सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

प्रकरण ५) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





    प्रस्तुत प्रकरणात आपण शहाजीने निजामशाहीची शरणागती दिल्यावर त्याच्या ताब्यात आलेल्या पुणे जहागीरीची, तेथील कारभाराची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी शहाजीकडे निजामशाहीची शरणागती देण्यापूर्वी कोणता प्रदेश होता याची संक्षेपात माहिती घेऊ.

    शिवकालीन पत्रसारसंग्रहातील स. १६३६ च्या मे महिन्यातील आदिल - मोगल तहानुसार शहाजीकडे जुन्नर, त्रिंबक आदी किल्ल्यांचा ताबा होता. शहाजीच्या शरणागतीचा वृत्तांत पाहता माहुली गडावर असताना त्याने शरणागती पत्करली. तेव्हा उपरोक्त किल्ल्यांत आणखी एकाची भर पडते. त्याचप्रमाणे मराठी रियासत खंड - १ मध्ये याच काळातला एक वृत्तांत असून त्यानुसार शहाजीने पोर्तुगीजांकडे यावेळी खटपट करून चौल येथे आश्रय घेण्याची धडपड चालवली होती. त्यावेळी पोर्तुगीजांनी त्यांस उघड आश्रय देण्याचे नाकारले पण दंडा राजपुरी येथे जाण्यासाठी मदत हवी असल्यास देण्याची तयारी दर्शवली. विशेष म्हणजे दंडा राजपुरी यावेळी शहाजीच्या ताब्यात होते.

    डॉ. ब. प्र. सक्सेना लिखित व भ. ग. कुंटे अनुवादित ' दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास ' मध्ये या संदर्भात थोडी अधिक माहिती मिळते. त्यानुसार, शहाजहान दक्षिणेत उतरला त्या आसपास शहाजीकडे चांभारगोंदा, अष्टी हे महाल होते. शिवाय संगमनेर, नाशिकचाही ताबा त्याच्याकडेच होता. तसेच शहाजीने बादशाही फौजांपासून जुन्नर, चाकण, पुणे हि स्थळे जिंकून घेतल्याचाही उल्लेख आहे. फक्त कालनिर्देश आढळत नाहीत.

    विविध संदर्भ ग्रंथांतील माहिती पाहता शहाजीकडे माहुली, जुन्नर, त्रिंबक, दंडा राजपुरी हे चार किल्ले असल्याचे तरी स्पष्ट होते. चाकण जरी त्याच्याकडे असले तरी तेथील गढीचा ताबा कोणाकडे होता याची माहिती मिळू शकली नाही. चांभारगोंदे व अष्टी महालापैकी चांभारगोंदा हे भोसल्यांच्या पाटीलकी वतनाचे गाव असून स. १५९७ पासून मालोजीने तिथे वास्तव्य केल्याचा उल्लेख ' शककर्ते शिवराय ' मध्ये विजय देशमुखांनी केलाय. असो. नाशिक, संगमनेर, पुणे इ. प्रांतापैकी व उपरोक्त स्थळ - किल्ल्यांपैकी प्रत्यक्ष शरणागती वेळी कशाकशावर शहाजीचा ताबा होता हे समजायला मार्ग नाही. परंतु निजामशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी जो भूप्रदेश शहाजीने तुडवला वा कब्जात घेतला, त्यातीलच बव्हंशी प्रदेशाचा शिवाजीच्या राज्यात पुढे अंतर्भाव झाल्याचे माझे मत आहे.

    स. १६३६ मध्ये शहाजीला प्राप्त झालेल्या जहागिरीचा पूर्ण तपशील मिळत नाही. आदिलशहास लिहिलेल्या त्याच्या एका पत्रावरून, जेव्हा माहुलीवर निजामशाहीची शरणागती देऊन तो विजापूर दरबारच्या सेवेत दाखल झाला तेव्हा त्यांस चार लाखांची जागीर मिळाल्याचा उल्लेख आहे. अर्थात हि जहागीर नव्याने प्राप्त झाली कि त्याची आधीची मिळून आणखी काहीची भर पडून ती चार लाखांची झाली याची स्पष्टता होत नाही. असो. 

    विजापूर दरबारने शहाजीला नोकरीत घेऊन त्याची रवानगी कर्नाटक प्रांतातील मोहिमेवर केली. या स्वारीमागील मुख्य प्रयोजन म्हणजे त्या प्रांतातील संस्थानिकांवर आपलं वर्चस्व बसवत एकतर ती समूळ नष्ट करणं वा खंडणी बसूल करणं. याबाबतीत विजापूर व गोवळकोंडा दरबार दरम्यान करार झाला असून त्यान्वये पूर्व किनारा गोवळकोंड्याकडे तर पश्चिम किनारा विजापूरकडे अशी कर्नाटक प्रांताची विभागणी झाली होती, असे रियासतकार सरदेसाई नमूद करतात. परंतु प्रत्यक्ष घटनाक्रम पाहता विजापूर व गोवळकोंड्यामध्ये हा करार पाळण्याऐवजी तोडण्याचीच स्पर्धा असल्याचे दिसून येते.

    कर्नाटक प्रांताची मोहीम अंगावर पडताच शहाजीने पुणे प्रांतातील आपल्या जहागीरीची व्यवस्था लावण्यासाठी नेमकी कोणती व्यवस्था केली याची विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. दादोजी कोंडदेवची त्याने पुण्याच्या जहागिरीवर देखरेख करण्यासाठी नियुक्ती केल्याचे मोघम विधान बव्हंशी इतिहासकार करतात. याविषयी सविस्तर चर्चा आपण पुढील प्रकरणी करू.  

    शिवाजीच्या हयातीत रचलेल्या शिवभारतानुसार जेव्हा शिवाजी बारा वर्षांचा झाला त्यावेळी शहाजीने त्याची रवानगी बंगळूराहून पुण्याला केली. विशेष म्हणजे शिवभारतात दादोजी कोंडदेव शिवाजीला पुण्याहून बंगळूरला घेऊन गेल्याची वा तिकडून घेऊन आल्याची नोंद नाही. जेधे शकावालीत शिवाजीच्या पुणे आगमनाविषयी अवाक्षर नसले तरी जेधे करीन्यात मात्र " ... त्यावरी माहाराजानी राजश्री सिवाजीराजे यां समागमे राजश्री सामराजपंत पेशवे व माणकोजी दहातोडे सरनोबत व बालाजी हरी मज्यालसी ( सभासद याअर्थी ) व कारकून व स्वाराचा जमाव देऊन पुण्यास पाठविले त्यावरी कसबे खेडेबारे येथे ही वाडे बांधले ... " इतकाच उल्लेख आहे व हि घटना करीन्यानुसार शहाजीच्या प्रथम कैदेनंतरची आहे. अर्थात, यात प्रसंगाचा काल दिलेला नाही.

    शिवाजीचे दादोजी कोंडदेव सोबतचे पुणे आगमन ' पुरंदरे दफ्तर भाग ३ रा ' मधील खेडेबारे येथील देशपांडेच्या शिवकालीन करीन्यात येते. परंतु या करीन्यात विशिष्ट कालाचा वा शकाचा निर्देश नसल्याने तारीख वा साल निश्चितीसाठी करीन्यातील घटनांवर अवलंबून राहावे लागते. दुसरे असे कि, याच करीन्यात माहादेवभट माहाभास हा शिवाजीचा गुरु असल्याचा उल्लेख असूनही ज्याअर्थी तो दुर्लक्षिला गेला आहे त्याअर्थी या करीन्यावर विसंबून दादोजी कोंडदेव सोबत शिवाजीची शहाजीने रवानगी केली असं विधान करणं निश्चितच धारीष्ट्याचं ठरेल. असो.

    सध्या तरी शिवभारतातील अध्यायांवर विश्वास ठेवून वयाच्या बाराव्या वर्षी वा १२ वर्षे पूर्ण झाल्यावर शिवाजी बंगळूरहून पुण्यास आला हे मानणं भाग आहे. शिवाजीला पुण्यास पाठवताना शहाजीने त्याच्यासोबत " काही हत्ती, घोडे व पायदळ, पिढीजाद व विश्वासू अमात्य, त्याचप्रमाणे विख्यात अध्यापक, बिरुदे, उंच ध्वज, विपुल द्रव्य त्याचप्रमाणे अद्वितीय कर्मे करणारे दुसरे परिजन या समवेत त्या पुण्यशील पुत्रास शहाजी राजाने शुभदिनी पुणे प्रांती पाठविले. "
( संदर्भ :- शिवभारत अध्याय १०, श्लोक २५ ते २७ )

    शिवाजीचा जन्म दि. १९ फेब्रुवारी १६३० चा. त्यात अधिक बारा वर्षे धरता साधारणतः स. १६४२ - ४३ च्या सुमारास तो बंगळूराहून पुण्यास आला असं सामान्यतः मानलं जातं. प्रत्यंतर अस्सल साधनांचा पुरावा सध्यातरी उपलब्ध नसल्याने शिवभारताच्या कथनावरच विश्वास ठेवावा लागतो. परंतु त्यासोबत हेदेखील ध्यानात घेतलं पाहिजे कि, १२ म्हणजे बारा वर्षे पूर्ण झाल्याबरोबर लगेच शहाजीने शिवाजीला पाठवलं असं होत नाही. कदाचित यात आणखी काही वर्षे मागं - पुढं झाली असू शकतात. असो.

    शिवचरित्र निबंधावलीनुसार श. १५६७ मध्ये शिवाजीची कारकीर्द सुरु झाली. अर्थात, तोपर्यंत शहाजी कर्नाटक प्रांतातून सवड मिळताच देशी येऊन आपल्या जहागिरीच्या कामकाजाची पाहणी करे. इथे गोंधळात टाकणाऱ्या कित्येक बाबी असून प्रत्यंतर पुरावे नसल्याने या गोंधळाचे निवारण करणे तितकंस सोपं नाही.

    प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे कि, शहाजीकडे पुणे व आसपासचा जो भूप्रदेश जहागिरी दाखल होता, त्याच प्रदेशात त्यास क्रमाक्रमाने सरकारतर्फे --- आदिलशाही दरबाराकडून मोकासदाराचेही अधिकार मिळत गेले. इथे मोकासा व जहागीरदार यातील अंतर जाणून घेण्यासाठी द. वि. आपटे यांची ' शिवभारत ' ची प्रस्तावना अथवा ' शिवचरित्र निबंधावली ' तील लेख पाहावेत. इथे फक्त एवढेच नमूद करतो कि, जहागीर हि वंशपरंपरागत असून मोकासा हा काही वर्षांपुरता वा महिन्यांकरता असतो. जहागीरदार व मोकासदाराची कर्तव्यं जरी जवळपास एकसारखीच असली तरी मोकासदार हा सरकारनियुक्त असल्याने त्याच्याकडे काही खास अधिकारही असतात, जे जहागीरदारास नसतात. उदाहरणार्थ, एखाद्याकडे इनाम चालवायचे झाल्यास त्यासाठी (१) बादशाही फर्मान (२) वजीर वा मोकासदाराची खुर्द्खते आणि (३) सुभेदाराची सनद या तीन पत्रांची गरज असे. यात जहागीरदाराचा संबंध येत नाही.

    बव्हंशी इतिहासकारांच्या मते, शहाजीला पुणे परगण्याचा मोकासा मिळाला त्यावेळी त्याने त्यातील २९०( काही ठिकाणी २८८ गावं दिली आहेत. ) गावांपैकी कर्यात मावळात मोडणाऱ्या ३६ गावांचा मोकासा शिवाजीच्या नावे केला. सांडस खुर्द कडील वीस गावं त्याने आपला चुलत भाऊ मंबाजी भोसलेकडे दिली तर उर्वरित गावांची जबाबदारी दादोजी कोंडदेवकडे सोपवली. विशेष म्हणजे यात जिजाबाईच्या वाटणीस एकाही गावाचा मोकासा नाही. हि बाब मला खटकली असून या निमित्ताने उपलब्ध साधने अभ्यासली असता खेडेबारे प्रांतातील मौजे कामथडी हा गाव जिजाबाईच्या सरदेशमुखीचा असल्याचे समजले. या संबंधातील वतनपत्र, निवाडापत्र सातारकर शाहूच्या ( संभाजी पुत्र ) काळातील आहे. या निवाड्यातील माहितीनुसार स. १६३० च्या आसपास कामथडी गाव जिजाबाईकडे इसाफतीने तथा इनाम म्हणून सरदेशमुखी बाबत चालत होते. जिजाबाईचा शिक्का फारसी असल्याच्या उल्लेख बव्हंशी इतिहासकार करतात. मग जर तिच्याकडे शिक्का आहे तर कामकाजादाखल एखादं गाव का असून नये ? त्याहीउपर म्हणजे खासगी खर्चासाठी एखाद दुसरं गाव आपल्या कुटुंबाकडे लावून देण्याचा तो काळ लक्षात घेता, शहाजीने जिजाबाईकडे गाव सोपवलं नाही असे कशावरून म्हणता येईल ? माझ्या मते, शहाजीने स्वतःस मिळालेला मोकासा --- जो इतरांना पोटमोकासदार म्हणून शिवाजी - मंबाजीत जसा वाटला त्याचप्रमाणे जिजाबाईकडेही काही गावांचा अंमल असावा. यासंदर्भात शिवकालीन पत्रसार संग्रहातील पत्र क्र. ६१४ विशेष उपयुक्त आहे. हे पत्र खुर्दखत स्वरूपाचे असून ते जिजाबाईच्या कचेरीतून गेल्याचे त्यात स्पष्ट दिले आहे. यावरून जिजाबाईकडेही शहाजीने काही अधिकार निश्चितच सोपवल्याचे स्पष्ट होते. यासंदर्भात आणखी कागदोपत्री पुरावा उपलब्ध झाल्यास याकाळातील बऱ्याचशा गूढ गोष्टींवर प्रकाश पडेल.            

    मोकासदार म्हणून शिवाजीची मुद्रांकित पत्रं प्रथमतः उलपब्ध होतात ती स. १६४६ सालातली. त्यापूर्वीचा त्याचे नावे आढळणारा पत्रव्यवहार पत्रसारसंग्रह तसेच इतरत्र आहे परंतु अलीकडेच डॉ. नभा काकडे संपादित ' छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे ' मध्ये ज्या पत्रांचा समावेश केला गेला आहे --- जी निःसंशय शिवाजीची असल्याचे डॉ. काकडेंचे मत आहे --- त्यामुळे स. १६४६ सालापूर्वीची पत्रं, ज्यामध्ये शिवाजीच्या नावे आदेश वगैरे गेले आहेत, ती जमेस धरण्याची मला गरज वाटत नाही.

    शहाजीला पुण्याव्यतिरिक्त सुपे, इंदापूर, चाकण परगण्याचाही मोकासा प्राप्त झाला होता. पैकी, सुप्यावर त्याने संभाजी मोहिते या आपल्या द्वितीय पत्नीच्या भावास नियुक्त केले असून चाकण व इंदापूर बाबत खुलासा होत नाही. परंतु स. १६४६ च्या पत्रानुसार इंदापूर परगणा शिवाजीकडे सोपवाल्याचे स्पष्ट होते.

    पुणे, सुपे प्रांतांवर मुख्य मोकासदार तथा मालक म्हणून शहाजीचं उपलब्ध असलेलं शेवटचं पत्र स. १६५५ डिसेंबरचं आहे. त्यानंतरचा त्याचा पत्रव्यवहार निदान पत्रसारसंग्रहात तरी उपलब्ध नाही. हि नोंद तसेच जेधे शकावली - करिना, तसेच शिवभारत व काही अस्सल पत्रांच्या आधारे असं दिसून येतं कि, स. १६५५ पर्यंत शिवाजीच्या ज्या काही हालचाली वा कृत्यं इतिहासात नमूद आहेत, त्या सर्वांमागे शहाजीचा हात आहे. किंबहुना हेच विधान स्पष्टपणे असं करता येईल कि, स. १६३६ मध्ये शहाजीने निजामशाहीची शरणागती दिली असली तरी त्यानुभावाद्वारे त्याचे स्वतःच्या राज्यनिर्मिती / विस्ताराचे प्रयत्न आदिलशाही नोकरीत आल्यावरही चालू होते. त्यामुळेच विजापूर दरबाराची त्याच्यावर स. १६३६ ते ५० दरम्यान दोनदा नाराजी ओढवली. विशेषतः दुसऱ्या वेळी ओढवलेल्या गैरमर्जीमुळे त्यांस कैदही भोगावी लागली. परंतु त्यामुळे त्याच्या प्रयत्नांत खंड पडल्याचे दिसून येत नाही. उलट त्यानंतर त्याने आपल्या डावपेचांत बदल करून आपल्या मुलाचे विशेष कर्तुत्व लक्षात घेत स. १६५५ नंतर शिवाजीला स्वतंत्र हालचालीची मोकळीक दिली. अर्थात, याक्षणी स. १६५५ नंतर पुणे, सुपे आदि प्रांतातील अधिकाऱ्यांना शहाजीच्या नावे / हस्ते गेलेले हुकुम उपलब्ध नाहीत यावर आधारित हे विधान आहे, याची नोंद घ्यावी.

    स. १६५५ पर्यंत जी काही पुणे व आसपासच्या प्रांतात शिवाजीने खटपट केली त्यामागे शहाजीची योजना असल्याचे, विधान स्पष्ट करण्यासठी या काळात घडलेल्या काही घटनांकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. 

    पहिली घटना म्हणजे माहुलीवर निजामशाहीची शरणागती देताना घडलेला शहाजी - कान्होजी जेधे भेटीचा करीन्यातील वृत्तांत. त्यानुसार असे दिसून येते कि, शहाजी निजामशाहीसाठी लढत होता त्यावेळी कान्होजी जेधे विजापूरकरांना रुजू असून रणदुल्लाखानाच्या हाताखाली कार्यरत होता. विजापूरकरांशी तह करून शहाजी त्यांच्या नोकरीत आला त्यावेळी पुणे, सुपे प्रांतासोबत मावळ ( बारा मावळ ) भागही त्याच्या जहागिरीत होता व यातील एका भागात कान्होजी जेधेचे वतन आणि वर्चस्व असल्याने शहाजीने त्यांस आपल्या चाकरीत घेण्याची इच्छा दर्शवली. कान्होजी जेधेही शहाजीच्या इच्छेनुसार त्यांस रुजू झाला.

    दुसरी घटना आहे स. १६४४ ची. या वर्षातील दि. १ ऑगस्ट १६४४ च्या आदिलशाही फर्मानानुसार शहाजीला दरबारातून निर्वासित केले होते -- अर्थात चाकरीवरून दूर केले होते. तसेच त्याचा मुतालिक दादाजी कोंडदेव कोंडाण्याच्या बाजूस असून त्याचा पाडाव करण्यासाठी खंडोजी व बाजी घोरपड्याची नियुक्ती केल्याचा उल्लेख आहे. इतिहास संशोधकांच्या मते, हे फर्मान कान्होजी जेध्यास पाठवले असून त्याने घोरपाड्यांना सामील होऊन कोंडाण्याचा प्रांत ताब्यात घेण्याकरता मदत करावी अशी आदिलशाहीची अपेक्षा आहे. आज्ञा आहे.

    उपरोक्त घटनेस / फर्मानास दुजोरा देणारा भाग जेधे करीन्यात आहे. परंतु त्यातील तपशिलात गोंधळ असल्याचे दिसून येते. प्रथम आपण जेधे करीन्यातील नोंद पाहू.
" ... त्यावरी रणदुलाखान मृत्य पावले त्यास संतान नाही म्हणून त्यांची दौलत त्यांचा खीजमतगार अफजलखान कर्ता देखोन त्यास दिल्ही अणी चंदीस रवाना केले त्या बा| माहाराजास ही फौजेनसी रवाना केले बा| कान्होजी ना| ही जमेतीनसी गेले चंदीस वेढा घातला जर केली त्यास चंदीस राचेवार मऱ्हाटे होते त्यांचा व माहाराजाचा घरोबा आहे सामान पुरविताती यैसी बदगोई ( तक्रार ) अफजलखान याणी विजापुरास पातशाहास मुस्तुफाखाना लिहिली त्यावरून माहाराजास धरून विज्यापुरास बोलाऊन नेणे बा| कान्होजी नाईक होते पातशाहानी तहकिकात मनात आणीता तुफानी गोष्टी ( खोट्या गोष्टी ) यैसे जाले त्यावरी पातशाहानी माहाराजाचा सन्मान केला सदर बकसीस दिल्ही सीरपाव दिल्हे बेगरूळ प्रांत पांचा लक्षा होनाची जहागीर देऊन वेगली मसलती सांगितली बा| कान्होजी ना| ही जमावानसी होते .... " येथून पुढे शिवाजीच्या पुणे रवानगीचा वृतांत आहे. असो.

    करीन्यातील माहितीनुसार हि घटना रणदुल्लाखानाच्या मृत्यूनंतर घडली. रणदुल्लाचा मृत्यू स. १६४३ - ४४ चा आहे. तर पत्रसारसंग्रह व शिवचरित्र निबंधावलीनुसार स. १६४४ च्या फेब्रुवारीत शहाजी देशी, अर्थात महाराष्ट्रात आहे. म्हणजे आधीच्या परिच्छेदातील निर्देशित फर्मानाची तारीख गृहीत धरली तर स. १६४४ च्या पावसाळ्यात वा नंतर अथवा तत्पूर्वी शहाजी कर्नाटकात रवाना झाल्यावर त्याच्या कैदेचा --- करीन्यात दिल्याप्रमाणे --- प्रसंग घडून आला. परंतु यानंतर करीन्यात जो उल्लेख येतो, त्यामुळे करीन्यातील प्रसंगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. करीन्यानुसार शहाजीवरील आक्षेप खोटा ठरून आदिलशहाने दरबारात त्याचा सन्मान करत पाच लक्ष होनांची जहागीर बेंगरूळास दिली.

    परंतु शहाजीचे जुलै १६५६ चे पत्र वेगळीच हकीकत सांगते. त्यानुसार माहुलीवर त्याने निजामशाहीची शरणागती दिली त्यावेळीच आदिलशहाने त्यांस चार लक्षांची जहागीर दिली होती. फरक इतकाच आहे कि, शहाजीच्या पत्रात जहागीर दिल्याचा उल्लेख आहे, विशिष्ट भूप्रदेशाचा नाही. त्यामुळे करीन्यातील कथनावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न पडतो.

    तिसरी घटना दि.२५ जुलै १६४८ ची आहे. कर्नाटक प्रांतातील मोहिमेत मुस्तफाखानाने महंमद आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीला कैद केले. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या कान्होजी जेधे व दादाजी कृष्णलाही कैद भोगावी लागली. या घटनेस जेधे शकावली व करिना तसेच पत्रसार संग्रहातील काही पत्रं आणि शिवभारतात दुजोरा मिळतो.

    शहाजीच्या या कैदेची मीमांसा करताना वा कारण सांगताना शिवाजीच्या पुणे प्रांतांतील उद्योगांकडे निर्देश केला जातो. परंतु याच काळातील अब्दुला कुतुबशहाकडून महंमद आदिलशहाला गेलेलं पत्र शिवकालीन पत्रसारसंग्रहात प्रसिद्ध झालेलं आहे. त्यानुसार या सुमारास व तत्पूर्वीही शहाजी आदिलशाही सोडून कुतुबशाहीत जाण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. ग. ह. खरे, रियासतकार सरदेसाई वगैरे प्रभूतींच्या मते शहाजीची ही धडपडच विजापूरची त्याच्यावर गैरमर्जी होण्यास कारणीभूत ठरली. याखेरीज विजापूरतर्फे कर्नाटक प्रांतातील पाळेगारांना रगडताना शहाजी अंतस्थरित्या त्यांचा बचाव करत असल्याचीही चर्चा त्यावेळी होती. तेव्हा हि दोन कारणं प्रामुख्याने शहाजीच्या अटकेसाठी कारणीभूत ठरल्याचं दिसून येतं.

    शहाजी कैद होताच त्याला जहागिरीदाखल दिलेला प्रदेश जप्त करण्यासाठी आदिलशाहाने बंगळूर व पुण्याकडे फौजा रवाना केल्या परंतु त्यांचा अनुक्रमे संभाजी व शिवाजीने खरपूस समाचार घेतल्याने आदिलशहा थोडा नरमला. या काळात शिवाजीनेआप्ल्या बापाच्या सुटकेसाठी मोगल दरबारीही प्रयत्न करून पाहिले. त्यानुसार उभयपक्षी काही पत्रव्यवहारही झाला. परंतु मोगलांच्या मार्फत विजापूरवर दबाव आणून शिवाजीने शहाजीची सुटका केली असं म्हणता येत नाही. कारण शहाजीच्या सुटकेसाठी संभाजीला बंगळूर, कंदर्पी तसेच शिवाजीला सिंहगडासारखे मजबूत स्थळ आदिलशहास द्यावे लागल्याचे इतिहासात नमूद आहे.

    याबाबतीत तुलनात्मक अवलोकनार्थ एक प्रसंग नमूद करतो. स. १६४२ - ४३ मध्ये काही कारणांनी आदिलशहाने मुस्ताफाखानास कैद केले होते. त्यावेळी शहाजहानने दिल्ली दरबारातील विजापुरी वकिलास कैद करत आदिलशहास मुस्तफाची सुटका करण्याचे आदेश दिले. आदिलशहाने शाही हुकमाची बिनतक्रार अंमलबजावणी केली. हे लक्षात घेता शहाजीच्या सुटकेमागे मोगलांचा हात असावा हे संभवत नाही. उलट आदिलशहाने कर्नाटकातील बंगळूर व कंदर्पी ताब्यात घेऊन तिकडील शहाजीच्या मनसुब्यांना सुरुंग लावत इकडे सिंहगडाचाही ताबा परत मिळवला. हि स्थळे आदिलशहाच्या ताब्यात कधी गेली याचे कालनिर्देश मिळत नाहीत. असो.

    दि. १६ मे १६४९ रोजी आदिलशहाने शहाजीची सुटका करत शाही कृपा दर्शवण्यासाठी बंगळूर प्रांताची जहागीर काही स्थळे वजा करून त्याच्या ताब्यात दिल्याचे जेधे शकावली - करीन्यावरून दिसून येते. यावेळी बहुतेक त्याला ' महाराज ' हि पदवी देण्यात आली असावी असा माझा तर्क आहे. कारण या घटनेपूर्वी कोणत्याही सरकारी पत्रात शहाजीच्या नावाआधी महाराज पदवी लावल्याचे दिसून येत नाही.

    विजापूरच्या कैदेतून शहाजीची जरी सुटका झाली असली तरी त्याच्याविषयी आदिलशहाचे मन पूर्णतः साफ झाल्याचे दिसून येत नाही. याचं प्रत्यंतर तत्कालीन पत्रव्यवहारावरून येते. स. १६४९ ते ५४ दरम्यानचा शहाजीचा जो काही पत्रव्यवहार पत्रसारसंग्रहात प्रकाशित झालाय त्यातील पत्रांवर प्रथम शाह अजम हैदरशाहा व नंतर जैनाखान पीरजादेची ' परवानगी ' दिसून येते. याचाच अर्थ असा कि, सुटका होऊनही शहाजी एकप्रकारे विजापूरकरांच्या नजरकैदेत होता. आणि विशेष म्हणजे याच काळात शिवाजीही पुणे प्रांतात स्वस्थ बसून राहिला होता. अर्थात, राजकीय आघाडीवर या काळात कसलीही हालचाल करणे शक्य नसले तरी हाच काळ अंतर्गत सुव्यव्स्थेकरता कारणी लावून शिवाजीने आपल्या उद्योगाचा, पर्यायाने राज्याचा पाया मजबूत केला.

    विजापूरकरांच्या मेहेरबानीने भोगाव्या लागलेल्या प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कैदेमुळे शहाजीने आपले पूर्वीचे धोरण बदलले. प्रसंग पडला असता व्यक्तीच्या अंगभूत गुणांची पारख होते असं म्हणतात. तशी यावेळी शिवाजीची होऊन योग्य वेळ येताच शहाजीने त्यांस पुर्नाठा मोकळीक दिल्याचे दिसून येते. अर्थात यानंतर जरी शिवाजीने स्वबळावर राजकारणं केली असली तरी बापाचा सल्ला न घेता त्याने महत्त्वाचे निर्णय घेतले असतील हे संभवत नाही दुर्दैवाने शहाजी - शिवाजी मधील पत्रव्यवहार कित्येक कारणांनी आज उपलब्ध नसल्याने याविषयी अधिक काही लिहिणे शक्य नाही. असो.

    स. १६४९ मध्ये शहाजीची त्याच्या सहाय्यकांसh सुटका झाली त्यावेळी त्याने मुद्दामहून भेट घेत व शपथक्रिया करत कान्होजी जेधे व दादाजी कृष्ण लोहकरे यांस शिवाजीच्या मदतीकरता देशी रवाना केले. यासंर्भात जेधे शकावलीतला पुढील उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे. " शके १५७१ विरोधी संवछर जेष्ट श्रुध पुर्णिमा शाहाजी राजे कोढाणास देऊन सोडिले ते समई कान्होजी नाईक जेधे व दादाजी कृष्ण लोहकरे यांस सोडिले माहाराजांची व त्यांची भेटी जाली ते समई माहाराज बोलिले की तुम्ही आम्हा मुले बंदखानी श्रमी जालेस यां उपरी आम्ही पातशाहीसी तह केला की बारा गांवातून मजुरा करून हुकुम प्रमाणे कर्नाटक प्रांते मसलत करावी त्यावरून बेगरूल प्रांत पांचालक्षा होनाचा जाहागीर दिल्हा आहे यां करिता आपणास कर्नाटकाची मसलत करावी लागली तुमचे वतन मावळात अहे चिरंजीव राजश्री सिऊबा खेड बारी यांत व पुणा अहेत त्याजवल तुम्ही जमावानसी राहावे तुमची जबरदस्ती त्यां प्रांते आहे अवघे मावळचे देशमूख देखील त्यासी रुजू होऊन त्यांचे आज्ञेत वर्तेत येसा विचार करून जबरदस्तीने राहावे येखादी मोगलाईकडील फौज व ईदलशाहीकडील फौज आली तरी आपण ईमान राखा व त्यांसी लढाई करावी यैसी शफत ईमान पुरस्कर बेलरोटीवर हात ठेऊन घेतली तैसीच त्याणी ही कान्होजी नाईकांस शेफत दिल्ही अणी कान्होजी नाईक यांस व दादाजी कृष्ण यांस वस्त्र देऊन बराबर हुजऱ्या व पत्रे देऊन राजश्री सिवाजीराजे याजकडे पाठविले. "
शकावलीतला हा मजकूर नुसता वरवर जरी वाचला तरी लक्षात येते की, नजीकच्या काळात शिवाजीचा मोगल वा आदिलशाहीशी झगडा जुंपणं अपरिहार्य आहे. शहाजीच्या या विधानांना तत्कालीन वस्तुस्थितीचा चांगलाच आधार असून भविष्यात शिवाजीवर येणारं संकट हे शिवाजीच्या नव्हे तर शहाजीच्या कृत्यांमुळे ओढवणार होतं. किंबहुना याच काळातील विजापूर दरबारच्या हालचाली पाहिल्या तर याचा सहज अंदाज बांधता येतो. याकरता आपणांस तत्कालीन घटनांची थोडक्यात माहिती घेणे अत्यावश्यक आहे.
           
    जावळी प्रांतात मोरे घराण्याची सत्ता असून त्यांनी आदिलशाहीचे मांडलिकत्व स्वीकारले होते. या घराण्याच्या प्रमुखास ' चंद्रराव ' किताब असून स. १६४८ मध्ये ' चंद्रराव ' दौलतराव मोरे मरण पावला. तो निपुत्रिक असल्याने मुख्यपद मिळवण्याकरता त्याच्या भावबंदांत चुरस निर्माण झाली परंतु दौलतरावाच्या पत्नीने शिवथरकर मोऱ्यांपैकी एक मुलगा दत्तक घेऊन त्यांस यशवंतराव नाव दिले व त्याच्या मार्फत सत्ता आपल्याच घराण्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. तिच्या या कृत्यास मुख्यतः शिवाजीचा पाठिंबा असल्याचा उल्लेख इतिहासकार करतात.

    स. १६४९ मध्ये अफझलखानाची वाई परगण्याचा मोकासदार म्हणून नियुक्ती झाली. याबद्दलचे उपलब्ध पहिले पत्र, पत्रसार संग्रहात आहे. ( पत्र क्र. ५५३ )

    भौगोलिकदृष्ट्या जावळीचा भाग वाई व शिवाजीच्या पुणे जहागिरीदरम्यानच्या प्रदेशात येतो. जावळीचा ' चंद्रराव  दौलतराव मरण पावल्यावर पश्चात त्याच्या पत्नीने दत्तक पुत्र घेऊन त्याची जहागिरीवर स्थापना केली. परंतु हि गोष्ट मुख्य सत्तेच्या संमतीविना --- विजापूरच्या परवानगी शिवाय --- घडल्याचे पत्रसारसंग्रहातील क्र. ५५७ च्या पत्रावरून लक्षात येते. हे तलबपत्र अफझलने कान्होजी जेध्यास पाठवले असून त्यात " चंद्रराऊ कदीम मयत जालियावरि गैर लोकी पैस करून बलकाविले आहे. याबद्दल त्यावरी नामजादी केली आहे " असा मजकूर आहे. या व इतर आणखी पत्रांवरून असे लक्षात येते कि, दौलतराव मोऱ्याच्या मृत्यूनंतर दरबारास न विचारता यशवंतरावाची गादीवर स्थापना केल्याबद्दल जावळीचा शक्य तितका भाग वा साधल्यास संपूर्ण जावळीच ताब्यात घेण्याचा अफझलचा विचार होता. याकरता त्याने मोऱ्यांच्या ताब्यातील जोहर खोरे कान्होजी जेध्यास मोकासा म्हणून देत त्यावर ताबा बसवण्याचा आदेश दिला. परंतु यानंतर हि स्वारी बहुतेक बारगळ्याचे दिसून येते.

    मात्र या व पुढील काही वर्षांत शहाजीच्या कैद प्रसंगामुळे शिवाजीला या राजकारणात कसल्याही प्रकारे थेट सहभाग घेता आला नाही. दरम्यानच्या काळात शिवाजीच्या पाठिंब्यावर गादीवर आलेला यशवंतराव शिवाजीस जुमानेसा झाला. प्रसंगी शिवाजीच्या प्रदेशातही घुसखोरी करण्यास त्याने मागे - पुढे पाहिले नाही. तेव्हा स. १६५६ च्या जानेवारीत शिवाजीने जावळीवर हल्ला करून मोऱ्यांना उखडून काढले व त्या वर्षाअखेरपर्यंत त्याने तो भाग आपल्या ताब्यात घेतला.

     हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता काही गोष्टींची स्पष्टता होते :- (१) कर्नाटक प्रांती गेलेला शहाजी तिथे आदिलशाहीचा राज्यविस्तार करत स्वतःचेही हितसंबंध प्रस्थापित करत होता. (२) त्याचवेळी इकडे शिवाजीच्या मार्फत आपल्या सत्तेची वाढ करत होता. जावळी प्रकरणी केलेला हस्तक्षेप याचेच एक उदाहरण आहे. इतिहासकार जरी यास शिवाजीचे कृत्य मानत असले तरी त्याकरता सबळ पुरावा नाही. उलट शहाजी हा आदिलशाहीतला महत्त्वाचा सरदार व एकेकाळच्या निजामशाहीचा सूत्रधार असल्याने जावळीकरांनी शिवाजीमार्फत वा थेट त्याच्याशीच संधान बांधल्याचा अंदाज करता येतो. अर्थात इतिहासकारांचे प्रचलित मत व माझे अनुमान केवळ तर्कावर आधारित असले तरी माझ्या अनुमानास बळकटी येण्याचे मुख्य कारण माझ्या मते, शहाजी व शिवाजीच्या तत्कालीन स्थितीत आहे.

    जावळी प्रकरणी शिवाजीने हस्तक्षेप केला असे म्हणताना तत्पूर्वी त्याने अशी कोणती कर्तबगारी, पराक्रम दाखवला होता ज्याआधारे जावळीकरांनी त्याचा आश्रय घ्यावा, हा प्रश्न उद्भवणे स्वाभाविक आहे. त्याउलट शहाजीच्या पराक्रमाची पार्श्वभूमी सर्वज्ञात आहेच. शिवाय त्याचा पुण्याकडील प्रांत जावळीकरांना लागून असल्याने व स्वतः शहाजी विजापूरचा जबाबदार अधिकारी --- मोकासदार असल्याने दरबारात आणि व्यवहारात शहाजीला जेवढ स्थान, मान, अधिकार असणं स्वाभाविक होतं तितकं शिवाजीला नाही. या गोष्टी लक्षात घेता जावळी प्रकरणातला शिवाजीचा हस्तक्षेप शहाजीच्या आज्ञेनेच झाल्याचे दिसून येते.

    शहाजीच्या या कारवाया कितीही अंतस्थरीत्या सुरु असल्या तरी विजापूरचे राज्यकर्ते त्या न समजण्याइतपत दुधखुळे नव्हते. त्यांनी यावर तोडगा म्हणून प्रथम शहाजीच्या अटकेचा पर्याय चोखळला. त्यानंतर त्याची पुणे - कर्नाटक स्थित जहागीर ताब्यात घेण्याचा यत्न केला. पैकी, पहिला उपाय यशस्वी तर दुसरा अयशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी शहाजीला ओलीस धरत पुणे - कर्नाटकातील मजबूत स्थळे त्याच्या मुलांकडून घेत शहाजीची सशर्त सुटका केली. परंतु यावरच न थांबता कैदमुक्त शहाजीवर लक्ष ठेवण्यास शाह अजम हैदरशाहा व जैनाखान पीरजादेला नेमत जावळीच्या व पर्यायाने शिवाजीच्या उरावर अफझलखानास बसवले.

    कैदमुक्त झाल्यावर शहाजी - कान्होजी शपथक्रियेचा वृतांत अफझल वा विजापूरकरांना माहिती होता, नव्हता हे स्पष्ट करता येत नसले तरी वाईच्या परगण्याचा मोकासदार म्हणून अफझलची नियुक्ती होताच जोहर खोऱ्याची मोकासादारी देण्याचे आमिष दाखवत अफझलने प्रस्तावित जावळी स्वारीकरता कान्होजी जेध्यास चाकरीकरता येण्याची आज्ञा केली. कान्होजीचा वतनी मुलूख शिवाजी व जावळीकर मोऱ्यांच्या दरम्यान होता. कान्होजीला मोकासदार केल्यास या दोघांना नवीन प्रतिस्पर्धी उद्भवण्याचे भय घालता येत होते. कान्होजीची शहाजी निष्ठा दुभंग करता येत होती. अखेर कोणत्या वतनदाराला आपल्या सत्तेची वाढ नको असते ? तात्पर्य, कान्होजी प्रभूती वतनदारांना आपल्या पक्षात मिळवून घेत पुणे प्रांती जो उद्योग शहाजीने आरंभला होता त्याला खीळ घालण्याचे, शह देण्याचे अफझलचे धोरण यातून स्पष्टपणे दिसून येते.           

    यावरून शहाजी - विजापूरकरांतील सुप्त व प्रकट संघर्षाची कल्पना येते. म्हणजेच स. १६३६ मध्ये शहाजीने निजामशाहीची शरणागती दिली असली तरी आपल्या महत्त्वाकांक्षेला आवर घातला नव्हता. कैदमुक्त झाल्यावरही त्याने आपले प्रयत्न थांबवल्याचे दिसून येत नाही. कान्होजी जेधेला शिवाजीच्या मदतीकरता पाठवण्याचा हेतू जवळपास अफझल प्रमाणेच होता, याविषयी दुमत होऊ नये. त्याच्या दुर्दैवाने काही वर्षांपुरती का होईना जावळी व इतर प्रांतांतील हालचालींवर हैदरशाहा व जैनाखान --- पर्यायाने विजापूरकरांमुळे बंधनं आली परंतु हि बंधनं दूर होताच त्याने आपल्या धोरणात बदल करत एका स्थळाहून दोन्हीकडचं राजकारण चालवण्याऐवजी कर्नाटक प्रांत आपल्या हाती घेत पुण्याची जबाबदारी शिवाजीवर सोपवली. यामागे एक कारण संभवते व ते म्हणजे शहाजीच्या मोठ्या मुलाचा --- संभाजीचा कनकगिरी प्रसंगातला अपघाती मृत्यू. अर्थात, याविषयीही इतिहासकारांत मतभेद असून संभाजी स. १६५४ मध्ये मरण पावला तसेच स. १६६३ मध्ये मृत झाला असे दोन मतप्रवाह आढळतात. तूर्तास तरी आपणांस त्या वादात शिरण्याचे प्रयोजन नसल्याने त्याची चर्चा येथे करत नाही.
 
                                                                                                  ( क्रमशः )


ता. क. :- प्रस्तुत लेख पूर्ण होत असताना जदुनाथ सरकार कृत ' औरंगजेबाचा इतिहास ' ( मराठी अनुवाद ) मधील पृ. क्र. ४२३ वरील नोंदीनुसार चांभारगोंदा, अष्टी हे परगणे मोगल साम्राज्यात मोडत असल्याचे दिसून येते. (स. १६५७ )
चांभारगोंद्याचे पाटीलकी वतन बाबाजी भोसले --- शहाजीच्या आजोबाकडे असून इथेच मालोजीने मकरंदपुरा वसवत स. १५९७ पासून वास्तव्य केल्याचा उल्लेख ' शककर्ते शिवराय ' मध्ये विजय देशमुख करतात. तसेच डॉ. ब. प्र. सक्सेना लिखित ' दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास ' नुसार चांभारगोंदा, अष्टी हे महाल निजामशाहीची उभारणी केली तेव्हा शहाजीच्या ताब्यात होते.
यावरून स. १६३६ मध्ये झालेल्या मोगल - आदिल तसेच शहाजी - आदिल तहांत उपरोक्त वतन, महालाविषयी काय तरतूद करण्यात आली असावी अशी शंका मनात उद्भवते. सध्या तरी या प्रश्नाचा उलगडा करण्यास माझ्याकडे वेळ न् साधने नसल्याने हि माहिती इथे नोंदवत याविषयी अधिक माहिती संपादण्याची जबाबदारी मी अभ्यासू वाचकांवर सोपवत आहे.   
 

1 टिप्पणी:

Dr.Dhanaji konde म्हणाले...

संजयजी अतिशय अभ्यासपूर्ण लेख,इतिहासामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी शंकास्पद प्रकरणे आहेत त्याचा निष्पक्ष सखोल अभ्यास करून तो सत्य इतिहास जगासमोर आणायला हवा.