बुधवार, २७ मार्च, २०१३

ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली

 दिल्ली झाली दीनवाणी । दिल्लीशाचे गेले पाणी ।
      ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली ।। २ ।।
          शिवभारतकार परमानंद यांचा नातू गोविंद याने वरील शब्दांत ताराबाईची प्रशंसा तर केली आहेच पण तिच्या योग्यतेचेही वर्णन केले आहे. छ. शिवाजी महाराजांचा धाकटा मुलगा राजाराम याची पत्नी ताराबाई हि सेनापती हंबीरराव मोहित्यांची मुलगी. स. १७०० च्या मार्च महिन्यात सिंहगड येथे राजारामाचे निधन झाले व राजकीय पटलावर ताराबाई नामक वीरांगनेचा प्रवेश झाला. यावेळी तिचे वय अवघे २५ वर्षांचे असून पोटी एक पुत्र तिसरा शिवाजी होता. ( शिवाजी तिसरा, जन्म ९-६-१६९६ )
                   राजारामाच्या मृत्यूची बातमी समजतांच काही काळ औरंगजेबास आपण सर्व दक्षिण जिंकलो असा भास झाला. शिवाजीने स्थापलेल्या स्वराज्याचा वारस आपल्या कैदेत आहे. बस्स, आता दक्षिण आपलीचं ! अशी मोगल बादशहाची भावना बनली. परंतु, लवकरचं त्याचा भ्रमनिरास झाला. राजारामाच्या चार बायकांपैकी ताराबाई व राजसबाई विशेष कर्तुत्ववान होत्या. अधिकार व सत्तालालसा दोघीनांही होती व सवतीमत्सरही भरपूर होता. त्यात भर पडली राजारामानंतर गादीचा वारस कोण या प्रश्नाची !
                 ताराबाईचा मुलगा शिवाजी हा यावेळी ४ वर्षांचा असून राजसबाईचा पुत्र संभाजी हे केवळ २ वर्षांचा होता. अशा परिस्थितीत ताराबाईने आपल्या मुलाला राज्याचा स्वामी बनवण्याचे ठरवताच थोडा गोंधळ व वाद निर्माण झाला. परंतु, लवकरचं त्याचे निरसन होऊन विशाळगडी शिवाजीचे राज्यारोहण झाले. मुलाच्या नावाने कारभार हाती घेऊन ताराबाईने राजसबाई व संभाजीला नजरकैदेत टाकले आणि मोगलांशी सुरु असलेला लढा नेटाने पुढे चालवला. स. १७०० ते १७०७, तब्बल सात वर्षे ताराबाईने औरंगजेबाच्या प्रयत्नांना दाद न देता स्वराज्य राखण्याचे प्रयत्न शर्थीने चालवले. याच काळात स्वराज्यातील प्रमुख किल्ले जिंकण्याच्या कामगिरीवर औरंगजेब स्वतः निघाला. आरंभी त्यास थोडेफार यश मिळाले पण लवकरचं त्याची स्वारी रेंगाळली.
               या काळात ताराबाईने आपल्या रणनीतीमध्ये बदल केला.  संभाजी, येसूबाई, राजाराम यांची उदाहरणे नजरेसमोर असल्याने तिने आपला मुक्काम कधीही एका विशिष्ट किल्ल्यावर न ठेवता ती सतत आपला मुक्काम बदलायची. त्यामुळे संभाजीप्रमाणे कैद होण्याचा किंवा येसूबाई - राजाराम प्रमाणे किल्ल्यात कोंडून पडण्याचा प्रसंग तिच्यावर ओढवला नाही. तसेच स्वराज्यातील प्रत्येक किल्ला ताब्यात घेण्याचा औरंगजेबाचा अट्टाहास ताडून तिने किल्ले लढविण्याचेही नवे धोरण आखले.
          आजवर मोगल सैन्य गड - किल्ल्यांना वेढा घालून बसल्यावर बाहेर फिरणाऱ्या मराठी फौजा त्यांच्यावर छापे मारून व रसद तोडून त्यांना हैराण करत. जिंजीसारख्या ठिकाणी राजारामाने हेच तंत्र वापरून दीर्घकाळ मोगलांना झुंजवत ठेवले. परंतु, याच जोडीला ताराबाईने आणखी एक युक्ती अंमलात आणली. पावसाळा तोंडावर येईपर्यंत किल्ला लढवायचा व पावसाळ्यास आरंभ झाला कि किल्ला शत्रूच्या हवाली करायचा. पण तत्पूर्वी किल्ल्यावरील दारुगोळा व दाणागोटा नष्ट करायचा किंवा सोबत घेऊन बाहेर पडायचे. ज्यामुळे किल्ला ताब्यात येउन देखील त्याचा लगोलग बंदोबस्त करणे मोगलांना शक्य होऊ नये. आणि मोगलांची मुख्य सेना त्या किल्ल्यापासून लांब गेली कि, आपल्या धाडसी लष्करी तुकड्यांच्या मार्फत गेलेला किल्ला परत आपल्या ताब्यात घ्यायचा. ताराबाईच्या या धोरणामुळे मराठी मुलखातील किल्ले जिंकणे औरंगजेबास भलतेच महागात पडले. एकतर वर्षभर एखाद्या गडाला वेढा घालायचा. वेढ्याच्या काळातील नुकसान सोसायचे. वर दक्षिणा म्हणून किल्लेदाराला रोख रकम मोजून किल्ला ताब्यात घ्यायचा. आणि वर्ष - सहा महिने खपून जिंकलेला किल्ला आपली पाठ वळतांच मराठ्यांनी जिंकल्याची बातमी ऐकायची. औरंगजेबाच्या मनाला काय यातना होत असतील ते तोच जाणे !
           या सात वर्षांच्या काळात दिवा विझण्यापूर्वी जसा मोठा होतो त्याप्रमाणे औरंगजेबाने आपले अखेरचे सर्व प्रयत्न करून पाहिले. ताराबाईचे प्रमुख सहाय्यक रामचंद्रपंत अमात्य व परशुरामपंत प्रतिनिधी यांच्यात फूट पाडण्यासाठी फितुरीची बनावट पत्रे बनवली. शाहूला आपले मांडलिक बनवून त्याची मराठी राज्यावर नियुक्ती करण्याचाही त्याचा बेत चालला होता पण शाहूची प्रत्यक्ष सुटका करण्यास त्याचे मन धजावत नव्हते. कारण, या प्रदीर्घ मोहिमेत शाहूच्या रुपाने मिळालेले एकमेव यश त्याला अखेरच्या क्षणी गमवायचे नव्हते. वस्तुतः याचवेळी त्याने शाहूला सोडले असते तर ताराबाई व शाहू यांच्यात कलागत लागून औरंगजेबाचे कार्य थोड्या प्रमाणात तरी घडून आले असते. कारण, सात वर्षे सत्ता हाती घेऊन राज्यकारभार करणारी ताराराणी सुखासुखी शाहूच्या हाती राज्यकारभार सोपवणार नव्हती. याविषयीचा अंदाज खरेतर औरंगजेबासारख्या राजकारणात हयात घालवलेल्या व्यक्तीच्या लक्षात यायला हवा होता. पण मराठी राज्याच्या सुदैवाने औरंगजेबास हि दुर्बुद्धी सुचली नाही.
             औरंगजेबासोबत मराठी राज्याचा जो काही २५ वर्षे लढा चालला होता, त्याचे अखेरच्या काळात बरेचसे स्वरूप बदलले होते. राजाराम सत्तेवर येउन स्थिरावला त्यावेळी मराठी सरदारांचे काही गट पडले होते. एक गट स्वराज्यनिष्ठ होता. छ. शिवाजीमहाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यास तो कटिबद्ध होता. दुसरा गट भाडोत्री सरदारांचा होता. जो कोणी रोख पगार व जहागीर / वतन  देईल त्याच्या बाजूने लढायचं असा त्यांचा निर्धार होता. तिसरा गट होता स्वतंत्र वृत्तीच्या एकांड्या शिलेदारांचा. यांना स्वराज्य, मोगलाई यांत फारसा रस नव्हता. आपल्या पथकाच्या / लष्करी सामर्थ्याच्या बळावर प्रांतांत लुटालूट करून आपले सैनिकी बळ वाढवणे आणि स्वपराक्रमावर नवीन मुलुख जिंकून त्यात आपले स्वतंत्र अधिष्ठान निर्माण करणे हेच त्यांचे मुख्य ध्येय / उद्दिष्ट होते.
               या तीन गटातील सरदारांपैकी पहिल्या व तिसऱ्या गटातील सरदारांचा मोगलांना विशेष जाच झाला. स्वराज्यनिष्ठावंतांविषयी या ठिकाणी फार काय लिहायचे, पण एकांड्या शिलेदारांचा प्रश्न वेगळा होता. स्वराज्यातील मुलुख धुवून निघाल्यामुळे लूटमारीस योग्य राहिला नव्हता. राहता राहिला मोगलांच्या अंमलाखालील सधन प्रदेश, तर तो तुटून लुटण्यास त्यांनी कमी केले नाही. या तिसऱ्या गटातील सरदारांनीच गुजराथ, माळवा इ. प्रांतांवर सतत स्वाऱ्या करून उत्तरेतून येणारी औरंगजेबाची रसद तोडून मोगलांना रडकुंडीस आणले. मराठ्यांच्या तथाकथित स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या टप्प्यांत याच सरदारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. आंग्रे, भोसले, पवार, होळकर, शिंदे, कदम बांडे इ. काही नावे वाचकांच्या परिचयाची आहेतचं. या सरदारांना स्वराज्य वा मोगलाई यांच्याशी काही देणे - घेणे नव्हते. मोठमोठ्या फौजा बाळगून हे बलवान झाले होते व लहानमोठे प्रदेश बळकावून एकप्रकारे स्वतंत्र संस्थानिक बनले होते. अशा सरदारांना काबूत आणण्यापेक्षा त्यांच्याकडे असलेले प्रदेश त्यांच्याजवळचं ठेऊन व त्यांचे महत्त्व रक्षून आपले कार्य साधून घेण्याचा एकचं मार्ग उपलब्ध राहिला होता. ज्याचा अवलंब वारसा युद्धांत ताराबाई व शाहू यांनी केल्याचे दिसून येते.
          स्वराज्यनिष्ठांच्या गटातील नावांचे आता संशोधनचं करावे लागेल. कारण, या गटात मोडतील अशा मंडळींची नावे चटकन आठवत नाहीत. काहीजण म्हणतील कि, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य यांचे काय ? ते स्वराज्यनिष्ठ नव्हते का ? तर प्रिय वाचकहो, ते निश्चित स्वराज्यनिष्ठ होते पण वतनाच्या आसक्तीपासून दुर्दैवाने ते लांब राहू शकले नाहीत. मोगलांविरुद्ध ते स्वराज्यनिष्ठेने लढले पण वारसा युद्धांत मात्र त्यांनी वतनास प्राधान्य दिले. याला एखादाच खंडो बल्लाळ सारखा अपवाद दिसून येतो. असो, राहता राहिला मुद्दा भाडोत्री सरदारांचा तर माने, निंबाळकर प्रभूती सरदार या गटात मोडणारे सरदार असून पुढील काळात त्यांनी मोगलांचाच पक्ष स्वीकारला. परिणामी, पुढच्या राजकारणात त्यांना अजिबात महत्त्व राहिले नाही. उत्तर पेशवाईत हुजऱ्याचा मुख्य कारभारी झालेला त्रिंबकजी डेंगळे जे कार्य करून व लौकिक संपादन करून इतिहासात अजरामर झाला त्याच्या तुलनेने हे खानदानी मराठा सरदार बदनामीच्या का होईना पण अडगळीतचं पडून राहिले. त्यांच्या अस्तित्वाचा कोणाला फायदाही झाला नाही व त्यांच्या मदतीविना कोणाचे अडलेही नाही !
          स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर शाहू कैदेतून सुटून आला त्यावेळी उपरोक्त तीन गटांतील मराठी सरदारांचे राजकारणावर वर्चस्व होते. मोगलांच्या कैदेतून सुटून आलेल्या शाहूने ताराबाईकडे राज्यकारभार आपल्या हवाली करण्याची मागणी केली. परंतु, ताराबाईने ती साफ धुडकावून लावत स्पष्ट शब्दांत सांगितले कि, शिवाजीमहाराजांनी कमावलेले राज्य शाहूच्या वडिलांनी -- म्हणजे संभाजीने -- गमावले. आज ज्या राज्यावर ताराबाईचा अंमल आहे व ज्या राज्यावर शाहू आपला अधिकार सांगत आहे ते राज्य राजारामाने संपादले आहे. वडिलोपार्जित राज्यावर हक्क सांगणे निराळे पण चुलत्याने कमावलेल्या राज्यावर पुतण्या कसा काय हक्क सांगू शकतो ? ताराबाईचा युक्तीवाद बिनतोड आणि न्यायाचा होता. परंतु तिची बाजू तिच्याच लोकांना उचलून धरणे योग्य वाटले नाही. इतिहासकार याविषयीचे समर्थन करताना लिहितात कि, राजारामाने जरी मंचकारोहण केले असले तरी राज्याचा मालक हा शाहूचं आहे हि त्याची भावना अखेरपर्यंत कायम होती व शाहूला मोगलांच्या कैदेतून सोडवून त्यास राज्याचा अधिकार सोपवण्याचा त्याचा मानस होता. राजारामाची जी भावना होती, तीच समजूत त्याच्या प्रधानमंडळाची व सरदारांची देखील होती. स. १७०७ मध्ये जेव्हा शाहू मोगलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात परतला त्यावेळी धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य इ. चे मत शाहूकडे ताराबाईने राज्याचे अधिकार सोपवावेत असेच होते. परंतु, ताराबाईने ठणकावून सांगितले कि, शाहूचा या राज्यावर कोणत्याही प्रकारे हक्क पोहोचत नाही.
             इतिहासकार काहीही सांगोत, पण ताराबाईचा पक्ष हा न्यायाचा होता हे उघड आहे. असो, शाहूचा या राज्यावर कसलाही अधिकार नाही इतकेच सांगून ताराबाई थांबली नाही तर तिने आपल्या सर्व सरदारांकडून एकनिष्ठेतच्या शपथा घेऊन शाहूसोबत लढण्याची तयारी केली. वस्तुतः, ताराबाईची यावेळी थोडी हलाखी होती. एकतर तिची बरीचशी फौज ठिकठिकाणी मोगलांशी लढण्यात गुंतली होती. तिचा मुख्य सेनापती धनाजी जाधव याची निष्ठा डळमळीत झालेली होती. डळमळीत धनाजीला वेसण म्हणून तिने परशुरामपंत प्रतिनिधीला सोबत पाठवले. पण, खंडो बल्लाळ चिटणीसाने आपले सर्व वजन खर्चून धनाजीला शाहूच्या पदरात घातले आणि स. १७०७ च्या खेडच्या लढाईत जाधवाची फौज तटस्थ राहिल्याने ताराराणीच्या सैन्याचा पराभव झाला.
              खेडच्या लढाईनंतर शाहूचे आक्रमण वाढत गेले व स. १७०८ च्या आरंभी राज्याभिषेक झाल्यावर त्याने कोल्हापूरवर स्वारी केली. शाहूच्या सैन्याशी समोरासमोर लढण्याची तयारी नसल्याने ताराबाईने आपले प्रमुख किल्ले लढवण्याची जबाबदारी रामचंद्रपंतावर टाकून ती स्वतः मालवणला निघून गेली. शाहूची कोल्हापूर मोहीम जरी यशस्वी झाली असली तरी फार काळ तो तिकडे थांबला नाही व त्याची पाठ फिरताच ताराराणीने फिरून एकदा गेलेला मुलुख व गड - किल्ले जिंकून घेतले. दरम्यान मोगलांच्या वारसा युद्धाचा निकाल लागून मोगल शहजादा मुअज्जम उर्फ बहादूरशहा हा बादशाह झाला. त्यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे आपण वारस आहोत व दक्षिणच्या सहा सुभ्यांतून आपणांस चौथाई आणि सरदेशमुखी वसुलीचा अधिकार मिळावा अशी मागणी शाहू व ताराबाईने बहादूरशहाकडे केली. मोगलांनी धूर्तपणे सांगितले कि, चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा तयार आहेत पण तुमच्यापैकी त्या कोणाच्या नावे द्यायच्या तेवढे सांगा ! तात्पर्य, ताराबाई किंवा शाहू यांच्यापैकी एकालाच मोगलांकडून चौथाई व सरदेशमुखी मिळणार होती आणि या दोघांपैकी ती नशीबवान व्यक्ती कोण असणार याचा फैसला रणभूमीवरच होणार होता. याबाबतीत शाहूपेक्षा ताराबाई जास्त हुशार निघाली. मोगलांच्या निवाड्याने, संभाव्य वारसा युद्धांत शाहूला मोगलांचे पाठबळ मिळणार नाही हे एक उघड गुपित होते. त्याचा फायदा उचलून तिने दक्षिणेतील मोगली अंमलदारांना शाहूच्या विरोधात चिथावणी दिली. आरमारप्रमुख कान्होजी आंग्रेला कोकणातून घाटावर येण्याची आज्ञा सोडली. शाहूचा सेनापती चंदसेन जाधव यास, तिने आपल्या पक्षास वळवून घेण्याचा प्रयत्न केला. आरंभी ताराबाईच्या खटपटीला यश मिळत गेले पण बाहेरच्या शत्रूशी लढत असताना घरातील शत्रूकडे तिचे अक्षम्य दुर्लक्ष होऊन तिच्यावर विपरीत प्रसंग ओढवला.
              स. १७१४ च्या जुलै - ऑक्टोबर दरम्यान रामचंद्र अमात्य, गिरजोजी यादव इ. च्या मदतीने राजसबाई व संभाजी यांनी ताराबाईस तिच्या मुलासह कैद करून सत्ता आपल्या हाती घेतली. स. १७१४ पासून स. १७४९ पर्यंत तब्बल ३५ वर्षे ताराराणीस राजकीय अज्ञातवास भोगावा लागला. या ३५ वर्षांमध्ये अनेक स्थित्यंतरे घडून आली होती. ज्या मुलाच्या बळावर मोठ्या हिरीरीने तिने राज्याचा पसारा मांडला होता तो शिवाजी स. १७२७ मध्ये मरण पावला. त्याच्या निधनाने ताराबाईचा जोर काहीसा ओसरला. इकडे शाहूला आवर घालणे संभाजीला शक्य न झाल्याने त्याने निजामाची मदत स्वीकारली. परंतु, त्यामुळे फारसा फरक पडला नाही व एका लढाईत शाहूच्या सरदारांकडून संभाजी पराभूत झाला. त्या लढाईत संभाजीचा सर्व परिवार व ताराबाई शाहूच्या सैन्याच्या हाती लागले. संभाजीच्या परिवारास कोल्हापुरास परत पाठवण्यात आले. ताराबाईची देखील कोल्हापुरास रवानगी करण्याचा शाहूचा विचार होता पण कोठेही गेल्याने आपली कैद टळत नाही हे जाणून तिने साताऱ्यासच राहण्याचा निर्णय घेतला. ( स. १७३० )
             स. १७३० ते ४९ पर्यंत तब्बल १९ वर्षे ताराबाईने साताऱ्यास काढली. या अवधीत स्वराज्याचे साम्राज्य झाल्याचे जसे तिच्या लक्षात आले त्याचप्रमाणे दरबारावरील शाहूचे नियंत्रण हळूहळू कमी होत जाउन पेशव्याचे प्रस्थ वाढत चालल्याचेही तिच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. स. १७४५ - ४६ पासून शाहूच्या वारसाचा शोध घेण्यास आरंभ झाला. शाहूला मूलबाळ नव्हते आणि कोल्हापूरच्या संभाजी देखील निपुत्रिक होता. अशा स्थितीत विठोजीराजे व शरफोजी राजे यांच्या वंशातील एखादा मुलगा दत्तक घ्यावा किंवा रघुजी भोसल्याच्या मुलास दत्तक घ्यावे असा शाहूचा विचार होता. त्यावेळी ताराबाईने आपले मौन सोडले आणि शाहूला सांगितले कि, औरस वंशज हयात असताना दत्तकाचा शोध का घेता ? ताराराणीच्या या प्रश्नाने शाहू गडबडला. ताराबाईच्या वाक्यांचा त्याला काहीच अर्थ लागेना. तेव्हा तिने खुलासा केला कि, माझा मुलगा शिवाजी यांस बंदिवासात असताना मुलगा झाला. परंतु, हि गोष्ट उघडकीस आल्यावर संभाजीने त्यास ठार करण्याचे प्रयत्न केले म्हणून आपण त्यास गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवले आहे. त्यास आणून गादीवर बसवावे. आपल्या चुलतीचा खटपटी स्वभाव शाहू पुरेपूर ओळखून होता. त्याने तिला सरळ विचारले कि, तुम्ही सांगता त्यास प्रमाण काय ?
                   तेव्हा ताराबाईने सांगितले कि, या प्रकरणाची सर्व माहिती कोल्हापूरचा अमात्य भगवंत रामचंद्र यास आहे. तेव्हा शाहूने स्पष्ट केले कि, भगवंत रामचंद्राने श्रीकृष्णेचे उदक हाती घेऊन हि माहिती सत्य असल्याचे सांगून ते जल माझ्या हातावर घालावे. ताराबाईने यास संमती देऊन भगवंत रामचंद्रास तसा निरोप पाठविला. इकडे शाहूने भगवंतराव नरहर दप्तरदार यास भगवंत रामचंद्र अमात्याच्या भेटीस पाठवून ताराबाईच्या नातवाची प्रत्यक्ष भेट घेण्यास सांगितले. भगवंत दप्तरदाराने शाहूच्या आज्ञेनुसार कार्य करून सर्व वृत्तांत शाहूला कळवला. त्यानंतर शाहूने आपला विश्वासू चिटणीस गोविंदराव याला ताराबाईच्या नातवाची भेट घेऊन तो खरोखरच तिचा नातू आहे का याचा तपास करण्यासाठी पाठवले. गोविंदरावाने ताराबाईच्या नातवाची -- राम्राजाची -- दोन तीन वेळा भेट घेऊन हा अस्सल राजपुत्र असल्याची शक्य तितकी खात्री करून घेतली व तसे शाहूस त्याने कळवले. पुढे कोल्हापूरचा अमात्य भगवंत रामचंद्र हा साताऱ्याजवळ आला. कृष्णनदीच्या साक्षीने शपथक्रिया करण्यास खरेतर शाहू स्वतः जाणार होता पण प्रकृती ठीक नसल्याने त्याने आपल्या तर्फेने जगजीवन परशुराम प्रतिनिधी यांस पाठवले. कृष्णा नदीचे जल हाती घेऊन भगवंतराव अमात्याने रामराजा ताराबाईचा नातू असल्याचे शपथपूर्वक सांगितले. या घटनेची बातमी शाहूला पाठवण्यात आली. ताराबाईच्या सांगण्याची सत्यता पडताळून पाहिल्यावर देखील आपल्या हयातीत तिच्या नातवास आणून राज्याभिषेक करण्याची वा भावी वारस म्हणून त्याच्या नावाची घोषणा करण्याची छाती शाहूस झाली नाही. यावरून नजरकैदेत असलेल्या ताराराणीच्या योग्यतेचा अंदाज बांधता येतो. इतिहासकार पुराव्यांच्या आधारे काहीही म्हणोत, परंतु आपल्या हयातीत ताराबाईच्या नातवास साताऱ्यास आणणे म्हणजे आपल्या पायावर धोंडा हाणून घेणे हे शाहूने ओळखले व म्हणूनचं त्याने आपल्या मृत्यूनंतर रामराजास साताऱ्यास आणण्याची आज्ञा केली.
            यावरचं शाहू थांबला नाही तर मृत्युपूर्वी स्वहस्ते दोन याद्या त्याने पेशव्यास लिहून दिल्या. त्या याद्यांनुसार, आपल्या वंशाच्या आज्ञेत राहून राज्य सांभाळण्याची शाहूने पेशव्यास आज्ञा केल्याचे स्पष्ट दिसून येते. याचा असाही अर्थ होतो कि, रामराजास हाताशी धरून ताराबाई राज्यकारभार हाती घेईल ; तसे न घडावे यासाठी पेशव्याने रामराजास हाताशी धरावे असे शाहू पेशव्यास अप्रत्यक्षपणे सुचवत आहे. तसेच, आपल्या वंशाच्या आज्ञेत राहायचे याचा स्पष्ट अर्थ असा कि, रामराजा वगळता इतरांची आज्ञा मानण्याचे कारण नाही व हे इतर म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून फक्त ताराराणी होय !
         दिनांक ४ जानेवारी १७५० रोजी ताराराणीचा नातू रामराजा छत्रपती बनला. तत्पूर्वीचं ताराबाईने आपले राजकीय जाळे विणायला सुरुवात केली होती. १५ डिसेंबर १७४९ रोजी शाहूचे निधन झाले. ताराबाईला आता प्रतिस्पर्धी म्हणून शाहूच्या राणीचा -- सकवारबाईचा -- तेवढा अडथळा होता. तिच्या सुदैवाने पेशव्याची देखील शत्रू सकवारबाईचं असल्याने त्यांनी संगनमताने तिला एकप्रकारे सती जाण्यास भाग पाडले. पहिले आठ - पंधरा दिवस नानासाहेब पेशवा व ताराबाई यांच्यात सौरस्य होते पण पेशव्याने रामराजास हाताशी धरून राज्यकारभार हाती घेण्यास आरंभ करताच ताराराणी चवताळली व तिने स. १७५० च्या नोव्हेंबर अखेर सातारच्या किल्ल्यावर रामराजास भेटीस बोलावून कैद केले. प्रत्यक्ष छत्रपतीचं कैद झाल्याने पेशव्यावर   अडचणीचा प्रसंग उद्भवला. सातारच्या किल्ल्यावर हल्ला चढवून रामराजाची सुटका करण्याचा पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध होता पण धन्याच्या विरुद्ध हत्यार उपसल्याचा गवगवा झाला असता. त्याशिवाय ताराबाईने खरोखरचं रामराजास अटक केली आहे कि, या दोघांनी मिळून नाटक केले आहे याचा प्रथम शोध घेणे त्यास गरजेचे वाटले. तेव्हा त्याने किल्ल्याभोवती चौक्या बसवून पुण्याला निघून जाण्यात धन्यता मानली. मात्र जाताना त्याने सातारा शहरातील छत्रपतींचा सर्व जामदारखाना आपल्या ताब्यात घेतला. ताराबाईच्या हाती काही द्रव्यबळ लागू नये म्हणून त्याने हे कृत्य केले असले तरी आपल्याच मालकाचा जामदारखाना त्याच्या पूर्वपरवानगीशिवाय ताब्यात घेणे म्हणजे एकप्रकारे लूट करणे किंवा दरोडा घालणे होय ! आणि हे कृत्य नानासाहेब पेशव्याने केले.
         रामराजास कैदेत ठेऊन राज्यकारभार करण्याचा ताराबाईने प्रयत्न करून पाहिला पण लवकरचं तिच्या लक्षात आले कि, लष्कराच्या व खजिन्याच्या आभावी आपणांस फारसे काही करता येणे शक्य नाही आणि याच दोन साधनांच्या आधारे प्रबळ होऊन पेशव्याने सर्व राज्यकारभार आपल्या हाती घेतला आहे. तेव्हा तिने पेशव्याच्या विरोधात रणशिंग फुंकले. पोर्तुगीज, मोगल, निजाम, फ्रेंच, इंग्रज, सिद्दी इ. सोबत तिने पत्रव्यवहार सुरु करून पेशव्याच्या विरोधात त्यांची मदत मागितली. पेशवा आणि इतर  दरबारी मानकऱ्यांचे पटत नाही हे ओळखून प्रतिनिधी, सेनापती, आंग्रे इ. ना तिने पेशव्याच्या विरोधात चिथावणी दिली. केवळ एवढ्यावरचं न थांबता शिंदे - होळकरांना देखील पेशव्याच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला. आधीचं नानासाहेब आपल्या या दोन बलदंड सरदारांच्या विषयी साशंक होता त्यात ताराबाईच्या कारस्थानाची भर पडल्याने पेशवा गडबडला. परंतु ताराबाईच्या राजकीय चातुर्याचा खरा फटका त्याला अजून बसायचा होता. नानासाहेबाचा चुलतभाऊ सदाशिवराव यालाचं ताराराणीने अप्रत्यक्षपणे फूस लावून कोल्हापूरची पेशवाई स्वीकारण्यास प्रवृत्त केले. यावरून ताराबाईच्या हिकमती स्वभावाची कल्पना यावी.
           ताराबाईचे कारस्थान खोलवर गेले होते यात शंकाच नाही परंतु, हाताशी सैन्य व द्रव्यबळ नसल्याने तिच्या कारस्थानाचा जोर लटका पडत गेला. तुळाजी आंगऱ्याने पेशव्याला थोडाफार उपद्रव दिला पण तो जास्त काही करू शकला नाही. सेनापती दाभाडे तर डभईच्या तडाख्याने थंडचं झाले होते. उमाबाई दाभाडेने आपला सरदार दमाजी गायकवाड यास ताराबाईच्या मदतीस पाठवले. दमाजी पुण्यावर चालून आला तेव्हा पेशवा निजामाशी लढण्यात मग्न होता. मात्र पेशव्याच्या सरदारांनी दमाजी गायकवाडाचा पराभव करून त्याचे बळ मोडले. ( मार्च १७५१ ) दमाजीचा बंडावा संपुष्टात येताच ताराबाईचे बळ सरले. तिने शरणागती पत्करली. पण तत्पूर्वी आपल्या आक्रस्ताळपणाचे दर्शनही घडवले. शाहूच्या पश्चात गादीवर बसलेला रामराजा हा आपला नातू नाही असे तिने जाहीर केले ! यामुळे खानदानी मराठ्यांमध्ये खळबळ माजली. कारण, कित्येक मराठा सरदारांनी आपल्या मुली रामराजास दिल्या होत्या व ते छत्रपतींचे नातलग बनले होते. तोच रामराजा जर ताराबाईचा नातू नाही तर मग आहे तरी कोण ? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी ताराबाईस विचारले. तिने यावर काय उत्तर दिले ते इतिहासात नमूद नाही.
           रामराजा खोटा असल्याचे जाहीर झाल्यावर ताराबाईचे सहाय्यक तिला सोडून जाऊ लागले. या दरम्यान ताराबाईला देखील समजून चुकले होते कि, पेशव्याशी तडजोड करण्यातचं निभाव आहे. पण सहजी वाकेल ती ताराराणी कसली ? अखेरचा पर्याय म्हणून तिने कोल्हापूरच्या संभाजीला साताऱ्यास येउन राज्य ताब्यात घेण्याची सूचना केली. परंतु, तुम्ही रामराजास मारून टाका मग मी येतो असे संभाजीचे म्हणणे पडले. यामागील त्याचे हेतू स्पष्ट होते. रामराजास आणण्याचा पुढाकार जसा ताराबाईने घेतला तसाच त्याला ठार करण्यातही घ्यावा. म्हणजे परस्पर तिची बदनामी होईल ती निराळी. त्याशिवाय रामराजा जिवंत असताना आपण जर साताऱ्यास गेलो व पुढेमागे आपले आणि ताराबाईचे पटले नाही तर नवा उपद्व्याप करण्यास रामराजारुपी साधन शिल्लक राहू देऊ नये. संभाजीच्या निरोपातील खोच जाणून ताराबाईने आपला हात आवरता घेतला व पेशव्याशी समेट केला. त्यानुसार रामराजा तिच्याच ताब्यात राहील हे पेशव्याने मंजूर केले. तसेच राज्यकारभार आपल्या संमतीने चालवावा, रामराजाच्या नव्हे हि ताराबाईची अट देखील नानासाहेबाने मान्य केली. तेव्हा शपथपूर्वक सर्वांसमोर रामराजा हा आपला नातू नसल्याचे ताराबाईने मान्य केले. ( सप्टेंबर स. १७५२ )
           यानंतर ताराबाईने राजकीय घडामोडींमध्ये फारसा सहभाग घेतला नाही. ताराबाईचे सामर्थ्य पेशवा ओळखून होता. त्यानेही तिला फारसे न दुखवता राज्यकारभार चालवला. अखेर १० डिसेंबर १७६१ रोजी तिचे सातारा येथे निधन झाले. अखेरपर्यंत रामराजा तिच्या कैदेत राहिला. त्याला सोडवण्याचा प्रयत्न पेशव्याने केलाचं नाही. जसा फत्तेसिंग तसाच रामराजा समजून त्यास आहे त्या स्थितीत ठेवण्यात आले. पण फत्तेसिंग व रामराजामधील महत्त्वाचा फरक म्हणजे रामराजा नाममात्र छत्रपती म्हणून कायम  राहिला असला तरी तो राजपुरुष नसल्याने छत्रपतींचा कोणताही अधिकार त्यास मिळाला नाही.
           रामराजाच्या प्रकरणातील नेमके सत्य कधी उजेडांत येईल कि नाही माहिती नाही पण, या बनावाची उभारणी करून समस्त मराठी साम्राज्याला अल्पकाळ का होईना जो हादरा ताराराणीने दिला त्यावरून तिच्या बुद्धीसामर्थ्याची कल्पना येते. तिच्या कल्पक बुद्धीला जर प्रबळ लष्करी सामर्थ्याची जोड मिळाली असती तर नानासाहेबाकडे पेशवेपद राहिलेचं असते असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. रामराजा खोटा असे न सांगता त्यालाच गोडीगुलाबीने तिने आपल्या पक्षास वळवून घेतले असते तर मराठी राज्यातील पेशव्यांचा वाढता प्रभाव मर्यादित होऊन छत्रपतींचे महत्त्व परत वाढीस लागलेचं नसते असे म्हणवत नाही. लष्करी बळावर आपले गेलेले पेशवेपद नानासाहेबाने शाहूकडून अक्षरशः हिसकावून घेतले. पण त्याच नानासाहेबास, ताराबाईने रामराजास पकडून सातरचा किल्ला बळकावला तेव्हा किल्ल्यावर हल्ला चढवण्याचे धैर्य झाले नाही. कारण तो ओळखून होता कि, ताराराणी म्हणजे शाहू नव्हे ! याबाबतीत ताराबाई नानासाहेबास गुरु भेटली ! ! सारांश, अठराव्या शतकातील हिंदुस्थानात होऊन गेलेल्या कर्तबगार स्त्रियांच्या मालिकेत ताराबाईचे नाव अग्रभागी असल्याचे दिसून येते.

सोमवार, २५ मार्च, २०१३

अजातशत्रू ( शाहू -भाग ४ )


             स. १७४० मध्ये बाजीरावाचा मृत्यू झाला त्यावेळी रघुजी भोसले व फत्तेसिंग शाहूच्या आज्ञेने कर्नाटकांत मोहिमेवर होते. रघुजीने या स्वारीत बाजीरावास जे जमले नाही ते करून दाखवले. अर्काटच्या नवाबाचा रघुजीने पराभव केला. अर्काटकरांची बाजू घेण्यास फ्रेंच वळवळ करू लागले तर त्यांनाही रघुजीने तराटणी देऊन गप्प बसवले. तसेच त्रिचनापल्ली सारखे प्राचीन वैभवाचे स्थळ देखील रघुजीने आपल्या ताब्यात घेऊन तेथील मुस्लिम सत्ताधीश चंदासाहेब यास कैद करून साताऱ्यास पाठवून दिले. त्रिचनापल्ली घेतल्यावर रघुजी पुढील बेत आखणार इतक्यांत बाजीराव मरण पावल्याची बातमी आल्यामुळे त्याने मोहीम आटोपती घेतली. त्रिचनापल्ली त्याने मुराराव घोरापड्याच्या ताब्यात देऊन त्याने फत्तेसिंगसोबत परतीची वाट धरली. चिटणीस बखरीचा दाखला घेतला असता असे दिसून येते कि, फत्तेसिंगाचे रघुजीसोबत साताऱ्यास परत येणे शाहूला आवडले नाही. त्याच्या मते फत्तेसिंगाने स्वतः त्रिचनापल्ली येथे राहायला हवे होते. त्यातच मुराराव घोरपड्याच्या ताब्यात त्रिचनापल्लीसारखे ठिकाण दिल्याने शाहूच्या नाराजीत भर पडली. कारण, शाहूच्या आज्ञेने जरी मुराराव कर्नाटकातील मोहिमांमध्ये सहभागी होत असला तरी तो काही शाहूचा अधिकृत सरदार नव्हता. त्यामुळे शाहूची नाराजी स्वाभाविक होती. असे असले तरी, रघुजीसमोर तरी दुसरा पर्याय काय होता ? एव्हाना त्यास फत्तेसिंगाची कर्तबगारी समजून चुकली होती. त्याला एकट्याला मागे ठेवण्यात काही अर्थ नव्हता. म्हणूनच त्याने मुरारावास जवळ करून कर्नाटकातून माघार घेतली.
                 इकडे नानासाहेबाने पेशवेपद मिळाल्यावर एक नवीनचं पराक्रम करून ठेवला. कोल्हापूरच्या संभाजीसोबत त्याने एक गुप्त करार करून शाहूच्या पश्चात संभाजीला सातारच्या गादीवर बसवण्याचे मान्य केले. शाहूची वृद्धावस्था, त्याला पुत्रसंतान नसणे आणि राज्याचा वाढता विस्तार पाहता पुढे काय हा प्रश्न दरबारातील मुत्सद्यांच्या समोर उभा राहू लागला होता. या प्रश्नाचे निरसन करण्याच्या नावाखाली आपापला स्वार्थ साधण्यास नानासाहेब पेशवा व रघुजी भोसले धडपडू लागले. पेशव्याची इच्छा अशी कि, सातारा व कोल्हापूर हि दोन राज्ये एक करावीत. संभाजीपण यावेळी म्हातारा झाला होता आणि त्यालाही मुलबाळ नव्हते. त्याशिवाय तो फारसा कर्तबगार नसल्याने त्यास कधीही गुंडाळून ठेवणे पेशव्याला सहजशक्य होते. मिळून सातारा व कोल्हापूर हि दोन राज्ये एक करून पेशवा आपले सामर्थ्य व महत्त्व वाढवू इच्छित होता. त्याउलट रघुजीचे बेत होते. शाहूची धाकटी राणी सगुणाबाई हि रघुजीच्या आईची चुलत बहिण असल्याने रघुजीच्या मुलांपैकी एकाला दत्तक घेण्याचा सगुणाबाईचा विचार चालला होता व शाहू देखील त्यास अनुकूल होता. पण काही कारणांनी हा बेत अंमलात आणता आला नाही. सातारची गादी आपल्या मुलाला मिळवून देण्याव्यतिरिक्त आणखी एक उद्देश रघुजीच्या मनात होता व तो म्हणजे नानासाहेबास पेशवेपदावरून दूर करणे हा होय ! सारांश, स. १७४० - ४१ पासून सातारचे मुत्सद्दी शाहूच्या मरणाची वाट बघू लागले होते.
               स. १७४३ च्या मे व जून महिन्यात शाहू आजारी पडला. त्याकाळात सर्व हिंदुस्थानातील सत्ताधीशांचे लक्ष साताऱ्यात काय होते याकडे लागले होते. परंतु, सुदैवाने शाहू आजारातून उठला. पण यावेळी त्याच्यात पूर्वीसारखा जोर राहिला नव्हता. त्यातचं त्याच्या घरातील प्रकरणांची भर पडली. त्याच्या दोन्ही राण्यांचे आपसांत पटत तर नव्हतेच पण दरबारी राजकारणात देखील त्या नको तितका हस्तक्षेप करीत. न्याय - निवाड्याच्या बाबतीत देखील त्या पुढाकार घेत व न्याय - अन्यान न पाहता आपल्या माणसांची बाजू उचलून धरत. त्यांच्या या मनमानी कारभारा समोर शाहूचे देखील फारसे काही चालत नव्हते.  वृद्धावस्था, अस्थिर प्रकृती, बायकांची भांडणे इ. मुळे तो पुरता वैतागून गेला. त्यातचं अलीकडे नानासाहेब पेशवा शाहूच्या पूर्वपरवानगी शिवाय कित्येक राजकीय प्रकरणे स्वबळावर उरकू लागल्याने त्याच्याविषयी शाहू साशंक बनला आणि स. १७४७ च्या जानेवारी - मार्च दरम्यान केव्हातरी त्याने नानासाहेबास पेशवेपदावरून दूर केले. नानासाहेबाच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी पेशवा बनवण्याचा शाहूचा विचार होता पण आपल्या मुत्सद्देगिरी व लष्करी सामर्थ्याच्या बळावर नानासाहेबाने इतर मराठी मुत्सद्द्यांना व सरदारांना असा धाक घातला होता कि, त्याने रिक्त केलेलं पंतप्रधानपद स्वीकारण्यास कोणी पुढे येईना. त्याशिवाय आपल्या लष्करी बळाचा खुद्द शाहुवर देखील प्रयोग करण्यास नानासाहेबाने मागेपुढे पाहिले नाही.  शाहूस लिहिलेल्या एका पत्रात त्याने आपले पद परत न दिल्यास आपण ' बाहेरील इज्जतीचा दरकार सोडून बसू ' अशी स्पष्ट शब्दांत धमकी दिली. इज्जतीचा दरकार सोडून नानासाहेब काय करणार होता ? कदाचित लष्करी बळावर त्याने शाहूला कैद करून संभाजीला साताऱ्यास आणले असते किंवा इतर कोणाला तरी सातारची गादी दिली असती किंवा त्याने आपली स्वतंत्र सत्ता स्थापन केली असती. सारांश, नानासाहेबाने आपले लष्करी बळ शाहूच्या निदर्शनास आणून देताच एप्रिलमध्ये शाहूने त्यास पेशवेपदाची वस्त्रे दिली व या प्रकरणावर पडदा टाकला. ( स. १७४७ )
                 यानंतर राज्याच्या कारभारात शाहूने पूर्वीसारखे लक्ष घालणे सोडूनचं दिले. तसेही त्याच्या हाती आता फारसे अधिकार शिल्लकचं कुठे राहिले होते म्हणा ! फक्त सातारा व आसपासच्या प्रदेशावर आता त्याची हुकुमत होती व ती हुकुमत देखील किती पोकळ होती हे त्याने नानासाहेबास पेशवेपदावरून दूर केल्यावर त्याच्या लक्षात आले. त्यातच २५ ऑगस्ट १७४८ रोजी शाहूची धाकटी राणी सगुणाबाईचे निधन झाल्याने तो मनातून पुरता खचला. त्याची प्रकृती झपाट्याने खालावू लागली. शाहूचा अंतकाळ समीप आल्याचे जाणून मुत्सद्दी पुढील उलाढालीस प्रवृत्त झाले. शाहूची थोरली राणी सकवारबाईने विठोजीराजांच्या व शरीफजी राजांच्या वंशजांपैकी एकाला दत्तक घेण्याचा बेत आखला. नानासाहेबाचे संभाजीसोबतचे स्नेहसंबंध वाढीस लागले. रघुजी भोसले यात सहभाग घेणार पण त्याची पुरस्कर्ती सगुणाबाई आता हयात नसल्याने त्याने यात सहभाग घेतला नाही. याच सुमारास कैदेत असलेल्या ताराबाईने आपला नातू हयात असल्याने जाहीर करून मुत्साद्द्यांमध्ये आणखीनचं गोंधळ माजवला. खुद्द शाहूला यातील कोणतीच मसलत पसंत नव्हती. तरीही नाईलाजाने त्याने ताराबाईच्या नातवास आपल्या माघारी साताऱ्यास आणण्याचे ठरवले. परंतु, तत्पूर्वी ताराबाईचा महत्त्वकांक्षी व खटपटी स्वभाव जाणून त्याने ताराबाई ज्यास आपला नातू म्हणत आहे तो खरोखरचं राजपुत्र आहे कि नाही याची गोविंदराव चिटणीस मार्फत खात्री करून घेतली. आपल्या हातातील डाव ताराबाईच्या हातात जात आहे हे पाहून सकवारबाईने कोल्हापूरच्या संभाजीस साताऱ्यास येण्याची सूचना केली. त्यानुसार संभाजी कोल्हापुरातून बाहेर देखील पडला पण शाहूला हे समजताच त्याने संभाजीला परत जाण्याची आज्ञा केली. तेव्हा संभाजी चुपचाप माघारी वळाला. इकडे, पुढील निरवानिरव करण्याची शाहूने तयारी चालवली व आपल्या सर्व प्रमुख सरदारांना भेटीस बोलावले. बव्हंशी प्रधान व सरदार पेशव्यास अनुकूल असल्याने शाहूच्या आज्ञेनुसार फारसे कोणी साताऱ्यास येउन दाखल झाले नाही. तेव्हा निरुपायाने शाहूने स्वहस्ते दोन याद्या नानासाहेब पेशव्यास लिहून दिल्या. या याद्या म्हणजे शाहूचे एकप्रकारे राजकीय मृत्यूपत्रचं होय ! या याद्यांनुसार वागण्याचे नानासाहेबाने मान्य केले. तसेच शाहूच्या इच्छेनुसार त्याच्या पश्चात ताराबाईचा नातू रामराजा यास साताऱ्यास आणून त्यास राज्यपद देण्याचेही पेशव्याने मान्य केले. ( ऑक्टोबर १७४९ )
                पुढे लवकरचं १५ डिसेंबर १७४९ रोजी वृद्धापकाळाने शाहूचे निधन झाले. त्याची पत्नी सकवारबाई हिने सहगमन केले. अर्थात, तिने स्वखुशीने सहगमन केली कि तिला तसे करण्यास भाग पाडले हा एक वादाचा मुद्दा आहे पण प्रस्तुत ठिकाणी त्या वादात शिरण्याचे काही प्रयोजन नाही. शाहूच्या मृत्यूनंतर त्याच्या इच्छेनुसार ४ जानेवारी १७५० रोजी ताराबाईचा नातू, रामराजा यास सातारच्या गादीवर छत्रपती म्हणून बसवण्यात आले.
                इथपर्यंत आपण शाहूच्या हयातीचा व राजकीय कारकीर्दीचा धावता आढावा घेतला. छ. शिवाजी महाराजांचा नातू व संभाजीचा मुलगा म्हणून ज्या प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा मराठी इतिहास वाचक मंडळी शाहुकडून बाळगून असतात, त्या अपेक्षेप्रमाणे शाहूचे वर्तन घडले नव्हते हे उघड आहे. मात्र आपल्या पराक्रमी आजोबाच्या कीर्तीला कलंक लागेल असेही काही कार्य / कृत्य त्याने केले नाही. राजकारणात एक छत्रपती म्हणून वावरतांना स. १७२० नंतर शाहू हळूहळू कमजोर पडत चालल्याचे दिसून येते. आरंभी मोहिमांवर स्वतः जाणारा शाहू येथून पुढे स्वारीवर जाण्याचे टाळताना दिसू लागला. स. १७२० पूर्वी त्याच्या सरदारांचे कार्यक्षेत्र मर्यादित होते व शाहू स्वतः मोहिमेवर जात असल्याने त्यांच्या स्वैर वर्तनावर काहीसे नियंत्रण होते. परंतु बाजीरावाच्या काळात हि परिस्थिती साफ बदलली. आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत बाजीरावाने आपले महत्त्व व सामर्थ्य इतके वाढवले कि, राजकारणाचे केंद्र सातारा येथून पुण्यास कधी आले हे लोकांना उमगलेचं नाही. शाहूच्या आज्ञेने बाजीराव जंजिरा स्वारीस गेला आणि मध्येच मोहिमेतून अंग काढून बाजूला झाला. पण बाजीराव म्हणजे मराठी राज्य वा शौर्य नाही हे शाहूने, बाजीरावाच्या अनुपस्थितीमध्ये जंजिरा मोहीम चालवून सिद्ध केले. जंजिऱ्याच्या स्वारीत शेवटी मानाजी आंगऱ्यास मदत करण्यासाठी म्हणून चिमाजीने सहभाग घेतला आणि यशाचा वाटेकरी बनला. शाहूच्या एकूण राजकीय कारकिर्दीतील १७२० -४० हि वीस वर्षे यासाठी महत्त्वाची आहेत कि, बाजीराव - चिमाजीचे पराक्रम एकापाठोपाठ एक अशा प्रकारे झळकल्याने पेशवेबंधूंना कमालीचे महत्त्व आले आणि त्यामानाने इतर प्रधान व सरदारांचे महत्त्व घटत गेले. इंचबर्डन व गोर्डन या इंग्रज वकिलांनी स. १७३९ च्या जून महिन्यात शाहू व पेशव्यासोबत झालेल्या भेटीत हाच निष्कर्ष काढला.   
                एका बाबतीत मात्र शाहूने पेशव्यांना फारसे जुमानल्याचे दिसत नाही व ती बाब म्हणजे कोल्हापूरकर संभाजीचे प्रकरण ! कोल्हापूरचे राजकारण त्याने स्वतःहून चालवले. त्यात पेशव्याचा किंवा इतर कोणाचा शिरकाव होऊन दिला नाही पण हि कसर पुढे नानासाहेबाने बहरून काढली. पेशवेपद मिळताच संभाजीला शाहूच्या नंतर सातारची गादी देण्याचे मान्य करून गडी मोकळा झाला. नानासाहेबाच्या काळात आजारपण व घरगुती भांडणे यांमुळे शाहू व्यापला जाउन राजकारणावरील त्याचे लक्ष उडाले. पण हाच काळ राजकीय संक्रमणाचा असल्यामुळे आणि अशा परिस्थितीला तोंड देण्याची कुवत नानासाहेबाची नसल्याने भविष्यात मारतही राज्यावर पानिपतचे अरिष्ट ओढवले. उदाहरणार्थ, याच काळात शिंदे - होळकरांनी जयपूर प्रकरणी नसत्या भानगडी करून राजपुतांचे वैर पदरात पाडून घेतले. शाहू व राजमंडळ यांच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या नादात शिंदे - होळकर स्वतंत्रपणे वागू लागल्याचे नानासाहेबाच्या लक्षात आलेच नाही. पुढे आपली चूक ध्यानात आल्यावर त्याने या दोन सरदारांमध्ये भांडणे लावून त्यांना दुर्बल करण्याचे आत्मघातकी धोरण स्वीकारले.
                   बंडखोर सरदारांचा बंदोबस्त करण्यात कित्येकदा शाहूने नको तितका उदारपणा दाखवल्याचे दिसून येते. आरंभीच्या काळात त्याचा स्वभाव तितका मृदू नव्हता. परशुरामपंत प्रतिनिधी ताराबाईस सोडून शाहूला येउन मिळाल्यावर त्याने त्यास आपल्या तर्फेने प्रतिनिधीपद दिले. पुढे चंद्रसेन जाधवाच्या बंडास परशुरामाची फूस असल्याने लक्षात आल्यावर शाहूने परशुरामास कैद करून त्याचे डोळे काढण्याची आज्ञा फर्मावली. परंतु, खंडो बल्लाळने मध्ये पडून प्रतिनिधीचा बचाव केला. त्यामुळे परशुरामाचे डोळे वाचले मात्र कैद काही टळली नाही. प्रतिनिधीच्या बाबतीत इतकी कठोरता धारण करणारा हाच शाहू पुढे दमाजी थोरात, उदाजी चव्हाण इ. च्या बाबतीत मात्र जालीम उपाय योजताना दिसत नाही. अशा सरदारांना वारंवार माफी देऊन त्याने एकप्रकारे या सरदारांना व इतरांना देखील आपल्या विरोधात बंड करण्यास प्रोत्साहन दिल्यासारखे झाले.  
                    जो प्रकार बंडखोरांच्या बाबतीत तोच आपल्या चढेल नोकरांच्या बाबतीत करून शाहूने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. पेशवा - सेनापती, पेशवा - आरमारप्रमुख, पेशवा - प्रतिनिधी, पेशवे - भोसले इ. वादांत त्याने निर्णायक अशी भूमिका कधी घेतलीच नाही. वस्तुतः शाहू हा धनी असून इतर त्याचे नोकर होते पण असे असतानाही शाहूला आपल्याच नोकरांची भीड पडत गेली. हा कदाचित प्रदीर्घ मोगली कैदेचा परिणाम तर नसावा ना ! आपल्यापेक्षा जो जबरदस्त असेल त्याच्यासमोर मान झुकवण्याची जी सवय शाहूला कैदेत असताना लागली होती ती नंतरही कायम राहिली होती असे कित्येकदा वाटते. पण याचा परिणाम मराठी राज्याला अतिशय घातक असा झाला.      बाजीरावाने सेनापतीला लोळवले. आंगऱ्यांच्या विरोधात इंग्रजांशी हातमिळवणी केली. प्रतिनिधीच्या ईर्ष्येने मुद्दाम जंजिरा मोहीम रखडवली. नानासाहेबाने पुढे कर्नाटकात इतर कोणत्याही मराठी सरदाराचा शिरकाव होऊ दिला नाही. शाहूच्या पाठबळावर बाबूजी नायकाने कर्नाटकात जाण्याचा प्रयत्न केला पण प्रसंगी निजामाशी संधान बांधून नानासाहेबाने बाबूजीचा कर्नाटकातून साफ उठावा  केला. याचा परिणाम म्हणजे, कर्नाटकात मुस्लिम आणि युरोपियन सत्ता प्रबळ होऊन तो भाग मराठी राज्याच्या ताब्यातून कायमचा निघून गेला. शाहूने वेळीच पेशव्यांना न रोखल्यामुळे पेशव्यांची हिंमत व सामर्थ्य वाढतच गेले. पुढे आपल्या विरोधकांचा तडकाफडकी बंदोबस्त करून पेशव्यांनी इतर प्रधानांवर आणि सरदारांवर आपला वचक बसवला व हा प्रकार छत्रपती असून देखील शाहू निमुटपणे पाहत बसला.
                      शाहूच्या या उदार आणि शांत वृत्तीचा फायदा कोल्हापूरकरांनी भरपूर घेतला. संभाजीने शाहुवर कित्येकदा मारेकरी घातले, पण शाहूने संभाजीचा कायमचा बंदोबस्त करण्याचे कधी मनावर घेतले नाही. त्याच्या जागी खुद्द कोल्हापूरचा संभाजी वा ताराबाई असते तर मिळालेल्या संधीचे भांडवल करून त्यांनी शाहूचा केव्हाच निकाल लावला असता. परंतु, शाहूने मात्र असे काही केल्याचे दिसून येत नाही. शाहूवर तो मोगलाधार्जिणा असल्याचे अनेक आरोप होतात. परंतु, हे आरोप अजूनपर्यंत कोणी पुराव्याने सिद्ध केलेले नाहीत. त्याचप्रमाणे त्याच्यामुळेचं निजामाचे अस्तित्व शिल्लक राहिले असेही म्हटले जाते पण त्यातही तथ्य नाही. पालखेड प्रसंगी बाजीराव निजामाला लोळवेल  असे खुद्द बाजीरावाला वाटत नव्हते तर इतरांची काय कथा ! पालखेड नंतर निजामाशी भोपाळ येथे बाजीरावाचा संग्राम घडून आला पण, सोबत तोफा - बंदुका नसल्याने त्याला निजामाचा काटा काढता आला नाही. पुढे नानासाहेबाच्या कारकिर्दीत शाहू हयात असेपर्यंत निजामाशी प्रत्यक्ष असा संघर्षचं न उद्भवल्याने लढाईचा प्रसंग आलाच नाही. शाहूच्या निधनानंतर पेशवे - निजाम यांच्यात वैमनस्य आले पण त्याची चर्चा येथे अनावश्यक आहे.
    सारांश, शाहूच्या एकूण जीवनाचा व राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतल्यास असे दिसून येते कि, मराठ्यांचा हा राजा आपल्या आजोबा वा बापाप्रमाणे पराक्रमी, कर्तबगार व धोरणी नसला तरी नेभळट, कर्तुत्वशून्य देखील नव्हता. बालपण शत्रूच्या कैदेत गेल्याने त्याच्या मनाची जी काही जडणघडण झाली तिचा विचार केल्याखेरीज त्याच्या स्वभावाचा व वर्तनक्रमाचा अंदाज येणार नाही. ज्या ठिकाणी सतत आपल्या जीवितावर वा धर्मावर घाला पडण्याची धास्ती आहे अशा ठिकाणी १७ - १८ वर्षे काढावी लागल्याने कोणाचाही स्वभाव हा शांत व उदार आणि तडकाफडकी निर्णय घेण्यास असमर्थ असा बनणे स्वाभाविक होते. शाहूच्या बाबतीत हेच घडून आले. स. १७०७ मध्ये मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यावर पहिल्या दोन - चार वर्षांत त्याचा मुळचा स्वभाव दिसून आला. पण हि उमेद अल्पकाळचं टिकली आणि पुढे त्याची वृत्ती शांत होत गेली. शाहू हा शिवाजी - संभाजीच्या मनाने चैनी व विलासी असला तरी राज्यकारभाराकडे त्याचे दुर्लक्ष कधी झाले नाही. औरंगजेबाच्या कैदेत असताना शाहू सतत त्याच्या सोबत वावरत असल्याने स्वारीत, दरबारात कसे वर्तन करायचे, कारभार कसा करायचा याचे अप्रत्यक्ष शिक्षण त्यास तिथेच मिळाले होते. त्या शिक्षणाचा फायदा त्यास पुढील आयुष्यात बराच झाला. मुक्कामात वा प्रवासांत कोठेही जनतेची तक्रार ऐकून त्यावर त्वरित निर्णय देण्यास शाहू नेहमी तत्पर असे.
        तात्पर्य, फारसा महत्त्वकांक्षी नसला तरी कर्तबागार पण काहीसा दुबळ्या मनाचा हा दुसरा शिवाजी उर्फ शिवाजी, बखरकारांनी गौरवल्याप्रमाणे ' अजातशत्रू ' निश्चितचं होता.  अकारण कोणाला दुखवायचे नाही, आपली खोड काढणाऱ्यास फारसे गंभीर शासन करायचे नाही अशा राज्यकर्त्याचा शत्रू तर कोण बनणार व याच्याशी वैर ते काय धरणार ?

रविवार, २४ मार्च, २०१३

अजातशत्रू शाहू ( भाग - ३ )


                स. १७२० मध्ये बाजीरावाकडे पेशवेपद आल्यावर सातारच्या राजकारणास निराळे वळण लागले. स. १७२८ पर्यंत दरबारावर शाहूचे वर्चस्व होते पण स. १७२८ मधील  पालखेडच्या लढाईनंतर दरबारासह खुद्द शाहूवर देखील बाजीरावाचा प्रभाव वाढू लागला. पालखेडच्या यशाचा हा दुष्परिणाम सातार दरबार तसेच शत्रू दरबारातील मुत्सद्यांच्या नजरेतून सुटला नाही. स. १७३० नंतर परराज्यातील वकील व मुत्सद्दी थेट सातार दरबारसोबत बोलणी न करता पुण्याला शनिवारवाड्याचे उंबरठे झिजवू लागले. परंतु याविषयी या ठिकाणी अधिक लिहिणे योग्य नाही. प्रसंगानुसार याची माहिती पुढे येईलच. 
             स. १७२४ मध्ये दक्षिणचा सुभेदार मुबारीझखान व निजाम यांच्यात तंटा निर्माण झाला. मुबारीझ हा मोगल बादशहाचा अधिकारी म्हणून तर निजाम बंडखोर म्हणून लढण्यास समोरासमोर आले. दक्षिणेत स्वतंत्र सत्ता स्थापण्याचा निजामाचा बेत मोगल दरबारांत आता उघड झाला होता. त्याचा हा बेत हाणून पाडण्यासाठी खुद्द मोगल बादशहा प्रयत्नशील होता व त्याच्याच प्रोत्साहनाने मुबारीझखान निजामाच्या विरोधात दंड थोपटून उभा राहिला. या झगड्यात शाहूच्या नेतृत्वाखालील मराठी फौजांची गरज दोन्ही पक्षांना होती व मोगल बादशहाने शाहूला, मुबारीझखानास मदत करण्याचा हुकुमही पाठवला होता. परंतु, शाहूच्या संमतीने बाजीराव, दाभाडे, भोसले इ. सरदार निजामाच्या मदतीस गेले व स. १७२४ च्या सप्टेंबर अखेर साखरखेडले येथे झालेल्या लढाईत मुबारीझखानाचा पराभव होऊन तो मारला गेला आणि दक्षिणेत निजामाची सत्ता कायम झाली. स. १७१९ मध्ये बाळाजी विश्वनाथाने दिल्लीहून आणलेल्या सनदांनुसार दक्षिणच्या सहा सुभ्यातुन सरदेशमुखी व चौथाई वसुलीचे हक्क शाहूला देण्याचे निजामाने मान्य केले होते. त्या भरवशावर शाहूने निजामाला मदत केली पण एकदा वेळ निघून गेल्यावर निजामाने आपण त्या गावचेच नाही असे दाखवून शाहूला हात चोळत बसायला लावले.
            मोगलांच्या कैदेतून सुटका झाल्यावर परसोजी भोसल्याची शाहूला मोठी मदत झाली होती. परसोजी मरण पावल्यावर कान्होजी भोसले अधिकारावर आला. फौजबंद व स्वतंत्र वृत्तीचा असल्याने कान्होजी हा इतर मराठी सरदारांशी - विशेषतः पेशव्याशी अधिक  फटकून वागे. भोसले - पेशवे घराण्याची हि चुरस पेशवाई अखेर पर्यंत दिसत असली तरी तिचा आरंभ बाजीरावाच्या काळातच झाल्याचे दिसून येते. स. १७२४ - २५ मध्ये कान्होजी निजामाच्या तंत्राने चालू लागल्यामुळे स्वतः शाहूने त्याच्यावर स्वारी केली. त्यावेळी प्रत्यक्ष भेटीत शाहूने त्याची समजूत घालून त्यास बाजीरावासोबत कर्नाटक स्वारीस पाठवले. परंतु घरातील कटकटी व बाजीरावा सोबतची सत्तास्पर्धा यांमध्ये कान्होजी गुरफटला जाउन त्याच्या हातून विशेष असे काही कार्य घडून आले नाही. पुढे स. १७२९ - ३० मध्ये त्याने निजामाशी स्नेहसंबंध जोडून त्याच्याकडे जाण्याची तयारी केली. त्यावेळी शाहूने, कान्होजीचा पुतण्या रघुजी यास, कान्होजीचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवली. रघुजीने कान्होजीला कैद करून साताऱ्यास पाठवले. तेथे सात वर्षांची कैद भोगून बंदिवासातच त्याचा मृत्यू झाला. कान्होजी भोसल्याच्या प्रकरणी बाजीरावाने आपल्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाउन लक्ष घातल्याने या दोघांचा खटका उडणे स्वाभाविक होते. त्यात कान्होजीचा पुतण्या व इतर नातलग त्याच्या विरोधात असल्याने कान्होजीला दुर्बल करणे बाजीरावास काहीसे सोपे गेले. या प्रकरणी एक राजा म्हणून पुढाकार घेऊन आपल्या सरदारांना आळ्यात ठेवण्याचे जे कार्य शाहूने पार पाडायला हवे होते, ते पार पाडण्यास तो पुरता असमर्थ ठरला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, ताराबाईच्या विरोधातील समरप्रसंग अपवाद केल्यास स. १७०८ - ९ नंतर मोहिमांवर जाण्याचे शाहूने साफ टाळल्याचे दिसून येते. अर्थात, त्याचा हा निर्णय त्याने स्वेच्छेने घेतला होता कि परिस्थितीमुळे तो तसा वागत गेला हे समजायला मार्ग नाही, पण जाग्यावर बसून राज्य सांभाळण्याचे व राज्याचा विस्तार करण्याचे कार्य करता येत नाही हे त्याच्या लक्षात आले नाही. याचा परिणाम म्हणजे सातारच्या आसपासचे राजकारण सोडल्यास दूरवरील राजकारणे -- उदा. राजपुताना, गुजराथ, दिल्ली, हैद्राबाद इ. -- करण्यास किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यास तो साफ अपयशी ठरला आणि या राजकारणांचे सर्व नियंत्रण बाजीराव पेशव्याकडे गेले. बाजीरावाने हे हेतुपूर्वक केले असेही म्हणता येऊ शकते पण या ठिकाणी हे पण लक्षात घेतले पाहिजे कि, जर बाजीराव पुढे आला नसता तरी शाहूचे अधिकार नियंत्रित करण्यास कोणी मराठी सरदार वा अष्टप्रधान मंडळातील कोणी प्रधान पुढे आलाच नसता असे नाही. राजारामाच्या कारकिर्दीचा दाखला घेतल्यास संताजी व धनाजीने त्यास कित्येकदा वाकवल्याचे दिसून येते. खुद्द शाहूला देखील धनाजी - चंद्रसेन या पिता - पुत्रांनी काय कमी त्रास दिला होता. सारांश, स. १७२० नंतर जसजसा मराठी राज्याचा विस्तार होऊ लागला तसतसा शाहूच्या अधिकारांचाही संकोच होत गेला.
                 शाहूच्या कारकिर्दीत अनेक नवीन संस्थाने उदयास आली, त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे भोसले घराणे होय ! स. १७०७ मध्ये शाहू नगरला आला. त्यावेळी दौलताबादजवळील पारद गावचे एक प्रकरण उद्भवले. शाहूच्या सैन्यातील लोक रसद गोळा करण्यासाठी फिरत असताना पारद गावच्या पाटलाने त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा शाहूची पथके गावावर चालून गेली. गढीच्या आश्रयाने गावकरी व पाटील लढू लागले. या लढाईत पारद गावचा पाटील शहाजी लोखंडे हा मारला गेला आणि गाव शाहूच्या ताब्यात आले. मृत पाटलाची पत्नी आपल्या लहान मुलास घेऊन शाहूच्या भेटीस आली व मुलाला शाहूच्या पायांवर घालून अभय मागितले. शाहूने उदार मनाने त्यांना माफी दिली व पारद गाव इनाम म्हणून दिले. त्याशिवाय त्याने आणखी एक गोष्ट विशेष केली. मृत लोखंडे पाटलाच्या मुलास आपल्या सोबत बाळगले व त्याचे नाव फत्तेसिंग भोसले असे ठेवले. या फत्तेसिंगाचा एका राजपुत्राप्रमाणे थाट ठेवण्यात आला. त्याची सर्व जबाबदारी शाहूने आपली उपस्त्री विरुबाई हिच्यावर सोपवली. विरुबाई हि जरी शाहूची लग्नाची बायको नसली ती त्याने तिचा मान महाराणीप्रमाणेचं ठेवलेला होता. स. १७४० अखेर विरुबाईचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या खाजगी खर्चासाठी तोडून दिलेला अक्कलकोट परगणा शाहूने फत्तेसिंगास दिला. अशा प्रकारे अक्कलकोट संस्थानची निर्मिती झाली खरी, पण तत्पूर्वीच फत्तेसिंगाच्या मर्यादा शाहू व दरबारी मुत्सद्द्यांच्या लक्षात आल्याने पुढील राजकारणात फत्तेसिंगास फारसे महत्त्व राहिले नाही. शाहूच्या पश्चात इतर सरदार व प्रधानांप्रमाणेचं अक्कलकोटकर देखील पेशव्यांच्या प्रभावाखाली आले.
              फत्तेसिंगास भागानगरचा सुभा देऊन त्यास कर्नाटक प्रांतात पाठवण्याचा शाहूचा विचार होता. त्यानुसार त्याने स. १७२५ मध्ये फत्तेसिंगाच्या नेतृत्वाखाली पेशवे, प्रतिनिधी, सेनापती इ. प्रमुख मंडळी कर्नाटकात रवाना केली. या स्वारीमागे काही विशेष राजकीय कारणेदेखील होती. तंजावारास व्यंकोजीचा वंशज शरफोजी राज्य करत होता. त्यास आसपासच्या मोगल अंमलदारांनी उपद्रव दिल्याने त्याने शाहूकडे मदतीची याचना केली. तसेच याच सुमारास निजाम देखील कर्नाटक प्रांतात जाण्याच्या बेतात होता. अशा परिस्थितीमध्ये शाहूने तातडीने फत्तेसिंगास कर्नाटकात रवाना केले. फत्तेसिंग हा मोहीमप्रमुख असला तरी पेशवा, प्रतिनिधी, सेनापती, सरलष्कर इ. बड्या धेंडांना रगडून त्यांजकडून काम करून घेण्याची त्याची कुवत नव्हती. तसेच शाहूने त्याचा मान राजपुत्रासारखा ठेवला असला तरी तो राजघराण्यातील नाही याची जाणीव त्याच्यासहित इतरांना असल्याने त्याच्या अधिकारांना तशाही मर्यादा पडत होत्या. विशेष काही कार्यभाग न साधता मे १७२६ मध्ये थोडीफार खंडणी वसूल करून फत्तेसिंग मागे फिरला. या स्वारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे संताजी घोरपडेचा वंशज व गुत्ती संस्थानचा संस्थापक मुराराव घोरपडे शाहूच्या आज्ञेने फत्तेसिंगास सामील झाला होता. शाहूच्या फौजा साताऱ्यास परत येण्यास निघाल्या त्याचवेळी निजामाने कर्नाटकात जाण्यची तयारी चालवली. तेव्हा निजामाला पायबंद देण्यासाठी शाहूने स. १७२६ च्या नोव्हेंबरमध्ये फिरून एकदा फत्तेसिंगास सर्व प्रमुख सरदारांसह कर्नाटकांत पाठवले. यावेळी फत्तेसिंग स्वतः कलबुर्गा येथे चौथाई वसुलीला गेला तर बाजीराव तसाच पुढे निघून श्रीरंगपट्टणला थडकला. आदल्या स्वारीप्रमाणेच फत्तेसिंगाची हि मोहीम साफ अपयशी झाली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पेशवे - प्रतिनिधी - सेनापती यांच्यातील अंतर्गत लाथाळी हे होय. त्यामुळे मोहीम फक्त रेंगाळत गेली. त्याशिवाय शाहूचे प्रमुख सरदार दूर कर्नाटकांत गेल्याचे पाहून निजामाने कर्नाटक प्रांती न जात कोल्हापूरकर संभाजीला हाताशी धरून खुद्द शाहूलाच राज्यासनावरून खाली खेचण्याचा डाव आरंभला. त्यामुळे शाहूने तातडीने कर्नाटकातील फौजा मागे बोलावल्या. अशा प्रकारे, छ. शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयानंतर प्रथमचं दक्षिण दिग्विजयास बाहेर पडलेल्या मराठी फौजांना दोनवेळा अपयश घेऊन मागे यावे लागले. मात्र फत्तेसिंग हा विशेष कर्तुत्ववान नसल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी टाकणे बरोबर नाही एवढा धडा मात्र शाहूला या कर्नाटक मोहिमांमधून मिळाला. त्याचप्रमाणे शाहूच्या सरदारांनीही फत्तेसिंगाच्या कुवतीचा अंदाज घेतल्याने पुढील राजकारणात त्यास त्यांनी फारसे महत्त्व दिलेच नाही.
                           मोगल बादशाहाने जरी शाहूला छ. शिवाजी महाराज निर्मित स्वराज्याचा वारस म्हणून मान्यता दिली असली तरी स्वराज्याचे खरे मालक आपणचं हि भावना जशी ताराबाईची होती तशीच संभाजीची देखील होती. संभाजीची मनःस्थिती चंद्रसेन जाधव पूर्णतः ओळखून होता. ताराबाई कैदेत जाण्यापूर्वी किंवा कोल्हापुरच्या गादीवर संभाजी आल्यावर केव्हातरी चंद्रसेन निजामाच्या चाकरीत दाखल झाला होता. परंतु, असे असले तरी कोल्हापुरकरांशी त्याचा स्नेहसंबंध होताच. जाधवाच्या सल्ल्याने निजामाने संभाजीला शाहूविरोधात चिथावणी दिली. शाहू विरोधात लढण्याची संभाजीची तयारी होताच स. १७२६ मध्ये निजामाने कर्नाटक प्रांती जाण्याची हूल उठवून शाहूला कर्नाटकात सैन्य पाठवण्यास भाग पाडले. स. १७२६ अखेरीस शाहूच्या फौजा कर्नाटकात जाताच निजाम व संभाजी उघडपणे शाहूच्या विरोधात चालून आले. वास्तविक, संभाजी असा काहीतरी आततायीपणा करेल म्हणून स. १७२५ अखेर शाहूने त्याच्यासोबत एक तह केला होता. त्यानुसार दोघांच्या फौजा जो काही मोगलांचा प्रांत आपल्या ताब्यात घेतील त्यात उभयतांची निम्मी निम्मी वाटणी असणार होती. उदाहरणार्थ, जर संभाजीने दक्षिणेतील मोगलांचा मुलुख जिंकला तर त्यातील अर्धा त्याने शाहूला द्यायचा आणि शाहुने माळवा, गुजराथ इ. प्रांतात संभाजीला अर्धा वाटा द्यायचा असे ठरले. संभाजीला तर असा निम्मा वाटणीचा व्यवहार मुळातचं नको होता. परंतु, याचवेळी निजामासोबत चाललेले कारस्थान फळास न आल्याने त्याने वरवर तहास मान्यता दर्शवली. इकडे निजामाने शाहूचे सुलतानजी निंबाळकर, चिमणाजी दामोदर हे प्रमुख सरदार फितवले. मुख्य फौज कर्नाटकात गेलेली, जवळचे भरवशाचे सरदार शत्रूला फितूर झालेले अशा स्थितीत देखील शाहूने आपले मनोधैर्य कायम राखले. त्याने कर्नाटकातील सैन्याला ताबडतोब मागे फिरण्याचा आदेश दिला. तसेच कान्होजी भोसले, रायाजी जाधव इ. सरदारांच्या मदतीने निजामाला रोखण्याचाही प्रयत्न केला. शाहूच्या सुदैवाने कोल्हापूरचा संभाजी युद्धकर्मांत तितकासा कुशल नसल्याने त्याच्यावर एका आघाडीचे नेतृत्व सोपवणे निजामाला शक्य झाले नाही. उलट संभाजीच्या संरक्षणासाठी त्याला सतत सोबत बाळगावे लागले. परिणामी शाहूच्या विरोधात एकदम दोन - तीन आघाड्या उघडून लढाई घेण्याचा जो निजामाचा आरंभीचा उद्देश होता तो साफ बाजूला पडला. त्यामुळे त्याच्या स्वारीचा वेग मंदावून कर्नाटकातील मराठी सरदारांना महाराष्ट्रात परतण्यास सवड प्राप्त झाली. लष्करी मोहिमेचा वेग मंदावल्याचा शत्रूला फायदा घेत येऊ नये यासाठी निजामाने मग शाहू आणि बाजीराव यांच्यात संशयाचे वातावरण निर्माण केले व त्यात तो यशस्वी देखील झाला. काही काळ बाजीराव व शाहू एकमेकांच्याविषयी साशंक झाले होते पण लवकरचं त्यांच्यात एकी निर्माण झाली व स. १७२८ च्या मार्च महिन्यात मराठी फौजांनी पालखेड येथे निजामाचा पराभव केला. यावेळी झालेल्या तहात निजामाने शाहूच्या राजवटीस मान्यता दिली. दक्षिणेतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या शाहूच्या हक्कांना देखील त्याने मंजुरी दिली, पण संभाजीला शाहूच्या ताब्यात देण्याची अट त्याने मानली नाही. तहाची वाटाघाट सुरु असतानाच त्याने संभाजीला कोल्हापुरास पाठवून दिले. निजामाच्या स्वारीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून आली व ती म्हणजे प्रकरण अगदी गळ्याशी आले असताना देखील शाहू स्वतः युद्धआघाडीवर आलाच नाही. जर आरंभीच शाहू स्वतः बाहेर पडला असता तर त्याच्या सरदाराना फितुरी करता आली नसती. उलट शाहू जाग्यावर बसून दुसऱ्यांच्या मदतीची वाट बघत बसल्याने आपण काहीही केले तरी हा स्वामी स्वबळावर आपले काय वाकडे करणार अशी भावना सरदारांची बनत गेली.
                पालखेड नंतर बाजीरावाने लागोपाठ अनेक मोहिमांमध्ये विजय मिळवले पण प्रस्तुत लेखाचा नायक शाहू असल्यामुळे त्याच्याशी संबंधित मोहिमांचाच येथे विचार करणे भाग आहे. पालखेडच्या तडाख्यानंतरही संभाजीचे डोळे न उघडल्याने स. १७३० मध्ये आपल्या सर्व प्रमुख सरदारांसह शाहूने कोल्हापूरवर स्वारी केली. यावेळी संभाजीच्या पक्षाला उदाजी चव्हाणाचा मोठा आधार होता. शिरोळ येथे उदाजीला श्रीनिवासराव प्रतिनिधी व धनाजी जाधवाचा मुलगा शंभूसिंग यांनी घेरले. उदाजीच्या बचावासाठी स्वतः संभाजी चालून आला पण, त्याचा काहीही उपयोग न होता प्रतिनिधी आणि जाधवाने संभाजीचा पराभव करून त्यास पळवून लावले. कोल्हापूरची सर्व फौज लुटली गेली. झाडून बुणगे लुटले गेले. संभाजीची आई राजसबाई, ताराबाई व संभाजीच्या बायका कैद झाल्या. त्यांपैकी संभाजीच्या आईला व बायकांना कोल्हापूरास परत पाठवण्यात आले. ताराबाईला देखील कोल्हापूरास पाठवण्याचा शाहूचा विचार होता पण कोठेही गेले असता कैद काही चुकत नाही हे लक्षात घेऊन ताराबाईने शाहूजवळ राहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तिची रवानगी साताऱ्यास करण्यात आली. शाहूच्या या स्वारीने संभाजीला शहाणपण सुचून त्याने शाहूसोबत तहाची वाटाघाट आरंभली. स. १७३१ च्या फेब्रुवारीमध्ये कराडजवळ जखीणवाडी येथे शाहू आणि संभाजीची भेट झाली. यावेळी झालेल्या तहानुसार कोल्हापूरचे राज्य एकप्रकारे सातारचे मांडलिक संस्थान बनले. अर्थात, या तहामुळे संभाजी संतुष्ट झाला नाही. परंतु, पालखेडसारखा उपद्व्याप करण्याची त्याची परत हिंमत देखील झाली नाही. या स्वारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे, शाहूने हि मोहीम स्वतः चालवली आणि या स्वारीचे नेतृत्व चुकुनही त्याने प्रधानमंडळाकडे जाऊ दिले नाही. जेणेकरून, घरच्या भांडणात बाहेरच्यांचा शिरकाव होईल असे असे काही घडू न देण्याची काळजी, शाहूने त्याच्या बाजूने घेतली.
              स. १७२८ मध्ये पालखेडच्या विजयाने जरी शाहूचे आसन स्थिर व बळकट झाले असले तरी त्याला हादरा देण्याचे निजामाचे प्रयत्न सुरुच होते. यावेळी त्याच्या गळाला शाहूचा सेनापती त्रिंबकराव दाभाडे हा लागला होता. त्रिंबकराव हा पराक्रमी व शूर असल्याने आणि बाजीरावाप्रमाणेचं काहीसा उद्दाम असल्यामुळे बाजीरावाचे आणि त्याचे पटत नव्हते. त्यात शाहूच्या एका कृत्याची भर पडली. गुजरात प्रांताचा निम्मा मोकासा त्याने चिमाजीआपाला व निम्मा त्रिंबकरावस दिला. दाभाड्यांना शाहूचा हा निर्णय अजिबात मंजूर नव्हता. तेव्हा शहूने गुजरातच्या बाबतीत फेरविचार करून चिमाजीच्या नावे दिलेला मोकासा रद्द केला. परंतु,यामुळे पेशवे - सेनापती यांच्यातील वैराग्नी पेटायचा तो पेटलाच. या काळात दोघांनी प्रत्यक्ष लढणे टाळले, पण त्यांचे हस्तक मात्र एकमेकांच्या प्रदेशवर ताव मारत होते. तडजोडीच्या उद्देशाने पेशव्यांनी सेनापतीसमोर प्रस्ताव ठेवला कि, गुजराथमध्ये आम्हांस निम्मी वाटणी द्यावी बदल्यात माळव्यात आम्ही तुम्हाला निम्मी वाटणी देऊ. पण सेनापतीने हा प्रस्ताव धुडकावून लावला आणि निजामाशी हातमिळवणी करून पेशव्याचा काटा काढण्याचा बेत रचला. निजाम आपल्या फौजेसह दाभाड्यांच्या मदतीस निघाला पण या दोघांच्या सैन्याची युती होण्यापूर्वीच बाजीरावाने डभई येथे त्रिंबकरावास गाठून त्याचा पराभव केला. या संग्रामात त्रिंबकराव मारला गेला. डभईच्या प्रसंगाने गुजरातचा तंटा काही मिटला नाही पण पेशव्याची दहशत मात्र इतर सरदारांवर बसून ते पेशव्यास वचकून राहू लागले. दाभाडे - पेशवे वादाचे निवारण करणे शाहूस न जमल्यामुळे एकप्रकारे पेशव्यांचे वर्चस्व वाढत जाण्यास तो देखील काही प्रमाणात कारणीभूत ठरला. सेनापती, प्रतिनिधी सारखी मंडळी पेशव्यावर का चिडून आहेत याच्या कारणांचा शोध घेऊन आपल्या प्रधानांमधील वाद मिटवण्यास शाहूने पुढाकार घ्यायला हवा होता. पण असे दिसून येते कि, पेशव्याचे जसजसे लष्करी सामर्थ्य वाढत चालले होते तसतसे शाहूचे अधिकारवर्चस्व घटू लागले होते.
                         स्वराज्याचा विस्तार कोकणात झाल्यापासून जंजिरेकर सिद्दीचा मराठी राज्याला उपद्रव सुरु झाला होता. सिद्द्यांची खोड मोडण्याचे अनेक प्रयत्न शिवाजी - संभाजी या पितापुत्रांनी केले. परंतु सिद्द्यांना जरब बसवणे यापलीकडे त्यांच्या स्वाऱ्यांचा काही उपयोग झाला नाही. शाहू राज्यावर आला त्यावेळी कोकणात सिद्दी आणि आंग्रे यांचा झगडा जुंपलेला होता. मात्र आंगऱ्यांना एकाच वेळी सिद्दी, मोगल, इंग्रज, डच, पोर्तुगीज इ. शत्रूंना तोंड देणे शक्य नसल्यामुळे एकाच्या मदतीने दुसऱ्याचा पराभव करून ते आपले वर्चस्व राखू पाहत होते. अशा स्थितीत सिद्दी सोबत कधी युद्ध तर कधी तह असे प्रसंग उद्भवत. स. १७३३ मध्ये शाहूने जंजिऱ्यावर मोहीम आखली. आपले सर्व प्रमुख प्रधान व सरदार त्याने या स्वारीसाठी कोकणात रवाना केले. जंजिरा व रायगड ताब्यात घेणे हि या मोहिमेची प्रमुख दोन उद्दिष्ट्ये होती. पैकी रायगड ताब्यात घेण्याचे बाजीरावाने कारस्थान रचले पण प्रतिनिधीने स्वतंत्रपणे प्रयत्न करून रायगड ताब्यात घेतला. आधीच पेशवे - प्रतिनिधी मधून विस्तव जात नव्हता. त्यात प्रतिनिधीच्या या यशाची / कृत्याची भर पडली. परिणामी, बाजीरावाने यापुढे मोहिमेत मनापासून सहभाग घेतलाच नाही. उलट आंगऱ्यांना हाताशी धरून त्याने प्रतिनिधीचे पाय खेचण्याचा उपक्रम आरंभिला. याचा परिणाम म्हणजे जंजिरा स्वारी रेंगाळून स. १७३३ च्या डिसेंबरमध्ये बाजीरावाने सिद्दी सोबत तह करून मोहीम आटोपती घेतली. जरी बाजीराव या स्वारीतून बाहेर पडला असला तरी इतर सरदारांच्या मार्फत शाहूने जंजिरा मोहीम सुरूच ठेवली. आंग्रे व इतर मराठी सरदारांच्या प्रयत्नांचे फळ म्हणजे सिद्दी जेरीस येउन त्यांचे बळ खचू लागले. त्यांना कुमक देखील कुठ्न मिळेना. इंग्रज, पोर्तुगीजांनी प्रसंग पाहून आतल्या अंगाने सिद्द्यांना जगवण्याचा प्रयत्न केला पण तो तितकासा उपयुक्त ठरला नाही. मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात चिमाजी आप्पा मानाजी आंगऱ्याच्या मदतीसाठी कोकणात उतरला. १९ एप्रिल १७३६ रोजी सिद्द्यांचा प्रमुख सरदार सिद्दी सात यास रेवासजवळ श्रीगाव येथील लढाईत चिमाजी आपाने ठार केले. या लढाईने सिद्द्यांचा सर्व जोर संपून ते शरण आले. जंजिरा किल्ला त्यांच्या ताब्यात ठेवण्याच्या अटीवर त्यांनी शाहूचे मांडलिकत्व स्वीकारले. अर्थात हि मांडलिकी फक्त कागदावरचं राहिली हे वेगळे सांगायची गरज नाही. जंजिरा मोहीम तशी यशस्वी झाली पण जंजिरा किल्ला सिद्द्यांच्याच ताब्यात राहिल्याने तिच्या यशाला अपयशाचे मोठे गालबोट लागून राहिले. जर शाहू स्वतः या मोहिमेत युद्ध आघाडीवर दाखल झाला असता तर कदाचित या मोहिमेचे स्वरूप साफ पालटले असते. बाजीराव - पर्तिनिधी यांच्यातील पाय खेचण्याचा खेळ बंद पडला असता. त्याशिवाय इतर सरदार देखील आपापसांतील मतभेद विसरून एकजुटीने काम करण्यास परवृत्त झाले असते. परंतु शाहूचा पाय साताऱ्यातून बाहेर न निघाल्याने जंजिरा स्वारी बव्हंशी निष्फळचं ठरली.
                 पालखेड, जंजिरा इ. मोहिमांच्या वेळी सातारा न सोडणाऱ्या शाहूला स. १७३७ मध्ये अचानक स्वारी - शिकारी करण्याची लहर आली. आपले सर्व अष्टप्रधान मंडळ, प्रमुख सरदार, तोफखाना, जनानखाना सोबत घेऊन मिरजेचे ठाणे आपल्या ताब्यात घेण्याच्या उद्देशाने शाहू सातारा सोडून बाहेर पडला. त्याच्या या बादशाही स्वारीचे रसभरीत वर्णन मल्हार रामराव चिटणीसने आपल्या बखरीत केले आहे. स. १७३७ मध्ये त्याने उंब्रज येथे आपली मुख्य छावणी उभारली व तेथून मिरज ताब्यात घेण्यास आणि उदाजी चव्हाणास समज देण्यास सरदार रवाना केले. नंतर स्वतः शाहू मिरजेच्या रोखाने गेला. स. १७३९ च्या ऑक्टोबर आरंभी मिरजेचे ठाणे शाहूच्या ताब्यात आले. मिरज ताब्यात आल्यावर शाहू साताऱ्यास परत फिरला. वास्तविक या स्वारीतून फायदा असा काही विशेष झाला नाही. परंतु, आपले लष्करी नेतृत्व परत एकदा आजमावण्याची व लोकांना आपल्या लष्करी कौशल्याची चमक दाखवण्याची शाहूची इच्छा मात्र काही प्रमाणात पुरू झाली. विशेष म्हणजे याच काळात बाजीराव भोपाळ येथे निजामाशी लढत होता तर वसईला चिमाजीआपा पोर्तुगीजांशी झगडत होता. दिल्लीवर याच वर्षी नादिरशहाची धाड येउन पडली होती. अशा प्रचंड मोठ्या प्रकरणांत मराठी फौजा ठिकठिकाणी गुंतलेल्या असताना शाहूने हि मोहीम आखून यशस्वी करून दाखवली इतकेच फारतर म्हणता येईल.
                   स. १७३९ मध्ये नादीरशहाने दिल्लीत थैमान घातले त्यावेळी मोगल बादशाहीच्या मदतीसाठी शाहूने बाजीराव पेशव्यास उत्तरेत जाण्याची आज्ञा केली. या प्रसंगी शाहूने, औरंगजेब बादशाहला दिलेल्या वचनाचा उल्लेख कित्येक इतिहासकार करतात. परंतु, या वचन कथेत दम नसल्याचे माझे ठाम मत आहे. औरंगजेब मरण पावला स. १७०७ मध्ये, शाहूचा जन्म स. १६८२ चा -- म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूप्रसंगी शाहू २४ - २५ वर्षांचा होता. स्वराज्याचे नेतृत्व त्यावेळी ताराबाई करत होती. पुढेमागे ताराबाईचा पाडाव करून शाहू हा राज्याचा अधिकारी होईल असे काय औरंगजेबास स्वप्न पडले होते काय ? त्याहीपलीकडे म्हणजे आपल्यामागे मोगल बादशाहीची धूळदाण होईल हे भविष्य काय औरंगजेबास आधीच कळले होते का ? तात्पर्य, शाहूने औरंगजेबास मोगल बादशाहीच्या रक्षणाचे वचन दिले होते असे म्हणतात ते साफ चुकीचे असल्याचे सिद्ध होते. आयुष्याचा बराचसा काळ -- विशेषतः बालपण ते तारुण्य --- मोगलांच्या सहवासात गेल्याने शाहू मानसिकदृष्ट्या मोगलांच्या थोडासा अधीन झाला होता. होता होईल तितकी मोगल बादशाही राखायची त्याची इच्छा होती. त्याशिवाय आपण आजच्या काळाच्या चष्म्यातून गतकालीन घटनांकडे पाहतो, हा दृष्टीकोनचं मुळात चुकीचा आहे. बाबरपासून औरंगजेबपर्यंतच्या प्रदीर्घ काळात दिल्लीतील मोगलांचे आसन पक्के झाले होते. मोगल राजवटीच्या विरोधात बंडे झाली, नाही असे नाही, पण मोगल बादशाही उलथवून टाकून नवीन राजवट प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. मोगल बादशाहीचा देखावा कायम ठेऊन आपापली सत्ता बळकट करण्याची खेळी त्यावेळचा प्रत्येक सत्ताधीश खेळत होता. मोगल बादशाहीचा हा देखावा स. १८५७ पर्यंत कायम ठेवणे जेथे इंग्रजांना देखील गैर वाटले नाही तिथे मोगलांच्या कैदेत १७ - १८ वर्षे काढलेल्या शाहूचे मन मोगल बादशाही उलथवून टाकण्यास धजवेल हे संभवत नाही. त्याहीपलीकडे विचार केला असता मोगलांनी नर्मदेच्या उत्तरेस आपले राज्य रक्षावे, नर्मदा उतरून दक्षिणेत त्यांनी ढवळाढवळ करू नये अशी छ. शिवाजी महाराजांची देखील भूमिका होती. म्हणजे मोगल बादशाहीचे उत्तरेतील अस्तित्व एका मर्यादेपर्यंत त्यांनाही मंजूर होते असे म्हणता येते. त्यावरून त्यांचा नातू हा आपल्या आजोबांच्याच धोरणाचा पुरस्कार करत होता असे का म्हणू नये ? म्हणजे मोगल बादशाही राखण्याचे अनिष्ट धोरण शाहूने स्वीकारले असा जो आरोप केला जातो त्यात तथ्य नसल्याचे दिसून येते. मोगल बादशाहीचे नाममात्र अस्तित्व राखून राज्यविस्तार करण्यास जर त्याने परवानगी दिली नसती तर मराठी राज्याचा विस्तार नर्मदेच्या उत्तरेकडे झालाच नसता याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. राहता राहिला मोगल बादशाहीच्या रक्षणाचा मुद्दा तर चौथाई व सरदेशमुखीच्या बदल्यात मोगली सत्तेचे  शत्रूंपासून संरक्षण करण्याची अट शाहूने मान्य केली होती. अशा परिस्थितीत, नादिरशहाच्या हल्ल्याच्या वेळेस त्याने बाजीरावास उत्तरेत जाण्याची आज्ञा केली तर ती मोगल बादशाहीसोबत केलेल्या करारांच्या अटींना जागूनच केली होती असे म्हणावे लागते.
                     बाजीराव हा निःसंशय पराक्रमी व रणशूर होता. पण त्याचे गोडवे गाण्याच्या नादात अलीकडचे व आधीचे कित्येक इतिहासकार वाहवत गेले आणि शाहूच्या धोरणांकडे डोळसपणे न पाहता त्यांनी त्याला मोगलधार्जिणा ठरवून बाजीरावाला हिरो बनवले. वास्तविक याच बाजीरावाने संधी असताना देखील दिल्ली का लुटली नाही याचा कोणी विचार केला का ? शाहूमुळे निजामाचा बचाव झाला असेही म्हटले जाते, मग भोपाळच्या लढाईत निजामाच्या बचावाला काय शाहू गेला होता ? समजा, निजामाचा संहार न करण्याची शाहूची आज्ञा होती तर मग डभईच्या संग्रामात त्रिंबकरावास मारण्याचा हुकुम बाजीरावास कोणी दिला होता ? त्रिंबकरावाचा मृत्यू जर युद्धातील अपघात मानला तर निजामाचाही तसा अपघात घडवून आणणे बाजीरावास शक्य नव्हते काय ? तात्पर्य, बाजीरावाचे उदात्तीकरण करण्याच्या नादात शाहूची प्रतिमा -- जाणीवपूर्वक असो किंवा अजाणतेपणी -- मलिन करण्याचे कार्य आमच्या मराठी इतिहासकारांनी केलेलं आहे.
        असो, स. १७४० ,अध्ये २८ एप्रिल रोजी बाजीरावाचा मृत्यू झाला. त्यानंतर २५ जून १७४० रोजी बाजीरावाचा थोरला मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यास शाहूने पेशवेपद दिले. स. १७४० -४९  या नऊ वर्षांच्या काळात काही महिन्यांचा अपवाद सोडल्यास नानासाहेब हाच पेशवेपदी कायम राहिल्याने राजकारणावर नियंत्रण त्याचेच राहिले. नानासाहेब पेशवा झाला त्यावेळी शाहू साठीच्या जवळ आला होता. म्हणजे शाहुच्या वृद्धावस्थेस आरंभ झाला होता. शाहूच्या कारकीर्दीच्या अखेरच्या दशकातील घटनांची माहिती पुढील व अखेरच्या भागात पाहू.

बुधवार, २० मार्च, २०१३

अजातशत्रू शाहू ( भाग - २ )


छ. शिवाजी निर्मित स्वराज्याचे खरे वारस आपणच आहोत हे सिद्ध करण्यासाठी शाहू - ताराबाई आपापले सर्व बळ एकवटून कार्य करीत होते. स्वराज्याचा लढा आता भोसले घराण्याचा झगडा बनला होता व या झगड्यांत दोन्ही पक्षांचे प्रमुख अपवाद केल्यास इतरांना फारसा रस नव्हता. याचे कारण म्हणजे, या झगड्यातून काय अर्थप्राप्ती होणार हे दिसतच होते. अशा परिस्थितीत कित्येक मराठी सरदारांनी पक्ष बदलाचा पर्याय स्वीकारला. ताराबाई - मोगल अशी युती दिसताच शाहूच्या दरबारातील कित्येक सरदार फिरून ताराबाईस रुजू झाले. काही महाभाग असेही होते कि, भोसले घराण्याच्या तंट्यात पडून फुकट मरण्यापेक्षा सरळसरळ मोगलांची चाकरी करण्यास निघून गेले. अर्थात, त्यांनाही दोष का द्यावा ? ताराबाई व शाहू देखील आपणांस स्वराज्याचे खरे वारस म्हणून मोगली मान्यता मिळवण्यासाठीच तर झगडत होते ! सारांश, कनिष्ठांनी वरिष्ठांचे अनुकरण मात्र करावे पण योग्य अयोग्य हा विचार न करावा हि सामाजिक मानसिकताच या उदाहरणातून दिसून येते इतकेच !
ताराबाई - शाहू यांच्या झगड्यास वैतागून मोगलांकडे जाणाऱ्यांमधील सर्वात मोठे प्रस्थ म्हणजे चंद्रसेन जाधव ! शाहूच्या या प्रमुख सेनापतीस फितूर करण्याचा ताराबाईने बराच प्रयत्न केला व चंद्रसेनने देखील आपण ताराबाईस अनुकूल असल्याचा देखावा रचला. त्यानिमित्ताने त्याने थोरात, निंबाळकर, पवार इ. सरदारांनाही शाहूविरोधात चिथावणी दिली. दरम्यान शाहूसोबत तंटा करण्यास त्याला जे निमित्त हवे होते ते बाळाजी विश्वनाथच्या रूपाने त्यास प्राप्त झाले. शाहूने बाळाजीला ' सेनाकर्ते ' हे नवीनच पद दिले. त्यामुळे सेनापती चंद्रसेन जाधवास हे आपल्या अधिकारक्षेत्रातील अतिक्रमण वाटल्यास नवल नाही. त्यातच हरणाचा / काळ्या कबुतरा तंटा बाळाजी व चंद्रसेनच्या सेवकांमध्ये उद्भवून दोन्ही पक्षांची बाचाबाची झाली. तेव्हा जाधवाने बाळाजीस कैद करण्याचा घाट घातला. जीवावरील संकट जाणून बाळाजी शाहूच्या आसऱ्यास धावला. शाहूने बाळाजीस अभय देताच चंद्रसेनाने शाहूला निरोप पाठवून बाळाजीस आपल्या हवाली करण्याची मागणी केली अन्यथा आपण चाकरी सोडून जात असल्याची धमकी दिली. शाहूने जाधवाची समजूत घालण्यासाठी व तो ऐकत नसल्यास त्याचा बंदोबस्त करण्यासाठी हैबतराव निंबाळकरास पाठवले. निंबाळकराने जाधवास उधळून लावले तेव्हा चंद्रसेन ताराबाईच्या दरबारात रुजू झाला. ( स. १७११ ) पुढे त्याने हैबतराव निंबाळकरास ताराबाईच्या पक्षात आणण्याची कामगिरी बजावली आणि संधी मिळताच मोगल मुत्सद्दी निजाम याच्या पदरी तो गेला. परंतु हा भाग पुढील काळात घडला असल्याने तूर्तास इतकेच पुरे.
चंद्रसेन निघून जाताच शाहूने, चंद्रसेनाचा भाऊ संताजी यास सेनापतीपद दिले. इकडे बाळाजी विश्वनाथाने पिलाजी जाधव, अंबाजी पुरंदरे इ. मदतीने फौजफाटा वाढवून शहूची बाजू बळकट करण्याचा उद्योग आरंभला. कारण, परसोजी भोसले व चिमणाजी दामोदार वगळल्यास शाहूकडे आता फौजबंद असे कोणी मराठी सरदार फारसे नव्हते व हे दोघेही खानदेशाकडे असल्याने आणि पेशवा बहिरोपंत पिंगळे हा निष्क्रिय राहिल्याने शाहूची अवस्था बिकट बनली होती. दरम्यान चंद्रसेन जरी शाहूला सोडून गेला असला तरी शाहूच्या उर्वरित सरदारांचे मनोधैर्य अजून कायम होते. स. १७११ च्या अखेरीस कोरेगाव नजीक खटाव येथील कृष्णराव खटावकर या मोगली ठाणेदारास लढाईत ठार करून बाळाजी विश्वनाथाने खटाववर शाहूचा अंमल बसवून दिला. या मोहिमेत बाळाजीला श्रीपतरावची मदत झाली. स. १७१२ मध्ये ताराबाईच्या आज्ञेनुसार आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे कोकणातून पुढे घाटावर, सातारच्या दिशेने येऊ लागला. त्यास रोखण्यासाठी शाहूने बहिरोपंत पेशव्यास रवाना केले. परंतु, कान्होजीने बहिरोपंतास कैद करून शाहूच्या आक्रमणातील हवाच काढून घेतली. खुद्द पेशवाच कैद झाल्याने शाहूची स्थिती बिकट झाली. पण प्रसंग जाणून त्याने बाळाजी विश्वनाथास पेशवेपद दिले. याकामी अंबाजी पुरंदरेची बाळाजीला मोठीच मदत झाली. बाळाजीस पेशवा बनवून कान्होजीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शाहूने त्याच्यावर सोपवली. ( स. १७१३, नोव्हेंबर ) पेशवेपद मिळताच बाळाजी आंगऱ्याच्या मोहिमेवर रवाना झाला. युद्धापेक्षा वाटाघाटींनी आंगऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा बाळाजीने प्रयत्न केला व त्यात तो यशस्वी झाला. कान्होजीने शाहूची ताबेदारी मान्य केली. अर्थात, यामागे बाळाजीची मुत्सद्देगिरी कारणीभूत असली तरी ते काही प्रमुख कारण नाही. कान्होजी शाहूकडे वळण्यास तत्कालीन राजकारणातील एक अपघात प्रामुख्याने कारणीभूत ठरला. ( स. १७१४ )
स. १७१४ मध्ये शाहूचा पाडाव करण्याच्या खटपटीत ताराबाई मग्न असताना, राजारामची द्वितीय पत्नी राजसबाई व तिचा मुलगा संभाजी दुसरा यांनी ताराबाई व तिचा पुत्र तिसरा शिवाजी यांना कैदेत टाकून कोल्हापूची सत्ता आपल्या हाती घेतली. सुप्रसिद्ध मुत्त्सद्दी रामचंद्रपंत अमात्य याने हे कारस्थान रचले. हा कट यशस्वी होण्यास शाहू व निजाम या दोघांनी हातभार लावल्याचे मानले जाते. कोल्हापुरास हि राज्यक्रांती झाली त्यावेळी कान्होजी आंग्रे व बाळाजी विश्वनाथ युद्धाच्या तयारीने समोरासमोर आले होते. परंतु, कोल्हापूरची बातमी समजताच आंगऱ्याचे नैतिक बळ खचले. नव्या परिस्थितीत आपले स्थान काय हा प्रश्न त्याच्यासमोर उद्भवला. आंगऱ्याची मनःस्थिती जाणून व संभाजीने त्यास आपल्या पक्षात घेण्याआधी आपणच त्यास शाहूच्या ओटीत घातले असता अंती फायदा आपलाच आहे हे ओळखून बाळाजीने त्यास शाहूच्या पदरी आरमारप्रमुखाची लालूच दाखवली. त्याशिवाय कोकणात जे काही प्रांत व किल्ले आंगऱ्याने ताब्यात घेतले होते, ते त्याच्याच ताब्यात राहतील असे आश्वासनही दिले. या बदल्यात आंगऱ्याने शाहूस छत्रपती म्हणून मान्यता द्यायची होती. अशा या व्यवहारात आपले काहीच नुकसान नाही हे पाहून कान्होजीने शाहूचा पक्ष स्वीकारला. ( स. १७१४ )
मोगल आघाडीवर यावेळी भलतीच हालचाल चालली होती. निजाम उल्मुल्क हा स. १७१३ मध्ये दक्षिणचा सुभेदार म्हणून कारभारावर दाखल झाला. ढासळत्या मोगल बादशाहीची अंतःस्थिती जशी त्याला माहिती होती तशी शाहू, ताराबाई वा इतर मराठी सरदारांना नव्हती. दक्षिणेत स्वतंत्र पंथ पाहण्याचा त्याचा गुप्त हेतू होता व त्यासाठी तो प्रयत्नशील होता. वरवर मोगल बादशाहीचा अधिकारी म्हणून काम करताना तो येथे आपले हितसंबंध जुळवू लागला होता. ताराबाई व शाहू अशी दोन फळ्यांत विभागलेली मराठेशाही त्याच्या महत्त्वकांक्षेला अनुरूप अशीच होती. या दोघांपैकी एका पक्षाला मदत करण्याच्या नावाखाली दक्षिणेतील आपले आसन बळकट करण्याचा त्याचा डाव होता. शाहू - ताराबाई वादांत, ताराबाई कैदेत जाउन संभाजी आला आणि निजामाच्या गळाला संभाजीरुपी मासा अलगद लागला. शाहू मोगलांच्या कैदेत लहानाचा मोठा झाला होता तर ताराबाई सुमारे २० - २२ वर्षे मोगलांशी राजकारण व युद्ध या दोन्ही माध्यमांतून लढत होती. या दोघांवर कब्जा बसवणे निजामाला थोडे अवघड होते. त्यामानाने अननुभवी संभाजी त्याच्या कारस्थानात फसणे सोपे होते व तसेच घडले. मात्र निजामाच्या धुर्ततेचा कळस असा कि, त्याने शाहूला आपण त्याचे हितचिंतक असल्याचे भासवून काही काळ अक्षरशः गाफील ठेवले. ब्रिटन लढाई हरते पण युद्ध जिंकते असे म्हटले जात असे, त्या धर्तीवर मोगल लढाई हरत पण मुत्सद्देगिरीत निदान मराठी सत्ताधीशांच्यापुढे तरी जिंकत असे म्हणावेसे वाटते.
निजामाच्या दुर्दैवाने मोगल बादशाहने स. १७१५ मध्ये त्यास उत्तरेत बोलावले व दिल्लीच्या प्रसिद्ध सय्यद बंधूंमधील हुसेनअली सय्यद यास दक्षिणच्या सुभ्यावर नेमले. निजाम व सय्यदांचे वैर असल्याने हुसेनअलीने दक्षिणेत आल्यावर शाहूचा पक्ष स्वीकारला. मोगलांशी वैर पत्करण्याची कोल्हापूरच्या संभाजीची तयारी नसल्याने तो अगदीच गप्प बसला. याचा फायदा शाहूने बरोबर उचलला व मोगलांच्या पाठींब्यावर त्याने बंडखोर सरदारांचा बंदोबस्त करण्याचे कार्य प्रथम हाती घेतले. यात पहिला नंबर लागला तो दमाजी थोराताचा ! शाहू, ताराबाई, मोगल अशा वारंवार चाकऱ्या बदलणाऱ्या थोराताची निष्ठा अशी कोणावरच नव्हती. अशा मंडळींची फार काळ गय करणे शाहूला परवडण्यासारखे नव्हते. बाळाजी विश्वनाथास त्याने थोराताच्या बंदोबस्तासाठी पाठविले. परंतु, बोलाचालीने दमाजीला सरळ करायला गेलेल्या बाळाजीस थोराताने कपटाने कैद केले. अखेर दंड भरून त्यास आपली सुटका करावी लागली. तेव्हा शाहूने सचिवास दमाजीच्या मुसक्या आवळण्यास पाठविले. परंतु दमाजीने अल्पवयीन सचिव नारो शंकर यासच छापा मारून कैद केल्याने शाहूच्या आक्रमणातील एकप्रकारे हवाच काढून घेतली. वस्तुतः पेशव्याचा पराभव झाल्यावर खुद्द शाहूने थोरातावर चालून जायला हवे होते किंवा सचिवाचे प्रकरण घडल्यावर तरी स्वतः मोहिमेवर बाहेर पडायला हवे होते पण का कोणास ठाऊक, तो स्वतः काही स्वारीसाठी बाहेर पडलाच नाही. ( स. १७१६ - १७ ) पुढे स. १७१८ मध्ये बाळाजी विश्वनाथने हुसेनअली सय्यदची मदत घेऊन मोगली तोफखान्याच्या सहाय्याने दमाजी थोराताचा पराभव करून त्यास कैद केले. त्याची हिंगणगावची गढी मातीस मिळवली तर गावावरून गाढवाचा नांगर फिरवला. दमाजीला शाहूने पुरंदरावर कैद करून ठेवले. पुढे शाहूच्या राण्यांनी त्याच्या वतीने रदबदली केल्याने शाहूने दमाजीस कैदमुक्त केले. पण स. १७२८ मध्ये दमाजीने कोल्हापूरच्या संभाजीसोबत  हात मिळवणी करून शाहूविरोधात दंड  थोपटले. तेव्हा फिरून त्यास पकडून शाहूने पुरंदरावर  कैदेत टाकले. या  बंदीवासातच दमाजीचा अंत झाला.
औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला चढवून त्याच्या तंबूवरील सोन्याचे कळस कापण्याचे कार्य संताजी घोरपडेच्या साथीने विठोजी चव्हाणाने पार पाडले. स. १६९९ मध्ये कर्नाटकांत मोहिमेवर असताना विठोजी लढाईत मारला गेला. त्याचा मुलगा उदाजी यास बापाचे पद व जहागीर मिळाली. शाहू व ताराबाई यांच्या झगड्यात त्याने नेहमीच ताराबाईचा व पुढे संभाजीचा पुरस्कार केला. स. १७६२ मध्ये एका लढाईत उदाजी मरण पावला पण शाहू हयात असे पर्यंत त्याने शाहूच्या मुलखावर वारंवार हल्ले चढवून त्यास त्रस्त केले. उदाजी पराक्रमी असला तरी तो मनापासून कोल्हापूरकारांशी एकनिष्ठ असल्याने शाहूच्या उद्योगास त्याचे पाठबळ लाभले नाही. शाहूने कित्येकदा त्याच्यावर मोहिमा आखल्या, त्यास पराभूत करून कैद देखील केले पण उदाजी काही त्यास बधला नाही. उदाजीला कायमचे कैद करणे व ठार करणे वा त्यास अनुकूल करून घेणे हे तीनच पर्याय शाहूपुढे होते. पण त्याने यातील कोणताच पर्याय न निवडल्याने उदाजी चव्हाणाच्या शौर्याचा मराठी राज्यास कसलाही फायदा न होता हा मोहरा वाया गेला. कमीत कमी त्याने उदाजीला कायमचे कैदेत टाकून ठेवले असते तर इतर बंडखोर सरदारांना थोडा तरी आळा बसला असता. उलट उदाजीला वारंवार कैद करून सोडून देण्याच्या वृत्तीमुळे इतरांना दहशत अशी कधीच बसली नाही. परिणामी पेशवाई संपेपर्यंत या बंडखोर सरदारांचा सातारच्या राज्यास नेहमीच उपद्रव होत राहिला.   गुणग्राहक म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाहूच्या कीर्तीला लागलेले हे एक मोठे वैगुण्यच मानले पाहिजे.
छ. शिवाजी महाराजांच्या जावयाचा -- महादजी निंबाळकराचा वंशज -- रंभाजी निंबाळकर हा मोगलांच्या तर्फेने पुणे प्रांतावर नियुक्त होता. या रंभाजीस आपल्या बाजूला ओढून घेण्याची शाहूने बरीच खटपट केली पण रंभाजी मोगलांशीच एकनिष्ठ राहिल्याने स. १७१६ मध्ये खंडेराव दाभाड्याच्या करवी  शाहूने त्यास पुण्यातून पळवून लावले.
स. १७१५ ते १७१८ पर्यंत हुसेनअली सय्यदने दक्षिणच्या सुभेदारीचे काम पाहिले. राजारामच्या काळात शंकराजी मल्हार हा सचिवपदाचे काम पाहत होता. पुढे त्याने राजकारण त्यागून काशीला प्रयाण केले. तेथे काही काळ व्यतीत करून त्याने दिल्ली दरबारात मराठी पक्षाची बाजू मांडण्याचे काम केले. या शंकराजीस हुसेनअलीचा कारभारी म्हणून बादशाहने नियुक्त केले. हुसेनअली दक्षिणेत आला तेव्हा या शंकराजी मार्फत त्याने शाहूशी सलोखा साधण्याचा प्रयत्न केला व या प्रयत्नांचे फलित म्हणजे (१) मोगल बादशाहीतर्फे शाहूस शिवाजीच्या राज्याचा वारस म्हणून मान्यता मिळाली. (२) त्याव्यतिरिक्त शाहूच्या अधीन असलेल्या मराठी सरदारांनी अलीकडे जो मुलुख संपादन केला, त्यावरील शाहूच्या मालकीस मंजुरी मिळाली. (३) शाहूच्या परिवारास कैदेतून मुक्त करण्याचे मान्य केले. (४) दक्षिणच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार शाहूला मिळाला. याबदल्यात शाहूने पुढील अटी मान्य केल्या -- (१) चौथाईच्या बदल्यात पंधरा हजार फौज मोगल बादशाहीच्या मदतीस पाठवावी. सरदेशमुखीच्या बदल्यात मोगल मुलखातील चोऱ्या वगैरे उपद्रवांचा बंदोबस्त करावा. (२) मोगल बादशहाला दरसाल दहा लक्ष खंडणी देणे. (३) कोल्हापूरच्या संभाजीस शाहूने उपद्रव देऊ नये. स. १७१८ आमध्ये हा तह ठरला  व या तहास मोगल बादशाहची मान्यता मिळवण्यासाठी हुसेनअली सय्यदसोबत बाळाजी विश्वनाथ व प्रमुख मराठी सरदारांना स. १७१८ च्या अखेरीस शाहूने दिल्लीला पाठवले. स. १७१९ च्या मार्चपर्यंत दिल्लीत अनेक उलाढाली होऊन अखेर तहावर बादशाही शिक्कामोर्तब झाले. स. १७१९ मध्ये शाहूचा सर्व परिवार दक्षिणेत येउन पोहोचला. तब्बल १० - १२ वर्षांनंतर येसूबाईची व शाहूची भेट झाली.
दिल्ली मोहीम पार पाडल्यावर बाळाजीच्या मदतीने शाहूने आपल्या राज्यकारभाराची फिरून एकदा घडी बसवण्याचा प्रयत्न केला. मोगलांसोबत झालेल्या दीर्घकालीन संग्रामात कित्येक मराठी सरदार मोठमोठ्या फौजा बाळगून स्वतंत्रपणे मोहिम आखत होते. या सरदारांनी लष्करी बळावर बराच मुलुख काबीज केला होता. या सरदारांच्या सत्तेला मान्यता देऊन त्यांनी नाममात्र शाहूचे आधिपत्य मानावे अशा प्रमुख अटीवर बाळाजी विश्वनाथाने त्यांना सातारच्या दरबारात खेचले. यामुळे शिवाजीनिर्मित स्वराज्याचे सरंजामशाहीत रुपांतर झाले असले तरी याची सुरवात राजारामच्या काळातच झालेली असल्याने प्रस्थापितांना शाहूने फक्त मान्यता दिली असेच म्हणावे लागते. स. १७२० मध्ये राज्यकारभाराची घडी बसवत असताना बाळाजी विश्वनाथाचा मृत्यू झाला. बाळाजी विश्वनाथ मरण पावल्यावर रिक्त झालेले पेशवेपद शाहूने, बाळाजीच्या मोठ्या मुलास ---  बाजीरावास दिले. इथे शाहूच्या एकूण कारकीर्दीचा पूर्वार्ध संपून उत्तरार्धास आरंभ होतो.

मंगळवार, १९ मार्च, २०१३

अजातशत्रू शाहू ( भाग - १ )


            मराठी बखरकारांनी पुण्यश्लोक, अजातशत्रू  या विशेषणांनी गौरवलेल्या शाहूची भित्रा, दुबळा, अकर्तुत्ववान, नेभळट इ. गौरवपरपदांनी बऱ्याच मराठी इतिहासकारांनी हेटाळणी देखील केली आहे. याच शाहुच्या पदरी उदयास आलेल्या भट घराण्यातील पेशव्यांनी पुढे प्रत्यक्ष छत्रपतींना गुंडाळून ब्राम्हणी पेशवाई उभारल्यामुळे कित्येक इतिहासकारांनी याबाबत शाहूस दोषी धरले आहे. ( प्रस्तुत लेखकाचे देखील असेच मत आहे. )  स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांचा हा नातू, संभाजीचा पुत्र नेमका होता तरी कसा याविषयी सर्वसामान्य इतिहास वाचकांना फारशी माहिती नसल्याने इतिहासकारांनी शाहूस दिलेली दुषणे खरी मानून ते देखील शाहूविषयी प्रतिकूल मत बाळगून आहेत. प्रस्तुत लेखाद्वारे दुसरा शिवाजी उर्फ शाहू हा नेमका कसा होता हे जाणून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.  
ता. १८ मे १६८२ रोजी शाहूचा जन्म रायगडजवळील गंगावली गावी झाला. आपल्या पराक्रमी पित्याची आठवण म्हणून संभाजीने आपल्या मुलाचे नाव ' शिवाजी ' ठेवले. स. १६८२ मध्ये जन्मलेला दुसरा शिवाजी हा काहीसा दुर्दैवी निघाला. स. १६८९ मध्ये त्यास पितृशोक तर अनुभवा लागलाच पण त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यास मोगलांच्या नजरकैदेत जाण्याचा प्रसंग ओढवला. छ. संभाजीचे मोगलांच्या कैदेत जाणे, राजारामाची नजरकैदेतून सुटका होऊन त्याने मंचकारोहण करणे, संभाजीच्या सुटकेसाठी नव्या छत्रपतीकडून कसलाही खटाटोप न होणे, मोगलांचा रायगडी वेढा पडताच येसूबाईच्या सल्ल्याने राजारामचे जिंजीला निघून जाणे इ. लागोपाठ विद्युतवेगाने घडणाऱ्या घटनांनी काही काळ का होईना पण मराठी सरदार पुरते भांबावले होते. संभाजीची पत्नी व ८ - ९ वर्षे महाराणीपद अनुभवलेली येसूबाई देखील या बनावाने बरीच चकित झाली असावी. जरी तिने रायगडाहून राजारामास निघून जाण्याचा सल्ला दिला असला तरी बाहेर राहून आपली सर्वोतपरी मदत करून व रायगड शत्रूहाती पडण्यापूर्वी आपणांस पुत्रासह येथून बाहेर काढण्याचेही बजावले होते. परंतु, राजारामाने येसूबाईचा अर्धाच सल्ला मान्य केला. स्वतः तो तर निसटला पण येसूबाई व शाहूच्या सुटकेविषयी त्याने काहीशी अनास्थाच बाळगली. ७ वर्षांचा शाहू घरातील व घराबाहेरील राजकारण समजण्याइतका सुज्ञ होता का ? हा प्रश्न एकवेळ बाजूला ठेऊ पण वयाच्या ७ व्या वर्षी हे आघात भोगणाऱ्या शाहूच्या मनावर या घटनांचे पडसाद कसे उमटले असतील याची वाचकांनीच आपल्या मनाशी कल्पना करावी.
              ३ नोव्हेंबर १६८९ ते ८ मे १७०७ -- जवळपास १७ - १८ वर्षे शाहू मोगलांच्या नजरकैदेत राहिला. या प्रदीर्घ अवधीत त्याचे बालपण शत्रूच्या गोटांत गेले. मोगलांच्या मेहरबानीने जे काही शिक्षण मिळाले तेवढेच.  औरंगजेबाने शिवाजीचे नाव बदलून शाहू तर केलेच पण त्याचे लग्नही लावून दिले. शाहूच्या बाबतीत नेमका कोणता निर्णय घ्यावा याविषयी औरंगजेबाची चलबिचल चालली होती. संभाजीला पकडून ठार केले, रायड जिंकला, राजाराम परागंदा झाला तरी स्वराज्याचे एकांडे शिलेदार अजून लढत होते. अशा परिस्थितीमध्ये शाहूला मुस्लिम करून त्यास स्वराज्यात परत पाठवावे कि आहे त्याच स्थितीत म्हणजे त्याचे धर्मांतर न करताच मोगल बादशाहीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेऊन स्वराज्यात रवाना करावे अथवा मारून टाकावे किंवा मरेपर्यंत त्यास कैदेतच ठेवावे ! नेमके काय करावे ? औरंगजेब्ची याच बाबतीत मती गुंग झाली होती.
                  आपल्या मृत्युपूर्वी शाहूला त्याने झुल्फीकारखानसोबत स्वराज्यातील किल्ले ताब्यात घेण्याच्या मोहिमेवर रवाना केले होते. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. मोहिमेसाठी बाहेर पडलेल्या शाहूला आपल्या ताब्यात घेण्यास मराठी सरदार उत्सुक होते परंतु शाहू मात्र बाहेर पडण्यास राजी नसल्याचे दिसून येते. स. १७०७ मध्ये औरंगजेबाचे निधन झाल्यावर त्याच्या मुलांमध्ये बादशाही तख्तासाठी तंटा निर्माण झाला. त्यावेळी शाहू शहजादा आजमच्या गोटांत होता. शहजादा मुअज्जम हा उत्तरेत असून कामबक्ष विजापुराकडे होता. औरंगजेबाचा दफनविधी उरकून आजम, मुअज्जमचा बंदोबस्त करण्यासाठी उत्तरेत रवाना झाला. त्याच्या सोबत शाहू व त्याचा परिवार देखील होता. शाहुच्या बाबतीत कोणताही निर्णय न घेता त्यास कैदेतच ठेवण्याचा आजमचा आरंभी बेत होता. परंतु आजमच्या कित्येक राजपूत व मुस्लिम सरदारांनी आणि त्याची बहिण झीनतुन्नीसाबेगमने शाहूला कैदेतून सोडण्याची आजामला गळ घातल्याने काही अटींवर ८ मे १७०७ च्या आसपास शाहू माळव्यातील शाही छावणीतून बाहेर पडून दक्षिणच्या वाटेला लागला.
              उपलब्ध माहितीवरून असे दिसून येते  कि, मोगलांच्या ताबेदारीत राहून शाहूने आपले राज्य परत मिळवायचे होते. शाहू मोगलांशी एकनिष्ठ राहावा म्हणून त्याची आई येसूबाई, दोन्ही राण्या, संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग इ. सर्व नातलग आजमने आपल्या सोबत ओलिस म्हणून ठेवले. शाहूला मोगल बादशाहीतर्फे दक्षिणच्या सहा सुभ्यातुन चौथाई व सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याची मोकळीक दिली होती पण यासाठीचे अधिकृत फर्मान त्यास नंतर देण्यात येईल असे सांगण्यात आले. सारांश, ताराबाईच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या मराठी सरदारांना घरच्या भांडणात गुंतवण्यासाठी व आपल्या भावांना सत्ताप्राप्तीसाठी त्यांची कसलीही मदत न मिळावी या हेतूंनी प्रेरित होऊन आजमने मुद्दाम शाहूला कैदेतून मोकळे केले असे म्हणता येते. कारण, शाहूला आपले राज्य मोगलांच्या विरोधात लढून नाही तर आपल्या चुलतीच्या विरोधात लढून मिळवायचे होते. यदाकदाचित शाहू - ताराबाई युती झाली तर त्या युतीचा आपणांस उपद्रव होऊ नये यासाठी शाहूचा परिवार मोगलांनी ओलिस धरला. याशिवाय मोगलांशी एकनिष्ठ राहिल्यास दक्षिणच्या सहा सुभ्यांच्या चौथाई व सरदेशमुखीची सनद शाहूला देण्याचे प्रलोभनही दाखवण्यात आले. मोगली कैदेतून सुटून शाहू बाहेर पडला तेव्हा जवळचा सेवकवर्ग अपवाद केल्यास त्याच्यासोबत ना सैन्य होते ना खजिना !
                बीजागड उर्फ बढवाणी नावाचे संस्थान नर्मदेच्या दक्षिणेस होते. तेथील राजपूत संस्थानिक मोहनसिंग रावळ हा अलीकडे मराठी सरदारांच्या मदतीने मोगलांशी लढत होता. याच मोहनसिंगांच्या मदतीमुळे नेमाजी शिंदे वगैरे सरदार नर्मदापार माळव्यावर चालून जात होते. शाहूचा या मोहनसिंगाशी स्नेहसंबंध होता. मोगली छावणीतून बाहेर पडताच शाहू मोहनसिंगाकडे आला. तेथून जुजुबी मदत घेऊन तापी किनाऱ्यावरील जमीनदार अमृतराव कदम बांडे याच्या सोबत शाहू महाराष्ट्राच्या रोखाने निघाला. महत्त्वाची बाब म्हणजे याच काळात मल्हारराव होळकर हा कदम बांड्यांकडे शिलेदारी करीत होता व पुढील काळात बढवाणीच्या संस्थानिकाच्या मदतीने नर्मदेच्या परिसरात त्याने आपला जम बसविला.
                शाहू जसजसा दक्षिणेकडे सरकू लागला तसतसे परसोजी भोसले, नेमाजी शिंदे, निंबाळकर सारखे फौजबंद मराठी सरदार त्याच्या गोटांत दाखल होऊ लागले. मराठी सरदारांचा वाढता पाठिंबा लक्षात घेऊन शाहूने नगर मुक्कामातून ताराबाई सोबत वाटाघाटी आरंभल्या. शाहूचे मत, मराठी राज्याचा छत्रपती म्हणून त्याचा अधिकार ताराबाईने मान्य करावा असे होते. त्याउलट, ताराबाईचे म्हणणे होते कि, शिवाजी महाराजांनी स्थापलेले स्वराज्य संभाजीने गमावले. तिच्या पतीने -- म्हणजे राजारामाने -- स्वपराक्रमाने नव्याने राज्य संपादन केले आहे. अशा या राज्यावर हक्क सांगण्याचा शाहूला अधिकारच काय ?  तांत्रिकदृष्ट्या या वादात ताराबाईची बाजू योग्य व न्यायाची असल्याचे दिसून येते.  पण १८ व्या शतकातील पुरुषांची मानसिकता पाहता एका कर्तबगार स्त्रीच्या हाताखाली काम करण्याची बव्हंशी मराठी सरदारांची तयारी नव्हती असेच म्हणावे लागते. १८ व्या शतकातील कर्तबगार स्त्रियांच्या मालिकेत ताराबाईचे स्थान अव्वल आहे यात शंकाच नाही. ती युद्धकला, कपट, धूर्तता, निग्रह, तडफ  इ. राजकीय पुढाऱ्यांस आवश्यक अशा गुणांनी युक्त होती व तीच तिची नेमकी कमजोर बाजू होती ! परिणामी, ताराबाईचा पक्ष न्यायाचा असून देखील तिच्याशी निष्ठेने राहण्याची शपथ वाहणारे धनाजी जाधव प्रभूती सरदार शाहूच्या गोटांत दाखल झाले.
                 स. १७०७ च्या ऑक्टोबर महिन्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे शाहू व ताराबाईच्या सरदारांची लढाई घडून आली. शाहू स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होता तर ताराबाईच्या फौजेचे नेतृत्व तिचा सेनापती धनजी जाधव याच्याकडे होते. त्याशिवाय परशुरामपंत प्रतिनिधी देखील लढाईत हजर होता. प्रत्यक्ष संग्रमाआधीच शाहूने धनाजी जाधवास फितवण्यात यश मिळवले. परिणामी प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी जाधवाची फौज संग्रामात सहभागी न झाल्याने शाहूच्या सैन्याचा सर्व मारा प्रतिनिधीच्या पथकांवर झाला व शाहूचे आक्रमण असह्य झाल्याने प्रतिनिधीला पळून जावे लागले. शौर्य, तडफ इ. आनुवांशिक गुणांचे शाहूने या निमित्ताने स्वपक्षीयांना व विरोधकांना जे दर्शन घडविले त्यामुळे त्याची बाजू वरचढ बनत गेली. खेडची लढाई जिंकल्यावर शाहूने धनाजी जाधवास सेनापतीपद दिले तर बाळाजी आवजीची वंशपरंपरागत चिटणीशी खंडो बल्लाळ या त्याच्या वारसास दिली. आरंभीच्या दिवसांत शाहूचा जम बसवण्याचे मुख्य काम या खंडो बल्लाळने व परसोजी भोसल्याने पार पाडले हे या ठिकाणी नमूद करणे योग्य होईल.
          खेडच्या लढाईनंतर शाहूने प्रचंडगड, राजगड, चंदन वंदन वगैरे किल्ले ताब्यात घेऊन साताऱ्यास ओरचे लावून १७०८ च्या जानेवारी आरंभी सातारचा किल्ला ताब्यात घेतला. केवळ दोन - तीन महिन्यात शाहूने जे लागोपाठ विजय मावळले त्यामुळे ताराबाईची बाजू काहीशी खचू लागली होती. कारण, मिळणाऱ्या प्रत्येक विजयासोबत ताराबाईला सोडून शाहूकडे जाणाऱ्या मराठी सरदारांची संख्या वाढू लागली होती. स. १७०८ च्या जानेवारीतच शाहूने स्वतःस राज्याभिषेक करून अष्टप्रधानांची नियुक्ती केली.
           त्यानंतर ताराबाईच्या बंदोबस्ताचे कार्य त्याने हाती घेतले. वस्तुतः, ताराबाईला कैद करण्याच्या उद्देशानेच शाहूने साताऱ्यावर हल्ला चढवला होता पण शाहू येण्यापूर्वीच ताराबाई पन्हाळ्याकडे सटकली होती. तेव्हा आता पन्हाळ्यावर स्वारी करणे शाहूस भाग होते. तत्पूर्वी नैतिक उपचारांचा एक भाग म्हणून वारणा नदीच्या दक्षिणेकडील भाग ताराबाई व तिच्या पुत्रास देण्याची तोड शाहूने काढली. मात्र ताराबाई अशा तुकड्यांवर संतुष्ट राहणाऱ्यांमधील नाही हे तो जाणून होता. त्याच्या अपेक्षेप्रमाणे ताराबाईने शाहूची सूचना धुडकावून लावली व फेब्रु. १७०८ मध्ये शाहूच्या फौजा कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या. याचवेळी सातारच्या आसपास व पुण्यात आपला अंमल प्रस्थापित करण्याचा शाहूचा प्रयत्न चालला होता. यासाठी मोगलांशी लढणे त्यास भाग होते. थोरात, दाभाडे, बाळाजी विश्वनाथ, पवार, निंबाळकर इ. मंडळी त्यासाठी प्रयत्नशील होती.
                  शाहूची कोल्हापूर मोहीम बऱ्यापैकी यशस्वी झाली. वसंतगड, पावनगड, पन्हाळा, विशाळगड इ. किल्ले ताब्यात घेऊन रांगणा किल्ला जिंकण्यासाठी शाहू पुढे सरकला. त्यावेळी ताराबाईचा मुक्काम रांगण्यावर होता. शाहू रांगणा घेण्यासाठी पुढे येत असल्याचे पाहून ताराबाईने रांगणा लढवण्याची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्यावर सोपवली व ती मालवणला निघून गेली. इकडे शाहू कोल्हापूर मोहिमेत मग्न होता त्याच सुमारास म्हणजे स. १७०८ च्या जुलै महिन्यात त्याचा सेनापती धनाजी जाधव हा मरण पावला. जाधवाच्या मृत्यूने शाहू खचला किंवा त्याची बाजू दुबळी झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण धनाजीच्या तोडीचे कित्येक पराक्रमी सरदार शाहूच्या पदरी होते. धनाजीच्या निधनानंतर शाहूने सेनापतीपद धनाजीचा मुलगा चंद्रसेन यास दिले.
                    दरम्यान स. १७०८ मध्ये मोगल बादशाह मुअज्जम उर्फ बहादूरशहा नगरला येउन दाखल झाला होता. शहजादा कामबक्षचा निकाल लावून आपले बादशाही पद सुरक्षित राखण्यासाठी त्याने हि मोहीम आखली होती. या मोहिमेत मराठी सरदारांची कामबक्षला मदत न व्हावी या हेतूने त्याने शाहूला आपल्या मदतीस येण्याची आज्ञा केली. स. १७०७ मध्ये मुअज्जमने शहजादा आजमचा पराभव करून त्याचा निकाल लावल्याने शाहूचा परिवार आता मुअज्जमच्या ताब्यात आला होता. अशा परिस्थितीत शाहूला मुअज्जम उर्फ बहादूरशहाची आज्ञा पाळणे भागच होते. परंतु, तो स्वतः बहादूरशहाकडे गेला नाही. आपल्या मार्फत म्हणून त्याने नेमाजी शिंद्यास मोगल बादशाहच्या मदतीस पाठवले व आपला मुक्काम साताऱ्यास हलवला.  शाहू कोल्हापूरातून निघून जाताच ताराबाईने त्वरेने येउन पन्हाळा ताब्यात घेतला. कोल्हापुरास यावेळी शाहूच्या मार्फत नेमलेला परसोजी भोसले होता. त्याने किंवा शाहूने ताराबाईच्या या कृत्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

       स. १७०९ च्या जानेवारीत बहादूरशहाने कामबक्षाचा पराभव करून त्यास ठार केले. बहादूरशहाचे आसन स्थिर झाल्याचे पाहताच आपल्या राज्यास मोगलांची मान्यता मिळावी व दक्षिणच्या सहा सुभ्यातुन चौथाई, सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याचे फर्मान मिळावे यासाठी शाहू आणि ताराबाईने आपापले वकील बहादूरशहाकडे रवाना केले. मोगली मुत्सद्यांच्या सल्ल्यानुसार बहादुरशहाने शाहू व ताराबाई यांना सांगितले कि, तुम्ही आपापसांत आधी निश्चित करा कि, शिवाजीच्या राज्यावर तुमच्यापैकी नेमका कोणाचा अधिकार आहे. मगच आम्ही तुम्हाला चौथाई व सरदेशमुखीच्या सनदा देऊ. मोगलांच्या या पवित्र्याने शाहूचा भ्रमनिरास झाला तर त्यामानाने ताराबाईस विशेष बळ प्राप्त झाले. कारण, मोगलांच्या या निवाड्याने शाहूला मोगल दरबारचा सक्रिय पाठिंबा नसल्याचे जाहीर झाले. ताराबाई व शाहू यांच्यात तंटा लावून मोगल स्वस्थ बसले नाहीत. शाहूने सोडवलेले प्रांत परत फिरून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला. पुणे प्रांत म्हणजे स्वराज्याचा गाभा. तो आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शाहूच्या सरदारांच्या व मोगलांच्या बऱ्याच लढाया पुण्याच्या आसपास घडून आल्या. इकडे ताराबाईने आपले राजकीय चातुर्य पणाला लावून दक्षिणेतील मोगल अंमलदारांना आपल्या पक्षास मिळवून शाहूचा उच्छेद चालवला. सारांश, ताराबाई व मोगल यांच्या कात्रीत शाहू चांगलाच सापडला व संभाजीचा हा पुत्र या अडचणीतून कसा मार्ग काढतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.

शनिवार, १६ मार्च, २०१३

गंगोबातात्या



           छ. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे पुढे पेशव्यांनी साम्राज्यात रुपांतर केले असे सामान्यतः म्हटले जाते. पेशव्यांच्या या राज्यविस्ताराच्या कामी त्यांना अनेक शूरवीरांची व मुत्सद्द्यांची मदत झाली. त्यांपैकी एक म्हणजे गंगाधर यशवंत चंद्रचूड हा होय ! गंगाधर चंद्रचूड उर्फ गंगोबातात्या हे नाव मराठी इतिहासप्रेमी वाचकांना अगदीच अपरिचित असे नाही. होळकरांचा गोडबोल्या कारभारी, पानिपत मोहिमेत दिल्लीचा किल्ला जाटाच्या ताब्यात देण्याच्या कटातील हा फितूर मुत्सद्दी, माधवराव – रघुनाथराव यांच्या भांडणात राघोबाची बाजू घेतल्याबद्दल भर दरबारात पेशव्याच्या हातून मार खाणारा वृद्ध मुत्सद्दी इ. अनेक सत्य – असत्य कथांच्या रूपाने हे ऐतिहासिक पत्र मराठी इतिहास वाचकांच्या मनात घर करून आहे.

           मराठी भाषेत इतिहास विषयक लेखन जरी विपुल प्रमाणात झाले असले तरी आजही संदर्भ ग्रंथांपेक्षा मराठी वाचकांवर कथा – कादंबऱ्यांची मोहिनी आहे. खंडीभर पुरावे धुंडाळून शेजवलकरांनी ‘ पानिपत १७६१ ‘ हा ग्रंथ लिहिला खरा, पण त्याचे वाचन किती जणांनी केले हा एक संशोधनाचा विषय आहे. त्याउलट विश्वास पाटलांनी प्रचलित कथा – दंतकथांच्या आधारे लिहिलेली ‘ पानिपत ‘ कादंबरीचे आज भारतातील प्रमुख भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. शेजवलकरांच्या पानिपत ग्रंथातील गंगोबातात्या हा लढवय्या आणि मुत्सद्दी आहे तर पाटलांच्या कादंबरीतील गंगोबा हा गोडबोल्या, भित्रा व मराठी राज्याशी द्रोह करणारा असा मुत्सद्दी आहे. आज मराठी इतिहास वाचकांना पाटलांनी रंगविलेला गंगोबाच माहिती आहे. शेजवलकरांच्या गंगाधरपंताची कोणाला फारशी माहितीच नाही. या ठिकाणी विश्वास पाटलांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही तसेच गंगोबाचे उदात्तीकरण देखील करण्याची माझी इच्छा नाही. प्रस्तुत लेखाचा मुख्य उद्देश म्हणजे गांगोबाच्या चरित्राचा एक धावता आढावा घेणे हा होय !

   पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळात मल्हाररावाचे प्रस्थ वाढू लागले होते. लौकिकात जरी मल्हारराव पेशव्यांचा सरदार असला तरी व्यवहारात मात्र तो एक स्वतंत्र संस्थानिकच होता. प. बाजीरावाच्या कालापासूनच होळकरावर नियंत्रण घालण्याचा पेशव्यांचा उद्योग चालला होता. आपला एखादा विश्वासू सेवक कारभारी म्हणून मल्हाररावच्या पदरी नेमून त्याच्या पायांत बेडी अडकवण्याचा पेशव्यांचा डाव होता व या खेळीतील त्यांचा मोहरा बनला गंगाधर यशवंत चंद्रचूड ! निंब गावचा हा मुत्सद्दी व योद्धा होळकरांचे कारभारी पद भूषवण्यास एकदम लायक होता. पेशव्यांनी मोठ्या चलाखीने गंगोबाला होळकराकडे नेमले खरे, पण मल्हारराव याबाबतीत वस्ताद निघाला. गंगोबाने मल्हाररावावर ताबा बसवण्यापूर्वीच होळकराने त्यास आपल्या घोळात घेतले. परिणामी पेशव्यांची, विशेषतः पेशव्याचा मुख्य कारभारी या नात्याने सदाशिवरावाची गंगोबावर नाराजी ओढवली. वस्तुतः, मल्हाररावसारख्या चतुर शूरवीराला रगडून पेशव्यांचा अंकित करणे हि जबाबदारी गंगोबाच्याच काय पण खुद्द पेशव्यांच्या देखील कुवतीबाहेरची होती. पण हि वस्तुस्थिती पेशव्यांनी कधी लक्षातच घेतली नाही.

       होळकरांच्या पदरी कारभारी म्हणून नोकरीस लागल्यावर गंगाधरचे नशीब पालटले. फडावरील मुत्सद्देगिरी व कारकुनीला अंगच्या पराक्रमाची जोड असल्याने पुढील काळात गंगोबावर लष्करी मोहिमा सोपवून मल्हारराव काहीसा निश्चिंत राहू लागला होता. अनुभवाने गंगोबालाही एक गोष्ट चांगलीच समजून आली होती. एकाच वेळी पेशवे व होळकर अशा दोघांच्या नोकऱ्या करण्यापेक्षा होळकराचाच पक्ष घेऊन राहिलेले केव्हाही चांगले. स. १७५० नंतर गंगोबाने आपला हा विचार हळूहळू अंमलात आणण्यास आरंभ केल्याचे दिसून येते. स. १७५० नंतर होळकरी सैन्याने ज्या मोठमोठ्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला त्या सर्व मोहिमांमध्ये गंगोबाचा सक्रीय सहभाग असल्याचे दिसून येते. स. १७५१ मध्ये मोगल वजीर सफदरजंग व रोहिले – पठाणांचा झगडा जुंपला. त्यावेळी वजिराच्या मदतीला शिंदे – होळकरांच्या फौजा गेल्या. त्या संघर्षात गंगोबाची तलवार तळपली. पुढे स. १७५४ मध्ये कुंभेरीच्या वेढ्यात मल्हाररावाचा मुलगा खंडेराव याचा अपघाती मृत्यू झाला. पुत्रनिधनाने वृद्ध मल्हारराव रणभूमीवरून काहीसा निवृत्त झाला व लष्कराची जबाबदारी गंगोबा व तुकोजीवर येऊन पडली. रघुनाथरावाचा प्रसिद्ध अटक मोहिमेत होळकरी सैन्याचे नेतृत्व प्रामुख्याने या दोघांनीच केले. स. १७६० मध्ये बुराडी घाटच्या लढाईनंतर अब्दालीसोबत लढण्यास होळकरांनी पुढाकार घेतला. त्यावेळी झालेल्या संग्रामात २७ फेब्रुवारी १७६० रोजी गंगोबाने दिल्लीजवळील सिकंदरा, या नजीबच्या जहागीरीतील प्रदेशावर स्वारी करून लूट मिळवली. ४ मार्च १७६० रोजी अफगाण सैन्याने छापा मारून गंगोबाला उधळून लावले तरी त्याचा हा पराक्रम खास दुर्लक्षणीय नाही.

     पानिपत युद्धानंतर बदललेल्या परिस्थितीनुसार पुढील राजकारणाचा उपक्रम ठरविणारे भेलसा मुक्कामातून नानासाहेब पेशव्याने लिहिलेले एक पत्र नाना पुरंदरे, विठ्ठल शिवदेव व गंगोबातात्यालाच उद्देशान लिहिले आहे. त्यात उत्तर हिंदुस्थानची जबाबदारी पेशव्याने या तिघांवर सोपविल्याचे दिसून येते. स. १७६५ मध्ये मल्हारराव व इंग्रजांचा झगडा जुंपला. त्यावेळी झालेल्या लढायांमध्ये होळकरी सैन्याचे नेतृत्व गंगोबाने केले. या संग्रामात होळकरांच्या सैन्याने इंग्रजांचा पराभव करून उत्तर हिंदुस्थानात मराठी राज्याची प्रतिष्ठा राखली. स. १७६६ मध्ये मल्हारराव वारल्यावर मात्र गंगोबाचे आसन काहीसे डळमळीत झाले. मल्हाररावाच्या मृत्यूनंतर त्याचा नातू मालेराव यास होळकरांची सरदारकी मिळाली असली तरी स. १७६७ मध्ये त्याचे निधन झाल्याने होळकरांचा वारस कोण हा प्रश्न निर्माण झाला. यावेळी अहिल्याबाईस दत्तक पुत्र घेण्याची परवानगी देऊन होळकरांचे कारभारी पद आपणांस मिळावे अशी गंगोबाने रघुनाथरावाकडे मागणी केली. परंतु राघोबादादा त्याची मागणी पूर्ण करण्यास असमर्थ होता. माधवराव पेशवा म्हणून राजकारणात स्थिर झाला होता. स. १७६७ अखेरीस त्याने तुकोजीला होळकरांच्या सरदारकीची वस्त्रे देऊन त्यास अहिल्याबाईच्या आज्ञेत वर्तण्याची आज्ञा दिली. त्याचप्रमाणे उत्तर हिंदुस्थानचा कारभार शिंदे, होळकर, पवार, राजेबहाद्दर इ. सरदारांनी गंगोबातात्याच्या सल्ल्याने करावा अशीही आज्ञा काढली. माधवरावाच्या या हुकुमावरून गंगोबाच्या राजकीय प्र्स्थाची महती लक्षात येते.

     असे असले तरी, याच माधवरावच्या विरोधात जाऊन कारस्थाने करण्यास गंगोबाने मागे – पुढे पाहिले नाही. पेशवे घराण्यातील चुलत्या – पुतण्याच्या वादात त्यावेळी कित्येक सरदारांची मने दुलग झाली होती. त्यांपैकी काही तटस्थ राहिले तर कित्येकांनी आपापल्या नायकाचा स्वीकारला. रघुनाथरावाने होळकरांकडे मदतीची मागणी केली त्याचप्रमाणे माधवरावाने देखील अशीच मागणी केली. तुकोजी होळकराने कोणताच पक्ष स्वीकारला नाही मात्र गंगोबा रघुनाथाच्या पक्षाला मिळाला. स. १७६८ च्या जून महिन्यात धोडप येथे माधवरावाने रघुनाथरावाचा पराभव केला. अटकेपार भरारी मारणारा राघोबादादा आता पेशव्यांचा नजरकैदी बनला. या लढाईत गंगोबादेखील सहभागी होता व पराभवानंतर तो कैदी म्हणून पेशव्यांच्या हाती लागला. पेशव्याने त्यास प्रथम नगरच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. पुढे त्यास पुणे दरबारात हजार करण्यात आले. कैदेतून सुटका हवी असल्यास ३० लाख रुपये दंड भरावा लागेल अशी पेशव्याने त्याच्यासमोर अट मांडली. तात्याने एवढ्या मोठ्या रकमेचा भरणा करण्यास असमर्थता दर्शवली. तेव्हा पेशव्याने भर दरबारात त्यास छड्या मारल्या. खरे तर ३० लाखांचे एक निमित्त होते. आपण वारंवार तात्याचा पक्ष घेऊन, उत्तर हिंदुस्थानची जबाबदारी त्याच्यावर सोपवून देखील तो रघुनाथरावची बाजू घेतो याचा पेशव्याला राग होता. तो राग त्याने अशा पद्धतीने व्यक्त केला. यातून फारसे काही नसले तरी पेशव्याचा एक हेतू मात्र साध्य झाला व तो म्हणजे सखारामबापू सारखी मंडळी पेशव्याच्या विरोधात कारस्थाने करण्यास काहीशी कचरू लागली.

       स. १७७२ मध्ये माधवरावच्या मृत्यूनंतर नारायणराव पेशवा झाला. आरंभी रघुनाथाचे व नारायणाचे उत्तम रहस्य होते पण पुढे लवकरच दोघांत तंटे निर्माण होऊन पेशव्याने चुलत्यास कैदेत टाकले. यावेळी दादाने आपल्या सुटकेसाठी व सत्ताप्राप्तीसाठी कित्येक कट आखले. त्यातील एक कट सिद्धीस गेला पण त्यात नारायणराव पेशवा जीवानिशी गेला. त्या कटात गंगोबाचा देखील सहभाग होता. नारायणराव मारला गेल्यावर दादा पेशवा झाला. आपले मुख्य कारभारीपद गंगोबाला देण्याचा त्याचा विचार होता पण प्रत्यक्षात मात्र गंगोबाला त्याने कारभारीपद दिले नाही. पेशवेपद हाती पडताच दादाने आपला जम बसवण्यास आरंभ केला खरा आपण वर्षभरातच त्याच्या विरोधात सरदारांनी बंड पुकारल्याने दादाचे आसन डळमळीत झाले. पुण्यातून त्याची गच्छंती होऊन कारभार बारभाई मंडळाकडे आला. या सर्व घडामोडींमध्ये सहभागी होण्याचे भाग्य मात्र गंगोबाला लाभले नाही. २० फेब्रुवारी १७७४ रोजी तो मरण पावला.