सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

डिसेंबर १६६७ मध्ये शिवाजी व पोर्तुगीजांमध्ये झालेला तहनामा




    ' महान शिवाजी राजे व कौंट व्हिसेरेइ यांच्यामध्ये झालेल्या मैत्रीच्या कराराचा मसुदा '

    ' महान कौंट व्हिसेरेइ यानी जो करारनामा पाठविला त्याचा आशय असा :

    ' आमच्या राज्याच्या आश्रयास आलेल्या देसायांचा पाठलाग करीत शिवाजी राजे आपल्या सैन्यासह आमच्या राज्यात घुसल्याचे पाहून आम्हाला फार वाईट वाटले. त्याचे परिमार्जन करण्यासाठी शिवाजी राजे यानी आम्हाला वारंवार पत्रे पाथ्व्वून दिलगिरी प्रदर्शित केली व ह्या राज्याशी असलेली त्यांची मैत्री टिकविण्याची व ती पुढे चालू ठेवण्याची इच्छा दर्शविली. त्याच्या विनंतीस अनुसरून आम्ही पुढील अटी सुचविल्या :

    १. शिवाजी राजे यांच्या सैन्याने बार्देशमध्ये दि. १९ नवंबर १६६७ रोजी जी बायका मुले कैद करून नेली त्याना त्यानी खंडणी न घेता अथवा त्याना ओलीस न ठेवता सोडून द्यावे त्याचप्रमाणे आमच्या स्वामीच्या प्रजाजनांची गुरेढोरे आणि गोणीचे बैल पळविण्यात आले, तेही परत करावेत. कारण महान व्हिसेरेइ यानी ज्या अर्थी सौम्यपणे लिहिले त्याअर्थी आणि त्यानी लिहिल्याप्रमाणे जी माणसे इकडे कैद करून ठेवण्यात आली होती, त्याना एक छदामही न घेता मुक्त करून, पाद्रि गोंसालु मार्तीश यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    २. लखम सावंत आणि केशव नाईक हे जे देसाई आमच्या राज्याच्या आश्रयास येऊन राहिले आहेत. त्याना ताकीद करण्यात येत आहे की, त्यांचे वास्तव्य आमच्या राज्यात असेस्तोवर तो त्यांनी शिवाजी राजे यांच्याशी अथवा त्यांच्या प्रजाजनाशी युद्ध करू नये वा त्यांची कुरापत काढू नये. त्यानी जर तसे केले, आणि ते जर मला कळले, अथवा शिवाजी राजे यानी माझ्या निदर्शनास आणले, तर त्याना आमच्या स्वामीच्या राज्यात फिरून प्रवेश मिळणार नाही. आमच्या राज्यात असलेले नारबा सावंत आणि मल्लू शेणवी या दोघाना देखील असाच इशारा देण्यात येत आहे. जे देसाई आमच्या राज्यात येऊन राहिले आहेत, त्यानी बंडाळीस प्रवृत्त होऊ नये म्हणून त्याना गोवा शहरातच वास्तव्य करण्याची सक्ती केली जाईल. त्यानी साष्टीत अथवा बार्देशमध्ये काही गडबड न करता राहिले पाहिजे. त्यानी दंगेधोपे माजविले अथवा या राज्यातील प्रजाजनाची कुरापत काढली, तर त्याना या बेटातून हद्दपार करण्यात येईल.

    ३. बालाघाटातून जो व्यापारी माल आणि गोणीचे बैल या बेटात तसेच साष्टी आणि बार्देश प्रांतात येतील त्याना प्रतिबंध केला जाऊ नये, अथवा माल अडवून ठेवण्यात येऊ नये. तसेच या बेटांतून अथवा आमच्या स्वामीच्या इतर प्रदेशातून जे गोणीचे बैल बालाघाटी माल आणण्यासाठी जातील त्याना अडथळा केला जाऊ नये. शिवाजी राजे आणि आदिलशहा यांच्यामध्ये युद्ध जुंपले, तरी देखील हा व्यापार चालू राहावा.

    ४. उभय पक्षांची जमिनीवर आणि समुद्रावरही मैत्री असावी. जर या मैत्रीत व्यत्यय येण्यासारखा एकादे कृत्य घडले तर शिवाजी राजे यानी कौंट व्हिसेरेइ यांच्याकडे व कौंट व्हिसेरेइ यानी शिवाजी राजे यांच्याकडे त्याचा खुलासा मागवा. हा खुलासा मिळाल्याखेरीज मैत्री भंग पावू नये.

    उपरिनिर्दिष्ट अट मान्य करण्यात येत आहे.

    ५. शिवाजी राजे याना कौंट व्हिसेरेइ यांच्याशी एकाद्या कामाविषयी वाटाघाटी करायच्या असतील, तर एकाद्या विश्वासू मनुष्यामार्फत त्या करता येतील. तीच गोष्ट हत्यारांच्या उपयोगाचीही आहे.

    गोवा ५ डिसेंबर १६६७
कौंट व्हिसेरेइ यानी लिहिल्याप्रमाणे व उल्लेखिल्याप्रमाणे मी हे मान्य करीत आहे.

    २५ जमादिलाकर, १०६८ पोर्तुगीज ११ डिसेंबर १६६७
शिवाजी राजे यांचा शिक्का.


संदर्भ ग्रंथ :-
१) पोर्तुगीज - मराठा संबंध :- स. शं. देसाई           

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

शिवराज्याभिषेकवेळी ९६ कुळी मराठी लोकांची लिस्ट बनवली होती. ती लिस्ट तुम्ही देऊ शकाल का? जर तुमच्याकडे नसेल तर कुठे मिळेल याची माहिती मिळेल का? मी माझ्या घराण्याचा इतिहास शोधात आहे त्यासाठी मला उपयोग होईल.

अनामित म्हणाले...

Sanjay sir shivaji hya lekhmalechya pudchya bhaganchi aaturtene waat baghat aahot...lavkarat lavkar he likhan purn karave hi vinanti