इतिहासविषयक लेखन
करताना, ते देखील संशोधनात्मक किंवा विश्लेषणात्मक, लेखकाने तटस्थवृत्तीने लेखन
करावे असा एक सर्वसाधारण नियम आहे. हा नियम तात्विकदृष्ट्या कितीही योग्य असला तरी
व्यवहारात याची शब्दशः अंमलबजावणी करणे शक्य नसते. किंबहुना कितीही मोठा इतिहासकार
असला तरी त्याचे इतिहास लेखन हे कधीही १००% निःपक्षपाती भूमिकेतून होत नसते आणि
मनुष्यस्वभाव किंवा निसर्गनियम लक्षात घेता अशी अपेक्षा कोणत्याही
लेखकाकडून करणे हे अयोग्य आहे. परंतु, असे असले तरी इतिहास लेखन करताना कोणत्याही
ऐतिहासिक व्यक्तीचे जाणते – अजाणतेपणी बदनामीकारक अथवा विकृत चित्रण करणे हे
चुकीचे आहे. कित्येकदा अशा गोष्टी नकळत होऊन जातात, पण त्या लक्षात येताच
त्याविषयी आपली चूक झाली आहे असे स्पष्टपणे सांगून माफी मागणे व त्या व्यक्तीविषयी
लिहिलेला तो विशिष्ट मजकूर आपल्या लेखनातून काढून टाकणे हा मार्ग इतिहास लेखकासमोर
उपलब्ध असतो. परंतु दुदैवाने, फार कमी इतिहास लेखक या मार्गाचा अवलंब करत असल्याचे
दिसून येते. हा सर्व लेखन प्रपंच करण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्याही हातून जाणते
- अजाणतेपणी एक गुन्हा घडला आहे.
अव्वल
पेशवाईतील प्रसिद्ध मराठी सरदार मल्हारराव होळकर, याचा दिवाण गंगाधर यशवंत
चंद्रचूड या ऐतिहासिक व्यक्तीचे माझ्या ‘ पानिपत असे घडले ‘ या पुस्तकात विकृत
चित्रण जरी केले नसले तरी त्या व्यक्तीच्या पराक्रमाला न्याय देणे, त्याच्या
पराक्रमाचा उल्लेख करणे मला शक्य झाले नाही. माझ्या त्या कृत्याचे म्हणा किंवा
पापाचे म्हणा, प्रायश्चित्त म्हणून गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबातात्या या
व्यक्तीच्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेणारा एक छोटासा लेख मी या ठिकाणी प्रसिद्ध
करत आहे.
गंगाधर यशवंत
चंद्रचूडचा जन्म कधी व कुठे झाला याविषयी मला माहिती मिळाली नाही. तो निंब गावचा
रहिवाशी असून मल्हारराव होळकराचा कारभारी किंवा दिवाण म्हणून त्याची नेमणूक
बाजीराव पेशवा याने केली. किंबहुना असेही म्हणता येईल की, गंगोबाची नियुक्ती
अंबाजीपंत पुरंदरे याने केली. याचे कारण सांगण्यापूर्वी तत्कालीन मराठी राज्यातील
अशा महत्त्वाच्या पदांवरील नेमणुका कशा केल्या जात याची माहिती या ठिकाणी देतो.
चिटणीस (पत्रव्यवहार
), फडणीस ( हिशेब ) व पोतनीस ( खजिन्याचा सांभाळ ) हे कामगार छत्रपतींच्या दरबारी
असत व त्यांना दरखदार असेही म्हणत. अर्थात कोणत्याही राज्यचालकाच्या वा
सुभेदाराच्या पदरी या तीन अधिकाऱ्यांची आवश्यकता ही असतेच. छत्रपतींकडे जे
अष्टप्रधान असत त्या अष्टप्रधानांना देखील राज्यकारभार करण्यासाठी फडणीस, पोतनीस व
चिटणीस या अधिकाऱ्यांची गरज लागे. परंतु, अष्टप्रधानांपैकी कोणीही आपल्या
मर्जीनुसार उपरोक्त पदांवर व्यक्तीची नेमणूक वा बडतर्फी करू शकत नसे.
अष्टप्रधानांकडील चिटणीस, फडणीस व पोतनीस या हुद्द्यांवरील नोकरांची नेमणूक
करण्याचे अधिकार छत्रपतींकडे असलेल्या दरखदारांकडे असत. अर्थात यासाठीसुद्धा
वशिलेबाजी केली जात असे. उदाहरणार्थ, शाहूने बाळाजी विश्वनाथ यांस जेव्हा
पेशवेपदाची वस्त्रे दिली तेव्हा त्याच्या पदरी फडणीस म्हणून रामाजीपंत भानू याची
नियुक्ती करण्यात आली. वस्तुतः रामाजीपंत भानू यास पेशव्यांची फडणीशी जरी
छत्रपतींच्या दरखदाराकडून म्हणजे फडणीसाकडून झाली असली तरी ती पेशव्याच्या
शिफारशीने झाली होती हे लक्षात घेणे गरजेचे आहे. भानू व भट या दोन घराण्यांचे जे
काही ऋणानुबंध होते त्यास जागून बाळाजी विश्वनाथाने रामाजीपंत यांस आपली फडणीशी
दिली.
छत्रपतींच्या राज्याच्या रक्षणासाठी व
राज्यवृद्धीसाठी अष्टप्रधानांना आपल्या हाताखाली अनेक लहान – मोठे सरदार बाळगावे
लागत. त्याचप्रमाणे पेशव्यांच्या हाताखाली देखील कित्येक सरदार होते व कित्येकांना
रोख पगार तर काहींना सरंजामी प्रांत तोडून दिले जात. ज्या सरदारांना असे प्रांत
तोडून दिले जात त्या सरदारांना, त्या प्रांताच्या कारभारासाठी जे मदतनीस लागत.
त्यांची नियुक्ती पेशव्यांच्या मार्फत केली जात असे.
जोपर्यंत सातारचे छत्रपती आपला अधिकार रक्षून होते तोपर्यंत या सर्व नेमणुका
अप्रत्यक्षपणे त्यांच्या मार्फत केल्या जात. परंतु पुढे पेशव्यांनी छत्रपतींना
गुंडाळल्यामुळे अशा नेमणुका करण्याचे अधिकार पेशव्यांकडे आले. म्हणजेच,
पेशव्यांच्या पदरी असलेले शिंदे – होळकरांसारखे मोठे सरदार असो की पेठे वा पटवर्धन
हे लहान सरदार असो, त्यांना सरंजाम लावून दिल्यास त्यांच्याहाताखाली जे नोकर नेमून
दिले जात त्यांची नियुक्ती पेशव्यांच्या मार्फत केली जात असे. ही बाब कित्येक
इतिहासकारांनी व अभ्यासू वाचकांनी दुर्लक्षित केलेली आहे. गंगोबा किंवा
त्याच्याप्रमाणेच इतर सरदारांच्या पदरी जे काही कारभारी नेमले गेले व त्यांनी
प्रसंगी पेशव्यांच्या अथवा मराठी राज्याच्या विरोधात जी काही कारस्थाने केली,
त्याबद्दल त्यांना दोष दिला जातो व तो स्वाभाविक आहे. परंतु, त्यांना दोष
देण्यापूर्वी, त्या लोकांना अधिकाराची जागा कोणी दिली याचीही दखल घेणे गरजेचे आहे.
मुळातच या कारभाऱ्यांची नेमणूक करण्यामागे पेशव्यांचा काय हेतू असे याचीही माहिती
घेणे गरजेचे आहे.
सरदारांच्यामार्फत आपले हेतू साध्य करून
घेण्यासाठी आणि सरदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेशवे आपल्या मर्जीतील इसमांना
सरदारांचे कारभारीपद देत असत. हे लक्षात घेता गंगोबाने होळकरांचा कारभारी म्हणून
जी काही बरी – वाईट कृत्ये केली त्या सर्वांची जबाबदारी प्रत्यक्ष नसली तरी अप्रत्यक्षपणे
पेशवा आणि त्याच्या कारभाऱ्यावर येते.
गंगाधर चंद्रचूड यास होळकरांचे कारभारीपद
कधी व कसे मिळाले याची तपशीलवार माहिती माझ्याकडे सध्या तरी नाही. परंतु,
होळकरांच्या पदरी गेल्यावर गंगाधर चंद्रचूड मुत्सद्दी व योद्धा म्हणून नावारुपास
आला हे निश्चित ! मल्हारराव होळकराने ज्या काही मोहिमा पुढे यशस्वीपणे पार पाडल्या
त्या सर्व मोहिमांमध्ये गंगाधर चंद्रचूडने सहभाग घेतला. इतकेच नव्हे तर प्रसंगी
होळकरांच्या मुख्य सेनापतीचे कार्य देखील त्याने पार पाडल्याचे दिसून येते.
या ठिकाणी गंगाधर यशवंत चंद्रचूड या व्यक्तीने
ज्या काही महत्त्वाच्या घडामोडींमध्ये सहभाग घेतला त्या घटनांची माहिती थोडक्यात
दिली आहे.
(1) मोगल
वजीर सफदरजंग याने देशी – परदेशी रोहिले – पठाणांच्या विरोधात जाट आणि मराठ्यांची
मदत मागितली. त्यावेळी शिंदे आणि होळकर सफदरजंगाच्या मदतीस गेले. सफदरजंगच्या
मदतीस जाट व मराठी सरदार आल्याचे पाहून अहमदखान बंगशने फरुखाबाद जवळ गंगाकाठी हसनपूर
येथे आपली छावणी ठोकली. या ठिकाणाहून त्याने मराठ्यांचा मुकाबला करण्याचा निर्धार
केला. हसनपुरा जवळ किल्ला असून त्यास
फत्तेगड असे म्हणत. फत्तेगडास शिंदे,
होळकर, जाट आणि सफदरजंग यांच्या संयुक्त फौजांनी वेढा घातला. त्यावेळी बंगशच्या
मदतीस सादुल्लाखान आणि बहादूरखान हे दोन रोहिला सरदार आपापल्या फौजफाट्यासह येऊ
लागले. यांना रोखण्याची जबाबदारी गंगाधर यशवंत आणि जवाहीर जाट यांच्यावर सोपवण्यात
आली. उभय खानांची व गंगोबा आणि जवाहीर यांची २८ एप्रिल १७५१ रोजी मोठी लढाई घडून
आली. रोहील्यांची बव्हंशी फौज कापली गेली. बहादूरखान लढाईत मारला गेला तर
सादुल्लाखान जीव घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. मराठी फौजांच्या या विजयाचा
परिणाम म्हणजे हसनपूरची छावणी सोडून बंगशने रातोरात पळ काढला.
(2) कुंभेरी
वेढ्याच्या प्रसंगी मल्हारराव होळकराचा मुलगा खंडेराव मारला गेला. ( मार्च १७५४ )
या प्रसंगानंतर मल्हाररावाने प्रत्यक्ष संग्रामात सहभाग न घेता तुकोजी होळकर व
गंगाधर यशवंत यांच्यावर युद्धाची जबाबदारी सोपवल्याचे दिसून येते. अर्थात, एकुलत्या
एक मुलाच्या मृत्यूचे दुःख आणि वृद्धत्व यांमुळे असे होणे स्वाभाविक होते. स. १७५४
नंतर मल्हाररावाने ज्या काही मोहिमा पार पाडल्या त्या सर्वांमध्ये गंगोबा प्रमुख
होता. रघुनाथरावाच्या प्रसिद्ध अटक स्वारीत तुकोजी व गंगाधर यशवंत यांनीच
प्रामुख्याने होळकरी सैन्याचे नेतृत्व केले.
(3) बुराडी
घाटच्या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे मरण पावल्यावर अब्दालीशी लढण्याची जोखीम
मल्हाररावाने आपल्या शिरावर घेतली. त्याप्रसंगी होळकरांच्या सैन्याचे नेतृत्व
गंगोबानेच केले होते. रोहिलखंडात शिरून अब्दालीला मिळणारी रोहील्यांची रसद
तोडण्याचा डाव मल्हाररावाने आखला. तेव्हा रोहील खंडात स्वारी करण्याची जबाबदारी
त्याने गंगोबावर सोपवली. गंगोबाने सिकंदरा आणि आसपासच्या भागात लुटीचा धडाका
लावला. अब्दालीने त्याच्या बंदोबस्तासाठी जहानखान व नजीबखान यांची नियुक्ती केली.
४ मार्च १७६० रोजी सिकंदर येथे जहानखान व नजीबखान यांनी गंगोबाचा पराभव केला.
(4) पानिपत
मोहिमेवर भाऊची नेमणूक करण्यात आली. त्यावेळी उत्तरेत अब्दाली शिंदे – होळकरांच्या
सोबत तह करून मायदेशी जाण्याच्या विचारात होता. तहाच्या वाटाघाटी करण्याचे काम
होळकरांच्या वतीने गंगोबा करत होता.
(5) १४
जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या युद्धात, आपल्या पक्षाचे सैनिक पळत
असल्याचे पाहून व या झुंजीत आपला पूर्ण पराभव झाल्याचे लक्षात आल्यावर गंगाधर
यशवंत आणि मल्हारराव होळकर यांनी रणभूमीतून निघून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु या
ठिकाणी मोठ्या खेदाने नमूद करावे लागत आहे की महाराष्ट्रातील विद्वान इतिहास
संशोधकांनी व ललित लेखकांनी मल्हारराव आणि गंगोबा यांच्या पराक्रमाची दखल न घेता
या दुकलीने ‘ शीर सलामत तो पगडी पचास ‘ या आपल्या धोरणास जागून कसा पळ काढला याचे
वर्णन करण्यात धन्यता मानली !
(6)
दिनांक २८ जून १७६१ रोजीचे एक पत्र
मराठी रियासत खंड – ४ मध्ये छापलेले आहे. हे पत्र कोणी कोणास लिहिले आहे याविषयी
सरदेसाई यांनी कसलाही उल्लेख केलेला नाही.
‘
दिल्लीहून गिलचा पठाण आपले देशास गेला. रोहिला नजीबखान फौजेनिशीं दिल्लींत आहे.
मल्हारराव होळकर माळव्यांत इंदुरीं आहेत. गंगाधरपंत तात्या कांहींशी फौज घेऊन
जाठापाशीं आहे. खासा जाठाची फौज व तात्या व गाजुद्दिन ऐसे त्रिवर्गांनीं मिळून
आगऱ्याचा किल्ला सोडविला म्हणून वार्ता आहे. किल्ल्यांत अंमल जाठाचा. आजी जाठ
जबरदस्त आहे. उभयतां त्याच्या अनुमतें आहेत. अयोधेयचा नबाब श्री काशीस आला. तेथून
आठ – दहा कोस पूर्वेस जाऊन पाटण्यास पातशहा होता त्यास आणविला. त्यानें नबाबास
वजिरी दिली. आज तीन दिवस काशींत आहेत.’
(7) पानिपत
युद्धानंतर उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्ता कायम राखण्याची मोठी जबाबदारी
मल्हारराव होळकराने पार पाडली. पानिपत नंतर लगेचच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस
राजपुतांशी शिंदे – होळकरांना लढावे लागले. त्यावेळी झालेल्या युद्धात मराठी
फौजांनी राजपूत संस्थानिकांना चांगलेच सडकून काढले.
(8) नानासाहेब
पेशव्याच्या मृत्यूनंतर माधवरावासी पेशवेपद मिळाले आणि पेशवे कुटुंबात गृहकलहास
आरंभ झाला. रघुनाथरावाने माधवरावाच्या विरोधात कारवाया सुरु केल्या. परिणामी
आळेगाव येथे उभयतांची एक झुंज होऊन माधवराव रघुनाथरावास शरण गेला. त्यानंतर
रघुनाथरावाने निजामाशी मैत्रीचा तह केला. परंतु निजामाने एका बाजूला दादाशी मैत्री
करत दुसरीकडे नागपूरकर भोसल्यांशी मैत्रीचा गुप्त तह करून पेशव्यांवर आपला शह
बसवण्यास आरंभ केला. या घडामोडी चालू असताना मल्हारराव होळकराचा मुक्काम वाफगावी
होता. निजाम आणि भोसले यांच्यात युती हे होऊन ते दोघे आपल्यावर चालून येत असल्याचे
समजल्यावर रघुनाथराव आणि माधवराव यांच्यात काही काळ सख् निर्माण झाले. शत्रूशी
लढण्यासाठी दोघेही मराठी सरदारांना आपापल्या फौजफाट्यासहीत मदतीस येण्यासाठी पत्रे
पाठवू लागले. अशाच प्रकारचा पत्रव्यवहार होळकरासोबत देखील झाला. मल्हाररावाने
निजाम – भोसले विरुद्धच्या लढ्यात पेशव्यांच्या मदतीला जाण्याचा निर्णय घेतला पण
त्या बदल्यात त्याने आपल्या काही मागण्या पेशव्याला कळवल्या. मल्हाररावाच्या काय
मागण्या होत्या याची माहिती सध्या तरी मला मिळाली नाही परंतु पेशव्याने त्याला दहा
हजारांचा नवीन सरंजाम दिल्याचा उल्लेख मराठी रियासतीमध्ये आढळतो. या वेळी मल्हारराव
होळकराच्या वतीने गंगोबातात्या बोलणी करत होता. काही इतिहासकारांच्या मते, पुढे माधवरावाने
भर दरबारी गंगोबाला छड्यांनी मारले त्याचे मूळ या घटनेत आहे. काय असेल ते असो, पण
पेशव्याने एकदा मागण्या मान्य केल्यावर होळकरांची फौज पेशव्यांच्या मदतीला गेली.
राक्षसभुवनच्या संग्रामात निजामाची सेना त्याचा दिवाण विठ्ठल सुंदर याच्या नेतृत्वाखाली
लढत होती. या विठ्ठल सुंदरचे मस्तक कापून पेशव्याला नजर करण्याचे कार्य
होळकरांच्या पदरी असलेल्या गिलच्यांनी केले असा उल्लेख मराठी रियासतीमध्ये मिळतो. राक्षभुवनचा हा संग्राम दिनांक 10 अगस्त 1763 रोजी घडून आला. या लढाईमध्ये होळकरांच्या फौजेचे नेतृत्व कोणी केले याविषयी निश्चित माहिती मला मिळाली नाही. कदाचित तुकोजी होळकर अथवा गंगोबा यांपैकी एकाने या लढाईत सेनापतीचे कार्य केले असेल किंवा खुद्द मल्हाररावाने देखील आपल्या शौर्याची आणि कल्पक नेतृत्वाची चुणूक या झुंजात दाखवली असेल.
(9) दिनांक 23 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सारची लढाई घडून आली व इंग्रजांच्याविरोधात सुजा, शहाआलम, मीर कासीम या या त्रिकुटाचा पराभव झाला. या लढाईनंतर इंग्रजांनी सुजा आणि त्याच्या मित्रांच्या विरोधात जास्तच आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळे त्याने शिंदे - होळकरांकडे मदतीची याचना केली. यावेळी महादजी माळव्यात होता तर होळकर जाट आणि नजीबखान यांच्यात चाललेल्या संग्रामात पेशव्याच्या आज्ञेनुसार जाटाच्या वतीने नजीबासोबत लढत होता. स. 1765 च्या फेब्रुवारी महिन्यात जाट आणि नजीब यांच्यात तह होऊन त्यांचा लढा मिटला. त्यानंतर सुजाच्या विनंतीनुसार होळकर त्याच्या मदतीला जाऊ लागला. याविषयीचे 30 मार्च 1765 रोजी गंगोबाने लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे ते पुढीलप्रमाणे :- ‘ जाठाचा सलूख नजीबखानाशीं जाल्या उपरी अंतर्वेदच्या
बंदोबस्ताकरितां अनूपशहरीं आलों. तेथें नबाब शुजाउद्दौला येऊन भेटले. कित्येक
निखालस भाव बोलून साह्य व्हावयाचा करार करून गेले. त्याउपर सुभेदार इटाव्यास आले.
काम उरकोन गंगातीरीं मेहदीघाटास जाणार.'
सुजा आणि मल्हारराव यांच्या संयुक्त सैन्याने इंग्रजांशी युद्ध आरंभले. यावेळी कुरा येथे झालेल्या संग्रामात होळकरी फौजेने ब्रिटीश पलटणींचा सडकून समाचार घेतला. या लढाईची तपशीलवार माहिती देणारे पत्र मराठी रियासत खंड 5 मध्ये छापले आहे ते याठिकाणी देत आहे :- ‘ तदनंतर फिरंगी चालोन आले, त्यांशीं झुंज मातबर झालें. चारपांचशें घोडे, चाळीस
पन्नास उंटें व तीन तोफा आणल्या. तेही दम धरून मुक्कामास आले. आम्ही घेरा घालोन
होतों, तों बातमी आली, रोहिले पठाण
एकत्र होऊन बुणग्यावर आले. मग तैसेच चालोन काल्पीस बुणगे उतरून पुनः गंगाधरतात्यास
फौज देऊन रवाना केलें. तेथें एक लढाई जाली. हरोळ तमाम बुडविला. फिरंग्यांची दोन
पलटणें, हजार घोडे, चारशें उंटें,
बाणांच्या कैच्या, वीस पंचवीस निशाणें आणलीं.
ते गावाचा आश्रय करून राहिले. तेथें चार सहा कोस पावेतों फौजांस पाणी नव्हतें,
यामुळें उलटोन ( तात्या ) काल्पीस आले, नाकेबंदी
केली. मग चारपांच नावा मेळऊन रातबा धरून ( ते फिरंगी ) यमुना उतरले, तोफाखालीं मोर्चे उधळले. चारपांच घडी युद्ध जालें. परंतु बेदड ( चिखलांत
रुतलेली वनस्पतींची मुळें ) भारी त्यामुळें घोड्यांचा नाइलाज झाला. म्हणून
गनिमीकावा देऊन बेदड पुढें देऊन उभे राहिलों. इंग्रज काल्पींत ठाणें बसवून माघारे
गेले. आम्ही उलटोन त्यांचें ठाणें काढून आपले ठाणें बसविलें. तेथून उमरगडचा
बंदोबस्त करून ग्वाल्हेर प्रांतें चाललों आहों.’ हे पत्र आपाजीराम याने 27 जून रोजी पेशव्यास लिहिले आहे असे सरदेसाई सांगतात. या पत्राचे वाचन केले असता सहज लक्षात येते कि या मोहिमेत गंगोबाने होळकरांच्या सेनापतीची भूमिका बजावली होती. या पत्रानुसार होळकरांनी इंग्रजांचा संपूर्ण पराभव केल्याचे सिद्ध होते तरीही सरदेसाई आणि कित्येक इतिहासकार असे लिहितात कि कुरा येथे इंग्रजांनी होळकराचा पराभव केला !
(10) पुढे मल्हारराव होळकर मरण पावल्यावर होळकरांची सरदारकी त्याचा नातू मालेराव यास देण्यात आली. परंतु सरदारकी प्राप्त झाल्यावर काही महिन्यांतच मालेरावाचा मृत्यू झाला. यावेळी रघुनाथराव उत्तर हिंदुस्थानातच होता. होळकरांच्या घरात आता कर्ता पुरुष कोणी नसल्याने त्यांची सरदारकी कोणाला द्यायची हा प्रश्न आता उद्भवला होता. होळकरांचा दिवाण गंगोबातात्या यावेळी रघुनाथरावाच्या गोटात होता. मल्हाररावाचे निधन झाल्यावर बहुतेक त्याची कारभारी पदावरून हकालपट्टी झाली असावी. कारण, अहिल्याबाईस दत्तक पुत्र घेण्याची अनुमती देऊन कारभारीपद आपल्यास द्यावे अशी त्याने रघुनाथरावाकडे मागणी केली. अहिल्याबाईच्या विरोधात पुढे रघुनाथरावाने ज्या काही कारवाया केल्या, त्या कारवायांच्या मागे गंगोबाचा कुशाग्र मेंदू कार्यरत होता हे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. गंगोबाच्या सल्ल्याने दादासाहेबाने शेट्याजी आयतोळा आणि आनंदराव गोपाळ या आपल्या सरदारांना होळकरांच्या अंमलाखालील प्रांताची जप्ती करण्यासाठी पाठविले. तेव्हा अहिल्याबाईने बुळे नावाच्या सरदारास दादासाहेबाने पाठवलेल्या सरदारांच्या मुकाबल्यासाठी रवाना केले. दोन्ही पक्षांच्या सैन्याची गाठ कधी, कुठे पडली याची निश्चित माहिती मला मिळाली नाही परंतु, या संग्रामात अहिल्याबाईच्या सैन्याचा विजय होऊन शेट्याजी आयतोळा रणात पडला. या पराभवामुळे रघुनाथराव संतप्त झाला तर अहिल्याबाईची छाप सर्व शत्रू - मित्रांवर बसली असे म्हणता येईल.
जवळपास दोन - तीन दशके होळकरांची सेवा करणारा गंगोबा अचानक होळकरांच्या विरोधात का उभा राहिला असावा ? त्याची कारभारीपदावरून गच्छंती हे एक कारण असू शकेल पण, निव्वळ हेच प्रमुख कारण असावे असे वाटत नाही. परंतु याविषयी विश्वसनीय अशी माहिती मिळत नसल्याने अधिक न लिहिणे योग्य !
(11) स. 1768 च्या जून महिन्यात माधवराव आणि रघुनाथराव यांच्यातील वाद चिघळला जाऊन दोन्ही पक्ष उघडपणे एकमेकांच्या विरुद्ध लढण्यास उभे राहिले. यावेळी दोघांनीही दौलातीतील सर्व लहान - मोठ्या सरदारांना आपापल्या पक्षात वळवून घेण्याची शिकस्त केली. महादजी शिंदे माधवरावाच्या गोटात गेला तर त्याचा पुतण्या केदारजी दादाच्या छावणीत दाखल झाला. होळकरांची फौज तुकोजीच्या नेतृत्वाखाली होती. माधवरावाचे व रघुनाथरावाचे वकील तुकोजीकडे मदतीच्या मागणीसाठी गेले असता तुकोजीने कोणताही एक पक्ष स्वीकारण्यास साफ नकार दिला आणि गंगोबाकडे बोट दाखवून तो नामानिराळा राहिला. बहुतेक गंगोबा यावेळी फिरून होळकरांचा कारभारी झाला असावा किंवा तुकोजीच्या पदरी असावा। याविषयी निश्चित अशी काही माहिती मिळत नाही. गंगोबाने मनोनाम दादाचा पक्ष घेण्याचे ठरवले होते. परंतु माधवरावास त्याने स्पष्टपणे नकार न देता जणू काही आपण नाईलाजाने दादाच्या गोटात जात आहोत असेच भासवले. अर्थात, या अनुभवी मुत्सद्द्याचे खेळ माधवराव पुरेपूर ओळखून होता. अखेर 10 जून 1768 रोजी धोडप किल्ल्याजवळ दोन्ही पक्षांची गाठ पडली. स्वतः रघुनाथराव लढाईत सहभागी झालाच नाही. तो धोडप किल्ल्यावर स्वस्थपणे बसून राहिला. त्याच्या सैन्याचे नेतृत्व चिंतो व मोरो विठ्ठल रायरीकर, गणेश विठ्ठल वाघमारे, सदाशिव रामचंद्र इ. केले. होळकरांची फौज गंगाधर यशवंतच्या नेतृत्वाखाली दादाच्या बाजूने लढली. दादाच्या सहाय्यकांनी निकराची झुंज दिली पण अखेर माधवरावाने बाजी मारली. दादाची फौज पराभूत झाली. त्याचे कित्येक सहाय्यक पकडले गेले. खुद्द दादा आता पेशव्यांचा नजरकैदी बनला तर तिथे इतरांची काय कथा !
माधवरावाने गंगाधर यशवंताची रवानगी प्रथम नगरच्या किल्ल्यावर केली. पुढे त्याच्याकडून दंड म्हणून तीस लाख रुपयांची मागणी केली. या रकमेचा भरणा करण्यास नकार दिल्यामुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे म्हणा, परंतु माधवरावाने भर दरबारात गंगाधर यशवंतास छड्या मारल्याचा उल्लेख जवळपास सर्वच इतिहासकार करतात.
(12) माधवराव पेशव्याच्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा भाऊ नारायणराव हा पेशवा झाला. आरंभी काही दिवस त्याचे आणि रघुनाथाचे चांगले पटत होते परंतु पुढे लवकरच दोघांची भांडणे होऊन नारायणाने दादासाहेबास नजरकैदेत टाकले. तेव्हा दादाने आपल्या हितचिंतकांच्या सहाय्याने कैदेतून सुटका करून घेण्याचे प्रयत्न आरंभले. यासाठी कित्येक कटांची आखणी करण्यात आली तर कित्येक कट यशस्वी होता होता राहिले ! यापैकीच एक कारस्थान म्हणजे नारायणराव पेशव्यास धरण्याचा / मारण्याचा कट ! गंगाधर यशवंत या सर्व कटांमध्ये दादाला सामील होता कि नाही याची स्पष्टता होत नाही पण अखेरच्या कटात मात्र त्याचा सहभाग असल्याचा उल्लेख मिळतो. अर्थात, नारायणास पकडण्याच्या कटामध्ये तसा बव्हंशी मुत्सद्यांचा सहभाग होता पण प्रसंग पडला तेव्हा गारद्यांनी नारायणरावाचा निकालच लावून टाकला ! नारायणराव मरण पावल्यावर दादाने पेशवेपद धारण केले. त्यावेळी आपला मुख्य कारभारी म्हणून गंगोबाला नेमण्याचा त्याचा विचार असल्याचे सरदेसाई लिहीतात. परंतु, तात्याला पेशव्यांचे कारभारीपद मिळाल्याचा उल्लेख मात्र आढळत नाही.
(13) नारायणरावाच्या खुनानंतर पेशवाईत अनेक घडामोडी झाल्या पण त्यात सहभागी होण्याचे भाग्य तात्याला लाभले नाही. दिनांक 20-2-1774 रोजी तो मरण पावला.
जवळपास दोन - तीन दशके होळकरांची सेवा करणारा गंगोबा अचानक होळकरांच्या विरोधात का उभा राहिला असावा ? त्याची कारभारीपदावरून गच्छंती हे एक कारण असू शकेल पण, निव्वळ हेच प्रमुख कारण असावे असे वाटत नाही. परंतु याविषयी विश्वसनीय अशी माहिती मिळत नसल्याने अधिक न लिहिणे योग्य !
(11) स. 1768 च्या जून महिन्यात माधवराव आणि रघुनाथराव यांच्यातील वाद चिघळला जाऊन दोन्ही पक्ष उघडपणे एकमेकांच्या विरुद्ध लढण्यास उभे राहिले. यावेळी दोघांनीही दौलातीतील सर्व लहान - मोठ्या सरदारांना आपापल्या पक्षात वळवून घेण्याची शिकस्त केली. महादजी शिंदे माधवरावाच्या गोटात गेला तर त्याचा पुतण्या केदारजी दादाच्या छावणीत दाखल झाला. होळकरांची फौज तुकोजीच्या नेतृत्वाखाली होती. माधवरावाचे व रघुनाथरावाचे वकील तुकोजीकडे मदतीच्या मागणीसाठी गेले असता तुकोजीने कोणताही एक पक्ष स्वीकारण्यास साफ नकार दिला आणि गंगोबाकडे बोट दाखवून तो नामानिराळा राहिला. बहुतेक गंगोबा यावेळी फिरून होळकरांचा कारभारी झाला असावा किंवा तुकोजीच्या पदरी असावा। याविषयी निश्चित अशी काही माहिती मिळत नाही. गंगोबाने मनोनाम दादाचा पक्ष घेण्याचे ठरवले होते. परंतु माधवरावास त्याने स्पष्टपणे नकार न देता जणू काही आपण नाईलाजाने दादाच्या गोटात जात आहोत असेच भासवले. अर्थात, या अनुभवी मुत्सद्द्याचे खेळ माधवराव पुरेपूर ओळखून होता. अखेर 10 जून 1768 रोजी धोडप किल्ल्याजवळ दोन्ही पक्षांची गाठ पडली. स्वतः रघुनाथराव लढाईत सहभागी झालाच नाही. तो धोडप किल्ल्यावर स्वस्थपणे बसून राहिला. त्याच्या सैन्याचे नेतृत्व चिंतो व मोरो विठ्ठल रायरीकर, गणेश विठ्ठल वाघमारे, सदाशिव रामचंद्र इ. केले. होळकरांची फौज गंगाधर यशवंतच्या नेतृत्वाखाली दादाच्या बाजूने लढली. दादाच्या सहाय्यकांनी निकराची झुंज दिली पण अखेर माधवरावाने बाजी मारली. दादाची फौज पराभूत झाली. त्याचे कित्येक सहाय्यक पकडले गेले. खुद्द दादा आता पेशव्यांचा नजरकैदी बनला तर तिथे इतरांची काय कथा !
माधवरावाने गंगाधर यशवंताची रवानगी प्रथम नगरच्या किल्ल्यावर केली. पुढे त्याच्याकडून दंड म्हणून तीस लाख रुपयांची मागणी केली. या रकमेचा भरणा करण्यास नकार दिल्यामुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे म्हणा, परंतु माधवरावाने भर दरबारात गंगाधर यशवंतास छड्या मारल्याचा उल्लेख जवळपास सर्वच इतिहासकार करतात.
(12) माधवराव पेशव्याच्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा भाऊ नारायणराव हा पेशवा झाला. आरंभी काही दिवस त्याचे आणि रघुनाथाचे चांगले पटत होते परंतु पुढे लवकरच दोघांची भांडणे होऊन नारायणाने दादासाहेबास नजरकैदेत टाकले. तेव्हा दादाने आपल्या हितचिंतकांच्या सहाय्याने कैदेतून सुटका करून घेण्याचे प्रयत्न आरंभले. यासाठी कित्येक कटांची आखणी करण्यात आली तर कित्येक कट यशस्वी होता होता राहिले ! यापैकीच एक कारस्थान म्हणजे नारायणराव पेशव्यास धरण्याचा / मारण्याचा कट ! गंगाधर यशवंत या सर्व कटांमध्ये दादाला सामील होता कि नाही याची स्पष्टता होत नाही पण अखेरच्या कटात मात्र त्याचा सहभाग असल्याचा उल्लेख मिळतो. अर्थात, नारायणास पकडण्याच्या कटामध्ये तसा बव्हंशी मुत्सद्यांचा सहभाग होता पण प्रसंग पडला तेव्हा गारद्यांनी नारायणरावाचा निकालच लावून टाकला ! नारायणराव मरण पावल्यावर दादाने पेशवेपद धारण केले. त्यावेळी आपला मुख्य कारभारी म्हणून गंगोबाला नेमण्याचा त्याचा विचार असल्याचे सरदेसाई लिहीतात. परंतु, तात्याला पेशव्यांचे कारभारीपद मिळाल्याचा उल्लेख मात्र आढळत नाही.
(13) नारायणरावाच्या खुनानंतर पेशवाईत अनेक घडामोडी झाल्या पण त्यात सहभागी होण्याचे भाग्य तात्याला लाभले नाही. दिनांक 20-2-1774 रोजी तो मरण पावला.
1 टिप्पणी:
Nice article...Thanks...
टिप्पणी पोस्ट करा