शनिवार, २७ जानेवारी, २०१८

प्रकरण १९) सम्राट शिवाजी :- काही दुर्लक्षित बाबी


    महाराष्ट्रात शिवाजी व कर्नाटक - तामिळनाडूत व्यंकोजीने चालवलेला उपक्रम म्हणजे शहाजीने आरंभलेल्या उद्योगाची एकप्रकारे पूर्तताच होती. दोघांत फरक इतकाच कि, शिवाजीचा उद्योग स्वतंत्रपणे वर्तण्याचा तर व्यंकोजीचा, शहाजीप्रमाणेच बादशाही चाकरीत राहून आपले महत्त्व वाढवण्याचा होता.

    शिवाजीच्या कर्नाटक मोहिमेची चर्चा करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे कि, आदिलशाहीत चाकरी करताना शहाजीने जो जो प्रदेश तुडवून आदिलशाहीला जोडण्याचा प्रयत्न केला, त्या भागासह इतर प्रदेशही शिवाजीने आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला व त्यात तो काही प्रमाणात यशस्वीही झाला.

    इतिहासकारांच्या मते कर्नाटक प्रांतातील स्वारी हाती घेण्याचे विचार शिवाजीच्या मनात स. १६७६ पासून घोळत होते. तर काहींनी या स्वारीच्या कल्पनेचे श्रेय रघुनाथपंत हणमंतेला दिलेलं आहे. परंतु उपलब्ध पुरावे लक्षात घेता, शहाजी जिवंत असल्यापासून शिवाजीचा कर्नाटकाकडे आपली सत्ता विस्तारण्याचा प्रयत्न चालला होता. उदाहरणार्थ, अफझलखानाला मारून टाकल्यावर वेगाने त्याने पन्हाळयापर्यंतचा प्रदेश काबीज केला व नेताजी पालकर गदग, लक्ष्मेश्वरपर्यंत गेला, तो याच कारणासाठी.
    परंतु अनेक कारणांनी -- विशेषतः तुर्कांशी उद्भवलेल्या झगड्यामुळे स. १६७३ पर्यंत शिवाजीला कर्नाटकात उतरण्याची संधीच मिळाली नाही.

    स. १६७२ मध्ये अली आदिलशाहचा मृत्यू व पाठोपाठ विजापूर दरबारात उफाळलेल्या दख्खनी - पठाणी संघर्षामुळे स. १६७३ मध्ये शिवाजीला कर्नाटकात जाण्याची संधी प्राप्त झाल्यासारखे वाटले. परंतु राजाचे धोरण सेनापतीत नसल्याने उंबराणीच्या लढाईत कोंडीत सापडलेल्या विजापुरी सरदारास --- बहलोलखानास प्रतापराव गुजराने शिवाजीच्या आज्ञेविरुद्ध परत जाण्याची मोकळीक दिल्याने हा बेत काहीसा लांबणीवर पडला. ( स. १६७३ पूर्वार्ध )
   
    स. १६७३ च्या उत्तरार्धात कर्नाटकात शिरण्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून शिवाजीने कारवारकडे स्वारी केली. परंतु उंबराणीस बचावलेल्या बहलोलने त्याला माघार घेण्यास भाग पाडले.

    स. १६७४ च्या फेब्रुवारीत आदल्या वर्षीची चूक दुरुस्त करण्याची संधी प्रतापरावास मिळाली. नेसरी येथे त्याने फिरून बहलोलखानास गाठले. परंतु या प्रसंगी झालेल्या लढ्यात प्रतापराव व त्याचे पाच सात साथीदार मारले गेल्याचे इतिहासकार सांगतात.
    माझ्या मते हा सर्व बनाव संशयास्पद आहे. प्रतापरावसारखा व्यावसायिक सेनानी केवळ राजाने ठपका दिला म्हणून मूठभर साथीदारांसह खानाच्या फौजेवर तुटून पडेल हेच असंभवनीय आहे. परंतु या लढ्याचे तपशील माझ्याकडे नसल्याने तूर्तास केवळ प्रश्नचिन्ह उपस्थित करूनच हा मुद्दा संपवतो.

    स. १६७४ च्या पावसाळ्यात शिवाजीने स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. त्यानंतर त्याने तुर्की प्रदेशात लुटालूट करत वर्षाखेर विजापुरी कोकणात --- फोंडा, कारवारकडे स्वारी केली. स. १६७५ च्या मे मध्ये त्याने हा प्रदेश आपल्या राज्यास जोडून घेतला.
    दरम्यान राज्याभिषेकापासून शिवाजीचे बहादूरखानासोबत तहाचे प्रयत्न चालले होते. जे दोनवेळा अयशस्वी झाले. इतिहासकारांनी याचे विश्लेषण करताना शिवाजीने खानास, पर्यायाने औरंगजेबास फसवल्याचे म्हटले आहे. परंतु उपलब्ध पुरावे पाहता इतिहासकारांना तत्कालीन राजकारणाचे आकलनच न झाल्याचे दिसून येते.

    स. १६७२ मध्ये अली आदिलशहाचा मृत्यू होऊन अल्पवयीन सिकंदर गादीवर बसल्यानंतर दरबारात दखनी - पठाणी हे दोन पक्ष प्रामुख्याने निर्माण झाले. दख्खनींमध्ये मुख्यतः दक्षिणी मुसलमान, ज्यात बव्हंशी धर्मांतरित व सिद्दीचा समावेश होता. 

    आदिलशाहीत पठाणी पक्ष बळावणे कुतुब व तुर्कांना विशेष जाचक होते. कुतुबशाहीतही दखनी - परदेशी झगडा असून त्यांचा सुलतान आदिल प्रमाणे अल्पवयीन नसल्याने हा वाद अजून चव्हाट्यावर आला नव्हता. तुर्कांच्या दृष्टीनेही पठाण बळावणे घातक होते. हिंदुस्थानची सार्वभौम सत्ता एकेकाळी पठाण - अफगाणांनी गाजवल्याचा उभय पक्षीयांना केव्हाही विसर पडला नव्हता. त्यामुळेच आदिलशाहीत वाढणारा पठाणांचा प्रभाव, हे आदिलशाही नष्ट करण्यासाठी  तुर्कांच्या दृष्टीने चांगले कारण होते.

    राजकीय पत्रांच्या आधारे पाहिले तर शिवाजी हा पठाणांपेक्षा दखनींना अनुकूल असल्याचे दिसते. परंतु माझ्या मते हे अनुमान चुकीचे आहे. शिवाजी व औरंगसारखे धूर्त, पाताळयंत्री मुत्सद्दी लिखित पत्रांत आपलं अंतर्मन व्यक्त करतीलच असे नाही. व राजकीय पत्रांत तर अजिबात नाही !
    माझ्या मते, शिवाजीला दख्खन मधील उर्वरित सर्व सत्ता नेस्तनाबूद करून वा त्यावर आपलं मांडलिकत्व लादून आपलं राज्य साम्राज्याप्रती पोहोचवायचं होतं व शिवाजीसारखी पराक्रमी व्यक्ती अशी महत्वाकांक्षा न बाळगेल तरच नवल !

    कर्नाटक स्वारीमागील शिवाजीच्या हेतूंचीही चर्चा येथेच करणे योग्य ठरेल. इतिहासकारांत शिवाजीच्या दक्षिण दिग्विजयामागील हेतूंविषयी मतभिन्नता असली तरी राज्यविस्ताराचे त्याचे धोरण सर्वमान्य आहे. त्याखेरीज लक्षात घेण्यासारखी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटकातील शहाजीच्या जहागिरीत शिवाजीचा असलेला वाटा !
    या संदर्भात डॉ. नभा काकडे संपादित ' छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे ' मधील पत्र क्र. ७७ अतिशय महत्वाचे आहे. ( पसासं ले. क्र. २६१५ ) यानुसार शिवाजीने दि. १५ एप्रिल १६५७ रोजी तिरुमल राय गोसावी यास कर्नाटक प्रांती काही तालुके रौप्यपटावर करार करून दिले आहेत. या संदर्भात उद्भवणारी महत्वाची शंका म्हणजे, सदर रौप्यपटात वर्णिलेला राजा श्रीरंग वा त्याचा मुलगा तिरुमल राय हे चंद्रगिरीचे संस्थानिक होत का ? अभ्यासूंनी यावर अधिक प्रकाश टाकावा. असो.
     उपरोक्त पत्राच्या अनुषंगाने डॉ. काकडेंच्या ग्रंथातील पत्र क्र. ९७ ( पसासं ले. क्र. २३३२ ) हा देखील चिंतनीय आहे. यामध्ये शिवाजीने व्यंकोजीकडे कर्नाटकातील शहाजीच्या जहागिरीतील आपला निम्मा वाटा मागितला आहे. इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे स. १६७६ मध्ये व्यंकोजीने तंजावर जिंकून स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला होता. या कृत्यास नंतर त्याने विजापूर दरबारची संमती मिळवली असली तरी अशा प्रकारचा स्वतंत्र अभिषिक्त राजा --- पितृक सत्तेतील का होईना, सावत्र भावाचा रास्त वाटा सोडून देईल हे व्यवहारतः संभवत नाही.
    तात्पर्य, कर्नाटकात मोहीम आखतानाच वाटणीच्या वा अन्यनिमित्ताने व्यंकोजीला हाताखाली घालून त्यास आपल्या मांडलिकांत समाविष्ट करण्याचा शिवाजीचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो.
    खेरीज कुतुबशहाचा नाकर्तेपणा, व्यंकोजीचा पायापुरते पाहण्याचा स्वभाव आणि कर्नाटकातील लहान - मोठ्या संस्थानिकांची लाथाळी... या सर्वांचा फायदा घेत बहलोलखानाच्या पाठींब्याने शेरखान लोदी वलिगंडपुरं येथून कर्नाटकात स्वतंत्र पठाणी सत्ता उभारण्याचा उपक्रम करत होता. ज्यामध्ये गरज पडल्यास युरोपियनांकडून मदत घेत कुतुबशाहीलाही उखडून काढण्याचा त्याचा विचार होता. औरंग वा त्याच्या अधिकाऱ्यांना याची कितपत जाणीव  होती याची माहिती मिळत नसली तरी शेरखानचे बेत हणून पाडत तिथे आपली सत्ता स्थापित करण्याचा शिवाजीचा निश्चय ठरला असून त्याकरताच त्याने आदिल - कुतुब सोबत तह केले होते. असो. 

    स. १६७६ च्या अखेरीस शिवाजी कर्नाटक स्वारीसाठी रायगडाहून बाहेर पडला. तत्पूर्वी त्याने संभाजीला शृंगारपुरास पाठवून दिले होते. संभाजीच्या शृंगारपूर येथील नियुक्तीवरून इतिहासकारांनी केलेली विविध अनुमानं व उपलब्ध पुरावे तसेच संभवनीय शक्यता लक्षात घेऊन असे म्हणता येते कि, प्रसंग पडल्यास समस्त राजपरिवार एकाच स्थळी -- रायगडी -- नसावा या हेतूने शिवाजीने संभाजीला शृंगारपुरी पाठवले. तिथला प्रदेश रायगडासारखाच दुर्गम असल्याने संभाजी तिथे सुरक्षित होता. तसेच गरज पडल्यास रायगड - शृंगारपूर परस्परांना मदत करू शकत होते. खेरीज शिवाजीकरता रायगडापेक्षा शृंगारपूर हे मदतीकरता जवळचे ठाणे बनू शकत होते.
    खेरीज संभाजी संबंधाने प्रामुख्याने लक्षात घेण्यासारख्या दोन महत्त्वाच्या बाबी म्हणजे :- (१) पसासं ले. क्र. १८८२ नुसार शिवाजीने गोव्याकडचे काही कामकाज संभाजीकडे सोपवल्याचे दिसून येते.  (२) अण्णाजी दत्तोकडे शिवाजीने राज्याचा दक्षिण भाग -- दाभोळ सुभा सोपवला असून संभाजीची नियुक्ती याच क्षेत्रात मोडणाऱ्या शृंगारपूरी करण्यात आली होती. जर संभाजी आणि अण्णाजी यांच्यात वितुष्ट होते व हे शिवाजीला माहिती होते तर, आपल्या गैरहजेरीत या दोघांना तो एकाच प्रदेशात का नियुक्त करेल ? याचाही विचार होणे आवश्यक आहे.

    कर्नाटक मोहिमेची फलनिष्पत्ती :- स. १६७६ च्या अखेरीस कर्नाटक स्वारीकरता बाहेर पडलेला शिवाजी स. १६७८ च्या एप्रिलमध्ये पन्हाळ्यास दाखल झाला. सुमारे सव्वा वर्षांहून अधिक काळ चाललेल्या या स्वारीत शिवाजीला संमिश्र स्वरूपाचे यश लाभल्याचे दिसून येते.
    जिंजीचा किल्ला ताब्यात येईपर्यंत कुतुबशहाने शिवाजीला आर्थिक, लष्करी मदत केली परंतु हा किल्ला कुतुबशाही सैन्याच्या हवाली न करता त्याने स्वतःच्या ताब्यात ठेवल्याने कुतुबशहाने त्याची साथ सोडली. त्यामुळे यापुढील सर्व मोहिम त्याला स्वबळावर पार पाडावी लागली. ( मे - जून १६७७ )

    जदुनाथ सरकारांच्या मते स. १६७७ - ७८ मध्ये शिवाजीने कर्नाटकात जिंकलेल्या प्रदेशाची लांबी १८० तर रुंदी १३५ मैल इतकी असून या प्रदेशाचे वार्षिक उत्पन्न २० लक्ष होन एवढे होते. खेरीज या प्रदेशातील किल्ल्यांची संख्या १०० एवढी होती.
    खेरीज सरकारांनी शिवाजीच्या कर्नाटक स्वारीतील लुटीविषयक दिलेली माहिती अशी, " शिवाजीने अतिशय संघटितपणे कर्नाटकची जी लूट केली आणि तेथून जबरदस्तीने जे द्रव्य वसूल केले, त्यामुळे कर्नाटकची परिस्थिती रस शोषून घेतलेल्या एखाद्या हाडाच्या तुकड्याप्रमाणे झाली. " ( सरकार कृत, औरंगजेबाचा इतिहास )
    याशिवाय शेरखानाचा बंदोबस्त झाल्याने कर्नाटकात पठाणी सत्ता मूळ धरण्याचा धोका नाहीसा झाला. व्यंकोजीला नरम करून त्याच्या राज्याचा काही भाग शिवाजीने आपल्या राज्यास जोडला. तसेच कर्नाटकात नव्याने जिंकलेल्या प्रदेशाच्या संरक्षण व्यवस्थेची तरतूद करण्यासाठी त्याने तिकडे आपले काही अंमलदार, लष्करी पथके नेमून दिले.

    शिवाजीच्या कर्नाटक स्वारीतील यशापयशाची चर्चा करताना असे दिसून येते कि, या स्वारीत त्याने जिंजी, वेलोर सारखे जिंकलेले मजबूत किल्ले हीच त्याची या मोहिमेतील मुख्य कमाई म्हणावी लागेल. सरकारांच्या म्हणण्यानुसार जरी २० लक्ष होन वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश शिवाजीच्या ताब्यात आला असला तरी त्यावर त्याचा पूर्णतः अंमल बसला नव्हता. किंबहुना या स्वारीत फक्त मोक्याची स्थळं ताब्यात घेऊन मागाहून परत एकदा कर्नाटक प्रांती मोहीम काढून हा सलग भूप्रदेश ताब्यात घेण्याचा शिवाजीचा मानस असावा असे दिसते. परंतु अशी स्वारी पुढे त्याच्याने किंवा नंतर संभाजीकडूनही होऊ शकली नाही. असो.

    कर्नाटकात शिवाजीने केलेल्या लुटी संदर्भात असे म्हणता येते कि, कुतुबशहाकडून मिळणारी आर्थिक मदत बंद झाल्याने यापुढील मोहिमेचा सर्व खर्च चालवण्याची जबाबदारी शिवाजीवरच येऊन पडली. आणि मोहिमांचा खर्च परस्पर बाहेर भागवण्याचे त्याचे आरंभापासून धोरण असल्याने कर्नाटक प्रांताची त्याला शक्य तितकी लूट करणे भाग पडले. परंतु या लुटीतून त्याला आर्थिक फायदा कितपत झाला असावा हा संशोधनाचा प्रश्न आहे. कारण या स्वारीत व्यतीत करावा लागलेला काळ, पदरी असलेलं सैन्य, ताब्यात आलेल्या किल्ल्यांच्या डागडुजीचा खर्च व नवीन बांधकामे यावर झालेला खर्चही विचारात घेणे भाग आहे. असो.

    स. १६७८ च्या एप्रिलांत शिवाजी कर्नाटक स्वारीतून पन्हाळ्यास येऊन दाखल झाला. तेथून जवळच शृंगारपूर असलेल्या संभाजीला भेटीस न बोलावता तो तडक मे महिन्यात रायगडी निघून गेला.
                                                                                                                    ( क्रमशः ) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: