ. क्र. ३७ - ३८, पॉप्युलर प्रकाशन, पुनर्मुद्रण २०१२  

खेरीज यांच्यात पंथीय भेद असून तुराणी सुन्नी तर इराण्यांत शिया पंथियांचा मोठा भरणा होता.


७) मालवा में युगान्तर या अराजकतापूर्ण शताब्दी, पूर्वकाल १६९८ - १७६५ ई. :- रघुबीरसिंह, 

प्रकाशक :- श्री मध्य भारत हिंदी साहित्य समिती इंदौर, प्रथमावृत्ती स. १९३८, पृ. क्र. १४३-४४   


८)  उक्त 

९)  उक्त 

१०) मालवा में युगान्तर :- रघुबीरसिंह

वुइल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित “ LATER MUGHALS “ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा मराठी अनुवाद :-  प्रमोद ठोंबरे 

निजाम - पेशवे संबंध १८ वे शतक :- प्रा. त्र्यं. शं. शेजवलकर, प्रकाशक - पुणे विद्यापीठ, प्रथमावृत्ति जानेवारी १९५९

मराठ्यांच्या उत्तरेतील मोहिमा भाग १ ला ( १७२० - १७४० ) :- विश्वनाथ गोविंद दिघे, प्रकाशक - विश्वनाथ गोविंद दिघे, प्रकाशन वर्ष १९३३ 


११) मालवा में युगान्तर :- रघुबीरसिंह

     पेशवे दप्तर खंड १३ :- लेखांक क्रमांक :- १५, १७, १८, १९, २२ - २३, २९. ३०, ३३     


१२) पेशवे दप्तर खंड १० :-  ले.  क्र. ६६   


१३)   मालवा में युगान्तर :- रघुबीरसिंह, पृष्ठ क्र. २५०  


१४)  उक्त,  पृ. क्र. २५५ 

१५)  उक्त


१६) उक्त पृ. क्र. २६० - ६१

१७) पे. द. खंड १५ :- पृ. क्र. ८६, ८८, ९२, ९३

       मालवा में युगान्तर :- रघुबीरसिंह, पृ. क्र. २७४ - ७६

 माळव्यातील राजपूत संस्थिकांनी पेशव्याच्या खर्चाकरता सुमारे साडेदहा लक्ष रुपये द्यावेत,अशी नोंद पे. द. १५ पृ. क्र. ९४ वर आढळते. परंतु या रकमांची प्रत्यक्षतः वसुली करण्यात आली, न आली याची माहिती मिळत नाही. 

१८) प्रस्तुत कलमास मुख्य आधार - 

      वुइल्यम इर्विन लिखित व जदुनाथ सरकार संपादित “ LATER MUGHALS “ या ग्रंथाच्या दुसऱ्या खंडाचा मराठी अनुवाद :-  प्रमोद ठोंबरे 

मुघल साम्राज्याचा ऱ्हास :- ( मूळ लेखक सर जदुनाथ सरकार ) मराठी अनुवादक - ग. श्री. देशपांडे, प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई, प्रथमावृत्ती मे १९९० 


१९) हिंगणे दफ्तर १ ला खंड :- संपादक - ग. ह. खरे, ले. क्र. २०


२०) उक्त ले.  क्र. १९

      तसेच ले. क्र. २३ नुसार आरंभी नानासाहेब पेशव्याने स. जयसिंहाचाच पक्ष घेण्याची भूमिका अंमळ डळमळीत झालेली दिसते. तसेच या लेखांकातून – जो नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दी आरंभीचा आहे – पेशव्याचा द्रव्यलोभ हा दुर्गुण आपल्या निदर्शनास येतो, जो उत्तरोत्तर वाढत गेल्याचे इतिहास सांगतो.