शुक्रवार, २९ जून, २०१२

भीमा - कोरेगावची अनिर्णीत लढाई ( १ जानेवारी १८१८ )

दिनांक 1 जानेवारी 1818 रोजी पुण्याजवळ भीमा नदीच्या काठी कोरेगाव येथे दुसरा बाजीराव पेशवा याच्या नेतृत्वाखालील मराठी फौजेची आणि ब्रिटीश सैन्याची लढाई घडून आली. या लढाईविषयी उपलब्ध मराठी संदर्भ ग्रंथांमधून जी काही माहिती मला मिळाली, त्या माहितीच्या आधारे या लढाईचे विश्लेषण करण्याचा या ठिकाणी एक प्रयत्न करण्यात आला आहे.
          पार्श्वभूमी :- दुसरा बाजीराव पेशवा याने स. 1817 च्या उत्तरार्धात इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले. यावेळी खडकी आणि येरवडा येथे ब्रिटीश आणि मराठी फौजांचा सामना घडून आला व पेशवा पुणे सोडून गेला. बाजीरावाने पुणे सोडल्यामुळे इंग्रजांनी पुणे शहर आपल्या ताब्यात घेतले व शनिवारवाड्यावर आपले निशाण फडकावले. इंग्रजी फौजांशी निर्णायक झुंज न घेता बाजीराव आपल्या सैन्यासह पुण्याच्या सभोवती घिरट्या घालत असताना भीमा नदी जवळ कोरेगाव येथे त्याची व इंग्रजी फौजांची एक लढाई घडून आली. इतिहास ती कोरेगावची किंवा भीमा - कोरेगावची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे.   
  1)  ' ... ..... ... बाजीराव नासिककडे न जातां ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून ता. 30 डिसेंबर रोजीं चाकण येथें येऊन पोंचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. त्याचे पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गांठावें किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावें असा बाजीरावाचा बेत असल्याचें स्मिथ यास दिसून आलें, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. .... ..... ....... क. बर पुण्याचे बंदोबस्तास होता. त्यानें आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, त्यावरून कॅ.  Staunton थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन ता. 31 डिसेंबर 1817 रोजीं रात्रीं 8 वाजतां शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशीं सकाळी 10 वाजतां कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठीं दिसली. Staunton ची बातमी बापू गोखल्यास होतीच. 
       घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गांठ पडली.  बापू गोखल्यास श्रीमंतांनीं आज्ञा केली, कीं आज लढाई करून आम्हास पुढें जाण्यास मार्ग करून द्यावा. गांवास लहानशी तटबंदी होती तींत इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यांजवर दुसऱ्या बाजूनें मराठ्यांनी तोफांचा मारा सुरु केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील आरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. इंग्रज शिकस्त झाले. त्यांचे पुष्कळसे ऑफिसर्स व लोक मारले गेले. रात्री 9 वाजेपर्यंत लढाई चालून पेशव्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. इंग्रजांचे 175 जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे 500 लोक पडले. थोडक्या लोकांनी पुष्कळांशी लढून आपला निभाव केल्याबद्दल कोरेगांव येथें इंग्रजांनी स्मारकाचा स्तंभ उभारला आहे. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून ज. स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटांत त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की ता. 2 जानेवारी रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोंचला. त्याच दिवशी कॅ. Staunton जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला.' ( संदर्भ ग्रंथ - मराठी रियासत खंड 8 )
     
      2)  '.... ..... ..... दुसरे दिवशी पेशव्यांनीं तेथोन कुच करून मुळा नदीस मुकामास आले. आणि पुढें न जातां  परत ब्राम्हणवाड्यास आले. आणि जुनरास जाऊन फुलगावावर मुकाम झाला. तेथोन कुच करून पुन्हा सालप्याच्या घाटानें करनाटकांत जाण्याचा विचार ठरविला. कुच करून राजवाडीस मुकामास जावें असा विचार होता, तों प्रथम प्रहर दिवसाचे आंत नगराहून पुण्यास जाण्याकरितां इंग्रजाची फौज एक पलटण व दोनशें स्वार व दोन तोफा घेऊन कोरेगावास मुकामास आले. तेथून फुलगावीं एक कोसावरच पेशव्याचा मुकाम आहे हें त्यांस माहित नव्हते. व पेशव्यांकडील फौजेनें इंग्रजांकडील फौज कोरेगावावर आलेली पाहून त्यांजवर धावा केला. इतक्यांत त्या पलटणींतील साहेबांनी जलदी करून कोरेगावांतील दोनतीन वाड्यांत शिरून तोफ चालू करून पलटणी लोक फेरा मारू लागले. तेणेंकरून पेशवे याजकडील लोक अजमासे दीडशे व इंग्रजाकडीलही सुमारे चारशांवर मेले व जखमी झाले असतील. याप्रसंगी बापूसाहेबानीं बहूत शूरत्व केले. इंग्रजी फौज ही धैर्य धरून अस्तमानपर्यंत लढत होती, रात्र झाल्यावर पेशवे यांजकडील फौजेनें इंग्रजी फौजेला सोडून राजेवाडीस मुकामास गेले. ' ( संदर्भ ग्रंथ :- सरदार बापू गोखलेच्या विषयी लिहिलेल्या दोन बखरींच्यापैकी  विठ्ठल पुणेकर लिखित बखरीमधील हा उतारा आहे. सदर बखरीतील उतारे श्री. सदाशिव आठवले यांच्या ' सरदार बापू गोखले ' या ग्रंथात छापले आहेत. विठ्ठल पुणेकर यांनी बापू गोखले विषयीची बखर कधी लिहिली याविषयी माहिती मिळत नाही. त्यामुळे या बखरीत कोरेगाव येथील लढाईच्या संदर्भात जी काही माहिती आलेली आहे त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे एक कोडंच आहे. परंतु, कोणत्याही बखरीतील सर्वच माहिती सर्वस्वी टाकाऊ नसते हे इतिहासप्रेमी वाचकांना आणि अभ्यासकांना माहिती आहेच. त्यामुळेच या बखरीतील उपरोक्त उतारा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला आहे. )


  3)   '..... ...... ........ ब्राम्हणवाड्याहून पेशवा पुन्हा पुण्याच्याच रोखाने निघाला तो ता. 30 डिसेंबर 1817 रोजी चाकण येथे आला. मात्र  तेथून बापूच्या सूचनेमुळे असो किंवा स्वतःच्याच लहरीप्रमाणे असो पुण्याकडे न जाता जवळपासच पण दुसऱ्याच कोणत्यातरी स्थळाकडे चालू लागला. बाजीराव पुण्यास जाणार, त्याचेबरोबर चांगला फौजफाटा असणार, तिथे कदाचित त्याला आणखी लोक सामील होणार आणि आपला पुण्यावरचा ताबा सुटणार अशी भीती वाटून इंग्रजांची एक फौज शिरूरहून कॅ. Staunton ह्याचे नेतृत्वाखाली पुण्याकडे निघाली. पुण्यास कर्नल बर होता, पण त्याच्याकडे सैन्यही फारसे नव्हते आणि युद्धसामग्रीही बेताचीच होती. कॅप्टन Staunton ची फौज ता. 1-1-1818 रोजी कोरेगावास पोचली तेव्हा पेशव्यांच्या फौजेचा तळ तेथे आधीच पडलेला होता. तिचे आधिपत्य अर्थात बापूकडेच होते. बापूने पेशव्यास साताऱ्याकडच्या मार्गाला लावले आणि स्वतः कोरगावी इंग्रजांविरुद्ध मोर्चेबांधणी सुरु केली. बापूने प्रथम तोफांचा मारा करण्याचे योजिले, परंतु इंग्रजांनी आडोशाच्या सुरक्षित जागा शोधल्यामुळे ते गोळ्यांच्या टप्प्यात येत नाहीत हे लक्षात येताच त्याला युद्धतंत्र बदलावे लागले. बंदुका आणि तलवारी हाती घेऊन मराठे पुढे धावले. इंग्रजांनी चांगला प्रतिकार केला ह्यात शंका नाही. तथापि ह्या ठिकाणी इंग्रजांना काय किंवा मराठ्यांना काय मोठे निकाली युद्ध कोणालाच करायचे नव्हते. इंग्रजांना हे मार्गातील संकट पार करून पुढे पुण्याकडे जावयाचे होते, तर बापूला त्यांना अडवून धरून पेशव्यास दूर जाण्यास अवसर द्यावयाचा होता. दोघांचेही हेतू सिद्धीस गेले. ता. 4 जानेवारी 1818 च्या एका बातमीपत्राप्रमाणे त्या तारखेपर्यंत बाजीराव फुलगावला मुक्कामाला आलेला होता.' ( संदर्भ ग्रंथ :- सरदार बापू गोखले - लेखक :- सदाशिव आठवले )
     विश्लेषण :-  कोरेगावच्या लढाई विषयी मराठी रियासत आणि सदाशिव आठवले यांचे सरदार बापू गोखले हे पुस्तक फारसे विश्वसनीय असल्याचे दिसून येत नाही. तुलनेने विठ्ठल पुणेकर लिखित बापू गोखल्यांची बखर या ठिकाणी अधिक विश्वसनीय अशी वाटते. याचे कारण म्हणजे, बखर लेखकास कोणत्याही पक्षाचे गुणगान करण्यापेक्षा आपल्याला जी माहिती ज्ञात आहे ती लिहून काढणे गरजेचे वाटत होते. त्याउलट सरदेसाई आणि सदाशिव आठवले यांचे लेखन गोंधळात टाकण्यासारखे असल्याचे दिसून येते. कोरेगाव येथील लढाईमध्ये मराठी फौजेचा विजय झाल्याचे सरदेसाई अप्रत्यक्षपणे नमूद करतात परंतु त्यासोबतच इंग्रजांनी मोठ्या शर्थीने आपला बचाव केल्याचे आणि लढाईमधून बाजीराव पेशवा पळून गेल्याचेही त्यांनी नमूद करून वाचकांचा गोंधळ मात्र उडवून दिला आहे.
        सदाशिव आठवले यांनी दिलेली  माहिती देखील जवळपास अशीच आहे.  त्यांच्या मते हि लढाई एकप्रकारे अनिर्णीत अशी  होती. इथपर्यंत ठीक आहे परंतु, 4 जानेवारीच्या बातमीपत्राचा हवाला देत ते लिहितात कि त्या तारखेपर्यंत बाजीरावाचा मुक्काम फुलगावी होता हे काही पटत नाही. याचे कारण म्हणजे फुलगाव हे स्थळ चाकण आणि भीमा - कोरेगाव यांच्या दरम्यान असून या ठिकाणाहून भीमा कोरेगाव अगदीच जवळ म्हणजे 8 - 10 किलोमीटर्सपेक्षाही कमी अंतरावर आहे. बाजीराव पेशव्याच्या पाठीवर जनरल स्मिथची फौज असल्याचे खुद्द आठवले यांनीच लिहिले आहे आणि असे असूनही कोरेगावची लढाई झाल्यावर बाजीरावाचा मुक्काम 4 जानेवारी रोजी फुलगावी होता असे ते लिहितात याला काय म्हणावे ? याउलट विठ्ठल पुणेकर लिखित बखरीमधील माहिती विश्वसनीय वाटते कि लढाई झाल्यावर मराठी फौजा राजेवाडीस निघून गेल्या. राजेवाडी हे स्थळ जेजुरीच्या जवळपास असून भीमा - कोरेगावच्या युद्धक्षेत्रापासून सुमारे 30 - 40 किमी. अंतरावर आहे.
                   भीमा - कोरेगाव येथे पेशव्याची आणि ब्रिटीश फौजेची लढाई घडण्यापूर्वीच्या घटनांचा परत एकदा थोडक्यात आढावा घेणे गरजेचे आहे. खडकी आणि येरवडा येथील लढाया झाल्यानंतर बाजीराव पुणे शहर सोडून निघून गेला. त्याच्या पाठीवर जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश फौजेची एक तुकडी होतीच. स्मिथच्या फौजेला पाठीवर घेऊन बाजीराव पुण्याच्या आसपासच्या दीड - दोनशे किलोमीटर्सच्या परिघात पळत होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ब्रिटीश सैन्याचा एखाद्या ठिकाणी ठासून उभा राहून पराभव करण्याची त्याची इच्छा होती कि नव्हती या वादात या ठिकाणी तरी शिरण्याचे काही प्रयोजन नाही परंतु, इंग्रजांच्या सैन्याशी मोठी लढाई देण्याचे तो टाळत होता हे एक उघड गुपित आहे. कोरेगावची लढाई घडून येण्यापूर्वी बाजीराव  जुन्नरच्या  आसपास ब्राम्हणवाडा  येथे मुक्कामास होता. तेथून तो पुण्याच्या दिशेने निघाला असला तरी पुण्याला जाण्याची त्याची इच्छा कितपत होती याविषयी शंकाच आहे. जनरल स्मिथ हा पेशव्याच्या पाठलागावर होताच. त्याला रोखून धरण्याची कामगिरी बहुतेक त्रिंबकजी डेंगळेवर सोपवण्यात आलेली होती असे दिसून येते. अर्थात, हे कार्य दुसऱ्या  कोणत्यातरी सरदारावर देखील सोपवले असावे. असो, ब्राम्हणवाडा येथून बाजीराव पुण्याचं दिशेने निघाला. त्याच्या हेतूंची / बेताची  इंग्रजाना अजिबात कल्पना नव्हती असेच म्हणावे लागते. मुंबईची इंग्रज फौज पुण्याच्या दिशेने येत होती तिला अडवण्याचा पेशव्याचा बेत असावा किंवा पुणे शहर परत एकदा आपल्या ताब्यात घेण्याचा त्याचा हेतू असावा असा इंग्रजांचा समज झाला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बाजीरावाचे मनसुबे उधळून लावण्याचे त्यांनी ठरवले. पुण्यामध्ये इंग्रजांची फारशी मोठी फौज नव्हती. पुण्यातील इंग्रजांना त्वरीत कुमक करेल असे एक ठाणे जवळच होते व ते म्हणजे शिरूर हे होय ! या ठिकाणी असलेल्या इंग्रज फौजेस तातडीने पुण्यास जाण्याचा आदेश देण्यात आला. इकडे जनरल स्मिथ मराठी सैन्याचा प्रतिकार मोडून काढत बाजीरावास पकडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. बाजीराव पेशवा ब्राम्हणवाडा येथून चाकणच्या पुढे फुलगावी मुक्कामास आला. शिरूर येथील ब्रिटीश सैन्यावर हल्ला करण्याची त्याची योजना नव्हती त्याचप्रमाणे पुण्यात जाण्याची देखील त्याची इच्छा नव्हती. नाहीतर चाकण येथून तो फुलगावी न जाता तडक पुण्याला जाऊ शकत होता. यावेळी पुण्यात इंग्रजांची फौज अगदीच अत्यल्प अशी होती. जर बाजीराव पुण्यावर चालून गेला असता तर पुणे शहराचे रक्षण त्यांच्या  हातून झालेच असते असे म्हणता येत नाही. परंतु बाजीराव अथवा त्याचे सरदार अधिक व्यवहारी होते.  जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली बडी इंग्रज फौज आपल्या पाठलागावर आहे याची त्यांना कल्पना होती. तसेच शिरूर येथे इंग्रजांची एक तुकडी मुक्कामाला असल्याची माहिती त्यांना  होतीच. पुणे ताब्यात घेतल्यावर शिरूर येथील ब्रिटीश तुकडीचा बंदोबस्त त्यांना करावा लागला असता आणि तोपर्यंत ज. स्मिथ पुण्याजवळ येऊन ठेपला असता. किंवा असेही म्हणता येते कि एकाच वेळेस त्यांना ज. स्मिथच्या आणि शिरूर येथील ब्रिटीश सैन्याचा मुकाबला दोन आघाड्यांवर करावा लागला असता.  हे सर्व लक्षात घेता  पुणे ताब्यात घेण्याचं भरीस न पडता स्मिथ पासून शक्य तितके लांब जाण्याचाच निर्णय मराठी सरदारांनी किंवा पेशव्याने घेतला असे म्हणता येते.
                त्यामुळेच पुणे उजव्या बाजूला टाकून फुलगावी  येथे मराठी सैन्याचा तळ पडला. आधी सांगितल्यानुसार ब्रिटिशांना मराठी मुत्सद्यांच्या बेताची अजिबात कल्पना नसल्याने त्यांनी पेशवा कदाचित पुण्यावर चालून जाईल हि शक्यता गृहीत धरून शिरूर येथील ब्रिटीश तुकडीला पुण्याला जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार शिरूर येथील इंग्रज फौज कॅप्टन Staunton च्या नेतृत्वाखाली पुण्याच्या दिशेने रवाना झाली. शिरूर येथील ब्रिटीश फौज आपल्यावर चालून येईल अथवा त्या फौजेचा पुण्याला जाण्याचा बेत असावा अशी कल्पना मराठी सरदारांना होती कि नाही याविषयी ठामपणे सांगणे शक्य नाही.  कारण, त्यांना जर तशी काही कल्पना असती तर भीमा - कोरेगाव नजीक त्यांनी नदीउतार रोखून धरण्याचा किंवा नदी पाठीशी घालून भीमा - कोरेगाव हे स्थळ काही काल आपल्या ताब्यात ठेऊन शिरूरच्या फौजेचा मार्ग रोखून धरण्याचा बंदोबस्त केला असता. परंतु त्यांनी असे काहीच केल्याचे दिसून येत नाही. यावरून शिरूर येथील इंग्रजी फौजेच्या बेताची  त्यांना फारशी माहिती असल्याचे दिसून येत नाही.  इकडे शिरूरच्या इंग्रज पथकाला पेशवा फुलगावी मुक्कामाला असल्याची बातमी मिळाली नव्हती असे दिसून येते. उपलब्ध माहितीवरून शिरूर येथील ब्रिटीश सैन्य 31 डिसेंबर 1817 रोजी सायंकाळी किंवा रात्रीच पुण्याच्या दिशेने रवाना झाला होते. साधारण 35 - 40 किमी. अंतर कापून हि फौज जेव्हा कोरेगाव जवळ येऊन पोहोचली त्यावेळी शत्रू सैन्याला समोर उभे असल्याचे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असावा. परंतु, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी प्रसंग ओळखून कोरेगाव ताब्यात घेण्याची चलाखी केली. मराठी फौजांनी जर यापूर्वीच कोरेगावचा ताबा घेतला असता तर इंग्रजांना या वेळी आपला बचाव करणे अतिशय अवघड गेले असते पण मराठी सरदार याबाबतीत फारच गाफील राहिले असे म्हणावे लागते. इकडे ब्रिटीश लष्कराची निशाणे दृष्टीस पडताच मराठी मुत्सद्द्यांत चलबिचल  झाली असावी. कारण उपलब्ध माहितीवरून त्या दिवशी फुलगाव येथील मुक्काम उठवून साताऱ्याच्या दिशेने  जाण्याचे त्यांचे आधीच ठरले होते व त्यानुसार बरीचशी मराठी पथके पुढे रवाना झाली होती. खुद्द बाजीराव पेशवा आणि बापू गोखले व इतर काही सरदार मागे राहिले होते. सातारचा छत्रपती प्रतापसिंह यावेळी बाजीरावासोबत होता कि मराठी सैन्यासह तो आधीच पुढे गेला होता याची चर्चा या ठिकाणी तशी अप्रयोजक आहे. कारण छत्रपती लढाईच्या ठिकाणी हजर असला काय आणि नसला काय दोन्ही सारखेच होते. असो, रात्रभर प्रवास करून दमलेली ब्रिटीश पथके कोरेगावात पोहोचली त्यावेळी सकाळचे 9 - 10 वाजून गेले होते. तरीही या ठिकाणी मराठी सैन्याशी लढाई दिल्याखेरीज आपला निभाव लागणे शक्य नसल्याचे त्यांनी ओळखले. माघार घेण्याचा किंवा पुढे पुण्याला जाण्याचा आता प्रश्नच नव्हता. कारण, मराठ्यांची सेना पुढे जय्यत तयारीनिशी सज्ज असल्याने पुणे तर दूरच पण सुरक्षितपणे माघार घेणे देखील शक्य नव्हते. असो, इकडे बाजीरावाने आपल्या सरदारांना ब्रिटीश फौजांशी लढण्याची आज्ञा दिली किंवा असेही म्हणता येईल कि मराठी सरदारांनी इंग्रजांना लढाईमध्ये गुंतवण्याचे ठरवून बाजीरावाला सातारा जवळ करण्याचा सल्ला दिला. दोनपैकी काय खरे असेल ते असेल, पण हे निश्चित कि कसलीही पूर्वकल्पना नसताना किंवा आगाऊ डावपेच आखलेले नसताना मराठी व इंग्रजी सैन्याला कोरेगाव येथे एकमेकांशी झुंजणे भाग पडले.
              मराठी सरदारांच्यापेक्षा इंग्रज अधिकारी संधी व भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यात जास्त कुशल असल्याचे या लढाईत दिसून येते. रात्रभर प्रवास केलेला असूनही कोरेगाव हे स्थळ ताब्यात घेण्यात त्यांनी कमालीची तडफ दाखवली. यावेळी ब्रिटीश पथकांच्या सोबत तोफा असल्याने त्यांनी माऱ्याच्या जागा पाहून आपल्या तोफा पेरल्या. मराठी सैन्याचा तोफखाना आधीच पुढे गेल्याने त्यांना आपल्या तोफखान्याचे पाठबळ लाभू शकले नाही किंवा त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफा पुढे पाठवल्यामुळे मागे राहिलेल्या लहान तोफांचा या प्रसंगी मराठी फौजेला फारसा फायदा झाला नाही असे लढाईच्या उपलब्ध वर्णनावरून लक्षात येते. असो, कोरेगावात घुसलेल्या इंग्रजी फौजांचा समाचार घेण्याची किंवा त्यांना लढण्यात गुंतवण्याची जबाबदारी बापू गोखलेवर येऊन पडली होती. इंग्रजांनी गावाचा आश्रय घेतलेला असल्याने बापूला आपल्या तोफांनी इंग्रज पथकांना सडकून काढता आले नसावे. त्याउलट मराठी फौजा मोकळ्या मैदानावर असल्याने आणि ब्रिटीशांनी मोक्याच्या जागी तोफांचे मोर्चे उभारले असल्यामुळे त्यांच्या तोफा मराठी सैन्यावर आगीचा वर्षाव करत होत्या. इंग्रजांचा तोफखाना बंद पडला नाही तर आपल्या फौजेची बरीच हानी होईल हे ओळखून बापूने लष्कराला कोरेगावावर चालून जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार मराठी पथके कोरेगावावर चालून गेली. परंतु, इंग्रज सैनिकांनी गावातील घरांचा आश्रय घेतलेला असल्याने त्यांच्यावर थेट चाल करणे किंवा हातघाईच्या लढाईत त्यांचा समाचार घेणे त्यांना शक्य झाले नाही. 
              कोरेगावात इंग्रज आणि मराठी सैनिकांची हातघाईची लढाई झाली कि नाही किंवा झाली असल्यास ती कधी झाली ? तसेच बापू गोखल्याने  कोरेगाव ताब्यात घेण्यासाठी किती हल्ले चढवले व इंग्रजांनी ते कसे परतवून लावले  याविषयी सध्या तरी लिहिणे मला शक्य नाही. कारण तितकी माहिती याक्षणी माझ्याकडे नाही. पुढेमागे याविषयी अधिक माहिती मिळाल्यास मी या लढाईचे तपशीलवार वर्णन जरूर देईन. या ठिकाणी लढाईनंतर नेमके काय घडून आले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे व माझ्याकडे जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावरून असे अनुमान बांधता येते कि सदाशिव आठवले लिहीतात त्यानुसार हि लढाई अनिर्णीत राहिली. भीमा - कोरेगाव येथील लढाईमध्ये ना मराठी सैन्य जिंकले ना इंग्रज ! याचे कारण म्हणजे, युद्ध संपल्यावर सामान्यतः विजयी पक्ष रणांगणाचा ताबा घेतो ते या ठिकाणी घडून आले नाही. अर्थात काही अपवादात्मक प्रसंगी विजयी पक्षाला रणभूमी ताब्यात घेण्यात यश मिळत नाही किंवा काही कारणास्तव युद्धभूमी ताब्यात न घेता विजयी पक्षाला त्या ठिकाणाहून निघून जावे लागते हे गृहीत धरून देखील कोरेगाव येथे मराठी किंवा इंग्रजी फौजेचा विजय झाला असे ठामपणे म्हणता येत नाही. समजा, मराठी सैन्य जिंकले असे म्हणावे तर मुठभर इंग्रज फौजेची त्यांनी कत्तल वा लूट का केली नाही हा प्रश्न उद्भवतो. इंग्रजांच्या बाबतीत देखील हेच म्हणता येईल. कदाचित ब्रिटीश पक्षाच्या वतीने असेही समर्थन करता येईल कि, पूर्ण रात्र प्रवास केल्याने आणि दिवसभर युद्धाचा ताण पडल्यामुळे पराभूत मराठी सैन्याचा पाठलाग करणे त्यांना शक्य झाले नसावे. परंतु, हा मुद्दा देखील तितकासा पटण्यासारखा नाही. किंबहुना काहीकाळ  हा मुद्दा जर मान्य केला तर पुढचा प्रश्न उद्भवतो कि, प्रतिहल्ल्यात किंवा माघार घेणाऱ्या मराठी सैन्याची त्यांनी कितपत हानी केली ? लढाईची उपलब्ध वर्णने लक्षात घेतली असता भीमा नदी पाठीशी घेण्यात दोन्ही पक्षांना अपयश आल्याचे दिसून येते. किंबहुना दोघांनाही नदी पाठीशी घेणे त्यावेळी जमले नाही. हे ध्यानात घेता कोरेगावातून माघार घेणाऱ्या व नदीपार करून पळून जाणाऱ्या मराठी सैन्याचा पाठलाग करून त्यांची कत्तल उडवण्याची संधी इंग्रजांनी का दवडली याची उकल होत नाही. म्हणूनच इंग्रज किंवा मराठी फौजा कोरेगाव येथे निर्णायक विजय मिळवू शकल्या नाहीत असे म्हणावे लागते. 
        सूर्यास्तापर्यंत लढाई देऊन बापू गोखलेने जेजुरीच्या मार्गाने साताऱ्याच्या दिशेने कूच केले. लढाई चालू असताना बाजीराव पेशवा त्याच मार्गाने पुढे साताऱ्याच्या रोखाने गेला असल्याने त्याची पिछाडी सांभाळत त्याच मार्गाने जाणे बापूला भाग होते. कोरेगाव येथील लढाईमध्ये सहभागी घेतलेल्या मराठी सैन्याने जेजुरीच्या अलीकडे असलेल्या राजेवाडी या ठिकाणी आपला तळ ठोकला. हे ठिकाण कोरेगावपासून सुमारे 30 - 35 किलोमीटर्स अंतरावर आहे. कोरेगावच्या लढाईने बाजीराव पेशव्याच्या फौजेच्या अनेक उणीवा मात्र परत एकदा प्रकर्षाने जगासमोर म्हणा किंवा शत्रूसमोर आल्या असेच म्हणावे लागते. जरी या संघर्षात मराठ्यांची सर्व फौज सहभागी झाली नसली तरी इंग्रजांच्या एका पथकाचा निःपात करण्यात त्यांना आलेले अपयश ठळकपणे लक्षात येते. पाठीवर असलेल्या जनरल स्मिथच्या प्रचंड फौजेला रोखून धरण्याची जबाबदारी यावेळी मराठी सैन्याने किंवा काही इतिहासकार सांगतात त्यानुसार त्रिंबकजी डेंगळेने पार पाडली नसती तर कोरेगाव येथे बापू गोखलेच साफ निकाल लागला असता असेच म्हणावे लागते.  असो, कोरेगावची लढाई झाल्यावर शिरूरहून पुण्याला निघालेली ब्रिटीश फौज, लढाई झाल्यावर दुसऱ्या दिवशी शिरूरच्या दिशेने मागे वळली. जर कोरेगावची लढाई त्यांनी जिंकली असती तर विजयी पथके जल्लोष करत थेट पुण्याला गेली असती आणि त्या शहरात आपल्या विजयाचा मोठा उत्सव त्यांनी केला असता. यामुळे पुण्यातील पेशव्याच्या व पेशवाईच्या समर्थकांना मोठीच दहशत बसली असती. परंतु कोरेगावात इंग्रजांचा विजय झाला नसल्याने त्यांनी पुण्याकडे जाण्याचे एकप्रकारे टाळले असेच म्हणावे लागते. या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा उद्भवतो कि, जरी इंग्रजांचा कोरेगाव येथे पराभव झाला नसला तरी त्यांनी तसेच पुढे पुण्यात जाण्याचे का टाळले असावे ? माझ्या मते, जनरल स्मिथ 2 जानेवारी 1818 रोजी चाकण जवळ आल्याची बातमी मिळाल्यामुळे आणि कोरेगावच्या झुंजात ब्रिटीश सैन्याची बरीच हानी झाल्यामुळे तसेच नजीकच्या काळात  तरी पुण्यावर बाजीरावाची स्वारी येण्याची शक्यता नसल्याने शिरूरहून आलेली ब्रिटीश पथके परत मागे फिरली असावीत.  
             कोरेगाव येथे इंग्रजांनी जो काही स्तंभ अथवा स्मारक उभारले आहे ते ब्रिटीशांच्या विजयाचे प्रतीक आहे असे म्हणणे धाडसाचे आहे. शत्रूच्या तुलनेने त्यांची फौज अल्प असताना देखील मोठ्या शौर्याने आणि शिकस्तीने सामना करून त्यांनी आपला बचाव केला त्याबद्दल इंग्रजांना अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांनी त्या ठिकाणी एक स्मारक उभारले असल्यास नवल नाही.                    


               

४४ टिप्पण्या:

सागर भंडारे म्हणाले...

संजय मित्रा, लेख आवडला. विश्लेषण अगदी योग्य दिशेने झालेले आहे. लेख आवडला हे सांगण्यासाठी ही पोच बाकीच्या गोष्टी प्रत्यक्ष फोनवर बोलूयात :)

Sahyadri म्हणाले...

lekh chan ahe chan mahiti milalali, smarkacha photo pahije ka? roj tyachya samorun jato

अनामित म्हणाले...

संजय,
विश्लेषण आवडले. या लढाई बद्दल माझे मत काय आहे हे तुला माहितच आहे. कोरेगावच्या विजय स्तंभाबद्दल लिहताना केलाला हा शब्दाचा खेळखंडोबा मला अजिबात आवडला नाही. ते विजयस्तंभ महार वीरांची गाथा गाणारा आहे. मुख्य संदर्भ अधोरेखीत न केल्या बद्दल मी तुझा निषेधही करणार नाही. कारण तुला माहितच आहे की तुझ्या ’पानिपत’च्या प्रकाशनाच्या वेळी तुनी केलेल्या विधानावरुन तू आजूनही महार (तेही ब्राह्मणी व ईश्वरवादी) आहेस हे सिद्ध झाले व मी माझी नाराजीही व्यक्त केली. मग जो अशा ब्राह्मणी यंत्रणेचा बळी आहे त्याचा निषेध करण्याचे कारणच उरत नाही. राहिला प्रश्न कोरेगावच्या लढाईवर लिहण्याचा.
तुला लिहायचे असेल तर सष्ट व सत्य लिह. ताकाला जाऊन भांडं लिपवू नकोस.
एक तर तो इंग्रज सेनेतील महार सैनिकांचा विजय होता असे लिह. किंवा तो महारांचा विजय नव्हता असे लिह. उगीच इंग्रज इंग्रज करत ख-या वीरांचा अनुल्लेख करु नकोस. ज्या सन्मास ते वीर पात्र आहेत तो बहाल कर अथवा ते त्यास पात्र नाहीत असे मनातून वाटत असल्यास लिहताना ’इंग्रज सेनेतील महार सैन्य’असा रोखटोक उल्लेख येऊदे. त्या नंतर तुला मी उत्तर देईनच.
पण त्या लढ्यातील मुख्य़ मुद्दा असा बाजूला सारू नकोसे.

sanjay kshirsagar म्हणाले...

Anonymous said......
अनामिक मित्रा, तुझे माझे बोलणे झाले आहे असे मला अजिबात आठवत नाही. कारण ; ज्यांशी माझे बोलणे, तेदेखील आडपडदा न बाळगता झाले आहे / होत आहे / होत राहील, ते माझ्याशी प्रकटपणे ( स्वतःच्या खऱ्या ओळखीसह ) संवाद साधतात. भले मग त्यांचे आणि माझे मतभेद असले तरी ! तेव्हा जर तू माझ्याशी खरोखरच कधी संपर्क साधला असशील तर तुझ्या खऱ्या नावासह समोर ये, ( ज्या नावाने चारचौघे राहू दे, तुझे आई - बाप तुला ओळखतात त्या ) मगच मी माझी बाजू मांडेन. तोपर्यंत तू विचारलेल्या एकाही प्रश्नास मी उत्तर देणारा नाही.

अनामित म्हणाले...

संजय,
अरेच्चा, माझ्याकडे काहितरी लॉगिन प्रोब्लेम झाला दिसतोय म्हणून अनामिक नावाने माझी कमेंट पडलेली दिसतेय.तर चल परत एकदा तीच कमेंट कॉपी पेस्ट करतो.
-------------

संजय,
विश्लेषण आवडले. या लढाई बद्दल माझे मत काय आहे हे तुला माहितच आहे. कोरेगावच्या विजय स्तंभाबद्दल लिहताना केलाला हा शब्दाचा खेळखंडोबा मला अजिबात आवडला नाही. ते विजयस्तंभ महार वीरांची गाथा गाणारा आहे. मुख्य संदर्भ अधोरेखीत न केल्या बद्दल मी तुझा निषेधही करणार नाही. कारण तुला माहितच आहे की तुझ्या ’पानिपत’च्या प्रकाशनाच्या वेळी तुनी केलेल्या विधानावरुन तू आजूनही महार (तेही ब्राह्मणी व ईश्वरवादी) आहेस हे सिद्ध झाले व मी माझी नाराजीही व्यक्त केली. मग जो अशा ब्राह्मणी यंत्रणेचा बळी आहे त्याचा निषेध करण्याचे कारणच उरत नाही. राहिला प्रश्न कोरेगावच्या लढाईवर लिहण्याचा.
तुला लिहायचे असेल तर सष्ट व सत्य लिह. ताकाला जाऊन भांडं लिपवू नकोस.
एक तर तो इंग्रज सेनेतील महार सैनिकांचा विजय होता असे लिह. किंवा तो महारांचा विजय नव्हता असे लिह. उगीच इंग्रज इंग्रज करत ख-या वीरांचा अनुल्लेख करु नकोस. ज्या सन्मास ते वीर पात्र आहेत तो बहाल कर अथवा ते त्यास पात्र नाहीत असे मनातून वाटत असल्यास लिहताना ’इंग्रज सेनेतील महार सैन्य’असा रोखटोक उल्लेख येऊदे. त्या नंतर तुला मी उत्तर देईनच.
पण त्या लढ्यातील मुख्य़ मुद्दा असा बाजूला सारू नकोसे.

-एम. डी. रामटेके.

अनामित म्हणाले...

Ha lekh manaje niwwal murkha panacha kalas aahe. Good. chaludya.

Real Vidrohee म्हणाले...

इतिहासाचा मागोवा घेणाऱ्याला आढळते की ब्रिटिशांनी राज्य ताब्यात आल्यावर ते मजबूत करण्यासाठी हिंदूंना जाती-जातींत फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. ब्राह्मण या जातीला TARGET केल्यास हिंदूंना फोडणे अधिक सोपे जाणार होते. त्यांचे काही हिंदू निष्ठावंत होते - त्यांनीही या कामात, प्रचारात त्यांना मदत केली. त्याच बरोबर पुण्याच्या पूर्वेकडील आणि नगर जिल्ह्यातील महार लोकांना मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्नही याचाच भाग होता. महार किंवा कुठल्याही जातीचे लोक ब्रिटिश फौजेत होते आणि छत्रपतींच्या मराठी फौजेत नव्हते हे विधान अगदी प्रथमदर्शनीसुद्धा हास्यास्पद आहे. त्यामुळे कोरेगाव भीमाची लढाई ही महार फौजेची ब्राह्मण फौजेशी लढाई होती हे विधान म्हणजे कल्पना शक्तीची फारच मोठी कोलांटीउडी होती. मात्र दुर्दैवाने ब्रिटिशांनी टाकलेल्या या जाळ्यात दलित नेतृत्व फसले - तथाकथित उच्चवर्णीय नेतृत्वही अन्याय्य परंपरा उपटून टाकण्याइतके शहाणे नव्हते, त्यातून त्यांच्यातील दरी वाढत गेली. उच्चवर्णीय म्हणजे फक्त ब्राह्मण - तेवढ्या एका जातीला वाईट ठरवले की झाले हीसुद्धा एक सोयिस्कर arrangement होती. बाकीचे उच्चवर्णीय संख्येने, पैशाने, ताकदीने अधिक असल्यामुळे राजकीय दृष्ट्या बळी द्यायला एकीकडे ब्राह्मण आणि दुसऱ्या बाजूला रामोशी, पारधी अशा जाती ब्रिटिशांच्या सोयीच्या होत्या. यातूनच पुढे महारांचा ब्राह्मण सैन्यावर विजय ही कल्पना महार समाजाला आकर्षक वाटणे साहजिक होते - त्यासाठी कोरेगाव भीमा च्या लढाईबद्दलची ही कल्पनाशक्तीची कोलांटीउडी त्यांनी मान्य केली असावी. वाईट गोष्ट अशी की या आकर्षक गैरसमजुतीतून आपण देशाच्या पारतंत्र्याचा आनंद साजरा करतो आहोत हे या नेतृत्वाच्या ध्यानात आले नाही. देशातील नागरिक एकमेकांशी बंधुभाव राखू शकले नाही तर देशाचे काय होते याचे हे ठळक उदाहरण आहे.

अनामित म्हणाले...

Bahujanana Murkh Banvianyacha Dhanda Band kara atat tari..
Bheemaa-Koregaon chi Ladhayee Maharbattalion ne Jinkli ahe....tyamule tithe Stamb ubharla ahe......ya Ladhayi Nantar peshvayeecha Ast zala.....
he suryaprakasha itke svacch ahe....baki ha sarv Fafat pasara vyarth ahe

Unknown म्हणाले...

मी आपण सर्वांसारखा फार शिकलेला तर नाही परंतु माझ्या मते हा इतिहास असा होता जसा डॉ जगताप यांनी दिव्य मराठी दैनिक पेपर मध्ये खालील दिलेल्या लेख मध्ये दिलेला आहे मी जसाचा तसाच आपणा समोर ठेवतो आणि आशा करतो आपण पण स्वीकार करणार आहात ....दिलीप कुमार जंजाळ ..
अन्याय, अस्पृश्यतेविरुद्ध महारांनी पुकारलेले पहिले बंड भीमा कोरेगाव क्रांतिस्तभ
डॉ. वामनराव जगताप | Dec 31, 2011, 23:20PM IST
(दिव्य मराठी)
मराठेशाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर शूद्रांच्या गुणवत्तेस अत्यंत अल्प मूल्य व वाव होता. या कालखंडातील सर्व राज्यकर्त्यांनी महारादी सर्वच अस्पृश्य लढवय्या जातींचा फक्त आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला. त्यांच्या शौर्याचे केवळ काठी, तोडे, कडे इत्यादी नगण्य इनाम म्हणून देऊन कौतुक केले. कधी कधी तर फक्त शाबासकी देऊनच बोळवण केली जाई. स्वराज्य व सुराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणा-या महारांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलखाची शान भारतखंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकत ठेवला; पण त्यांची पायरी कधीच बदलली नाही. बाजी निंबाळकर व नेताजी पालकर या मुसलमान झालेल्या सरदारांना मोठ्या सन्मानाने हिंदू धर्मात घेतले. पुन्हा सरदारकी बहाल केली; परंतु अस्पृश्यांच्या गळ्यात मडके व कमरेला खराटा बांधून ठेवण्याचा जागतिक विक्रम केला. अशा अनेकानेक पशुतुल्य अन्याय, अत्याचार व अस्पृश्यतेच्या विरोधात त्या वेळी महारांचे सरदार दुसरे सिदनाक यांनी स्वाभिमान प्रकट करून श्रीमंत बाजीराव पेशव्यांना विनंती केली होती की पेशवाईत महारादी अस्पृश्य जाती-जमातींना अस्मितेने वागवले जावे. महार सैनिक मायभूमीसाठी प्राण देण्यास तयार आहेत; पण त्यांची ही विनंती पेशव्यांनी अतिशय तिरस्काराने अमान्य केली होती आणि म्हणून महारांची संख्या अल्प असूनही ते पेशव्यांविरुद्ध अत्यंत शौर्याने व त्वेषाने लढले. प्राणांची आहुती देऊन अस्पृश्यतेची अत्युच्च परिसीमा गाठलेल्या पेशव्यांचा अभूतपूर्व पराभव केला. यावरून स्पष्ट होते की महार सैनिक ब्रिटिशांच्या आमिषाला बळी पडून किंवा पोटासाठी पेशव्यांच्या विरोधात लढले नसून त्यांची लढाई समता, अस्मिता यासाठी होती. अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले हे त्यांचे प्रथम बंड होते.

Unknown म्हणाले...

भीमा-कोरेगावची लढाई : एक निमित्त- हे युद्ध पुण्यापासून 20 किलोमीटर अंतरावरील भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात लढले गेले. या युद्धाचे स्वरूप मोठे विचित्र व भयानक होते. हे युद्ध इंग्रजांनी महारांच्या बळावर पेशवाईविरुद्ध लढले असले तरी याचे खरे स्वरूप अस्पृश्यता व अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई असेच होते. महार मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करणे हे त्यांचे एकच ध्येय होते. हजारो वर्षांच्या अन्यायाला कायमची मूठमाती देण्यासाठी पेटलेल्या मानसिकतेची जिद्द होती. या लढाईच्या निमित्ताने महारांना नामी संधी सापडली होती.

या युद्धाचे दुसरे एक वैशिष्ट्य असे होते की, पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या 30 हजार होती. यापैकी 5 हजार पायदळ व 25 हजार घोडदळ होते. त्यापैकी 20 हजार तर निवडक प्रशिक्षित अरब घोडेस्वार होते. त्या तुलनेत इकडे इंग्रजप्रणीत केवळ 834 महार सैनिक होते. तरीही निकराचा लढा देऊन त्यांनी आपल्यापेक्षा 40 पट जास्त असलेल्या पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवून दिला. 16 तास झुंज देऊन महार सैनिकांनी अखेर 1 जानेवारी 1818 च्या सायंकाळी 6 वाजता पेशव्यांच्या बलाढ्य सैन्यावर कब्जा केला. एवढ्या मोठ्या सैन्यापुढे एवढ्याशा सैन्याचा टिकाव लागणे अशक्यप्राय होते. तशी परिस्थितीसुद्धा निर्माण झाली होती; पण न्यायासाठी मरण पत्करू अशा बाण्याने महार सैनिक प्राणपणाने लढले. कारण त्यांना माहीत होते की कोणत्याही परिस्थितीत आपणास माणसाचे जगणे जगू दिले जात नाही. जगू दिले जाणार नाही. असे मृत जीवन जगण्यापेक्षा न्यायासाठी, हक्कासाठी लढत लढत मेलेले बरे. जगापुढे एक नवा इतिहास निर्माण होईल. ते पेटून उठले होते. भीमा कोरेगावच्या या लढाईत शूद्र-महार सैनिकांनी शेवटी इंग्रजांना विजय मिळवून दिला. इंग्रजांनी यापूर्वी पेशवाईशी दोन वेळा केलेल्या लढाईत इंग्रजांना मोठी हार पत्करावी लागली होती. कोरेगावच्या या लढाईत 834 शूद्र-महार सैनिकांपैकी 275 तर पेशव्यांच्या 30 हजारपैकी 600 सैनिक कामी आले.

क्रांतिस्तंभाची निर्मिती - ज्या महार अस्पृश्य सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या या लढाईत प्राणांची आहुती दिली, त्यांच्या व त्या दिवसाच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक भव्य ऐतिहासिक असा क्रांतिस्तंभ निर्माण केला व समतेच्या या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा संगमरवरी शिलेवर मराठी व इंग्रजी भाषेत कोरली. 1795 मध्ये खर्ड्याची लढाई पेशव्यांना जिंकून देणारे, प्रतापगड, वैराटगड, रायगड, जंजिरा, पुरंदर इत्यादी ठिकाणी मराठी मातीचे इमान राखणारे महार कोरेगावच्या लढाईत 1818 मध्ये म्हणजेच अवघ्या 23 वर्षांत पेशवाईविरुद्ध का लढले? ब्रिटिशांसारख्या परकीय सत्तेला विजय मिळवून देण्यात महारांचे प्रयोजन काय? मराठी मुलखाबद्दलची त्यांची अस्मिता अचानक का बदलली? ते देशद्रोही, फितूर होते काय? अशा प्रश्नांची उत्तरे हा दीपस्तंभ- क्रांतिस्तंभ देत राहील यात शंका नाही.

क्रांतिस्तंभाला डॉ. आंबेडकरांची मानवंदना - 1 जानेवारी 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांतिस्तंभाला प्रथम भेट देऊन आपल्या सहका-यांसमवेत मानवंदना देऊन त्या वर्षी स्मृतिदिन साजरा केला. या ऐतिहासिक मानवंदनेनंतर दरवर्षी 1 जानेवारीला लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी व सैनिक तसेच मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कुटुंबासह विजयस्तंभाला भेट देऊन मानवंदना देऊन आदरांजली अर्पण करतात.

क्रांतिस्तंभाची आजची स्थिती - क्रांतिस्तंभाची आजची स्थिती अत्यंत निराशाजनक आहे. 25 जुलै 1989 रोजी या क्रांतिस्तंभाला विजेचा हादरा बसून वरचे चार थर कोसळले आहेत. बरीच नासधूस झाली आहे. अजून बराचसा भाग कधी कोसळेल याचा नेम नाही. स्तंभाला सगळीकडून फुगवटा आला आहे. शहिदांची नावे कोरलेली संगमरवरी भव्य शिलाही दुभंगली आहे. या क्रांतिस्मारकाचे पुनरुत्थान, संरक्षण, संवर्धन करणे तर सोडाच, शासन याची साधी डागडुजीही करीत नाही. परिसराला संरक्षक भिंत नाही. सुशोभीकरण नाही. शासनाची, धर्मादाय नागरी संस्थांची ही अनास्था काय दर्शवते? कदाचित असे वाटत असावे की हे स्मारक लवकर उद्ध्वस्त झालेले बरे!

धन्यवाद ..............
दिलीप कुमार जंजाळ

sanjay kshirsagar म्हणाले...

श्री. दिलीप कुमार जंजाळ,
आपल्या दोन्ही प्रतिक्रिया मी वाचल्या. काही कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे आपल्या प्रतिक्रिची पोच – पावती देण्यास विलंब झाल्याबद्दल मी प्रथम आपली माफी मागतो.
मी इतिहासातील तद्न्य नाही किंवा इतिहास संशोधक देखील नाही. मी फक्त इतिहासाचा अभ्यासक आहे. विद्यार्थी आहे. भीमा – कोरेगाव येथील लढाईच्या बाबतीत जे काही मला पुरावे मिळाले ते अभ्यासल्यावर जे निष्कर्ष निघाले ते या ठिकाणी मी मांडले आहेत. मला जी काही माहिती उपलब्ध झाली त्यावरून प्रस्तुत लढाई हि ब्राम्हणशाही विरुद्ध महार / अस्पृश्य अशी नसल्याचे मला आढळून आले. या ठिकाणी श्री. अनिल कठारे यांच्या ‘ शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास ‘ या संदर्भ ग्रंथाचा आपण वाचन करावे अशी मी शिफारस करू इच्छितो. श्री. कठारे यांनी प्रस्तुत ग्रंथात जी काही माहिती दिलेली आहे ती अतिशय बहुमोल आहे. अर्थात, भीमा – कोरेगावच्या लढाई विषयीची त्यांची मते आणि तुमचे विचार हे एकचं आहेत हे देखील या ठिकाणी नमूद करणे योग्य ठरेल. श्री. कठारे यांनी आपल्या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या बाजीराव पेशव्याने जेव्हा इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले तेव्हा पेशव्याच्या वतीने रायगड किल्ला लढवण्याचे कार्य ज्या मराठी सैनिकांनी पार पाडले त्या मराठी सैनिकांमध्ये महार समाजातील शूर शिपायांचा देखील समावेश होता. त्यामुळे प्रश्न असा उद्भवतो कि, जर भीमा – कोरेगाव येथील लढाईत इंग्रजांच्या बाजूने लढणारे महार हे ब्राम्हणशाही विरोधात, अस्पृश्यतेच्या विरोधात लढत होते असे म्हणायचे झाले तर मग रायगडावरील महार कशासाठी लढत होते ? कि, इंग्रजांकडून लढणारे महार अस्पृश्य होते आणि पेशव्याकडून लढणारे स्पृश्य होते ? त्याशिवाय महत्त्वाचा मुद्दा असा कि, पेशवाईमध्ये महार समाजाच्या गळ्यात मडके व कमरेला जो खराटा आला तो पेशवाईच्या अस्तानंतर देखील कायम का राहिला ? भीमा – कोरेगावच्या युद्धात जर महारांनी इंग्रजांना विजय मिळवून दिला असे आपण गृहीत धरले तर इंग्रजांनी महारांचे समाजातील स्थान / दर्जा उंचावण्यास का मदत केली नाही ? महारांच्या वरील अमानुष निर्बंध का हटवले नाहीत ?
सारांश, वरील शंकांच्या निरसनार्थ मी भीमा – कोरेगावच्या लढाईचा अभ्यास करण्यास आरंभ केला व त्यातून जे काही निष्कर्ष निघाले ते या ठिकाणी मी पुराव्यासह मांडले आहेत.

अनामित म्हणाले...

संजयजी
बुद्धीभेद करणारा लेख वाटला. लढाई १८१८ साली झाली असं मराठी शिलालेख दाखवतो. स्तंभ १८२२ साली बनवला गेला. १८५७ ला पेशव्यांनी कुठल्या सत्तेविरुद्ध उठाव केला ? महात्मा फुले यांनी इंग्रजी सत्तेकडे गा-हाणे मांडले ते पेशव्यांच्या काळात शक्य झाले असते का ? त्यांच्या विलासी आयुष्याची, अन्याय अत्याचाराची वर्णनं पुरेशी असताना त्यांच्याबद्दल सामान्य जनतेत प्रेम होतं असा संदेश या लेखातून जातो. इंग्रजांच्या इतर ठिकाणच्या स्तंभांची छायाचित्रं तुलनेसाठी आहेत का ?

इंग्रजीत जयस्तंभ म्हटले नाही याऐवजी स्थानिक भाषेत जयस्तंभ म्हणणे हे जास्त इमानदारीचे वाटते. स्थानिकांना इंग्रजांनी केलेला क्लेम पसंत नसता आणि पेशव्यांचा बीमोड झाला नसता तर त्या जयस्तंभास उखडून फेकणे अशक्य होते का ?

umesh म्हणाले...

lekh farach GADABADLAAY......far vichitr lihilay .aani abhyspurn vatat nahi ....mandani vyavastht nahi ..ani mahiti pan vyavasthit nahi ....jevha chagali mahiti milel tevha punha edit kara

...umesh jawalikar

sanjay kshirsagar म्हणाले...

या लेखात गडबड, वैचित्र्य असे काय हे तरी सांगा राव !

राजन म्हणाले...

लेख अभ्यासपूर्ण आहे. ब्रिटिशांनी पुण्यावर आधीच कब्जा केला होता, त्यामुळे कोरेगाव भीमाच्या निसटत्या चकमकीमुळे पेशवाई बुडाली - ही कल्पना अतिरंजित आहे. हा स्तंभ ब्रिटिशांनी - लोकांना ब्रिटिश सरकारवर निष्ठा वाढावी म्हणून - उभारला, हे या स्तंभावरच लिहिले आहे. दुसरे म्हणजे 1818 मध्ये झालेल्या चकमकीची आठवण ब्रिटिश सरकारला 1851 मध्ये व्हावी हे आश्चर्य नाही का? त्या काळच्या आयुर्मर्यादेकडे पाहता 1818 साली कळत्या वयाची असलेली किती माणसे 33 वर्षानंतर जिवंत असतील? आणि सत्तेवर असलेल्या ब्रिटिशांची थापेबाजी उघडकीला आणून जीवाशी खेळ कोण करणार होते म्हणा.

sanjay kshirsagar म्हणाले...

Rajendra Joshi साहेब, अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
स. १८५१ चा उल्लेख काही मला समजला नाही. त्याचा खुलासा कराल का ? बाकी, स. १८१८ ते ५१ दरम्यानच्या ३३ वर्षांच्या कालावधीत बरीच माणसे हयात असतील. कारण, त्यावेळी इतके काही मर्यादित आयुर्मान नव्हते.
राहिला प्रश्न इंग्रजांच्या थापेबाजीचा तर त्या विषयीच्या तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे.

राजन म्हणाले...

बरोबर आहे, उल्लेख अर्धवट आला. कोरेगाव भीमा लढाईच्या स्मृती जागवण्यासाठी 1851 साली ब्रिटिशांनी एक शौर्यपदक सुरू केले. बहुधा महार रेजिमेंटची स्थापनाही त्या दरम्याने करण्यात आली. मला या काळातील विविध उल्लेख आणि आपल्या ब्लॉग / कॉमेंट्स वरून असे वाटते की मराठी राज्य ताब्यात आल्यानंतर पहिल्या पंचवीस-एक वर्षांतच ब्रिटिशांनी "जात" या गोष्टीचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करून घ्यायला सुरुवात केली असावी. त्याचा परिणामही खूप खोलवर झालेला आहे.

अनामित म्हणाले...

दिसली फट कि घुसला भट काय जोशिबुआ खरय न ?? :-)

राजन म्हणाले...

समतेची तथाकथित लढाई जातिद्वेषावर आधारित आहे, हेच वरील कॉमेंटवरून दिसून येते. अगदी कोरेगाव भीमाच्या स्तंभावरही ब्रिटिश सरकारबद्दल लोकांना निष्ठा वाटावी म्हणून हा स्तंभ उभारला या अर्थाचे लिखाण आहे. त्यानंतर follow-up action म्हणून पुण्याच्या पूर्वेकडे दलित लोकांना ख्रिस्ती बनवण्याच्या मोहिमेचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यासाठी १८५० नंतर अहमदनगर येथे सिंथिया फेरार या मिशनरी महिलेला आणण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून त्या भागात खूप मोठ्या प्रमाणावर दलित समाज धर्मांतरित झाला. त्याच काळात काही लोकांनी आपल्या लिखाणातून हिंदू लोकांमध्ये जातिद्वेष रूजवायला सुरुवात केली. लोकांना एक अंतर्गत शत्रू दाखवला - आणि या शत्रूपासून वाचवण्यासाठी दयाळू देवाने आपल्याला ब्रिटिश सरकार दिले असे लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न मांडला.

राजन म्हणाले...

या प्रयत्नांत बऱ्याच खोट्या गोष्टी लिहिल्या गेल्या. उदा. पशुपालक आणि कृषि संस्कृतीतील बलराम - खांद्यावरील नांगर हे ज्याचे चिन्ह म्हणून ओळखले जाते - भारतातील कृषिसंस्कृतीमध्ये उत्तर भारतापासून महाराष्ट्रा - कर्नाटकापर्यंत ज्याचे नाव प्रसिद्ध आहे, मुलांचे नाव बलराम / बळीराम ठेवले जाते - त्याच्या ऐवजी असुर राजा बली हा "बळीराजा" असल्याचे असत्य पसरवले गेले. त्यातही काही खोटेपणा केला गेला. ज्याचे गुरू शुक्राचार्य होते, जो यज्ञ करून दान देत असताना विष्णूने त्याला शब्दात पकडले - तो अवैदिक किंवा मूळनिवासी असल्याचे सांगितले गेले. वास्तविक सुर - असुर अशा सत्ताधाऱ्यांमधील चढाओढीची ही कथा आहे. त्यात "वामन" हे ब्राह्मणांनी केलेल्या फसवणुकीचे प्रतिक म्हणून दाखवण्यात आले - जो प्रत्यक्षात ब्राह्मण नसून विष्णू म्हणजे सुर सत्ताधारी गटाचा प्रतिनिधी होता. ब्राह्मणाचे सोंग घेऊन तो राजा बली ला फसवत होता. या कथेत ब्राह्मण होता तो एकच - शुक्राचार्य, ज्याने बलीला सावध करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ही गोष्ट फसवणुकीचे उदाहरण असेल तर - ब्राह्मणांच्या नावाखाली सत्ताधारी लोकांनी समाजाला कसे फसवले याचे उदाहरण आहे.

राजन म्हणाले...

व्यक्तीचे गुण अवगुण - स्वभाव या गोष्टी जातीवर अवलंबून नाहीत; किंवा भारताची राज्यघटना "व्यक्ती" हे एकक धरते - असे म्हणणाऱ्या लोकांनीच "जात" हे एकक धरले. अमुक "जातीने" लबाडी केली, अमुक "जातीने" अन्याय केला - त्यामुळे आज समोर असलेले - मरून गेलेले - पुढे त्या जातीत जन्माला येणारे सर्व तुमचे शत्रू आहेत - असे सांगणाऱ्या विचाराला आज "समतेची लढाई" किंवा पुरोगामित्व म्हटले जाते. यात बहुसंख्य लोकांना काही चुकीचे दिसत नाही कारण आज हा चुकीचा विचारच प्रस्थापित आहे. त्याचा उपयोग भ्रष्ट राजकारण्यांना सत्ता मिळवण्यासाठी होतो, बुद्धिमंतांना प्रसिद्धी / समृद्धी / पुरस्कार / विद्यापीठांमधील अध्यासने मिळवण्यासाठी होतो, सामान्य माणसाच्या मनातील सकारात्मक भावना दाबून मत्सर / द्वेष अशा भावना सुखावल्या जातात - अशा गोष्टीतील चुका सोयीने कोणालाच दिसत नाहीत. म्हणून हा विचार प्रस्थापित आहे - त्यालाच "विद्रोह" असेही नाव आहे. सरकारमान्य - प्रतिष्ठित - प्रस्थापित विद्रोह.

Unknown म्हणाले...

जर हे केवळ ईग्रज मराठा युध्द होते तर महार योध्दे प्रतीपक्षाचे संख्याबळ विपुल असताना,तसेच पराभवाची शक्यता असताना,प्राणपणाणे कसे लढले.त्या मागची प्रेरणा कोणती?कोणती अशी एक बाब त्यांना स्वतांच्या जीवना पेक्षाही अनमोल होती? पेशवे महारांना का आपले वाटले नाहीत?महारांना पेशवे काळात मिळणारी वागणूक सन्मानजन्य होती का? जाउद्या मानवीय तरी होती का?

sanjay kshirsagar म्हणाले...


Youraj Donde,

http://peshwekalinitihas.blogspot.in/2012/11/blog-post_30.html
या लेखात भीमा – कोरेगावच्या स्मारक स्तंभाचे फोटो दिले आहेत. त्यात इंग्रजांतर्फे लढताना जखमी वा मृत झालेल्या सैनिकांची नावे आहेत. ती बारकाईने वाचा.

Milind Sasane म्हणाले...

दर्जाहीन लिखाण अभ्यास खुप खुप अभाव
महत्वाच् म्हणजे यात खर अस काहीच नाही
खऱ्या शुरवीरांचा नामोल्लेख जाणीवपूर्वक टाळलाय का तर ते महार होते
अरे लाज वाटायला पाहिजे

सुधीर त्र्येंबकराव पाटील म्हणाले...

Khare aahe

सुधीर त्र्येंबकराव पाटील म्हणाले...

खरे आहे .....
अनुमोदन....

Unknown म्हणाले...

अगदी बरोबर

Ram T म्हणाले...

सदर लेख सर्वंकष नसला तरी खूप मोठ्या प्रमाणात योग्य विश्लेषण केले आहे .. मुळात ३०,००० पेशवा सैनिकांना ५०० महारांनी पराभूत केले असं मुद्दा काही लोक मांडत आहेत त्यांनी ३० हजार लोक एकत्रित पाहावेत आणि खरच ५०० लोक त्यांना मारू शकतील का याचा अंदाज करावा ...अजून एक अशे सांगावे वाटते कि ३०,००० पेशवा सैन्यात फक्त ब्राह्मण लोक होते का ? त्यात किमान हजार दोन हजार महार लोक सुधा असणारच मग ते महार शूर नाहीत असेच म्हणावे लागेल ... आपण जो समुदाय किंवा एखादा राजा इंग्रजाकडून लढला त्याला देशद्रोही संबोधले आहे. उदा १८५७ च्या उठावात इंग्रजांच्या बाजूने लढलेले . मग हे ५०० महार देशद्रोही का नाहीत? त्यांचा सन्मान का केला जातो ? सदरचा विजयस्तंभ केवळ इंग्रजांनी जाणूनबुजून हिंदू समाजात फुट पडण्यासाठी बांधला आहे आणि दलितांना ख्रिचन बनवण्याचा कावा होता ...जो कि आज तो यशस्वी होत असल्याचा प्रत्यय येत आहे

अनामित म्हणाले...

तुझा काय अभ्यास आहे ते तरी दाखव.. उगाच झा*उपट कशाला करतोस?

Unknown म्हणाले...

ल*डू दाखवलीस का जात...

Unknown म्हणाले...

Tula Kay yet te sang naa Zh*tu

Ravindra Shinde म्हणाले...

100 टक्के बरोबर

Unknown म्हणाले...

हे सगळ्यात बरोबर ..

Unknown म्हणाले...

संजय ...
डिलिट करा माझि कॉमेंट ..
त्यात काहि अर्थ नाहि ....
उमेश जावलिकर

Unknown म्हणाले...

संजय सरळ शिव्या देता येत नाहित म्हणुन हे unknown च्या कॉमेंट तुमच्या आहेत का? तुमचा स्वभाव पहाता तुम्हि सरळ शिव्या देताना पाहिलय ..
मग ह्या शिव्यावाल्याने कॉमेंट नाव फोटो लावुन द्याव्यात कि. प्र्त्येकाचा दृश्टिकोन वेगळा असु शकतो ..
.. नाहि पटला कि दे शिव्या ...
कोणाचि वकिलि करतोय ?
आणि या कॉमेंट अशा अभ्यासु ब्लॉग वर का असाव्यात ?

Unknown म्हणाले...

संजय सर मग ईतिहासात किवा इंटरनेटवर महार सरदार व किललेदाराचा ईतीहास का सापडत नाहि

सावंत विकास म्हणाले...

संजय सर,
आता लोकांच्या जातीय अस्मिता टोकदार झाल्यात सत्य चूक बरोबर वगैरे कशाचेही भान राहणारच नाही कमेंट वाचून तरी असच दिसतंय.

लेख उत्तम आहे. बाकी इंग्रज आणि महार यांच्यात झालेल्या करार(झाला असेल तर) माहिती द्यावी.
गळ्यातील मडकं आणि झाडू वगैरे
परवा भाषणात ऐकलं म्हणून कुतूहल निर्माण झालय

Shekgar म्हणाले...

दुसरे सिदनाक यांच्याबद्दल अधिक माहिती द्याना

Shekgar म्हणाले...

आपल्या शंकांची उत्तरे इतिहासात आहेत.
महार समाज त्वेषाने का लढला?
महार समाज अस्पृश्य होता का?
महार समाजावर पेशव्यांनी झाडू मडक्याची शिक्षा का जरी केली?
पेशव्यांची लबाडी कशी
शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या तत्वांच्या विरुध्द पेशवाई कशी होती.
ती नष्ट होणे का आवश्यक होते?
इंग्रजांच्या बाजूने महार सैनिकांच्या बरोबरीने मराठा राजपूत ई सैन्य होते,तर पेशव्यांच्या बाजूने अरबी तसेच मुस्लिम पिंदारी लोक होते. ह्याचा अर्थ पेशव्यांना स्थानिक समर्थन नव्हते.

Shekgar म्हणाले...

सामान्य जनतेला अजिबात पेश्व्यांबद्दल प्रेम नव्हते

राजन म्हणाले...

भावनेच्या नजरेने / राजकीय किंवा जातीय आवडीनावडीतून आज समोर घडणाऱ्या घटनांकडे पाहिले तरी परस्परविरोधी कट्टर मतांचे समर्थक तयार होतात. आज समोर घडणाऱ्या घटनांचे अनेक पुरावे असतात, काही तर डोळ्यांसमोर घडात असतात - तरीही अशी परस्परविरोधी मते बनू शकतात.
इतिहास तर तुमच्या डोळ्यांसमोर घडत नाही, त्याचे पुरावेही फारच कमी उपलब्ध असतात. त्यामुळे इतिहासाकडे अशा भावनिक / राजकीय / जातीय / घराण्याच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने पाहिले तर सत्य कधीच सापडणार नाही.
कोरेगाव भीमा संदर्भातील बाबी आज सरळसरळ राजकीय उद्देशांसाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे हा विषय अत्यंत दुखरा बनवला गेला आहे. सत्याला महत्व राहिलेले नाही. जाती-जातीत साशंकता, जातीतून स्वार्थ साधण्याच्या शक्यता, साधन / इंधन म्हणून एखाद्या जातीबद्दलच द्वेष या गोष्टी "पुरोगामी महाराष्ट्रा"त अत्यावश्यक बनल्या आहेत. मोठी मतदारसंख्या आपल्यामागे एकत्र ठेवायची असेल तर त्यांना प्रिय वाटणारी काही गृहीते द्यावी लागतात, एक शत्रू दाखवावा लागतो - म्हणजे ही मोठी संख्या आपला राजकीय स्वार्थ साधायला वापरून घेता येते.
त्यामुळे "गळ्यात गाडगे कमरेला खराटा", कोरेगाव भीमा लढाईत सिदनाक, ही लढाई म्हणजे काहीतरी सामाजिक कारणाने झालेली असणे - अशी अनेक गृहीते सर्रास लोकांच्या माथी मारली जातात, त्यांचा राजकीय कारणासाठी, स्वार्थासाठी वापर होतो. आणि अनेक लोकांना ही गृहीते प्रिय वाटत असल्यामुळे त्यांचे खरेखोटेपण तपासण्याची कल्पना त्यांना सहन होत नाही.

राजन म्हणाले...

०१ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमा येथे काय घडले?

याबद्दल वेगवेगळे दावे केले गेले, केले जातात. त्यावर लोक वाद घालत असतात.

पण खरे काय आहे? त्या काळी याबद्दल कोणी काही अधिकृत नोंद केली होती का?

-

साताऱ्याच्या दरबारात ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी असलेला जेम्स ग्रांट डफ हा त्या घटनेला समकालिन होता. एवढेच नव्हे तर त्या घटनेची जी वर्णने कंपनीच्या तुकडीच्या प्रमुखाने कळवली, नोंदली गेली ती त्याच्या नजरेखालून गेली असावीत अशा हुद्द्यावर होता.

-

या ग्रांट डफ ने सातारा दरबारातील त्याच्या कारकीर्दीत त्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे "मराठ्यांचा इतिहास" लिहिला. मराठा राज्य संपून कंपनीचे राज्य आले त्याचा तो केवळ साक्षीदारच नव्हता तर त्यातील काही कारवाया त्याने केलेल्या, घडवून आणलेल्या होत्या.

-

कोरेगाव भीमा बद्दल तो काय म्हणतो ते त्याच्या लिखाणाच्या तिसऱ्या खंडात पृष्ठ ४३२ ते ४३८ वर उपलब्ध आहे. समजून घेण्यात रस असेल तर पुढील लिंक वर पहा.

https://archive.org/stream/in.ernet.dli.2015.63151/2015.63151.A-History-Of-The-Mahrattas-By-James-Grant-Duff-Esp-Voliii#page/n449/mode/2up

राजन म्हणाले...

गळ्यात गाडगे आणि कमरेला खराटा लावावा लागत होता - हे आज जवळपास दीडशे वर्षे सांगितले जाते. पण हे खरे आहे?
डॉ. आंबेडकरांनी लाहोरच्या जातपाततोडक संमेलनाच्या अध्यक्षपदावरून वाचण्यासाठी जे भाषण तयार केले होते ते पुढे Annihilation of Castes या नावाने प्रबंध रूपाने प्रसिद्ध केले गेले. त्यामध्ये हा उल्लेख होता. कोणी वाचकाने ०५ जून १९३६ च्या "केसरी" मधून प्रश्न विचारला होता, की हे खरे आहे का? त्यावर डॉ. आंबेडकरांनी ०६ जुलै १९३६ रोजीच्या केसरी मधून उत्तर दिले होते की "ही कथा अस्पृश्य लोकांमध्ये कितीतरी दिवसांपासून प्रसृत झालेली आहे" (जसेच्या तसे शब्द). पुणे ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यापासून पूर्ण पेशवे दप्तर ब्रिटिशांच्या ताब्यात आले, आणि त्यांनी ते जपून ठेवलेले होते - आजही पाहायला मिळते. त्यात कुठेही असा साधा उल्लेखही सापडत नाही. याबद्दल प्रश्न विचारणाऱ्याने विचारले होते - तसा काही संदर्भ नसल्याचे डॉ. आंबेडकरांच्या उत्तरावरून स्पष्ट होते.

थोडे मागे जाता आढळून येते की पेशवे आणि ब्राह्मण यांना खलनायक ठरवून ब्रिटिशांना त्यापासून वाचवणारे उपकारकर्ते ठरवण्याच्या कामात - त्याचबरोबर लोकांना ख्रिश्चन बनवण्याच्या कामात अनेक खोट्या गोष्टी लिहिल्या - पसरवल्या गेल्या. (तरीही भारतात अस्पृश्यता होती, अन्याय होते. स्त्रियांना दुय्यम दर्जा होता हे यामुळे खोटे ठरत नाही. ब्रिटिशांच्या मोहिमेत अनेक गोष्टी "बढा चढा कर" सांगितल्या गेल्या. काही पूर्ण खोट्या सांगितल्या गेल्या). रेव्हरंड जॉन मरे मिचेल याने ब्राह्मण जातीविरुद्ध लोकांना भडकावून ख्रिश्चन बनवण्याच्या कामात मोठे यश मिळवले. असे अनेक वृत्तांत त्याने आपल्या In Western India या वर्णनात्मक पुस्तकात लिहिले आहेत. या "गळ्यात गाडगे - कमरेला खराटा" कथेचा मूळ लेखक हा मिचेल होता. त्याचे खरे मानून राजारामशास्त्री भागवत यांनी १८८८ सालच्या त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला. तेव्हापासून हे खरे मानले जाऊ लागले.

Unknown म्हणाले...

खरी गोष्ट आहे
आपण बरोबर बोलत आहात...