शनिवार, २६ मार्च, २०१६

बुराडी घाटच्या संग्रामानंतरचे जनकोजी शिंदेचे पत्र




लेखांक [ २२० ]            श्री     संवत १८१६ पौष वद्य १३ 
                                [ १६ जानेवारी १७६० ]

    राजश्री लालजी बलाल प्रांत कोटे व पा|| पाटण गोसावी यांसि.
अखडित लक्ष्मी आलकृत राजमान्य स्ने||    जनकोजी सिंदे रामराम सुमा सितेन मया अलफ. ' दिलीवरी गिलच्या व रोहिले आले. त्यांची व आमची लडाई जाली. छ २० जमावली गुरुवारे ( १० जानेवारी १७६० ) जाहली. त्यास तीर्थरूप काकाबावा यास गोळ्या लागोन लडाईतच राहिले व आम्हासही उजवे दंडावरी गोली लागली. थोडकीच असे. त्याउपर आम्ही बुनग्यात येउन सर्वही बुनगे साभाळून गांव कोट पुतली प्रांत जेपूर येथे आलो. तो येथेच राजश्री मल्हारजी बाबा होळकरही फौजसहवर्तमान आले. त्याची व आमची भेट जाहली. याउपरी बुनगे येखादे जागा लाउन आम्ही उभयता सडे फौजेनसी दिलीकडे रोहिले व गिलच्यास तबी करावयास येका दो रोजात जातो. शत्रूस नेस्तनाबूत करितो. चिंता न करणे. तुम्ही आपले मामलियात मजबूदीनेच असणे आणि आपले काम काज करीत जाणे. वरचेवरी वर्तमान लिहित जाणे. ' जाणिजे छ २६ माहे ज|ोवल. बहुत काय लिहिणे हे विनंती.
                              पै छ १७ ज|ोवल माघ वद ४
                                      [ ५ फरवरी १७६० ]

    ( पत्र जसे छापले तसे उतरवून घेण्याचा प्रयत्न केल्याची नोंद घ्यावी. )  

    विश्लेषण :- प्रस्तुत पत्र बुराडीचा संग्राम झाल्यावर सहा दिवसांनी जनकोजी शिंदेने कोटा संस्थानच्या दरबारात असलेल्या आपल्या वकिलास लिहिले आहे. यामध्ये बुराडी संग्रामाचे अगदी त्रोटक वर्णन असून स्वतः जनकोजीलाही उजव्या दंडावर गोळी लागल्याचा उल्लेख आहे. परंतु लढाईत शिकस्त होऊनही बुणग्यांसहित व्यवस्थित माघार घेत तो कोट पुतळीस आला. इथेच त्याची मल्हारराव होळकरसोबत भेट झाली. अर्थात उभयतांची प्रत्यक्ष भेट कोणत्या दिवशी व कुठे झाली याचा उल्लेख नसला तरी ज्याअर्थी प्रस्तुत पत्र १६ जानेवारी रोजी लिहिले आहे तेव्हा याच दिवशी वा आदल्या दिवशी कधीतरी उभयतांची मुलाकात झाली असावी.

    यासंदर्भात दत्ताजी शिंद्याच्या मुक्कामाचे तपशील पाहणे आवश्यक ठरेल. दि. ३० डिसेंबर १७५९ रोजी तो सोनपत जवळ होता. १० जानेवारी रोजी बुराडीच्या लढाईत तो मारला गेला तर १६ जानेवारीचे जनकोजीचे उरोक्त पत्र आहे. यावरून असे दिसून येते कि, होळकर शिंद्याच्या मदतीकरता दिल्लीकडेच चालला होता व तो येण्याच्या आत अब्दालीने आपला डाव साधून घेतला.

    बुराडीची लढाई व होळकराची भेट झाल्यावर उभयतांनी अब्दालीविरुद्ध लढण्याची फेरयोजना करून प्रथम बुणगे व कबिले सुरक्षित स्थळी पाठवून मग दिल्लीकडे चाल करण्याचा मनसुबा आखल्याचेही उपरोक्त पत्रातच नमूद केले आहे.

    लक्षात घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे सदर पत्र लालजी बल्लाळला दि. ५ फेब्रुवारी १७६० रोजी मिळाल्याची नोंद आहे.                

संदर्भ ग्रंथ :-

(१) शिंदेशाही इतिहासाची साधने ( भाग १, ३ ) :- संपादक - आनंदराव भाऊ फाळके.                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: