सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

बाजीराव पेशव्याची निरर्थक दिल्ली स्वारी !



            स. १७३७ मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्याने दिल्लीवर चढाई करून एकप्रकारे मोगल बादशाहीचे नाक कापले असे समजले जाते. बाजीरावाच्या या स्वारीविषयी बऱ्याच प्रमाणात लेखन झाले असले तरी या मोहिमेतील कित्येक महत्त्वाच्या गोष्टींकडे / घटनांकडे मराठी इतिहास अभ्यासकांचे दुर्लक्ष झालेले आहे.
         बाजीरावाच्या दिल्लीवरील धडकेचे तारखांनिशी खालील प्रमुख टप्पे मराठी रियासत खंड – ४ मध्ये देण्यात आले आहेत.
(१) ५ – १ – १७३७ :- बाजीराव नर्मदापार झाला
(२) १० – १ – १७३७ :- भेलसा काबीज ; बुंदेलखंडात भदावर स्वारी
(३) १ मार्चच्या सुमारास होळकर व बाजी भिवराव यमुनापार
(४) १२ – ३ – १७३७ :- जळेश्वर नजीक होळकराचा पराभव
(५) १६ – ३ – १७३७ :- सादतखान आगऱ्यासमोर यमुनेवर दाखल
(६) २२ – ३ – १७३७ :- कोटीला येथे होळकर बाजीरावास सामील
(७) २३ – ३ – १७३७ :- सादतखान, खानडौरा व बंगश यांची मथुरेवर भेट
(८) २८ – ३ – १७३७ :- बाजीरावाची दिल्लीवर धडक
(९) २९ – ३ – १७३७ :- रामनवमीस दिल्ली येथील कालिकेची यात्रा लुटली
(१०)        ३० – ३ – १७३७ :- होळकराने बादशाही फौजेचा पराभव केला ; याच दिवशी कमरुद्दीनखानासोबत बाजीरावाचा संघर्ष घडून आला
(११)        १ – ४ – १७३७ :- खानडौरा, सादतखान व महंमदखान बंगश यांच्या फौजा दिल्लीस दाखल
(१२)        ५ – ४ – १७३७ :- बाजीराव जयपूर नजीक दाखल
{ मराठी रियासतीमध्ये सरदेसाई यांनी बाजीरावाच्या या मोहिमेच्या ज्या तारखा दिल्या आहेत, त्या अजिबात विश्वसनीय नाहीत. दुदैवाने मराठी रियासतींचे संपादन करणाऱ्यांनी देखील याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तूर्तास, अचूक अशा तारखा माझ्याकडे उपलब्ध नसल्याने पुढील विवेचनासाठी मराठी रियासतीमधील काही तारखांचा आधार घेणे भाग आहे. }
        वस्तुतः स. १७३६ मध्येचं बाजीराव दिल्लीवर चालून जाण्याच्या बेतात होता पण परिस्थिती अनुकूल नसल्याने त्याने आपला हात आवरता घेतला.
   स. १७३७ मध्ये बाजीरावाने मागील वर्षी रहित केलेला बेत अंमलात आणण्याचा निश्चय केला. बाजीराव असा काहीतरी धाडसी निर्णय घेईल याची मोगली मुत्सद्द्यांना जाणीव होतीच. त्यानुसार सर्व उमरावांना युद्धासाठी सज्ज होण्याचे इशारे गेले होते. मोगल वजीर कमरुद्दीनखान मोठ्या तयारीनिशी दिल्लीतून बाहेर पडणार होता. आघाडीला त्याने मीरबक्षी खानडौरा व महंमदखान बंगश यांना पाठवले. फैजाबादहून सादतखान आपला पुतण्या अबुल मन्सूरखान सफदरजंग याच्या सोबत आगऱ्याच्या दिशेने निघाला. दक्षिणेत निजामाला देखील बादशाहने फर्मान पाठवून आपल्या मदतीस बोलावले. निजामाला पायबंद देण्याची जबाबदारी बाजीरावने चिमाजीवर सोपवली होती. त्याशिवाय शाहूचे मराठी सरदार देखील याच कामगिरीवर नियुक्त करण्यात आले होते. परंतु, निजाम हेतुपूर्वक निष्क्रिय राहिल्याने त्याच्याकडून बाजीरावास किंवा मराठी राज्यास यावेळी कसलाही उपद्रव झाला नाही.
       बाजीरावाने दिल्ली स्वारीचे वर्णन करणारे एक प्रदीर्घ पत्र आपला धाकटा भाऊ चिमाजी यांस लिहिले आहे ते खालीलप्रमाणे :-
 “ श्रियासह चि. रा. आपा यांसी, बाजीराव बल्लाळ आशीर्वाद उपरी, येथील कुशल तागाईत छ १५ जिल्हेज मु. नजीक सवाई जयनगर. विशेष बुंदेलखंडचा राजा जगतराज याचे हवाली बुनगे बुंदेलखंडांत रवाना करून आम्ही सडे जाहलो. याचे वृत्त सादतखानाचें युद्ध होऊन सरदार आल्याचें वर्तमान विस्तारें लेखन चतुर्भुज कासिदाबरोबर पत्रें पाठविलीं, तीं पावून सविस्तर वर्तमान कळलेंच असेल. सादतखान यमुना उतरोन आगरीयासीं आला. त्यासी गांठ घालावी तरी तो आगरियाचा आश्रय असतां मोडे न मोडे. गंभीर यमुनेच्या संगमीं धीर धरून राहवें तरी ते जागीं जाऊन कोतरखळ्या फार ; खानडवरा व महंमदखान बंगस वगैरे दिल्लीहून आगरियास येत होते ते, व सादतखान एक झालिया मनसबा भारी पडेल. याजकरितां संगमीं राहणें उत्तम नव्हे. दुसरें, सादतखानांनी बादशहास व अमिरास लिहून पाठविलें कीं, मराठ्यांची फौज यमुना उतरोन आली होती ते बुडविली. दोन हजार स्वार मारिले व दोन हजार नदींत बुडाले. मल्हारजी होळकर व विठोबा बुळे कामास आले. बाजीरावाची धाड आली होती तिची गत हे जाहली. आम्ही यमुना उतरोन मराठे बुडवून चमेलीपार करितों. म्हणून कित्येक गप्पा लिहून पाठविल्या. पातशहांनीं खुशाली कळवून सादतखानास वस्त्रें व मोत्यांची माळ व शिरपाव पाठविला ; व वकीलासही शिरपाव दिला. सादतखानांनीं आपली बाजू शेर करून घेतली. वरकड अमीरांसही कित्येक प्रकारें धिक्कारून लिहिले. तें वृत्त रा. धोंडो गोविंद यांनीं वरचेवर लिहून पाठविलें. तात्पर्यार्थ आमचे फौजेंत जीव नाहीं केवळ निर्जीव, बुडवून नेस्तनाबूद केली असें लिहित. लपंडाव करून दाखविले. मोगली कारभार, आपण ऐकत जाणतच आहेत. करावें थोडें, लिहावें फार. पातशहास सत्य भासलें तें मिथ्या केलें पाहिजे. त्याचे विचार दोन. एक सादतखानास बुडवावें, किंवा दिल्लीस जाऊन दिल्लीचे पूर जाळावे तेव्हां मिथ्या होईल. त्यास, सादतखान आगरे सोडीनासे देखोन, आम्ही दिल्लीस जावयाचा निश्चय केला. पुरे जाळावे व मराठे आहेत असें पातशहास अवलोकन करवावें, ऐसा विचार करून, २६ जिल्कादीं ( १८ – ३ – १७३७ ) कूच करून पातशाही रस्ता सोडून लांब मजला करून दमनसिंग चूडामण जाठाचे मुलखांतून नेवातयाचे सरहद्दें डोंगर किनाऱ्यानें चालिलों.
     खानदौरा व बंगस आगरियास गेले. यांची व सादतखानाची भेट २ जिल्हेजीं ( २३ – ३ – १७३७ ) झाली. ( पेशव्यांचा वकील ) धोंडोपंत खानदौरापाशीं होते. सादतखानानें खानदौरास सांगून पाठविलें, कीं ‘ बाजीराव याची फौज आपण मोडली. बुनगे पळाले. ते खासाही चमेल उतरोन गेले. अद्याप तुम्ही त्याची खुशामत करितां ! वकील ठेवून घेतला आहे हें कोण्या विचारे ? वकीलास निरोप देणें.’ त्यावरून धोंडो वकील यासीं निरोप दिल्हा. आम्हांजवळ आले. कमरुद्दीनखान, अजीमुल्लाखान वगैरे आले. आम्हीं त्यांजसीं गांठ न घातली. सातां कोसांवर उजवे बाजूस आमचे हातें त्यांस टाकून लांबलांब मजली वीस कोसांच्या करून दोन मजलींनीं ७ जिल्हेजीं ( २८ मार्च ) दिल्लीस बारापुला व कालिकेचें देऊळ उजवे हातें टाकून जाऊन कुशबंदी नजीक शहर येथें मुक्काम केला. पुऱ्यास आगी देऊन शहर खाक करावें, त्यास दिल्ली महास्थळ, पातशहा बरबात जालियांत फायदा नाहीं. दुसरें, पातशहाचे व खानडौराचे चित्तांत सलूख करावयाचें आहे. मोगल यांस सलूख करुं देत नाहींत. अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो. याकरितां आगी लावायाचें तहकूब करून, पातशहास व राजे बखतमल्ल जयसिंगाचा वकील दिल्ली येथें यांसीं पत्रें पाठविलीं. शहरांतून दोन हत्ती व घोडी उंटें आलीं होतीं तीं सांपडलीं. लष्करचे लोकांनीं शहरचे लोक मंगळवार रामनवमी २९ मार्च रोजीं भवानीचे यात्रेस बाहेर आले होते, त्यांस झांबडाझांबड केलें. दुसरे दिवशीं बुधवारीं ( ३० मार्च ) पातशहाचे आज्ञेनें बखतमल्ल यांनीं उत्तर पाठविलें कीं, धोंडोपंतास पाठविणें. त्यावरून मशारनिल्हेस पाठवावें तरी, आम्ही शहराजवळ आलों, यांमुळें दिल्लीत गलबला झाला, यांमुळें पाठविले नाहींत. भला मनुष्य व स्वार पाठवून देणें. मशारनिल्हेस पाठवून देतों, आम्ही शहरानजीक राहिल्यानें, शहरास उपसर्ग लागेल, याकरितां कूच करून झीलच्या तलावावर जातों.’ म्हणून उत्तर पाठवून आम्हीं कूच केलें.
      शहराजवळून येत असतां, पातशहांनीं नबाब मीर हसनखान कोका दरोगा खास चौकी, नबाब अमीरखान व खोजे रोजअफजूखान, राजे शिवसिंग जमातदार रिसाले अमीर, व मुजफरखान, नायब बक्षीगिरी आहादी व नबाब मुजफरखान, खानीदौराचे बंधु, सात आठ हजार फौजेनिशीं शहराबाहेर रिकाबगंजाजवळ आले. राजश्री सटवाजी जाधव पुढें गेले होते त्यांची व मोगलांची गांठ पडली. झटपटी होत होती. मशारनिल्हेनीं आम्हांस सांगोन पाठविलें त्यावरून रा. मल्हारजी होळकर व राणोजी शिंदे व तुकोजी पवार व यशवंतराव पवार, व मानाजी पायगुडे व गोविंद हरि पाठविले. त्यांचें यांचें झुंज होऊन मोगल मोडिले. राजे शिवसिंग वगैरे दहा बारा दरबारी ठार झाले. नबाब मीरहसनखानकोका जखमी झाला. दिगरबादे चौकी पातशहाचे अडीच तीनशें मेले. चारशें माणूस जखमी जालें. रोजअफजूखान व अमीखान व मुज्फरखान वगैरे शहरांत पळोन गेले. रा. राणोजी शिंदे याजकडील इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेली. वरकड नामांकित माणूस कोणी ठार झालें नाहीं. घोडे माणूस जखमी झाले. तदनंतर आम्ही झीलच्या तलावावर मुक्काम केला. ( दिल्लीचे दक्षिणेस तीन मैल. झील म्हणजे सखल जमीन ) संध्याकाळच्या चार घटका दिवस बाकी राहिला, तों कमरुद्दीनखान पातशहापुरावरून आल्याची खबर आली. तेच क्षणीं आम्ही तयार होऊन गेलों. त्यांचे आमचे फौजेचें युद्ध झालें. बारांत गेलेला एक हत्ती रा. यशवंतराव पवार यांणीं घेतला. घोडीं उंटें लष्करांत आलीं, त्यास दिवस अस्तमानास गेला. रात्रींचा दम धरून चौगीर्द मोगल वेढून बुडवावा, तरी झीलचा तलाव सोळा कोस लांब, उजवीकडे कमरुद्दीनखान, पुढें शहर. दुसरें, आम्ही दिल्लीस गेल्याचें वर्तमान नबाब खानदौरा व सादतखान व महंमदखान बंगस यांसी ७ जिल्हेजीं ( २८ मार्च ) मंगळवारीं राधाकुंडाचे मुक्कामीं कळतांच सडेसड होऊन पंचवीस तीस हजार फौजेनें बडेलास बत्तीस कोस येऊन मुक्काम केला. दुसरे दिवशीं ( बुधवारीं ) अलावर्दीच्या नाल्यावर पंचवीस कोस मुक्काम केला.
       गुरुवारीं प्रातःकाळी खानदौरा, सादतखान, बंगस व कमरुद्दीन सारे एक होणार. एक झाल्यावर सोसणार नाहीं, व शहर समीप. यास्तव मोगलांस टाकून चहूं कोसांवर मुक्काम केला. आम्हाकडील फिरंगोजी पाटणकरास गोळी लागोन ठार झाला. वरकडही दहा पांच माणूस व घोडीं जखमी झालीं, मोगलांकडील दहापांच ठार झाले. दहावीस जखमी झाले. गुरुवारीं सादतखान व खानदौरा व बंगस सारे कमरुद्दीनखानाजवळ आले. अलाबर्दीपासून ( सराई अलाबर्दीखान दिल्लीच्या दक्षिणेस १४ मैल ) झीलच्या तलावापर्यंत मुक्काम करून आहेत. आम्ही मोगल पाठीवर घेऊन दाबांत आणून बुडवावे , या विचारें कूच करून रेवाडी, कोटपुतळी, मनोहरपुरावरून आलों. अद्याप सारे मोगल अलाबर्दी व झीलच्या तलावावरी आहेत म्हणोन बातमी वर्तमान आलें. खानदौराची पत्रांवरी पत्रें सवाई जयसिंगजीस गेलीं. त्यांवरून ते पंधरा सोळा हजार फौज व तोफखाना देखील स्वार होऊन बासव्यावर ( जयपूरच्या ईशान्येस ३० मैल ) गेले आहेत. भेटीस जातात. सवाईजींचीं पत्रें ममतायुक्त आपला मुलुख रक्षावा म्हणून येतात. आम्हांकडील व्यंकाजीराम त्यांजपाशीं आहेत, त्यांजपासून लिहीवीत असतात. आम्ही त्यांचे मुलखाचे वाटेस जात नाहीं. वाटेनें दाणादुणा देतील. अभयसिंग जोधपुरास आहेत. आम्ही आतां ग्वालेर प्रांतें बाकीसाकी राहिली आहे, ती वसूल करून, मोगल मागें मागें आले तरी त्यास हैराण करून, पायींची धांपा देऊन, धावतां धावतांच खराब होत तेंच करून, दाबांत आणून, गांठ घालून, राजश्री स्वामींचें पुण्यें, व वडिलांचे आशीर्वादें बुडवितों. आमची चिंता न करणें, मुख्य गोष्टी खानडौराचे व पातशहाचे चित्तांत सलूख करावयाचें आहे. मोगल यांणीं हिंमत धरिली आहे. त्यांतें शीरोपस्थ सादतखान आहे. त्याचा गर्व श्रीसंकल्पें हत जालियास, सर्व मनोदयानुरूप होईल. मनोदयानुरूप सलूख जालिया करुं, नाहीं तरी सलूख करीत नाहीं. दिल्लीभवता मुलूख खालसा केला. पुढें सोनपतपानपत यमुनापार मुलूख राहिला, तोही ताराज करून मोगल अन्नास महाग होत ऐसेंच केलें जाईल. होईल तें वृत्त मागाहून तुम्हांस लिहून पाठवूं. कदाचित मोगल दिल्लीस राहिले, तरी आगरियास जाऊन अंतर्वेदींत उतरून कुल मुलूख तराज करितों. नबाब निजाम उल्मुल्क यांनीं गडबड केली, रेवा उतरले, तरी तुम्हीं मागें शह देणें. पेशजी लिहिलें आहे त्याप्रमाणें करणें. मारून ताराज करणें. इकडेस सक नाहीं. तिकडेसही नाहींसा करणें. निजामास पायबंद असलिया उत्तम आहे. लोभ असों दीजे हे आशीर्वाद.”
        बाजीरावाच्या उपरोक्त पत्रातील तारखांच्या बाबतीत देखील सरदेसाई व रियासत संपादक मंडळाने गोंधळ केला असल्यामुळे ; तसेच सदर पत्राच्या छपाईमध्ये देखील चुका झाल्यामुळे या पत्राची विश्वसनीयता बरीच कमी झाली आहे.
         बाजीरावाने वरील पत्र ता. ५ एप्रिल १७३७ रोजी म्हणजे दिल्लीवरील चढाईनंतर सुमारे ४ - ५ दिवसांनीच लिहिले आहे. मुख्यतः या पत्राच्या आधारेच बाजीरावाच्या या मोहिमेचे विश्लेषण केले आहे.
         नर्मदापार झाल्यावर बाजीरावाने भेलशाचे ठाणे ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने ग्वाल्हेरवरून भदावरप्रांती स्वारी केली. तेथील शासक गोपाळसिंग व त्याचा मुलगा अनिरुद्धसिंग हे मोगल दरबाराशी एकनिष्ठ असल्याने व भदावरकरांच्या ताब्यात चंबळ नदीच्या उतारावरील अटेर  नामक मोक्याचे ठाणे असल्याने त्या राजावर आपला शह बसवणे बाजीरावास आवश्यक वाटले. बाजीरावाने भदावर प्रांतावर स्वारी केल्याचे समजताच सादतखानाने गोपाळसिंगास मदतीचे आश्वासन दिले. तेव्हा मोगली कुमक येईपर्यंत ठाणी लढवण्याचा निर्णय गोपाळसिंगाने घेतला. इकडे पेशव्याने लष्करी व कुटनीतीच्या बळावर भदावर प्रांत ताब्यात घेण्याचा उद्योग आरंभला. गोपाळसिंगाचा एक मुलगा बाजीरावाने हाताशी धरला. याविषयी मराठी रियासतीमध्ये आलेली माहिती पुढीलप्रमाणे :- “ वर्तमान कळतांच सडे फौजेनिशीं शहरावर चालोन घेतलें. शहर घेऊन कोटास मोर्चे लाविले. तेव्हां अनिरुद्धसिंग शरण येऊन भेटला ( १८ फेब्रुवारी १७३७ ), वीस लक्ष खंडणी कबूल केली, पंधरा लक्ष रोख दिले, पांचाबद्दल ओलीस दिले. लुटीनें लष्कर अभर झालें. सर्व प्रांत लुटून ताराज केला. दुसरी फौज पाठवून भदावरही लगोलग घेतलें. सादतखानाकडून राजाचें साह्य कांहीं एक झालें नाहीं.”   मराठी रियासतीमधील हि हकीकत अटेरचे ठाणे घेतले त्या प्रसंगाची आहे.
          भदावरच्या मदतीस सादतखान व त्याचा पुतण्या सफदरजंग फैजाबादहून त्वरेने पुढे येत होते. परंतु ते येऊन पोहोचण्याआधीच गोपाळसिंगाने शरणागती पत्करली. अटेरचे ठाणे बाजीरावाच्या हाती पडले होते. अटेर हाती आल्यावर बाजीरावाने ताबडतोब बाजी भिवराव यास चंबळ व यमुनेच्या उतारांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवली व ती त्याने चोखपणे पार पाडली ! बाजी भिवरावने नदी उतारांचा बंदोबस्त केल्याने सादतखानास यमुनापार करून बाजीरावावर चालून येणे शक्य होईना. इकडे दिल्लीतून खानडौरा व महंमदखान बंगश आगऱ्याच्या रोखाने रवाना झाले होते. त्यांच्या पाठोपाठ खासा मोगल वजीर कमरुद्दीनखान येत होता. या सर्व मोगल सरदारांची गाठ पडण्याआधीच प्रत्येकाला एकएकटे गाठून त्यांचा समाचार घेण्याचा बाजीरावाने बेत आखला.
        त्यानुसार मार्चच्या आरंभी किंवा फेब्रुवारी अखेरीस केव्हातरी मल्हारराव होळकर, विठोजी बुळे व पिलाजी जाधव यमुना पार करून सादतखानावर चालून गेले. या फौजेचे नेतृत्व बहुतेक मल्हाररावाकडे होते. त्याच्या नेतृत्वाखालील सैन्याने प्रथम शुकोहाबादला वेढा घातला. तेव्हा तेथील किल्लेदार लालजी खत्री याने दीड लाख रुपये व एक हत्ती देऊन आपला बचाव केला. तेथून होळकराने आपला मोर्चा फिरोजाबादच्या दिशेने वळवला. तिथे लुटालूट करून मराठी फौजा जळेश्वर येथे आल्या. या ठिकाणी सादतखानाच्या आघाडीच्या पथकांचा व मराठी सैन्याचा सामना घडून आला. सादतखानाच्या आघाडीची फौज सफदरजंगच्या नेतृत्वाखाली या जळेश्वर नजीक येऊन पोहोचली. शत्रूसैन्याची बातमी मिळताच, होळकराने या सफदरजंगच्या तुकडीला घेरण्यासाठी जाळे विणायला आरंभ केला. परंतु ; सफदरजंग या ठिकाणी लष्करी डावपेचांत होळकरास भारी पडला. होळकरासोबत लढण्याच्या भरीस न पडता त्याने लढत – लढत माघार घेण्याचे ठरवले. सफदरजंगचा कावा होळकराच्या लक्षात आला नाही. तो सफदरजंगच्या पाठीवर त्याला घेरण्यासाठी निघाला. परंतु, जेव्हा सफदरजंग मागे फिरून सादतखानाच्या मुख्य सैन्यास जाऊन मिळाला तेव्हा होळकरास आपली चूक कळून आली. आता माघार घेण्याची पाळी होळकराची होती !
          सादतखानाच्या अवाढव्य लष्करासोबत लढण्याची आपली तयारी नाही हे ओळखून मल्हारराव यमुनेच्या दिशेने जाऊ लागला. पण, होळकरास सहजासहजी जाऊ देण्यास सादतखान तयार नव्हता. सादतखानाच्या फौजेने माघार घेणाऱ्या मराठी सैन्यावर जोरदार हल्ले चढवले. शत्रूचे हल्ले परतवत होळकर वेगाने यमुना नदी जवळ करत होता. अखेर जळेश्वर पासून सुमारे ३० – ३५ किमी अंतरावर असलेल्या इतिमादपूर येथे होळकर व सादतखानाची मोठी लढाई घडून आली. या लढाईमध्ये मराठी सैन्याचा पराभव होऊन सुमारे एक हजार मराठी सैनिक शत्रूहाती कैद झाले. इतिमादपूर पासून जवळपास ४ – ५ किमी अंतरावर यमुना नदी वाहते. होळकराने बहुतेक याच ठिकाणी किंवा जरा वरच्या बाजूला आगऱ्यासमोर यमुना पार केली असावी. सादतखान व मल्हाररावाची हि लढाई १२ मार्च १७३७ रोजी घडून आली. पराभूत झालेली मराठी सेना २२ मार्च १७३७ रोजी ग्वाल्हेरनजीक कोटीला येथे बाजीरावाच्या छावणीत दाखल झाली असे सरदेसाई लिहितात. माझ्या मते, सरदेसाई यांनी तारखांची बरीच गल्लत केली आहे. कारण, लढाई झाल्यावर सुमारे दहा दिवसांनी होळकर बाजीरावाकडे जातो हे तितकेसे पटत नाही. यावेळी बाजीरावाचा तळ तत्कालीन प्रघातानुसार युद्धआघाडीपासून सुमारे १०० – १२५ किलोमीटर्स अंतरावर असावा. सरदेसाई ज्या कोटीला गावी बाजीरावाचा मुक्काम होता असे सांगतात ते स्थळ नकाशामध्ये सापडत नसल्याने याविषयी अधिक काही लिहिता येत नाही.
          होळकर यमुना उतरून गेल्यावर पाठोपाठ सादतखान देखील यमुना नदी पार करून आगऱ्यास दाखल झाला. यावेळी दिल्लीहून निघालेले बंगश व खानडौरा आगऱ्याच्या जवळ आले होते.
               जी गोष्ट टाळण्याचा बाजीरावाने आटोकाट प्रयत्न केला होता अखेर ती घडून आली. बंगश व खानडौरा यांच्या फौजा कोणत्याही क्षणी सादतखानास येऊन मिळण्याची शक्यता होती. ते येण्यापूर्वी सादतखानावर हल्ला करावा तर त्याने आगऱ्याच्या किल्ल्याचा आश्रय घेतला असता. आगऱ्याच्या किल्ल्याला वेढा घालून तो तडकाफडकी ताब्यात घेण्याची बाजीरावाची तयारी नव्हती. तेव्हा त्याने आपली रणनीती बदलली. प्रथम त्याने आपल्या छावणीतील सर्व बुनगे रणक्षेत्रापासून लांब बुंदेलखंडात रवाना केले व सड्या फौजेनिशी दिल्ली गाठण्याचा बेत आखला !
            वस्तुतः आरंभी तरी बाजीरावाचा बेत वेगळाच होता. मोगल सरदारांना एककटे गाठून त्यांचा पराभव करून मग दिल्ली गाठण्याचा त्याचा विचार होता. परंतु, सादतखानाने होळकरास उधळून लावल्यामुळे बाजीरावास आपले डावपेच बदलावे लागले. खरे पाहता, बाजीरावाच्या दिल्ली स्वारीची योजना इतिमादपूर येथील लढाईने पार निकालात निघाली होती. सादतखानाने बाजीरावाचे सर्व मनसुबे उधळून लावले होते. जर इतिमादपूर अथवा इतरत्र सादतखानाचा पराभव झाला असता तर बंगश व खानडौरा यांना झटपट गुंडाळून बाजीरावाने दिल्लीचा घास घेतलाही असता. परंतु, सादतखान व सफदरजंगमुळे त्याची सर्व योजना फिस्कटली !
        लष्करातील बुणग्यांची व्यवस्था लावून झाल्यावर बाजीरावाने मोगल सरदारांच्या मुक्कामांची बातमी काढली. खानडौराच्या छावणीत असलेला बाजीरावाचा वकील धोंडोपंत हा मोठा हुशार व कारस्थानी असून मोगली गोटातील सर्व खडानखडा बातमी तो बाजीरावास कळवत असे. बाजीरावाच्या दिल्ली स्वारीला जे काही यश प्राप्त झाले त्यातील बरेचसे श्रेय या धोंडोपंतास जाते. वकील व हेरांनी दिलेल्या बातमीनुसार सादतखानाचा तळ आगऱ्यास होता तर खानडौरा व बंगश हे मथुरेजवळ राधाकुंड येथे येऊन पोहोचले होते. दिल्ली ते आग्रा हे अंतर सुमारे २०० किमी असून आग्रा ते राधाकुंड हे अंतर जवळपास ८० किलोमीटर्स आहे. तर अटेर ते दिल्ली ३०० किमी असून अटेर – आग्रा हे अंतर जवळपास १०० किलोमीटर्स आहे.
   दिल्ली – राधाकुंड - आग्रा – अटेर या स्थळांमधील अंतरे लक्षात घेतल्याशिवाय बाजीरावाच्या लष्करी करामतीची यथायोग्य कल्पना येणे अशक्य आहे.
       १८ मार्च ते २३ मार्चच्या दरम्यान केव्हातरी बाजीराव दिल्लीच्या दिशेने रवाना झाला. मोगल सरदारांना उजव्या बाजूला टाकून दूरवरूनचं त्याने शत्रू सैन्याला बगल दिली. इकडे २३ मार्च रोजी खानडौरा आणि बंगश, सादतखानास येऊन भेटले. या त्रिवर्ग मोगल सरदारांची भेट नेमकी कुठे झाली याची मराठी रियासतीतून स्पष्टता होत नाही. बाजीरावाच्या पत्रानुसार त्यांची भेट आगऱ्यास झाली तर सरदेसाई यांच्या मते त्यांची भेट मथुरेजवळ झाली. सरदेसाई यांच्या मतापेक्षा या ठिकाणी बाजीरावाच्या पत्रावर विश्वास ठेवणे भाग आहे. बाजीरावाचे पत्र गृहीत धरले असता असे म्हणता येईल कि, ज्यावेळी खानडौरा व बंगश आगऱ्यास येत होते त्याचवेळी बाजीराव त्यांच्या उजव्या बाजूने दिल्ली जवळ करत होता.
      खानडौरा व सादतखान यांची भेट झाल्यावर सादतखानाने खानडौरा यांस बाजीरावाच्या वकीलास रजा देण्याची सूचना केली. बाजीरावाचा वकील, धोंडोपंत यांस बाजीरावाच्या बेतांची कल्पना होती. खानडौराने त्यास छावणीतून जाण्याचा हुकुम करताच तो सरळ बाजीरावाच्या छावणीत दाखल झाला. वस्तुतः, सादतखानाची प्रामाणिक भावना होती कि आपण मराठी फौजेचा मोठा पराभव केला आहे. होळकरासारख्या नावाजलेल्या सरदारास आपण रणभूमी सोडून पळुन जाण्यास भाग पाडल्यामुळे बाजीराव हादरून गेला असावा. अर्थात, त्याची हि समजूत चुकीची असली तरी त्याच्या या समजुतीला बळ पुरवण्यास अप्रत्यक्षपणे बाजीरावच कारणीभूत झाला !
        दिल्लीकडे स्वारी करण्यापूर्वी जेव्हा त्याने आपले बुनगे बुंदेलखंडात पाठवून दिले तेव्हा शत्रूचा असा समज झाला की, बाजीराव घाबरला असून बुनगे लांब पाठवून तो वेगाने दक्षिणेत परत जात आहे. शत्रूचा हा गैरसमज बाजीरावाच्या पथ्यावर पडला.
         शत्रू गाफील असल्याची पक्की खबर बाजीरावास होती. त्याने या संधीचा फायदा उचलून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला. शत्रूसैन्याला बगल देऊन अटेर ते दिल्ली हे सुमारे ३०० किमी अंतर अल्पावधीत कापून २८ मार्च १७३७ रोजी बाजीराव दिल्ली शहराजवळ येऊन ठेपला.
        सामान्यतः असे मानले जाते कि, बाजीरावाने मोगल सरदारांस चकवून दिल्ली गाठली. परंतु, दिल्ली न लुटता किंवा मोगल बादशहावर आपली जरब न बसवताच तो मागे फिरला. पण यात अजिबात तथ्य नाही.
         बाजीरावाचे चिमाजीस पाठविलेले पत्र काळजीपूर्वक वाचेल असता असे दिसून येते कि, बाजीराव दिल्लीकडे जात असल्याची कुणकुण मोगल सरदारांस लागली होती. २८ मार्च १७३७ रोजी बाजीराव जेव्हा दिल्लीस पोहोचला तेव्हाच राधाकुंड मुक्कामाहून सादतखान, खानडौरा व महंमदखान बंगश दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. माझ्या मते, बाजीराव दिल्लीकडे चालल्याची बातमी प्रथम कमरुद्दीनखानास लागली होती. कारण ; खानडौरा व महंमदखान बंगश हे मथुरेच्या आसपास आले असले तरी कमरुद्दीन अजूनही मथुरेच्या वाटेवरच होता. त्यामुळे बाजीराव दिल्लीला जात असल्याची बातमी प्रथम कमरुद्दीनखानालाच प्रथम मिळणे स्वाभाविक आहे. तसेच बाजीरावाच्या पत्राचा आधार घेतल्यास दिल्ली नजीक सर्वप्रथम जे मोगली सरदार येऊन ठेपले त्यांत कमरुद्दीनखानाचे नाव सर्वप्रथम येते.               
             सोमवार २८ मार्च १७३७ रोजी बाजीराव दिल्लीजवळ आला. यावेळी कमरुद्दीनखान दिल्लीपासून सुमारे दीडशे किमी अंतरावर असलेल्या राधाकुंड नजीक होता. वस्तुतः शनिवारी २६ मार्च रोजी किंवा रविवारी २७ मार्च रोजीच त्याचा व बाजीरावाचा सामना घडून आला असता. परंतु, आपल्याला बगल देऊन बाजीराव दिल्लीला जात असल्याची कमरुद्दीनखानास अजिबात कल्पना नव्हती. त्याउलट, कमरुद्दीनखान आगऱ्यास निघाल्याची पक्की खबर बाजीरावास असल्यामुळे त्याने कमरुद्दीनला चकवून दिल्ली जवळ केली.
   माझ्या मते, २६ मार्च रोजी बाजीराव राधाकुंडच्या आसपास होता. माझे हे विधान निव्वळ तर्कावर आधारीत नसून भक्कम अशा पुराव्यावर आधारीत आहे. खुद्द बाजीराव आपल्या पत्रात लिहितो कि, “ कमरुद्दीनखान, अजीमुल्लाखान वगैरे आले. आम्हीं त्यांजसीं गांठ न घातली. सातां कोसांवर उजवे बाजूस आमचे हातें त्यांस टाकून लांबलांब मजली वीस कोसांच्या करून दोन मजलींनीं ७ जिल्हेजीं ( २८ मार्च ) दिल्लीस बारापुला व कालिकेचें देऊळ उजवे हातें टाकून जाऊन कुशबंदी नजीक शहर येथें मुक्काम केला. “ यावरून हे स्पष्ट होते कि २६ मार्च रोजी बाजीराव राधाकुंडच्या जवळ होता. तेथून त्याने दिल्लीपर्यंतचे सुमारे दीडशे किलोमीटर्सचे अंतर अवघ्या दोन दिवसांत कापले. त्याच्या या वेगवान हालचालीमुळे अनुभवी मोगल सरदार देखील काही काळ थक्क झाले !
       बाजीराव आपल्याला बगल देऊन दिल्लीकडे सटकल्याची बातमी कमरुद्दीनला २७ – २८ मार्चच्या दरम्यान केव्हातरी समजली. त्याने आपल्या सहकाऱ्यांना याविषयी सूचना देऊन तडक दिल्लीकडे आपल्या सैन्याचा मोर्चा वळवला. अवघ्या दोन दिवसांत बाजीराव दिल्ली गाठेल याची कोणीच कल्पना केली नव्हती. त्यामुळे मोगली सरदारांचा दिल्लीकडे जाण्याचा वेग हा काहीसा मंद राहिला.
        इकडे सोमवारी दिल्लीजवळ दाखल झालेल्या मराठी सैन्याने मंगळवार २९ मार्च १७३७ रोजी आपल्या अस्तित्वाची जाणीव मोगल बादशहा व दिल्लीच्या नागरिकांना करून दिली. त्या दिवशी रामनवमी असून कालिकेच्या देवळाजवळ यात्रा भरली होती. मराठी लष्करातील काही तुकड्यांनी हि यात्रा लुटली. वस्तुतः सोमवारी दिवसभरात केव्हातरी खासा बाजीराव पेशवा दिल्लीजवळ आल्याची किंवा मराठी सैन्य दिल्लीला येऊन थडकल्याची बातमी मोगल बादशहास मिळाली होती. मराठी सैन्याच्या या चढाईने हादरून जाऊन त्याने तहाची बोलणी करण्याचा निर्णय घेतला व आपल्या सर्व सरदारांना तातडीने बाजीरावाच्या पाठीवर येण्याचा हुकुम केला. मंगळवारचा दिवस मोगल बादशहाने कसाबसा घालवला. अजून मोगली सरदारांचा पत्ता नव्हता व बाजीरावाने आपल्या लष्करी सामर्थ्याची अल्पशी चुणूक दाखवली होती.
             इकडे बाजीरावाने देखील मंगळवारचा अख्खा दिवस एकप्रकारे वाया घालवला असेच म्हणावे लागते. मुळात दिल्लीला येण्यामागे त्याचा नेमका काय हेतू होता याची अजूनही स्पष्टता झालेली नाही. माझ्या मते, बाजीरावची हि स्वारी किंवा दिल्लीला मारलेली धडक पूर्णतः निरर्थक होती. जळेश्वर येथे होळकराचा पराभव झाल्यावर आपल्या लष्कराची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी त्याला एखाद्या चमकदार सैनिकी विजयाची नितांत आवश्यकता होती. त्यासाठीच त्याने दिल्लीवर स्वारी करण्याचा बेत आखला. नाहीतर सोमवारी दिल्लीत दाखल झाल्यापासून मंगळवार रात्रीपर्यंत हाताशी भरपूर फौज व संधी असूनदेखील त्याने दिल्ली लुटण्याचा किंवा मोगल बादशहास जरब बसेल असे एखादे कृत्य करण्याचा त्याने अजिबात प्रयत्न केला नाही याचा अर्थ काय घ्यायचा ?
      बाजीराव याविषयी आपल्या पत्रात लिहितो कि, “ पुऱ्यास आगी देऊन शहर खाक करावें, त्यास दिल्ली महास्थळ, पातशहा बरबात जालियांत फायदा नाहीं. दुसरें, पातशहाचे व खानडौराचे चित्तांत सलूख करावयाचें आहे. मोगल यांस सलूख करुं देत नाहींत. अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो. याकरितां आगी लावायाचें तहकूब करून, पातशहास व राजे बखतमल्ल जयसिंगाचा वकील दिल्ली येथें यांसीं पत्रें पाठविलीं. ” जर बाजीरावाने हा सर्व विचार आधीच केला होता तर मग दिल्लीला जाण्याचा अट्टाहास त्याने का केला ? मोगल बादशहा सोबत त्याला खरोखर तह करायचा होता किंवा आपण सांगू त्या अटींवर मोगल बादशहाने तह करावा अशी बाजीरावाची इच्छा होती तर त्या दृष्टीने त्याने काही वेगळ्याच हालचाली करायला हव्या होत्या पण तसे काही न करता त्याने फुकट आपल्या सैन्याची दमछाक मात्र करून घेतली !
         मोगल बादशहाने मंगळवारचा दिवस विचारात घालवला. तसेच शहरात जी काही हाताशी फौज होती तिच्या सहाय्याने मोगल सरदार मदतीस येईपर्यंत शहराचा बचाव करण्याची योजना आखली. माझ्या मते, आगऱ्याहून सादतखान व राधाकुंडच्या जवळ असलेला कमरुद्दीन वेगाने बाजीरावाच्या पाठीवर धावून येत असल्याच्या बातम्या बादशहाला मिळाल्यामुळे त्याचे खचलेले अवसान पुन्हा बळ धरू लागले होते.
     इकडे मंगळवारी रामनवमीची यात्रा लुटून बाजीराव जरी लष्करी आघाडीवर स्वस्थ बसला असला तरी राजकीय आघाडीवर मात्र त्याची धडपड सुरू होती. त्याने आपला वकील मोगल बादशहा व जयपूरच्या सवाई जयसिंगचा दिल्लीतील वकील राजा बखतमल्ल यांच्याकडे पाठवून तहाची वाटाघाट आरंभली. खुद्द मोगल बादशहा देखील याप्रसंगी धरसोड वृत्तीने वागत असल्याचे दिसून येते. बाजीरावासोबत लढावे कि तह करावा याविषयी त्याचा निश्चय होत नव्हता. दिल्लीच्या वाटेवर असलेल्या खानडौराची देखील अशीच मनःस्थिती असल्याचे दिसून येते. त्याने मोगल बादशहाला बाजीरावाशी तह करण्याचा सल्ला दिला.
          बुधवार ३० मार्च १७३७ रोजी बादशहाच्या आज्ञेनुसार बखतमल्ल याने बाजीरावास सुचवले कि तहाच्या वाटाघाटीसाठी धोंडोपंतास पाठवून द्यावे. परंतु, दिल्लीतील राजकीय बनावाचा अंदाज लागत नसल्यामुळे बाजीरावाने आपला वकील बादशहाच्या भेटीस पाठवला नाही. मोगल बादशहाच्या हेतूंचा अजिबात अंदाज येत नसल्याने बाजीराव देखील यावेळी काहीसा धरसोड वृत्तीने वागल्याचे दिसून येते. आपला वकील बादशहाच्या भेटीस न पाठवता सैन्याचा तळ उठवून शहरापासून ३ – ४ मैल अंतरावर त्याने छावणी टाकली. यामागील त्याचा हेतू उघड होता. संधी मिळताच मोगली मुत्सद्दी दगा करण्यास चुकणार नाहीत याची बाजीरावाला कल्पना होती. अधिक सावधगिरीचा उपाय म्हणून बाजीरावाने आपली मुख्य छावणी व दिल्ली शहर यांच्यादरम्यान सटवोजी जाधवाची नेमणूक केली. बाजीरावाच्या अंदाजाप्रमाणे मोगलांनी आपले बळ आजमावून पाहिले.
       बादशहाच्या आज्ञेनुसार दिल्लीतील मोगल उमराव सुमारे सात – आठ हजार सैन्यासह बाजीरावाच्या छावणीवर चालून गेले. परंतु, छावणीच्या तोंडावर सटवोजी जाधवाची व त्यांची गाठ पडली. प्रसंग पाहून जाधवाने पेशव्याकडे अधिक कुमकेची मागणी केली असता पेशव्याने शिंदे, होळकर, यशवंतराव व तुकोजी पवार, हरि गोविंद यांना जाधवाच्या मदतीस पाठविले. दोन्ही फौजांची मोठी लढाई घडून, बादशाही फौजेची शिकस्त झाली. लढाई झाल्यावर मराठी फौजा आपल्या तळावर मागे परतल्या.
            मिळालेल्या विजयाचा फायदा घेऊन मराठी सैन्य दिल्लीला भिडले असते तर त्यांचा काही प्रमाणात आर्थिक फायदा झाला असता पण यावेळी पेशव्याचे दुर्दैव उभे राहिले !
          बुधवारी दुपारपर्यंत कमरुद्दीनखानाची फौज दिल्लीला येऊन धडकली होती. बाजीराव दिल्ली शहरातील सैन्याशी लढत असल्याची बातमी कमरुद्दीनला होती कि नव्हती हे समजायला मार्ग नाही. तसेच दिल्ली शहरातील मोगल फौज व मराठी सैन्याची लढाई चालू असताना कमरुद्दीन दिल्लीजवळ आला कि लढाई घडून गेल्यावर दिल्लीला पोहोचला याचीही स्पष्टता होत नाही.
            कमरुद्दीनखान दिल्लीजवळ आल्याचे समजताच बाजीरावाने त्याच्यावर चालून गेला. सकाळी दिल्लीतील मोगल फौजेशी लढून थकलेली मराठी पथके देखील या संघर्षात सहभागी झाली. बाजीराव व कमरुद्दीन यांच्यातील लढाई निकाली निघाली नाही. संध्याकाळ झाल्यामुळे उभयपक्षांचा बचाव झाला. बाजीरावाची बव्हंशी फौज लागोपाठ दोन लढाया कराव्या लागल्यामुळे दमली होती तर कमरुद्दीनची सेना प्रवासाने थकली होती.
        कमरुद्दीनची छावणी वेढून त्याला गुडघ्यावर आणण्याचा बाजीरावाचा आरंभी बेत होता परंतु तो त्यास सोडून द्यावा लागला. कारण ; सादतखान, बंगश व खानडौरा दिल्लीजवळ आले होते.
     गुरुवारी कमरुद्दीनखान, सादतखान, बंगश व खानडौरा यांच्या फौजा एकत्र होणार व आपल्यावर हल्ला चढवणार. जर आपण त्यांच्याशी लढत बसलो तर दिल्ली शहरातील मोडलेली फौज आपल्या पाठीवर येणार. अशा स्थितीत तुलनेने अल्प अशा आपल्या मराठी सैन्याचा पूर्णतः चुराडा होऊ शकतो याचा बाजीरावाला अंदाज आला. प्रसंग पाहून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला. बुधवारी मध्यरात्री किंवा गुरुवारी सुर्योदयापूर्वीच त्याने जयपूरच्या दिशेने कूच केले. रेवाडी, कोटपुतळी, मनोहरपूरमार्गे तो जयपूरजवळ ५ एप्रिलच्या सुमारास पोहोचला.
        आपल्या पाठीवर मोगली फौजा धावून येतील असा बाजीरावाचा अंदाज होता. त्यामुळे अवघ्या ४ – ५ दिवसांत जवळपास अडीचशे किलोमीटर्सचा प्रवास करून त्याने जयपूर गाठले होते. परंतु, मोगल सरदारांच्या विषयी जो काही बाजीरावाने अंदाज बांधला होता तो चुकीचा निघाला. बाजीरावाच्या पाठीवर धावून जाण्यास मोगल सरदार उत्सुक नव्हते. याचा अर्थ असा होत नाही की बाजीरावाची दहशत वा जरब त्यांना बसली होती अथवा बाजीरावाच्या तोडीचे रणचातुर्य त्यांच्याकडे नव्हते.
         वस्तुस्थिती काही वेगळीच होती. बाजीरावाने दिल्ली सोडून सरळ जयपूरचा रस्ता धरला. जयपूरचा सवाई जयसिंग हा बादशाही उमराव असला व बादशहाच्या आज्ञेने तो बाजीरावाच्या बंदोबस्तासाठी ससैन्य दिल्लीकडे येत असला तरी त्याचा व बाजीरावाचा अंतस्थ स्नेह जगजाहीर होता. किंबहुना, त्याच्या नेतृत्वा खाली राजपूत संस्थानिक निष्क्रिय राहिल्यामुळेच मराठी सत्ता आरंभी माळव्यात व पुढे उत्तर हिंदुस्थानात स्थिरावली. जयसिंग उदासीन राहिल्यामुळेच बाजीरावाला दिल्लीला धडक मारता आली. मोगल मुत्सद्दी हि वस्तुस्थिती जाणून होते. अशा परिस्थितीमध्ये बाजीरावाच्या पाठीवर धावून जाण्यात काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी ताडले. तसेच बाजीरावाने दिल्लीची लूट किंवा मोगल बादशहाचा उपमर्द न केल्याने बाजीरावाची दिल्ली स्वारी मोगली मुत्सद्द्यांना फारशी झोंबली नाही. त्याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मोगल मीरबक्षी खानडौरा हा जयसिंग व बाजीराव यांना अनुकूल होता. सारांश, सर्व वस्तुस्थिती लक्षात घेऊन मोगली सरदारांनी बाजीरावाचा पाठलाग करण्याचे टाळले. त्यावेळच्या गुंतागुंतीच्या राजकीय परिस्थितीमुळेच एकप्रकारे बाजीरावाचा बचाव घडून आला. अन्यथा, पानिपतपेक्षाही मोठा बिकट प्रसंग तेव्हा उद्भवलाच नसता असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
  बाजीरावाच्या दिल्ली स्वारीचा फलितार्थ :- उपलब्ध साधने पाहता माझ्या मते, बाजीरावाची हि स्वारी मराठी राज्याच्या दृष्टीने पूर्णतः निरर्थक होती. या मोहिमेमध्ये सैन्याची दमणूक झाली, हानी झाली पण म्हणावा तसा प्रादेशिक लाभ अथवा अर्थप्राप्ती झाली नाही. या मोहिमेतून निदर्शनास येणाऱ्या काही जमेच्या बाबी म्हणजे, मराठी लष्कराची कार्यक्षमता व बाजीरावाचे लष्करी नेतृत्व !  जळेश्वर येथे आपल्या प्रमुख सरदाराचा पराभव झाल्यावर व दिल्लीवर चालून जाण्याचा बेत साफ सोडून देण्याचा प्रसंग उद्भवल्यावर देखील ज्या प्रकारे बाजीरावाने दिल्लीला धडक मारली ते पाहता त्याच्या लष्करी नेतृत्वाची जितकी तारीफ करावी तितकी कमीच आहे ! 
   ज्या वेगाने मराठी सैन्याने दिल्ली जवळ केली व एकाच दिवशी दोन लढाया मारून लगेच दुसऱ्या दिवशी दिल्लीचा मुक्काम गुंडाळून राजपुतान्याकडे प्रस्थान केले, ते पाहून शत्रूसेना देखील त्यांचे सरदार देखील अचंबित झाले असावेत. माझ्या मते, इतक्या वेगाने हालचाली करणारे शिस्तबद्ध व कार्यक्षम असे लष्कर  तत्कालीन मराठी सरदारांच्या शिवाय इतर संस्थानिकांच्या पदरी नसावे !