शनिवार, १ एप्रिल, २०१७

पाटीलकी मोकदमी कदीम वतन माहाराचे





महाराष्ट्रेतिहासाची सा.                   ९ डिसेंबर १७५३  
विभाग ३                              २ सफर सलास खमसैन मया अलफ

    वरील मजकूर थोडा गेला आहे. 

    गुरव पिलाजी गोले यांची साखा संख्या करून वतनासी भांडतो. तो खोटा, त्यास व वतनासी आर्थाआर्थी संबंध नाही, यावरून देशमुख व देशपांडे व समस्त गोत व समाकुल पांढर व भोवरगाव यांचे साक्षीनसी महजर करून दिल्हा बिता
  
    महजरनामा व तेरीख ९ माहे जिल्हेज बि हुजूर हजर मज्यालसी गोत प्रांत वाई सरकार नबी शाहू दुर्ग उर्फ परनाला सुभे दारूलजफर विज्यापूर सु ११११ सन इसने मया अलफ ( १६ मे १७०२ )

रा| दताजी केशव नाईक व सूर्याजी फिरंगी न|| पिसाल देशमुख पा| मजकूर १
गोपाल सेटिया मल्हारजी व चौधरी मोवनसेट पाटना कसबा वाई १
जमाल पाटील कसबा वाई करनूरकर १
सिवाजी राजपुरे, रेतोजी राजपुरे १


रा| गंगाजी शंकर व गिरमाजी झुंगो देशपांडे पा| मजकूर १
 बावधनकर
तुळाजी पिसाळ का| मजकूर १
आपाजी पा| मजकूर १
बहिरोजी सेपटिया, सिवाजी चौगुला क|| मजकूर १
मौजे पसरणीकर मोकदम १
गोपाल कदम कसबे वाई १

    महजूर सेटी बीन नाग नाक महार मौजे नागेवाडी सा| मुऱ्हे पा| मजकूर यासी लिहून दिल्हा महजर यैसाजे. तुवा हुजूर येन जाहीर केले की मौजे नागेवाडी येथील कदीम पटेलकी आपली मिरास आपले वडील वडील चालवीत आले. देवाचे पुजेस गुरव धांडेघरकर येक व गौडालीकर येक यैसे दोघे गुरव गावात आणून ठेविले. त्यानी रहिवासी होताच आपले वडिलांचे मारेचुरे ( दंगे ) करून मिरास घेतली. आपण महार दूर उभा राहून असे गुरव जवळ जडला. लाचलुचपती देऊन मिरासीस जडला. आपण कदीम बुनादी आहे. साहेबी आपणास हाती धरून पांढरीवर बसऊन आपले हाते पटेलकी घेतली पाहिजे म्हणऊन विनती केली. त्यावरून मनास आणिता गुरव एकदोन वेळा बोलाविले परंतु ते येऊन उभे राहिनात. अगर पदरही झाडिनात. तेव्हा दिसोन आले की गुरव गैर मिरासी सेटी मजकूराने गुरव माळूमाती जडला म्हणऊन सांगितले ते खरे व सिवझाडे मोकदम यांसीही विचारिले. की कदीम मिरास कोन्हाजी ते सत्य स्मरोन सांगणे त्यासि त्याणी सांगितले की मौजे मजकूरची पाटिलकी माहाराची मिरास यैस आम्हास दाखल आहे. आमच्या वडील वडीलही सांगत आले आहेत. यैसी साक्ष दिल्ही मग मौजे मजकूरची पाटीलकी खाऊन गावची लावणी संचणी करून पाटीलकीचा एक लाजिमा पटीपासोडी गाहून मोट इनाम मान पान नेमणुका सुके असणे. गुरवाने गावीचा देव श्री नागबड सिध पुजून असावे. पाटीलकीसी अर्था अर्थी संबंध नाही. महारानी पाटीलकी खाऊन असावे. येसी पेस्तर ( पुढे ) हिलाहरकत कशील ती गोताची अन्याई दिवाणचा गुन्हेगार बमहजर सही येणेप्रमाणे महजर करून दिल्हा. त्या प्रा| आपण पाटीलकी आनभवीत असता मोरीनी गुरव याणी चिंतामणगुरवाची पाटी करून कैलासवासी माहाराज स्वामी संनिध उभा राहिला. माहाराज साहेबी पूर्वील हकीकत मनास आणून भगवत सामराज व गिरमाजी झुंगी देशपांडे पा| मजकूर यासी हुजूर आणून पुरसीस केली. त्यास त्याणी उत्तर केले की पाटीलकी मोकदमी कदीम वतन माहाराचे त्यासि मध्ये गुरवानी हुजूर फिर्याद केली होती. त्यास राजश्री परशरामपंत प्रतिनिधी याणी किले वैराटगड मोगलाकडे होता ते माहाराज धारादिव्य दिल्हे त्यावरून माहाराने किला घेऊन साहेबीस दिल्हा तेव्हाही माहार खरा जाला व गुरव खोटा जाला. त्यास देशमुख व देशपांडे याणी गोताचे साक्षीनसी महजर करून दिल्हा. त्या प्रो| माहार पाटीलकी आनभवीत आहे. गुरवास पाटीलकीच्या वतनास आर्थाआर्थी संमध नाही. त्यावरून मनास आणून मौजे मजकूरची पाटीलकी मोकदमी तुझे वतन पुरातन हा आपले वतन वंशपरंपरेने आनभवीणे म्हणऊन आज्ञा केली. त्याप्रमाणे आपण वतन आनभवीस आहे. त्यास माहाराजसाहेबी कृपाळू होऊन भोगवटीयासी पत्रे करून देऊन वंशपरंपरेने सदरहु वतन चालविले पाहिजे म्हणऊन विदित केले. यावरून मनास आणून मौजे मजकूरची पाटीलकी मोकदमी वतन पुरातन याचे. पूर्वी रांगणियाचे मुकाशी असता. याणि किले वैराटगडचे धारदिव्य याणे केले व चिरंजीव कैलासवासी याणीही जमीदारास पुरसीस करून पुरातन वतन याचे खरे केले. त्या प्रो| मौजे मजकूरची पाटीलकी मोकदमी वतन करार करून अजरामरात करून यासी वतनपत्र करून दिल्हे, तरी यासी व याचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने वतन चालवून दंडक प्रो| वतनाची सेवा याचे हाते घेणे. गुरव पाहिले पासून खोटा होत आला आहे. त्यास मौजे मजकूरचे पाटीलकी मोकदमीसी आर्थाआर्थी संमंध नाही प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणे. या पत्राची प्रती लेहून घेऊन हे पत्र भोगवाटीयासी याजवळ परतोन देणे. जाणिजे छ २ माहे सफर सु|| सलास खमसैन मया आलफ. ( १७५५ ) 


संक्षिप्त विवेचन :- हा वतनी निवाड्याचा कागद पूर्ण नाही. यातील बराचसा भाग गहाळ आहे. यामध्ये राजाराम, शाहू व ताराबाई या तीन सत्ताधीशांचा उल्लेख येतो. मूळ तंटा बहुधा राजारामाच्या कारकिर्दीत उद्भवला. त्याने निरसन झाल्यावर बहुतेक शाहूच्या काळात या वतनाच्या सनदेची उजळणी होऊन शाहूच्या पश्चात पुन्हा एकदा सनदेची उजळणी करण्यासाठी किंवा काही तंट्यामुळे हि बाब ताराबाईसमोर आली. यावेळी सातारचा छत्रपती रामराजा जरी असला तरी तो ताराबाईच्या नजरकैदेत असल्याने अशा बाबतीत निवाडे करण्याचा अधिकार तिच्याकडेच संभवतो. खेरीज पत्रातील चिरंजीव कैलासवासी  असा उलेख फक्त तीच करू शकते, रामराजा नाही.
या पत्राच्या वाचनात अनेक चुका झाल्याने काही ठिकाणी संदिग्ध उल्लेखही आढळतात. उदाहरणार्थ पूर्वी रांगणियाचे मुकाशी असता. याणि किले वैराटगडचे धारदिव्य याणे केले याच्या दोन शक्यता संभवतात. प्रथम, रांगण्याचा मोकासा असता, परंतु हा मोकासा कोणाकडे इथपासून प्रश्नास आरंभ होतो. दुसरा अर्थ असा कि, मुक्कामी / मुकामीचे मुकाशी असे वाचन झाले असावे. दुसरीच येथे ग्राह्य आहे. कारण ताराबाईचा औरंगजेब विरुद्ध लढ्याचा बराचसा काळ याच परिसरात व्यतीत झाला होता.                       

संदर्भ ग्रंथ :-
१) मराठ्यांचा इतिहास, साधन परिचय :- संपादक - अ. रा. कुलकर्णी, म. रा. कुलकर्णी, मा. रा. कंटक  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: