बुधवार, २७ नोव्हेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ६ )

 
                 घाशीरामाचे प्रकरण घडून गेल्यावर काही महिन्यांनी महादजी शिंदे पुण्यास येणार हे एकदाचे निश्चित झाले. नानाची या बातमीने मोठी धांदल उडाली होती. इंग्रज - निजाम - पेशवे या त्रिकुटांची फौज यावेळी टिपूचा बंदोबस्त करण्यात गुंतली होती. महादजी दक्षिणेत येणार या वार्तेने केवळ नानाच नाही तर इंग्रज व निजाम देखील काहीसे भयचकित झाले होते. दिल्ली दरबारी पेशव्याच्या वतीने जो बहुमान महादजीने मिळवला होता --- अर्थात वकील - इ - मुतलकीचे पद ---- तो यापूर्वी मोगल बादशहाने निजामअलीचा पूर्वज निजामुल्मुल्कास दिला होता. आपल्या पूर्वजाने भूषविलेले पद पेशव्याच्या पदरच्या एका सरदाराने मिळवावे हे निजामाला सहन होण्यासारखे नव्हते. अर्थात, हि  बाब तशी दुय्यम होती. निजामाच्या पोटातील मुख्य भीती वेगळीच असून त्यामुळे तो काहीसा अस्वस्थ झाला होता. मोगल बादशहाच्या वतीने कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार महादजीकडे -- पर्यायाने पुणे दरबारकडे आला होता. या अधिकाराच्या बळावर निजामाची सत्ता ते चुटकीसरशी -- निदान कागदावर तरी -- संपुष्टात आणू शकत होते. त्यामुळे निजामाला महादजीच्या पुणे आगमनाच्या वार्तेने थोडी दहशत बसली होती. त्याशिवाय पुणे दरबारला निजामावर शह बसवण्यासाठी खंडणी, चौथाई सारखी कित्येक कारणे उपलब्ध होती. यांपैकी एखाद्या कारणाच्या निमित्ताने निजामाच्या विरोधात राजकीय व लष्करी कारवाई पुणे दरबार जरूर करू शकत होता. इंग्रजांच्या दृष्टीने पाहिल्यास महादजीचे पुणे आगमन हा फार मोठ्या चिंतेचा विषय होता !

                स. १७८३ मध्ये महादजीच्या मध्यस्थीने त्यांनी पुणे दरबारशी तह करून पहिले इंग्रज - मराठा युद्ध आटोपते घेतले. इंग्रजांनी मनात स्वार्थ बाळगून महादजीला मोठेपणा दिला होता, त्या बाह्य डौलावर नाना व महादजी काही काळ भाळले हे उघड आहे. नानाला वाटले की, महादजी आता इंग्रजांचा मित्र झाला तर महादजीच्या मते इंग्रज आपले सच्चे दोस्त बनले. वस्तुतः, हा तह घडवून आणण्यासाठीच इंग्रजांनी महादजीला मोठेपणा दिला होता. तह बनून आल्यावर महादजीच्या स्पर्धेने त्यांनी दिल्ली दरबारात अंतस्थरित्या हस्तक्षेप करण्यास आरंभ केला. यावेळी मोगल बादशाहीतील सर्वोच्च असे वकील - इ - मुतलकीचे पद मिळवण्यासाठी महादजी व ब्रिटीश गव्हर्नर जनरल हेस्टिंग्स यांच्यात स्पर्धा लागली होती. पैकी, स. १७८४ च्या नोव्हेंबरमध्ये महादजीने हेस्टिंग्सला मात देऊन हे पद आपल्या ताब्यात घेतले. तेव्हापासून महादजी हा इंग्रजांचा अव्वल क्रमांकाचा शत्रू बनला. इंग्रजांची त्यावेळी आर्थिक हलाखी असल्याने व दक्षिणेत टिपूचे प्रस्थ वाढल्याने त्यांनी महादजीकडे तात्पुरते दुर्लक्ष केले. स. १७९० पर्यंत इंग्रजांनी महादजीला उत्तरेत एकप्रकारे मोकळा हात दिला. मात्र, त्याच्या मार्गात शक्य तितके अडथळे निर्माण करण्यासही ते चुकले नाहीत.

          महादजी व इंग्रज यांच्यात सालबाईच्या तहापासून एकप्रकारे शीतयुद्ध सुरु झाले. पुढे लवकरचं इंग्रजांचे दुटप्पी वर्तन लक्षात आल्यावर महादजीनेही आपले राजकारण खेळण्यास आरंभ केला. स. १७६५ मध्ये इंग्रजांना मोगल बादशहाने सालीना २६ लक्ष रुपये भरण्याच्या बोलीवर बंगाल, बिहार व ओरिसाचे दिवाणी हक्क प्राप्त झाले होते. मोगल बादशहा व इंग्रज यांच्यात हा करार होण्यापूर्वीच बंगाल प्रांतावर रघुजी भोसल्याने आपली चौथाई बसवलेली होती. म्हणजे, इंग्रजांना दिल्ली दरबारी सालीना २६ लक्ष व नागपुरच्या भोसल्यांना वार्षिक खंडणी देणे भाग होते. परंतु, त्यांनी रकमेचा भरणा कधी केलाच नाही. इंग्रजांकडून द्रव्य उपटण्याची शक्ती मोगलांमध्ये नव्हती आणि पुणे दरबारच्या स्पर्धेमुळे नागपूरकरांना इंग्रजांशी गोडीगुलाबीने राहण्यात आपले हित वाटत होते. महादजीला या सर्व गोष्टींची पूर्ण माहिती होती. इंग्रजांना आजमवण्यासाठी त्याने स. १७८५ मध्ये मोगल बादशहाच्या वतीने आजवर थकित राहिलेल्या बंगालच्या खंडणीचा प्रश्न उपस्थित केला. तसेच भोसल्यांच्या वतीने चौथाई मागण्याचाही प्रयत्न केला. इंग्रजांनी महादजीच्या या मागण्या तेव्हाच उडवून लावल्या. ब्रिटीश गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिसने तर महादजीला युद्धाची अप्रत्यक्ष धमकी दिली. हि घटना स. १७८५ ची असून तेव्हापासून इंग्रज व महादजी परस्परांचे पक्के वैरी बनले होते. सालबाईच्या तहाच्या वेळी महादजीने हैदरचा विश्वासघात करून परस्पर इंग्रजांशी तह करण्यास पुणे दरबारला भाग पाडले होते. पण तोच महादजी आता टिपूला इंग्रजांविरुद्ध उठाव करण्यासाठी गोंजारू लागला होता. स. १७९० मध्ये कॉर्नवॉलिसने निजाम व पुणे दरबारच्या मदतीने टिपूविरुद्ध मोहीम आखली. त्यावेळी त्याने महादजीकडे मदत मागितली पण त्याने नकार दिला. वस्तुतः, इंग्रजांच्या मदतीने टिपूचा बंदोबस्त करणे शिंद्याला नामंजूर होते. याबाबतीत त्याचे नानासोबत मतभेद होते. टिपूविरुद्ध इंग्रजांना मदत करून नानाने मोठी चूक केली असे नानाच्या विरोधकांचे मत आहे तर नानाने यावेळी टिपूच्या बंदोबस्तास प्राधान्य देऊन मोठीच कामगिरी बजावली असे नानाच्या समर्थकांचे मत आहे. प्रस्तुत विषयाशी हि चर्चा वरकरणी विसंगत वाटत असली तरी, तत्कालीन राजकारण समजून घेण्यासाठी हि अप्रयोजक चर्चा अत्यावश्यक आहे.

       स. १७९० पर्यंत हिंदुस्थानचे राजकीय चित्र पुढीलप्रमाणे होते :--- बंगाल, बिहार मध्ये आपला पाय घट्ट रोवून इंग्रज सत्ता यमुनेपर्यंत येऊन थडकली होती. यमुनेच्या पलीकडे शिंदे - होळकर अजून पक्के पाय रोवून उभे असल्याने इंग्रजांना दिल्लीमध्ये प्रवेश करता येत नव्हता. पेशव्याच्या वाढत्या सामर्थ्याने भयभीत झालेल्या नागपूरकर भोसले व निजामाच्या मदतीने बंगालपासून इंग्रज तसेच किनाऱ्याने खाली मद्रासपर्यंत आले होते. मधल्या पट्ट्यात फ्रेंच, डच इ. ची ठाणी असली तरी त्यांचे राजकीय महत्त्व साफ ओसरले होते. हिंदुस्थानचा पूर्व किनारा या प्रकारे इंग्रजांचा अंकित बनला होता तर पश्चिम किनाऱ्यावर मुंबई व सुरत येथे त्यांचे बस्तान बसले होते. पश्चिम किनाऱ्यावर त्यांना त्रास देणारे आंग्रे दुर्बल झाले होते तर पेशव्यांचे आरमार फारसे प्रभावी नव्हते. जंजिऱ्याचा सिद्दी त्यांचा अंकित बनला होता. गुजरातमध्ये गायकवाडास त्यांनी बगलेत मारले होते. तेथून माळवा - राजपुताना त्यांच्या दृष्टीपथात होता. येऊन - जाऊन त्यांना अडसर आता पुणे व म्हैसूर दरबारचा होता. म्हैसूरचा वाघ जर त्यांचा अंकित झाला वा तो थंड पडला तर निजाम त्यांच्या लगामी लागलेला असल्याने पुणे दरबारवर आपले वर्चस्व लादणे इंग्रजांच्या शक्तीबाहेर नव्हते. इंग्रजांना एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात आली होती की, आपला अखेरचा मुकाबला हा मराठी राज्याशी आहे. मराठी सरदार सर्व देशभर पसरलेले असल्याने त्यांचा अल्पावधीत पाडाव करणे तूर्तास तरी त्यांच्या कुवतीबाहेरचे होते. टिपूचे सामर्थ्य त्यांना माहिती होते. कर्नाटक प्रांत सोडल्यास बाहेर येण्याची त्याची हिंमत नव्हती व दूरवरील फ्रान्स देशातील मुठभर मुत्सद्द्यांची त्यास असलेली सहानुभूती वजा केल्यास त्यास कोणाचा पाठिंबाही नव्हता. टिपू व इंग्रज हे अल्पकाळासाठी एकत्र आले असते तर पुणे दरबारला भारी पडले असते असे सामान्यतः म्हटले जाते. परंतु, या मतात अजिबात तथ्य नाही. समजा, निजाम - इंग्रज व टिपू यांनी पुणे दरबारविरुद्ध मोहीम आखली असती तर काय झाले असते ? लष्करीदृष्ट्या निजामाची सत्ता यावेळी जवळपास मोडीत निघाली होती. त्यामुळे त्याचे भय मराठी सरदारांनी बाळगण्याचे काही कारण नव्हते. राहता राहिले टिपू व इंग्रज तर, इंग्रजांना एकाच वेळी उत्तरेत व दक्षिणेत मराठी सरदारांशी लढणे अजिबात परवडण्यासारखे नव्हते. फारतर टिपू एकटाच पुणे दरबार विरुद्ध लढला असता. इंग्रजांनी त्याला रसद, दारुगोळा फारतर पुरवला असता किंवा तोही त्यांना पुरवता आला नसता. कारण, दक्षिणेत इंग्रजांनी आक्रमक धोरण स्वीकारल्यावर उत्तरेत वावरणारे मराठी सरदार अजिबात गप्प बसले नसते. इंग्रजांना एकाच वेळी उत्तरेत व दक्षिणेत मोहीम चालवणे शक्य नाही हे महादजी ओळखून होता. त्याउलट नानाला याची जाणीव नव्हती असेच म्हणावे लागेल. यावरून असे दिसून येते की, नानाने निजाम - इंग्रज यांच्या टिपूविरुद्ध युतीत जाऊन एक मोठीच राजकीय चूक केली. आपल्या तिघांच्या सामर्थ्यापुढे टिपूचा निभाव लागणार नाही याची नानास जाणीव होती कि नव्हती हे समजायला मार्ग नाही. होती म्हणावी तर दक्षिणेतील राजकीय सत्ता समतोल साधण्यासाठी त्याने तटस्थ राहणे आवश्यक होते. आणि नव्हती म्हणावी तर सारा खेळचं संपला !

          असो, हिंदुस्थानची राजकीय परिस्थिती अशी होती की, या देशाचे सार्वभौमत्व ताब्यात घेण्यास मराठी व इंग्रजी सत्तेत अखेरचा सामना जुंपला जाणार हे निश्चित होते. सालबाईच्या तहानंतर महादजीला याची जाणीव झाली. इंग्रजांशी लढण्याकरता त्यानेही फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज इ. युरोपियन लष्करी अंमलदारांना आपल्या सैन्यात दाखल करून त्यांच्याकरवी कवायती प्रशिक्षित सैन्यदल बनवण्यास आरंभ केला. शस्त्रास्त्रांचे कारखाने काढले. महादजीच्या अनुकरणाने / स्पर्धेने इतर मराठी सरदारांनीही हाच उपक्रम स्वीकारला. परंतु, महादजी काय व इतर मराठी सरदार काय, त्यांनी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केले व ते म्हणजे आपल्या कवायती सैन्याचे नेतृत्व त्यांनी पोटभरू पाश्चात्त्यांच्या हवाली केले. या युरोपियन लोकांना या देशात फक्त पैसा कमवायचा होता. त्यांची निष्ठा त्यांच्या राष्ट्राप्रती होती, ना इथल्या स्थानिक सत्त्ताधीश वा सरदाराशी ! त्यामुळे ऐन प्रसंगी तसाच प्रसंग उद्भवला तर ते आपल्या मालकाचा विश्वासघात करण्यास मागे - पुढे पहात नसत. खुद्द महादजीला देखील लालसोट प्रसंगी याचा चांगलाच अनुभव आला होता पण त्यातून त्याने योग्य तो धडा घेतला नाही.

        स. १७९१ च्या ऑगस्टमध्ये घाशीराम प्रकरण निकाली काढल्यावर स. माधवरावाने राज्यकारभारात लक्ष घातल्याचे दिसून येत नाही. नानाच्या विविध प्रयत्नांना / अडथळ्यांना न जुमानता महादजी मोठ्या निर्धाराने दक्षिणेत येण्यास निघाला. याच काळात होळकरांचे शिंद्यांच्यासोबतचे अंतर्गत वैमनस्य यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते. आजवर अहिल्याबाई व महादजी दोघे एकविचाराने वागत असून तुकोजी नाना फडणीसच्या तंत्राने चालत होता. परंतु, आता नाना, तुकोजी व अहिल्याबाई असे त्रिवर्ग एकत्र आले आणि महादजी एकाकी पडला. वास्तविक, या दोन बलवान सरदारांतील तेढ मिटवण्याचे सोडून नानाने त्यांच्या द्वेषाला खतपाणी घालण्याचा उद्योग केला. याविषयी नानाचे चरित्रकार वा. वा. खरे यांनी नानाची बाजू सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी उपलब्ध पत्रे पाहता नानाने आपल्याच सरदारांना दुर्बल करण्याचे पेशव्यांचे धोरण पुढे चालू ठेवल्याचे दिसून येते. नाना व होळकरांचे हे उद्योग पेशव्याच्या कानी घालून त्याच्याकडून न्याय मागण्यासाठी महादजी पुण्यास यायला निघाला. यावेळी टिपूची मोहीम संपत आली होती. इंग्रजी पलटणांच्या सहाय्याने मराठी सरदारांना जे यश या मोहिमेत मिळाले होते ते लक्षात घेऊन नानाने परशुराम पटवर्धनास पत्र लिहून कळवले की, कॅप्टन लिटलच्या हाताखालील मुंबईची पलटणे घेऊन पुण्यास यावे. महादजी आपल्या फौजेच्या बळावर पेशव्याचा ताबा घेऊन आपणांस कैद करेल वा कारभारातून काढेल अशी नानाला भीती वाटत होती. दरबारात अशा महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना पेशव्यास त्याची खबर नव्हती.

                            आपण सैन्यासह येत आहोत हे समजल्यावर नाना इंग्रजांची फौज मदतीस आणण्याच्या खटपटीत आहे, हे समजताच महादजी जरुरीपुरते सैन्य घेऊन पुण्याकडे निघाला. पण त्याने नेहमीचा मार्ग सोडून बीड, तुळजापूर असे मुक्काम करत आरामात तो स. १७९२ च्या जूनमध्ये पुण्यास दाखल झाला. तोपर्यंत टिपूवर चालून गेलेले पुणे दरबारचे सरदार मोहीम आटोपून पुण्यास दाखल झाले होते. महादजीच्या पुणे आगमनाविषयी कित्येकांच्या मनात अनेक तर्क - कुतर्क होते. परंतु, या सर्वांपेक्षा नानाच्या मनात महादजीविषयी नेमकी काय भावना होती किंवा महादजीच्या पुणे आगमनाविषयी त्याचा काय ग्रह होता हे लक्षात घेणे योग्य ठरेल. आपणांस कारभारातून दूर करून पेशव्याचे प्रमुख कारभारीपद आपल्या ताब्यात घेण्यासाठी महादजी पुण्यास येत आहे अशी नानाची ठाम समजूत होती. हे कृत्य घडवून आणण्यासाठी महादजीकडे लष्करी बळ, बादशाही पदांचा अधिकार व योग्य अशी कारणेही होती. महादजीचा पुण्यास येण्याचा नेमका काय हेतु होता हे पाहणे देखील याच स्थळी योग्य ठरेल.

        वकील - इ - मुतलकीच्या वस्त्रांचा वाद व समारंभ :-    सालबाईच्या तहानंतर पुणे दरबारात नानाचे वाढलेले प्रस्थ महादजीच्या लक्षात आलेलं होतं. मराठी राज्याचा निश्चित अशी राज्यघटना वगैरे काही नसल्याने सालबाईच्या तहानंतर मराठी राज्यात --- विशेषतः पुणे दरबारात कित्येक महत्त्वाच्या पण गोंधळून टाकणाऱ्या घटना घडल्या होत्या. मूळात मराठी राज्याचे धनी सातारकर छत्रपती असून, ते एकप्रकारे आपला सर्वाधिकार पेशव्यांना सोपवून साताऱ्यास स्वस्थ बसून राहिले होते. अर्थात, हि स्वस्थता त्यांच्यावर लादण्यात आली हा भाग निराळा. पेशवे जोवर समर्थ होते तोवर त्यांनी हा अधिकार सांभाळला पण नारायणाच्या खुनानंतर पेशव्यांचे अधिकार, पेशव्यांच्या दिमतीस असलेल्या फडणीसाकडे आले. लौकिकात, छत्रपती धनी असलेल्या राज्याचा सांभाळ पेशव्यांच्या वतीने त्यांचा नोकर नाना फडणीस करत होता, तर व्यवहारात नाना हा छत्रपती व पेशव्यांची सत्ता वापरत होता. याच कारणांमुळे शिंदे - होळकर प्रभूती सरदार नानाविषयी मनात थोडंस वैषम्य बाळगून होते. कारण हे पेशव्यांचे सरदार असून त्यांच्यावर पेशव्यांच्या कारकुनाने -- म्हणजे आपल्याच बरोबरीच्या नोकराने आपणांवर हुकुमत गाजवावी हे त्यांना खटकत होते. तसेच राज्यकारभारात पेशव्याच्या वतीने नाना जो काही निर्णय घेत असे तो त्या सरदारांना बंधनकारक असल्याने राजकारणात एकसुत्रता अशी फारशी राहत नव्हती. याचा महादजीला चांगलाच अनुभव आला होता. तेव्हा राज्यकारभाराच्या एकप्रकारे दुरुस्तीसाठी म्हणा किंवा कारभारी मंडळाच्या पुनर्रचनेसाठी महादजी पुण्यास येत होता हे उघड आहे. याविषयीची उपलब्ध पत्रे आहेत , त्यातून त्यांस पेशव्यांचे प्रमुख कारभारीपद मिळवण्याचीही सुप्त इच्छा असल्याचे उघड होते. एकूणचं, महादजी विषयी नानाला वाटणारी भीती अगदीच अनाठायी नव्हती पण लष्करी बळावर मह्दाजी हे धाडस करील हि नानाची अटकळ चुकीची होती हे निश्चित !

      टिपूवरील मोहिमेत अडकलेले मराठी सरदार पुण्यास येऊन दाखल होताच महादजी देखील पुण्यास आला. रिवाजानुसार त्याची व पेशव्याची भेट घडून आली. भेटीच्या प्रसंगी महादजीने पेशव्याच्या पायावर डोकं ठेवलं तर पेशव्याने आपल्या गळ्यातील मोत्यांची माळ महादजीच्या गळ्यात घातली. या भेटीनंतर महादजीने दिल्ली दरबारातून पेशव्यांच्या नावे आणलेल्या वकील - इ - मुतलकीच्या वस्त्रांचा पेशव्यांनी स्वीकार करावा असा आग्रह धरला. वास्तविक स. १७८४ च्या नोव्हेंबर मध्येच महादजीने पेशव्याच्या नावाने दिल्ली दरबारातून वकील - इ - मुतलकीची वस्त्रे मिळवली होती व ती पेशव्याने स्वीकारावीत यासाठी पाठवूनही दिली होती, परंतु नानाने त्यावेळीही या वस्त्रांच्या स्वीकृतीसाठी आपला विरोध दर्शविला होता. त्यामुळे ती वस्त्रे उज्जैन येथेच पडून होती. तेव्हा महादजीने स्वतःच ती वस्त्रे पेशव्यास प्रदान करण्याचा निर्णय घेतला. स. १७८४ पासून नानाचा या गोष्टीला विरोध होता. त्याविषयी उभयतांचे पत्रोपत्री मोठे युद्ध घडून आले होते. पुढे महादजी पुण्यास आल्यावर व पेशव्यांची औपचारिक भेट झाल्यावर त्याने परत हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी नानाने त्यास असा आक्षेप घेतला की, पेशवे हे छत्रपतींचे नोकर असल्याने मोगल बादशाहाने त्यांना दिलेली बहुमान व ‘ महाराजाधिराज ‘ या पदवीचा स्वीकार करणे योग्य नाही. त्यासाठी छत्रपतींच्या परवानगीची आवश्यकता आहे. नानाला पूर्णतः खात्री होती की, महादजीला अशी परवानगी मिळणे शक्य नाही तर तिकडे महादजीला नानाच्या या चालीचा आगाऊ अंदाज असल्याने त्याने छत्रपतींची परवानगी काढण्यासाठी आपले हस्तक रवाना केले होते.  

             या ठिकाणी पेशव्यास बादशहाने दिलेले बहुमान स्वीकारण्यात नानाने जो विरोध दर्शविला त्याच्या कारणाची चर्चा न करता असा बहुमान पेशव्याने स्वीकारणे योग्य होते का हे पाहणे आवश्यक आहे. छ. शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचे तेज पेशव्यांच्या स्वराज्यात अजिबात उरले नव्हते हे स्पष्ट आहे. संभाजीपुत्र शाहूने मोगलांचे रीतसर मांडलिकत्व स्वीकारले होते. परिणामी, स्वराज्य हे स्वतंत्र राज्य न राहता मोगलांचे अंकित राज्य बनले. अर्थात, हे फक्त कागदावर जरी असले तरी कागदावरील शब्द सर्वच्या सर्व कधी व्यर्थ जात नसतात. आपण मोगल बादशहाचे नोकर ही भावना जशी शाहूची तशीच शेवटपर्यंत पेशव्यांचीही राहिली. असे असताना, मोगल बादशहाने पेशव्यांना ‘ महाराजाधिराज ‘ हि पदवी देऊन एकप्रकारे घटनात्मक पेच उभा केला. लौकिकात व व्यवहारात पेशवा हा छत्रपतीचा नोकर असून छत्रपती हा मोगल बादशहाचा ताबेदार ! आपल्या हाताखालच्या नोकरांना कोणते बहुमान वा पदव्या द्यायच्या याचा अंतिम निर्णय जरी बादशहाच्या मर्जीवर अवलंबून असला तरी आपल्या कृत्यामुळे होणाऱ्या राजकीय उलाढालींची त्याला काय कल्पना असणार ? त्याने पेशव्यास ‘ महाराजाधिराज ‘ म्हणून पदवी दिल्याने पेशवा आता छत्रपतींच्या बरोबरीचा किंवा वरच्या दर्जाचा अधिकारी बनला. हि राजकीय गुंतागुंत ना बादशहाच्या ध्यानी आली ना महादजीच्या ! या पदवीचा स्वीकार केल्यास राजमंडळातील व इतर मराठा सरदार निश्चितपणे दुखावले जाणार अशी नानाची अटकळ होती व थोडेबहुत झालेही तसेच. कार्यक्रम झाल्यावर पेशव्यांना नजरा करण्याचा कार्यक्रम झाला त्यावर मराठा सरदारांनी बहिष्कार टाकला.

        असो, विवेचनाच्या भरात आपण बरेच पुढे आलो. तर, अखेर नानाचा सर्व विरोध  बाजूला ठेवून ता. २२ जून १७९२ रोजी गारपीर येथे फर्मानबाडीचा समारंभ करण्यात येऊन त्यावेळी बादशाही पदे स्वीकारण्यात आली. याच वेळी महादजीने रीतसर पेशव्यांचे दुय्यम पद ---- म्हणजे वकील - इ - मुतलकीचे नायब मुनाबीची वस्त्रे स्वीकारली. आपल्या या कृत्याने किंवा राजकीय चालीने विरोधकांची तोंडे बंद केली. या समारंभाचे वृत्त निजामाच्या दरबारातील मराठी राज्याचा वकील गोविंदराव काळे यांस समजले. त्यावेळी ता. २ जुलै १७९२ रोजी त्याने नाना फडणीसला पत्र पाठवले, ते येथे समग्र देत आहे.

इ. सं. ऐ. टि. मा. १ ले. ९                                       दि. २ जुलै १७९२

   विनंती ऐसीजे
               राजश्री पाटील बावा जांबगांवीहून निघोन ज्येष्ठ व. अष्टमीस पुण्यानजीक खडकीच्या पुलावर येऊन मुक्काम केला. नवमी सह दशमी सायंकाळचे पाच घटका दिवस राहता श्रीमंतांचे दर्शन घ्यावयाचा मुहूर्त निश्चयात आला. इकडून श्रीमंत गणेशखिंडी पावेतो सामोरे गेले तिकडून पाटील बावा आपले बराबरील सरदार घेऊन आले. इकडील मुत्सद्दी मंडळी व सरदार मंडळींच्या व यांच्या भेटी झाल्या. नंतर पाटीलबावा येऊन श्रीमंतांचे पायावर डोई ठेऊन भेटले. श्रीमंतांनी आपले गळ्यातील मोत्यांची माळ पाटीलबाबांचे गळ्यात घातली. येणे प्रमाणे समारंभाने भेट बहुत चांगली झाली. या पूर्वी भेट झाल्याचे सरासरी लिहिले, तपशील समजावा सबब लिहिले असे म्हणोन आज्ञा.
                       त्यास श्रीमंतांचे ताले ( ग्रह ) विचित्र की असे बराबरीचे सरदार दिग्विजयी होऊन येऊन पायावर डोई ठेवून भेटतात. यांच्या आखबारा रुमशामपावेतो ( पूर्व रोमन बादशाही, इस्तंबूल व पश्चिम आशिया ) मिरवतात. या पुण्याईस जोडा नाही. वर्णन करावे ! याचा संतोष मोठा झाला. येथील मंडळीत आम्हास सांगावयास आर्त तेज बंदेगान अल्ली व मध्यस्थीस सांगितले. त्यासही खुषी झाली. जसे व्हावे तसे झाले. उचित ते घडले. आम्ही येथे पूसावयाचे स्थळ म्हणोन उमदे लहान थोर वर्तमान पुसतात सांगितले पाहिजे. यास्तव पुढे होईल त्याची वरचेवर लिहिण्यास आज्ञा होत जावी. रवाना चंद्र ११ जिल्काद हे विनंती.
                   …………… श्री मुबारक करो याहून पदव्या अधिक प्राप्त होतील.

                                                    श्री         
         विनंती ऐसीजे बादशाहाकडून वकील मुतलकी व अमीर उल उमराव म्हणजे मीरबक्षीगिरी यांचा बहुमान आणिला आहे तो घेण्याविषयी राजश्री पाटील बाबांनी विनंती केली. त्यावरून घ्यावयाचा निश्चय झाला. डेरा देऊन फर्मानवाडी ( दरबार डेरा, वस्त्रे स्वीकारताना भरवलेला तंबूतील दरबार ) वरून, आषाढ शुद्ध तृतीया शुक्रवारी तिसरे प्रहरीं श्रीमंतांची स्वारी डेरादाखल झाली. प्रथम पातशाही फर्मान मस्तकी वंदून मुनशीजवळ दिला. त्यांनी भर दरबारात वाचला. सर्वांनी श्रवण केला. यात गुलाम कादर याने बेअदबी केली. त्याचे परिपत्य बादशाही नोकर बहुत होते. परंतु कोणी केले नाही. श्रीमंतांचे सरदार महादजीराव शिंदे यांनी करून बंदोबस्त केला. याजकरिता हे पद पुस्त दर पुस्त ( वंश परंपरा ) दिले असे ये विषयी फार विस्तारे लिहिले. ते सर्वांनी ऐकिल्यावर वकीलमुतलकी व अमीर उल उमराची खिलत ( मानाचा पोशाक ) चारकुबा / चाकुबा ( बीन बाह्यांचे लांब जाकीट ) व जिगा ( एक दागिना ) शिरपेंच व परिंदा कलगीमय लटकन व माळा मरवारींद व कलमदान ढालतरवार व मोरचेल, नालकी ( कळस असलेला हौदा, दोन आडव्या दंडावर ठेवलेला ), पालखी झालदार, शिक्के करार, व माही मरातब ( मत्स्य सोन्याचे दोन गोल मिळून होणारे ) तमनतोग हत्ती, घोडा समेत, बहुत आदरे करून घेतली. श्रीमंतांनी एकशे एक मोहोर पादशाहास नजर ठेविली. पाटीलबावांनी श्रीमंतांस एक्कावन्न मोहरा नजर डेऱ्यातच केली. तोफा व गाडद्याच्या सिलका ( सलाग्या,  बंदुकीचे बार ) झाल्या त्याजवर सरकार वाड्यात घेऊन सर्वांनी नजरा केल्या. राजश्री कल्याणराव कवडे व बाबाराव व कृष्णाजी देवाजी व आनंदराव रघोत्तमराव याजकडील यांनी नजरा केल्या व सर्वांनी आदाब ( नमस्कार ) बजाविली. समारंभ चांगला झाला. तुम्हास कळावयाकरिता लिहिले म्हणोन आज्ञा. ऐशिवाय पत्रे पाहून अति संतोष झाला आनंद कोठे माईना. पत्री विस्तारक किती ल्याहावा ? श्रीमंत वैभव झाली विचित्र पुण्याई कधी झाल्या नाहीत त्या रकमा चालून आल्या. श्री मुबारक करो व याहून पदव्या अधिक प्राप्त होतील, फर्माना येतील. गुलाम कादराचे पारपत्य कोणाच्याने जाले नाही, ते राजश्री माधवराव शिंदे यांनी केले. हे रक्कम आम्ही येथे बोलण्यात आणिली नाही. वाईट वाटावयाची कारणे पाटीलबाबांनी एक्कावन्न मोहरा नजर करून आदाब बजाविली येणेकरून येकनिष्ठपणाचे त्यांचे महात्म्य दिगंतरास गेले. खानदानास उचित ते त्यांनी केले. आपण व पाटीलबाबांनी आदाब बजाविली, मग राजश्री कल्याणराव व बाबाराव व कृष्णाजी देवाजी यांचा गुंता काय ? मार्ग पदाच्या स्वरूपाप्रमाणे घातला इतके न होते तर तितकेच उणे दिसते. पृथ्वीपति व इतर यवन व मराठे राजे यास आदाब कराव्या. त्यापरीस हे ब्राह्मण प्रभु सहस्त्र वाटे प्रशस्त पदास अदाब बजवावी लागती ठीक झाले. हाच मार्ग शेवटपर्यंत चालावा. आपले व पाटीलबाबांचे कारकीर्दीत ह्या गोष्टी भारी झाल्या. कीर्तीचे ध्वज झाले. हे आपल्यास व पाटील बावांस मुबारक असो. रवाना चंद्र २२ जिलकाद हे विनंती.

 विश्लेषण :-  या पत्रावर विश्लेषण करण्यासारखे फारसे काही नाही. फक्त या ठिकाणी एक - दोन गोष्टी नमूद करण्यासारख्या आहेत. बादशाही फर्मानात गुलाम कादरच्या अत्याचारांचा उल्लेख आहे, व त्याच्या अत्याचारांपासून बादशहा व परिवारास वाचवण्यासाठी कोणीही मोगल उमराव पुढे आला नाही याचा उल्लेख जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. हा उल्लेख आपल्यास अनुलक्षून असल्याचा निजामाचा ग्रह झाला नसल्यास नवल ! खर्ड्याच्या लढाईमागील हे एक कारण आहे. असो, यापुढील भागात आपण महादजी व नाना यांच्यातील वाद, महादजीचा मृत्यू, खर्ड्याची लढाई इ. मुद्द्यांची चर्चा करणार आहोत.    

                                                                            ( क्रमशः ) 

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ५ )


           स. माधवराव पेशव्याच्या कारकिर्दीत गाजलेली प्रमुख प्रकरणे म्हणजे घाशीराम कोतवाल, महादजी शिंदेने दिल्ली दरबारकडून मिळवलेली वकील - इ - मुतलकीची वस्त्रे स्वीकारण्याचा कार्यक्रम, नाना - महादजी वाद व सख्य, खर्ड्याची लढाई, दुसऱ्या बाजीरावाशी चोरून ठेवलेले संधान इ. यांशिवाय आणखीही कित्येक घडामोडी आहेत पण त्यांचा व पेशव्याचा तसा थेट संबंध येत नसल्याने व त्या प्रकरणांत पेशवा निव्वळ नामधारी प्रमुख असल्याने त्या बाबींचा या ठिकाणी उल्लेख करणे अप्रस्तुत आहे.
 
           घाशीराम कोतवाल :-  घाशीराम कोतवाल विषयीचे एक विस्तृत पत्र ‘ मराठ्यांचा इतिहास : साधन परिचय ‘ या ग्रंथात प्रकाशित करण्यात आले असून तेच या ठिकाणी समग्र देत आहे.
  
ऐ. टि. मा. १ ले. ४०                                        २ नोव्हेंबर १७९१

  वडिलांचे सेवेसी सा। नमस्कार
  विज्ञापना ऐसीजे. पुण्याहून पस्तीस असामी तैलंग ब्राह्मण आपले देशास जाण्याकरिता निघोन घासीराम कोतवाल याचे तळ्यावर गेले आणि सायंकाळचे चार घटका दिवसास स्वयंपाक करावयास लागून अस्तमान दोन घटका रात्रीस भोजन केले. नंतर चार घटका आटपाआटप करावयास लागली तो इतक्यात कोतवालाचे प्यादे त्यांचे पेठेतून पाचसात प्यादे जाऊन तितक्या ब्राह्मणास भवानी पेठेतील चावडीस आणून एका खणाचे भुयार आहे त्यात पस्तीस आसामी कोंडिल्या त्यात वारा जावयास जागा नाही. सबब, ब्राह्मण आत कोंडमारा होऊन एकवीस आसामी मृत्यू पावले. घातल्या पासोन तिसरे रोजी रा. मानाजी फाकडे चावडीजवळ राहतात. त्यास त्या भुयारात गलबा ( गडबड ) होऊ लागला हा कशाचा म्हणोन, आपणा खुद त्या भुयाराजवळ जाऊन कुलूप तोडवून पाहिले, आणि श्रीमंतास ब्राह्मण मेल्याचे वर्तमान सांगून पाठविले. नंतर श्रीमंतांनी चार प्यादे व एक कारकून चौकसीस पाठविला. तो इतक्यात घासीराम याणे वाड्यात येऊन विनंती केली जे कोमटी पंचवीस तीस आसामी माझे तळ्यावर येवून राहात आणि शहरात चोऱ्या करीत होते. त्यास धरून आणून ठेविले.
                त्यांणी अफू खाल्ली तेणें करून मृत्यू पावले आज्ञा जाहल्यास मूठमाती देतो. उत्तर जाहले जे चौकशीस कारकून गेला आहे. तो आल्यानंतर सांगे ते सांगू. असे बोलून चिंचवडचे देवास पुलापलीकडे सामोरे गेले. तेथून स्वारी फिरोन बेलबागेत आल्यावर घासीरामाने गाठ घालून गैरवाका समजावून मूठमातींची परवानगी घेतली. आणि आपले घरास गेला. इतक्यात श्रीमंत राजश्री रावसाहेब ( स. मा. पेशवे ) यांनी श्रीमंतास ( नाना फडणीस ) बोलावू पाठविले.  वाड्यात गेले तेव्हा रावसाहेब यांणी विचारले जे घासीरामाने ब्राह्मण मारिले, त्यास त्याची चौकी होऊन घासीरामाचे पारपत्याचे काय ठरविले ? उपरात आज्ञा होईल तसे करू म्हणोन बोलून घासीरामास बोलावू पाठविले. तो आला तो श्रीमंतही सरकार वाड्यातून आपले घरास आले, आणि वेदमूर्ती  भटजीतात्यास चौकशी सांगितली त्यांणी कोतवाल मजकूर यास ब्राह्मण कशाकरिता कोंडिले व मरावयाचे कारण काय ? जे खरे असेल ते सांग, असा प्रश्न केला. तेव्हा त्याणे उत्तर केले, जे चोर म्हणोन कोंडिले. ते अफू खाऊन मेले. यात माझे काही कृत्रिम नाही. असे म्हणत आहे तो रावसाहेबांचा निरोप आला जे त्याचे पारपत्य चांगले करावयाचे. याचे म्हणणे तो या प्रकारचे व श्रीमंत राजश्री नानांचे वाड्यापासी हजार पंधरासे ब्राह्मण मिळोन नाना प्रकारच्या वल्गना करू लागले.
      तेव्हा सर्वमजकूर भटजींनी श्रीमंताचे कानावर घालून कोतवालांच्या मुसक्या बांधून गाडद्यांचे पहाऱ्यात ठेविला. तरी तेलंगी ब्राह्म आतताईपणास न चुकत. हत्तीचे पायास बांधल्याशिवाय आम्हास आपले बिराडी जावयाचे नाही. नंतर वे।। राजश्री अय्याशात्री यांस ब्राह्मणाचे मध्यस्थीस घातले जे उदईक तुमचे म्हटल्याप्रमाणे याचे पारपत्य करतो. तरी ब्राह्मण न ऐकत शास्त्री यांचे आंगावरील वस्त्रे, धोतर नेसावयाचे सुद्धा झोंबून फाडिले, व श्रीमंताचाही निग्रह पाहून, प्रथम प्रहर रात्रीस हत्ती आणवून वर्ता ( वरती ) त्यास घालून बांधिला आणि सर्व शहर फिरवून पर्वतीजवळील रमण्यात नेऊन पायात बेडी घालून ठेविला. शहरातून फिरते वेळेस ब्राह्मणांनी कोतवालास पाच सात दगड मारिले. तेणेकरून काही डोकी फुटली होती व शंभर गाडदी चौकीस होते. नंतर दुसरे रोजी, भाद्रपद शुद्ध द्वितीय बुधवार प्रातःकाली, ब्राह्मण मागती दोन हजार पावेतो आजमासे जमा होऊन, श्रीमंतांचे वाड्यापुढे बहुतच गरगशा ( गोंधळ ) करू लागले. आणि बोलत जे त्यास जिवे मारल्या शिवाय आम्ही ऐकत नाही. व श्रीमंतांचेही म्हणणे त्यास जिंवे मारावयाचा त्याजवरून राजश्री बाळाजीपंत केळकर निसबत ( अधिकारात )  राघोपंत गोडबोले यांस रमण्यात पाठवून, त्याची बेडी तोडवून, उंटावर उंटाचे शेपटीकडे तोंड करून बांधून, कोतवाल चावडीस आणिला आणि पाच पाट काढून ( डोईचे केस पाच ठिकाणी कापणे ), शेंदूर डोकीत घालून पुन्हा उंटावर पूर्ववतप्रमाणे घालून आठी पेठा फिरवला, आणि गारपिरावर नेऊन सोडिला. आणि ब्राह्मणास सांगितले जे, तुम्हास पाहिजे तर सोडा किंवा मारा असे सांगून हवाली केला. त्याजवर दोन घटका दिवसात सायंकाळच्या राहता ब्राह्मणांनी धोंडे घालून मारिला. त्यास दहन करावयाची देखील परवानगी नाही, व कोतवाल मजकूर ( उपरोक्त ) याचा दिवाण बापूजीपंत व गोपाळपंत व केसोपंत भावे यांचे घरी चौक्या बसवून बेड्या घालून ठेविले आहेत. त्यांचेही पारपत्य यथास्थित चांगले करणार, व त्या देव माणसे ब्राह्मणास धरून आणावयास व कोंडून ठेवावयास जे होते त्यांची पारपत्ये शिरच्छेदाची करावी, असा श्रीमंतांचा मनोदय आहे. पुढे काय घडेल ते पाहावे, व कोतवाल मजकूर याचे घरची जप्ती मुलांमाणसांसुद्धा करून चौक्या बसविल्या आहेत. व दोघां लेकांस बेड्या घातल्या. याप्रमाणे येथे जाहले ते स्वामींस कळावया करिता लिहिले आहे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.  

          प्रसिद्ध इतिहास संशोधक वा. वा. खरे यांनी आपल्या ‘ नाना फडणवीसांचे चरित्र ‘ या ग्रंथात घाशीराम कोतवाल विषयी जी माहिती दिली आहे ती येथे देतो :-
 “ पुण्याहून द्रविड ब्राह्मण आपल्या देशास जाण्याकरिता निघोन असामी पसतीस श्रावण वद्य १४ रविवारी प्रहर दिवसास सायंकाळी घाशीराम कोतवाल यांचे बागात जाऊन उतरले. तेथे ब्राह्मणांनी कणसेमळ्यातील मक्याची दहा कणसे तोडली. त्यावरून माळ्याचा व त्यांचा कजिया जाहला. माळ्याने शिवीगाळ केली. त्यावरून ब्राह्मणांनी त्यास मारिले. त्याजवरून माळी फिर्याद घेऊन कोतवाल यांजकडे आला आणि सांगितले की, फितवेखोर चोर कोमटी वगैरे आहेत, मळ्यात दंगा करतात, मला मारिले, त्यांचे पारिपत्य केले पाहिजे, असे सांगितले. त्याजवरून कोतवाल याने पंचवीस प्यादे पाठवून ब्राह्मणास मारामार करोन बांधोन भवानी पेठेत त्याचा वाडा आहे तेथे भुयारामध्ये रविवारी प्रहर रात्रीस घातले. आता ( आत किंवा जाता ? ) जात ना, तेव्हा मारून घातले. रविवारची रात्र, सोमवारचा दिवस - रात्र, मंगळवारी भाद्रपद शु. १ प्रातःकाळी मानाजी फाकडे याजला वर्तमान कळले. ( ३० ऑगस्ट १७९१ ) त्यांनी तेथे जाऊन जबरदस्तीने कुलपे तोडून भुयार उघडून ब्राह्मण ओढून बाहेर काढले त्यात अठरा ब्राह्मण मेलेले ! तीन ब्राह्मणांस जीव मात्र होता. तेही वरती काढल्यावर सायंकाळी मेले, सहा ब्राह्मण मात्र वाचले. हे वर्तमान फाकडे यांनी श्री. राजश्री रावसाहेब ( पेशवे ) यांस सांगोन पाठविले. त्यांजवरून कोतवाल याजला बोलावून आणून पुसिले. त्याने सांगितले की, कोमटी वगैरे जातीचे फितव्यामध्ये काही होते व चोरीही करीत होते. ते बातमी पक्की लावून त्याजला पेठेत ठेविले. त्यांनी काही जणांनी अफू व सोमल खाउन मेले. असे कोतवाल याने नानांस समजाविले. नानांनी मेलेल्यास जाळण्याची परवानगी दिली. कोतवाल याने कारकून मुर्दे जाळावयास पाठविला. तो मुर्द्यांजवळ गेला. तेथे फाकडे बसले होते ते त्यास मुर्दे नेऊ देईनात. की, ‘ रावसाहेब यांची परवानगी आल्याशिवाय जाळू देत नाही. कोतवालाचे ऐकत नाही.’ साफ सांगोन कारकून याजला पाठविले आणि फाकडे यांनी आपला कारकून रावसाहेबांकडे पाठविला की, ‘ एकवीस ब्राह्मण मृत्यू पावले. कोतवाल जाळावयास नेतो त्यांस तूर्त मी नेऊ दिले नाही. याची चवकशी करावी.’ असे सांगोन पाठविले. त्याजवरून कोतवाल याला बोलावून आणून नानांनी पुसिले तेव्हा त्याने पहिल्यासाखे सांगितले. त्यावरून नानांनी त्याला चौकीमध्ये बसविले आणि चौकशीस कारकून पाठविला. तो मंगळवार चार घटका दिवसपावेतो हा मजकूर जाहला. तो हजार ब्राह्मण तेलंग मिळोन एकच आकांत केला ! नानांनी दरवाजा लाविला ! सहा घटका रात्र झाली. वे ११ (?) राजश्री अय्याशास्त्री यांस बोलावून आणिले. ते नानांचे वाड्यापुढे येताच ब्राह्मणांनी मारमार करून शास्त्रीबोवांची शालजोडी व पागोटे फाडिले ! नंतर वाड्यात गेले. नानांचे त्यांचे बोलणे झाले. याला पारिपत्य देहांत असे शास्त्रीबोवांनी साफ सांगितले. ब्राह्मणांचा कट बहुत ‘ कोतवाल याजला जीवे मारावे.’ तेव्हा मग रात्रीस हत्ती आणून त्याचे पाठीवर उपडा बांधोन चार पेठे फिरवून रात्रीस रमण्यामध्ये बेडी घालून चौकी देऊन ठेविला. तेथेही ब्राह्मण दोनशेपावेतो चौकीस राहिले ! बुधवारी प्रातःकाळी ब्राह्मण जमा झाले. रावसाहेबांचा नेट भारी की, यांचे पारिपत्य करून डोके मारावे. निकर्ष फार, तेव्हा मग बुधवारी दोन प्रहरी चावडीवर कोतवाल याजला आणून उंटावर बसवून अवघे शहर फिरवून सायंकाळी दोन घटका दिवसास भवानी पेठेच्या पलीकडे अदकोसावर नेऊन सोडला. बसला राहिला. हातास काढणी लावून म्हारांनी धरली होती. तो समागमे द्रविड ब्राह्मण होते. त्यांनी दगड उचलून मस्तकावर घालून जिवे मारिला. भृगुवारी कोतवालीकडील कारकुनास बेड्या फडणीस मजमदार ( मुजुमदार ? जमादार ?) यावेगळे सगळ्यांस घातल्या. दोघा लोकांसही ( लेकांस ? ) बेडी घातली. घराचीही जप्ती जाहली. कुंटणी कोतवाल याने ठेवल्या होत्या त्यांचे व माणसे कोतवालीकडील यांचे. हात, पाय, नाक, कान काढावे ऐशी बोलवा आहे. कोतवालाचे शरीरास आग नाही. अद्यापि पडले आहे. नदीत टाकले नाही.” ( संदर्भ :- ऐ. ले. सं. नं. ३३७४ )

         विश्लेषण :-  घाशीराम सावळादास प्रकरणी आजवर विपुल लेखन झाले आहे. त्यात नानाचे विरोधक व समर्थक यांनी आपल्याला जो हवा तो अर्थ ओढून ताणून काढलेला आहे. प्रस्तुत ठिकाणी आपणांस पेशव्याच्या सहभागापुरताच या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे हि घटना श्रावण मासाचा दक्षिणा समारंभ घडल्यानंतर घडून आली. दुसरे असे की, मानाजी फाकडेने हे प्रकरण धरून लावल्यामुळे स्वतः पेशव्यास यामध्ये दखल देणे भाग पडले. या ठिकाणी मानाजी शिंद्याची थोडक्यात माहिती देतो.
          
            मानाजी शिंदे उर्फ फाकडे हा महादजी शिंदेचा नातलग असून त्याचा आजोबा साबाजी शिंदे हा सरकारस्वारीसोबत नेहमी स्वाऱ्या - शिकाऱ्यांमध्ये सहभागी असे. पानिपतनंतर शिंदे घराण्याची सरदारी आपणांस मिळावी यासाठी मानाजीने प्रयत्न केला. महादजीला शिंद्यांचा वारस म्हणून मान्यता देणे दादाला गैर वाटत असल्याने त्याने मानाजीचा पक्ष उचलून धरला. तेव्हापासून मानाजी हा दादाचा पक्षपाती बनला. पराक्रमाच्या बाबतीत हा महादजीच्याच तोडीचा असून त्याच्या शौर्याच्या सन्मानार्थ त्यास ‘ फाकडे ‘ हा गौरवपर किताब देण्यात आला होता. बारभाई, विशेषतः महादजी व नानाच्या विरोधात मानाजीने कैक कारवाया केल्या, पण सालबाईच्या तहाने दादा जाग्यावर बसला तेव्हा मानाजीचे उपद्व्याप बंद झाले. त्यानंतर त्याने नानासोबत जुळवून घेऊन पुण्यातच आपला तळ ठोकला. मानाजीची हि हकीकत काहीजणांना अप्रस्तुत वाटेल पण त्या शंकेचे निरसन योग्य स्थळी करण्यात येईल.
     
          घाशीरामाने मेलेल्या ब्राह्मणांची माहिती मनाजीला कोणी कळवली वा कळली या तपशिलापेक्षा त्यास ती समजताच त्याने बेधडकपणे कोतवालाच्या वाड्यात शिरून त्या ब्राम्हणांची सुटका केली हे महत्त्वाचे आहे. घाशीरामाचा दरारा एवढा होता कि, मानाजी वा तत्सम इसमाशिवाय त्याने कोणाला जुमानलेही नसते. असो, घडला प्रकार समजताच मानाजीने थेट पेशव्याकडे निरोप पाठवून घडल्या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली. पेशव्याने हि बाब नानाकडे सोपवली. तोवर सर्व बातमी घाशीरामास समजून तो आपला जीव वाचवण्यासाठी नानाकडे निघालाच होता. त्याने घडला प्रकार जसाच्या तसा न सांगता विपर्यास्त मजकूर पेश केला. तेव्हा नानाने मृतदेहांचे दहन करण्याची कोतवालास आज्ञा केली. त्यानुसार कोतवालाचे कारकून मृत ब्राम्हणांचे देह ताब्यात घेण्यास गेले असता मानाजी आडवा पडला व जोवर पेशवे स्वतः या प्रकरणी लक्ष घालत नाहीत तोवर आपण मृतदेह ताब्यात देणार नाही असा उलट निरोप पाठविला. मानाजी फाकडे मध्ये पडल्याने नानाने परत एकदा घाशीरामाची चौकशी केली. परंतु, तो आपल्या जबाबावर ठाम राहिला. तेव्हा नानाने त्यास कैद करून चौकशीसाठी आपले कारकून रवाना केले. दरम्यान घडला प्रकार स. माधवाच्या कानी पडला. त्याने आपल्या अधिकारात चौकशी केली कि नाही याचा स्पष्ट उल्लेख खरे वा सरदेसाई करत नाहीत परंतु, घाशीराम हा गुन्हेगार असल्याची त्याची खात्री पटली असल्याने त्यास शिक्षा करण्याचा त्याचा निश्चय ठरला होता हे स्पष्ट आहे. अर्थात, या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे व त्या म्हणजे ---- (१) मानाजी फाकडेने पेश्व्यास या प्रकरणी निर्णय घेण्यास एक प्रकारे जबरदस्तीने भाग पडले व (२) नाना फडणीसचा सल्ला न घेता पेशव्याने स्वतंत्र वृत्तीने निर्णय घेण्याचे कृत्य केले.

           पेशव्याने घाशीरामास दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी झाली व प्रकरण तिथेच संपले. याविषयी खुद्द नाना फडणीसने ता. ११ ऑक्टोबर १७९१ रोजी साताऱ्यास बाबूराव आपट्यास लिहिलेल्या पत्रात पुढील मजकूर आहे :- “ कोतवालाचे पारिपत्याचा वगैरे मजकूर विस्तारे लिहिला त्यास कोतवालाच्या अपराध पातकांची पराकाष्ठा जाली, सबब पारिपत्य केलें. वरकड मजकूर सर्व लटके. लबाड व द्वेषी आहेत ते मनस्वी गोष्टी उठवितात. ही पुण्यांतील लोकांची रीत चाललीच आहे. “ नानाच्या या पत्रावरून असे दिसून येते कि, घाशीराम हा अन्यायी होता हे नानास माहिती होते पण काही कारणांस्तव त्याने त्याच्या अपराधांकडे दुर्लक्ष केले होते. अर्थात, पुण्यासारख्या राजधानीच्या शहरात कोतवालीचे काम करायचे म्हटल्यावर काही प्रमाणात गैर प्रकार हा चालणारचं. असो, या प्रकरणाने आजपर्यंत कित्येक लेखकांना एक प्रकारे विलक्षण असे वेड लावले आहे. मात्र, त्यातून नेमके असे तथ्य बाहेर न येता भलत्याच विषयांना / वादांना तोंड फुटले. असो, त्या वादात न शिरता प्रस्तुत ठिकाणी आपणांस उपरोक्त दोन गोष्टींची चर्चा करायची आहे. जर मानाजी शिंदे उर्फ फाकडेने नेट लावला नसता तर स. माधवाने या प्रकरणात जातीने लक्ष घातले असते का ? याचे उत्तर नकारार्थी मिळते. मानाजी मध्ये पडला नसता तर त्या ब्राम्हणांची कोतवालाने केव्हाच वासलात लावली असती. जरी नानाच्या कानी हि बाब गेली असती तरी कोतवालाच्या विपर्यास्त जाबाबाने तो समाधानी झाला असता व त्यानेही यात लक्ष घातले नसते. घाशीराम प्रकरणी नानाचे काही समर्थक असाही युक्तिवाद करतात की, मानाजी हा नानाच्या शत्रूपक्षातील -- रघुनाथरावाच्या गोतावळ्यातील -- असल्याने त्याने मुद्दामहून नानाला उणे पाडण्यासाठी या प्रकरणाचा उपयोग केला. यासाठीच मानाजीचे पूर्वचरित्र आधी देण्यात आले होते. जरी मानाजी दादाचा पक्षपाती असला तरी सालबाईच्या तहानंतर तो नानाचाच आश्रय घेऊन राहिला होता हे विसरून चालत नाही. मानाजी हा स्वतंत्र वृत्तीचा होता. त्याच्या सहवासात आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांमध्येही त्याच्याविषयी एक प्रकारचा भयमिश्रित आदर होता. घाशीरामाचे कृत्य त्याच्या कानी आले तेव्हा नानाला सांगण्यापेक्षा पेशव्याला त्याने यात लक्ष घालण्यास भाग पडून काही गोष्टी निश्चित साधून घेतल्या. (१) पेशव्याला आपल्या धनीपणाची जाणीव करून दिली. (२) पुणेकर व सर्वत्रांस पेशवा हा मुखत्यारीने कारभार पाहण्यास लायक आहे कि नाही हे दाखवून दिले. (३) यानिमित्ताने त्याने स्वतःला पेशव्याच्या नजरेत आणण्याचाही प्रयत्न केला. याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे मानाजीने यानिमित्ताने जो पायंडा पाडला त्याचा उपयोग पुढे दरबारी चर्चेत महादजीने नाना विरुद्ध केला.

           या प्रकरणातून पुढे आलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे स. माधवाने नाना फडणीसच्या विरोधात जाऊन स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचे दाखवलेलं धाडस होय ! प्रथम जेव्हा त्यांस या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्याने नेहमीच्या पद्धतीनुसार हे प्रकरण नानाकडे सोपवले. नानाने या प्रकरणी जो निवडा केला तो मानाजीस पटला नाही व त्याने स. माधवास परत एकदा निरोप पाठवून या घटनेची चौकशी करण्याची विनंती केली. तेव्हा एकप्रकारे पेशव्याचा निरुपाय झाला म्हणा किंवा त्याची उपजत चिकित्सक वा शोधकवृत्ती जागृत झाली आणि त्याने या प्रकरणी लक्ष घातले. त्यातून जे काही बाहेर आले वा घडले तो इतिहास आहे. पेशव्याच्या निवाड्याविरोधात जाण्याचे नानाने साहस केले नाही. कारण, असे काही करण्याची त्यास काही गरजही नव्हती. नानाच्या लेखी घाशीरामास तसेही फारसे महत्त्व नव्हते आणि त्याच्या बदली कामगार नाना जवळ मौजूद होते. दुसरे असे कि, पेशव्याला निर्णय फिरवण्यास लावण्याचे त्याचे सामर्थ्य निश्चित होते, नाही असे नाही, पण त्यानिमित्ताने त्यास आणखी एका राज्यक्रांतीस आमंत्रण नव्हती. नाना, तुकोजी व अलीबहाद्दर या त्रिकुटाच्या कारवायांनी त्रस्त झालेला महादजी शिंदे आता महारष्ट्रात सैन्यासह येणार होता. अशा वेळी पेशव्याची मर्जी रक्षण्यातच नानाचा निभाव होता. कारण, महादजीसारख्या जबरदस्ताचा पेशव्यास आधार मिळाला तर आपले दरबारातील स्थान धोक्यात येईल याची नानास पूर्णतः जाणीव होती. तेव्हा प्रसंग पाहून त्याने गम खाण्याचे धोरण स्वीकारले. पुढील इतिहास पाहता नानाचे हे धोरण कमालीचे यशस्वी झाल्याचे दिसून येते.
                                                                       
                                                                     ( क्रमशः )

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ४ )

            रियासतकार सरदेसाई यांनी आपल्या मराठी रियासत खंड ६ मध्ये सवाई माधवराव पेशव्याच्या दिनचर्येच्या काही नोंदी दिलेल्या आहेत. या नोंदी स. १७८६ ते १७८८ च्या दरम्यानच्या असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्या नोंदी खालीलप्रमाणे :-

   (१) ता. २८-६-१७८६ ची नोंद -  ‘ वानरासारखे एक कबू जनावर श्रीमंतांनी पाळलेले होते. ते मोकळे करून बकुळीच्या झाडावर सोडले. त्याजला हुसकूं लागले, तेव्हां तिसऱ्या मजल्यावरून खाली फरसावर पडला. वांचला. फारच खेळ चालला. गणेशपंत पेठ्याचा पुतण्या नमस्कारास येतो. त्याचे शरीर अत्यंत स्थूल वायुबद्ध आहे. त्याला दोन दिवस चौसोपीत किती एक प्रदक्षिणा घालवितात. श्रीमंतांचे पायास दरद झाला आहे,  त्यास इंग्रज पाद्री येऊन मलमपट्टी लावितो. गुरुवारी केशवभट तामसी याला इंग्रजाचे सोंग दिले. भटजी अनमान करुं लागला. त्याला रागें भरून शिव्या दिल्या. मग टोपी कुडती आणवून दोन घटका सोंग देऊन बसविले. भोजनसमयी केशवभटास मनस्वी बोलों लागले. श्रीमंत म्हणाले याला झुलपे, कल्ले, दाढी राखा.’

   (२) दुसरी एक नोंद - ‘ शिव्या मनस्वी देतात. उपाध्ये, जोशी व जवळची मंडळी यांस आईबहिणीवरून शिव्या, तोंडावर मारावे असे होत असते. भोजनसमयी मुसलमानी शब्द बोलतात. शिंदे, पोरगे यांच्या वज्रमुष्टीच्या लढाया लावितात. थकोन पडला तरी ढालाइताकडून सोटे मारवावे, बळेंच उभा करून लढवावे, नाकातोंडांतून रक्तें आली, तरी सोडूं देत नाहींत. दोनचार मुले दुखण्यास पडली आहेत. चौकी पाहऱ्यावरील लोकांस शिव्या द्याव्या, तोंडावर मारवावे. माणसे दिलगीर आहेत. कांही रुसूनही गेले. शिष्ट ब्राम्हण दर्शनास आला तर शिव्या द्याव्या. चिंचवडच्या देवास शिव्या दिल्या. स्नानसंध्येसमयीं आशीर्वादास व नमस्कारास लोक येतात, त्यांस दर्शन होत नाहीं. कोणी चांगले सांगितले तर ऐकत नाहींत, चांगले सांगेल त्याचा राग करावा, त्यास पेचांत आणावे. हलक्या गोष्टी सांगेल त्याजवर ममता करावी. दोनप्रहरी मुले घेऊन मनस्वी खेळ करावे. ओरडत असावे. दरबारास बसावयास कंटाळा. मुत्सद्दी मंडळीच्या थट्टा कराव्या. दरबारास झगा पोषाख करून येत नाहींत. लिहिणे, पढणे सोडून दिले. तिरंदाजी टाकिली. दौलतीच्या उपयोगी नीति किंवा प्राचीन गोष्टी ऐकत नाहींत. बाहेर लोक आपणाबद्दल चांगले वाईट काय म्हणतात त्याचा शोध करीत नाहींत. जवळ राहणारे झाडून दिलगीर आहेत. चित्तास येईल तें करितात. चांगले सांगेल तो लबाड.’

    (३) ‘ प्रातःकाळीं घोडे फिरावयास गेले होते. श्रीमंतांचा काळवीट सुटून पळाला व पर्वतीचे हरणांत जाऊन मिसळला. त्यास धरण्यासाठी सर्व हरणे दाणा खावयासाठी रमण्यांत जमविली. मागें स्वार उभे करून कोंडिली. झाडून गार्दी व चौकबंदीचे लोक प्रातःकालीं पुढे पाठवून आपण व तात्या हिराबागेंत भोजनास गेले. लोक पर्वतीवर चढूं लागलेले पाहून हरणें सर्व पहाड चढून पळून गेली. श्रीमंतांस वर्तमान समजतांच रागें भरून माघारे आले.’

              याव्यतिरिक्त पेशव्याच्या खासगी व सार्वजनिक जीवनाविषयी काही नोंदी सरदेसाई यांनी मराठी रियासत मध्ये प्रसिद्ध केल्या आहेत त्या खालीलप्रमाणे :-  

  (१) ता. १६-३-१७८६  ‘ हुताशनीचे दिवशी श्रीमंत दोन घटका रात्रीं दिल्ली दरवाजाचे बाहेर होळीजवळ येऊन, दर्शन घेऊन दरवाजाचे वर ते एक क्षण बसून तमाशा पाहून आंत गेले. दुसरे दिवशी प्रातःकाळीं चार घटका दिवसांत भोजन करून, तिरंदाजीचे दिवाणखान्यांत बसले. जवळचे बसणारे घरची मुले घेऊन आले होते. खेळ, तमाशे, बीन चार पांचशे पर्यंत होते. अगोदर वाघ बकरीचा खेळ जाहला. नंतर श्रीमंत पाणी प्यावयास उठोन गेले. समागमे मल्हारपंत भडभडे होते. मागती येऊन बसले. जेठींची लढाई लाविली. दोन घटका समतुल्य जाले. मग राहविले. दहा घटका दिवसपर्यंत खेळ जाहला. मग श्रीमंत उठले व मंडळी घरास गेली. खेळांत पुढाईत बाळाजीपंत ठोसर व बाळाजीपंत केळकर हे होते. रात्री डफगाणे, चार फड आणिले होते. पांच जण पोरे होते. त्यांत एक चांगला होता. श्रीमंत भोजन करुन तिसरे घटकेस चांफेखणांत आले. अमृतराव पेठे, बाळाजीपंत लेले, मोरोबा फडके, खंडेराव त्रिंबक, खंडो अनंत, शिदोबा नाईक थत्ते, जनार्दन राम वगैरे मंडळी होती. पांच सात सोंगे प्रहररात्रपर्यंत जाहली. श्रीमंत उठोन निद्रेस गेले. वरकड मंडळी सवेंच गेली. होळीचे अगोदर गांवांत कोणी खटखट न करी अशी ताकीद पेठोपेठी केली. वद्य तृतीयेस रात्री भवानीपंताचा खेळ वाड्यांत जाहला. दोनतीन पोरे नाचणार व मागे डफगाणे. सोंगे कांही चमत्कारिक नव्हती. काल सकाळचे पोरांचे खेळांत दोन ठिकाणी कजिया झाला. बुधवारचे हौदाजवळ द्राविड ब्राह्मण जात होते त्यांचे अंगावर पोरांनी शेण टाकिले. ते शिव्या देत. पोरें अनिवार, अधिक धूळ टाकिली. एक दोघांस धोंडे लागले. रडत निघाले. कोतवालांनी समजूत घालून वाटेस लाविले. जोगेश्वरीजवळ तेलंगी ब्राह्मणांस धक्काबुक्की केली.’

  (२) काल रंगपंचमीचे दिवशी श्रीमंत सासुरवाडीस बाळाजी नाईक थत्ते यांजकडे भोजनास गेले. सौ. रमाबाई अगोदरच गेली. नंतर श्रीमंत प्रहर दिवसा घोड्यावर बसून दिल्ली दरवाजाने समागमे मंडळी घेऊन गेले. भोजन होऊन थत्ते यांनी श्रीमंतांस पोषाख दिला. परत घोड्यावर बसून गणेश दरवाजाने आंत आले. तिसरा प्रहरां रंग केला. मजलस गणपतीचे दिवाणखान्यांत. कलावंतिणीचे दोन तीन ताफे होते. मंडळीस अगोदर बोलावणी केली तेही आले. चार घटका नाच होऊन मग रंगास प्रारंभ केला. श्रीमंतांनी आपले हातें चिरकांडीने कार्याकरण मंडळीचे अंगांवर घातला. नंतर रंगाची व गुलालाची रेल जाली. अंग व पोषाख भिजून चिंब झाली, येथपर्यंत रंग खेळले. रात्री खेळ करावयास सांगितले. रास्तेखेरीज अवघे गुरुजीबावा सुद्धां आले होते. खेळ, डफगाणे, पोरांचा नाच, गोविंदांची सोंगे सहा घटकांपर्यंत जाली. मग श्रीमंत निद्रेस गेले. असा पांच दिवस खेळ जाला. महादु सुताराने लांकडांची बाहुली कळासूत्री व सूर्याचा रथ केला तो दिल्लीचे कळासूत्री मजालसीचा चांगला जाला. शाहीरही गाणारे चांगले आले होते. सोंगांत भवानीपंताचे सोंग, एक दाईचे व दुसरे मोगलाचे हीं सरस जालीं. गोविंदांपैकी एक गणपतीचे व दुसरे मुरळीचे. राणूपैकी तपकिरीची नक्कल व सुतारापैकी सूर्याचे, याप्रमाणे पांच दिवस तमाशा जाला.’

     विवेचन :- वर जे काही उतारे दिले आहेत ते आणि या लेखमालिकेच्या गेल्या भागात गोपिकाबाईचे जे उपदेशपर पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यांचे मनन केले असता असे स्पष्टपणे दिसून येते कि, एक ब्राम्हण घराण्यातील मुलगा या दृष्टीने आवश्यक ते सर्व शिक्षण माधवास मिळेल याकडे नानाने लक्ष पुरवले असले तरी एक पेशवा म्हणून जी त्याची जडण - घडण होण्याकडे नानाने जशी देखरेख पुरवायला हवी होती तशी पुरवली नाही. गोपिकाबाई बाल पेशव्यास आपले वर्तन कसे आखीव - रेखीव हवे हे पत्राद्वारे कळवते तर नाना फडणीस, बाल पेशव्याच्या स्वैर वर्तनास दुर्लक्ष करून एकप्रकारे प्रोत्साहन देत होता. याचा अर्थ काय होतो ?

       मराठी रियासत - खंड ७ मधील पुढील उल्लेख या पार्श्वभूमीवर मननीय आहे :-
“ या पेशव्यास घरकोंबडा करून हलक्यांच्या संगतींत कडक बंदोबस्ताने ठेविले हा प्रकार खुद्द गोपिकाबाईसही आवडला नाही. ‘ स. १७८८ मध्ये माधवराव मातुःश्री बाईसाहेबांस भेटण्यास हरिपंताबरोबर गेला, तेव्हां बाई हरिपंतास म्हणाली, याच्याजवळ कारकून वगैरे लहान माणसें ठेवून बंदोबस्त करितां, तुमचे परवानगीशिवाय कोणीं येऊं नये, भेटूं नये, असें करितां, त्यास यांणीं शहाणें कधीं व्हावें ? नाना किंवा किंवा तुम्ही एकजणाने, अगर दुसरा कोणी मातबर रास्ते यांजसारिखा यांजवळ नेहमी असावा,’ असे बोलणें बहुत प्रकारें घडलें. दोन महिने राहवें असें असतां तात्यांनी सारे बोलणे समेटून पुण्यास घेऊन आले.”

    विश्लेषण :-  वरील परिच्छेदातून काय ध्वनित होते ? गोपिकाबाईने स. माधवरावास जे उपदेशपर पत्र पाठविले होते ते, वास्तविक कारभाऱ्यांना -- म्हणजे हरिपंत फडके व नाना फडणीस या दोघांना उद्देशून होते. जरी त्या पत्राचा मुख्य रोख स. माधवाने कसे वागावे असा असला तरी त्यास त्या प्रकारचे शिक्षण देण्यात यावे अशीच गोपिकाबाईने सूचना केली होती. मात्र, म्हातारीची हि सूचना मनावर घेण्याची नाना व हरीपंतास फारशी गरज भासली नाही. याचे प्रत्यंतर स. १७८८ च्या स. माधवराव व गोपिकाबाईच्या भेटीत आले. कारभाऱ्यांनी व आपल्या नातवाने आपल्या सर्व उपदेशाची, सूचनांची पायमल्ली केल्याचे तिच्या लक्षात आले. यावेळी तिच्या समोर दोन पर्याय होते. पहिला म्हणजे, स्वतः पुण्यास येउन पेशव्याच्या स्वच्छंदी वर्तनावर दाब ठेवून तसेच कारभाऱ्यांना आळ्यात ठेवून स. माधवरावामध्ये धनीपणा निर्माण करणे. किंवा दुसरा, जे चालले आहे त्याकडे दुर्लक्ष करणे. माझ्या मते, गोपिकाबाईने पूर्ण विचारांती दुसरा पर्याय निवडला. नारायणरावच्या खुनानंतर झालेल्या राज्यक्रांतीची -- परिवर्तनाची जाणीव तिला झाली होती. सत्तेच्या वारूवर जरी स. माधव आरूढ झाला असला तरी त्याचा लगाम आता नानाच्या हाती होता हे तिला कळून चुकले होते. लौकिकात जरी गोपिकाबाई हि पेशव्याची आजी असली तरी व्यवहारात तिला आता कवडीचेही स्थान नव्हते. ती पुण्यात परतली असती तर तिची अवस्था पार्वतीबाईपेक्षा वेगळी झाली नसती हे तिने ओळखले.

      सवाई माधवराव राज्यकारभार करण्यास शक्य तितका उशीरा तयार होईल याकडे नानाचे विशेष लक्ष असले तरी इतर बाबतीत मात्र त्याने पेशव्यास मुक्त सोडले होते. व्यायाम, शिकार किंवा दरबारी उठण्या - बसण्यात कधी अडवले नाही. मात्र त्यास दरबारी कामकाजात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले नाही. याचे कारण म्हणजे, त्या त्याबाबतीचे शिक्षणचं देण्यात आले नाही. स. माधवरावाला सरकारी कागदपत्रांवर मखलासी करण्याचा आरंभ करण्यास मुळी स. १७९२ चा मे महिना उगवावा लागला. यावेळी पेशवा १८ वर्षांचा होता. थो. माधवरावाशी तुलना केली असता थोरला माधवराव याच वयात थोड्याफार स्वतंत्र वृत्तीने राज्यकारभार व स्वाऱ्या - शिकाऱ्या करू लागला होता.
     
        पेशव्याचा व इंग्रज वकिलांचा फार निकटचा संबंध आला. विशेषतः म्यालेट स. १७८६ पासून स. १७९६ पर्यंत दहा वर्षे पुण्यात तळ ठोकून बसला होता. त्याची व पेशव्याची प्रसंगोत्पात भेट होत असे. त्याची नोंद त्याने आपल्या रोजनिशीत केली असून त्यातील काही भाग सरदेसाई यांनी आपल्या मराठी रियासत मध्ये प्रसिद्ध केला आहे तो या ठिकाणी देत आहे :-

       (१) पेशव्यासोबत झालेल्या पहिल्या भेटीचे म्यालेट लिखित वर्णन - ‘ आम्ही ७ मार्च १७८६ रोजी सायंकाळी पाच वाजता वाड्याजवळ आलो. आमच्या सन्मानार्थ घोडेस्वार व पायदळाच्या रांगा उभ्या केल्या होत्या. बहिरोपंताने पुढे येऊन आम्हांस दिवाणखान्यांत नेले. आंत पाऊल टाकतांच कित्येक अधिकारी पुढे सामोरे आले. आम्ही क्षणभर उभे असतांच पेशव्यांची स्वारी आंत आली. मी त्यांस सलाम केल्यावर त्यांनी छातीस छाती लावून भेट दिली. नंतर ते गादीवर बसले. मी बरोबरच्या मंडळीसह खाली गालिच्यावर बसलो. एकमेकांचे कुशल प्रश्न झाल्यावर मी गव्हर्नर जनरल कडून आणलेली थैली त्यांचे हाती दिली ; आणि त्यांचे स्नेहभावाचे निरोप तोंडी सांगितले. माझे म्हणणे त्यांनी आदराने ऐकून ग. ज. ची खुशाली विचारली, आणि ‘ आपल्या येण्याने आम्हांस मोठा आनंद झाला,’ अशी भाषणे केली. हे भाषण संपल्यावर मी त्यांस माझ्या नेमणुकीचा हुकूम दाखविला, तो त्यांनी कारभारी गणेशराव यांजकडून वाचून घेतला. नंतर मी पेशव्यांस देण्याच्या वस्तू आणल्या होत्या त्या मागवून पुढे ठेविल्या. त्यांतले घोडे व गाडी त्यांस फार आवडली. हे नजराणे गुदरल्यावर भेट संपली. हा बालपेशवा अंगाने सडपातळ आणि अकरा वर्षांचे वयास लहानच दिसतो. चेहरा विशेष सुंदर किंवा पाणीदार नाही, तथापि तरतरीत व बुद्धिमान दिसतो.’

      (२) मराठी कागद पत्रांत वरील घटनेचा तपशील दिला आहे तो पुढीलप्रमाणे :- ‘ फाल्गुन शु. ८ सोमवारी सायंकाळचे ६ घटका दिवसास म्यालेट श्रीमंतांचे भेटीस आला. बरोबर दहा असामी होते. तिरंदाजीचे दिवाणखान्यांत बैठक केली. ताजीम देण्याचा पेंच पडूं नये म्हणून वकील अगोदर दिवाणखान्यांत आले, आणि अमृतराव पेठे यास भेटत आहेत तोंच श्रीमंत आंत गेले. श्रीमंतांस एकजण मुख्य तो मात्र भेटला. दोन घटका बसले. बारगीर व गाडदी हजार पांचशे उभे करून बंदोबस्त चांगला केला होता. श्रीमंतांनी मालेटास हिंदुस्थानी बोलीने पुसिलें, तुम्हांस कलत्त्याहून यावयास किती दिवस लागले. उ० पंचविसावे दिवशी मुंबईस आलों. त्यानें अर्ज केला, दया असावी. कागद थैल्या तीन होत्या, त्यांतील एक फोडून कागद पारसनीसांकडून वाचविला. मग विडे दिले आणि प्रथम श्रीमंत उठोन गेले. नंतर वकील गेला.’           
                                   
   *      सवाई माधवरावास मर्दानी खेळांची व प्राणी पाळण्याची देखील हौस होती. पेशव्याने स्वतः शिकारखान्याच्या कामदारास लिहिलेल पत्र पुढीलप्रमाणे :-
 ‘  हरणाचा मजकूर आपाजीपंत गोडबोले यांचे पत्रांत लिहिलाच आहे. स्वारीपूर्वी धरऊन फत्तेचे वर्तमान व मर्दनेचे माप लवकर पाठवा. कालापहाडची गांठ कशी आहे. वरकड हरणे आजारी होतीं तीं नांवनिशीवार लिहून पाठवा. अकडबाज रोड आहे कीं ताजा आहे, आणि काळा आहे तितकाच आहे कीं अधिक उणा जाला तें लिहा. रात्रीस हरण सोडीत असतात, त्याचे बरगडीवर गांठ आहे ती बरी झाली कीं नाहीं, इत्यादि सर्वांचे आजार नांवनिसीवार लिहा. माणीक हरणाचीं हाडें गणेश खिंडीत ठेविली आहेत, तीं कोणास न कळतां काढऊन शिकारखान्याचे गड्याबरोबर येथें पाठवावी. चिरगुटांत पक्की बांधून गुप्त पाठवावीं. अकडबाज थोडासा रोड जाला म्हणून लिहिले त्यास मुढी चारितात, त्यांत वेलदोडे थोडेसे अधिक टाकावे, व थोडेंसें लोणीही खावयास देत जावे. बेडक्या ताटकीसिंगाचे गांठीवर सयदअलीस पुसोन डाग द्यावा. थोरला लक्ष्मी चिपाटा आजारी आहे त्यास होईल तो उपाय करावा. मग ईश्वरसत्ता. पागेंत हरण फिरतात, त्यांतून एकानें उडी टाकिली, त्याचे पायबीय नीट पहा. काला पहाड व अकडबाज ताजे राखावे. पोलेचुबा व हरण गंजीवर येऊन दाणा खातो, त्यास त्याला हुसकून लावावा, हरण्यांत दाणा खावयास देऊं नये.’

       *      मेजर प्राइसने पेशव्याची हि पशुशाला  स. १७९१ मध्ये पाहून तिचे वर्णन लिहिले आहे ते पुढीलप्रमाणे :- ‘ या ठिकाणी उत्तमोत्तम नमुने मुद्दाम आणून पाळलेले होते. एक सिंह व एक गेंडा मला इतके आवडले कीं जणूं काय ते आपल्या रानांतच विहार करीत आहेत असें दिसलें. तो पशुराज तर अत्यंत तेजस्वी व स्वच्छ दिसत होता. उघड्या जागेंत खांबास सांखळीनें बांधून त्यास ठेवलेलें होतें. त्याचें खाणें व निगा अत्यंत दक्षतेनें ठेवलेली मला आढळली. गेंड्याची तरतरी पाहून तर मला जास्तच अचंबा वाटला. वाघ वगैरे दुसरीं अनेक जनावरें तेथें होतीं, पण या दोघांच्या पुढें तीं तुच्छ वाटत. या बागेंत हरणें व काळवीट यांचे कळप बाळगलेले होते. त्यांस वाद्यांच्या नादावर झोंपाळ्यावर बसून झोके घेण्यास शिकविलेले होते.’                 

               *            स. १७९२ मध्ये सर चार्लस म्यालेट याला पेशव्याने मुद्दाम एकदां हा हरणांचा खेळ दाखविला होता. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे :- ‘ आम्ही दोन वाजतां तंबूंत येऊन बसलों. समोर दोन झोंपाळे बांधलेले होते, त्यांजवर तीन काळवीट वाद्यांचे सुरावर पावले टाकीत पुढें आले. दोन त्या झोंपाळ्यावर बसले व एक खाली सत्रंजीवर निजला. नंतर वाद्यें बंद झालीं आणि कांहीं नाचणारणी मंजूळ आवाजाने नाचत त्या काळविटांपुढे आल्या. नंतर चवथा काळवीट मागें लाजून बसला होता, तो पुढे आला. पुढे एका नोकराने झोंकें देण्यास सुरुवात केली. थोड्या वेळाने त्या म्होरक्या काळविटाचे शिंगांवर माळ घालण्यांत आली. तेव्हां ते सर्व निघून परत गेले. पेशव्याने मला सांगितले, ‘ हा खेळ आज सात महिने या जनावरांस शिकविण्यांत येत आहे.’

                        *          स. १७९४ मध्ये रॉबर्ट मेबोनने स. माधवाच्या मर्दानी खेळातील कौशल्याचे पुढील शब्दांत वर्णन केले आहे :-   ‘ परशुरामभाऊशीं बोथाटी खेळतांना या तरुण पेशव्याचे कौशल्य पाहून मला मोठे कौतुक वाटले. पर्वतीच्या खालील विस्तीर्ण पटांगणांत हा खेळ चालत असे. सभोवार शिबंदीची व इतर लोकांची मोठी गर्दी जमली होती. मध्यभागी लहान दगडांची एक उंच रास करीत. पेशवा हातांत भाला घेऊन घोड्यावर दोनतीन चकर भरधाव करून भाल्याच्या टोंकानें ती रास कोसळून पाडी. भाल्याच्या टोंकास लाल फडक्याचा एक लहानसा चेंडू बसविलेला असे. पेशव्यानंतर परशुरामभाऊने तसाच भरधाव घोडा फेकून दगडाच्या राशीवर चाल केली, पण त्याच्याने दगड पाडवले नाहींत. दुसऱ्या कित्येकांनी प्रयत्न केला, पण त्यांसही तें साधले नाही. नंतर पेशवा व दुसरा एक यांची घोड्यावरूनच पकडापकड सुरु झाली. पेशव्याने प्रतिपक्षास भाल्याने घोड्यावरून पाडण्याचा प्रयत्न केला ; आणि थोड्याच अवकाशांत त्याने त्यांस खालीं आणिलें. हें त्याचे घोड्यावरचे नैपुण्य अप्रतिम होते. ‘
            
                विश्लेषण :-    शिकार, मैदानी खेळ, सण - समारंभ इ. गोष्टी या पेशव्याच्या खासगी आयुष्याशी निगडीत असल्याने त्यांना या स्थळी फारसे महत्त्व देता येत नाही. वस्तुतः या नोंदी या ठिकाणी देण्याचेही विशेष असे काही प्रयोजन नव्हते. पण या नोंदी एका महत्त्वाच्या गोष्टीचा पुरावा आहेत व तो गोष्ट म्हणजे नाना फडणीसने पेशव्याच्या राजकीय शिक्षणाकडे केलेलं अक्षम्य दुर्लक्ष हे होय ! नानाचे समर्थक काहीही म्हणोत, पण स. माधवराव हा राज्यकारभार करण्यास लायक होऊ नये याची नानाने विशेष खबरदारी घेतली होती असेच सिद्ध होते. परराष्ट्र दरबारातील वकिलांच्या भेटीच्या वेळी नाना सांगेल त्यानुसार हा पेशवा वकिलांच्या भेटी घेत असे. पेशव्याच्या सर्व हालचालींवर नानांचे नियंत्रण असल्याचे साफ दिसून येते. राज्यकारभार हाती नसल्याने स. माधवराव शिकारखान्यातील आपल्या प्राण्यांना प्रजा समजून त्यांचे संगोपन करत बसला तर त्यात नवल काय ? ज्याने प्रजेची काळजी करावी तो कोणत्या हरणाला काय खायला घालावे आणि काय नाही याची सूचना देत बसला आहे. कोणत्याही इतिहास अभ्यासकाने जर वरील नोंदी वाचल्या तर तो स. माधवरावास सरळसरळ नादान असेच म्हणेल. पण एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे कि, या पेशव्यास निष्क्रिय बनवण्यात नाना फडणीस कारणीभूत होता. असो, मैदानी खेळातील पेशव्याचे प्रभुत्व पाहता आणि शिकारखान्यावरील त्याचे बारीक लक्ष पाहता असे लक्षात येते कि, जर त्यास योग्य व्यक्तींचा सहवास आणि साथ लाभली असती तर हा नक्कीच एक कर्तबगार पेशवा बनला असता. याविषयीचा पुरावा महादजी शिंदेच्या पुणे मुक्कामातील दरबारी नोंदीत मिळतो. महादजीने स्वतःहून पेशव्यास नानाची बंधने झुगारण्यास भाग पाडल्याचे दिसून येते. पण दुर्दैवाने महादजीच्या निधनानंतर पेशवा परत नानाच्या जाळ्यात अडकला आणि त्यातच गुरफटून गेला.

                  अडचणीच्या वेळी नाना पेशव्याच्या आडून आपला बचाव कसा करून घेत असे याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्राम्हण - प्रभू वाद होय ! वास्तविक नारायणराव पेशव्याच्या कारकिर्दीत नारायणाने या वादात ब्राम्हणांची बाजू घेऊन प्रभूंना शुद्र ठरवले होते. परंतु, त्यामुळे हा वाद निकाली निघाला नाही. स. १७८८ मध्ये प्रभूंनी या विषयी नाना फडणीसकडे दाद मागितली. नाना फडणीसने त्यांना पेशव्याकडे फिर्याद करण्याचा सल्ला दिला. वस्तुतः यावेळी रामशास्त्री, अय्याशास्त्री सारखे विद्वान पंडित पुणे दरबारी होते. रामशास्त्री तर न्यायाधीश होता. त्याशिवाय ब्राम्हण - प्रभू वादाची जेवढी माहिती रामशास्त्री व नानाला होती तेवढी १४ वर्षांच्या स. माधवास कोठून असणार ? ज्या स. माधवरावास महालांच्या जमाखर्चाच्या नोंदी पाहून त्यावर मखलाशी करण्याचे माहिती नाही तो ब्राम्हण - परभू वादावर काय निर्णय देणार ? यातून एकच निष्कर्ष निघतो की, पेशवा राज्यकारभारास कसा नालायक आहे व आपण असलो तरचं राज्याचा निभाव लागेल हि भावना जनसामान्यांची व्हावी असाच नानाचा प्रयत्न चालला होता. नाहीतर या काळात राजकीय आघाडीवर कित्येक मोठ - मोठी प्रकरणे चालली होती. त्यांमध्ये निवडा करण्याची जबाबदारी नानाने पेशव्यावर का सोपवली नाही ? तुकोजी व अलीबहाद्दर याच काळात महादजीसोबत फटकून वागत होते. दिल्लीच्या राजकारणातून शिंद्याला माघार घ्यावी लागली होती. याचे राजकीय परिणाम काय होतील हे न समजण्याइतका नाना काही नवखा मुत्सद्दी नव्हता. लांब उत्तरेत कशाला, दक्षिणेत टिपूचे वाढते प्रस्थ कमी करण्यासाठी निजामाच्या जोडीला इंग्रजांच्या गळ्यात गळे घालताना नानाने पेशव्याला काही सल्ला विचारला होता का ? किंवा याविषयी त्याचे मत काय आहे याची चाचपणी केली होती का ? सारांश, राज्यात इतक्या मोठमोठ्या घडामोडी सुरु असताना नानाने पेशव्याला लक्ष घालण्यासाठी ब्राम्हण - प्रभू वादाचे प्रकरण उपलब्ध करून दिले. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा ? अहिल्याबाई व तुकोजी हे होळकरी दौलतीचे अनुक्रमे मालक व सेवक ! या दोघांमध्ये चाललेल्या शीतयुद्धास मिटवण्यासाठी स्वतः नाना स. माधवास घेऊन नर्मदापार माळव्यात गेला असता तर होळकरांचे घरचे भांडण मिटून राज्यालाही फायदा झाला असता आणि महाराष्ट्राबाहेर पेशव्याचे पाऊल पडून बाह्य जगाचे त्यास प्रत्यक्ष ज्ञान झाले असते. राज्यकारभार करण्यासाठी पेशवा पुण्यात जाग्यावर असलाच पाहिजे असा काही दंडक नव्हता. किंवा नाना ऐवजी हरिपंत वा पटवर्धन मंडळी स. माधवासोबत उत्तरेत जाऊ शकत नव्हती अशातलाही भाग नव्हता. मग नानाने हे का टाळले असावे ? प्रवासांत फितूर वा दगा फटका होण्याचा धोका होता असे म्हणावे तर राज्यकर्त्यास असा धोका कधी नसतो ? पुण्यात -- शनिवारवाड्यात अजिबात फितूर होत नव्हते असे कोणी म्हणू शकते का ? तात्पर्य, स. माधवराव हा राज्यकारभारास लायक बनूच नये अशाच तऱ्हेची काळजी नानाने घेतली होती असे मोठ्या खेदाने नमूद करावे लागते.
                                                                                        ( क्रमशः )

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - ३ )


                    परकीय व स्वकीय शत्रूंना तोंड देण्यात नाना गुंतला असला तरी बाल पेशव्याच्या संरक्षणाकडे त्याचे अजिबात दुर्लक्ष झाले नव्हते. शेवटी पेशव्याच्या जीवावरच त्याच्या सर्व उड्या होत्या ना ! स. १७७६ मध्ये इंग्रजांसोबत पुरंदर येथे तहाची वाटाघाट चालली त्यावेळी इंग्रज वकील व पेशव्याच्या भेटीचा प्रसंग उद्भवला. यावेळी पेशवा सुमारे पावणेदोन वर्षांचा होता. अपरिचित वस्त्रांतील माणसे पाहून तो घाबरेल म्हणून प्रत्यक्ष भेटीआधी इंग्रजी पोषाखातील लोकांचा वावर मुद्दाम त्याच्याभोवती ठेवण्यात आला होता. यांमुळे इंग्रज वकील अप्टनच्या भेटीचा प्रसंग निभावून गेला. स. १७७७ मध्ये सवाई माधवाची आई -- गंगाबाई -- हिचे निधन झाले. तिचा मृत्यू तसा अकस्मात असाच होता. गंगाबाई जरी नवज्वराने मरण पावली असे अस्सल कागदपत्रांच्या आधारे सांगितले जात असले तरी ती नवज्वराने न मरता तिने आत्मघात केला वा तसे करण्यास तिला भाग पाडण्यात आले असेही अस्सल कागद पत्रांतून आढळून येते. असो, ३ वर्षाच्या मुलास हा मातृवियोग सहन करावा लागला. अर्थात, आईच्या भेटीची इच्छा त्याने व्यक्त केली असता  काहीतरी कारण सांगून त्यांस गंगाबाईचा विसर पाडला जात असे. कारण ; तीन वर्षांच्या बालकास ‘ मनुष्य मरतो म्हणजे नेमके  काय होते ‘ हे थोडी समजणार ? गंगाबाईच्या निधनानंतर इंग्रजांचे पुण्यावर आक्रमण होण्याचे चिन्ह दिसू लागले परंतु, स. १७७९ च्या आरंभी तळेगाव - वडगाव येथे इंग्रजांची कोंडी झाल्याने त्यांनी माघार घेतली. यावेळी मराठी सत्तेचे राजकीय महत्त्व व लष्करी बळ इतर सत्ताधीशांच्या नजरेस आणून देण्यासाठी नानाने स. १७७९ च्या २१ एप्रिल रोजी पर्वती येथे मोठ्या समारंभाने बाल पेशव्याच्या मुंजीचा कार्यक्रम घडवून आणला. इकडे राजकीय आघाडीवर धामधूम सुरु असली तरी बाल पेशव्याच्या शिक्षणाकडे नानाचे दुर्लक्ष झाले नाही. तत्कालीन प्रघातानुरूप भावी पेशव्यास आवश्यक ते सर्व लिखापढीचे शिक्षण त्यास देण्यात आलेचं.  त्याशिवाय व्यायामाचीही त्यास हळूहळू तालीम देण्यात येऊ लागली.
                 स. १७८२ सालच्या अखेरीस सालबाईच्या तहाची वाटाघाट सुरु होऊन पहिले इंग्रज - मराठा युद्ध बंद झाले. तेव्हा नानाने पेशव्याच्या विवाहाकडे लक्ष पुरवले. दरम्यान याच सुमारास बहुतेक नानाच्या किंवा इतर कोणा मुत्सद्द्याच्या सल्ल्यावरून स. माधवरावाने आपल्या आजीसाठी पत्र लिहिले. त्यात वर्तणूकीसंबंधी उपदेश करण्याची त्याने विनंती केली. तेव्हा त्या पत्रास उलट उत्तर म्हणून म्हणा किंवा आपल्या राज्यकारभार करणाऱ्या नातवास उपदेश करण्यासाठी म्हणा, गोपिकाबाईने सुमारे १३ कलमी उपदेशपर पत्र लिहिले, ते खालीलप्रमाणे :-
काव्येतिहास पत्रे व यादी व लेख ३९३ (५९)            
                                                                              ८ जाने. १७८३
        श्रियासह चिरंजीव राजश्री माधवराव प्रधान यांसि प्रति गोपिकाबाई मुक्काम नाशिक आशीर्वाद  उपरी येथील कुल तागायत छ. ४ माहे सफर जाणून सकीय [ स्वकीय ] कुशल वर्तमान यथास्थित असे विशेष तुम्ही पत्र पाठविले ते पावले.
            “ मी लहान, वडिली ( आजीने ) सर्व त्याग करून श्रीक्षेत्री वास केला आहे. त्यास सर्व माहित वडिलांस, यास्तव कोणे रीतीने चालावे हे सर्व ल्याहावयास आज्ञा व्हावी.” म्हणोन लिहिले त्यास सूर्यग्रहण संधि अन्वये कृष्णपक्ष होऊन लोप जाहला होता ( सर्वोतोपरी वाईट दिवस होते.) तो हल्ली पुण्योदये करून दुष्टांचा संहार व सुष्टांचे पालग्रहणार्थ तुम्ही ( स. मा. ) या कुळात जन्म घेऊन पुरंदर येथे उदयास आला. त्यापक्षी इकडून लिहावयाचे कारण दिसत नाही. परंतु मानवी देह आणि तुम्ही लिहिले, त्यापेक्षा तूर्त चालावयाचे जे सुचले ते लिहिले आहे.
१  प्रातःकालचे घटका रात्रौ उठोन दिशेस जाऊन पादप्रक्षालन मुखप्रक्षालन करून दिवाणखान्यातील श्रीमृत्तिका गणपतीचे ( मातीचा गणपती ) दर्शन घेऊन प्रातः स्मरणाचे श्लोक म्हणावे. नंतर सूर्योदयाबरोबर वैद्यांनी येऊन हात पाहावा.
    प्रकृति अन्वयें औषध घ्यावें. नंतर लिहावयास बसावे. कित्त्यात हात फिरवून मग ज्या कागदावर निशाणे ( शेवटली अक्षरे ) व्हावयाची असतील ते लिखितान्वयेंच वाचावे. ते समयीं जवळ गुरुजी [ महादजी बल्लाळ गुरुजी ?] व आणखी एक दोघे संभावित योग्य असतील ते असावे. जास्त असो नये. येणेप्रमाणे घटिका तीन येकूण घटिका …. कलम १
१ तालीमखान्यात जाऊन दंड काढावे. दिवसेंदिवस शक्ति अन्वयें चढते दंड असावे ; बरोबर समवयी मुलें पांच चार संभावितांचीं असावी ; व जेठी ( मल्ल ) येक दोघे व नेहमी विश्वासु ग्रहस्थ बरोबर असावयाचे ते असावे. खिजमतगार कार्यकारण असावे. जेठी यांनी कुस्तीचे डाव शिकवावे. नंतर समवयी मुलांसुद्धा प्रकृतीस जो खुराक मानेल तो नेमें - करून घेत जावा. येणेप्रमाणे घटिका दीड. येकूण घटि साडेचार …. कलम २
१ स्नान करावयाचे समयीं पंचांग जोशी वाचून संकल्प सांगावा. नंतर गंगाष्टक म्हणावें ; संध्या थोंडकी परंतु न बोलतां करावी, तर्पण करावें. उपाध्ये यांणीं पूजा करावी. ते समयी पुराण देवघरात व बाहेर गायन होत असावे. आपण तुळशी फुलें माळा वहावीं. नंतर नित्य दाने देऊन क्षणभर बसावें. ते समयी शास्त्री व वैदिक महान शिष्ट आल्यास नमस्कार करून योग्यतेनुरूप उत्थापन देऊन काही भाषण करावें. नंतर उपहार करावयास जावें. येणेप्रमाणे घटी साडेतीन. येकूण घटी आठ …. कलम ३
१ कचेरी यावे ते समयीं सर्वाक्ष देऊन योग्यतेनुरूप नेत्रलाभ व भाषण होत असावें. कचेरीत लघु बोलूं नये व गैर नि ही ( ! ) बोलू नये. मनुष्य परीक्षा असावी. गैर वाका एखाद्याने समजाविलेस पक्केपणी विचार करून अपराध ठरल्यास दुसऱ्याकडून त्यास निषिद्ध करवावें. आपण नेत्रकटाक्ष करून पाहावें. अपराधानुरूप पारपत्य करावें, परंतु संभावित गृहस्थ बहुत दिवस पदरीचा प्रामाणिक. अशाने रद बदली केली असतां क्षमा करावी. दुसऱ्याचे क्षूद्र कांढू नये. येणे करून त्यांचा अपमान होतो, आणि तो त्याचे मनात दंश राहतो, साधल्यानुरूप नाश करील. आणि आपल्यास लघुपणा येईल. संन्निधानीं लोभात लघु मनुष्य राखल्यास जें केलें त्यास ते रुकार होतात, परंतु जन लोक वाईट म्हणतात, थोरपणास हानि होती. येणेप्रमाणे घटी तीन. येकूण घटी अकरा …. कलम ४
१ भोजनाचे पूर्वी सोंवळें जाहले नंतर थोरल्या देवघरात जाऊन फुले घालून, नमस्कार करून. ब्राह्मणास उदके सोडून भोजनास बसावें. ते समयीं भाषण करावें तें राजसूय यज्ञांतील ब्राह्मणभोजन प्रकरणी वगैरे योग्य सर्वांस दिसेल ते बोलावें. पाक करणार व शिष्टमंडळी सुशिक्षित विश्वासुक असतील ते बाळगावे. घटी २ येणे प्रमाणें घटी १३ …. कलम ५
१ भोजनोत्तर आचमन करून शतपदी करून तांबूल घ्यावा. नंतर दोन घटिका राजविलास खेळ खेळावे. एखादे दिवशी निद्रा आल्यास घटी अर्ध घटिका निजावे. येणे प्रमाणें घटी २ येकूण घटी पंधरा …. कलम ६
१ शास्त्री यांजवळ विराटपर्वापासून भारतातील चिंतनिका करीत असावी ; व वृद्ध मनुष्यें पदरची बहुत दिवशीं व अन्य शहाणे असतील त्यांशी दिल्ली प्रकरणी गोष्टी कशा जाहल्या त्या ऐकण्यात असाव्या. आपले वडिलांच्या गोष्टी कारभारी यांसी एकांत स्थळी विचारीत असावे ; व तसबिरा व नकाशे अनेक पहात असावे. ते समयीं शाहाणे बुद्धिमान असतील ते जवळ असावे. येणेप्रमाणें घटिका चार एकूण घटिका १९ …. कलम ७
१ खर्डे लिहावयास बसलें, तें समयीं  मुलें संभावित गृहस्थीची बुद्धिमान पहावयासी असावी. करदन बस्तन, गुणाकार भागाकार करावयाचा सराव बहुत असावा. गुरुजी यांनी विद्याभ्यासाकरिता बोलणे प्राप्त आहे. परंतु लिहावयाचे जागीच बोलणे तेथे विशेष कोणी असो नये. घरी चार येऊन घटिका तेवीस …. कलम ८
१ लिहिणे जाहले नंतर काही उपहार थोडासा मर्जी असल्यास मुला समवेत घेऊन करावा. नंतर तांबूल घ्यावा. घटी एक एकूण घटिका चोवीस …. कलम ९
१ घोडी फेरावयास चार रोजांनी जात जावे. ते समयी बरोबर पटवर्धन मंडळी व अन्यत्र सरदार असावे. त्यांशी भाषण करणे ते संतोषवृत्तीने करावे. परंतु अत्यंत लोभही नसावा व विरुद्ध ही न दाखवावे. काही जाहल्यास क्षमा होणार नाही असे भय असावे. योग्यता बघून त्यांची भाषण संतोषे करून करावे आणि दिवशी बाग पहावयास गेल्यास जिन्नस तेथे फुले व फळे जी आणून पुढे ठेवतील ती यथायोग्य बघून त्यास देववावी व आपण द्यावयाची असतील त्यास आपण देऊन मग यावे. ज्या दिवशी स्वारी जावयाची नाही, त्या दिवशी कागदपत्र दवलत प्रकरणी असतील ते कारभारी याणी समजावीत असावे ते समयी कोणी असो नये व गंगाभागीरथी ताईसाठी यांची भेट चार रोजी एक वेळ घेत असावी. त्यासच वाड्यात यावयाचा बेत व्हावा. नंतर त्यास बहुत संतोषेकरून बोलावे व मूल पणाने बोलण्याचा डौल दाखवावा. वाड्यातच आज रहावे. असा आग्रह करून ठेऊन घेत जावी. दिवाण यांणी राजकारणाचे वर्तमान व पुढील योजना करावयाचा विचार करून विनंती करीत असावी. त्या समयी अन्यत्र कोणी असो नये व त्यातील अभिप्राय दुसऱ्यांपाशी निघो नये. म्हणजे मसलती असाध्य होत नाहीत. बातमी हरतऱ्हेची राखावी, म्हणजे मसलतीस बल बहुत आहे. एकूण घटिका अठ्ठावीस …. कलम १०
१ तिरंदाजी करावयास जावे. तेथे बरोबर सरदार व पागे व मानकरी बरोबर असल्यास तीर कोण कसे मारता हे ध्यानात असावे. व हरएक खेळ पहावयाचे ते सर्वत्र समवेत पहावे. येणेप्रमाणे घटिका दोन एकूण घटिका इ. …. कलम ११
१ दीप दर्शन जाहल्यानंतर संध्येस वस्त्रांतर करून बसावे. संध्या जाहलेनंतर स्तोत्रपाठ म्हणावा. नंतर पुरुष सुक्त अथवा पवमानातील अध्याय म्हणावे ते समयी अधिज्ञांनी जवळ असावे. नंतर भोजनास जावे. भोजन होऊन उठेपर्यंत घटी चार …. कलम १२
१ भोजनोत्तर तांबूल खावयास दिवाणखान्यात क्षणभर बसून तांबूल घ्यावे. नंतर कार्याकारण मंडळी जवळ असावी. ते समयी बातमीदार यांणी वर्तमान गुप्त सांगत असावे ; व हरयेक बातमीची पत्रे विश्वासु मनुष्य कोण असेल त्याजकडे काम योजावे, त्याणी सांगावे व त्यावर ही बातमी प्रमाण अथवा सप्रमाण सांगतात याची चौकशी कसावी. नंतर निद्रेस जावे. येणे प्रमाणे घटी तीन एकूण घटिका सात.
    
     एकूण कलमे तेरा लिहिली आहेत, ती ध्यांनी आणोन चालल्यास उपयोगी पडतील. बहुत काय लिहिणे हे आशीर्वाद.   
              या ठिकाणी प्रथम एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे व ती म्हणजे यावेळी सवाई माधवरावाचे वय अवघे ९ वर्षांचे होते.  हि बाब लक्षात घेऊनच या उपदेशपर कलमांकडे पहावे लागते. गोपिकाबाईच्या या पत्रात एकूण १३ कलमे असून त्यातून प्रथमदर्शनी लक्षात येणारी बाब म्हणजे यात नाना फडणीसला अजिबात विशेष असे महत्त्व दिलेलं नाही. स. माधवाचा संरक्षक व एकप्रकारे पालक म्हणून नाना कार्यरत असताना देखील गोपिकाबाईने त्यास या पत्रात फारसे महत्त्व का दिले नाही हे  समजायला मार्ग नाही. दुसरे म्हणजे गुरुजी म्हणून जो उल्लेख या पत्रात येतो, तो महादजी बल्लाळ गुरुजी यास अनुलक्षून असावा. हा थोरल्या माधवरावाच्या काळात त्याच्या निकटवर्तीयांपैकी एक होता. तिसरी गोष्ट म्हणजे, पटवर्धनांच्या विषयी गोपिकाबाईने केलेली सूचना चिंत्य आहे. नानासाहेब पेशव्याच्या काळापासून पटवर्धनांवर पेशव्यांची खास मर्जी होती. थो. माधवराव व नारायणरावच्या काळातही पटवर्धन नानासाहेबाच्या वंशजांची मर्जी रक्षून होते. त्यांच्याशी कशा प्रकारे वर्तन ठेवायचे याविषयी गोपिकाबाईने आपल्या नातवास जो उपदेश केला आहे त्यामुळेच मननीय आहे. त्याव्यतिरिक्त इतर जो काही उपदेश गोपिकाबाईने माधवास केला आहे तो सहेतुक आहे आणि तसा असायलाच हवा ! गोपिकाबाईचे पत्र समग्र वाचले असता असे लक्षात येते कि, येत्या काही वर्षांत आपला हा नातू स्वतःहून राज्यकारभार पाहण्यास तयार व्हावा या हेतूने तिने त्यांस जसे सुचेल त्याप्रमाणे लिहिले आहे.
           ता. १० फेब्रुवारी १७८३ रोजी केशव नाईक थत्ते यांच्या कन्येशी -- रमाबाईसोबत स. माधवरावाचा विवाह झाला. या लग्नासाठी राज्यातील सर्व प्रमुख मुत्सद्द्यांना व सरदारांना बोलावण्यात आले होते. सालबाईच्या तहाची पूर्तता याच सुमारास पुण्यास व्हावी यासाठी नानाने महादजीला इंग्रज वकिलासह पुण्यात येण्याची सूचना केली होती पण ते जमू शकले नाही. उत्तरेतील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे महादजीला लग्न सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही. जवळपास याच कारणांनी अहिल्याबाई देखील समारंभास अनुपस्थित होती. पण तिच्या वतीने तुकोजी होळकर या कार्यक्रमास हजर होता. रघुनाथराव आणि इंग्रजांच्या विरोधातील लढायांमध्ये पुणे दरबारची मदत करणाऱ्या निजामास देखील विवाह सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले होते. त्याने आपला मुलगा पोलादजंग यांस पाठवले. परंतु, तो विवाहानंतर येऊन दाखल झाला. तेव्हा त्याच्या सन्मानार्थ नानाने फिरून एक मेजवानी समारंभ आयोजित केला. या लग्नाच्या निमित्ताने नाना व पुणे दरबारने आपल्या सर्व शत्रू - मित्रांना स्वसामर्थ्याचे एकप्रकारे दर्शन घडवले असेच म्हणावे लागेल.
           
                    विवाहानंतर स. १७८४ मध्ये स. माधवरावास घेऊन नाना व हरिपंत फडके गंगापुरास गोपिकाबाईच्या भेटीस गेले. गंगापूर येथे गोपिकाबाईने बाळकृष्णाचे मंदिर स्थापले होते. त्याच्या सालीना खर्चासाठी पेशव्याच्या नावाने एक लक्ष रुपयांची सनद करून देण्यात आली. काही दिवस आजी जवळ राहून स. माधवराव पुण्यास परतला. दरम्यान या काळात नानाच्या मनात निश्चित एक धोरण आकारास येत होते असे दिसून येते. वर गोपिकाबाईचे  जे उपदेशपर पत्र देण्यात आले आहे, त्यानुसार पेशव्याच्या शिक्षणाची व्यवस्था न ठेवता नानाने उलटा क्रम स्वीकारला.    
                                                                             ( क्रमशः )

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

सवाई माधवराव पेशवे यांचा अपघाती मृत्यू ? आत्महत्या ? की खून ? ( भाग - २ )

                              



                नारायणरावाने पेशवेपद मिळाल्यावर आपल्या भावाच्या वर्तनाचे अनुकरण करण्यास आरंभ केला. कोणासही टाकून बोलणे, शिवीगाळ करणे इ. कृत्ये त्याच्या हातून होऊ लागली. दरम्यान कर्नाटकात स्वारी करण्याचाही त्याचा विचार चालला होता. कारभार जरी तो बापूच्या सल्ल्याने करत असला तरी तो बापूच्या तंत्राने वागत नव्हता. चालू राज्यकारभारात आपणांस महत्त्व नाही हे ओळखून नाना फडणीस देखील कमालीचा तटस्थ बनला होता. दरबारात बापूचे व पटवर्धनांचे हिशेबाच्या भानगडीवरून खटके उडाले होते. पटवर्धन हे पूर्वीपासून माधवरावाचे पक्षपाती असल्याने त्यांत पक्षीय भावनेची भर पडली. अशा परिस्थितीत बापू व पटवर्धन मंडळींना सोबत घेऊन नारायण मार्च महिन्यात गोपिकाबाईच्या भेटीस गंगापुरास गेला. इकडे नारायण पुण्यातून दूर गेल्याचे पाहून रघुनाथाने पुण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. हैदर, भोसले इ. सोबत त्याचे संधान आधीच जुळले होते परंतु, दादाचा प्रयत्न उघडकीस येऊन वर्तमान नारायणास कळवण्यात आले. तेव्हा गंगापुरातील आपला मुक्काम तातडीने गुंडाळून नारायण पुण्यास आला. हैदरअलीचा पुणे दरबारातील वकील आपाजीराम हा दादास सामील होता. त्यास बेड्या घालून पुरंदरी रवाना केले व दादाला कडक नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याला सूर्यदर्शनासाठी गच्चीवर देखील जाण्याची बंधने लादण्यात आली. त्याशिवाय चुलत्यास उद्देशून नारायणराव अपमानकारक भाषेत बोलू लागला. परिणामी, दादा त्राग्याने उपोषणे करू लागला. त्याच्यामुळे आनंदीबाईस देखील उपवास घडू लागले. दोघांच्या दरम्यान मध्यस्थी करण्याचे इतरांनी प्रयत्न केले पण ते सिद्धीस गेले नाहीत. याची परिणती, नारायणास कैद करून रघुनाथरावास पेशवा बनवण्याचा कट रचण्यात झाली. या कटांत दादापासून माधवरावाच्या सर्व पक्षपात्यांचा कमी - अधिक प्रमाणात सहभाग होता. यामध्ये दादाचे सर्वच पाठीराखे ज्याप्रमाणे सहभागी होते त्याचप्रमाणे माधवरावाच्या खास वर्तुळातील समजले जाणारे हरिपंत फडके, नाना फडणीस हे देखील सामील होते. नानाने पेशव्यास आपले पागोटं सांभाळण्याची केलेली सूचना किंवा कटाची माहिती मिळूनही बंदोबस्त करण्यात हरीपंताने केलेली दिरंगाई यावरून सर्व काही उघड होते. असो, ता. ३० ऑगस्ट १७७३ रोजी शनिवारवाड्यात गारद्यांनी केलेल्या दंग्यात नारायणराव पेशव्याचा खून झाला व रघुनाथरावाची कैदेतून मुक्तता झाली. या ठिकाणी कट कोणी व कसा रचला आणि तो कशा प्रकारे सिद्धीस  नेला याच्या तपशीलात जाणे अप्रयोजक ठरेल. ज्यांना याविषयी अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांनी श्री. पांडुरंग गोपाळ रानडे यांचा ‘ नारायणराव पेशवे यांचा खून की आत्महत्या ?’ हा ग्रंथ अभ्यासावा.
           
                    नारायणाच्या खुनानंतर रघुनाथरावाने पेशवेपदाचा कारभार हाती घेतला. परंतु, घडल्या प्रकरामुळे बरेच दरबारी मुत्सद्दी व मानकरी नाराज झाले होते. अर्थात, हि नाराजी दोन प्रकारची होती. पहिला प्रकार म्हणजे, पेशव्याचा खून व्हावा अशी कटवाल्यांची अजिबात इच्छा नव्हती. पण घडल्या प्रकाराविषयी आता हळहळ व्यक्त करण्यापलीकडे ते काय करू शकत होते ? दुसरा प्रकार म्हणजे, अननुभवी नारायणास हाती धरून कारभारात आपले वजन व प्रस्थ वाढवण्याचा त्यांचा हेतू जागच्या जागी जिरला होता. कारण, पेशवेपदी आता अनुभवी, प्रौढ असा रघुनाथराव विराजमान झाला होता ! अशा परिस्थितीत नारायणराव पेशव्याची पत्नी गरोदर असल्याची बातमी सर्वत्र झाली आणि असंतुष्ट दरबारी मुत्सद्द्यांनी रघुनाथरावास पदच्युत करण्याचा निर्णय घेतला. नाना फडणीसचे चरित्रकार श्री. वा. वा. खरे व रियासतकार सरदेसाई यांची बारभाई कारस्थानाविषयीची मते अभ्यासली असता असे लक्षात येते की, नारायणरावाच्या खुनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यचे स्वप्न फक्त बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीसलाच पडले. बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेऊन संभाव्य राज्यक्रांती घडवून आणून त्यात मुख्य कारभार आपल्या हाती घेण्याचे नाना फडणीसने योजले. रघुनाथरावास पदच्युत करण्याच्या कामी जे बारभाई मंडळ उभारण्यात आले त्यामागील प्रमुख प्रेरणा नानाचीच होती परंतु, त्याने प्रत्यक्ष सहभाग न घेता पुढारपण सखारामबापूकडे दिले. बापूने प्रसंग पाहून दरबारी मुत्सद्द्यांना व सरदारांना आपल्या विश्वासात घेऊन दादाच्या विरोधात एक कारस्थानी मंडळ उभारले व दादा हैदरवर चालून गेल्याचे पाहून बापू व नानाने शनिवारवाड्यातून गंगाबाईस बाहेर काढले व तिला पुरंदरी रवाना केले. साताऱ्यास छत्रपतींना घडल्या प्रकाराची माहिती कळवून ता. २७ फेब्रुवारी १७७४ रोजी रघुनाथरावास पेशवेपदावरून बडतर्फ करण्यात आल्याचा जाहीरनामा काढण्यात आला. यांमुळे दादा बंडखोर ठरला तर बापू व नानाचे कारभारी मंडळ कायदेशीर बनले. हे दोघे गंगाबाईच्या नावाने कारभार करू लागले. यामागे नारायणरावाच्या अपराध्याला शिक्षा करण्याचा हेतू नसून जो जन्माला येईल त्या अल्पवयीन पेशव्यास मुठीत ठेवून सर्व राज्यकारभार आपल्या तंत्राने चालवण्याचा स्वार्थ होता, हे उघड आहे.
        
                        कारभारी मंडळाच्या या पवित्र्याने दादा आरंभी गडबडून गेला. परंतु, लवकरच त्यास परिस्थितीची सर्व उमज पडून त्याने कारभारी मंडळात भेद करण्याचा यत्न केला. त्याचप्रमाणे निजाम, भोसले, इंग्रज, हैदर यांच्याकडेही मदत मागितली. परंतु, निजाम व भोसले यांनी यापूर्वीच कारभाऱ्यांचा पक्ष स्वीकारला होता तर इंग्रज कोणीकडून काय मिळते याकडे लक्ष ठेवून होते. राहता राहिला हैदर, तर त्याने दादाला पाठिंबा दिला होता. असो, पुढे हा झगडा सुमारे ७ - ८ वर्षे चालला. दरम्यान या अवधीत अनेक घडामोडी घडून आल्या. पुरंदरावर गंगाबाई प्रसूत होऊन दि. १८ एप्रिल १७७४ रोजी तिला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नामकरण सवाई माधवराव असे करण्यात येऊन त्याच्या नावे पेशवेपदाची वस्त्रे मागवण्यात आली. सवाई माधवरावाच्या जन्मामुळे कारभारी मंडळास जोर येऊन त्यांनी दादाच्या बंदोबस्ताकडे विशेष लक्ष दिले. त्यातूनचं पहिले इंग्रज - मराठा युद्ध घडून आले. स. १७८३ च्या सालबाईच्या तहाने इंग्रज - मराठा युद्धाचा व दादाचाही निकाल लागला. या तहान्वये दादाचे राजकीय महत्त्व साफ लयास जाऊन पेशवाईचा सर्व कारभार बालपेशव्याच्या वतीने नाना फडणीस पाहू लागला. स. १७७४ पासून स. १७८३ पर्यंत मराठी राज्यात अनेक घडामोडी घडून आल्या. त्या सर्वांची दखल येथे घेणे शक्य नाही. मात्र, या ठिकाणी बालपेशव्याच्या संबंधित काही घटनांची थोडक्यात माहिती घेऊ.

                    ता. १८ एप्रिल १७७४ रोजी स. माधवरावाचा जन्म झाला. जन्मानंतर अवघ्या ४० दिवसांनी त्यांस समारंभपूर्वक पेशवेपदाची वस्त्रे प्रदान करण्यात आली. ( दि. २८ मे १७७४ ) बालपेशव्यास व त्याच्या आईस दगाफटका करण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यातील खरे किती व खोटे किती हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. मात्र, त्या सर्वातून त्याचा बचाव करण्यात सर्वच मुत्सद्द्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली हे नाकबूल करता येत नाही. जन्माच्या ४० व्या दिवशी पेशवाई लाभलेल्या स. माधवाच्या आयुष्यात स. १७९१ च्या ऑगस्टपर्यंत अनेक घडामोडी घडून आल्या. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांस मातृशोक घडून आला. ता. १२ जुलै १७७७ रोजी गंगाबाईचा पुरंदर येथे नवज्वराने मृत्यू झाला. त्यानंतर या पेशव्याचे संगोपन प्रामुख्याने पार्वतीबाईच्या देखरेखीखाली झाले. वस्तुतः, गोपिकाबाईने आपल्या नातवाच्या देखभालीसाठी यावेळी घरी परतणे योग्य होते पण करारी व निश्चयी आणि हेकट स्वभावाची माणसे सहसा आपल्या निश्चयापासून ढळत नाहीत. याप्रमाणे गोपिकाबाईचे वर्तन होते. थो. माधवराव मरणोन्मुख अवस्थेत होता तेव्हा ती आली नाही. नारायणाचा खून झाला तेव्हाही ती फिरकली नाही. पुढे स. माधवाचा जन्म झाला त्यावेळी देखील तिला नातवाचे तोंड पाहण्यासाठी का होईना पुण्यास यावेसे वाटले नाही. असो, पार्वतीबाईच्या देखरेखीखाली पेशव्याचे बालपण चालले होते खरे पण, आयुष्यभर ‘ आपण सधवा आहोत कि विधवा ?’ या प्रश्नात गुरफटून पडलेल्या पार्वतीकडून बालपेशव्याकडे संपूर्णतः लक्ष देणे फारसे  झालेलं दिसत नाही. त्यातच याच काळात भाऊच्या तोतयाचे प्रकरण अनिवार होऊन शेवटी तो तो तोतया असल्याचे सिद्ध करण्यात येऊन त्यास ठार करण्यात आले. मात्र, तरीही आपला पती अजूनही जिवंत आहे याच आशेवर ती बाई आला दिवस कंठत होती. अशा मनःस्थितीत असलेल्या व्यक्तीकडून बालपेशव्याचे संगोपन काय होणार ते दिसतंच होते.    

                        यावेळी कारभारी मंडळावर मोठी जबाबदारी येऊन पडली होती. त्यांनी आपणहून बालपेशव्याच्या संरक्षणाची जबाबदारी तर स्वीकारली होतीच  त्यानुषंगाने त्याच्या संगोपनाची / शिक्षणाची देखील व्यवस्था करणे त्यांना गरजेचे होते. लौकिकात ते बालपेशव्याला त्याचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते तरी प्रत्यक्षात पेशव्याच्या नावाने कारभाराची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली होती. बाल पेशवा जोवर जिवंत आहे तोवर या सत्तेचा आपणांस उपभोग घेत येईल याची त्यांस पूर्णतः जाणीव असल्याने स. माधवरावास ते आपल्या जीवाहून अधिक जपत असल्यास नवल नाही. स. माधवराव जसजसा मोठा होत होता, तसतशी घडून येत असलेल्या राज्यक्रांतीच्या फायद्याची मुत्सद्दी मंडळास कल्पना येऊ लागली होती. बाल पेशवा ज्याच्या हाती, त्याच्या ताब्यात राज्याची सर्व सूत्रे हे त्यांना समजू लागले होते. याचा परिणाम म्हणजे, कारभारी मंडळात सर्वचं कारभार आपल्या हाती घेण्याची स्पर्धा लागली. यांमध्ये नाना व बापू हे आघाडीवर असून त्यात नानाचा चुलत भाऊ मोरोबा हा तिसरा पण दुय्यम प्रतिस्पर्धी होता. कारभार व बाल पेशव्याचा ताबा घेण्यास हे तिघेही उत्सुक होते खरे पण तिघांची अनेक वैगुण्ये असल्याने त्यांना स्वबळावर हे कार्य सिद्धीस नेणे शक्य होत नव्हते. याचे प्रमुख कारण म्हणजे या तिघांकडेही लष्करी सामर्थ्य नव्हते. सखारामबापू हा जरी लढवय्या आणि कारस्थानी पुरुष असला तरी चार पाच हजारांच्या वर फौजफाटा बाळगणे व त्याबळावर एखादी मसलत सिद्धीस नेणे त्याच्या आवाक्याबाहेर होते. मोरोबा फडणीसची देखील तीच तऱ्हा होती आणि नानाकडे लष्करी नेतृत्वाचे गुण तर अजिबातच नव्हते. कागदावर जरी त्याच्या दिमतीला लष्करी पथक असले तरी त्याने त्याचे कधी नेतृत्व केलेलं नव्हते. अशा परिस्थितीत बालपेशव्याला बगलेत मारून राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेण्यासाठी या तिघांनी परस्परांच्या विरोधात बुद्धीबळाचा पटचं मांडला. पहिल्या इंग्रज - मराठा युद्धास जी काही तात्कालिक कारणे आहेत, त्यांमागे या चतुरस्त्र राजकारण्यांची परस्परविरोधी राजकारणेही कारणीभूत आहेत. इंग्रज, निजाम, हैदर - टिपू, भोसले, गायकवाड इ. ची सूत्रे सांभाळत व त्यांच्या कारस्थानांना तोंड देत नाना फडणीसने महादजी शिंदे, हरिपंत फडके व पटवर्धन मंडळींच्या बळावर सखारामबापू, मोरोबा फडणीस यांना राजकीय गुन्ह्यांत अडकवून कैदेत टाकले. पैकी, बापूचे कैदेत असताना निधन झाले तर नाना फडणीस मरण पावल्यावर मोरोबाची सुटका झाली. याशिवाय पहिल्या इंग्रज - मराठा युद्धाच्या समाप्ती सोबतच रघुनाथरावाचाही प्रश्न निकाली निघाला. तो नाना फडणीसच्या हवाली झाला. त्यांस उदरनिर्वाह व स्नानसंध्येपुरती नेमणूक देण्यात आली आणि राजकारणात सहभाग न घेण्याचे निर्बंध त्याच्यावर लादण्यात आले. मात्र, तत्पूर्वी महादजीकडे दादाने अंतस्थ खटपट करून आपल्या पुत्रास -- बाजीरावास --- राज्यकारभारात महत्त्व राहील अशी खबरदारी घेतली होती. दुसरा बाजीराव पेशवा व दौलतराव शिंद्याच्या तथाकथित मैत्रसंबंधांचे हे आद्य कारण असून याकडे अजून इतिहास संशोधकांचे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे.   

                रघुनाथाचा बंदोबस्त झाल्यावर नानास थोडी उसंत मिळाली. त्याच्या सुदैवाने सालबाईचा तह झाल्यावर लवकरचं म्हणजे स. १७८३ च्या ११ डिसेंबर रोजी दादाचे निधन झाले. दादा सारखा कारस्थानी पेशवा मरण पावल्याने नानाचा मार्ग बराचसा निष्कंटक झाला. दरबारातील त्याच्या एकाधिकारशाहीस आव्हान देण्याची शक्ती आता फक्त होळकर व शिंद्यांमध्ये होती. त्यापैकी महादजी दिल्लीच्या भानगडीत गुंतल्याने शिंद्यांचा धोका टळला होता. होळकरांच्या घरात अधिकार वाटणीवरून अहिल्याबाई व तुकोजीमध्ये तंटा निर्माण झाल्याने त्यांचेही लक्ष पुणे दरबारातील घडामोडींकडे फारसे नव्हते. असे असले तरीही नाना गाफील नव्हता. शिंदे - होळकर  हे परस्परांशी विभक्त असण्यातच आपला फायदा आहे हे पेशव्यांचे सूत्र नानाच्या मनावर पक्के ठसलेलं होतं. त्यानुसार त्याने आता तुकोजीला गोंजारण्यास आरंभ केला होता. मजेची बाब म्हणजे, पहिले इंग्रज - मराठा युद्ध संपेपर्यंत महादजी शिवाय नानाचे पान हलत नव्हते आणि त्यामुळे तुकोजीस दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. मात्र, आता नानाला आपली चूक उमगून त्याने तुकोजीला जवळ करून महादजीचे प्रस्थ कमी करण्याचा प्रयत्न चालवला. पुढे - मागे महादजी सोबत संघर्ष करण्याची वेळ आली तर त्याला अटकेपार जाणाऱ्या तुकोजी होळकर शिवाय दुसरा कोण त्राता होता ?
                                                                                                                                                                                                                              ( क्रमशः )