सोमवार, १ एप्रिल, २०१३

शहामतपनाह बाजीराव ( भाग - १ )


            छ. शिवाजी महाराजांना स्वराज्य संस्थापक म्हटले जाते तर या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करण्याचे श्रेय विसाजीपंतास दिले जाते. कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण जातीतील भट घराण्यात १८ ऑगस्ट १७०० रोजी जन्मलेल्या विसाजी उर्फ बाजीरावाने आपल्या उण्यापुऱ्या ३९ - ४० वर्षांच्या हयातीमधील १८ - २० वर्षांच्या कारकिर्दीत जी काही कर्तबगारी दाखवली, त्यामुळे भट घराणे विख्यात होऊन सातारकर छत्रपतींची पेशवाई कायमस्वरूपी त्या घराण्यास मिळाली. बाजीरावाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पेशवा म्हणून कार्यरत असताना देखील त्याची वृत्ती ' विसाजीपंताची ' न राहता ' बाजीराव ' थाटाची राहिली.
           ता. २ एप्रिल १७२० रोजी बाळाजी विश्वनाथाचे निधन झाल्याने रिक्त झालेले पेशवेपद छ. शाहूने बाळाजीच्या मोठ्या मुलास, बाजीरावास दिले. यावेळी बाजीराव केवळ १८ - १९ वर्षांचा असून त्याचा स्वभाव देखील वयाला साजेसा असा उद्दाम आणि बंडखोर प्रवृत्तीचा होता. लहानपणापासून बापासोबत स्वाऱ्या - शिकाऱ्यांमध्ये सहभाग घेतल्याने त्याचा कल फडावरील बैठ्या राजकारणापेक्षा शिपाईगिरीकडे अधिक होता. पुढे जसजसे वय आणि अनुभव वाढत गेले तसतसे त्याचे उद्दाम वर्तन मावळत गेले. लहानपणापासून लष्करी मोहिमांमध्ये व विविध राजकीय घडामोडींमध्ये सहभाग घेतल्याने बाजीरावाची आपल्या बापापेक्षाही वेगळी अशी विशिष्ट विचारसरणी बनली होती. त्याच्या वंशजांनी आपल्या पराक्रमी पूर्वजाची विचारपरंपरा जशीच्या तशी न स्वीकारता आपापल्या स्वभाव मर्यादांनुसार त्यावर संस्कार करून राबवण्याचा प्रयत्न केला. परिणामी ज्या वेगाने मराठी राज्य साम्राज्यावस्थेपर्यंत पोहोचले त्याच वेगाने त्याचा ऱ्हास घडून आला.
                  बाजीरावाच्या कारकिर्दीचे सामान्यतः दोन भाग पडतात. स. १७२० ते २७ व स. १७२८ ते ४०. पैकी पहिल्या सात - आठ वर्षांचा काळ हा तसा चाचपडण्यातचं गेला. स. १७१९ मध्ये प्राप्त झालेल्या स्वराज्याच्या सनदांच्या आधारे प्रांतात आपला अंमल बसवण्याचे कार्य स. १७२० ते २७ पर्यंत बाजीरावाने केले. त्याशिवाय माळव्याच्या स्वारीचा पाया देखील त्याच सनदांनी घातलेला असल्याने अधूनमधून त्याने माळव्याकडेही काही फेऱ्या मारल्या. परंतु, आरंभी तरी त्यास म्हणावे तसे यश काही लाभले नाही. माळव्यात शिरण्यास त्यास मोठा अडथळा मल्हारराव होळकराचा झाला.
         बढवाणीचा संस्थानिक पेशव्याला अनुकूल नसल्याने त्याचा बंदोबस्त केल्याखेरीज बाजीरावास पुढे जाता येईना व बढवाणीच्या बचावासाठी मल्हारराव होळकर उभा होता. वास्तविक, मल्हारराव हा तसा एकांडा शिलेदार असून स्वतंत्र वृत्तीने मोहिम करणारा सरदार होता. बाळाजी विश्वनाथच्या दिल्ली स्वारीत देखील तो सहभागी असून त्या मोहिमेच्या दरम्यान बाजीरावाशी त्याचा खटका उडून त्याने पेशव्याच्या मुलाला ढेकळं फेकून मारली होती. अशा या बाणेदार गृहस्थासोबत तंटा वाढवण्यापेक्षा त्यास आपल्या लगामी लावून माळव्याचे कार्य त्याच्याचं मार्फत उरकून घेण्याचे बाजीरावाने ठरवले व त्याने होळकराशी समेट केला. ( स. १७२१ ) यानंतर बाजीरावाच्या प्रत्येक स्वारीत होळकर सहभागी होऊ लागला. माळव्यावर अल्पावधीत ताबा बसवणे, होळकरामुळेच पेशव्यांना शक्य झाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
               माळव्याप्रमाणे कर्नाटकातही बाजीरावाने हात - पाय मारून पाहिले. स. १७२५ - २६ व स. १७२६ - २७ अशा लागोपाठ दोन मोहिमा त्याने शाहूच्या आज्ञेने दक्षिणेत काढल्या. परंतु, स्वतंत्र वृत्तीने काम करण्याची सवय असलेल्या बाजीरावास ' बारभाई ' पद्धतीचा कारभार पसंत नव्हता. कर्नाटक मोहिमेत प्रतिनिधी व सेनापती हि बडी धेंडं त्याच्या सोबत असून त्यांचा दर्जा बाजीरावाच्या बरोबरीचा असल्याने त्यांच्यावर बाजीरावाची हुकुमत नव्हती. सबब, या स्वाऱ्या निष्फळ ठरल्या. 
           परंतु, बाजीरावाच्या भाग्योदयाची वेळ आता नजीक आली होती. बाजीराव कर्नाटक स्वारीत गुंतलेला असताना स. १७२७ मध्ये निजाम - संभाजी यांनी एकत्रितपणे शाहूवर स्वारी केल्याने शाहूने बाजीरावासह आपल्या सर्व प्रमुख सरदारांना कर्नाटक मोहिमेतून मागे बोलावले. आपले लष्करी नेतृत्व व सामर्थ्य आजमवण्याची हि एक संधी चालून आली असून या संधीचे कोणत्याही परिस्थितीत सोनं केलचं पाहिजे या ईर्ष्येने बाजीरावाने निजामावरील मोहीम हाती घेतली. याकामी त्याला आपल्या भावाची - चिमाजीआपाची - बहुमोल मदत झाली. आपल्या सैन्याचे दोन भाग करून चिमाजीवर त्याने नाशिक ते सातारा - मिरजपर्यंतच्या प्रदेशचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली व स्वतः बाजीराव आपल्या वेगवान घोडदळासह निजामाच्या प्रदेशांत शिरला. बाजीरावाचे युद्धविषयक धोरण स्पष्ट होते. आपल्याकडे तोफखाना नाही तर निजामाचा तोफखाना जय्यत तयारीत आहे. अशा स्थितीत निजामासोबत लढाई करायची तर त्याच्या तोफखान्याचा सामना करणे टाळले पाहिजे. याची पक्की खूणगाठ बाजीरावाने मनाशी बांधली. त्यानुसार निजामाच्या प्रदेशांत जाळपोळ, लुटालूट करीत बाजीराव गुजरातकडे निघून गेला. पाठोपाठ त्याचा संहार करण्यासाठी निजामही चवताळून त्याच्यामागे धावला. बाजीरावाचा पाठलाग करताना जड तोफांचा अडथळा होतो म्हणून बव्हंशी तोफखाना मागे ठेऊन निवडक तोफांसह तो बाजीरावाच्या पाठीवर जाऊ लागला. अखेर पालखेडजवळ निजामाला त्याच्या मुख्य तोफखान्यापासून वेगळे करण्यात बाजीरावास यश मिळाले व त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. निजामाच्या फौजेभोवती त्याने आपल्या धावत्या तुकड्यांच्या चौक्या नेमल्या. पालखेडनजीक निजामाचा मुक्काम पडला तेव्हा याच धावत्या तुकड्यांनी निजामाची रसद पूर्णतः तोडून टाकली. त्यामुळे घाबरून जाउन निजाम तहास राजी झाला. तेव्हा ६ मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगांव येथे उभयतांमध्ये तह घडून आला. या तहानुसार दक्षिणच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या शाहूच्या हक्कांना निजामाने मान्यता दिली.
                 पालखेडची मोहीम म्हणजे बाजीरावाच्या कारकिर्दीतील व आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे. या स्वारीनंतर त्याचा आपल्या लष्करी नेतृत्वक्षमतेवरील विश्वास वाढीस लागला आणि या मोहिमेनंतर त्याने मागे वळून कधी पाहिले नाही. हे जरी खरे असले तरी पालखेडच्या विजयाचे सर्व श्रेय एकट्या बाजीरावास देणे अयोग्य ठरेल. त्याला चिमाजी आपाची जशी बहुमुल्य साथ लाभली. त्याचप्रमाणे शिंदे, होळकर, जाधव, पवार इ. सरदारांनीही बरीच मदत घेतली. याबाबतीत पिलाजी जाधव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे हे बाजीरावाचे गुरुचं समजले पाहिजेत. या सर्व अनुभवी योद्ध्यांमुळेचं २७ - २८ वर्षीय बाजीरावास हे यश प्राप्त झाले.
          पालखेड येथे बाजीरावाने निजामाला शरण येण्यास भाग पाडले, त्याचवर्षी होळकर, उदाजी पवार, कंठाजी कदम बांडे इ. च्या साथीने चिमाजी आपाने दयाबहादूर व गिरिधर बहादूर या दोन बलवान मोगल सुभेदारांना युद्धात ठार करून माळवा प्रांत एकदाचा ताब्यात घेतला. चिमाजीच्या विजयाची बातमी मिळतांच स्वतः बाजीराव बुंदेलखंडात छत्रसाल राजाच्या मदतीस धावून गेला. महंमदखान बंगशच्या विरोधात बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याने बाजीरावाची मदत मागितली होती. त्यावेळी चिमाजी माळव्याच्या प्रकरणात अडकल्याने बाजीरावास तातडीने बुंदेलखंडात जाता आले नाही. परंतु दया बहादूर व गिरिधर बहादूरचा बंदोबस्त होताच बाजीरावाने बुंदेलखंड प्रकरण हाती घेतले. यावेळी चिमाजी उज्जैनला वेढा घालून बसला होता व त्याची बातमी महंमदखान बंगशला होती. पण देवगडावरून गढामंडळमार्गे बाजीराव येत असल्याची कल्पना बंगशला नव्हती. परिणामी जैतपुरावर महंमदखान बंगश मराठी व बुंदेल्यांच्या फौजांच्या चिमट्यात कोंडला गेला. त्याने दिल्लीहून कुमक मागवली. मुलगा काईमखान यांस तातडीने मदतीस बोलावले. बापाच्या मदतीला मुलगा धावला खरा पण जैतपूरच्या अलीकडे सुपे येथे मराठी सैन्याने गाठून लुटून घेतले. केवळ १०० स्वारांनिशी काईमखान जीव घेऊन पळत सुटला. सुटकेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे पाहून स. १७२९ च्या मे महिन्यात बंगश शरण आला. पावसाळा तोंडावर आल्याने बाजीरावास परत फिरणे भाग होते. तेव्हा त्यानेही फारसे ताणून न धरता बंगशला सोडून दिले. छत्रसालने बाजीरावास या मदतीच्या बदल्यात पाच लाखांची जहागीर नेमून दिली. या जहागिरीच्या मोबदल्यात मोगलांच्या आक्रमणापासून छत्रसालच्या राज्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी बाजीरावाने उचलली. अशा प्रकारे माळवा - बुंदेलखंडातील विजय संपादून चिमाजी - बाजीराव पुण्यास परतले.
           डभईची लढाई हे बाजीरावाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे प्रकरण असल्याने याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे येथे भाग आहे. सेनापती खंडेराव दाभाड्यास मुलूखगिरीसाठी गुजरात प्रांत नेमून देण्यात आला होता, त्याचप्रमाणे माळवा प्रांत पेशव्यास मिळाला होता. अर्थात हि वाटणी स्वतः छत्रपती शाहूने केली होती. पण पुढे शाहूने गुजरात प्रांतातील निम्मा मोकासा चिमाजीच्या नावे करून निम्मा त्रिंबकराव दाभाड्यास दिला. त्रिंबकरावास शाहूचा निर्णय मंजूर नसल्याने त्याने आपली नाराजी छत्रपतीकडे दर्शवली. इकडे बाजीरावाने त्रिंबकरावची समजूत काढण्यासाठी त्यास, आपण माळवा प्रांती निम्मी वाटणी देतो असे सांगितले. परंतु त्रिंबकराव यास राजी झाला नाही. सेनापतीस नाराज करणे शाहूस योग्य वाटले नाही आणि त्याने चिमाजीला दिलेला निम्मा मोकासा रद्द केला. परंतु, तरीही बाजीराव गुजरातमधील वाटणीसाठी आग्रही राहिला.
          वास्तविक, बाजीरावास जसा स्वतःच्या  पराक्रमाचा, कर्तबगारीचा आत्मप्रत्यय आला होता ; त्याचप्रमाणे आपल्या छत्रपतीचा दुबळेपणा देखील हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागला होता. त्याशिवाय त्याच्या पूर्वसुरींची परंपरा व समकालीन लोकांच्या वर्तनाचाही त्याच्या मनावर थोडाफार परिणाम झाला होता. बलवान छत्रपतींची परंपरा शिवाजी महाराजांपासून सुरु होऊन तिचा शेवट संभाजीसोबत झाला होता. राजारामास संताजी व धनाजीने कित्येकदा रडवले होते. शाहू राजारामाइतका दुबळा नसला तरी संभाजीसारखा प्रखरही नव्हता. त्यामुळे धनाजी - चंद्रसेन या पितापुत्रांनी त्यास बरेच हैराण केले होते. शाहूचे वर्तन पाहता दरबारातील कोणताही मातबर मानकरी पुढेमागे त्यास बगलेत मारणार याचा अंदाज बाजीरावास आला होता. मग हे कार्य आपणचं हाती घेतले तर काय फरक पडतो अशी त्याची भावना बनल्यास नवल नाही.  त्याशिवाय त्याच्या समकालीन पवार, आंग्रे होळकर, भोसले इ. सरदारांचे स्वतंत्र वर्तन त्याच्या नजरेसमोर होते. शाहूची नाममात्र ताबेदारी स्वीकारून ते आपापली स्वतंत्र संस्थाने उभारत असल्याचे त्याच्या नजरेतून सुटले नाही. आपणही यांसारखा एखादा प्रयत्न करावा अशी इच्छा त्याच्या मनी उत्पन्न झाली.त्यानुसार त्याने बुंदेलखंडात एक प्रयत्न करून पाहिला. छत्रसालच्या मदतीस बाजीराव गेला आणि जहागीर मिळवून आला पण ती जहागीर त्याने स्वतःच्या खाजगी दौलतीमध्ये जमा धरली. मराठी राज्यात तिचा अंतर्भाव केला नाही. यावरून त्याचे विचार कोणत्या दिशेने चालले होते याची कल्पना येते.
             इकडे त्रिंबकराव दाभाड्याने बाजीरावाच्या द्वेषाने परिस्थितीचे अवधान सोडून निजामाची मदत मागितली. निजामालाही पालखेडच्या अपयशाचा बदला घ्यायचा होता. त्यानेही सेनापतीला मदतीचे आश्वासन दिले. तसेच बंगशला देखील बाजीराव विरोधी आघाडीत सामील करून घेण्याच्या उद्देशाने नर्मदेच्या किनारी भेटीस बोलावले. संभाव्य धोक्याची हि पूर्वसूचना समजून बंगशला अडवण्याची जबाबदारी बाजीरावाने मल्हाररावावर सोपवली. इकडे निजाम नर्मदेकडे जात असल्याचे पाहून चिमाजीआपा तातडीने मही नदीच्या उत्तरेस मेमदाबाद येथे गेला. त्या ठिकाणी जोधपुरच्या अभयसिंगाशी त्याची भेट होऊन उभयतांचा सलोखा झाला. प्रसंग पडला तर राजपुतांची मदत घेऊन निजाम - दाभाडेचा सामना करण्याचा पेशवेबंधूंचा निश्चय झाला. वास्तविक, या अभयसिंगाला गुजरात प्रांत हवा होता पण दाभाडे जबरदस्त असल्याने त्याची डाळ शिजत नव्हती. तेव्हा पेशव्याच्या मदतीने गुजरात ताब्यात घेण्याचा त्याने डाव आखला तर गुजरात हाताखाली घालण्यासाठी व दाभाडेच्या पक्षाला आणखी एक सत्ताधीश जाउन्न मिळू नये यासाठी पेशवे बंधूंनी अभयसिंगास तात्पुरते जवळ केले. दरम्यान इकडे नर्मदेवर निजाम - बंगश यांची भेट होऊन २८ मार्च १७३१ रोजी बंगश माळव्यात परतला तर निजाम दाभाड्यांच्या मदतीसाठी सुरतेस निघाला.                  
           निजामाचा तोफखाना व दाभाड्यांची फौज एकत्र झाल्यास आपला निभाव लागणार नाही हे ताडून बाजीरावाने त्वरेने १ एप्रिल १७३१ रोजी डभईजवळ भिलापूर येथे दाभाड्यांवर हल्ला चढवला. बाजीरावाने कितीही त्वरा केली असली तरी निजामाची एक तुकडी मोमीनयारखानाच्या नेतृत्वाखाली दाभाड्यांना येउन मिळाली होती. डभईच्या संग्रामात मोमीनयारखानाने सहभाग घेतला व लढत असताना तो मारला गेला. या लढाईमध्ये पेशवा व सेनापती यांचे  बळ काय होते याची निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही पण, दाभाड्यांच्या तुलनेने बाजीरावची फौज कमी होती हे निश्चित ! तसेच सेनापतीच्या बाजूने उदाजी पवार, कंठाजी कदम बांडे, चिमणाजी दामोदर हे सरदारही लढण्यास सिद्ध झाल्याने बाजीरावास यश मिळणे तसे दुरापास्तचं होते. दरम्यान सेनापती व पंतप्रधानातील तंटा सामोपचाराने मिटावा म्हणून छत्रपती शाहू दोन्ही बाजूला आज्ञापत्रे पाठवत होता. परंतु, उभयतांनी एकमेकांवर फितुरीचे आरोप करून, आपण लवकरचं शत्रूचा पाडाव करून आपल्या भेटीस येतो असे शाहूस कळवले. सारांश, बसल्या जाग्यावरून आज्ञा सोडणाऱ्या छत्रपतीला त्याची जागा दाखवून देण्याचे अप्रत्यक्ष कार्यदेखील या निमिताने दोन्ही प्रधानांनी करून दाखविले.
           दाभाड्यांच्या बखरीनुसार बाजीरावाने त्रिंबकरावाच्या कित्येक शिलेदारांना फितवले होते. हा आरोप खरा आहे कि नाही याची पडताळणी करण्यास प्रत्यंतर पुरावा नाही परंतु, बाजीरावसारखा सेनानी असला काही डावपेच वापरणारचं नाही असे समजणे चुकीचे ठरेल. बाजीरावाला हि लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असल्याने त्याने दाभाड्यांच्या फौजेत फितूर करण्याचा प्रयत्न केला तर त्यात बाजीराव समर्थकांनी वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. प्रत्यक्ष लढाईच्या वेळी दोन्ही बाजूच्या फौजा मोठ्या हिरीरीने लढल्या. स्वतः त्रिंबकराव हत्तीवर बसून तिरंदाजी करत होता. याप्रसंगी त्याचा माहूत मारला गेला तेव्हा स्वतः पायाने हत्ती चालवत त्याने सैन्याचे नेतृत्व केले. धनुष्य - बाण चालवताना त्याच्या बोटांची कातडी सोलून निघाली तरी त्याकडे दुर्लक्ष करून त्याने युद्ध चालूचं ठेवले. त्रिंबकराव जातीने लढत असल्याने त्याच्या फौजेत बळ संचारले व पेशव्याची सेना मार खाऊ लागली. बाजीरावाने देखील स्वतः आघाडीवर निवडक शिलेदार, बारगीरांसह दाभाड्याच्या फौजेवर अनेक हल्ले चढवले. परंतु त्यास म्हणावे तसे यश मिळाले नाही तेव्हा त्याने त्रिंबकरावास निरोप पाठवला कि, ' अशी लढाई शत्रूसोबत करून महाराजांना संतुष्ट करावे. आम्ही लढाई तहकूब करून भेटीस येतो.' परंतु त्रिंबकरावाने बाजीरावाचा सल्ला फेटाळला. बाजीरावाने आपल्या लोकांना लढाईपूर्वी किंवा लढाईदरम्यान सेनापतीवर शस्त्र न चालवण्याची आज्ञा केल्याचे उल्लेख मिळतात. यात कितपत तथ्य आहे ते या क्षणी सांगणे कठीण आहे. परंतु, दाभाड्यांच्या बखरीचा संदर्भ घेतला असता त्रिंबकरावाचा सावत्र मामा भावसिंगराव टोके हा पेशव्याला फितूर झाला असून त्याने आपल्या बारगिराकरवी त्रिंबकरावावर बंदूक चालवून त्यास ठार केले. त्रिंबकराव मरण पावताच दाभाड्यांची फौज पळत सुटली. पराभूत सेनापतीच्या फौजेची लूट करून करून बाजीराव परत मागे फिरला. कारण, डभईचा संग्राम जरी बाजीरावाने जिंकला असला तरी दभाड्यांची मोडलेली फौज परत एकदा एकत्र करून यशवंतराव दाभाडे बाजीरावावर चालून येऊ लागला. इकडून निजामही सुरतजवळ येउन थडकला होता. मिळून डभईची लढाई मारून देखील म्हणावा तसा लाभ पदरात न पडता बाजीरावाची कोंडी होण्याचा प्रसंग उद्भवला. तेव्हा त्याने दाभाडे व निजामाच्या फौजांना चकवत पुणे जवळ केले. दरम्यान सुरतच्या जवळ बाजीरावाच्या एका सैन्य तुकडीची व निजामाच्या पथकांची चकमक होऊन बाजीरावाच्या तुकडीचा पराभव झाला. परंतु, या क्षुल्लक विजयाचे भांडवल करून निजामाने, आपण माळवा व गुजरातमधून बाजीरावास हाकलून लावल्याच्या बढाया मारणारी पत्रे मोगल दरबारी पाठवली.
              डभईच्या लढाईनंतर स्वतः शाहूने तळेगावी जाउन त्रिंबकरावाची आई -- उमाबाई -- हिची भेट घेऊन तिचे सांत्वन केले. पेशवे - सेनापती यांच्यात दिलजमाई घडून यावी यासाठी प्रयत्न केले पण दाभाड्यांनी मनातील तेढ सोडली नाही. त्याशिवाय त्यांच्या घरातही लवकरचं अव्यवस्था माजून सेनापतीपद मात्र त्यांच्याकडे राहून गुजरातचा कारभार पुढे त्यांचा सरदार गायकवाड, याच्या हाती गेला.
            डभई प्रसंगाची जरा जास्त तपशीलवार चर्चा करण्याचे कारण म्हणजे या लढाईनंतर शाहूच्या उर्वरीत प्रधानांवर आणि इतर मराठी सरदारांवर पेशव्याची जरब बसली. पेशव्याच्या विरुद्ध जाणाऱ्याची आपण कशी वाट लावू शकतो हेच या प्रसंगातून पेशवेबंधूंनी आपल्या विरोधकांना दाखवून दिले. याच ठिकाणी आणखी एक गोष्ट नमूद करणे आवश्यक वाटते कि, दाभाड्यांनी निजामाचा आश्रय घेतल्यामुळे सातारकर छत्रपतींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पेशव्याला हे कटू कर्तव्य पार पाडावे लागले असे इतिहासकार सांगतात. परंतु दाभाडे, आंग्रे, भोसले इ. प्रकरणांतील पेशव्यांचे वर्तन पाहता वरवर आपण छत्रपतीचे हित साधत आहोत असे दाखवून पेशवे आपल्या डोईजड प्रतिस्पर्ध्यांना संपवत वा दुबळे करत चालले होते. छत्रपतीला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न सुरु असताना हि स्थिती होती तर मग पेशवाईत जेव्हा छत्रपती नामधारी झाले त्यावेळची स्थिती काय वर्णावी ?
                                                                             
                                                                           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: