शुक्रवार, २ जानेवारी, २०१५

दुसरा बाजीराव पेशवा ( भाग – १२ )





    दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाच्या समाप्तीनंतर मराठी राज्याचे एकूण स्वरूप व चित्र बदलून गेले. पेशवा आता इंग्रजांच्या अपरोक्ष आपल्याच सरदारांशी कोणताही व्यवहार करण्यास मोकळा राहिला नव्हता. तसेच त्याचे बलवान म्हणवले जाणार सरदारही या युद्धात पार गळाठून गेले होते. सुर्जी – अंजनगावच्या तहाने इंग्रजांनी दौलतराव शिंद्याचे हात – पाय पुरते बांधून टाकले होते. तशीही लष्करी – राजकीय उठाठेवींची त्यांस फार हौस नसली तरी त्याचा आणि पेशव्याचा मिलाफ होऊ न देण्याची खबरदारी इंग्रज घेतच होते. पेशव्याचा दुसरा भरवशाचा सरदार म्हणजे नागपूरचा दुसरा रघुजी भोसले ! पुणे दरबारशी फटकून वागण्याची वृत्ती जानोजी आणि त्याच्या वंशजांनी दाखवल्याने इंग्रजांनी तोच धागा पकडून दुसऱ्या रघुजीसोबत स. १८०३ मध्ये देवगावचा तह करून त्यांस शक्य तितके कागदोपत्री मराठी संघराज्यातून अलग केले. या दोघांना तैनाती फौजेच्या बंधनांनी जखडण्याची गव्हर्नर जनरल रिचर्ड वेल्स्लीची जाम इच्छा होती पण, दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाच्या पूर्वार्धातच ऑर्थर वेल्स्ली इतका टेकीस आला होता कि, शिंदे – भोसल्यांनी तहाची आतुरता दाखवताच त्याने झट कि पट तहाचे सोपास्कार उरकून घेतले होते. पेशव्याचा तिसरा महत्त्वाचा आणि बलवान सरदार म्हणजे बडोद्याचे गायकवाड ! गृहकलह, पुणे दरबारशी फटकून वागण्याची वृत्ती आणि बाजीरावाचे उलट – सुलट राजकीय निर्णय इ. मुळे गायकवाडीत इतका गोंधळ माजला होता कि, स. १८०२ मध्येच त्यांनी इंग्रजांच्या मदतीने आपली व्यवस्था लावून घेतली होती. उत्तर पेशवाईतील आणखी एक अतिशय महत्त्वाचा आणि बलवान सरदार म्हणजे यशवंतराव होळकर ! बाजीरावाने होळकराचा सरंजाम जप्त केल्याने तो बंडखोर बनला होता. परंतु, स. १८०५ च्या अखेरीस इंग्रजांनी त्याच्याशी तह करून एकप्रकारे त्यांस स्वतंत्र संस्थानिक म्हणून मान्यता दिली. यशवंतरावानेही स्वतंत्र सत्ताधीशाप्रमाणे स्वतःला राज्याभिषेक करून स्वतःच्या नावाने देवनागरी लिपीत नाणीही पाडली. स्वतःच्या नावाने नाणी पाडणारा हा छ. शिवाजी नंतरचा दुसरा मराठी सत्ताधीश ! सो. 

    दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धानंतरही ठिकठीकाणचे मराठी सरदार – मुत्सद्दी मोठ्या आशेने पुण्याकडे पाहत होते. मोगल बादशाह जरी शिंद्याचा --- पर्यायाने मराठ्यांचा आश्रय सोडून इंग्रजांच्या छत्रछायेखाली गेला असला तरी दिल्लीतील पेशव्यांचा वकील हिंगणे, पूर्वीच्याच उत्साहाने दरबारातील व आसपासच्या राज्यांतील बारीक – मोठ्या घटना विस्ताराने पेशव्यास कळवत होता. परंतु, पेशव्याची दृष्टीच मुळी आकुंचित असल्याने हिंगण्याची खर्डेघाशी व्यर्थ गेली ! असो, स. १८०३ नंतर स. १८१७ पर्यंत बाजीरावाच्या कारकिर्दीत काही फारशा मोठ्या राजकीय घडामोडी घडून आल्या नाहीत. याचे कारण म्हणजे बाजीरावास बदलत्या परिस्थितीचा व आपल्या कर्तव्याचा अंदाज येण्यास बराच काळ जावा लागला. त्याचप्रमाणे त्याच्या राज्याच्या व पेशवेपदाच्या रक्षणाची जबाबदारी परस्पर इंग्रजांनी उचलल्याने तो आरंभी तरी काहीसा निर्धास्त झाला होता. ‘ काहीसा ‘ शब्दप्रयोग वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे इंग्रजांवरही त्याचा जितक्यास तितका भरवसा होता. 

    स. १८०३ पासून स. १८१७ पर्यंत बाजीरावाच्या कारकिर्दीत घडलेल्या काही प्रमुख घटनांचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. 

१] अमृतराव आणि समशेरबहादार दुसरा यांचे वृत्तांत :- वसईचा तह घडून इंग्रज फौजा बाजीरावास घेऊन पुण्यास येऊ लागल्या तेव्हा अमृतराव पुण्यातून नाशिकला रवाना झाला. यावेळी शिंदे – भोसले व होळकर या तिघांची युती होऊन ते इंग्रजांशी एकत्रितपणे सामना देण्याच्या बेतात होते. खुद्द अमृतरावही या योजनेस आरंभी अनुकूल होता. त्याचप्रमाणे बाजीरावही आपल्या सरदारांना अंतस्थरित्या इंग्रजांविरुद्ध चिथावणी देण्याचे कार्य करत होता. परंतु, यावेळी बाजीरावाने एक महत्त्वाची चूक केली. त्रिवर्ग सरदार एकदिलाने इंग्रजांशी लढण्याची तयारी करत असताना त्याने शिंद्याला, होळकराशी तात्पुरती मतलबी जवळीक करून इंग्रजांचे राजकारण आटोपताच यशवंतरावाचा काटा काढण्याची सूचना केली. बाजीरावाची बातमीपत्रे मारण्याचे काम इंग्रजांप्रमाणेच अमृतरावही करत होताच. त्याच्या हाती वरील आशयाची पत्रे पडताच याने ती ऑर्थर वेल्स्लीच्या सल्ल्यावरून यशवंतरावास पाठवून दिली आणि शिंदे – भोसल्यांना मिळण्यासाठी जवळ आलेला होळकर उत्तरेत निघून गेला.

    अमृतरावाच्या या वर्तनावर इतिहासकारांनी विनाकारण टीका केली आहे. पुण्यातील चार महिन्यांच्या कारभारात अमृतरावास राजकारणाची अंतःस्थिती चांगलीच समजून चुकली होती. अशा परिस्थितीत बाजीराव जेव्हा प्राणांवर बेतली तरी दुटप्पी राजकारण खेळत असल्याचे पाहून भवितव्यता लक्षात घेऊनच त्याने इंग्रजांशी मैत्री केल्याचे दिसून येते. इंग्रजांनी अमृतरावाच्या या दोस्तीची कदर करत त्यांस स. १८०४ मध्ये सालीना आठ लक्षांची तैनात बांधून काशी येथे राहण्याची व्यवस्था करून दिली. यानंतर मराठी राज्याशी वा राजकारणाशी त्याचा अजिबात संबंध आला नाही. 

    थोरल्या बाजीरावाला बुंदेलखंडी मिळालेल्या खासगी जहागिरीवर नाना फडणीसने समशेरबहाद्दरच्या मुलाची --- अलीबहाद्दरची नियुक्ती केली होती. तो तिकडे आपला जम बसवत असताना स. १८०२ च्या ऑगस्टमध्ये मरण पावला. यावेळी त्याचा मुलगा समशेरबहाद्दर ( दुसरा ) हा पुण्यास होता. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने समशेरची बुंदेलखंड प्रांती नेमणूक न करता ती जहागीर सरकारजमा करून त्यावर नीलकंठ रामचंद्र प्रभू पागेची नियुक्ती केली. समशेरने या संबंधी पुष्कळ खटपट केली पण, रावबाजीने त्याचे काहीएक ऐकून घेतले नाही. पुढे हडपसरच्या लढाईत समशेर पेशव्याच्या वतीने लढला आणि नंतर महाडपर्यंत त्याच्या सोबतही गेला. तिथून बाजीरावाने त्याची रवानगी पुण्यास केली. यावेळी पुण्यात अमृतराव कारभारावर असून त्याने समशेरला सरंजामाची वस्त्रे देऊन बुंदेलखंडी पाठवून दिले. समशेर आपल्या जहागिरीच्या प्रदेशात पोहोचेपर्यंत दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाचा भडका उडून बुंदेलखंड ताब्यात घेण्यसाठी गव्हर्नर जनरल रिचर्ड वेल्स्लीने आपल्या भावाची --- हेन्री वेल्स्लीची योजना केली होती. 

    इंग्रजांनी यावेळी अलीबहाद्दरच्या प्रमुख सरदारांना --- गनीबेग व अनुपगीर गोसावी उर्फ हिंमतबहाद्दर आणि शिंद्याचा या भागातील बलवान सरदार अंबूजी इंगळे यांना फितूर केले होते. तसेच गोहदच्या राण्यालाही त्यांनी आपल्या पक्षात मिळवून घेतले. सारांश, बुंदेलखंड ताब्यात घेण्याची लष्करी तयारी झाली होती आता राजकीय तयारी बाकी होती, त्याची पण पूर्तता लवकरच झाली. वसईच्या तहानुसार तैनाती फौजेच्या खर्चासाठी पेशवा गुजरात आणि सावनूर प्रांतातील मिळून काही प्रदेश तोडून देणार होता. तेव्हा इंग्रजांनी गुजरात – सावनूर ऐवजी बुंदेलखंडाची मागणी केली आणि पेशव्याने दि. ५ ऑक्टोबर १८०३ रोजी लेखी कराराने ती पूर्ण करून वर समशेरबहाद्दर बंडखोर असल्याचे जाहीर करत त्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी इंग्रजांच्या गळ्यात बांधली. 

    समशेरने शक्य तितका इंग्रजांचा प्रतिकार केला. मदतीसाठी त्याने होळकराशी संधानही बांधले पण यशवंतराव वेळेवर त्या प्रांती जाऊ न शकल्याने समशेरने निरुपाय जाणून शस्त्रे खाली ठेवली आणि दि. १८ जानेवारी १८०४ रोजी इंग्रजांशी तह करून सालीना चार लाखांची तैनात घेऊन बांदा येथे राहण्याचे कबूल केले. अशा प्रकारे उत्तरेतील पेशव्याच्या मालकीची जागा, त्याने आपणहून इंग्रजांच्या स्वाधीन केली. याचे परिणाम तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाच्या वेळी बाजीरावाला अनुभवास आले.                   
२] फत्तेसिंग माने हा होळकराचा पराक्रमी सरदार. त्याला आपल्या पक्षात वळवण्याचे पेशव्याने बरेच प्रयत्न केले पण तो न बधल्याने, तसेच यशवंतराव उत्तरेत निघून गेल्यावर मान्याचा दक्षिणेत धुमाकूळ चालूच राहिल्याने बाजीरावाने चिंतामणराव पटवर्धन आणि प्रतिनिधीचा कारभारी बळवंतराव फडणीस यांना फत्तेसिंगाचा बंदोबस्त करण्याची आज्ञा केली. दि. १७ जुलै १८०४ रोजी पंढरपूर जवळ झालेल्या संग्रामात मान्याचा पराभव होऊन तो मारला गेला.

३] प्रतिनिधीचा बंडावा :- यशवंतरावाच्या पुणे स्वारीपूर्वीच परशुरामपंत प्रतिनिधीचे प्रकरण वर्दळीवर आले होते. पण बाळोजी कुंजीरच्या मार्फत पेशव्याने त्यास पकडून पुण्यातच नजरकैदेत ठेवले. पुढे यशवंतरावाच्या पुणे स्वारीत परशुरामपंत मोकळा झाला व त्याने आपले पूर्वीचेच ढंग सुरु ठेवले. तत्कालीन प्रथेप्रमाणे आपल्या जहागिरीत व सरकारच्या महालांत लुटालूट करणे, प्रसंगी वतनदार व धनसंचय केलेल्या ब्राम्हणांना लुटून घेणे, लग्नाच्या स्त्रियांना टाकून तेली जातीच्या रमा उर्फ ताई तेलीण हिच्यासोबतच जास्त काळ व्यतीत करणे, इ. कागाळ्या बाजीरावाच्या कानी जातच होत्या. पण प्रतिनिधीने जेव्हा छत्रपतींच्या नावा – निशाणाखाली पेशव्याची सत्ता झुगारून दिल्याचे जाहीर केले तेव्हा मात्र बाजीरावाने बापू गोखल्याला प्रतिनिधीचा बंदोबस्त करण्याची स. १८०४ च्या अखेरीस आज्ञा केली. त्यानुसार स. १८०६ मध्ये बापूने प्रतिनिधीला पकडून पुण्यास पाठवले. तिथे त्यांस बाजीरावाने स. १८११ पर्यंत नजर कैदेत ठेवून मुक्तता करून कराड प्रांती रवानगी केली. इकडे परशुरामपंत जरी कैद झाला असला तरी त्याची रक्षा ताई तेलीण हिने प्रांतात बंडावा सुरूच ठेवला. तेव्हा फिरून बापूने तिच्याविरुद्ध मोहीम काढून स. १८०८ मध्ये तिलाही पकडून पुण्यास पाठवून दिले. 

४] सातारच्या छत्रपतीपदी प्रतापसिंहाची स्थापना :- दि. ४ मे १८०८ रोजी सातारचा छत्रपती धाकटा शाहू मरण पावला. तेव्हा त्याचा थोरला मुलगा प्रतापसिंह यांस ता. १६ मे १८०८ रोजी बाजीरावाने आपल्या देखरेखीखाली राज्याभिषेक करविला. यावेळी पेशव्याने मुद्दाम वा अजाणतेपणी दोन गोष्टी घडवून आणल्या. पहिली म्हणजे नवीन छत्रपतीस त्याच्या नावाचा नवीन शिक्का बनवू न देता त्याच्या वडिलांच्याच वेळचा शिक्का वापरण्याचा आग्रह केला आणि राज्याभिषेकापूर्वी मुंजीची असलेली परंपरा देखील यावेळी खंडित करून टाकली. बाजीरावाच्या या दोन निर्णयांमागील कारणपरंपरेचे काही आकलन होत नाही. सातारच्या प्रतापसिंहास राज्याभिषेक झाला तेव्हा तो जवळपास पंधरा वर्षांचा होता. त्यामुळे साहजिकच त्याच्या कारभारावर त्याच्या आईचे म्हणजे माईसाहेबांचे नियंत्रण असणे स्वाभाविक होते. सुरवातीला प्रतापसिंह बरोबर पेशव्याचे राजकीय संबंध चांगले होते पण चार – दोन वर्षांतच परस्परांविषयी अविश्वास निर्माण होऊन सातारकरांनी इंग्रजांशी संधान बांधले.

५] वसईचा तह घडून आल्यावर बॅरी क्लोझने स. १८०९ च्या जुलै पर्यंत पुण्यातील वकिलातीचे काम पाहिले. या काळात त्याने पेशव्याच्या अंतर्गत राज्यकारभारात फारशी ढवळाढवळ न करता आपल्या सत्तेचा बोज राखण्यात जास्त धन्यता मानली. अर्थात या कालावधीत पेशवाही इंग्रजविरोधी कारवायांपेक्षा इतर कामकाजात अधिक गुंतल्याने क्लोझबरोबर त्याचे सालोख्याचेच संबंध राहिले. 

    क्लोझ नंतर स. १८११ च्या फेब्रुवारीत एल्फिन्स्टनची पुण्याचा रेसिडेंट म्हणून नेमणूक होईपर्यंत गोवान, हॅमिल्टन आणि हेन्री रसेल यांनी हंगामी रेसिडेंटची भूमिका बजावली. यांपैकी रसेलने त्यातल्या त्यात दोन वर्षे हि जबाबदारी सांभाळली तर इतरांना चार – दोन महिन्याखेरीज जास्त काळ मिळाला नाही. या सर्वांनी क्लोझ प्रमाणे आपली वागणूक ठेवल्याने पेशव्यासोबत त्या सर्वांचे संबंध चांगले राहिले असले तरी हॅमिल्टनच्या कारकिर्दीत दि. २९ ऑक्टोबर १८०९ रोजी पुण्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे काही काळापुरते इंगज – पेशव्यातील संबंधात कटुता निर्माण झाली.

    त्या दिवशी चार गोरे शिपाई पेशव्याच्या कोथरूड बागेत जबरदस्तीने शिरले. यावेळी बागेच्या बंदोबस्ताची जबाबदारी रुपराम चौधऱ्यावर असल्याने त्याच्या चौकीच्या सैनिकांनी या चार इंग्रजांना पकडून मारझोड करत, गावातून त्यांची धिंड काढत पेशव्याच्या वाड्याकडे जाऊ लागले. धिंडी दरम्यान शहरात घबराट माजून लोकांनी दुकाने – घरे बंद केली. तेव्हा मराठी सैनिकांनी घराघरांत घुसून लोकांना हि धिंड पाहण्यास रस्त्यावर आणले. तसेच एका इंग्रज शिपायास जास्त मार लागल्याने त्यांस चालता येईना तेव्हा शिकार केलेल्या प्राण्याप्रमाणे एका काठीला बांधून त्यांस खांद्यावरून उचलून नेण्यात आले. याशिवाय कैद्याने तहानेने व्याकूळ होऊन पाणी मागितले असता त्यांस मराठी सैनिकांनी मूत्र पिण्यास सांगितले. अशा प्रकारे हि वरात पेशव्याच्या वाड्यात आली. त्याने हे प्रकरण आपला काभारी सदाशिव माणकेश्वर याच्याकडे सोपवले. माणकेश्वर बुवा यावेळी हिराबागेत असल्याने हि वरात तिकडे गेली. तिथे पोहोचल्यावर माणकेश्वरने अधिक चौकशी न करता रेसिडेन्सीत निरोप पाठवून ‘ त्या चार कैद्यांना ‘ घेऊन जाण्याची सूचना केली. तेव्हा इंग्रजांनी डोल्या पाठवून आपली माणसे नेली.

    हा प्रकार घडला तेव्हा हॅमिल्टन पुण्याबाहेर होता. घटनेचा वृत्तांत मिळताच तो तातडीने पुण्यास आला व त्याने सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हेगारांना शासन करण्याचा पेशव्याकडे आग्रह धरला. हॅमिल्टन जाऊन त्याच्या जागी हेन्री रसेल रेसिडेंट म्हणून नियुक्त झाला होता. त्याने हि घटना कंपनी सरकार व इंग्रज राष्ट्राचा अपमान असल्याचे कारण पुढे करत तपासकामी पेशव्यास धारेवर धरले. तेव्हा पेशव्याने आपला कारभाऱ्यास शिवीगाळ करून कामात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल ठपका दिला. नंतर कोथरूड बागेतील व कोतवाल चौकीचे १०० शिपाई त्याने कैदेत टाकून त्यांतील ९ जणांना प्रत्यक्ष गुन्हेगार मानून बंदिवासात टाकले तर ५० जणांना राहत्या घरी नजरकैदेत ठेवले. पेशव्याच्या या तातडीमुळे रसेलनेही अधिक ताणून न धरता वादावर पडदा टाकला आणि ता. १८ नोव्हेंबर १८०९ रोजी रेसिडेन्सीत हुकुम काढून पुणे शहरात इंग्रज शिपाई वा अधिकाऱ्यांना जाण्यास बंदी घातली. 

    राजकीयदृष्ट्या या प्रसंगास / घटनेस फारसे महत्त्व नसले तरी परराज्यातील / राष्ट्रांतील सैनिकांविषयी मराठी शिपायांच्या मनात कशा प्रकारची भावना होती, याचे प्रत्यंतर या घटनेतून येते.

६] माउंट स्टूअर्ट एल्फिन्स्टनचे पुणे दरबारी आगमन :-  स. १८११ च्या फेब्रुवारीत हेन्री रसेलच्या जागी माउंट स्टूअर्ट एल्फिन्स्टन उर्फ ‘ अल्पिष्टन ‘ पुण्याच्या वकिलातीवर रुजू झाला. बॅरी क्लोझचा सहाय्यक म्हणून त्याने यापूर्वी पुणे दरबारचे कामकाज पाहिलेलं असल्याने आणि वसईच्या तहात त्याचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याने येथील राजकारणाची त्यांस चांगलीच ओळख होती. हिंदुस्थानात असलेल्या समकालीन इंग्रजांप्रमाणेच एल्फिन्स्टनही साम्राज्यविस्तारवादी होता. परंतु, त्याच्या राजकारणाची पद्धत रिचर्ड वेल्स्लीच्या वळणाची होती. त्यामुळे पेशव्याचा व त्याचा प्रसंगोत्पात खटका उडणे स्वाभाविक होते.

    एल्फिन्स्टनच्या स्वभावाची व कामकाजाच्या पद्धतीची माहिती असलेल्या इंग्लिश रेसिडेन्सीतील खुरशेट मोदीने पेशव्याला अंतस्थरित्या सावधगिरीचा इशारा देऊन ठेवला. मोदी जरी कंपनीचा नोकर असला तरी अंतस्थरित्या पैसे खाऊन तो पेशव्याचेही हित सांभाळत असे. तत्कालीन हिंदुस्थानी चाकारांपेक्षा त्याचे वर्तन निराळे होते असे म्हणता येत नाही. मोदीच्या सेवेची कदर म्हणून बाजीरावाने त्यांस स. १८०९ मध्ये कर्नाटक प्रांताची सुभेदारी दिली. मोदीने त्या प्रांती आपला मुतालिक नेमून रेसिडेन्सीतील नोकरी कायम राखली. अर्थात, हे त्यावेळच्या प्रथेस सुसंगत असले तरी एल्फिन्स्टनने या गोष्टीस आक्षेप घेऊन मोदीला पेशवे वा कंपनी सरकार यांपैकी एकाची चाकरी सोडण्याची आज्ञा केली. तेव्हा मोदीने कर्नाटकची सुभेदारी सोडली आणि पेशव्याने त्या जागी त्रिंबकजी डेंगळेची नियुक्ती केली.
 
 ७] वसईचा तह व दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धाची समाप्ती झाल्यावर पेशव्याने राज्यकारभार, धार्मिक कृत्यं आणि ऐशोआरामाकडे विशेष लक्ष पुरवले. ठीकठिकाणची बंडाळी संपुष्टात आल्यावर प्रांतात काही प्रमाणात शांतता – सुव्यवस्था प्रस्थापित होऊन सरकारी खजिन्यात महसुलाची भर पडू लागली. याच काळात केव्हातरी पेशव्याने मामलतींचा लिलाव करण्याचा निर्णय अंमलात आणला. त्यामुळे चढ्या बोलीने मामालती घेण्यात धनवानांची चढाओढ सुरु होऊन पाच हजारांच्या मामलतीवर पन्नास हजारांची बोली लागू लागली. बाजीरावाचे या काळात मुख्य उद्दिष्ट खजिन्यात भर टाकण्याचे असल्याने चढ्या भावाने मामलती घेणाऱ्यांनी वसुलीसाठी काहीही केलं तरी त्याकडे तो दुर्लक्ष करू लागला.

    पेशव्याचा सालाचा वसूल सुमारे सव्वा कोट रुपये असून त्यापैकी खर्च वजा जाता तो कमीतकमी पन्नास लाख रुपये शिलकीत टाकत असे. स. १८१२५ मध्ये त्याच्या खजिन्यात सुमारे पाच कोटींचा ऐवज असल्याचा उल्लेख इतिहासकार करतात. यावरून बाजीराव निश्चित एका धोरणाने पैसा गोळा करत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे याच काळात पेशव्याची विलासी व धार्मिक वृत्ती कळसास जाऊन पोहोचली. 

    तमाशा, लावणी, कीर्तनकार, गवई इ. ना भर दरबारी सन्मान देण्यात येऊ लागले. दरबारात, वाड्यात मातबर सरदार मसलती ऐवजी करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी गोळा होऊ लागले. शहरात व पुण्या आसपासच्या भागांत पेशव्याने आपल्या विश्राम – विलासांसाठी शहरांची – वाड्यांची निर्मिती केली. तत्कालीन प्रचलित रीतीस धरून पेशव्याची मर्जी रक्षण्याकरता लहान – मोठे सरदार, सावकार आपापल्या विवाहीत स्त्रियांना पेशव्यासोबत एकांत करण्यासाठी पाठवू लागले. पेशव्याच्या या विलासकृत्यांवर समकालीन एल्फिन्स्टन पासून नंतरच्या देशी – विदेशी इतिहासकारांनी भरपूर टीका केली आहे व आजही कित्येक नवजात इतिहासकार या कृत्यात धन्यता मानत आहेत.

    वास्तविक बाजीरावाचे विलास प्रकरण तत्कालीन प्रचलित रूढी – परंपरांना अनुसरून होते. स्वतः एल्फिन्स्टन पुण्याच्या रेसिडेन्सीत वेगळं काय करत होता ? बाजीरावाचा समकालीन नेपोलियन बोनापार्टचे विलासी आचरण कशा प्रकारचे होते ? बरे, तो जर तत्कालीन सभ्य आणि उच्च युरोपियन संस्कृतीनुसार हलक्या कुळातील होता असे जर मानले तर, राजकीय फायद्यासाठी आपापल्या विवाहित आणि अभिषिक्त बायका शृंगारून या हलक्या कुळातील नेपोलियनच्या बिछान्यात पाठवणाऱ्या उच्च कुलीन युरोपियन राजे – रजवाड्यांचे काय ? हि जर पाश्चिमात्त्य उदाहरणे नको असतील तर दुसऱ्या बाजीरावाच्याच काळात हिंदुस्थानात काय चालले होते ? मुस्लीम संस्थानिकांचे विलास याहून वेगळे होते का ? स्त्रियांविषयीची मुस्लिमांची भोगबुद्धी हा जर दुर्गुण वा दोष मानला जात असेल तर मग स्वधर्मीय दौलतराव शिंदे, नागपूरकर दुसरा रघुजी भोसले यांचे काय ? खुद्द बाजीराव पेशव्याच्या बापाने --- रघुनाथरावाने सुरत मुक्कामी ब्राम्हणाची मुलगी कशासाठी पळवून नेली होती ? नैतिकतेचा टेंभा मिरवणाऱ्यांणा मस्तानी प्रकरणातील राधाबाईच्या निंदनीय भूमिकेचा बरा विसर पडतो ? बाजीराव निदान दुसऱ्यांच्या बायकांना तरी जवळ करत होता पण राधाबाईने नानासाहेबाला आपल्याच पित्याच्या द्वितीय पत्नी – सावत्र माते सोबत फाजील लगट करण्याचा सल्ला कोणत्या नैतिक  भूमिकेतून दिला होता ? कि त्यावेळची नैतिक बंधने फारच सैल असल्याने राधाबाई, चिमणाजी व नानासाहेब यांचे वर्तन सहज खपून गेले, असे समजायचे ? फार लांब कशाला, महात्मा फुलेंनी जो पुण्यात विधवा स्त्रिया व अनाथ मुलांसाठी आश्रम सुरु केला होता, त्यामागील कारणे काय होती ? तत्कालीन समाजातील विधवांचे पाय, आपल्याच घरात कसे घसरवले जात होते ?

    खरोखरच त्यावेळच्या समाजमान्य कल्पनांच्या मर्यादेबाहेर बाजीरावाने वर्तन केले असते तर त्याचे राज्य घेण्यासाठी स.१८१८ पर्यंत इंग्रजांना वाट बघत बसण्याचे काहीच कारण नव्हते. बाजीरावाच्या सरदारांना आपापल्या विवाहित स्त्रिया रावबाजीच्या बिछान्यात पाठवणे गैर वाटले असते तर त्यांनी त्याच्याविरोधात बंड नसते का पुकारले ? किंवा एखाद्या माथेफिरू व्यक्तीने त्याचा खूनच केला नसता का ? सारांश, समकालीन सामाजिक रूढी, परंपरा लक्षात न घेता एखाद्याच्या विशिष्ट आचारणावर बोट ठेवून टीका करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे.
 
    दुसरा बाजीराव जितका विषयासक्त तितकाच धार्मिकही होता. बापाप्रमाणेच तो कट्टर शिवभक्त असून तत्कालीन समजुतीनुसार धार्मिक प्रथा, परंपरांचे शक्य तितके काटेकोरपणे पालन करण्याकडे त्याच्या मनाचा स्वाभाविक कल असे. आपल्या बापाने नारायणरावाचा खून करून मोठं पाप केल्याची भावना सदोदित त्याच्या मनाला सलत होती. त्या पापाचे क्षालन करण्यासाठी तत्कालीन समजुतीनुसार त्याची कर्मकांडे सुरु होती. खेरीज, प्रचलित पद्धतीनुसार त्याचे शिक्षण झालेलं असल्याने यज्ञयाग – पूजापाठ प्रसंगी करावयाच्या मंत्रोच्चारातही तो सहभाग घेत असे.

    जनतेला पीडून त्याने पैसा जमवला व भिक्षुक – ब्राम्हण आणि तमाशा कलावंत व स्त्रियांवर उधळला असा समज आहे. परंतु, बाजीरावाच्या या उधळपट्टी विषयीचे समकालीनांचे अभिप्राय पाहिले असता असे लक्षात येते कि, तो इतर पेशव्यांप्रमाणेच आर्थिक व्यवहारात दक्ष असून त्याचा खर्च बेताचा असला तरी त्यांत कंजूषपणाचा लवलेश नव्हता. त्याखेरीज इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्याने जी काही लष्करी तयारी केली होती, तिच्याकरता लागणारा प्रचंड पैसा पाहता खरोखरच या पेशव्याने भिक्षुक – ब्राम्हण व स्त्रियांवर पैशांची नाहक उधळपट्टी केल्याचा आरोप करणाऱ्या इतिहासकारांच्या बुद्धीची कीव येते.

    बाजीरावाची राजकीय कारकीर्द इतर कोणत्याही पेशव्यापेक्षा अधिक व शांततेची असली तरी त्या शांततेचा उपयोग करून राज्यकारभाराची घडी बसवण्याचा वा त्यात काही फेरबदल करण्याचा त्याने खटाटोप केला नाही. त्याची मुळातच तेवढी कुवत नसल्याने आणि त्याचे याविषयीचे पुस्तकी वा व्यावहारिक शिक्षणच न झाल्याने असे होणे स्वाभाविकच होते. असो, बाजीरावाने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत सामाजिकदृष्ट्या काही धाडसी निर्णय घेतले खरे, पण त्यांची अंमलबजावणी फार प्रभावीपणे होऊ शकली नाही. उदाहरणार्थ :- (१) तत्कालीन समाजात विवाह प्रसंगी वधूपिता वराकडून काही रक्कम घेत असे. या कन्याविक्रयास बाजीरावाने बंदी घातली. (२) पेशव्याच्या राज्यातून साष्टी व मुंबई प्रांती गाईंची विक्री होत असे, त्यावर पेशव्याने पूर्णतः बंदी आणण्याचा प्रयत्न केला. (३) एका धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तीला पुन्हा हिंदू धर्मात घेण्याकरता बाजीरावाने आज्ञा काढल्याचे इतिहासकारांनी नमूद केले आहे.

    बाजीरावाच्या आधीचे पेशवे मुलूखगिरीसाठी मोठ – मोठ्या फौजा घेऊन मोहिमेवर बाहेर पडत. परंतु, वसईच्या तहामुळे बाजीरावाला तो उपद्व्याप करण्याची मोकळीक न राहिल्याने दरवर्षी तो फौजफाटा घेऊन आपल्याच राज्यातून देवदर्शन करण्यासाठी मोहिमा आखू लागला. या देवदर्शन स्वारीत पूर्वपरंपरेनुसार मार्गातील गावांना लष्कराच्या उपद्रवात काही फरक पडला नाही.

८] पंढरपूरचा तह ( स. १८१२ ) :- वसईच्या तहानंतर बाजीरावाने थोडी स्वस्थता लाभताच दक्षिणेतील सरदाराना धारेवर धरण्यास आरंभ केला. त्यामागे प्रांतिक व सांपत्तिक अभिलाषा असल्याचा आरोप इतिहासकारांनी केला असला तरी त्यात फारसे तथ्य वाटत नाही. 

    नाना फडणीसच्या मृत्यूनंतर व यशवंतरावाच्या दक्षिण स्वारीने पुणे दरबारात बरेच घोटाळे माजून अनेकांच्या सरंजामांची घालमेल झाली होती. कित्येकांनी लष्करी बळावर परस्परांचे प्रांत दाबले होते. तेव्हा अशा सरदारांकडून गैरसनदी बळकावलेला मुलुख ताब्यात घेण्याचा सपाटा पेशव्याने लावला. त्याचप्रमाणे जे सरदार त्याच्या दृष्टीने नालायक, आकार्यक्षम होते त्यांचे सरंजाम जप्त करून तो इतरांना देऊ लागला. उदा :- पेशव्यांचा तोफखाना पानशांच्या अखत्यारीतून काढून त्याने त्यावर त्रिंबकजी डेंगळेची नियुक्ती केली. त्याचप्रमाणे अमृतरावाच्या औटघटकेच्या कारभारात ज्यांनी साथ दिली होती अशा बाबा फडके प्रभूतींचा त्याने उच्छेद चालवला.
तसेच कोल्हापूर, सावंतवाडी इ. संस्थानांच्या बाबतीतही पेशवा आपले वाजवी हक्क गाजवू लागला तेव्हा या संस्थानिकांनी व पेशव्याकडून त्रस्त झालेल्या सरदारांनी मदतीकरता एल्फिन्स्टनकडे धाव घेतली. 

    पेशव्याच्या राज्यकारभारात हस्तक्षेप करून त्याचे लष्करी बळ खच्ची करण्याची चालून आलेली संधी दवडण्याइतपत एल्फिन्स्टन मूर्ख नव्हता. त्याने आपली सर्व अक्कल – हुशारी पणाला लावून दि. २० जुलै १८१२ रोजी पंढरपूर येथे पेशव्याकडून खालील कलमांवर आधारित तहास मंजुरी मिळवून घेतली :- (१) जागीरदारांवरील पूर्वीचे द्वेष सोडून द्यावे. (२) पूर्वीच्या सनदांस व रिवाजांस सोडून नवीन मागण्या पेशव्याने त्यांजकडे इंग्रजांच्या परवानगीशिवाय करू नयेत. (३) तैनात जाबत्यांत ठरल्याप्रमाणे जागीरदारांनी फौजा बाळगून पेशव्याची नोकरी करावी. (४) इंग्रजांच्या परवानगीशिवाय जागीरदारांचे सरंजाम पेशव्याने जप्त करू नयेत. (५) भेटीच्या व अन्य प्रसंगी पेशव्यांनी त्यांचा योग्य सन्मान ठेवावा. (६) सनदाबाहेर जे प्रदेश जागीरदारांच ताब्यांत असतील ते त्यांनी सोडून पेशव्याचे हवाली करावे. (७) उभयतांमध्ये तक्रार उपस्थित झाल्यास त्याचा निवडा इंग्रज करतील तो पेशव्याने मान्य करावा. (८) जागीरदारांशी कोणताही करार परभारे करण्यास इंग्रज सरकार मुखत्यार आहेत. 

    टीप :- उपरोक्त तहातील ७ क्रमांकाचे कलम शब्दशः नसावे असे मला वाटते. कारण एकाच पक्षाला बंधनकारक अट एल्फिन्स्टन घालेल हे संभवत नाही. ७ वे कलम उभयपक्षी --- पेशवा आणि जागीरदार यांना --- बंधनकारक असावे पण माझ्याकडील सरदेसायांच्या रियासतीत जसा तह दिला आहे तो शब्दशः येथे उतरून घेण्याखेरीज सध्या तरी दुसरा पर्याय नाही.

    पंढरपूरच्या तहातील अटी पेशवा आणि जहागीरदार सहजासहजी मान्य करणार नाहीत याची एल्फिन्स्टनला खात्री होतीच. त्यामुळे तहाचा मसुदा बनवत असतानाच दक्षिणेतील इंग्रजांची व मांडलिक संस्थानिकांची फौज त्याने मोक्याच्या स्थळी आणून ठेवण्याची खबरदारी घेतली होती. त्यामागील प्रमुख हेतू म्हणजे, या निमित्ताने जर युद्धाचा भडका उडाला तर तडकाफडकी पेशव्याचे राज्य गिळंकृत करून टाकायचे. कारण, यावेळी दीर्घकालीन युद्धासाठी पेशव्याची वा त्याच्या सरंजामदारांची बिलकुल तयारी नव्हती. असो, पेशवा आणि त्याच्या जहागीरदारांनी एल्फिन्स्टनचा महत्त्वाचा डाव जरी वाया गेला असला तरी या तहान्वये एल्फिन्स्टनने जहागीरदार व पेशवा यांच्यातील थेट संबंध तोडून त्यात इंग्रजांची दरम्यानगिरी प्रस्थापित करत त्या दोघांवर कंपनी सरकारचे वर्चस्व लादले. 

९] कोल्हापूरकर इंग्रजांच्या पंखाखाली :- स. १८१२ च्या पंढरपूरच्या तहानंतर एल्फिन्स्टनने कोल्हापूरकर, सावंतवाडीकर आणि निपाणकर देसायाला पेशव्याच्या जोखडातून मुक्त करत कंपनी सरकारच्या छत्रछायेखाली घेतले. यांपैकी करवीरचे प्रकरण विशेष महत्त्वाचे होते. 

    इंग्रजांची व्यापाराकरता मालवण बंदर व किल्ला आपल्या ताब्यात घेण्याची बऱ्याच वर्षांची इच्छा होती. परंतु, पुणेकर जबरदस्त असल्याने त्यांना गप्प बसावे लागले होते. वसईच्या तहानंतर मात्र चित्र साफ पालटले. कोल्हापूरकरांना पुणेकरांचे वर्चस्व कधीच मानवले नव्हते. त्यात बाजीराव करवीरकरांवर आपला अधिकार गाजवू लागला तसा कोल्हापूरकरांनी एल्फिन्स्टनकडे मदतीचा धावा केला. दाराशी चालून आलेली सुवर्णसंधी अल्पिष्टनसाहेब कसा दवडेल ? त्याने लगेच करवीरकरांशी स्वतंत्र तहनामा करण्याची तयारी आरंभली. कोल्हापूर प्रकरणी इंग्रजांची वासना ओळखून रावबाजीने मालवण बंदर ताब्यात न घेण्याची विनंती करत, बदल्यात नुकसान भरपाईस्तव ५० लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. परंतु एल्फिन्स्टनने तिकडे साफ दुर्लक्ष केले तेव्हा बाजीरावाने, कोल्हापूरकरांशी स्वतंत्र तह करण्याचा इंग्रजांना अधिकार नसल्याचे ठणकावून सांगताच एल्फिन्स्टनने पेशव्याचे म्हणणे खोडून काढत दि. ८ ऑक्टोबर १८१२ रोजी करवीरकरांशी तह करून मालवण सोबत सर्जेकोट, पद्मगड, राजकोट हि स्थळे देखील आपल्या ताब्यात घेतली. तसेच चिकोडी व मनोळी पेशव्याला देऊन वरकरणी त्यांस खुश केले पण भविष्यात पेशवा – करवीरकरांची युती होण्याची शक्यता बव्हंशी मोडीत काढली. 

    अर्थात, कोल्हापूरकरांनी या तहास राजीखुशीने संमती दिली नाही हे वेगळे सांगायची गरज नाही ! त्याचप्रमाणे हे देखील या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे कि, वसईच्या तहानुसार इंग्रजांना परस्पर करवीरकरांशी तह करण्याचा अजिबात हक्क नव्हता पण, तहाची प्रभावी अंमलबजावणी करवून घेण्यासाठी ज्या लष्करी बळाची आवश्यकता असते, तेच नसल्याने पेशव्याचा दावा कितीही योग्य असला तरी त्यांस विचारतो कोण ? 

    निपाणकर देसायाच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडून आला. सारांश, निव्वळ लष्करी बळावर इंग्रज तहरूपी बंधनांनी एतद्देशीय संस्थानांना झपाट्याने आपल्या कब्जात घेऊ लागले होते व सर्व काही कळत असूनही ‘ मला ना तुला, घाल कुत्र्याला ‘ या वृत्तीने एतद्देशीय संस्थानिकही आपणहून इंग्रजांच्या पंखाखाली जात होते.     

१०] कॅप्टन फोर्डचा कंपू :- पंढरपूरचा तह केल्यावर बाजीरावाने एल्फिन्स्टनच्या मार्फत कॅप्टन फोर्डला आपल्या नोकरीत घेऊन त्याच्यावर एक कवायती कंपू बनवण्याची जबाबदारी टाकली. फोर्ड उर्फ ‘ पोट ‘ साहेबाला सेवेत घेताना २४ कलमी करार करण्यात येऊन त्यांत, कंपनी सरकारची तमा न बाळगता पेशवा सांगेल ती कामगिरी बजावण्याची त्याने मान्य केले होते.

    फोर्डसारख्या इंग्लिश माणसाला आपल्या सेवेत घेतल्याबद्दल सर्वच इतिहासकारांनी बाजीरावास दिलेला दोष योग्य आहे. ज्यांच्याशी आपणांस निर्णायक लढा पुकारायचा आहे, त्यांच्याच माणसास आपल्या सेवेत घेण्याचा मूर्खपणा क्वचितच कोणी करेल ! दुसऱ्या इंग्रज – मराठा युद्धातील युरोपियन लोकांची दगाबाजी माहिती असतानाही बाजीरावाने अशी चूक करावी याचे आश्चर्य वाटते. मनुष्य अनुभवाने शहाणा होतो असे म्हणतात खरे, पण काही बाबतीत रावबाजी या नियमाला अपवाद असल्याचे दिसून येते !
 
११] त्रिंबकजी डेंगळेचा कारभारात प्रवेश :- वसईच्या तहापासून इंग्रजांविषयी बाजीरावाचे मन कलुषित होऊ लागले होते. त्यातच एल्फिन्स्टन पुण्यास आल्यापासून वा त्यापूर्वीच वसईच्या बंधनातून स्वतःची सुटका करून घेण्याची पेशव्याची धडपड सुरु झाली होती. पेशव्याच्या या ‘ मूर्ख ‘ धडपडीला त्रिंबकजी मनापासून साथ देत होता. पेशव्याच्या सर्व सरदारांशी गुप्त पत्रव्यवहार चालवून त्रिंबकजी इंग्रजांच्या विरोधात मराठी सरदारांचा संघ उभारू लागला. त्रिंबकजीच्या प्रयत्नांना सरदारांचा मनःपूर्वक पाठिंबा किती होता, हा स्वतंत्र संशोधनाचा / लेखाचा विषय असला तरी पेशव्याचे मात्र त्यांस अंतःकरणापासून समर्थन होते. याचे प्रत्यंतर होळकर प्रकरणातून दिसून येते. 

    यशवंतरावा बद्दलची बाजीरावाच्या मनातील तेढ --- निदान यशवंतरावच्या हयातीत तरी गेली नाही. स. १८११ मध्ये यशवंतरावाचा आजार बळावल्याने कुलदेवतेच्या --- जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनाला येण्याचा त्याचा विचार चालला होता. त्यासाठी त्याने पेशव्याकडे परवानगीही मागितली. परंतु, पेशव्याने ती दिली तर नाहीच, वर इंग्रजांकडे खटपट करून यशवंतरावास दक्षिणेत उतरण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, होळकराच्या दहशतीमुळे इंग्रजांनी या प्रकरणी हात वर केल्याने बाजीरावाने स्वतः विजयदुर्गला जाण्याचा निर्णय घेत सातारकर छत्रपतीला रायगडी जाण्याची सूचना केली. यामागील प्रमुख कारण म्हणजे, यशवंतरावाच्या मागील स्वारीत त्याने छत्रपतींकडून पेशवाईच्या वस्त्रांची जी उठाठेव केली ती करू नये, हे होय !

    अर्थात, पेशव्याच्या सुदैवाने असा काही प्रसंग ओढवला नाही व होळकरही दक्षिणेत उतरला नाही. परंतु, होळकराविषयी इतकी आत्यंतिक शत्रुत्वाची भावना मनी असताना देखील बाजीरावाने निव्वळ त्रिंबकजीच्या आग्रहाखातर त्याच वर्षी होळकराकडे गणेशपंत पिटके नामक वकील आपल्या तर्फेने पाठवला. हि घटना यशवंतरावाच्या हयातीत घडली कि नंतरची याची निश्चिती करण्यास माझ्याकडे पुरेशी साधने नसली तरी यावरून, इंग्रजांविरुद्ध लढा पुकारण्यासाठी पेशवा मंदगतीने पण निर्धाराने तयारी करत असल्याचे काही प्रमाणात सिद्ध होते. 

१२] खुरशेट मोदी व गंगाधरशास्त्र्याचे खून आणि एल्फिन्स्टनची चलाखी :- स. १८१४ मध्ये इंग्रजांचा नेपाळशी तंटा जुंपून त्यांच्यात युद्धाला आरंभ झाला. आरंभीच्या काही महिन्यांत इंग्रजांना नेपाळमध्ये पराभवाचे तडाखे खावे लागले. इंग्रजांच्या पराभवाची वर्तमाने हिंदुस्थानात प्रसिद्ध होण्यास फार वेळ लागला नाही. परिणामी, इंग्रजांचे जोखड नाईलाजाने / स्वखुशीने स्वीकारलेल्या ठीकठिकाणच्या संस्थानिकांची स्वतंत्र होण्यासाठी चुळबुळ सुरु झाली. यावेळी हर एतद्देशीय दरबारातील एल्फिन्स्टन सारखे चढाक वृत्तीचे रेसिडेंट शक्ती ऐवजी युक्ती व कपटनीतीने आपल्या सत्तेचा बोज राखण्यास धडपडू लागले.

    इंग्रजांच्या चढेल वृत्तीने चिडलेला बडोदा दरबारातील इंग्रज विरोधी गट पुणे दरबारशी संधान बांधून भावी बिघाडाची तयारी करू लागला. त्यादृष्टीने इंग्रजांचे बडोद्यातील वर्चस्व मोडून काढण्याकरता गायकवाडांनी आपला वकील व इंग्रजांचा हस्तक गंगाधरशास्त्री पटवर्धन याची पुण्याला रवानगी केली. या वकिलातीसाठी निमित्त होते अहमदाबाद सुभ्याच्या वहिवाटीची संपलेली मुदत वाढवून घेणे व गायकवाडीतून पेशव्याला जे काही मागील देणे बाकी होते त्याचा हिशोब करून घेणे. शास्त्री मजकूर वरकरणी बडोदेकरांचा पण आतून इंग्रजांचा हस्तक बनून स. १८१४ च्या आरंभी पुण्यास आला खरा परंतु, औपचारिक भेटीखेरीज त्याच्या पदरी फारसे काही पडले नाही. 

    दरम्यान याच काळात बाजीरावाने उघडपणे त्रिंबकजीला कारभारात घेऊन त्यावर इंग्रज वकिलाशी व गंगाधर शास्त्र्याशी बोलणी करण्याची जबाबदारी सोपवली. त्रिंबकजी हा तत्कालीन दरबारी परंपरेत मुरलेला मुत्सद्दी नसल्याने त्याची रोखठोक परंतु, न्याय – नीतीला धरून केलेली भाषणे साम्राज्यवादी एल्फिन्स्टनला रुचली नसल्यास नवल ! त्यातच खुरशेट मोदीची अंतस्थरित्या त्रिंबकजीला मदत होत असल्याने त्याची बोलणी अधिकच आक्रमक होऊ लागली. तेव्हा एल्फिन्स्टनने शास्त्र्याला बडोद्यास जाण्याची सूचनाकेली पण, शास्त्र्याने ती जुमानली नाही व स्वतःच्या इभ्रतीखातर तो पुण्यातच पाय मुरगाळून बसला.

    मधल्या काळात त्रिंबकजीने शास्त्र्यालाच आपल्या पक्षात वळवून घेण्याचा प्रयत्न आरंभला व शास्त्रीही त्यांस अनुकूल होत चालला. नेटिव्ह डबल एजंट्सच्या या कृत्यांनी एल्फिन्स्टन चांगलाच चिडला. पण आततातीपणे त्याने त्यांच्यवर कारवाई न करता प्रथम मोदीला स. १८१५ च्या फेब्रुवारीत सक्तीने सेवानिवृत्त करून पेन्शनीत काढले व त्यांस स्वदेशी --- गुजरात प्रांती जाण्याचा हुकुम केला. मोदीने देशांतराचा आदेश न जुमानल्याने ता. २७ फेब्रुवारी १८१५ रोजी एल्फिन्स्टनच्या प्रेरणेने मोदीला विष देऊन ठार करण्यात आले. वास्तविक, मोदीचा खून हा गंगाधरशास्त्र्याकरता धोक्याचा इशारा होता पण, त्याकडे साफ दुर्लक्ष करत शास्त्र्याने उघडपणे पेशव्याशी हातमिळवणी केली. तेव्हा दि. २० जुलै १८१५ रोजी पंढरपूर मुकामी शास्त्र्याचा खून अज्ञात इसमांनी घडवून आणला. या दोन्ही खुनांमागील मुख्य प्रेरणा एल्फिन्स्टनची जरी असली तरी त्यानेच केलेल्या तपासात मोदीच्या मृत्यूमागे सुलेमान मांत्रिकाचा तर शास्त्र्याच्या हत्येच्या कटांत त्रिंबकजीचा हात असल्याचे सिद्ध करण्यात आले. 

    शास्त्री हा बडोद्याचा वकील असल्याने व पुणे – बडोदा दरम्यान इंग्रजांची मध्यस्थी असल्याने, एल्फिन्स्टनने त्रिंबकजीला आपल्या ताब्यात देण्याची पेशव्याकडे मागणी केली. त्याचप्रमाणे, पेशव्यावर दबाव आणण्यासाठी एलफिस्टनने जवळपासच्या प्रदेशातील इंगलिश पलटणी पुण्याजवळ बोलावून घेतल्या. इंग्रजांच्या या आक्रमक पवित्र्याने पेशवा विचारात पडला. रेसिडेंटची मागणी मान्य करण्याचे त्याच्या जीवावर येत होते. त्याने इंग्रजांशी याच वेळी बिघाड करण्याचा निर्णय घेतला पण, बापू गोखल्याने त्यांत मोडता घातला. कारण, पुण्याजवळच्या लढाया मारण्या इतपत पेशव्याची फौज समर्थ असली तरी देशभर युद्धाचा भडका उडाल्यास दीर्घकाळ लढा चालवण्याइतकी लष्कराची तयारी अजून झाली नव्हती. 

    वस्तुतः यावेळी देशातील इंग्रजांची बव्हंशी फौज नेपाळ युद्धांत गुंतल्याने, एल्फिन्स्टनने देखील मोठाच धोका पत्करला होता. यदाकदाचित तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धास याचवेळी प्रारंभ झाला असता तर पेशव्याला विजय मिळण्याची बरीच शक्यता होती. मात्र, पेशव्याने आपला बेत फिरवून त्रिंबकजीला इंग्रजांच्या स्वाधीन करून युद्धाचा प्रसंग तूर्तास तरी टाळला. या समयी एल्फिन्स्टनने केवळ लष्करी हालचालींच्या बळावर आणि युद्धाच्या धमकावणीवर बाजी मारली असली तरी आपल्या डावपेचांतील कमजोर दुवे लक्षात घेऊन त्यांची मजबुती करण्याकडे त्याने इतउत्तर भर दिला.

   
                                           ( क्रमशः )

३ टिप्पण्या:

Abhay Datar म्हणाले...

Dear Sanjayji,
Thanks for such an informative series. As for point 4- the reason why Bajirao II prohibited Ch. Pratapsinh from making a new seal and continuing with his father's seal might be that he wanted to diminish the authority of the new Chhatrapati, and as regards the thread ceremony, perhaps the caste angle was at play and this was an attempt to deny the Kshatriya status of the Chhatrapati, thus once again diminish the authority of his titular superior

sanjay kshirsagar म्हणाले...

Abhay Datar,
प्रतिक्रियेविषयी प्रथम धन्यवाद !
आपल्या पहिल्या मुद्द्याशी मी सहमत नाही. कारण प्रतापसिंहाच्या आधीचे छत्रपती नामधारी असून देखील त्यांचे स्वतःचे शिक्के होते. असो, आपण सांगता त्याप्रमणे दुसऱ्या मुद्द्यात अगदीच तथ्य नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. पेशवाईचा अस्त झाल्यावर याच मुद्द्यावरून ब्राम्हण - मराठा वाद निर्माण झाल्याचे आपणांस माहिती असेलच.

AHILYADEVI HOLKAR म्हणाले...

धन्यवाद अतिशय चांगली माहिती दिली आहे